Saturday, February 16, 2019

लिपस्टिक, क्लब महिंद्रा, दिवसकार्य आणि युद्ध

माझ्या हिच्या माहेरच्या अशिक्षित मोलकरणीला तिथे काम करत २५-३० वर्ष झालीत. माझ्या बायकोचं तिला फार कौतुक. आपल्या एकुलत्या एक लेकीला हिच्यासारखंच वाढवायचं तिचं स्वप्न होतं. सगळी कमाई लेकीच्या कपड्यांवर, लिपस्टीकवर, हेअरपिन, बांगड्या आणि इअरिंग्जवर खर्च करायची. आपल्या लेकीचे तसेच लाड करायची जे माझ्या सासूबाई स्वतःच्या लेकीचे करायच्या. तिच्या लेकीनेही प्रेमविवाह केला अगदी माझ्या बायकोसारखाच. फक्त एक गोष्ट राहून गेली, शिक्षणावर खर्च करायचा मात्र ती विसरली. आता मुलगी आणि जावयाला पोसण्यासाठी म्हातारी मोलकरीण राबते आहे आणि मुलगी - जावई टिव्ही हवा, बाईक हवी म्हणून हट्ट करत आहेत. मोलकरणीचं कर्ज काही फिटत नाही.

परिस्थितीने यथातथा असलेल्या आणि जेमतेम ग्रॅज्युएट झालेल्या एका नोकरदार मित्राने परवडत नसताना, इतरांचं बघून आणि घरच्यांच्या भरीस पडून क्लब महिंद्राची मेंबरशिप घेतली. गेल्या तीन वर्षात एकदाच गेला फिरायला तेही लोणावळ्याला कारण प्रवासखर्च परवडत नाही. अजून क्लब महिंद्राचे कर्जाचे हफ्ते फेडतोय.

खाऊन पिऊन सुखी असलेल्या एका ज्येष्ठ नातेवाईकाच्या अतीवृध्द आईचा देहांत झाला. सगळं काही रीतीरिवाजाप्रमाणे व्हावं म्हणून दिवसकार्य कर्ज काढून केलं. मुलाच्या उच्चशिक्षणासाठी आता पैसे कमी पडताहेत म्हणून डोक्याला हात लावून बसला आहे.

हे सगळे भारतीय आहेत. दुसऱ्याचं बघून स्वतःला न परवडणाऱ्या गोष्टी करणारी अशीच अनेक लोकं इंग्लंड अमेरिकेतही असतील.

त्यांचे देश हवं तेव्हा हवं तिथे हव्या त्या कारणांवरून युध्द करु शकत असतील. पण त्यांचे देश माझ्या सासुरवाडीइतके किंवा क्लब महिंद्रा परवडणाऱ्या किंवा भपकेबाज दिवसकार्य परवडणाऱ्या घरांइतके संपन्न आहेत. आणि पुराणकाळातील विमानविद्या आणि प्लॅस्टिक सर्जरी करु शकणाऱ्या आपल्या देशाला वर्तमानात मात्र विदेशातून तोफा आणि विमानं आयात करावी लागत आहेत.

आणि फेसबुकवरचे सुशिक्षित भारताने युद्ध करावे असा निर्वाळा देत आहेत. कारण इतर शस्त्रसंपन्न आणि तंत्रसंपन्न देश करु शकतात तर आम्ही का नाही?

आपल्या देशाला जगाचं स्वेटशॉप (मोलकरणींचा देश) म्हणतात ते योग्य ठरवायच्या मागे आपण सगळे लागलो आहोत की काय?, अशी शंका येते मनात.

ध्रुवतारा आणि काश्मीर

वर्गात शिकवताना मुलांना सांगतो की कंपनीकडे दोन ध्येय असली पाहिजेत.

पहिलं असतं लांबचं, अढळ, ध्रुव ताऱ्यासारखं. मग मी गमतीत म्हणतो की ध्रुव तारा फक्त दिशा दाखवतो. आपण कितीही चालत राहिलो तरी ध्रुव ताऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण म्हणून ध्रुव ताऱ्याला नजरेआड होऊ द्यायचा नाही.

दुसरं ध्येय तत्कालीन असतं. अढळ ध्येयाचा दिशेने जाताना त्या काळात ज्या अडचणी असतील त्यांना लक्षात घेऊन कधी मूळ दिशेच्या विरुद्ध जाऊन कधी आडवं तिडवं जाऊन पुन्हा मूळ दिशा पकडायची असते.

अतिरेक्यांचं अंतिम ध्येय काश्मीरवर स्वतःची सत्ता असू शकतं किंवा पाकिस्तानची सत्ता असू शकतं किंवा भारत सरकारला कायमची डोकेदुखी असू शकतं. त्यांची तात्कालिक ध्येयंही भारतीय लष्करावर हल्ले करून दहशत पसरवणे हीच दिसतात.

आपली अंतिम ध्येय काय आणि तात्कालिक ध्येय काय हे आपल्याला कळलं पाहिजे. जर कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या पोकळ वल्गनांना बळी पडून आपण काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे आणि तेथील लोक भारतीय नागरिक आहेत, त्यांच्या जीवनात शांती स्थैर्य असणे अंतिमतः आपल्या हिताचे आहे, हे विसरणार असू तर आपण विश्वगुरु. महासत्ता बनण्याच्या लायकीचे नाही. इतकंच काय आपण ज्या कंपन्यांत काम करतो त्यांच्या नफ्याला आणि प्रगतीला आपण अजिबात कारणीभूत नसून केवळ वरिष्ठ व्यवस्थापन चांगलं आहे आणि आपल्याला विचारत नाही म्हणून आपलं बरं चाललंय असं खुशाल समजावं.

इंग्लंड, अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि इस्त्राएलला युध्द करणं परवडतं कारण शस्त्रास्त्रनिर्मितीचे कारखाने आणि तंत्रज्ञान त्यांचं आहे. आपलं काय आहे? आपल्या भूमीवर लढल्या जाणाऱ्या गनिमी काव्याच्या आणि आत्मघातकी पथकाच्या युद्धाला तोंड द्यायला आपण प्रथम पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वाचाळपणाला आवर घातला पाहिजे आणि आपल्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षमतेला इतकं सशक्त बनवलं पाहिजे की पाकव्याप्त काश्मीरच्या जनतेलाही भारतात सामील व्हावंसं वाटावं.

आणि आर्चिजने कात टाकली

त्याकाळी हिमालय बुटका होता.

त्याकाळीही भारतात वास्तुशास्त्र होते. पण हिमालय बुटका असल्याने चिन्यांनी ते इथे येऊन चोरले. 'आंतरराष्ट्रीय कॉपीराईटचा प्रॉब्लेम नको म्हणून काय करावे?', या विचारात चीनी चोर असताना तिथल्या एका चोराला कळलं की भारताच्या उत्तरेला असणारा हिमालय चीनच्या दक्षिणेला आहे. मग त्यांनी भारतीय वास्तुशास्त्रातील सर्व दिशांचे गुण उलटे करुन त्याचे नाव ठेवले फेंग शुई.

फेंग शुई वापरुन चीन संपन्न झाला. त्या संपन्नतेत तिथल्या लोकांनी फटाक्यांचा शोध लावला. ज्याप्रमाणे भारतीय करदात्यांचा पैसा वापरून उभारलेल्या पुतळ्यांना भारतीय लोकांनी तिकिट काढून भेट देऊन भारतीय अर्थव्यवस्था सुधारली त्याप्रमाणे चीनचे फटाके चीनी लोकांना विकून चीनची अर्थव्यवस्था सुधारली.

पण अॉक्टोबर नोव्हेंबरमधे भारतात हिवाळा म्हणजे चीनमधे उन्हाळा (कारण त्यांचं फेंग शुई आपल्यापेक्षा उलटं). त्यामुळे तेव्हा तिथले काही फटाके व्यापारी उन्हाची काहिली कमी करण्यासाठी हिमालय चढून जायचे. एकदा एक व्यापारी वर चढल्यावर घाबरला आणि घसरुन भारताच्या साईडला पडला.

आणि त्याला कळलं की त्याकाळी भारतात फटाके नव्हते. मग चीनला भारतीय बाजारपेठ खुणावू लागली आणि चीनचे व्यापारी भारतात फटाके विकायला येऊ लागले.

त्याकाळच्या आर्चीज् गॅलरीत हे फटाके विकायला असायचे. लाल रंगाच्या कापडाखाली असलेल्या लाकडी पायऱ्यांच्या फर्निचरवर मांडून ठेवलेले चीनी फटाके मोठे लोभसवाणे आणि आकर्षक दिसायचे. तरुण मुलं मुली फटाके विकत घ्यायला वर्षभराचा पॉकेटमनी वाचवून ठेवायचे आणि मग दिवाळीत बागेत जाऊन जोडीने फटाके फोडायचे. जर फटाका फुटला, रॉकेट उडाले, भुईचक्र फिरले किंवा पाऊस न फुटता बरसला तर ती जोडी पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत टिके, नाहीतर मग बागेतच इतर उपलब्ध पर्याय शोधले जात.

काही मुलामुलींचे पालक वर्षभर पॉकेटमनी देत नसल्याने असे तरुण तरुणी बागेच्या आजूबाजूला फिरुन रोषणाई बघत आणि आपल्याला जे करायला मिळत नाही ते करायची आपली इच्छाच नाही असं स्वतःला आणि बरोबर फिरणाऱ्या मित्र मैत्रीणींना पटवून देत.

त्याकाळच्या काही भारतीय संघटनांना भारतीय संस्कृतीवरील हे चीनी आक्रमण पटत नव्हतं. त्यांना बागेबाहेरच्या लोकांतून पुरेसा पाठिंबा मिळू लागल्यावर त्यांनी संस्कृतीरक्षण मोहीम सुरू केली. बागेत जमलेल्या लोकांच्या फटाक्यांवर पाणी ओतणे, रॉकेट हातात फोडायला लावणे वगैरे उद्योग सुरू केले. त्याकाळच्या प्रसिद्धी माध्यमांना चघळायला विषय मिळाला. फटाके फोडायला न मिळणारे लोक त्याकाळच्या व्हॉटस अॅपवर त्याकाळच्याआधीच्या काळच्या भगतसिंग राजगुरु सुखदेव आणि मंडळींना फाशी देऊ लागले.

त्याकाळच्या आसाराम बापूंनी मातापित्यांना बरोबर घेऊन बागेत जाऊन फटाक्याच्या आवाजाच्या वरताण आवाज होईल अशा टाळ्या वाजवा असे सल्ले आपल्या भक्तांना दिले. एकीकडे बंडखोर तरुण फटाके वाजवत आहेत, दुसरीकडे संस्कृतीरक्षक तरुण पाणी घेऊन धावत आहेत आणि तिसरीकडे आईबाबांसहीत इतर तरुण टाळ्या वाजवीत आहेत असं चित्र दिसू लागलं.

पण चायनीज फटाक्यांची रोषणाई इतकी जबरदस्त होती की कित्येकदा पाण्याची बादली बाजूला ठेवून संस्कृतीरक्षकही टाळ्या वाजवू लागत. त्यामुळे फटाके अधिकच लोकप्रिय होत आहेत की काय असा भास होऊ लागला.

मग यावर उपाय म्हणून काही संस्कृतीरक्षकांनी भारतीय संस्कृतीचा मानबिंदू असलेल्या हिमालयातील शिवशंकराला आणि थोड्या खाली असलेल्या काशीला एकत्र आणून चीनपासून दूर दक्षिणेला शिवकाशी नावाचं गाव वसवलं आणि तिथे खास चीनी तंत्रज्ञानाचे पण भारतीय बनावटीचे फटाके बनवायला सुरुवात केली. हे फटाके संस्कृतीसंवर्धन करणारे असल्याने तरुणाबरोबर आता लहान मुलामुलींनाही ते उडवायला मिळू लागले. पण चीनी फटाके विकणाऱ्या आर्चीज् गॅलरीचा बिझनेस कमी झाला.

अशा तऱ्हेने फटाके भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक होत असताना आणि आर्चीज् गॅलरी बॅंकरप्सी कायद्याखाली फॉर्म भरायचं ठरवत असताना युरोपमधे व्हॅलेंटाईन नावाचा एक माणूस संतपदाला पोचला आणि आर्चीज् ने येणाऱ्या काळाची पावले ओळखून कात टाकली. लाल कापडाखाली रचलेल्या पायऱ्यांचं फर्निचर विकून नवीन फर्निचर करायला घेतलं.

Sunday, February 3, 2019

चिमण्यांचा बहिष्कार

आपले व्यक्तिमत्व कसे बनते? आपली मतं कशी बनतात? आपल्यावर कुणाचा प्रभाव पडतो? आपल्या जोडीदाराचा आणि त्याच्या मूल्यव्यवस्थांचा आपल्यावर कसा आणि किती प्रभाव पडतो? आणि तो किती काळ टिकतो? आपल्याला जो मानसन्मान ज्या लोकांकडून मिळतो त्यामुळे आपली मतं बदलतात का? आपल्याला ज्या टीकेचा, विरोधाचा आणि निंदेचा सामना करावा लागतो त्याचा आपल्या मतांवर काय परिणाम होतो? हे माझे आवडते प्रश्न आहेत. आवडते म्हणजे, अजून ते पूर्णपणे सुटले आहेत असं मला वाटत नाही. आयुष्य दरवेळी काहीतरी नवीन रंग दाखवतं आणि मला सापडलेली उत्तरं पुन्हा तपासून घ्यायला भाग पाडतं. 

परवा एका मैत्रिणीने यू आर अनंतमूर्तीची घटश्राद्ध ही कथा वाचली असा मेसेज पाठवला. एकदम तिचा हेवा वाटला. कारण मी गेले कित्येक वर्ष ही कथा आणि यावरचा चित्रपट शोधतोय. १९७७ साली प्रदर्शित झालेला या चित्रपटाने दिग्दर्शक गिरीश कासारवल्लींनी (किंवा कसरवल्ली किंवा कासरवल्ली किंवा कासरावल्ली; जे असेल ते) चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं. पदार्पणाच्या या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आणि चित्रपटमाध्यमाच्या द्विशताब्दीच्या वेळी केलेल्या आंतरराष्ट्रीय संकलनात हा चित्रपट भारतातून निवडला गेला. सर्वश्रेष्ठ भारतीय चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट आहे. चित्रपटही पहायला मिळत नाही आणि कथाही वाचायला मिळत नाही म्हणून मी इतके दिवस शोधाशोध करत असताना मैत्रिणीला कथा वाचायला मिळालीसुद्धा हे कळल्याने मला जगाच्या धावपळीत मागे पडल्यासारखे वाटलं.

तिला ज्या पुस्तकात ही कथा वाचायला मिळाली त्याचा फोटो तिने पाठवला आणि ते पुस्तक माझ्या घरी गेली कित्येक वर्ष असल्याचं मला आठवलं. जेव्हा तो कथासंग्रह विकत आणला होता तेव्हा त्यातील "न संपणारी गोष्ट' ही पहिलीच कथा मनाची पकड न घेऊ शकल्याने मी तो कथासंग्रह कपाटात ठेऊन दिला होता. त्यात घटश्राद्ध आहे हे कळताच धावत जाऊन आधी अनुक्रमणिका शोधली आणि घाईघाईत कुठेपर्यंत पोहोचलो.


छोटीशी कथा असल्याने तिचं सार सांगून अनंतमूर्तीचा अधिक्षेप करत नाही. पण कथेत शेवटी एका ठिकाणी कथानायिकेच्या आयुष्यातील वैयक्तिक दु:खाने परिसीमा गाठलेली असताना तिच्यासमोर ख्रिश्चन धर्मगुरू येतो आणि तिला सांगतो की अश्या अवस्थेत तू घरी परत जाशील तर तुझ्या ब्राह्मण समाजातील लोक तुला बहिष्कृत करतील. त्यापेक्षा तू आमच्याकडे ये. आमचा देव दयाघन आहे. सर्वांच्या पापांना तो क्षमा करतो. पाय घसरलेली तरुण विधवा नायिका ते ऐकत नाही. आपल्या घरी परतते. तिचे लोक तिला बहिष्कृत करतात. तिचे एकाकी वृद्ध वडील तिच्या नावाने श्राद्ध करून जाज्वल्य नीतिमंत असल्याचा लौकिक कमावतात आणि नंतर लगेचच एका कोवळ्या मुलीबरोबर विवाह करून आपल्या संसाराला लागतात. अंघोळ न करता देवमूर्तीला शिवल्याने साप येऊन आपल्याला शिक्षा करणार आहे या भीतीखाली वावरणाऱ्या लहान मुलाइतकीच पापपुण्याची समज असलेला समाज या घटनांना योग्य मानून पुन्हा आपल्या दिनक्रमात गुंतून जातो. कथा वाचून पुस्तक खाली ठेवलं आणि अनंतमूर्तीच्या कथनशैलीबद्दल विचार करत होतो. अतिशय प्रवाही आणि चित्रदर्षी भाषा आणि कमी शब्दात विचार मांडण्याचं कसब ही अनंतमूर्तीची बलस्थानं आहेत. कथेतील अंगावर येणाऱ्या रूढीपरंपरांच्या भयकारी दर्शनाने मी हताश झालेलो असताना माझ्या मनात त्या ख्रिश्चन धर्मगुरूचा प्रसंग पुन्हा पुन्हा येत राहिला.


उजव्या विचारसरणीच्या लोकांत अनंतमूर्ती अजिबात लोकप्रिय नाहीत. जसे आपल्याकडे तेंडुलकर तसे कर्नाटकात अनंतमूर्ती. एकाने 'बंदूक द्या गोळी घालतो' या अर्थाचं विधान काही काळापूर्वी केलेलं होतं तर एकाने 'त्यापेक्षा मी देश सोडून निघून जाईन' या अर्थाचं विधान केलेलं होतं. अनंतमूर्तीच्या निधनानंतर कर्नाटकातील दुसऱ्या फळीतील उजव्या मंडळींनी फटाके फोडून त्याचा आनंद व्यक्त केलेला होता (अर्थात पहिल्या फळीतील नेत्यांनी 'अशी घटना घडली असेल तर ते निंदनीय आहे' अशी सफाई दिली होती आणि आपण 'मरणांती वैराणी'च्या तत्वावर विश्वास ठेवतो असे आपल्या समर्थकांना पटवले होते).

राममनोहर लोहियांचा प्रभाव असलेले अनंतमूर्ती म्हणजे कन्नड वाङ्मयातील मोठं प्रस्थ होते. त्यांची विचारसरणी डावी होती. आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचे ते कट्टर विरोधक होते. ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले अनंतमूर्ती साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि FTII चे देखील. इंग्रजीचे पीएचडी असलेले अनंतमूर्ती, जेएनयूसहित देशविदेशातील अनेक विद्यापीठात मानद व्याख्याता म्हणून कार्यरत होते. त्याशिवाय अनेक सरकारी समित्यांवरही त्यांनी महत्वाची पदे भूषवलेली होती. सात कथासंग्रह; पाच कादंबऱ्या, एक नाटक, तीन कवितासंग्रह, आठ वैचारिक प्रबंध आणि एक आत्मकथन त्यांच्या नावावर आहेत.

आधुनिक कन्नड साहित्यात नव्योदय आणि नव्य अशा दोन परंपरा आहेत. त्यातील नव्य परंपरेचे ते एक समर्थ वाहक मानले जातात. या परंपरेत आयुष्य म्हणजे परंपराशरण कालक्रमण न मानता परंपरांचे अंतरंग शोधून त्यातील त्याज्य गोष्टी टाकून नव्याचा स्वीकार करण्याची प्रवाही घटना मानली जाते. त्यामुळे नव्य परंपरेतील लेखक आणि कवींचे नायक नायिका परंपरेशी झगडताना दिसतात आणि परंपरा योग्य की अयोग्य त्याचा निर्णय ते वाचकांवर सोडतात. नव्य परंपरेतील साहित्याच्या या रेषेत घटश्राद्ध अगदी बरोबर बसते. फक्त माझ्या डोक्यात तो ख्रिश्चन धर्मगुरूचा उल्लेख मात्र घट्ट बसला होता. आणि मला आठवलं की अनंतमूर्तीच्या भारतीपूरचा नायकही परदेशात असताना ख्रिश्चन मुलीबरोबर लग्न न करता राहतो. आणि नंतर भारतात परतल्यावर स्वतःच्या मनातील परदेशी प्रेयसीच्या प्रतिमेशी काही काळ संवाद साधत रहातो. मग मला हेदेखील आठवलं की संस्कृतमधून शिक्षणाची सुरवात केलेल्या आणि माध्व ब्राह्मणांच्या घरात जन्मलेल्या अनंतमूर्तीची पत्नीदेखील ख्रिश्चन आहे.

विचार करत इथपर्यंत पोहोचलो आणि मग आठवले ते अनंतमूर्तीचें साहित्यक्षेत्रातील कडवे विरोधक आणि उजव्या विचारांच्या लोकांचे प्रिय साहित्यिक एस एल भैरप्पा. तत्वज्ञानात डॉक्टरेट केलेल्या भैरप्पांची लेखणी बहुप्रसवा आहे. आजपर्यंत २६ कादंबऱ्या, तीन प्रबंध आणि एक आत्मकथन नावावर असलेले भैरप्पा कन्नडमधील सर्वात अधिक वाचले जाणारे साहित्यिक आहेत. अनंतमूर्तीसमर्थक भैरप्पांना लेखक न मानता वादविवादपटू मानतात तर भैरप्पा समर्थक अनंतमूर्तीना अडीच कादंबऱ्यांचा लेखक म्हणून हिणवतात (संस्कार आकाराने फार लहान कादंबरी आहे). अत्यंत लोकप्रिय असूनही भैरप्पांना राष्ट्रीय स्तरावर केवळ एकच साहित्य अकादमी पारितोषिक मिळाले आहे आणि कन्नड सरकारचा एक राज्य पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना ज्ञानपीठ मिळालेले नाही म्हणून कित्येक कन्नड वाचक नाराज आहेत.


कन्नड साहित्यातील नव्योदय परंपरेतील प्रगतीशील परंपरेचे वाहक असलेले भैरप्पा विविध विषयांवर लेखन करतात. म्हैसूर, नंतर गुजरातमधील सरदार पटेल विश्वविद्यालय नंतर दिल्ली अश्या विविध ठिकाणी तत्वज्ञानाची प्राध्यापकी करत त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांची प्रत्येक पात्रे आपापल्या कृतींमागील विचार आपल्याला सांगतात आणि ते विचार बरोबर आहेत की नाही याचा निर्णय भैरप्पा आपल्यावर सोडतात. गरीब ब्राह्मण घरात जन्मलेले आणि लहानपणी प्लेगच्या साथीत मातृछत्र हरवलेल्या भैरप्पांनी शिक्षणाला मध्येच विराम देऊन मुंबईत हमाली केली, नंतर साधूंच्या मागे जीवनाचा शोध घेत फिरले आणि शेवटी पुन्हा शिक्षणाकडे वळून त्यांनी तत्वज्ञानावर आपली पीएचडी पूर्ण केली. सत्य आणि सौंदर्य हा त्यांचा प्रबंध समजून घेण्यासाठी मला कन्नड शिकायची इच्छा आहे. भैरप्पांची पत्नी मात्र ख्रिश्चन नाही.

भैरप्पांच्या धर्मश्री या कादंबरीत ख्रिश्चन धर्मगुरूंचा विपुल उल्लेख आहे. ख्रिश्चन धर्मोपदेशक कशा प्रकारे अज्ञानी लोकांना भुलवून आपल्या धर्माच्या जाळ्यात खेचतात यावर धर्मश्रीमध्ये तपशीलवार शब्दचित्रण केलेलं आहे. आज इंटरनेटवर किंवा टीव्हीवर अंगात येणाऱ्या बायाबापड्या, त्यांच्यासमोर जोरजोरात ओरडणारा धर्मोपदेशकाच्या मंत्रोच्चाराने किंवा स्पर्शाने किंवा हातवाऱ्यासरशी शांत होताना बघून भैरप्पांनी धर्मश्रीमधे केलेलं चित्रण अतिरंजित न वाटता वाचकाला सहजपणे पटतं. एक वाक्य इंग्रजीमध्ये उच्चारवात बोलणारा धर्मगुरू आणि त्याचे वाक्य संपते न संपते तोच त्याहून वरचढ आवाजात मराठी किंवा हिंदी किंवा इतर भारतीय भाषांत भाषांतर करून प्रभुकृपेची शुभवार्ता सांगणारा अनुयायी हे चित्र मी टीव्हीवर नेहमी बघत असल्याने धर्मश्री वाचताना मला भैरप्पांच्या नायकाची बाजू पूर्णपणे पटली होती. धर्मांतराची ही काळी बाजू मला अस्वस्थ करून गेली होती.

पण घटश्राद्ध वाचताना मात्र परित्यक्ता स्त्रीला जेव्हा समाज आधार देत नाही त्यावेळी समाजाला तोंड देण्यासाठी धर्माचा आधार देणारा धर्मगुरू मला काळ्या बाजूचा न वाटता परंपराशरण समाज काळ्या बाजूचा वाटला. आणि धर्मप्रसारासाठी का होईना पण व्यक्तिगत पापभावनेतून बाहेर पडण्यासाठी, परमेश्वराने दिलेलं आयुष्य एका तथाकथित पापाचरणामुळे बहिष्कृत न करता पुन्हा मुख्य प्रवाहात घेण्यास तयार असणारा धर्मगुरू पांढऱ्या बाजूला झुकलेला वाटला.

आणि मग माझ्या मनात या दोन्ही साहित्यिकांबद्दल तुलना सुरु झाली.

दोघेही कन्नड. दोघांचे जन्मस्थान एकमेकांपासून कारने तीन साडेतीन तासांच्या अंतरावर. त्यातल्या त्यात अनंतमूर्ती तर जगप्रसिद्ध उडुपी मठाच्या जवळचे (गावाचे नाव लावण्याच्या दक्षिणेतील प्रथेप्रमाणे त्यांच्या नावातील यू उडुपीचा आहे). दोघांचे शिक्षण म्हैसूरमधले. दोघेही शेवटी बंगळूरात स्थिरावलेले. दोघेही ब्राह्मण. दोघेही आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च शिक्षण पूर्ण केलेले. दोघांचेही बहुतांश नायक ब्राह्मण. दोघांचे नायक / नायिका पौर्वात्य आणि पाश्चिमात्य मूल्यव्यवस्थेच्या संघर्षात अडकलेले. दोघांनीही ब्राह्मण समाजातील रुढींचे चित्रण केलेलं आहे. 'राजकारण आणि कल्पित वाङ्मय' हा एकाच्या डॉक्टरेटच्या प्रबंधाचा विषय तर 'सत्य आणि सौंदर्य' हा दुसऱ्याच्या प्रबंधाचा विषय (म्हणजे दोन्ही विषय सौंदर्यशास्त्राशी संबंधित आहेत). एकाच्या प्रोफेसरकीचा सुरवातीचा काळ कम्युनिस्टबहुल केरळमध्ये गेलेला तर दुसऱ्याला स्थैर्य लाभले ते काँग्रेसच्या काळातील गुजराथच्या सरदार पटेल विश्वविद्यालयात (त्यावेळी तिथे उजव्या विचारांच्या पक्षाचे सरकार नव्हते हा मुद्दा मी पुन्हा अधोरेखित करतो आहे).

पण एक डाव्या विचारांचा तर एक डाव्यांच्या तथाकथित दडपशाहीला विरोध करणारा. एक सरकारी समित्यांवर कार्यरत तर दुसरा सरकारी समित्यांपासून दूर. एकाला राज्यपातळीवर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक सन्मान मिळालेले तर दुसऱ्याला तुलनेने फार कमी सन्मान मिळालेले. एकाचा विवाह आंतरधर्मीय तर एकाचा बहुधा स्वधर्मीय आणि स्वजातीय. एकाच्या कथनात परंपराशरण समाज हा दुर्गतीचे कारण तर परंपरा मोडताना सर्व परंपरा मोडण्याचा आणि गतेतिहासाबद्दल अपराधबोध न बाळगण्याचा दुसऱ्याचा आग्रह. पाश्च्यात्य मूल्यांबद्दल एकाची आस्था तर पौर्वात्य ते टाकाऊ हा गैरसमज रोखण्यात दुसऱ्याला रस.

दोघांच्या नायक नायिकांचा परधर्माशी संबंध येतो खरा पण अनंतमूर्तीच्या साहित्यात जेव्हा नायक / नायिका स्वधर्मातील परंपराशरणतेने हताश झालेले असतात, त्यावेळी असा संबंध येतो (भारतीपूर आणि घटश्राद्ध). याउलट भैरप्पांच्या नायक नायिकांचा परस्परांशी संबंध येण्यापूर्वी परधर्माशी संबंध आलेला असतो (धर्मश्री) किंवा मग त्यांचा परस्परांशी संबंध येऊन ते सुखी असताना एकाला पुन्हा परंपरा आणि जोडीदार यात एकाची निवड करावी लागते (पारखा). त्यामुळे साहजिकपणे दोघांचे नायक नायिका आपल्याला जे सांगू इच्छितात त्या कथनात मोठा फरक पडतो. आणि वाचक मग लेखकाला काय सांगायचं आहे ते सोडून त्याला लेखकाबद्दल काय वाटतं त्याप्रमाणे संपूर्ण लेखन डोक्यावर घेतो किंवा मोडीत काढतो.

खरंतर धर्मांतराची काळी बाजू पुढे आणणाऱ्या धर्मश्रीमध्ये केवळ नोकरी मिळावी म्हणून धर्म बदलून ख्रिश्चन होणारा आणि नंतर आपल्या जुन्या धर्मबंधूंशी कठोरपणे वागणारा पोलीस ऑफिसर आहे. धर्म बदलणारा मुलगा आम्हाला कायमचा मेला असं म्हणणारे त्याचे वृद्ध आईबाप आहेत. म्हणजे भैरप्पांच्या धर्मश्रीमधे आणि अनंतमूर्तीच्या घटश्राद्धमध्ये धर्म बदलणे, आई वडिलांनी नाव टाकणे या गोष्टी समान आहेत. पण नायक आणि त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. भैरप्पांच्या धर्मश्रीमध्ये पोलिसाची नोकरी मिळावी म्हणून धर्म बदलणारा पूर्वाश्रमीचा ब्राह्मण, कथानायक नाही. त्याने धर्मबदल केलेला असून त्याच्या धर्मबदलाचे कारण वैयक्तिक पाप नसून आर्थिक लाभ आहे. याउलट अनंतमूर्तीच्या घटश्राद्धमध्ये परंपरेने पापाचरण ठरवलेले वर्तन करणारी नायिका केंद्रस्थानी आहे. ती धर्म बदलत नसूनही ती जातीबहिष्कृत आणि समाजबहिष्कृत केली जाते आणि ख्रिश्चन धर्मगुरू तिला फक्त मदत देऊ करतात पण ती धर्मबदल नाकारते.

इथपर्यंत पोहोचल्यावर माझ्या मनातल्या विचारांनी अजून एक वळण घेतलं. जर धर्मश्रीमधील पोलीस अधिकारी नायक असता तर भैरप्पांनी त्याची कथा कशी रंगवली असती? आणि जर घटश्राद्धमधील नायिकेने धर्मांतराचा मार्ग स्वीकारला असता तर अनंतमूर्तींनी तिचा भविष्यकाळ कसा रंगवला असता?

हे दोन्ही प्रश्न 'आत्याबाईला मिशा असत्या तर तिला काय म्हटले असते?', या प्रकारचे आहेत हे मला मान्य आहे. पण त्यांचा विचार करताना मला वाटतं त्या त्या लेखकाची मनोभूमिका, त्याचे जोडीदार, त्याला मिळणारे मानसन्मान, त्याला सहन करावी लागणारी टीका, त्याच्यावर स्तुतीसुमने किंवा टीकाप्रहार करणाऱ्यांची वैचारिक भूमिका या सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरतात. आणि या सर्वांचा परिणाम कितीही नगण्य का असेना पण एकदा लेखकाला एखाद्या पठडीत बसवणारे त्याचे चाहते आणि विरोधक त्याच्या सर्व विचारांना आपल्यासाठी सोयीस्कर वाटणाऱ्या चष्म्यातूनच बघतात. आणि मग चाहते व विरोधक यांच्या या खेचाखेचीत लेखकाच्या भूमिकाही अधिक टोकदार होत जातात.

त्यामुळे उजव्यांवर कडाडून टीका करणारे अनंतमूर्ती आपोआप डावे ठरतात. त्यांच्या कथनात इथल्या परंपराशरण दमित स्त्री पुरुषांच्या वेदनेला आवाज उमटलेला आहे हे मागे पडते. आणि डाव्यांच्या तथाकथित सांस्कृतिक वर्चस्वावर कडाडून टीका करणारे भैरप्पा आपोआप उजवे ठरतात. आपली मुळे कशी आहेत याचा विचार न करता पाश्चात्य विचारांचे कलम करून घेतल्यावर सैरभैर झालेल्या समाजाचे चित्रण त्यांच्या साहित्यात आहे हे मागे पडते. आणि मग भारतीय परंपरेनुसार दोघांचे समर्थक एकमेकांना अस्पृश्य समजून एकमेकांवर बहिष्कार टाकतात.

मला तर वाटतं भारतीय कशात अग्रेसर आहेत? कोठल्या गोष्टीत ते जगाचं नेतृत्व करू शकतात? या प्रश्नांचं उत्तर एकंच आहे. 'बहिष्कार टाकण्यात'. जो आपल्यासारखा नाही त्याला नाकारणे हे भारतीयांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. हे आपल्या सामाजिक व्यवहारात दिसून येतं.आपल्या साहित्यिक व्यवहारांत दिसून येत.. इतकंच काय पण आपल्या समाजमाध्यमांवरील व्यवहारांतही दिसून येतं. लहानपणी ऐकलं होतं. चिमणीच्या पिल्लाला हात लावला की बाकीच्या चिमण्या त्याला मरून टाकतात, त्याचा बहिष्कार करून टाकतात. बहुतेक भारतीय विचारांचा गाभा चिमण्यांच्या मानसिकतेचा आहे. लगेच बहिष्कार. लगेच वाळीत टाकणे. लगेच मरून टाकणे.

भैरप्पा असोत किंवा अनंतमूर्ती दोघेही आपल्याला चिमण्यांच्या मानसिकतेतून बाहेर यायला सांगत आहेत. फक्त एकाची सुरवात मार्क्सपासून होते तर एकाची आनंद कुमारस्वामींपासून. आपल्याला साहित्याचे मर्म घ्यायचे आहे की आपल्या सोयीस्कर भूमिका साहित्यावर लादायच्या आहेत? सत्याचे सौंदर्य आपण बघणार आहोत की आपल्या आवडत्या सौंदर्यालाच सत्य म्हणून कवटाळून बसणार आहोत? हाच मूळ प्रश्न आहे. आणि हाच या दोन्ही लेखकांच्या डॉक्टरेट प्रबंधाचा विषय होता. एक म्हणतो 'राजकारण आणि कल्पित वाङ्मय' दुसरा म्हणतो 'सत्य आणि सौंदर्य'.