Thursday, February 23, 2017

फळाला झुलत्यात झाडं हो !

मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या शिकवणीचे तास वाढले आहेत. सकाळची शिकवणी आटोपली की रात्री पुन्हा एकदा शिकवणीचा वर्ग भरतो. काल मोठ्याच्या शिकवणीचा वर्ग सुटणार म्हणून रात्री ९ वाजता कार घेऊन गेलो होतो. एकट्याला जायचा कंटाळा आला होता म्हणून धाकट्याला बरोबर घेऊन गेलो. आणि धाकट्याची बडबड सुरु झाली. मग त्याला शांत करण्यासाठी फोनमधली ऑफलाईन घेऊन ठेवलेली यु ट्यूबवरची गाणी ऐकायला दिली. पहिल्याच गाण्यात त्याचा जीव अडकला. बसल्या बसल्या तो गाण्याच्या तालावर उड्या मारत होता आणि मी स्टिअरिंगवर ताल धरला होता. पठ्ठयाने पाच सहा वेळा ऐकलं आणि मग त्याचा दादा आल्यावर घरी जाईपर्यंत त्याला तीनदा ऐकायला लावले. मला तर ते गाणं आवडतंच पण इतके वेळा ऐकलं म्हणून डोक्यात विचारांची साखळी सुरु झाली. तीच इथे शब्दात उतरवतोय.



मला हे गाणं आवडण्याचं कारण म्हणजे याचं संगीत, यातली ऊर्जा आणि यात उभा केलेला प्रश्न. “अंडं आधी का कोंबडं हो?” या सनातन प्रश्नानं अनेक तत्ववेत्त्यांना छळलं आहे. आणि कुणीही याचं समाधानकारक उत्तर देऊ शकलेला आहे असं मला वाटत नाही.

उत्क्रांतीवादी म्हणतात, पहिली कोंबडी बिनअंड्याची जन्माला आली. तिने अंडी द्यायला सुरवात केली आणि मग पुढच्या कोंबड्या अंड्यातून जन्मू लागल्या.

आता उत्क्रांतीवादाने हा प्रश्न ज्या पद्धतीने सोडवला आहे ती पद्धत अमान्य करणे मला कठीण जाते. त्यामुळे अजून सुयोग्य पद्धत सापडेपर्यंत मी त्याच पद्धतीने अंडं आधी का कोंबडं? हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो. आणि अर्थशास्त्र, समाजशास्त्र या सारख्या विषयांत देखील मला उत्क्रांतीवादाची पद्धत लागू पडताना दिसते.
अर्थशास्त्रातील भांडवलवाद मला सांगतो, खाजगी मालकीच्या संपत्तीच्या अधिकारातून पहिले भांडवल निर्माण होते. या भांडवलातून उद्योग, उद्योगातून नफा, आणि मग नफ्यातून पुन्हा भांडवल तयार होते. अश्या रीतीने भांडवल - नफा - भांडवल अशी साखळी चालू राहते. या साखळीची पहिली कोंबडी, ‘खाजगी मालमत्तेचा हक्क’ आहे, जी साखळीतून जन्माला आलेली नव्हती.

तर साम्यवाद मला सांगतो, खाजगी मालकीच्या संपत्तीच्या अधिकारातून सर्वात प्रथम संपत्तीचे असमान वाटप होते. या असमानतेतून शोषणाचा जन्म होतो. शोषणातून भांडवलाची निर्मिती होते, त्या भांडवलातून उद्योग सुरु होतो, तो नफा कमावतो, या नफ्याचे असमान रीतीने वाटप होते व भांडवल - शोषण - भांडवल अशी साखळी चालू राहते. या साखळीची पहिली कोंबडी, ‘असमान वाटपाची खाजगी मालकी’ आहे, जी साखळीतून जन्माला आलेली नव्हती.

समाजशास्त्र सांगते,राजा किंवा प्रजेच्या इच्छेतून सार्वभौम सत्तेचा जन्म होतो. ही सार्वभौम सत्ता कायदे निर्माण करते त्यातून ती प्रजेला स्वतःच्या इच्छा पूर्ण करता येतील असे वातावरण तयार करते आणि मग हे वातावरण टिकवण्यासाठी सार्वभौम सत्तेला स्वतःला टिकवावे लागते त्यासाठी अजून कायदे तयार होतात व सत्ता - कायदे अशी साखळी चालू राहते. या साखळीची पहिली कोंबडी, ‘समाज धारण करण्याची इच्छा’ आहे, जी या साखळीतून जन्माला आलेली नव्हती.

मी इतके दिवस उत्क्रांतीवाद या जीवशास्त्रीय संकल्पनेची, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्रात मला लागलेली संगती पाहून खूष होत होतो. पण उत्क्रांतीवादातून, ‘जड आणि चेतन या दोन गोष्टीत प्रथम कोण आलं?’, किंवा, ‘कशातून कशाची निर्मिती झाली?’ या प्रश्नांची मला पटतील अशी उत्तरे मिळत नाहीत, हे जाणवून थोडा खटटूदेखील होत होतो.
त्यातच दोन दिवसांपूर्वी माझा मित्र उत्पलने, ‘आजचा सुधारक’ मधील काही लेखांची माहिती देताना चैतन्य किंवा आत्मा यासारख्या संकल्पनेशिवाय आपण विश्वाच्या पसाऱ्याचे गणित मांडू शकतो असे मत मांडले होते. त्याने सांगितलेले लेख वाचायचे बाकी असताना हे गाणं ऐकलं. आणि धाकट्या मुलाच्या हट्टामुळे पुन्हा पुन्हा ऐकत राहिलो, तेव्हा त्यातल्या,

आदी जल्म बीजाचा झाला, तुका सांगोनिया गेला
सांगोनिया गेला sss तुका सांगोनिया गेला
हो
आदी बीज आलं कुठनं?
कुठनं आलं हो?
अन ते आलं फळामधनं
हॉ
ते आलं फळामधनं अअअअअअअ
अहाहाहा
त्या फळाला झुलत्यात झाडं हो, त्या फळाला झुलत्यात झाडं हो
त्याचं पुरानं हाई लई लांबडं हो
ह्या ओळींकडे लक्ष गेलं आणि अतिशय आनंद झाला.

यातलं, ‘फळाला झुलत्यात झाडं हो’ हे वाक्य फार मस्त आहे. नेहमी झाडाला फळे झुलतात. इथे मात्र अंडं आधी का कोंबडं? हा प्रश्न सोडवताना, गीतकार तुकोबांची साक्ष काढून सांगतो, की आधी बीज आलं. ते बीज कुठनं आलं? तर ते फळातून आलं. आणि त्या फळाला अनेक झाडं लागली. ही सगळी झाडं त्या फळाला झुलत आहेत. त्यांना नवी फळे येत आहेत. त्या नव्या फळांना नवी झाडे असा सगळा उलटा प्रकार आहे.

तुकोबांच्या वाङ्मयाचा मी अभ्यासक नाही. त्यामुळे खरोखरंच तुकोबारायांनी असा कुठला सिद्धांत मांडला आहे की नाही? हे मला खात्रीशीर माहिती नाही. पण हे भारूड ‘वारणेचा वाघ’ या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९७० मध्ये आला होता. आणि १९३६ मध्ये आला होता प्रभातचा विख्यात चित्रपट ‘संत तुकाराम’. या चित्रपटातील तुकोबारायांच्या तोंडी ‘आधी बीज एकले’ हा अतिशय गाजलेला अभंग आहे. पूर्ण अभंग असा आहे.


या अभंगात, पहिल्यांदा फक्त बीज होते, मग त्यातून झाड, त्या झाडाला फळे असा कल्पनाविस्तार केलेला दिसतो. जर वारणेचा वाघ मधील भारूड, वर दिलेल्या अभंगाचा वापर करून आपला कल्पनाविस्तार पुढे (खरं म्हणायचं तर मागे) नेत असेल तर, पहिले बीज फळातून येते आणि या फळाला झुलणारी झाडे लागतात; हा उलगडा होतो. पण एकंच गडबड होते, की ‘आधी बीज एकले’ हा अभंग तुकोबारायांचा नसून त्याचे रचनाकार होते शांताराम आठवले. त्यामुळे भारुडात म्हटलेलं ‘तुका सांगोनिया गेला’ मला खटकलं. वाचकांपैकी कोणी जर तुकोबांच्या गाथेचे अभ्यासक असतील तर गाथेत विश्वोत्पत्तीबद्दल तुकोबांनी काही सांगितले आहे काय? आणि असल्यास, शांताराम आठवलेंचा अभंग त्याच्याशी जुळतोय का? यावर त्यांनी कृपया प्रकाश टाकावा.

त्याशिवाय गेल्या वर्षी, ‘सुनता है गुरु ग्यानी’ या निर्गुणी भजनाचं सविस्तर विवेचन करायचा मी प्रयत्न केला होता त्याची आठवण झाली. त्यात निर्गुणातून सगुणाची निर्मिती कशी होते, याबाबत मी ऐतरेयोपनिषदातील दाखला दिला होता. आणि तो दाखलापण हेच सांगतो की निर्गुणातून सगुणाची उत्पत्ती होताना सगळं उलटं चालतं. हिरण्यगर्भच्या डोळ्यातून प्रकाशदायी सूर्य, नाकातून प्राणवायू वगैरे तयार होतो, आणि मग प्रकाश आहे म्हणून मातेच्या गर्भातील सगुणाला डोळे, प्राणवायू आहे म्हणून त्याला नाक अशी उत्पत्ती होते. म्हणजे झाडाला डुलणारी फळं हे सगुण विश्वाचं लक्षण तर फळाला डुलणारी झाडं हे निर्गुण विश्वाचं लक्षण की ज्यातून सगुणाची निर्मिती होते. अशी दुसरी संगती लागली.

आणि यात पुन्हा, ‘अंडं आधी की कोंबडी?’ या प्रश्नाची उत्क्रांतीवादाने केलेली उकल जाणवली. पहिली कोंबडी अंड्यातून नाही, त्याच धर्तीवर पहिलं झाड बीजातून नाही, तर ते फळांना डुलणारं झाड आहे. मग या झाडाला फळं, त्या फळांना बिया (बीज) त्यातून पुढली झाडं अशी साखळी चालू होते. पण या साखळीची सुरवात मात्र झाडाला लागलेल्या फळातून न होता, फळाला लागलेल्या झाडातून होते.

अशी उलट सुलट संगती लागल्यावर भारूडातील,

इथं शान्याचं झाल्यात येडं हो
त्याचं पुरानं हाई लई लांबडं हो

या ओळी खऱ्या वाटू लागल्या. आणि भगवान बुद्धाने या बाबतीत घेतलेली भूमिका जास्त जवळची वाटू लागली. भगवान बुद्धाचे सगळे विवेचन, विश्व कसे सुरु झाले याभोवती सुरु न होता, हे विश्व आहे इथून सुरु होते. तो भौतिक आणि सामाजिक प्रश्नांचा विचार करतो आणि अधिभौतिक किंवा काल्पनिक प्रश्नांचा विचार करण्यात वेळ न घालवता विश्वशांतीचा ध्यास घेतो, असं वाचलेलं आठवलं.
आता भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचं वाचन लवकरात लवकर सुरु केलं पाहिजे.

Wednesday, February 1, 2017

दाढीमिश्यांची गोष्ट (भाग ३)



दाढीबरोबर आपण भूगोल, इतिहास, धर्म, व्यवसाय, कला आणि या सर्वातून तयार होणाऱ्या समाजिक परंपरा अश्या विविध क्षेत्रात फिरू शकतो. आणि प्रत्येक वेळी काही मनोरंजक माहिती समोर येते.

दाढीबरोबर भू-गोलावर फिरताना आपण विषुववृत्ताजवळील उष्ण कटिबंधापासून सुरवात करूया. इथे जर दमट हवामान असेल तर पुरुष दाढी राखण्यापेक्षा ती काढून टाकणेच पसंत करतात, पण या प्रदेशातील हवामान जर कोरडे असेल तर मात्र दाढी ठेवणे पसंत करतात. दमट हवामानात घाम आणि त्यानंतर होऊ शकणारे त्वचेचे त्रास सहन करण्यापेक्षा दाढी काढून टाकणेच सोपे जात असावे. याउलट वाळवंटी प्रदेशात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने आणि कोरड्या हवामानात घाम येत नसल्याने दाढी राखणे हा पुरुषांच्या आळशीपणाला साजेसा उपाय ठरत असावा.

विषुववृत्ताला सोडून आपण ध्रुवीय प्रदेशांच्या जवळ सरकू लागलो की दाढी वाढू लागते आणि ध्रुवाजवळ पोहोचताना ती पुन्हा गायब होते. समशीतोष्ण कटिबंधात अंघोळ दैनिक नित्यकर्म असेलंच याची खात्री नसते आणि दाढी दैनिकऐवजी साप्ताहिक किंवा मासिक किंवा ऐच्छिक कार्यक्रमात ढकलली जाते. शीत कटिबंधाच्या सीमेवर दाढी न करणेच सोईचे असते. तिथे वाढलेली दाढी, कमी तापमानापासून चेहऱ्याला थोडे सुरक्षा कवच देत असावी. पण ध्रुवीय प्रदेशात मात्र दाढी मोठा त्रास ठरतो. दाढीत अडकलेले पाणी गोठून तो त्रास सहन करण्यापेक्षा दाढी करणे सोयीस्कर ठरते. म्हणजे विषुववृत्तीय असो किंवा ध्रुवीय प्रदेश, जेव्हा हवेत दमटपणा असतो तेव्हा दाढी छाटण्याकडे याउलट हवामान कोरडे असल्यास दाढी राखण्याकडे पुरुषांचा कल दिसून येतो.

भूगोलाला सोडून आता आपण इतिहासात शिरुया. इतिहासात डोकावून पाहताना कित्येकदा धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुद्द्यांची सरमिसळ होणे अपरिहार्य आहे. त्यामुळे मी एका वेळी एक किंवा दोन मानवसमूहांबद्दल लिहिण्याचे ठरवले आहे. ज्या मी स्वतः इतिहास संशोधक नाही. आणि माझे इतिहासाबद्दलचे वाचन मर्यादित असले तरी कुतूहल अमर्याद आहे. त्यामुळे या कुतूहलाचा साथीने मी जेंव्हा इतिहासाचा पडदा दूर करून मानवाच्या पूर्वजांच्या दाढीकडे बघतो तेव्हा माझ्या मर्यादित ज्ञानाला जे दिसते तितकेच लिहितो आहे.

लिखित इतिहास उपलब्ध असलेल्या ख्रिस्तपूर्वकालीन मानवी संस्कृती जगाच्या वेगवेगळ्या भागात आहेत. आपण सुरवात करूया टायग्रीस आणि युफ्रेटीस नद्यांच्या परिसरापासून. हा प्रदेश म्हणजे त्या काळचा मेसोपोटेमिया, किंवा आजचा तुर्कस्थान, इराक आणि इराण.


enki2.jpg
दाढीधारी एन्की
Image Courtesy : Internet
इथे नांदलेल्या सर्वात प्रसिद्ध संस्कृती म्हणजे सुमेरियन, अक्काडीन आणि बॅबिलोनियन. या तीनही संस्कृतीमधील राजांची आणि देवांची रंगवलेली किंवा कोरलेली भित्तिचित्रे त्यांना दाढी असलेली दाखवतात. पौरुषत्वाचा सुमेरियन देव म्हणजे एन्की. याच्या दोन खांद्यातून दोन नद्या वाहताना दाखवले जाते (याच त्या टायग्रीस आणि युफ्रेटीस नद्या) आणि याला भरघोस दाढी दाखवलेली असते. गिलगामेश या त्यांच्या प्रसिद्ध महाकाव्याचा नायक असलेला ‘गिलगामेश ‘ याच नावाचा नायक राजा देखील दाढीमिशाधारी आहे. पण त्या काळातील सामान्य नागरिक मात्र अनेकदा दाढीमिशाविरहित दाखवलेले दिसतात. म्हणजे अधिकारी पुरुष दाढीमिशावाले आणि सामान्य लोक सफाचट चॉकलेट हिरो असा काहीसा प्रकार मला जाणवतो. दुसऱ्या शब्दात या संस्कृतीत दाढीमिशा हे अधिकाराचे प्रतीक असावे.
Anu-Enlil-Enki-NinHurSag.jpg
वेगवेगळे मेसोपोटेमियन देव
Image Courtesy : Internet
Gilgamesh.jpg
शिंगे असलेला भालाधारी एन्कीडू आणि हातात सिंह असलेला गिलगामेश (एन्कीडूने  गिलगामेशला अंतरिक्षाची सफर घडवून आणली होती)
Image Courtesy : Internet

याच ठिकाणाची अजून एक प्रसिद्ध प्राचीन संस्कृती म्हणजे आजच्या इराणमधली आज लयाला गेलेली पर्शियन संस्कृती. पारशी लोकांचा देव अहूर माझदा आणि त्यांचा दानव आंग्रा मनियु दोघेही दाढीधारी. त्यांचा प्रेषित झरत्रुष्ट किंवा झोरोआस्टर हा देखील दाढीमिशाधारी. त्यांचे राजे सायरस, दरायस, झेरेक्सेस, काम्बियास, दुसरा दरायस, यझदेगार्द; सगळे दाढीमिशाधारी दाखवले आहेत. आणि सामान्य पर्शियन लोकांचे चित्रणदेखील दाढीमिशांसहित केलेले दिसते. म्हणजे कदाचित पर्शियामध्ये दाढीमिशांनी, अधिकाराचे प्रतीक ही आपली जागा सोडून पौरुषत्वाचे प्रतीक ही जागा घेतली असावी.

Naqsh_i_Rustam._Investiture_d'Ardashir_1.jpg
डोक्यावर मुगुट असलेला उजवीकडचा पुरुष म्हणजे अहूर माझदा डावीकडे ससानियन साम्राज्याचा संस्थापक आर्देशीर.
Image Couresy : Internet
प्रेषित झोरोआस्टरची अर्वाचीन चित्रकारांनी काढलेली चित्रे आणि शिल्पकारांनी घडवलेल्या अनेक मूर्ती मिळतात. पण त्यांचे समकालीन लोकांनी काढलेले चित्र किंवा शिल्प मला कुठे मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या अनेक चित्रांचा वापर करून क्लाउड बायोग्राफीने बनवलेला एक छोटा व्हिडीओ देतो. देव अहूर माझदा दाढीधारी, नंतरचे पर्शियन राजे दाढीधारी त्यावरून देव आणि राजे यांच्यामधले प्रेषित झोरोआस्टर दाढीधारी होते असे मानायला मी तयार आहे.


हे पर्शियन राजे पुढे बायबलमध्ये देखील भेटायला येतात. म्हणून आपण त्यांना तिथेच सोडून बायबलपूर्व काळातील इतर ठिकाणच्या संस्कृतीमधील दाढीमिश्याचे स्थान बघायला मध्यपूर्व आशियाला सोडून उत्तर आफ्रिकेतील दुसऱ्या एका प्राचीन संस्कृतीकडे पुढल्या भागात जाऊया.