Sunday, September 9, 2018

सारं काही परत येतं (भाग ३)

श्रावस्ती नगरीजवळील जैतवनात गौतम बुद्धाचा निवास असतो. त्याचा संदेश ऐकण्यासाठी आलेल्या अनेक यात्रिकांची श्रावस्तीत गर्दी झालेली असते. गुरूमुखातून कुठलाही संदेश ऐकण्याची इच्छा न उरलेला, गुरूपदेशातून आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते यावर विश्वास न उरलेला सिद्धार्थ आणि गौतम बुद्धाला पाहण्यासाठी, त्याचा संदेश ऐकण्यासाठी अधीर झालेला गोविंद असे दोघे श्रावस्तीत पोहोचतात. पहिल्याच झोपडीत भिक्षा मागण्यासाठी थांबतात. तिथल्या वृद्ध स्त्रीच्या तोंडून मौन पाळणाऱ्या, एकभुक्त, पीतवस्त्रधारी, सस्मित चर्येच्या ज्ञानी गौतम बुद्धाचं वर्णन ऐकून आपला उद्धार जवळ आला आहे याची गोविंदला खात्री पटते. त्या झोपडीतून सिद्धार्थच गोविंदला जवळजवळ खेचूनच बाहेर काढतो. वनवासाची सवय झालेले पूर्वाश्रमीचे ते दोन श्रमण रात्री श्रावस्तीत आसरा शोधतात. त्यातील एक बुद्धाचा संदेश ऐकण्यासाठी आतुर असतो तर दुसरा बुद्धाला बघण्यासाठी उत्सुक असतो.

सकाळ होते. जैतवनात पीतवस्त्रधारी अनेक भिक्षू फिरत असतात. आणि त्या अनेक भिक्षूंतून गौतम बुद्ध कोण ते सिद्धार्थला प्रथम जाणवतं. उत्फुल्ल किंवा उदासीन नसलेली त्याची शांत चर्या, त्यावर विलसणारं मृदू स्मित, त्याची धीरोदात्त चाल बघून सिद्धार्थला बुद्धाची ओळख पटते. गोविंदला तो बुद्ध दाखवतो. आणि मग गोविंदलाही बुद्धाची ओळख पटते. ते दोघे दिवसभर बुद्धाच्या मागोमाग फिरतात. काहीही न शोधणारी त्याची शांत नजर, त्याची गती, अवनत दृष्टी, खाली लोंबणारा पण हेलकावे न घेणारा त्याचा एक हात; कसलीही धडपड, इच्छा, खोटेपणा किंवा कशाचाही शोध घेण्याची इच्छा नसलेली त्याची देहाकृती बघून या महात्म्याला सत्य उमगले आहे याची सिद्धार्थला खात्री पटते. इतर कुठल्याही पुरुषाबद्दल कधीही अनुभवायला न मिळालेली गौरवबुद्धी गौतम बुद्धाच्याबद्दल सिद्धार्थच्या मनात उमटते. गौतम बुद्धाचा संदेश त्यांनी कर्णोपकर्णी ऐकलेला असतो पण तरीही तो गौतम बुद्धाच्या मुखातून ऐकण्यासाठी गोविंद अजून आतूर होतो.

संध्याकाळ होते. गौतम बुद्धाचे प्रवचन सुरु होते. धीरगंभीर पण शांत आवाजात गौतम बोलू लागतो. नक्षत्रांचा मंद प्रकाश यावा तसा त्याचा स्वच्छ आणि संथ आवाज श्रोत्यांपर्यंत पोहोचत असतो. दुःख, त्याचा उगम, त्यापासून मुक्तीचा मार्ग याबद्दल बुद्ध बोलतो. आणि प्रवचन संपल्यावर बुद्धाच्या संघात प्रवेश घेण्यासाठी यात्रिकांची गर्दी होते. लाजरा बुजरा गोविंदही पुढे सरसावतो आणि भिक्षुसंघात प्रवेश द्या म्हणून गौतम बुद्धाला विनंती करतो. गोविंद भिक्षु होतो. पण सिद्धार्थ मात्र संघात प्रवेश करत नाही. गौतम बुद्धाच्या संदेशात खोट काढणे शक्य नाही अशी ग्वाही सिद्धार्थ, गोविंदला देतो. तो दुसऱ्या दिवशी जैतवन सोडून निघणार असतो. त्यामुळे गौतम बुद्धाचा संदेश ऐकून संघप्रवेश केलेला गोविंद दु:खी असतो. याउलट संघप्रवेश न केलेला सिद्धार्थ मात्र शांत असतो.

यज्ञ, व्रत वैकल्ये, उपास तापास यामुळे पापक्षालन होते हे नाकारून; कलंकहीन होण्यासाठी ब्राह्मणधर्म सोडून सिद्धार्थ श्रमण होतो. मग इंद्रियनियमन करून वासना, विकार आणि विचारांवर मिळालेला विजय तात्पुरता आहे पण त्यातून अहंभावापासून मुक्ती मिळत नाही. श्रमणमार्गातून झालेलं आत्मज्ञान अतूट शांती देत नाही, ते मादक द्रव्यांच्या सेवनामुळे मिळणाऱ्या तात्पुरत्या गुंगीसारखे आहे; म्हणून तो मार्गही सोडणारा सिद्धार्थ, बुद्धाचे प्रवचन ऐकतो. त्या विचारात खोट नाही हे मित्राला सांगतो पण दीक्षा न घेता जेव्हा तो निघून जात असतो तेव्हा लेखकाने त्याची प्रत्यक्ष बुद्धाशी गाठभेट घालून दिली आहे. मी तत्वज्ञानाचा अभ्यासक नाही पण गौतम बुद्ध आणि सिद्धार्थाचे संवाद वाचताना भारतीय तत्वज्ञान शिकायचे बाकी आहे. तत्वज्ञान रुक्ष विषय वाटत असला तरी तो तसा नाही याची हेसेंनी आणि सरदेशमुखांनी मला जाणीव करून दिली. (अर्थात अंगभूत आळशीपणामुळे अजूनही मी त्याचा अभ्यास सुरु करू शकलेलो नाही, हा भाग अलाहिदा.)

सिद्धार्थ गौतमाला म्हणतो, ‘जग म्हणजे एक शाश्वत शृंखला आहे हे बुद्धाचे मत जर मान्य केले तर मग बुद्धाने सांगितलेले निर्वाणाचे तत्व त्या शृंखलेला तोडते. म्हणजे जग एक शाश्वत शृंखला आहे हे मान्य केले तर निर्वाण अमान्य करावे लागते आणि निर्वाण होणे शक्य आहे हे मानले तर शाश्वत शृंखलेचे तत्व भंगते’. सिद्धार्थाचा हा युक्तिवाद ऐकून गौतम बुद्धाची शांती ढळत नाही. त्याला गौतमाने जे उत्तर दिले आहे ते शब्दात मांडण्याची सिद्धी माझ्याकडे नाही. त्यासाठी हेसेंचेच शब्द वाचावेत.

गौतम बुद्धाचे उत्तर पटल्यावर सिद्धार्थ पुढे विचारतो की जी शांती गौतम बुद्धाने स्वानुभवातून मिळवली आहे, त्याच शांतीचा अनुभव केवळ त्याचा उपदेश ऐकून इतरांना होऊ शकेल काय? म्हणजेच अनुभवाअंती मिळणारे ज्ञान, स्वतः जगाचा अनुभव न घेता, केवळ गुरूपदेश ऐकून कुणालाही शाश्वत शांतीचा अनुभव देऊ शकणार नाही अशी आपली खात्री पटली आहे.

सिद्धार्थाच्या या मतप्रदर्शनावर आणि आपले ज्ञान स्वतः मिळवण्याच्या त्याच्या निर्णयाचे गौतम बुद्ध स्वागत करतो. पण जाताजाता तो सिद्धार्थाला अतिचातुर्यापासून सांभाळून राहण्यास सांगतो आणि त्या दोघांचा संवाद संपतो.

सिद्धार्थही तिथून निघतो आणि त्याला जाणवतं की गौतमाने त्याचा मित्र जरी त्याच्यापासून हिरावून घेतलेला असला तरी त्याने सिद्धार्थाला सिद्धार्थाचे दान दिले आहे.

अंतिम ज्ञान आणि शाश्वत शांती शोधणारा सिद्धार्थ, पूर्वज परंपरा किंवा इंद्रियदमन किंवा गुरूपदेश या तीनही मार्गांना सोडून आता पुढे निघतो. आता त्याचा मार्ग असतो तो स्वानुभवाचा. आणि त्या मार्गावर तो आता एकटा असतो. त्याच्याबरोबर त्याचा परममित्रही नसतो.

माझं एक फार आवडतं वाक्य आहे, ‘जेव्हा शिष्य तयार होतो तेव्हा गुरु अवतरतो’. बुद्धसंदेश ऐकण्यापूर्वीची गोविंदची आतुरता आणि बुद्धसंदेश ऐकण्यासाठी सिद्धार्थचा निरुत्साह वाचून मला वाटू लागलं होतं की बुद्धभेटीनंतर गोविंद आणि सिद्धार्थची साथ सुटणार. आणि तसेच झाल्यावर माझा इगो थोडा सुखावला होता. पण त्यानंतर बुद्ध आणि सिद्धार्थाचे संवाद वाचून, या पुस्तकाची किल्ली आपल्या हातात आली आहे हा माझा फाजील विश्वास आपोआप नाहीसा झाला आणि पुढे काय होणार? याबद्दलची माझी उत्सुकता वाढली.

No comments:

Post a Comment