Sunday, September 9, 2018

सारं काही परत येतं (भाग ३)

श्रावस्ती नगरीजवळील जैतवनात गौतम बुद्धाचा निवास असतो. त्याचा संदेश ऐकण्यासाठी आलेल्या अनेक यात्रिकांची श्रावस्तीत गर्दी झालेली असते. गुरूमुखातून कुठलाही संदेश ऐकण्याची इच्छा न उरलेला, गुरूपदेशातून आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते यावर विश्वास न उरलेला सिद्धार्थ आणि गौतम बुद्धाला पाहण्यासाठी, त्याचा संदेश ऐकण्यासाठी अधीर झालेला गोविंद असे दोघे श्रावस्तीत पोहोचतात. पहिल्याच झोपडीत भिक्षा मागण्यासाठी थांबतात. तिथल्या वृद्ध स्त्रीच्या तोंडून मौन पाळणाऱ्या, एकभुक्त, पीतवस्त्रधारी, सस्मित चर्येच्या ज्ञानी गौतम बुद्धाचं वर्णन ऐकून आपला उद्धार जवळ आला आहे याची गोविंदला खात्री पटते. त्या झोपडीतून सिद्धार्थच गोविंदला जवळजवळ खेचूनच बाहेर काढतो. वनवासाची सवय झालेले पूर्वाश्रमीचे ते दोन श्रमण रात्री श्रावस्तीत आसरा शोधतात. त्यातील एक बुद्धाचा संदेश ऐकण्यासाठी आतुर असतो तर दुसरा बुद्धाला बघण्यासाठी उत्सुक असतो.

सकाळ होते. जैतवनात पीतवस्त्रधारी अनेक भिक्षू फिरत असतात. आणि त्या अनेक भिक्षूंतून गौतम बुद्ध कोण ते सिद्धार्थला प्रथम जाणवतं. उत्फुल्ल किंवा उदासीन नसलेली त्याची शांत चर्या, त्यावर विलसणारं मृदू स्मित, त्याची धीरोदात्त चाल बघून सिद्धार्थला बुद्धाची ओळख पटते. गोविंदला तो बुद्ध दाखवतो. आणि मग गोविंदलाही बुद्धाची ओळख पटते. ते दोघे दिवसभर बुद्धाच्या मागोमाग फिरतात. काहीही न शोधणारी त्याची शांत नजर, त्याची गती, अवनत दृष्टी, खाली लोंबणारा पण हेलकावे न घेणारा त्याचा एक हात; कसलीही धडपड, इच्छा, खोटेपणा किंवा कशाचाही शोध घेण्याची इच्छा नसलेली त्याची देहाकृती बघून या महात्म्याला सत्य उमगले आहे याची सिद्धार्थला खात्री पटते. इतर कुठल्याही पुरुषाबद्दल कधीही अनुभवायला न मिळालेली गौरवबुद्धी गौतम बुद्धाच्याबद्दल सिद्धार्थच्या मनात उमटते. गौतम बुद्धाचा संदेश त्यांनी कर्णोपकर्णी ऐकलेला असतो पण तरीही तो गौतम बुद्धाच्या मुखातून ऐकण्यासाठी गोविंद अजून आतूर होतो.

संध्याकाळ होते. गौतम बुद्धाचे प्रवचन सुरु होते. धीरगंभीर पण शांत आवाजात गौतम बोलू लागतो. नक्षत्रांचा मंद प्रकाश यावा तसा त्याचा स्वच्छ आणि संथ आवाज श्रोत्यांपर्यंत पोहोचत असतो. दुःख, त्याचा उगम, त्यापासून मुक्तीचा मार्ग याबद्दल बुद्ध बोलतो. आणि प्रवचन संपल्यावर बुद्धाच्या संघात प्रवेश घेण्यासाठी यात्रिकांची गर्दी होते. लाजरा बुजरा गोविंदही पुढे सरसावतो आणि भिक्षुसंघात प्रवेश द्या म्हणून गौतम बुद्धाला विनंती करतो. गोविंद भिक्षु होतो. पण सिद्धार्थ मात्र संघात प्रवेश करत नाही. गौतम बुद्धाच्या संदेशात खोट काढणे शक्य नाही अशी ग्वाही सिद्धार्थ, गोविंदला देतो. तो दुसऱ्या दिवशी जैतवन सोडून निघणार असतो. त्यामुळे गौतम बुद्धाचा संदेश ऐकून संघप्रवेश केलेला गोविंद दु:खी असतो. याउलट संघप्रवेश न केलेला सिद्धार्थ मात्र शांत असतो.

यज्ञ, व्रत वैकल्ये, उपास तापास यामुळे पापक्षालन होते हे नाकारून; कलंकहीन होण्यासाठी ब्राह्मणधर्म सोडून सिद्धार्थ श्रमण होतो. मग इंद्रियनियमन करून वासना, विकार आणि विचारांवर मिळालेला विजय तात्पुरता आहे पण त्यातून अहंभावापासून मुक्ती मिळत नाही. श्रमणमार्गातून झालेलं आत्मज्ञान अतूट शांती देत नाही, ते मादक द्रव्यांच्या सेवनामुळे मिळणाऱ्या तात्पुरत्या गुंगीसारखे आहे; म्हणून तो मार्गही सोडणारा सिद्धार्थ, बुद्धाचे प्रवचन ऐकतो. त्या विचारात खोट नाही हे मित्राला सांगतो पण दीक्षा न घेता जेव्हा तो निघून जात असतो तेव्हा लेखकाने त्याची प्रत्यक्ष बुद्धाशी गाठभेट घालून दिली आहे. मी तत्वज्ञानाचा अभ्यासक नाही पण गौतम बुद्ध आणि सिद्धार्थाचे संवाद वाचताना भारतीय तत्वज्ञान शिकायचे बाकी आहे. तत्वज्ञान रुक्ष विषय वाटत असला तरी तो तसा नाही याची हेसेंनी आणि सरदेशमुखांनी मला जाणीव करून दिली. (अर्थात अंगभूत आळशीपणामुळे अजूनही मी त्याचा अभ्यास सुरु करू शकलेलो नाही, हा भाग अलाहिदा.)

सिद्धार्थ गौतमाला म्हणतो, ‘जग म्हणजे एक शाश्वत शृंखला आहे हे बुद्धाचे मत जर मान्य केले तर मग बुद्धाने सांगितलेले निर्वाणाचे तत्व त्या शृंखलेला तोडते. म्हणजे जग एक शाश्वत शृंखला आहे हे मान्य केले तर निर्वाण अमान्य करावे लागते आणि निर्वाण होणे शक्य आहे हे मानले तर शाश्वत शृंखलेचे तत्व भंगते’. सिद्धार्थाचा हा युक्तिवाद ऐकून गौतम बुद्धाची शांती ढळत नाही. त्याला गौतमाने जे उत्तर दिले आहे ते शब्दात मांडण्याची सिद्धी माझ्याकडे नाही. त्यासाठी हेसेंचेच शब्द वाचावेत.

गौतम बुद्धाचे उत्तर पटल्यावर सिद्धार्थ पुढे विचारतो की जी शांती गौतम बुद्धाने स्वानुभवातून मिळवली आहे, त्याच शांतीचा अनुभव केवळ त्याचा उपदेश ऐकून इतरांना होऊ शकेल काय? म्हणजेच अनुभवाअंती मिळणारे ज्ञान, स्वतः जगाचा अनुभव न घेता, केवळ गुरूपदेश ऐकून कुणालाही शाश्वत शांतीचा अनुभव देऊ शकणार नाही अशी आपली खात्री पटली आहे.

सिद्धार्थाच्या या मतप्रदर्शनावर आणि आपले ज्ञान स्वतः मिळवण्याच्या त्याच्या निर्णयाचे गौतम बुद्ध स्वागत करतो. पण जाताजाता तो सिद्धार्थाला अतिचातुर्यापासून सांभाळून राहण्यास सांगतो आणि त्या दोघांचा संवाद संपतो.

सिद्धार्थही तिथून निघतो आणि त्याला जाणवतं की गौतमाने त्याचा मित्र जरी त्याच्यापासून हिरावून घेतलेला असला तरी त्याने सिद्धार्थाला सिद्धार्थाचे दान दिले आहे.

अंतिम ज्ञान आणि शाश्वत शांती शोधणारा सिद्धार्थ, पूर्वज परंपरा किंवा इंद्रियदमन किंवा गुरूपदेश या तीनही मार्गांना सोडून आता पुढे निघतो. आता त्याचा मार्ग असतो तो स्वानुभवाचा. आणि त्या मार्गावर तो आता एकटा असतो. त्याच्याबरोबर त्याचा परममित्रही नसतो.

माझं एक फार आवडतं वाक्य आहे, ‘जेव्हा शिष्य तयार होतो तेव्हा गुरु अवतरतो’. बुद्धसंदेश ऐकण्यापूर्वीची गोविंदची आतुरता आणि बुद्धसंदेश ऐकण्यासाठी सिद्धार्थचा निरुत्साह वाचून मला वाटू लागलं होतं की बुद्धभेटीनंतर गोविंद आणि सिद्धार्थची साथ सुटणार. आणि तसेच झाल्यावर माझा इगो थोडा सुखावला होता. पण त्यानंतर बुद्ध आणि सिद्धार्थाचे संवाद वाचून, या पुस्तकाची किल्ली आपल्या हातात आली आहे हा माझा फाजील विश्वास आपोआप नाहीसा झाला आणि पुढे काय होणार? याबद्दलची माझी उत्सुकता वाढली.

Sunday, September 2, 2018

सारं काही परत येतं (भाग २)

कुशाग्र बुद्धिमत्तेच्या आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या सिद्धार्थचे वडील एक वेदशास्त्रपारंगत ब्राह्मण. आपल्या मातापित्यांच्या लाडक्या सिद्धार्थाची यज्ञविधीतील निपुणता आणि अर्थ समजून वेदपठण करण्याच्या त्याच्या सवयीमुळे सिद्धार्थ सगळ्यांच्या कौतुकास पात्र झालेला असतो. आपला मुलगा ब्रह्मर्षी होणार याची वडिलांना खात्री असते. गोविंद हा सिद्धार्थचा जीवश्च कंठश्च मित्र. इतका जवळचा की जणू सिद्धार्थची सावली. अर्थ समजून न घेता केवळ उच्चारवात वेदमंत्रांचे पठण करून अहंकाराने भरलेल्या ब्राह्मणांच्या कळपात कुठल्याही परिस्थितीत सिद्धार्थ शिरणार नाही याची गोविंदला खात्री आणि त्यांच्यात सहभागी व्हायला गोविंदही नाराज असतो. सगळ्यांच्या कौतुकास पात्र असलेला आणि तरुणींच्या हृदयात कामव्यथा जागवणाऱ्या सिद्धार्थचं मन मात्र अशांत असतं.

अर्घ्यदानाने पापक्षालन कसं काय होणार? जर विविध रूपात प्रकटलेला तो परमात्मा एकंच असेल तर मग त्याच्या विविध रूपांची आराधना करून त्या परमतत्वाचे ज्ञान कसे होणार? मनात उमटणाऱ्या सर्व विकार, विचार आणि वासनांचे शमन केवळ आराधनेने कसे होणार? आणि यज्ञ, याग, उपास, व्रत, वैकल्ये यामुळे पापक्षालन होत असले हे मान्य केले तरी पाप पुन्हा पुन्हा उत्पन्न का होते? ज्यांनी आपला आत्मा म्हणजेच जग हे सत्य जाणून घेतले, ज्यांनी निद्रावस्थेत परमसत्याचा अनुभव घेतला आणि जागृतावस्थेत ज्यांच्या हातून पुन्हा कुठलेही पाप घडले नाही, असे ज्ञानी ऋषी कुठे भेटतील? त्यांच्या हृदयी वसत असलेल्या असीम शांततेचा उद्भव आपल्या ठायी करून घेण्यासाठी काय करावे लागेल? कलंकहीनाला पापक्षालन ते कसले; म्हणून कलंकहीन व्हायचा मार्ग कोणता? या प्रश्नांनी सिद्धार्थला अशांत केलेले असते. आणि एक दिवस त्याच्या नगरातून श्रमणांचा तांडा जातो. विरक्त जीवन जगणारे, तहान-भूक आणि अन्य शारीरजाणिवांचे चोचले न पुरवता सर्व देहोपभोगांना कस्पटासमान लेखून, वासनांना पायदळी तुडवून जगणारे श्रमण पाहून सिद्धार्थाला जणू त्याच्या प्रश्नांचं उत्तर मिळतं. ‘आत्मसंयमन’.

आणि तो गोविंदला आपला निग्रह सांगतो. श्रमण होण्याचा. वडिलांची परवानगी घेण्यासाठी तो त्यांच्याकडे जातो. अपेक्षेनुसार वडील परवानगी नाकारतात. त्याच्यावर चिडतात. त्याला निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. पण सिद्धार्थाचा निर्णय झालेला असतो. तो पुन्हा पुन्हा नम्रपणाने परवानगी मागत राहतो. ‘माझी परवानगी न मिळाल्यास तू काय करशील? विनापरवानगी जाशील का?’, वडिलांच्या या प्रश्नाला नकारार्थी उत्तर देऊन सिद्धार्थ त्यांना निरुत्तर करतो. रात्रभर आपल्या कक्षाबाहेर परवानगीची वाट पाहत निश्चल उभा राहिलेल्या आपल्या मुलाला पाहून वडिलांना कळून चुकते की आपला मुलगा मनाने कधीच श्रमण झालेला आहे. आता तो आपल्याबरोबर थांबला तरीही ते केवळ शरीर असेल. त्यात पूर्वीचा सिद्धार्थ नसेल. म्हणून ते जड अंतःकरणाने श्रमणांबरोबर जाण्यास परवानगी देतात.

इथे मला जी ए कुलकर्णींचा ऑर्फियस आठवला. युरीडीसीला मृत्युदेवतेच्या राज्यातून परत पृथ्वीलोकात घेऊन चाललेल्या ऑर्फियसला जेव्हा जाणवतं की मृत्यूपूर्वीची युरीडीसी आणि आताची युरीडीसी वेगळी आहे, तेव्हा तो मागे वळून पाहतो, मृत्युदेवतेच्या अटीचा भंग करतो आणि त्याच्या लाडक्या युरीडीसीला परत पाठवतो, कारण त्याला जाणवलेलं असतं की आता त्याच्याबरोबर येतंय ते युरीडीसीचं शरीर. त्यातील मन पूर्णपणे बदललेलं आहे.

आपल्या कक्षाबाहेर परवानगीची वाट पाहात निश्चल उभ्या राहणाऱ्या सिद्धार्थला पाहून त्याच्या वडिलांनाही ऑर्फियससारखाच साक्षात्कार झालेला असावा. ते परवानगी देतात आणि म्हणतात, ‘वनात जा आणि श्रमण हो. तिथे सुखसर्वस्व सापडलं तर परत ये आणि माझा गुरु हो. तिथंही मृगजळच दिसलं तर परत ये आपण दोघे मिळून देवांना यज्ञाहुती देऊ’

सिद्धार्थ निघतो आणि त्याच्याबरोबर त्याची सावलीदेखील असते. गोविंद. त्यानेही घर सोडलेलं असतं. तोही सिद्धार्थाबरोबर श्रमण होण्यास निघतो. सिद्धार्थ सगळं काही सोडून निघतो पण त्याचा मित्र मात्र त्याच्याबरोबर असतो. जणू त्याचा भूतकाळ अजूनही त्याच्यासोबत असतो.

सिद्धार्थ श्रमण होतो. शारिरवासनांकडे तुच्छतेने बघू लागतो. शरीरोपभोगांच्या मागे लागलेल्या सामान्य जनतेकडे तुच्छतेने पाहू लागतो. वासनांमुळे पाप आणि मग पापक्षालनासाठी व्रत वैकल्ये या चक्रातून सुटण्याची त्याची धडपड चालू होते. आत्मसंयमनाच्या श्रमणांच्या सर्व विद्या तो शिकून घेतो. गोविंदही या मार्गावर सिद्धार्थच्या खांद्याला खांदा लावून चालत असतो. गोविंद आनंदी असतो पण सिद्धार्थमात्र अशांत.

सिद्धार्थाच्या मते अहंभाव विसरण्याचे श्रमणांचे सर्व मार्ग अहंभावापासून क्षणिक मुक्ती देतात. ज्याप्रमाणे एखादा मद्यपी मद्याच्या अमलाखाली स्वतःला विसरतो आणि मद्याचा अंमल ओसरला की पुन्हा नेहमीसारखा होतो त्याप्रमाणेच सिद्धार्थ समाधीअवस्थेत असताना अहंभाव विसरतो पण समाधीअवस्था ओसरली की पुन्हा त्याच अहंभावाने ओतप्रोत भरून जातो. त्याला जाणवते की त्याचे गुरूंनीदेखील अहंभावापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळवलेली नाही. आणि त्याला आंतरिक शांतीसाठी श्रमणांचा आत्मसंयमनाचा मार्ग तोकडा वाटू लागतो.

त्यातच शाक्यवंशातील एक महानुभाव; ज्याने जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवली आहे, ब्राह्मणपुत्र आणि राजपुत्र दोघेही ज्याच्या चरणी लीन होतात, अशा महाज्ञानी गौतम बुद्धाविषयी विविध वार्ता आता वनापर्यंत पोहोचू लागतात. हा बुद्ध म्हणवला जाणारा गौतम कधी काळी श्रमण होता आणि त्याने श्रमणमार्ग सोडल्यानंतर त्याला महाज्ञान प्राप्त झाले असे कळल्यामुळे सिद्धार्थच्या गुरूंच्या मनात गौतम बुद्धाबद्दल राग असतो. त्यांच्यासमोर गौतम बुद्धाबद्दल कुठलाही विषय काढलेला त्यांना पसंत नसतो.

भिक्षेसाठी नगरात गेलेल्या गोविंदला गौतम बुद्धाचा उपदेश एका घरात ऐकायला मिळतो. त्यामुळे प्रभावित होऊन परत आल्यावर तो गौतम बुद्धाचा उपदेश ऐकण्यासाठी वन सोडून मगध देशाला जाण्याची आपली इच्छा सिध्दार्थाला सांगतो. सिद्धार्थासाठी जणू ही योग्य संधी असते. ब्राह्मणधर्म सोडून आपल्याबरोबर श्रमणधर्म स्वीकारलेल्या गोविंदाने श्रमणधर्मात आनंदी असताना गौतम बुद्धाचा मार्ग ऐकायला उत्सुकता दाखवावी या संधीचा तो फायदा घेतो आणि श्रमण मार्ग सोडण्याचे ठरवतो.

बुद्धाचा संदेश ऐकण्याची गोविंदला उत्सुकता असते. याउलट प्रत्यक्ष बुध्दमुखातून संदेश न ऐकताच केवळ त्याबद्दल ऐकल्याने बुद्धाने आपल्याला श्रमणधर्माच्या कक्षेतून बाहेर खेचले. म्हणजे बुद्धसंदेश न ऐकताही त्याचे फळ आपल्या पदरात पडले आहे हे जाणवलेला सिद्धार्थ उदास हसतो आणि श्रमणमार्ग सोडण्याचा आपला निर्णय गोविंदाला सांगतो.

श्रमणमार्ग सोडण्यासाठी तो दोघांच्या वतीने वृद्ध श्रमणगुरूंकडून परवानगी मागतो. गुरु आश्चर्यचकित होतात. रागावतात. त्यामुळे त्यांनी अजून आत्मशांती मिळवलेली नाही याबद्दलचे सिद्धार्थाचे मत अजूनच पक्के होते. त्यांच्याकडूनच शिकलेल्या विद्येचा वापर करून सिद्धार्थ गुरूंच्या जिभेवर, मनावर आणि वाणीवर ताबा मिळवतो आणि श्रमणमार्ग सोडण्याची परवानगी त्यांच्या मुखातून वदवून घेतो.

वडिलांकडून परवानगी मिळवताना आज्ञापालन हा वडिलांकडून शिकलेला गुण वापरून सिद्धार्थ ब्राह्मणधर्म सोडण्याची परवानगी मिळवतो. तर श्रमण गुरूंकडून परवानगी मिळवताना सिद्धार्थ त्यांच्याचकडून शिकलेल्या परकायाप्रवेशसदृश विद्येचा वापर करतो. सिद्धार्थ निघतो. आणि जोडीला त्याची सावलीदेखील निघते. अहंभावाच्या नाशाबाबत श्रमणमार्गाचे अपयश हे सिद्धार्थाचे प्रतिपादन पटल्यामुळे गोविंदही सिद्धार्थाबरोबर निघतो.

पाण्यावरून चालण्याची विद्या आत्मसात करण्याचे नाकारून सिद्धार्थ श्रावस्ती नागरीकडे निघतो. आणि त्याच्यासोबत असतो त्याचा बालमित्र गोविंद. बदललेल्या रूपात का असेना पण अजूनही सिद्धार्थाचा भूतकाळ त्याच्याबरोबर असतो.