Monday, December 25, 2017

बोलेरो (भाग ३)

-----
तुंबाडचे खोत म्हणजे एक महाकादंबरी आहे. चार भाग असलेली आणि दोन खंडात विभागलेली ही कादंबरी काळाच्या एका विस्तीर्ण पटलावर घडते. एका घराण्याच्या चार पिढ्यांची कथा, कोकणच्या निसर्गाचे उत्कृष्ट शब्दचित्र रेखाटणारी कादंबरी, कोकणच्या माणसांची स्वभाववैशिष्ट्ये सफाईने रेखाटणारी कादंबरी अश्या अनेक प्रकारे तिचे वर्णन केले जाऊ शकते. मागील दोन भागात तिची रूपरेषा मांडण्याचा मी प्रयत्न केला. आता तिच्यावरील आक्षेपांकडे वळतो.

‘तुंबाडचे खोत’ वर श्री ना पेंडसे स्वतःदेखील फारसे खूष नव्हते असे माझ्या काही मित्रांशी बोलताना मला कळले. ही कादंबरी महा कादंबरी आहे पण महान कादंबरी नाही, अश्या स्वरूपाचे मत त्यांचे स्नेही विं दा करंदीकरांनी व्यक्त केले होते. कादंबरीच्या अर्पणपत्रिकेत स्वतः श्री ना म्हणतात, ‘त्या थोर कादंबरीकारांना ज्यांनी माझी जागा मला दाखवली’. काही टीकाकार तिच्यावर टीका करताना काहीजण तिला प्रादेशिक कादंबरी म्हणतात; तर काहीजण, ‘प्रयोजनहीन किंवा सूत्रहीन कादंबरी असा आरोप करतात. म्हणजे ही कादंबरी का वाचावी? ही नक्की कुणाची कथा? वाड्याची, घराण्याची, वाताहतीची की अजून कशाची? ते कळत नाही अशी टीका करतात. ऐसी अक्षरे या संस्थळावर एका वाचकाने असेही मत नोंदवले की या कादंबरीची पहिली पाचदहा आणि शेवटची पाच पाने फाडून ती वाचली तरी वाचकाला काही फरक पडत नाही. म्हणजे त्या पानांत असलेले कथानक आणि बाकीच्या कादंबरीतील कथानक यांचा सांधा जुळवायला शिरूभाऊ यशस्वी झालेले नाहीत.

माझ्या मते कादंबरीच्या शेवटी आलेले, ‘मंगल हवे असेल तर अमंगलाची किंमत मोजा’ हे वाक्य या कादंबरीचे सार किंवा सूत्र आहे. खोतांच्या घराण्यातील चार पिढ्यांच्या कथेच्या निमित्ताने मंगल आणि अमंगलाचा जिवंत वळवळणारा गोळा (हा कादंबरीतील शब्द आहे) शिरुभाऊंनी रेखाटला आहे. पद्मा सहस्त्रबुद्धे यांनी रेखाटलेली या कादंबरीच्या दोन्ही खंडांची मुखपृष्ठेही तेच सांगत आहेत असे मला वाटते. 



पहिल्या खंडाचे मुखपृष्ठ पाहताना असा भास होतो की वाचक समुद्रकिनाऱ्याजवळील एखाद्या टेकडीवर उभा आहे आहे, समोर नारळी पोफळीची झाडे आहेत, त्यापुढे हिरवीगार झुडपे आहेत आणि त्यापुढे किनाऱ्याकडे येणारी नीलधवल लाट आहे आणि त्यावर पसरलेले निळेशार आकाश आहे. त्या चित्रात सकाळ प्रसन्न करणारी वाऱ्याची एक सुखावह मंद झुळूक जाणवते. पुस्तकाचे नाव पुस्तकाच्या शीर्षस्थानी निळ्या आकाशात आहे. पुस्तकाचे आणि आणि लेखकाचे नाव पांढऱ्या रंगात आणि डोळ्यांना प्रसन्न वाटेल अश्या गोलाई असलेल्या अक्षरात आहे.

याउलट दुसऱ्या खंडाचे मुखपृष्ठ रेखाटताना वाचक समुद्रात तरंगणाऱ्या आणि तुंबाडपासून दूर जाणाऱ्या होडीत किंवा बोटीत बसून दूर सुटत जाणाऱ्या तुंबाडकडे पाहतो आहे असे रेखाटले आहे. समोर समुद्राच्या लाटा आहेत, त्यापुढे तुंबाडचा किनारा आहे. किनाऱ्यावर विरळ झालेली नारळी पोफळीची झाडे आहेत, वेळ रात्रीची आहे. समोर तुंबाड नारिंगी ज्वाळांच्या प्रकाशात भेसूर दिसते आहे. सोसाट्याचा वारा सुटला आहे आणि त्यात उठलेल्या हिरव्या काळ्या धुराच्या लोटात समुद्रकिनारी उभी असलेली झाडे झाकोळून गेली आहेत. पुस्तकाचे नाव पुस्तकाच्या शीर्षस्थानी नसून खाली लाटांमध्ये आलेले आहे. ते नारिंगी रंगात आहे. पुस्तकाचे आणि लेखकाचे नाव भुताळी वाटावे अश्या किंवा ज्वाळांतून उठणाऱ्या वाफेतून पाहिल्यावर पलीकडचे जग जसे हलताना दिसते तश्या अक्षरात आहे. जणू मंगल आणि अमंगलाचा गोळा धगधगतो आहे. आणि साक्षीला आहे जगबुडीचा अविरत प्रवाह.

मंगलातून अमंगल आणि अमंगलातून मंगल अशी सातत्याने चालणारी साखळी या कादंबरीत दिसून येते. जी व्यक्तिरेखा अमंगलाकडे तीव्रतेने झुकते तिच्या समोर उभी ठाकणारी व्यक्तिरेखा तीव्रतेने मंगलाकडे झुकणारी असते. तर ज्या व्यक्तिरेखा सौम्यपणे एकीकडे झुकतात त्यांच्यात मंगल अमंगल भावनांचा कल्लोळ चालू असतो. जणू अमंगलाला मंगलाचे कोंदण आणि मंगलाला आपले मांगल्य उजळून काढण्यासाठी अमंगलाची धग. तुंबाडात तीव्र व्यक्तिमत्वे तर लिंबाडातील लोक तुलनेने सौम्य.

भिकाजीपंतांची तीन मुले. मस्तवाल दादा आणि बंडूमुळे अमंगलाकडे झुकलेला गोळा जणू स्थिर करण्यासाठीच ज्याचा जन्म झाला तो नाना खोत. हा सौम्य प्रकृती खोत पुढे लिंबाडला जातो आणि त्याच्या वंशजांना सौम्य प्रवृत्तीचा वारसा मिळतो.

अहंकारी, उग्र आणि विलासी दादा खोतांचा विवाह होतो सात्विक आणि सोशिक गोदीशी. आणि त्यातून झालेला मुलगा म्हणजे सात्विक आणि निर्मोही गणेशशास्त्री. पण गणेशशास्त्रींचा विवाह होतो साधारण बुद्धिमत्तेच्या स्त्रीशी. त्यातून त्यांना झालेली मुलांत मंगल आणि अमंगलाची सरमिसळ होत जाते. थोरला जनापा म्हणजे शेतमजूर असल्याप्रमाणे राबणारा आणि केवळ शरीराच्या भुकांना जागणारा. दुसऱ्या क्रमांकावर कारस्थानी, पैशाचे आणि शरीरोपभोगांचे लोभी जुळे -चिमापा आणि बजापा. मग धगधगणारा गोळा मंगलाकडे सरकू लागतो आणि जन्माला येतो शरीराने आडदांड पण मनाने प्रेमळ बजापा आणि सगळ्यात शेवटी आजीची प्रतिकृती असलेली सोशिक आणि विद्वान ताई.

यातले जनापा, चिमापा, भिकापा सगळी थेरं करतात. लांड्या लबाड्या करतात, बायका ठेवतात, इतरांचं वाईट चिंततात, लोभाचा कळस गाठतात आणि स्वार्थासाठी नैतिक, अनैतिक असे सगळे मार्ग चोखाळतात. याउलट तीच रग किंबहुना त्याहून जास्त रग असलेला बजापा सगळ्या संधी उपलब्ध असूनही बायकांची लफडी करत नाही, कुणाला फसवत नाही, जुलाली प्रकरणात अडकूनही बायकोला अंतर देत नाही. किंबहुना तिच्यावर मनापासून प्रेम करतो आणि तिच्या मनाविरुद्ध एकही गोष्ट करत नाही. सगळ्यात सात्विक ताई. तिचा नवराच गायब होतो आणि ती कायमची माहेरी येते आणि आपल्या थोरल्या तीन भावंडांच्या अमंगलाला सावरत बसते.

शारीरभुकांचा दास असलेला जनापा आणि चिमापाशी संबंध ठेवणारी त्याची बायको यांचा मुलगा म्हणजे देशासाठी प्राण अर्पण करणारा, कुशाग्रबुद्धी, तेजस्वी विश्राम. गणेशशास्त्र्यांच्या अखेरच्या क्षणातही रानात रत असणाऱ्या जनापाच्या विश्रामला मात्र इंद्रियविजय प्राप्त झालेला. चुलत्याचा किंवा पोलिसांचा मार किंवा उपास यापैकी काहीही त्याला नमवू शकत नाही.

कारस्थानी चिमापाचा मुलगा अनंता सत्प्रवृत्त. ताई आत्या आणि विश्रामचा भक्त. वडिलांचा तिरस्कार करू लागतो आणि शेवटी वडिलांच्या आक्रस्ताळेपणामुळे स्वतःच्या जातीबाह्य प्रेमाला मिळवू न शकल्याने दारूत बुडतो. चिमापाची धाकटी पोर ताई. रूपाने आणि बुद्धीने आपल्या आजोबांवर गेलेली. पण तिच्या प्रेमाचे धिंडवडे निघतात आणि आपल्या मनासारखे करण्यासाठी शेवटी तिला वडील आणि चुलत्यांसमोर उग्र रूप धारण करावे लागते. प्रेमळ बजापाचा मुलगा विठ्ठल. तो मनाने प्रेमळ पण तुंबाडच्या तिन्ही काकांबद्दल असलेल्या अढीमुळे हलक्या कानाचा बनलेला. आणि त्यांच्याबद्दल विचार करताना डोक्यावरचा ताबा निसटणारा.

लिंबाड गेलेल्या आणि शामळू खोत म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाना खोताचा मुलगा कर्तबगार मधू खोत. त्याची तिन्ही मुले कर्तबगार निघतात. पण पहिले दोन लिंबाड सोडून घाटावर जातात. डॉक्टर इंजिनियर होतात. तिसरा नरसू खोतही कर्तबगार पण त्याच्या व्यक्तिमत्व शुभ्र पांढरे असण्याऐवजी त्यातही शरीराचे सर्व चोचले पुरवण्याची करडी छटा. सगळे रंगढंग करतो पण घरात आणत नाही. जनापा, चिमापा आणि भिकापासारखा भोगात लिडबिडत नाही पण बजापासारखा नायकिणीलाही बायको करून घेण्याइतका दिलदारही नाही. सगळ्या जगाला मदत करतो. पण धर्मांतर करणाऱ्या त्याच्या थोरल्या मुलाला मात्र जाणून घेऊ शकत नाही आणि धर्मांतरानंतर त्याला मदतही करत नाही. त्याचे संपूर्ण आयुष्य जाते ते चिमापा आणि भिकापाच्या कारस्थानांना तोंड देत, बजापाला आणि त्याच्या मुलाला सांभाळण्यात.

त्याची बायको आयुष्यभर नवऱ्याची सावली बनून राहते पण धाकट्या लेकाच्या लग्नानंतर मात्र नवऱ्याच्या वर्तनावर लांछन लावते आणि संपूर्ण घराला कसर लावते. त्याचा मोठा मुलगा हुशार पण शेवटी डॉक्टर होताना नापास होतो, वडिलांना न सांगता जास्तीचे पैसे मागत राहतो आणि शेवटी हिंदू धर्माला बोल लावत धर्मांतर करतो पण त्यामागील त्याग उदात्त नसून क्षुद्र आहे असे नरसूचे मत असते. धाकटा मधू, अबोल पण कामसू. लग्नानंतर बायकोच्या प्रेमात बुडालेला. पण शेवटी हलक्या कानाचा निघतो बापावर संशय घेतो आणि शेवटी वेडा होतो. वेडातून सुधारल्यावरही बायकोला घाबरून बाहेरचे मार्ग चोखाळतो. या मधुची बायको गुणी आणि सुंदर. पण तीही सासूच्या आणि नवऱ्याच्या त्रासाला कंटाळते आणि मग तिच्या मूळ स्वभावाला विपरीत वागू लागते.

त्याच वेळी बाह्य जगात जाती जातीत भांडणे होत असतात. लोक कुणाबद्दल हळहळ व्यक्त करत असतात तर कुणाच्या दुःखाला परमेश्वराचा न्याय समजत असतात. हिंदू मुस्लिम दंगे होत असतात. दंग्यात घरे जाळणारे नंतर आपल्या मित्राचे घर जळाले म्हणून कानकोंडले होत असतात. टिळकभक्त गांधीभक्त होतात. गांधीभक्त गोंधळतात. शिवाजी, टिळक, गांधी, सावरकर ही आपल्या क्षुद्र आणि दुबळ्यांच्या समाजाला पडलेली स्वप्ने आहेत. त्यांचे विचार आपल्याला कितीही आवडले तरीही ते प्रत्यक्षात आणण्याइतका आपला समाज ओजस्वी नाही हे मान्य करून स्वतःला जमेल तितका स्वार्थमूलक परमार्थ करतात. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आपल्याच नाकर्तेपणाच्या आणि स्वार्थाच्या अमंगलाला देशभक्तीच्या, नेतेभक्तीच्या मंगलाचे कोंदण द्यायचा प्रयत्न करतात.

त्यामुळे कादंबरीच्या सुरवातीच्या आणि अखेरच्या काही पानांचा मूळ कादंबरीशी असलेला क्षीण संदर्भ हा आक्षेप मला मान्य असला तरी, ‘कादंबरी सूत्रहीन आहे’ असे काही मला वाटत नाही.

------

No comments:

Post a Comment