Friday, January 26, 2018

रिच डॅड पुअर डॅड (भाग २)

-----------

माझ्या मुलांनी माझे बरेच गुण उचलले आहेत. त्यातले ‘नेमके नको ते गुण’ उचलले आहेत असं ही म्हणत असते. ही म्हणते ते सगळं बरोबर असतं याचा प्रत्यय मला थोड्याच दिवसांत आला.

मी बऱ्यापैकी खरं बोलतो. म्हणजे कित्येक गोष्टीत खोटं बोलून काय मिळणार ते मला कळत नाही म्हणून मी खरं बोलत असावा. शाळाकॉलेजात असताना काही मित्र मंडळी कधीही विचारलं ‘अभ्यास झाला का?’ तर कायम खांदे पाडून चेहरा गंभीर आणि रडका करून किती अभ्यास बाकी राहिला आहे त्याबद्दल सांगायचे. मी मात्र लगेच ‘अभ्यास झाला’ असं सांगून मोकळा व्हायचो. कारण थोडाफार का होईना पण अभ्यास झालेला असायचा. पण नंतर रिझल्टच्या वेळी ही खांदेपाडू मंडळीच जास्त मार्क घेऊन जायची. आणि वर विचारलं तर सांगायची की पेपर सोप्पा आला म्हणून बचावलो नाहीतर काशी झाली असती. मला जास्त मार्क मिळाले तर मी मात्र हे श्रेय माझ्या हुशारीला, सातत्याला द्यायचो. पुढे मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स सौंदर्यस्पर्धा बघितल्यावर आईवडील आणि गुरुजनांच्या आशीर्वादालाही देऊ लागलो. पण मुद्दा हा की कुणी काही विचारलं की मी बऱ्यापैकी खरं सांगतो.

साधारणपणे मला एक गोष्ट जाणवली आहे की प्रेम झालं असेल, लग्न ठरत असेल, घरी पाळणा हलणार असेल किंवा मग नवीन गाडी येणार असेल तर लोक कमालीची गुप्तता बाळगतात. चोरी किंवा खून केला तर जसं लपवावं तसं याबाबतीत कमालीची गुप्तता बाळगतात. कालांतराने सत्य जगासमोर आलं की मग पेढे वाटतात (म्हणजे चोरी / खुनाचे नाही पण लग्न ठरणे / पाळणा हलणे/ गाडी येणे वगैरेचे. तुलना चुकली बहुतेक. पण गुप्तता तशीच असते.). त्या दिवशी गाडी बुक करून घरी आलो तर सोसायटीत शिरताच पोरांच्या मित्रांनी त्यांना विचारलं, ‘काय रे, कुठे गेला होतात? आम्ही वाट बघत होतो. फुटबॉल हवा होता तुमच्याकडचा’.

यावर आमच्या दोन्ही लेकांनी दवंडी पिटायला मिळावी अशी गेल्या जन्मी पाहिलेली स्वप्न या जन्मी पूर्ण करण्याच्या आविर्भावात दहाव्या मजल्याला स्पष्ट ऐकू जाईल अश्या आवाजात आमच्या एर्टिगाची बातमी जाहीर केली. मला फार कौतुक वाटलं. नेहमी खरे बोलावे या शिकवणुकीचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव पाहून माझी मुले संस्कारक्षम आहेत आणि मी उत्तम संस्कार करू शकतो यावरच माझा विश्वास वाढला. आणि त्याच आनंदात मी माझ्या सगळ्या मित्र मैत्रीणीना, नातेवाईकांना गाडी बुक केल्याची बातमी कळवून टाकली. सगळीकडून होणाऱ्या कौतुकाच्या वर्षावाने मी इतका खूष झालो होतो चंद्रावरून पाहणाऱ्या माणसाला देखील असं वाटलं असतं की यांनी मारुतीची फॅक्टरी विकत घेतली आहे की काय? माझ्या हिला भीती वाटू लागली की या आनंदाच्या भरात अभिनंदन करणाऱ्याला मी मोत्याचा कंठा देण्याचं वचन वगैरे देतो की काय. दोन तीन दिवस असे कौतुकसोहळ्यात गेले.

मग कळलं की आपण जुन्या गाडीचं आरसीबुक हरवू नये म्हणून इतकं जपून ठेवलं आहे की ते कुठे ठेवलं आहे तेच लक्षात येत नसल्याने ते चोरांपासूनच नव्हे तर आपल्या स्वतःच्या हातांपासूनही दूर सुरक्षित आहे. मग संपूर्ण घर उलथं पालथं करून झाल्यावर आणि ‘म्हणून म्हणत होते, माझ्याकडे देत देत जा. एक गोष्ट नीट ठेवाल तर शपथ’ या वाक्याची १०१ पारायणे बायकोने पूर्ण केल्यानंतर शेवटी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरसीबुक हरवण्याची तक्रार द्यायला गेलो. माझ्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघून किंवा मग हिच्या वैतागलेल्या चेहऱ्याकडे बघून मला पुरेशी शिक्षा झालेली आहे हे कळल्यामुळे असेल कदाचित, पण पोलिसदादांनी मला लगेच तक्रारीची प्रत दिली. तिथून निघताना मी काहीतरी बोलायचं म्हणून हिला म्हणालो, ‘बघ, आपलं सगळं व्यवस्थित असलं की सरकारी कार्यालयातपण आपली काम कशी चटकन होतात.’ यावर ती काही न बोलता गप्प राहिली. मग मी पण गप्प राहिलो. माझा स्वभावंच तसा आहे, बायकोसमोर फार काही न बोलण्याचा.

आरसीबुकच्या मागे आम्हा दोघांची दोन तीन आठवडे धावपळ चालू होती. आणि इथे रोज एकेकाचे प्रश्न येऊ लागले. ‘काय मग, केव्हा येणार गाडी?’ सुरवाती सुरवातीला मी मोठ्या तत्परतेने आणि उत्साहाने उत्तर देत होतो. पण तीन आठवडे झाले तरी दुकानातून फोन आला नाही मग माझ्या उत्साहाला थोडी ओहोटी लागली. तेवढ्यात सोसायटीतल्या एका मित्राने कुठलाही गाजावाजा न करता होंडा सिटी आणली आणि पेढे द्यायला घरी आला. जेव्हा त्याने सांगितलं की त्याला बारा दिवसात डिलिव्हरी मिळाली तेव्हा मात्र इतके दिवस शांत असलेल्या हिचा धीर खचला. त्यांना बारा दिवसात मिळाली, आपल्याला मात्र एकवीस दिवसांनीही नाही. साधा फोनही नाही येत दुकानातून. आरसीबुक प्रकरणात तिला झालेल्या मनस्ताप आणि धावपळीचा राग शेवटी कारच्या दुकानावर निघाला. तेव्हा कळलं की जीएसटी मध्ये एसयूव्ही कार्सवर होऊ घातलेल्या तरतुदींमुळे मारुतीची देशभरात तुफान बुकिंग झाली होती. त्यामुळे आमच्या गाडीला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागणार होता.

दिवसामागून दिवस जात होते. चौकश्या वाढू लागल्या. समोर आल्यावर गाडीची चौकशी करणारे लोक आता फक्त चौकशी करण्यासाठी समोर येत आहेत की काय असे मला वाटू लागले. ग्रुपव्यतिरिक्त कधी माझ्याशी स्वतंत्र न बोलणारे मित्र आणि मैत्रिणी आता स्वतंत्र मेसेज करून ‘आला का रे तुझा रथ?’ वगैरे विचारपूस करू लागले. शेवटी शेवटी तर मला माझी गाडी म्हणजे गंगा आणि मी म्हणजे भगीरथ आहे असं वाटू लागलं. माझे नको ते गुण मुलं घेतात हे माझ्या बायकोचे मत मला या सततच्या चौकश्यांमुळे पटले. मित्रांनी फुटबॉल मागितल्यावर त्यांच्यासमोर आपण गाडी बुक केल्याची दवंडी पिटायची त्यांना काही गरज नव्हती असं मला वाटून गेलं. पण मग नंतर आपणही हिरीरीने तेच केलं आहे हे कळून मी गप्प बसलो.

अशात एक दिवस भावाकडे गेलो असताना त्याने मुलांना रात्री मरिन ड्राईव्हवर फिरवून आणलं. ग्लास टॉप बाजू करून खांद्यापर्यंत शरीर बाहेर काढून रात्रीच्या रस्त्यावर फिरून मुलं इतकी खूष झाली होती की त्यांनी मला तो सगळा अनुभव रंगवून सांगितला. आपल्या गाडीला ग्लास टॉप नाही याची मला आठवण झाली आणि एकदम पुअर डॅड असल्यासारखं वाटलं. मुलांचा नंतर भ्रमनिरास होऊ नये म्हणून आपल्या कधी ना कधीतरी येणाऱ्या गाडीची वैशिष्ट्ये त्यांना सांगितल्यावर दोघेही म्हणाले बाबा आम्हाला तुझ्याबरोबर मरीन ड्राईव्हला जायचंय. तू पण पाहिजेस आणि काका पण पाहिजे. हे ऐकल्यावर माझ्यातला पुअर डॅड कुठल्याकुठे पळून गेला आणि मी रिच डॅड असावा यावर विश्वास ठेवावासा वाटू लागला. मग गंगावतरण झाल्यावर अख्ख्या कुटुंबाला मरीन ड्राईव्हला घेऊन जाण्याचं वचन भगीरथाने स्वतःहून दिलं.

No comments:

Post a Comment