Friday, December 27, 2019

टेकडीवरचा माझा झीरो स्टोन

ARAI च्या टेकडीवर भरपूर पायवाटा आहेत आणि एक मोठा हमरस्ताही आहे. जेव्हा टेकडीवर नवीन होतो तेव्हा हमरस्त्याने जात होतो. त्याच हमरस्त्याने परतत होतो. जसजसा टेकडीवर रुळू लागलो तसतश्या त्या पायवाटाही खुणावू लागल्या. मग एक दिवस एका नवीन पायवाटेने जायला निघालो. काहीसं निर्जन आणि म्हणून अस्पर्श असं टेकडीच वेगळं रूप पाहून आनंदलो. माझ्या दिशाज्ञानाबद्दल मला विश्वास होता. त्यामुळे पायवाटेने गेलो तरी शेवटी नेहमीच्या ठिकाणी जाईन अशा आत्मविश्वासाने इयरफोन लावून गाणी ऐकत चाललो होतो. वाटेवर एका ठिकाणी बरोबर मध्येच कुणीतरी दगडांची रास रचलेली होती. कुण्या गाढवाने वाटेच्या मधोमध दगड रचून ठेवले आहेत असं म्हणत पुढे गेलो.


नेहमीचं ठिकाण जवळ येतंय असं वाटेना. फोनवर रेंज मिळत नव्हती. आणि निर्जन भाग असल्याने कुणाला काही विचारण्याची सोयही नव्हती. रस्ता भरकटल्यासारखं वाटलं. पण शिक्षक असल्याने आपण चुकू शकतो यावर चटकन विश्वास बसत नाही. चालत राहिलो. घामाघूम झालो होतो. यातला किती घाम चालण्यामुळे आणि किती घाम रस्ता सापडत नसल्याच्या तणावामुळे होता कुणास ठाऊक?

आणि एका वळणानंतर एकाएकी गजानन महाराजांचं टपरीवजा मंदिर समोर आलं. देवभोळा नसल्याने संतभोळाही नाही. पण इतरांना पवित्र वाटणारी वास्तू अनपेक्षितपणे समोर आली की माझ्याकडून नेहमी ख्रिश्चन, हिंदू, मुसलमान आणि लष्करी पद्धतीच्या अभिवादनाचं संमिश्र रूप असलेली हाताची हालचाल आपोआप होते, तशी झाली. मंदिराच्या समोरच्या छोट्याश्या अंगणात एक माझ्यासारखा चालकरी हाशहुश करत घाम पुसत बसला होता. आणि मी माझ्या नकळत एक सुटकेचा निश्वास टाकला. त्याला रस्ता विचारला नाही पण आपण निदान मानवी वावराच्या कक्षेत आहोत हे जाणवून सुखावलो. पुढे जात राहिलो तर तीव्र उतार लागला आणि टेकडी संपली. नेहमीची जागा आलीच नाही. मग धापा टाकीत मागे वळलो. पुन्हा चिलीम ओढणाऱ्या महाराजांचं मंदिर दिसलं आणि मनाशी खूणगाठ बांधली की महाराजांच्या मंदिराच्या उजवीकडे टेकडी संपते. तिथे जायचं नाही.

दुसऱ्या दिवशी त्याच वाटेने गेलो. पुन्हा तीच दगडांची रास ओलांडली. आता पुढे गजाजन महाराजांचं देऊळ येईल हे माहिती होतं. देऊळ आलं पण आज उजवीकडे वळलो नाही. डावीकडे अगदी छोटी पायवाट होती. त्या वाटेने गेलो. आजूबाजूला झाडी झुडपं जास्त होती. चालायला छान वाटत होतं. मनात उगाच आपण 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'चे किंवा मग 'सर्व्हायवर' सारख्या कार्यक्रमाचे नायक आहोत अशी भावना येत होती. आपण गतानुगतिक नाही. आपण नवीन वाट शोधायला घाबरत नाही. असे विचार डोक्यात येऊन स्वतःबद्दल किंचित कौतुक आणि अभिमानही वाटू लागला. झाडी विरळ होऊ लागली. आणि मग पुन्हा मोठी पायवाट सुरु झाली. पुढे जात राहिलो. आणि मग एका उंच चढावाला पार केलं तर पुन्हा नेहमीचा हमरस्ता समोर आला. काहीही केलं नसताना विजयाचा आनंद मनात भरून आला. उशीर झाला होता. म्हणून परतताना पुन्हा हमरस्त्याने निघालो. मग कित्येक दिवस हाच शिरस्ता झाला. जाताना नवीन पायवाट. दगडांची रास. गजानन महाराजांचं मंदिर. डावीकडची छोटी पायवाट. मग मोठी पायवाट. मग चढण. मग हमरस्ता. मग नेहमीच्या ठिकाणी चालण्याचा शेवट आणि परतण्यासाठी नेहमीचा हमरस्ता.

एका रविवारी असाच परत निघालो होतो. चढणापाशी आलो. समोर हमरस्ता खुणावत होता. पण मनात विचार आला की आज क्लास नाही आहे. तर मग पुन्हा पायवाटेने उलट जाऊया. म्हणून पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांकडे दुर्लक्ष करत, हमरस्ता सोडून चढ उतरू लागलो. मोठी वाट संपत आली. कानात कुठलीशी डॉक्युमेंटरी चालू होती. त्याच तंद्रीत चाललो होतो. आणि आजूबाजूला ओळखीच्या खाणाखुणा दिसेनात. तासभर चालून झालेलं होतं. त्यामुळे घशाला कोरड पडलेली होती. शरीरातील अतिरिक्त मेदवृद्धीमुळे भरपूर घाम आलेला होता. तशात डॉक्युमेंटरी संपली. आता लक्ष आजूबाजूला जास्त होतं. सगळी झाडं सारखी. सगळे दगड सारखे. एकक्षण थांबलो. पुन्हा मागे जावं असं वाटलं. पण तिथे दोन मुली माझ्या मागून येताना दिसल्या. (कदाचित माझ्या वयाच्या असाव्यात किंवा मग अजून काही. पण चष्मा घातलेला नसल्याने मला दुरून त्या मुलीच वाटल्या). त्यांचं माझ्याकडे लक्ष जावं इतका मी रुबाबदार नाही हे मला माहिती होतं. पण किमान 'हा धापा टाकणारा मध्यमवयीन पुरुष रस्ता चुकल्यामुळे गोंधळलेला आहे' असं त्यांचं माझ्याबद्दल मत होऊ नये म्हणून मी निसर्ग निरीक्षण करतो आहे असा आव आणला. आणि मग केसांवरून हात फिरवत पुन्हा उताराला लागलो. आता उजव्या हाताला अनोळखी चढण, डाव्या हाताला खोल घळ, मागे अनोळखी मुली आणि त्यांच्या मागे ओळखीचा रस्ता अश्या अवस्थेत मी पोटातल्या कावळ्याचं संगीत ऐकत अरुंद वाटेवरून चालू लागलो.

मुली बऱ्याच मागे पडल्या आहेत आणि त्यांना आपण दिसत नाही आहोत हे कळल्यावर मात्र मी त्या वाटेतून आणि प्रसंगातून मार्ग कसा काढायचा त्याचा विचार करू लागलो. मागे मुली असणार त्यामुळे तिथे जाण्याचे दोर मनाच्या आढ्यताखोर शेलारमामाने कापून टाकले होते. शेवटी मनाचा हिय्या केला आणि हर हर महादेव करत उजवीकडच्या अनोळखी चढणीकडे वळलो. काट्याकुट्यातून आणि घसरणाऱ्या दगडांवरून पायाबरोबर हातही वापरत, धापा टाकत चढण कशीबशी संपवली. अजूनही काही ओळखीचं दिसेना. त्यानंतर ज्याप्रमाणे मी धावलो ते जर कुणी बघितलं असतं तर, पर्णकुटीत सीता नाही हे पाहून सैरभैर झालेला आणि वृक्षवल्लरिंना तिच्या खाणाखुणा विचारणारा राम कसा दिसत असेल त्याची त्यांना लगेच कल्पना आली असती. फक्त शरचाप, जटा आणि वल्कलं तेवढी नव्हती.

दिशाहीन होऊन भटकण्यात अजून पाच मिनिटं गेली. ती पाच मिनिटं मला कित्येक युगांसारखी वाटून आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांत समजलेला नसला तरी त्याची अनुभूती मात्र आली. जंगल संपून एक पायवाट दिसली. सगळ्या दिशा आणि सगळ्या वाटा आता सारख्याच दिसू लागल्या होत्या. स्वतःच्या दिशाज्ञानावरचा विश्वास आता संपल्यात जमा झाला होता. आपल्याला बहुतेक चकवा लागला आहे असं वाटू लागलं. मग माझ्या लहानपणी रविवारी दुपारी दूरदर्शनवर प्रादेशिक भाषेतील चित्रपट दाखवत त्यात पाहिलेला सत्यजित रेंचा 'गुपी गाईन बाघा बाईन' हा चित्रपट आणि त्यात जंगलात वाट हरवलेले गोपी आणि बाघा आठवले. त्यांच्यासमोरचा भुतांचा नाच आठवला. मग युट्युबवर तो चित्रपट आहे हे कळल्यावर मुलांना तो बघण्याची सक्ती केली होती ते आठवलं. आणि सध्याच्या ऍनिमेशनपटांच्या खुराकावर वाढलेल्या त्या दोघांच्या चेहऱ्यावर, 'आपल्या बाबांना लहानपणी हे कसं काय आवडलं असावं?' असा प्रश्न उमटलेला पाहून आपण कसे अस्वस्थ झालो होतो ते आठवून हसू आलं. आणि इतक्या गोंधळलेल्या मनस्थितीतही आपल्या डोक्यात रामायणापासून ते आईन्स्टाईन आणि सत्यजित रेंपर्यंत कुठले कुठले विचार येत आहेत हे जाणवून स्वतःबद्दल थोडं कौतुकही वाटलं.


आता मी वाट फुटेल तिथे चालत होतो. मनातल्या शेलारमामाला, मागे दिसलेल्या मुलींना, 'अनोळखी मुलींनाही आपण हुशार दिसलं पाहिजे' या स्वतःच्या बावळट विचाराला शिव्या घालू लागलो होतो. आणि एकाएकी मला समोर ती दगडांची रास दिसली.


सीतेची पैंजणं पाहून रामलक्ष्मणाला जसा आनंद झाला असेल अगदी तसाच आनंद मला झाला. त्या दगडांच्या जवळ जाऊन उभा राहिलो. शाहरुखसारखे हात पसरले. स्वतःलाच एक प्रदक्षिणा घातली. आता गजानन महाराजांचं देऊळ कुठे असेल त्याचा पत्ता लागला. टेकडीच्या शेवटच्या टोकाकडे नेणारी नेहमीची ओळखीची चढण कुठे आहे ते कळलं. घरी जायचा रस्ता समजला. सगळ्या टेकडीचा माझ्या मनात तयार असलेला आणि काही काळापूर्वी विस्कटलेला नकाशा पुन्हा पूर्ववत झाला.

रस्त्याच्या मध्यभागी रचलेली ती दगडांची रास जेव्हा मी पहिल्यांदा पाहिली होती तेव्हा तिच्याबद्दल मनात आलेले नकारात्मक विचार आता दूर पळाले होते. त्यांची जागा आता विलक्षण आत्मीयतेने आणि प्रेमाने घेतलेली होती. याआधी असाच रस्ता चुकलेल्या कुण्या वाटसरूने पुन्हा रस्ता चुकू नये म्हणून आणि कदाचित इतरांनाही रस्ता कळावा म्हणून ती रास रचली असावी असं वाटून मी त्या अनामिक वाटसरूचे मनातल्या मनात आभार मानले. त्याबद्द्ल कृतज्ञता मनात दाटून आली होती. त्यामुळे त्याला काही देता आलं नाही तरी किमान त्याच्या धडपडीला काहीतरी द्यावं म्हणून मग बाजूला पडलेला एक मोठा दगड उचलून त्या दगडांच्या राशीवर ठेवला आणि माझ्या घराच्या रस्त्याला लागलो.

रस्ते माहिती नसताना जंगलातून फिरत शहरे वसवणाऱ्या आदिमानवाबद्दल; समुद्रात असे दगड रचणे शक्य नसताना हजारो मैल दूर अश्या युरोपातून संपूर्ण जग पादाक्रांत करणाऱ्या माणसांबद्दल; वाळवंटात रोज वाऱ्याने टेकड्या आपल्या जागा बदलत असताना, काफिले घेऊन फिरणाऱ्या व्यापाऱ्यांबद्दल; सगळ्यांबद्दल आदर दाटून आला. काही दिवसांपूर्वी दोन्ही लेकरांना पुण्याचा झीरो स्टोन दाखवायला घेऊन गेलो होतो त्यावेळी भारताच्या टोपोग्राफीचा सर्व्हे करण्याचा महान प्रकल्प तडीस नेणाऱ्या ब्रिटिशांबद्दल आदर वाटला होता. त्यांच्या त्या कल्पनेशी माझ्या अनुभवाचा बारीकसा धागा जुळला आहे असं वाटून अंगी आलेला शीण थोडा कमी झाला.
आणि मग जाणवलं की हे खुणेचे दगड जुन्या पांथस्थांना रस्ता बरोबर असल्याची खात्री देतात, नवीन पांथस्थांना खाणाखुणा देतात आणि परतीच्या वाटसरूंनाही दिग्दर्शन करतात. हे दगड म्हणजे कुणाच्यातरी अनुभवांचे संचित आहेत. कुणाच्या तरी वाटेचा, ती हरवण्याचा, पुन्हा सापडण्याचा आणि इतर कुणी हरवू नये या इच्छेचा वस्तुरूप इतिहास आहेत. मग वाटलं मी जे लिहितो तेही असेच दगड आहेत. मी परतीच्या प्रवासाला निघालो तर मला घराकडे नीट जातो आहे हे सांगणारे. दुसरा कुणी या वाटेने जात असेल तर त्यालाही दिग्दर्शन करणारे. अर्थात त्याला त्यांचं महत्व पटलं तरंच ठीक. नाहीतर दगडांची रास पहिल्यांदा पाहून माझ्या मनात जसे नकारात्मक विचार आले होते तसेच त्याच्याही मनात आले तर त्यालाही किमान एकदा तरी जंगलात वाट चुकण्याचा अनुभव घ्यावा लागेल. आणि मग कदाचित तोही सैरभैर होईल. मग त्याला दगडांचे प्रयोजन कळेल. आणि मग कदाचित तोही माझ्यासारखाच कृतज्ञ होऊन एखादा दगड त्या राशीवर चढवेल.

Thursday, December 19, 2019

व्यर्थ न हो बलिदान (भाग ३)



जेव्हा श्री सुब्रमण्यम यांनी एवरग्रीनिंग या संकल्पनेचा उल्लेख केला तेव्हा बँका असं का करतात याबद्दलची दोन स्पष्टीकरणं मला आठवली. बँकांनी असं करण्यामागे दोन प्रेरणा काम करत असतात असं मानलं जातं.

१) Containtment Scenario (कंटेन्टमेंट सिनारिओ) किंवा नुकसान रोखण्याची शक्यता. या कल्पनेप्रमाणे बँका अर्थव्यवस्थेकडे पाहतात. जर अर्थव्यवस्था जोमात असेल तर आपण सध्याचे मृत कर्ज पुन्हा जीवनदान देऊन सदाबहार केले तर आपल्याला ते अनुत्पादक घोषित करावे लागणार नाही परिणामी आपला ताळेबंद आणि नफातोटा पत्रक अनाकर्षक दिसणार नाही. अर्थव्यवस्था जोमात असल्याने आपण दिलेली इतर कर्ज आपल्याला व्यवस्थित उत्पन्न देतील. यातून अनुत्पादक कर्जांचा प्रश्न जरी सुटला नाही तरी त्यांच्यामुळे होणाऱ्या नुकसानाचा फटका इतर चांगल्या कर्जाच्या उत्पन्नात दडून जाईल.

ज्याप्रमाणे शाळेत इन्स्पेक्शनला साहेब येणार असतील तर जुन्या काळचे शिक्षक जरा कमी हुशार मुलांना इतर हुशार मुलांच्या मधे दडवून ठेवत आणि या किंचित ढ मुलांना पाढे म्हणता आले नाहीत तरी ते सगळ्यांबरोबर निदान तोंड हलवत रहातील याची खात्री करून घेत त्यातलाच हा प्रकार. ढ मुलाचे पाढे पाठ न होण्याची समस्या सुटत नाही पण ते इन्स्पेक्शन साहेबांच्या लक्षात येत नाही इतकाच काय तो फरक.

२) Phoenix Scenario (फिनिक्स सिनारिओ) किंवा राखेतून भरारी घेण्याची आशा. या कल्पनेप्रमाणे बँकांना अनुत्पादक झालेल्या कर्जाच्या कर्जदाराबद्दल आपुलकी आणि त्याच्या व्यवसायातील अडचणींबद्दल सहानुभूती असते. त्याला जर पुन्हा मदत केली तर तो अडचणींतून बाहेर येऊ शकेल आणि त्याचे पुनरुज्जीवित केलेले कर्ज फेडू शकेल अशी बँकेला खात्री वाटते म्हणून बँका त्याचे कर्ज अनुत्पादित घोषित ना करता त्याला पुनरुज्जीवित करतात.

हा फिनिक्स सिनॅरिओ आठवला आणि मग लगोलग युवाल नोहा हरारींच्या होमो डेऊस या पुस्तकातील काही संदर्भ आठवले.

माणसाचा मेंदू कसा काम करतो? आपण निर्णय कसे घेतो? आपण अनुभवांतून खरंच शहाणे होतो का? याबद्दल बोलताना हरारी अनेक शास्त्रज्ञांच्या कामाचा दाखला देत सांगतात की आपल्या मेंदूचे दोन भाग असतात. एक अनुभव घेणारा आणि दुसरा त्या अनुभवांतून एक सुसंबद्ध गोष्ट रचणारा.

अनुभव घेणारा भाग हा कायम वर्तमानात जगत असतो. या क्षणाचा अनुभव घेत असताना त्याला त्याआधीच्या क्षणात घेतलेल्या अनुभवाची स्मृती नसते आणि दोन लगतच्या अनुभवांतील संबंध जोडून त्याचा सलग अनुभव घेण्यास तो असमर्थ असतो. म्हणजे आपल्या मेंदूत केवळ हाच एक भाग असता तर आपण कधीच अनुभवांतून शहाणे होऊ शकलो नसतो.

पण सुदैवाने आपल्या मेंदूत दुसरा भाग असतो त्याला अनुभव घेता येत नसले तरी तो त्या अनुभवांतून एक आपल्याला एक गोष्ट तयार करून सांगतो. त्या गोष्टीच्या आधारे आपण तशाच प्रकारच्या नवीन अनुभवात कसं वागायचं ते ठरवतो. हा गोष्ट तयार करणारा भाग आपल्याला प्रत्येक घटनेचा अर्थ सांगत असतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या अनुभवांची साखळी तयार करून त्यातून तो एक सुसंगत गोष्ट तयार करून आपल्याला एखादी गोष्ट का करावी किंवा का करू नये यासाठी कारण किंवा हेतू तयार करून देत असतो.

पण या गोष्ट तयार करणाऱ्या भागाचीही एक मर्यादा असते. त्याला सगळे अनुभव लक्षात ठेवून त्याआधारे गोष्ट तयार करता येत नाही. त्यामुळे तो केवळ अनुभवाची सुरवात आणि त्याचा शेवट या दोन बिंदूंची सरासरी काढून आपली गोष्ट पूर्ण करतो. या सरासरी काढण्यामुळे एक गडबड होते. ज्या घटनांची सुरवात आणि शेवट दोन्ही आल्हाददायक असतात किंवा सुरवात आणि शेवट दोन्ही कमी त्रासदायक असतात त्या घटना कितीही त्रासदायक असल्या तरी आपण त्यांना पुन्हा पुन्हा सामोरे जाऊ शकतो. याउलट ज्यांची सुरवात आणि शेवट त्रासदायक असतात त्यांचा बाकीचा अनुभव तितका त्रासदायक नसला तरी त्या घटना आपल्याला अप्रिय होतात. म्हणजे वास्तविक घटना आणि त्यांच्याबद्दल आपल्या मेंदूने तयार केलेली आणि आपल्याला सत्य वाटणारी काल्पनिक गोष्ट यांत बरीच मोठी तफावत असू शकते.

मानवी मेंदूच्या या गडबडीला निसर्गानेही वापरून घेतलेले आहे. त्यामुळे मरणप्राय अशा वेदना होऊनही नंतरच्या दोन तीन महिन्यात शरीरात तयार होणारे सुखकारक हार्मोन्स स्त्रियांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या बाळाला जन्म देण्यासाठी तयार करतात. प्रसूतीनंतर शरीरात तयार होणाऱ्या या हार्मोन्समुळे त्या वेदनादायी घटनेची सरासरी तीव्रता अतिशय कमी होते आणि बऱ्याच स्त्रियांना पुन्हा आई बनावसं वाटतं. लहान मुलांचे डॉक्टर आपल्याजवळ गोळ्या चॉकलेट्स ठेवतात आणि इंजेक्शन दिल्यावर रडणाऱ्या बाळांना चॉकलेट देऊन शांत करतात. पाच वर्षात आपल्या कारभाराला कावलेल्या जनतेने निवडणुकीत आपल्यालाच पुन्हा निवडून द्यावे म्हणून नेते मंडळी पाचव्या वर्षात करात सवलती, पगारात वाढ, किंवा नवनवीन योजनांची घोषणा करतात. आपण पब्लिक मेमरी छोटी असते असा निष्कर्ष काढून मोकळे होतो पण ते तसं नसून गोष्टी तयार करून आपल्याला पुढचे निर्णय घ्यायला मदत करणाऱ्या मेंदूच्या भागाला डॉक्टर आणि नेते मंडळींनी गुंगवून टाकलेल असतं. वाईट अनुभवांच्या शेवटी येणार सुखद अनुभव आपल्या मनात तयार होणाऱ्या गोष्टीतील अप्रियतेची सरासरी कमी करून टाकतो आणि आपण पुन्हा एकदा अप्रिय घटनेचं स्वरूप समजून न घेता तिला सामोरे जायला हसतमुखाने तयार होतो. आणि "ज्याचा शेवट गोड त्याचं सारंच गोड" किंवा "अंत भला तो सब भला" हे वाक्प्रचार आपोआप शास्त्रोक्त ठरतात.

या गोष्ट तयार करणाऱ्या मेंदूच्या भागाबद्दल बोलताना हरारी पुढे जॉर्ज बोर्गेस या अर्जेंटीनीयन लेखकाच्या एका छोट्या गोष्टीचा उल्लेख करतात. 

Jorge Borges
Image Credit : Internet 
ही गोष्ट मिगेल सर्वांटीसच्या जगप्रसिद्ध डॉन क्विक्झोट (डॉन किहोते) च्या गोष्टीवर बेतलेली आहे.

डॉनला त्याच्या मेंदूच्या गोष्टी सांगणाऱ्या भागाने पटवून दिलेलं असतं की तो एक मध्ययुगीन शूर सरदार आहे. आणि राजकन्येला वाचवण्यासाठी तो राक्षसांशी युद्ध करतो आहे. पण डॉनच्या मेंदूने त्याला दाखवलेली राजकन्या प्रत्यक्षात शेतावर काम करणारी एक साधारण मोलकरीण असते आणि डॉनच्या मेंदूंने जे राक्षस आहेत हे त्याला पटवून दिलेलं असतं त्या प्रत्यक्षात पवनचक्क्या असतात.

पवनचक्क्यांना राक्षस समजून लढणारा डॉन
Image  Credit: Internet
बोर्गेस यांनी या कथेला पुढे नेत असा मुद्दा मांडला आहे की समजा पवनचक्क्यांशी लढून स्वतःचं हसं उडवून घेणाऱ्या डॉनच्या हातून खरोखरंच कुणाचा खून झाला तर तो काय करेल? आपल्या हातून एका हाडामांसाच्या जिवंत व्यक्तीचा खून झाला आहे हे कळल्यावर डॉन कसा वागेल त्याबाबत बोर्गेसनी चार शक्यता वर्तवलेल्या आहेत त्यातल्या तीनच आपल्यासाठी महत्वाच्या आहेत म्हणून तितक्याच इथे लिहितो.

१) पहिल्या शक्यतेनुसार डॉनला कदाचित या घटनेचं गांभीर्य कळणार नाही. त्याच्या गोष्टी सांगणाऱ्या मेंदूने त्याच्यावर इतका मोठा पगडा बसवलेला असू शकतो की त्याला आपण काय केलं आहे हेच कळणार नाही. हे अनेकांच्या बाबतीत होतं. आपण यांना मठ्ठ किंवा मानसिक रुग्ण मानतो.

२) दुसऱ्या शक्यतेनुसार "युद्धस्य कथा रम्या" याला भुलून सैन्यात दाखल झालेला सैनिक ज्याप्रमाणे प्रत्यक्ष रणधुमाळीनंतर बधीर होऊन पुन्हा युद्धभूमीवर जायला टाळाटाळ करू शकतो त्याप्रमाणे आपल्या गोष्टी सांगणाऱ्या मेंदूने आपल्या हातून हे काय भयंकर कृत्य करवून घेतलं आहे, अशा विचाराने डॉन आपल्या कोषातून बाहेर पडून पूर्णपणे वेगळा माणूस बनू शकतो. ही शक्यता कितीही आकर्षक वाटली तरी फार थोड्या जणांसाठी ही प्रत्यक्षात येऊ शकते. वाल्याचा वाल्मिकी व्हायला नारदमुनी भेटावा लागतो आणि तरीही ज्या ज्या लोकांना नारदमुनी भेटले त्या सर्वांत वाल्मिकी ऋषी होण्याइतपत परिवर्तन घडून आले नाही. वाल्याचा वाल्मिकी ही आपल्या पुराणातील एकमेव गोष्ट आहे.

३) याउलट तिसरी आणि सर्वात जास्त गुंतागुंतीची शक्यता म्हणजे आपल्या कृत्याची त्याला जाणीव होईल. पण जे केलं आहे ते अयोग्य नसून तेच बरोबर आहे हे स्वतःला समजावण्याची त्याची धडपड सुरु होईल. आणि इथे त्याचा गोष्टी सांगणारा मेंदूचा भाग मदतीला येईल. तो त्याला एक नवीन गोष्ट तयार करून सांगेल ज्यामधे त्या जिवंत माणसाला मारणे कसे आवश्यक होते हे डॉन स्वतःला पटवू शकेल.

कदाचित ही तिसरी शक्यता आपल्याला प्रथमदर्शनी अशक्य वाटू शकते. पण तिन्हीपैकी तिसरी शक्यताच बहुसंख्य माणसांसाठी प्रत्यक्षात येते. आपण केलेल्या घृणास्पद कृत्याला न्याय्य ठरवण्याची आपली इच्छा इतकी तीव्र असते की आपण त्यासाठी एक नवीन गोष्ट तयार करतो. आणि मग आपले कृत्य योग्य हे स्वतःला पटवण्यासाठी आपण मग तेच कृत्य पुन्हा पुन्हा करू लागतो.

म्हणून अमेरिका आधी व्हिएतनाम युद्धात आणि मग अफगाणिस्तान युद्धात अडकते. साम्यवादाचा पाडाव करतो आहोत ही गोष्ट अमेरिकन समाजमानाने मान्य केली की मग हजारो सैनिक युद्धभूमीवर पाठवले जातात. आणि पहिल्या सैनिकाचा बळी गेला की सुरु होतो उद्घोष “व्यर्थ न हो बलिदान” चा. मग पहिल्या सैनिकाचे बलिदान व्यर्थ होऊ नये अनेक सैनिकांचे बलिदान द्यायला समाज तयार होतो. सैनिकही तयार होतात. युद्धातून अपंगावस्थेत परत आलेला सैनिक आणि त्याचे नातेवाईकही आपण जे केलं ते बरोबर होतं असंच स्वतःला सांगत रहातात. व्हिएतनामच्या भूमीवर आपले सैनिक पाठवून आपण मूर्खपणा केला या वास्तविक सत्यापेक्षा आपण साम्यवादाच्या राक्षसाशी लढताना अपंग झालो हे काल्पनिक सत्य त्या सगळ्यांना सुखावह वाटते. आणि लढाई जिंकली असेल तर विजयोन्माद देते; हरली असेल तर पुन्हा लढायला कारण देते.

जसा डॉन तसे बँकर्स. आपल्या काल्पनिक सत्यात जगाला फसवून अनुत्पादक कर्जांना पुनरुज्जीवित करणारे. उद्या कदाचित बाजार इतका उसळेल की बाकीच्या कर्जांतून मिळणाऱ्या उत्पन्नात ही अनुत्पादक कर्जे खपून जातील. किंवा मग कुणास ठाऊक? कदाचित आजचे अनुत्पदक कर्ज उद्या रसरशीत व्यवसाय म्हणून उभे राहील आणि सगळी रक्कम सव्याज परतफेड करेल!

पण वास्तवातला बाजार कायम आपल्या कल्पनेतल्या बाजाराप्रमाणे चालायला बांधील नसतो. तेच आपल्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत झालेलं आहे. त्यामुळे आपण एका आर्थिक अरिष्टाच्या खाईसमोर उभे आहोत. आणि हे आपल्याला अर्थव्यवस्थेचे सगळे आकडे सांगत आहेत. उच्चविद्याविभूषित अर्थतज्ज्ञ सांगत आहेत. अनेक कंपन्यातील कामगार कपात सांगत आहे. कित्येक ठिकाणी रखडणारे किंवा न वाढणारे पगार सांगत आहेत.

असं सगळं असताना जेव्हा मी समाजमाध्यमांवर नजर टाकतो तेव्हा मी अचंबित होतो. अर्थव्यवस्थेबाबत सरकार कुठली धोरणात्मक पावले टाकत आहे याबद्दल काहीच चिंता न करता इथे अनेक लोक ज्या मुद्द्यांवर बोलत आहेत ते पाहून पुन्हा एकदा 'व्यर्थ न हो बलिदान'ने आपली भूल या देशातल्या सुजाण आणि सुशिक्षित लोकांवरही टाकायला सुरवात केली की काय? असं वाटू लागतं.

ज्या देशात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, वेगवेगळ्या खानपान पद्धती आहेत, वस्त्रप्रावरणांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, जिथले नववर्ष सुरु होण्याच्या तारखादेखील वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या आहेत आणि ज्या देशात सामील होताना अनेक प्रदेशांनी आपापल्या परंपरा नष्ट होऊ न देण्याच्या बोलीवर सामीलनाम्यावर सही केली आहे; त्या देशावर आर्थिक मंदीचं संकट घोंघावत असताना सुशिक्षितांच्या तोंडचे विषय मात्र आर्थिक सोडून बाकी सर्व बाबींवर आहेत, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे.

आपल्या समाजाला काय हवं आहे तेच आपल्याला माहिती नाही आहे याबद्दल माझी खात्री पटलेली आहे. कुठलीही तातडीची आवश्यकता नसताना केवळ जाहीरनाम्यात लिहिलं होतं म्हणून आर्थिक बाबींकडे दुर्लक्ष करून इतर गोष्टींबाबत कायदे संमत करून घेणं खरोखर आवश्यक होतं का? या कायद्यातील तरतुदींमुळे होऊ घातलेल्या प्रचंड गोंधळाला आणि खर्चाला ऐरणीवर घेत विरोध करण्याऐवजी इतर फुटकळ बाबींवर विरोध करणे खरोखर आवश्यक होतं का? ईशान्येच्या राज्यांना वेगळा न्याय लावत हा कायदा संमत करणं आणि त्याच वेळी ‘काश्मीरला वेगळा दर्जा का?’, असा प्रश्न विचारणं यात काही विसंगती आहे, असं कुणाला वाटत नाही का? आसामच्या लोकांनी कायद्याविरोधी निदर्शन करणं चूक आहे पण अंदमानच्या बेटांवरील ख्रिश्चन मिशनऱ्याला मारून टाकणाऱ्या आणि आपल्या भूमीवर परदेशी घुसखोरच काय पण स्वदेशी लोकांनाही पाय ठेवू न देणाऱ्या हिंसक आदिवासी जमाती योग्य आहेत, या दोन वाक्यात काही विसंगती आहे, असं कुणाला वाटत नाही का?

राष्ट्रातून देश उभा राहू शकतो पण विविध परंपरांनी नटलेल्या देशातून एक राष्ट्र उभे करणे म्हणजे अनेकांचा आवाज दडपणे हे साधं सत्य पटवून घ्यायला खरंच इतकं कठीण आहे का? की कुणाच्या तरी कल्पनेतील कुठल्यातरी प्राचीन राष्ट्राच्या अस्तित्वासाठी आपण जिवंत माणसांचे, त्यांच्या परंपरांचे, त्यांच्या स्वप्नांचे, त्यांच्या आर्थिक विकासाचे आणि जरूर पडेल तेव्हा त्यांच्या मुलाबाळांचे बळी द्यायला तयार झालो आहोत? आपण जरी आपल्या कल्पनेतील सत्याने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून आपल्या स्वप्नाला पुनरुज्जीवित करत असलो तरी त्याप्रमाणे प्रकट व्हायची सक्ती वास्तविक सत्यावर नाही. आपण कदाचित आपल्या भूतकाळातील शत्रूंवर विजय मिळवत असू पण भविष्यातील शत्रू आपण शिकून घेतलेल्या सर्व तंत्रांपेक्षा वरचढ असेल. आणि आपण त्याला तोंड द्यायला तयार होण्याऐवजी, वास्तविक देशाला सोडून काल्पनिक राष्ट्रासाठी व्यर्थ न हो बलिदानचा घोष करत बसलो, तर आपल्यात आणि एवरग्रीनिंग करून संपूर्ण समाजाला फसवणाऱ्या बॅंकर्समध्ये काहीच फरक नसेल.

समाप्त

व्यर्थ न हो बलिदान (भाग २)


अरविंद सुब्रमण्यम
Image Credit : Internet
भारतीय अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीच्या कारणांबद्दल आपले निष्कर्ष मांडून झाल्यावर श्री. सुब्रमण्यम पुढे करायच्या उपाययोजनांकडे वळतात. त्यासाठी त्यांनी मांडलेले मुद्दे समजण्यासाठी अर्थशास्त्रातील एक महत्वाची संकल्पना समजणे आवश्यक आहे.

जीडीपी किंवा सकल राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या तीन पद्धती आहेत. त्यातील सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत म्हणजे Expenditure Method (एक्सपेंडिचर मेथड) किंवा खर्चाधारित पद्धत. या पद्धतीप्रमाणे सूत्ररूपाने सांगायचे झाल्यास देशाचा जीडीपी म्हणजे C+G+I+(X-M). किंवा Consumption + Government Expenditure + Investment + (Export - Import). सोप्या शब्दात सांगायचं तर जीडीपी म्हणजे देशातील नागरिकांनी वस्तू आणि सेवांच्या उपभोगासाठी केलेला खर्च (+) सरकारी खर्च (+) देशात झालेली गुंतवणूक (+) देशाची निर्यात (-) देशाने केलेली आयात.

म्हणजे जर देशाचा जीडीपी वाढवायचा असेल तर उपभोगावरचा खर्च किंवा सरकारी खर्च किंवा गुंतवणूक किंवा निर्यात यापैकी कुठलीही एक गोष्ट किंवा सर्व गोष्टी वाढवल्या पाहिजेत किंवा / आणि आयात कमी केली पाहिजे.

हा मुद्दा लक्षात घेऊन आपण श्री सुब्रमण्यम काय म्हणतात त्याकडे वळूया.

अनेक लोकांना वाटते की उपभोगावरचा खर्च वाढवणे हे जीडीपी वाढवण्याचे एक कारण आणि त्यामुळे जीडीपी वाढणे हा परिणाम आहे. परंतु श्री. सुब्रमण्यम सांगतात की आपण कारण परिणाम यांची साखळी उलटी बघत आहोत. सूत्ररूपाने संकल्पना मांडल्याने हा गोंधळ होत असावा. त्यांच्या मते उपभोगावरचा खर्च वाढल्याने जीडीपी वाढत नसून जीडीपी वाढल्याने उपभोगावरचा खर्च वाढत असतो.

जीडीपी वाढण्याची कारणे कोणती? या प्रश्नाला उत्तर देताना ते सांगतात "गुंतवणूक आणि निर्यात हीच खरी जीडीपी वाढवण्याची दोन इंजिन्स आहेत. यापूर्वी भारताने अनुभवलेली प्रगती हीदेखील याच दोन इंजिनांवर आधारलेली होती. आपण उत्पादन क्षेत्रात मुसंडी मारण्याऐवजी सेवा क्षेत्रात जोरदार मुसंडी मारल्याने कदाचित आपल्याला हे लक्षात येत नसेल पण १९९१ पासून आपण अनुभवलेली प्रगती ही सॉफ्टवेअर क्षेत्रातील आपल्या निर्यातीमुळे आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ भारतात वाहता राहिला यामुळे झालेली होती. या प्रगतीचा परिणाम म्हणजे अनेक कुटुंबांचे उत्पन्न वाढले आणि अंतिमतः देशातील नागरिकांकडून उपभोगांवरचा खर्च वाढला. त्यामुळे आपण आता उपभोगांवरचा खर्च वाढवण्याकडे लक्ष देण्याऐवजी गुंतवणूक आणि निर्यात या गोष्टी कशा वाढतील याकडे लक्ष दिले पाहिजे.

आपली निर्यात तेव्हाच वाढते जेव्हा आपल्या मालासाठी किंवा सेवांसाठी अन्य देशात ग्राहक उपलब्ध असतात आणि त्यासाठी पैसे मोजायची त्यांची तयारी असते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजार इतका मंदावला आहे की निर्यातकेंद्री धोरण आखूनही आपल्याला त्यात मोठे यश मिळेल असं वाटत नाही. मग राहता राहिला मार्ग गुंतवणुकीचा. त्यातही परदेशी गुंतवणूक येण्याचे आपले मार्ग आता फार प्रशस्त राहिलेले नाहीत. असे का झाले असावे याबद्दल बोलण्याचे श्री सुब्रमण्यम यांनी टाळले असले तरी माझ्या मते आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पातळीवरील अस्थिर राजकीय आणि सामाजिक वातावरण यासाठी जबाबदार असावं.

आता जर उपभोगांवरचा खर्च हे जीडीपी वाढण्याचे कारणंच नसेल आणि गुंतवणूक व निर्यात हे दोन्ही राजमार्ग आता काट्याकुटयांतून जात असतील तर आपण यातून बाहेर पडणार कसे? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणतात की आपण परिस्थितीचे सुयोग्य आकलन करून आपल्या अपेक्षांवर लगाम ठेवला पाहिजे. दोन अंकी वाढीचा दरंच काय पण ८% वाढीचा दर हे अशक्यप्राय स्वप्न आहे हे आपण स्वीकारले पाहिजे.

वेगळ्या भाषेत सांगायचं तर भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था तोंडापेक्षा मोठा घास घेतल्यासारखी झाली आहे. घास टाकणे शक्य नसल्याने गुदमरायला होणार आहेच. यावर एकमेव उपाय म्हणजे आता तोंडातल्या घासाचे हळूहळू तुकडे करून ते गिळणे आणि तोपर्यंत नवीन घास न घेणे, हाच आहे.

अर्थात हे काही फार आकर्षक भविष्य नाही. त्यामुळे लोकानुनयी निर्णय करण्याकडे सरकारचा कल झुकू शकतो. ते टाळण्यासाठी श्री. सुब्रमण्यम सरकारला सल्ला देतात की,

१) वैयक्तिक उत्पन्न कर कमी करु नयेत(याचे लाभार्थी फार थोडे असतील आणि या निर्णयामुळे उपभोगावरचा खर्च फार मोठ्या प्रमाणात वाढणार नाही. त्याऐवजी उत्पन्न कर तितकाच ठेवून गरिबांना डायरेक्ट बेनिफीट ट्रान्स्फर करुन समाजाच्या पायथ्याशी असलेल्या अनेकांची क्रयशक्ती सरकारने वाढवावी)

२) जीएसटीचे दर (विशेषतः न्यूनतम दर) वाढवू नयेत (याने होणाऱ्या भाववाढीमुळे बहुसंख्य लोकांची खर्च करण्याची तयारी आणि ताकद दोन्ही कमी होतील)

३) व्याजदर कमी करत रहाण्याचा फायदा होणार नाही, कारण बॅका आता जोखीम घ्यायला घाबरत असल्याने रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या व्याजदरकपातीचा फायदा गिऱ्हाईकांपर्यंत पोचणार नाही.

४) इन्सॉल्व्हंसी अॅण्ड बॅंकरप्सी कोड (IBC) मधे अधिक लवचिकता आणावी. वीजनिर्मिती आणि रिअल इस्टेट सेक्टर हे पुढचे खड्डे आहेत. त्यांचा धक्का कमी बसावा अशा तर्‍हेने IBC मधे लवचिकता आणावी. सगळा भार न्यायालयांवर न टाकता सरकारने यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावेत.

५) आपली अर्थव्यवस्था अडचणीत आहे हे सरकारने नाकारु नये. रघुराम राजन यांनी बॅंकांवर उगारलेला पारदर्शकतेचा बडगा आता NBFC क्षेत्रापर्यंत पोचायला हवा. त्यांच्या अॅसेट्सच्या क्वालिटीचा लेखाजोखा घ्यायला हवा. बॅंका कुणाला कर्जे देतात, किती देतात, त्यांची वसुली कशी होते, न झाल्यास ते लपवले जाते की त्याची नोंद होते याबद्दलच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि तेच नियम NBFC क्षेत्रातही लागू केले पाहिजेत.

६) बाजारावरील नियंत्रकांच्या (अॉडिटर्स, आरबीय, सेबी, कंपनी कायदा सल्लागार इत्यादी) दर्जाकडे लक्ष द्यावे.

७) जोपर्यंत बॅंकांच्या व्यवहारात दृष्य सुधारणा दिसत नाहीत तोपर्यंत बॅंकाना भांडवली मदत करणं थांबवावं.

८) शेती, कामगार कायदे, जमीनधारणा कायदे यांत सुधारणा करावी.

९) अर्थव्यवस्थेच्या डेटाशी खेळणं सरकारने थांबवावं.

आपल्या अर्थव्यवस्थेपुढील अडचणी चक्राकार आवर्तने आणि रचनात्मक त्रुटी या दोन्ही स्वरुपाच्या असल्या तरी सरकारने व्याजदरकपात सारखे तात्पुरते निर्णय घेऊ नयेत असा सल्ला ते देतात. व्यवस्थेत विश्वासाचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. व्यवस्था जरी आयसीयूमधे असली तरी तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा फायदा नाही असं त्यांचं मत आहे.

श्री सुब्रमण्यम यांनी सांगितलेले उपाय सरकारने जसेच्या तसे अमलात आणले तर घरांच्या किमती वाढणार नाहीत, ठेवींवरचे बँकांचे व्याजदर कमी होतील आणि कर्जांवरचे व्याजदर वाढतील, प्राप्तीकर कमी होणार नाही.

त्यांच्या म्हणण्याचा रिअल इस्टेट क्षेत्रासंबंधी मला लागलेला अर्थ असा की रिअल इस्टेटमधे प्राईस करेक्शन झालं (किंमती गडगडल्या) तर बाजार कोसळेल आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम अतिघातक ठरेल. त्यामुळे प्राईस करेक्शन ऐवजी टाईम करेक्शन (दीर्घकाळपर्यंत किंमती स्थिर रहाणे) करण्याकडे या क्षेत्राचा कल असेल.

याचा सर्वसामान्य माणसासाठी अर्थ असा होतो की
१) धंदा व्यवसाय करत असाल तर नवीन कर्जे काढताना अतिरिक्त जोखीम घेऊ नका.
२) नोकरी करत असाल तर थोड्या फरकासाठी स्थायी नोकरी सोडू नका.
३) नोकरी शोधत असाल तर चांगला पगार ही एकमेव कसोटी ठेवू नका.
४) बॅंकेत ठेवी ठेवताना बॅंकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घ्या. घसघशीत व्याजाच्या आमिषाला बळी पडू नका.
५) सर्व रक्कम एकाच बॅंकेत ठेवणं टाळा.
६) भिशी किंवा तत्सम योजनेत उतरताना अनावश्यक जोखीम घेऊ नका.
७) नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्याकडे लक्ष द्या.
८) वायफळ खर्च टाळा. आवडीपेक्षा उपयुक्ततेकडे आणि आवश्यकतेकडे लक्ष द्या.
९) शेअर बाजारात उतरत असाल तर स्वतः अभ्यास करून कंपनी निवडा. टिप्सवर अंधविश्वास ठेवू नका.
१०) मुलांना स्वावलंबनाची सवय लावा.

(वरील दहा मुद्दे माझे निष्कर्ष आहेत. श्री. सुब्रमण्यम यांनी मांडलेले नाहीत)

इथपर्यंत तुम्ही वाचत आला असाल तर इतक्या रुक्ष विषयातही रस घेऊन माझ्यासोबत आल्याबद्दल धन्यवाद. तरिही एक प्रश्न रहातोच की या लेखमालेचं नाव मी असं का ठेवलं? त्याचं उत्तर आहे युआल नोहा हरारीचं होमो डेऊस हे पुस्तक. त्या पुस्तकाने काय केलं ते पुढच्या भागात सांगतो.



Tuesday, December 17, 2019

व्यर्थ न हो बलिदान (भाग १)


सकाळी टेकडीवर चालायला गेलो होतो. अरविंद सुब्रमण्यम यांनी बँगलोर (बंगळुरू) इंटरनॅशल सेंटरच्या व्यासपीठावर दिलेलं भाषण डाउनलोड करून ठेवलेलं होतं: ते ऐकत होतो. भाषणाचं नाव होतं ग्रेट इंडियन स्लो डाऊन (भारतातील महान मंदी). भाजप सरकारच्या पहिल्या कार्यकाळात भारत सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून काम करणाऱ्या सुब्रमण्यम यांनी मुदतपूर्व निवृत्ती घेतली होती. आणि हार्वर्ड विद्यापीठात संशोधन व अध्यापनाच्या कामात त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले होते. सुब्रमण्यम आणि त्यांचे मित्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या भारत शाखेचे प्रमुख जॉश फेलमन यांनी केलेल्या संशोधनाचे सार या भाषणात मांडलेले आहे.

जेव्हा अमेरिकन सरकार भारतावर व्यापारी निर्बंध घालत होते तेव्हा अमेरिकन सिनेटमध्ये भारताची बाजू मांडणारे सुब्रमण्यम जेव्हा भारत सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून काम करू लागले तेव्हा जनधन अकाउंट > आधार > मोबाईल क्रमांक यांची जोडणी करून सरकारी योजनांचे फायदे योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवावेत या योजनेचे ते शिल्पकार होते. विद्यमान सरकारबद्दल त्यांना ममत्व आहे आणि सरकारच्या उद्देशांबद्दल त्यांना खात्री आहे, असं मला त्यांच्या भाषणावरून आणि विशेषतः त्यानंतरच्या प्रश्नोत्तरावरून वाटलं.



काही अन्य अर्थ तज्ञांप्रमाणे 'सरकारने सगळे निर्णय केंद्रीभूत करून ठेवल्याने अर्थव्यवस्थेला धोरण लकवा झालेला आहे, नोटबंदी आणि जीएसटी राबवण्यामधील अव्यवस्था' ही कारणे भारताच्या सध्याच्या आर्थिक दुरावस्थेला कारणीभूत आहेत असं त्यांना वाटत नाही. याऐवजी संशोधनांती त्यांना जाणवलेले मुद्दे त्यांनी याप्रमाणे मांडले आहेत.

१) कुणी मान्य करो अथवा न करो पण भारतीय अर्थव्यवस्था सध्या अतिशय मोठ्या संकटात आहे. आणि हे संकट त्यांच्या शब्दात unprecedented (न भूतो न भविष्यती) अशा प्रकारचे आहे.

२) केवळ जीडीपीच्या आकड्यांकडे न बघता विविध क्षेत्रातील उत्पादन, उत्पन्न आणि कर्ज यांच्या आकड्यांची तुलना करता त्यांचे असे मत आहे की ही परिस्थिती १९९१ पेक्षा आणि २००२ पेक्षाही वेगळी आहे. १९९१ मध्ये आपली अर्थव्यवस्था अडकलेली होती पण जग मात्र वेगाने पुढे जात होते. २००२ च्या वेळी जागतिक अर्थव्यवस्था अडकलेली होती पण आपली अर्थव्यवस्था ठणठणीत होती. सध्या मात्र आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा दोन्ही ठिकाणी अर्थव्यवस्था अडकलेल्या आहेत. त्यामुळे सध्याची परिस्थिती अतिशय काळजी करण्यासारखी आहे. त्यांच्या शब्दात सांगायचे तर अर्थव्यवस्था अति दक्षता विभागात ठेवावी लागेल.

३) जर १९९१ मध्ये आपण धोरणात्मक निर्णय घेऊन आपल्या अर्थव्यवस्थेतील अडथळे दूर केले होते आणि आणि २००२ च्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संकटातही आपण तग धरू शकलो इतकेच काय पण २००८ च्या अमेरिकन सब प्राईम क्रायसिसच्या वेळी जेव्हा जगभरातील विविध अर्थव्यवस्था डगमगू लागल्या तेव्हाही आपल्या अर्थव्यवस्थेचं तारू व्यवस्थित किनाऱ्याला लागलं तर मग आता एकाएकी असा कुठला खटका ओढला गेला आहे की ज्यामुळे सुव्यवस्थित अर्थव्यवस्थेत एकाएकी गतिरोध उत्पन्न झाला?

४) स्वतःच उपस्थित केलेल्या या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणतात सध्याची समस्या एकाच वेळी सायक्लिकल आणि स्ट्रक्चरल (अर्थव्यवस्थेतील चक्रांमुळे आणि रचनात्मक अडचणींमुळे) आहे. आणि त्यांना दोघांना एकत्र आणून अर्थव्यवस्थेला खीळ घालणारा खटका म्हणजे ILFSची पडझड.

५) ILFS म्हणजे Infrastructure Leasing & Financial Services उर्फ पायाभूत सुविधांना पतपुरवठा करणाऱ्या एका कंपनीच्या पडझडीतून संपूर्ण अर्थव्यवस्थेला खीळ बसण्याची घटना कशी काय होऊ शकते ते समजावताना श्री सुब्रमण्यम यांनी Twin Balance Sheet Problem (ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम) किंवा दोन ताळेबंदातील अडचणी आणि Evergreening of loans (एव्हरग्रीनिंग ऑफ लोन्स) किंवा सदाबहार लोन्स या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं.

६) ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम म्हणजे धनको आणि ऋणको दोघांच्या ताळेबंदातील घोटाळा. व्यावसायिकाने केलेल्या स्वतःच्या व्यवसायाच्या भविष्य अंदाजाच्या आणि अर्थव्यवस्थेबद्दलच्या स्वतःच्या अंदाजाच्या आधारे बॅंका व्यवसायांना कर्जपुरवठा करतात. आता जर व्यावसायिकाच्या ताळेबंदातील तारण म्हणून दिलेल्या मिळकतींचे बाजारमूल्य घसरले (किंवा जास्त कर्ज मिळण्यासाठी जर ते खोटे वाढवून दाखवले असतील) आणि नंतर व्यावसायिकाला पुरेसा नफा झाला नाही तर तो कर्जाची परतफेड करत नाही. त्याच्या ताळेबंदात मूल्य वाढवून दाखवलेली पण प्रत्यक्षात कमी मूल्याची मालमत्ता दिसत रहाते आणि बॅंकेच्या ताळेबंदात त्याला दिलेले कर्ज बॅंकेची मालमत्ता म्हणून दिसत रहाते. कर्जाची आणि व्याजाची परतफेड होत नाही. पण बॅंका मात्र व्याज येणे आहे असं दाखवून नफा दाखवतात. प्रत्यक्षात ते कर्ज आता बुडीत खात्यात जमा झाल्यासारखे असते. पण फक्त ताळेबंद पाहणाऱ्याला मात्र सगळे व्यवस्थित दिसते.

असं होऊ नये म्हणून रिझर्व्ह बॅंकेने NPA नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स ताळेबंदात दाखवण्यासाठी आणि त्यावरील व्याज उत्पन्न म्हणून न दाखवण्यासाठी नियम केले आहेत. त्यातून वाचण्यासाठी बॅंका त्याच व्यावसायिकाला जुने कर्ज व्याजासहित फेडायला नवीन कर्ज देतात. आणि आपापले ताळेबंद नियमानुसार दिसतील याची काळजी घेतात. याला म्हणतात एव्हरग्रीनिंग लोन्स. कारण बाहेरून बघणाऱ्याला ताळेबंदातील कर्ज आता आतून सडलेली आहेत हे न कळता त्याला तो सदाबहार कर्जांचा ताळेबंद वाटतो.

७) २००४ ते २०११ च्या तेजीमधे बॅंकांनी स्टील, पायाभूत सुविधा, टेलिकॉम, वीजनिर्मिती या क्षेत्रांना भारंभार कर्जे दिली. परंतू ती कर्जे फेडण्यासाठी आवश्यक तितका नफा या उद्योगांनी न मिळवल्याने पहिला ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम सुरु झाला. बॅंकांनी एव्हरग्रीनिंग करु नये म्हणून रघुराम राजन यांनी नियमांचा बडगा उगारला. त्यामुळे बॅंकांनी आपापल्या ताळेबंदातील मृत कर्जे जाहीर करायला सुरुवात केली. ही होती ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेमची पहिली लाट.

यावर उपाय म्हणून सरकारने बॅंकांना भांडवल पुरवले आणि इन्सॉल्व्हंसी अॅण्ड बॅंकरप्सी कोड हा कायदा पास केला (दिवाळं काढण्याचा कायदा). त्याचा जास्तीत जास्त फायदा स्टील क्षेत्रातील उद्योगाला झाला. बाकीच्या क्षेत्रांना फायदा होण्यासाठी कायदा तितका लवचिक नव्हता.

तो तसा लवचिक करेपर्यंत सरकारने नोटबंदी केली.

नोटाबंदीमुळे बॅंकांच्या खात्यांमधे प्रचंड प्रमाणात पैसा आला. आता बॅंकांनी उद्योगांना कर्जपुरवठा करण्याऐवजी नॉन बॅंकिंग फायनान्शिअल कॉर्पोरेशन्सना (NBFC) कर्जे देण्यास सुरवात केली. म्हणजे बॅंकेसाठी हे कर्ज मालमत्ता झाले तर NBFC साठी देणी.

मग NBFC नी आपल्याकडे आलेल्या या पैशातून बांधकाम क्षेत्राला कर्जपुरवठा करायला सुरुवात केली. म्हणजे आता ही नवीन कर्जे NBFC साठी अॅसेट्स झाली आणि रिअल इस्टेट सेक्टरसाठी देणी बनली.

बांधकाम क्षेत्रात मागणीपेक्षा पुरवठा जास्त होता. पण त्यांनी जागांचे भाव उतरवण्यापेक्षा तसेच ठेवले आणि आपल्याकडील न विकल्या गेलेल्या जागांचा खर्च आणि त्यांच्यासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज भरण्यासाठी ही नवीन कर्ज वापरली.

त्यात ILFS (जी स्वतः एक NBFC आहे) च्या ताळेबंदातील गडबडीमुळे तिच्या व्यवहारांवर नियंत्रकांची नजर पडली. तिथला घोटाळा बघून भल्या भल्यांचे डोळे पांढरे झाले. आणि मग सर्व बॅंकांनी आपण ज्यांना कर्जे दिली त्या NBFC चे ताळेबंद आणि त्यांनी ज्यांना कर्जे दिलीत त्यांची आर्थिक स्थिती बघायला सुरुवात केली. ती अर्थातच चांगली नव्हती. कारण अनेक जागा विक्रीविना तशाच पडून होत्या. आता बॅंकांचं धाबं दणाणलं. आणि त्यांनी उद्योगांना कर्जपुरवठा करणं थांबवलं. आरबीआयने रेपो रेट कमी करुनही त्यांचा फायदा ऋणकोंना द्यायला बॅंका टाळाटाळ करु लागल्या. आणि भारतीय अर्थव्यवस्थेचं धडधडणारं इंजिन रुळावरुन उतरु लागलं.

आता या अपघातात बॅंका आणि उद्योग यांच्या ताळेबंदातील न संपलेला जुना ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम तर होताच वरून NBFC आणि रिअल इस्टेट सेक्टर अशा दोघांच्या ताळेबंदातील घोटाळा जमा होऊन तो फोर बॅलन्स शीट प्रॉब्लेम झाला आणि आपण महान भारतीय मंदीच्या गर्तेत शिरलो.

ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेमची समस्या वाढून आता तिची सुनामी झाली आहे. आणि यातून नुकसान न होता बाहेर येणं कठीण आहे असं श्री. सुब्रमण्यम यांचं मत आहे.

Sunday, December 15, 2019

वारसा

ही पोस्ट महाभारत युध्दाचे मूळ कारण सांगणारी वगैरे नाही. खरंतर महाभारत युध्दाला कुठलेतरी एकमेव कारण असेल अशी माझी समजूत नाही.

पण महाभारतकालीन समाजात पैतृक आणि मातुल घराण्याच्या संपत्तीच्या वारसाहक्काच्या व्यवस्थेचा पैलूही या युध्दाला असू शकतो अशी माझी धारणा आहे. त्या धारणेचा विस्तार म्हणजे ही पोस्ट आहे.

दोन गोष्टी आहेत

१) कुल कुणाचे? मातृकुलीन की पितृकुलीन. (मूल आईचे की बापाचे?)
२) आणि सत्ता कुणाकडे? (पुरुषाकडे की स्त्रीकडे?)

अनेकांच्या मताप्रमाणे महाभारतकालीन भारतात सत्ता पुरुषांच्या हातात गेली होती. स्त्री राज्य असलेले प्रदेश तुरळक होते. स्त्रीने माहेर सोडून सासरी जायची पद्धतही रुळली होती. पण विवाह ही सार्वत्रिक आणि सक्तीची बाब नव्हती. त्यामुळे विवाहबाह्य संबंध आणि विवाहपूर्व संबंध फार लक्षवेधी किंवा समाजविसंगत नव्हते. एकाच पुरुषाला अनेक स्त्रियांकडून मुले असणे किंवा एकाच स्त्रीला अनेक पुरुषांकडून मुले असणे याला समाजबाह्य वर्तन मानले जात नव्हते. पण त्यामुळे पहिला प्रश्न कळीचा झाला होता. की मुलाचे कुल कुठले? आईचे की बापाचे? कुणाच्या संपत्तीत मुलाला वाटा मिळणार, आईच्या की बापाच्या?

हिमालयीन समाजात मातृकुलीन व्यवस्था होती तर गांधार, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पठारी प्रदेशात पितृकुलीन व्यवस्था स्थिरावत चाललेली होती.

शकुंतलेच्या पुत्राला (भरताला) राजा दुष्यंताने स्वीकारावे आणि आपले कुल द्यावे, आपल्या संपत्तीचा वारस म्हणून नेमावे अशी कण्वमुनींची आणि स्वतः शकुंतलेची इच्छा असते. इथे पित्याच्या संपत्तीत (मातेच्या नव्हे) मुलाला हक्क मिळणे मान्य केले जाते. हस्तिनापूरमध्ये (उत्तर प्रदेशातल्या पठारी भागात) मुलावर पित्याचा हक्क आणि मुलाचा जन्मदात्या पित्याच्या संपत्तीवरचा हक्क प्रस्थापित होतो.

गंगा हिमालयीन समाजातील मुलगी. ती लग्न करते हस्तिनापूरच्या शंतनूशी. गंगा शंतनूकडून मुलं माहेरी पाठविण्यास संमती मिळवते. म्हणजे ती स्वतः जरी पुरुषसत्ता मानत असली, स्वतः जरी सासरी आलेली असली तरी मुलांना माहेरी पाठवते. जेव्हा भीष्माच्या वेळी शंतनू अडवतो तेव्हा ती भीष्माला त्याच्याकडे सोडून स्वतः माहेरी निघून जाते. म्हणजे शंतनू आणि गंगेच्या सुरवातीच्या सात पुत्रांना मातृकुल मिळते तर आठवा पुत्र भीष्माला मात्र पितृकुल मिळते पण त्याचे आजोळ तुटते. आणि पित्याच्या संपत्तीचा तो उत्तराधिकारी होतो.

पराशर तर सत्यवतीकडे कामभिक्षा मागतात आणि नंतर व्यासांना आपल्याबरोबर घेऊन जातात. म्हणजे सत्यवती सासरी जात नाही पण तिचा मुलगा मात्र बापाकडे जातो. म्हणजे व्यासाला पितृकुल मिळते पण त्याचेही आजोळ तुटते. पराशर फिरते तर सत्यवती हस्तिनापूर म्हणजे उत्तर प्रदेशातील. तिला पितृकुल व्यवस्था चालते आणि तीच व्यवस्था पुढे चालावी म्हणून ती नंतर जागरूक असते.

शंतनू आणि सत्यवतीचा मुलगा विचित्रवीर्य, बापाकडे राहतो. त्याचे आजोळही तुटत नाही आणि त्याला पैतृक संपत्तीचा वारस नेमावे म्हणून विवाहपूर्व अट त्याच्या आईने आणि आजोबानेच घातलेली असते. म्हणजे इथे पित्याच्या संपत्तीत (मातेच्या नव्हे) मुलाचा हक्क असणे अजून घट्ट होत जाते.

कुंती आणि माद्रीच्या वेळी गुंता अजून वाढतो. कारण त्यांच्या मुलांचा जन्मदाता पिता वेगळा आणि सामाजिक पिता वेगळा. जन्मदाता पिता हिमालयीन समाजातला तर सामाजिक पिता उत्तर प्रदेशातल्या हस्तिनापूरचा. जन्मदाते तर मुलांना सांगणार की माझ्या संपत्तीत तुमचा वाट नाही तुम्ही आईची संपत्ती बघा. आणि सामाजिक पिता म्हणावे तर उत्तर प्रदेशातील नियोगाचे प्रचलित नियम पाळलेले नाहीत.

त्यामुळे पैतृक संपत्ती मिळायची तर कुठल्या पित्याची? मूल आईचे म्हणावे तर त्यांना पहिल्या तीन पांडवांना कुंतिभोज (कुंतीला दत्तक घेणारा पिता) किंवा शूरसेन (कुंतीचा जन्मदाता) राजाच्या संपत्तीचे वारस बनावे लागेल आणि शेवटच्या दोन पांडवांना मद्रदेशाच्या संपत्तीचे वारस बनावे लागेल.

कुंती आणि माद्री पुत्र प्राप्त करून घेतात आणि त्या दोघींचे पुत्र त्यांच्याकडेच राहतात. आपापल्या बापाकडे जात नाहीत. म्हणजे पांडवांना मातृकुल मिळते आणि त्यांचे बापकडचे आजोळ तुटते. त्यांना जन्मदाता पित्याची संपत्ती मिळत नाही. कारण की कुंती आणि माद्रीने निवडलेले साथीदार त्या गंगेच्या समाजव्यवस्थेला मनात असतात. आणि कुंतीचा प्रयत्न असतो की त्यांना सामाजिक पित्याची संपत्ती मिळावी.

जर पांडवांना गंगेचा न्याय लावला असता माद्रीचा भाऊ शल्य राजाला नकुल सहदेवांना आपल्या संपत्तीमध्ये वाटा द्यावा लागला असता आणि कृष्णाला (कारण कृष्ण मथुरेचा आणि शूरसेन मथुरेचा राजा होता) पांडवांना वाटा द्यावा लागला असता. त्यामुळे शल्य आणि आणि कृष्ण दोघांचीही इच्छा होती की कुंती आणि पांडवांनी गंगेचा न्याय वापरू नये. तर सत्यवतीच्या न्याय वापरावा. म्हणून शल्य लढतो कौरवांकडून आणि कृष्ण लढतो पांडवांकडून.

बरं धृतराष्ट्र म्हणजे कौरवांचा जन्मदाताही अव्यंग नसल्याने समाजमान्य सम्राट नाही. आणि त्याची सूतसंतती भरपूर त्यामुळे पैतृक संपत्तीचा भरताचा किंवा विचित्रवीर्याचा न्याय लावला तर दुर्योधन आणि दुःशासनाला भरपूर वाटेकरी. (व्यासांच्या चरूची गोष्ट खरी मानून व्यासांकडे पितृत्व द्यावे तर व्यासांच्या पैतृक संपत्तीचा वाटा मिळेल पण हस्तिनापुरचा नाही.) आणि कौरव आईचे म्हणावेत तर त्यांना शकुनी मामाच्या संपत्तीत वाटा मागावा लागला असता.

या सगळ्यात विचित्रपणे अडकलेली दोन माणसे म्हणजे भीष्म आणि व्यास. म्हटलं तर भावंडे. कारण आई वडील वेगवेगळे असले तरी एकाच्या आईचा दुसऱ्याच्या वडिलांशी विवाह झालेला. आणि दोघांनाही पित्याच्या संपत्तीचा अधिकार मिळालेला. पण कुंती, माद्री आणि गांधारी या स्त्रियांनी दोन वेगवेगळ्या समाजांना (हिमालयीन आणि पठारी) एकत्र आणून जो गुंता तयार करतात त्याला सोडवणे कुणालाही शक्य नसते. आणि सर्वजण संपत्तीचे मालक असल्याने युद्ध अटळ होते.

Saturday, December 14, 2019

वेताळ पंचविशी

या बातमीवरून खालील पोस्ट सुचली होती.
------------------------------------------------------------

Image Credit : Internet 

अंधारी रात्र होती आणि वातावरण भेसूर होते. मधूनमधून पाऊस पडत होता. सोसाट्याच्या वार्‍याने अरण्यांतली झाडें हलत होती. विजांचा गडगडाट आणि कोल्हेकुई यांत मधेच भुतांचा हंसण्याचा आवाज येत होता. पण राजा विक्रम डगमगला नाही. निर्धाराने तो प्रेत घेऊन पळालेल्या वेताळाचा पाठलाग करीत होता. वेताळ प्रेत घेऊन झाडावर पुन्हां लपला होता. राजा त्या जुन्या झाडावर परत चढला आणि त्याने ते प्रेत खाली आणले. आपल्या खांद्यावर ते प्रेत घेऊन तो स्मशानाच्या दिशेने चालायला लागला.

तेव्हां प्रेतांत लपलेला वेताळ राजाला म्हणाला, ‘‘राजन, मला तुझा हेतू काय आहे ते कांही उमजत नाही. हे इतके कष्ट तूं कशासाठी करतो आहेस? मध्यरात्र झाली आहे, गडद अंधार आहे, कांहीही दिसत नाही आणि तुला भिती वाटत नाही कां? वन्य श्वापदांच्या, विषारी जनावरांच्या आणि भुताखेतांच्या या अरण्यांत तू तुझे प्राण धोक्यांत कां घालतो आहेस? तुझ्या मनांत काय आहे ते तरी मला सांग.

अनेकवेळा असं दिसतं की आपण जे करतो ते योग्य की अयोग्य हे ठरवणं अतिशय कठीण असतं. धर्मबुध्दी नावाच्या राजाच्या राज्यात एक घटना घडली. तिची कथा मी तुला सांगतो. त्या कथेवरुन धर्मबुध्दी असं का वागला ते तू मला सांग.

आटपाट नगर होतं. त्याचा राजा होता धर्मबुध्दी. या धर्मबुध्दीला दोन मुलं होती. एकाचं नाव शुध्दबुध्दी आणि दुसऱ्याचं नाव शीघ्रबुध्दी. दोघेही तेजस्वी आणि बलशाली होते. त्यांच्या बलशाली देहांकडे बघून दबून जाणारा माणूस त्यांच्या विनयशील वागणुकीमुळे चटकन आश्वस्त होत असे. सर्व प्रजाजन आपल्या या राजकुमारांवर अतिशय प्रसन्न होते. इतकं असूनही राजा आता चिंतेत पडू लागला होता. आपल्यानंतर या दोघांपैकी कुणाला राजा करावं या चिंतेने त्याच्या मनात घर केलं होतं.

एकदा त्याच्या कानावर एक अतिशय वाईट बातमी आली. प्रातःसमयी आलेल्या या बातमीने राजा हादरला. कुणीतरी राज्यातील एका स्त्रीवर अतिप्रसंग करुन तिला जाळून टाकलं होतं. या अमानुष अत्याचाराच्या बातमीमुळे संपूर्ण प्रजा चवताळून उठली. अत्याचाऱ्यांना शासन व्हायलाच हवं असा सूर सगळीकडून उठू लागला.

धर्मबुध्दीने दंडपाणी नावाच्या आपल्या अंतर्गत सुरक्षाप्रमुखाला बोलावलं आणि आरोपी कोण आहेत ते शोधून त्यांना न्यायासनासमोर आणण्याचं फर्मान सोडलं.

दुसऱ्या दिवशी बातमी आली की दंडपाणीने चारही अत्याचारी नराधमांना पकडलं आहे.'या नराधमांना हालहाल करून मारावं, त्यांचे असे हाल करावेत की पुन्हा कुणाला असा अत्याचार करण्याची इच्छा होऊ नये', अशी मागणी जनतेतून होऊ लागली.

तिसऱ्या दिवशी या चौघांना न्यायासनासमोर घेऊन येण्यासाठी दंडपाणी निघाला. पण रस्त्यात ते चौघे आरोपी त्याला हिसडा देऊन पळून जाऊ लागले. दंडपाणी चिडला. त्याने आपली तलवार काढली आणि तो आरोपींचा पाठलाग करु लागला. नग्न खड्ग घेऊन धावणारा उग्र दंडपाणी बघून आरोपी घाबरले आणि अजून वेगाने पळू लागले. त्यामुळे दंडपाणीचा राग अजून वाढला. आणि आरोपींना पकडण्याऐवजी त्याने त्यांच्यावर सपासप तलवारी चालवल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ते मृतदेह मग आपल्या वृषभशकटात टाकून त्याने न्यायासनासमोर आणले.

शकटातील ते मृतदेह, ते आणणारा रक्तलांछित दंडपाणी आणि त्याच्या हातातील ते रक्त प्यायलेलं खड्ग पाहून दरबार भयचकित झाला. नगरजनांनी खचाखच भरलेलं ते सभागृह दंडपाणी काय बोलणार तिकडे कान लावून बसलं होतं. इतक्या मोठ्या जनसमुदायात त्या वेळी अगदी मोरपीस पडेल तरी आवाज येईल इतकी शांतता होती.

धर्मबुध्दी, त्याच्या डाव्या बाजूला राणी न्यायसेना आणि उजव्या बाजूला दोन्ही राजकुमार शुध्दबुध्दी आणि शीघ्रबुध्दी बसले होते. मग धर्मबुध्दीने दंडपाणीला साऱ्या दृष्याचा खुलासा करायला सांगितलं.

जेव्हा दंडपाणीने आरोपींनी हिसडा देऊन पळण्यात यश मिळवलं हे सांगितलं तेव्हा सभागृहातील सर्वांच्या डोळ्यात अंगार फुलला. नाकपुड्या क्रोधाने फुलू लागल्या. हाताच्या मुठी वळल्या गेल्या. आणि मग जेव्हा दंडपाणीने पाठलाग व तलवारबाजीची घटना सांगितली तेव्हा सभागृहात एकंच आनंदाचा चीत्कार उठला. सर्व सभाजनांनी दंडपाणीचा जयजयकार केला.

धर्मबुध्दीने मग आपल्या दोन्ही राजकुमारांना पुढे बोलावलं आणि सांगितलं की दंडपाणीने जे केलं आहे त्याबद्दल तुम्हाला योग्य वाटेल तसा त्याचा सत्कार करा. ज्याची पध्दत मला योग्य वाटेल तो माझ्यानंतर या राज्याचा राजा बनेल.

शीघ्रबुध्दी लगेच पुढे आला. त्याने दंडपाणीला आपल्या गळ्यातील मोत्याची माळ काढून दिली आणि कृतकृत्य झालेल्या दंडपाणीला आपली तलवार भेट दिली. पुन्हा एकदा सभागृहात दंडपाणीचा आणि शीघ्रबुध्दीचा जयघोष झाला. तो आवाज इतका मोठा होता की जणू स्वर्गातील देवतांनाही शीघ्रबुध्दी राजा झाला असं वाटलं.

मग शुध्दबुध्दी पुढे झाला. आता तो दंडपाणीचा सत्कार कसा काय करणार याबद्दल सगळ्यांच्या मनात कुतूहल होतं. त्याने दंडपाणीला जवळ बोलावलं. त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं. त्याला सभागृहाकडे तोंड करायला सांगितलं त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि मग तो उच्चारवात म्हणाला 'दंडपाणीचं शौर्य अतुलनीय आहे आणि त्याची न्यायबुध्दी सगळ्यांना आवडेल अशा प्रकारे विचार करते.' सभागृह कानात प्राण आणून शुध्दबुध्दीचं भाषण ऐकत होतं. मग शुध्दबुध्दी पुढे म्हणाला 'असं असूनही यापुढे दंडपाणी आपल्या राज्याचा अंतर्गत सुरक्षा प्रमुख रहाणार नाही'. दंडपाणी आणि सभागृह या वाक्यामुळे अवाक् झालं असतानाच राजा धर्मबुध्दी उभा राहिला आणि त्याने शुध्दबुध्दीला आपला वारस म्हणून घोषित केलं."

ही कथा सांगितल्यानंतर वेताळ म्हणाला, ‘‘राजन्, असं वाटतं की राजा धर्मबुध्दी चुकला. त्याने लोकांच्या भावनांचा विचार न करता निर्णय घेणाऱ्या राजकुमाराला आपला वारस म्हणून घोषित केलं. मला तर वाटतं त्याने लोकभावनेत समरस झालेल्या शीघ्रबुध्दीला आपला वारस म्हणून घोषित केलं असतं तर प्रजा खूष झाली असती. ते न केल्याने धर्मबुध्दी चुकला. तुला काय वाटतं? या प्रश्नाचं उत्तर माहीत असूनही जर तू मौन पत्करलंस, तर तुझ्या मस्तकांचे असंख्य तुकडे होतील. आणि तुझ्या पायाशी लोळू लागतील.

राजा विक्रम म्हणाला, ' वेताळा, धर्मबुध्दीने केलं तेच योग्य आहे. राज्य चालवणं म्हणजे केवळ लोकांना आज जे आवडतं आहे ते करणं नसून राज्यशकट मजबूत करणं आहे.

अधिकारी हे व्यवस्थेला बांधलेले असतात. त्यांना त्यांचे अधिकार व्यवस्थेकडून मिळालेले असतात. जर एखाद्या अधिकाऱ्याने आपल्या अधिकारांची कक्षा कुठल्याही कारणांमुळे स्वतःच्या मर्जीने वाढवून घेतली आणि त्याला लोकभावनेमुळे राजाने मान्यता दिली तर ते व्यवस्थेला अंतिमतः मारक ठरते.

जर राज्य म्हणजे एक शरीर मानले तर प्रत्येक अधिकारी हा त्या शरीराचा एकेक अवयव असतो. आणि प्रत्येक अवयवाने आपापले काम सोडून दुसरे काम करणे शरीरासाठी धोकादायक असते. जर माणूस चालताना पडला आणि त्याला जखम झाली, त्यातून रक्त भळाभळा वाहू लागले, त्याच्या रक्तात खपली धरणारे घटक नसल्याने त्या माणसाचा शक्तीक्षय होऊ लागला तरी हृदयाने आपले रक्ताभिसरणाचे काम थांबवून चालत नाही. जर रक्त वाहू नये म्हणून हृदयाचे ठोके थांबले तर त्या माणसाचा तत्क्षणी मृत्यू होईल. त्याऐवजी बाकी सर्व अवयवांनी आपापले काम व्यवस्थित केले तर त्या माणसाचा जीव वाचू शकतो.

तसंच राज्याचं आहे. दंडपाणीचं काम न्याय करण्याचं नसून न्यायासनासमोर आरोपींना आणण्याचं आहे. त्याने आरोपींना मारुन टाकणं म्हणजे राज्यव्यवस्थेला दिलेला झटका आहे. याने लोकांना आज छान वाटलं आणि दंडपाणी शुद्ध चारित्र्याचा असला तरी भविष्यात या निर्णयाचा वापर करणारा अधिकारी किती शुद्ध चारित्र्याचा असेल याची खात्री नाही. किंबहुना इतका जयजयकार ऐकल्यावर दंडपाणीला आपल्या निर्णयक्षमतेवर गर्व होणारंच नाही आणि त्याच्या हातून चुका होणारंच नाहीत याचीही खात्री नाही.

व्यवस्था बनवताना आज समोर असलेल्या माणसांच्या चारित्र्याकडे बघून चालत नाही. तर हे अधिकार मिळालेला कुठलाही अधिकारी कशाप्रकारे वागेल त्याकडे लक्ष द्यावे लागते.

आज अमुकतमुकचा जयजयकार करणारे लोक आपल्या या वर्तणुकीचा भविष्यात काय परिणाम होईल ते न कळल्याने तसे वागत आहेत. उद्या अशाच अधिकाऱ्यांचा त्यांना त्रास झाला तर ते रडारड करतील. ते राज्यरुपी शरिरातील जिभेसारखे आहेत. पटकन ओव्या आणि त्याच तालात शिव्या देणारी जीभ. शरीराला त्रास होईल हे कळत असताना जास्तीत जास्त तिखट, मसालेदार किंवा चमचमीत खायला पुढे येणारी जीभ. तिच्या आहारी जाऊन निर्णय घेतले तर शरीर कायम दुःखात राहील.

म्हणून माझ्या मते धर्मबुध्दीने योग्य तेच केलं. "

राजाचं उत्तर ऐकून वेताळ प्रसन्न होत हसला आणि म्हणाला, तुझ्या सूक्ष्म विचारशक्तीबद्दल मी जे ऐकून होतो ते खरंच आहे तर. पण राजा तू असा उदास का दिसतोस? '

राजा विक्रम म्हणाला,' वेताळा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देताना मला एक शक्यता जाणवली. आजच्या आपल्या राजेशाही व्यवस्थेत ठीक आहे पण उद्या जर अशी कुठली समाजव्यवस्था अस्तित्वात आली की ज्यात समाजाचं नेतृत्व कुणी करावं याचा निर्णय लोकांच्या मताने घ्यावयाचा असेल तर त्या व्यवस्थेतील शुध्दबुध्दींचं जीवन किती खडतर असेल याचा विचार करून मी खिन्न होतो आहे. त्या काळात सदानकदा लोकानुनय करणारा राज्यकर्ता आणि अधिकारांचा अधिक्षेप करणारा अधिकारी व्यवस्थेला मारक असतो हे लोकांना कोण समजावेल? या विचारामुळे मी थोडा हतोत्साहित झालोय. '

यावर वेताळ म्हणाला,' खरंय तुझं. पण तू बोललास आणि तुझं मौन सोडलंस. त्यामुळे मी चाललो.' आणि मग वेताळही खिन्नमनाने झाडावर लटकून राहिला. विक्रमाने तलवार उपसली आणि तो पुन्हा वेताळाला आणायला निघाला.

Monday, November 25, 2019

हलाहल से हलाहल धुल रहा है

जे होणार होतं ते वाईट होतं. जे होत आहे तेही तितकंच वाईट आहे. पण या दोघांच्या वाईटपणाला एकत्र केलं तरी त्याहूनही अधिक वाईट गोष्ट घडते आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या नकळत आपण तिला हातभार लावतो आहोत.

सर्वपक्षीय नेते आपापले निर्णय केवळ सत्तेची लालसा आणि त्यामागच्या अर्थकारणामुळे घेतलेले आहेत हे पदोपदी दाखवून देत असताना पक्षसमर्थक आणि सर्वसामान्य मतदार मात्र आपापल्या आवडत्या पक्षाचे नेते कसे चारित्र्यवान आणि नीतिमान आहेत हे स्वतःला आणि इतरांना पटवून देण्याची धडपड करत आहेत. त्यातल्या काहीजणांना यातला फोलपणा कळतो पण मग त्यांना एक नवीन प्रश्न छळतो की इतर सर्वजण नीतीमत्ता सोडून वागत असताना केवळ एकाच पक्षावर नीतीमत्तेची जबाबदारी कशी काय टाकावी?

फेसबुकवरील एका वरिष्ठ मित्राने तर अटलजींचा काळ आता राहिला नाही. आता बदललेल्या काळात एका मताच्या अभावामुळे सत्तेवरून पायउतार होणाऱ्या अटलजींसारखी वर्तणूक ठेवणे अशक्य आहे असंही सांगितलं.

हे वाचताना मला दोन गोष्टी आठवल्या.

१) कलियुग आहे कलियुग : अटलजींच्या वेळी बाकीचे पक्षही नीतीमान होते हे आपण अप्रत्यक्षपणे मान्य करतो आहोत हे अनेकांच्या लक्षात येत नाही. वस्तुतः त्याकाळीही अन्य पक्ष तितकेच नीतीमान होते जितके आजकालचे पक्ष आहेत. त्याकाळीही संधीसाधू आणि आप्पलपोटे नेते तितकेच होते जितके आज आहेत. त्याकाळीही आपापला अजेंडा राबवण्यासाठी, स्वार्थ साधण्यासाठी आणि त्यासाठी विरोधी पक्षाला नामोहरम करण्यासाठी सगळे राजकीय पक्ष तितकेच उतावीळ होते जितके आज आहेत. 'अटलजींचा काळ आज राहिला नाही' या वाक्यामागे गतकाळ फार उत्कृष्ट होता आणि वर्तमानात सगळी माती झाली आहे, हा भारतीयांचा निराशावाद कारणीभूत आहे.

एकदा का एकेका मन्वंतराचे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग असे चार भाग परमेश्वराने केले आहेत असं मान्य केलं आणि प्रत्येक युगात समाजातील कलीचं प्रस्थ वाढत जाणार हे मान्य केलं की भूतकाळ हा कायम वर्तमानापेक्षा अधिक स्वच्छ वाटणं स्वाभाविक आहे. पण त्यातून एक अनपेक्षित वाईट परिणाम दिसून येतो की वर्तमान आणि भविष्याला बदलण्याची आपली जबाबदारी टाळून आपण अनीतीचं समर्थन तरी करू लागतो किंवा मग त्याला विरोध करण्याची आपली जबाबदारी टाळतो.

२) रश्मिरथी : राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांची रश्मिरथी या नावाची एक महाकविता आहे. शिवाजी सावंतांची मृत्युंजय ही कादंबरी ज्याप्रमाणे कर्णाला उत्तुंग दाखवते त्याप्रमाणे रश्मिरथी कर्णाला मध्यवर्ती भूमिका देऊन रचलेलं महाकाव्य आहे. त्यातील कित्येक संकल्पनांबद्दल माझ्या मनात वादाचे भरपूर मुद्दे तयार असले तरीही एक काव्य म्हणून रश्मिरथी माझी अतिशय आवडती रचना आहे. यात शेवटच्या म्हणजे सातव्या प्रकरणात जेव्हा कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत रुतून बसतं आणि त्याच्यावर शरसंधान करायला कृष्ण जेव्हा अर्जुनाला सांगतो तेव्हा कवी दिनकरांनी कर्णाच्या तोंडी खालील वाक्ये घातली आहेत

Image Courtesy :  Devadutt Patanaik 

'नरोचित धर्म से कुछ काम तो लो !
बहुत खेले, जरा विश्राम तो लो ।
फंसे रथचक्र को जब तक निकालूं,
धनुष धारण करूं, प्रहरण संभालूं,'

'रुको तब तक, चलाना बाण फिर तुम;
हरण करना, सको तो, प्राण फिर तुम ।
नहीं अर्जुन ! शरण मैं मागंता हूं,
समर्थित धर्म से रण मागंता हूं ।'


त्यावर अर्जुन गोंधळतो आणि त्याला त्या द्विधा मनस्थितीतून बाहेर काढण्यासाठी कृष्णाच्या तोंडून दिनकरांनी कौरवांची भीमाला विष खाऊ घालण्यापासून ते द्यूत आणि शेवटी अभिमन्यूवधापर्यंतची पापे वदवून घेतली आहेत आणि मग पुढे दिनकरांचा कृष्ण, कर्णाला विचारतो की,

'हमीं धर्मार्थ क्या दहते रहेंगे ?
सभी कुछ मौन हो सहते रहेंगे ?
कि देंगे धर्म को बल अन्य जन भी ?
तजेंगे क्रूरता-छल अन्य जन भी ?'

'न दी क्या यातना इन कौरवों ने ?
किया क्या-क्या न निर्घिन कौरवों ने ?
मगर, तेरे लिए सब धर्म ही था,
दुहित निज मित्र का, सत्कर्म ही था ।'

'किये का जब उपस्थित फल हुआ है,
ग्रसित अभिशाप से सम्बल हुआ है,
चला है खोजने तू धर्म रण में,
मृषा किल्विष बताने अन्य जन में ।'

'शिथिल कर पार्थ ! किंचित् भी न मन तू ।
न धर्माधर्म में पड भीरु बन तू ।
कडा कर वक्ष को, शर मार इसको,
चढा शायक तुरत संहार इसको ।'


माझ्या वरिष्ठ मित्राने जेव्हा आजकाल सर्वपक्षांची नीतीमत्ता खालावली आहे त्यामुळे एका पक्षाकडून नीतीची अपेक्षा का करावी? हा प्रश्न विचारला तेव्हा मला दिनकरांच्या कृष्णाचं 'हमीं धर्मार्थ क्या दहते रहेंगे ?' हेच वाक्य आठवलं.

आपली गंमत अशी आहे की आपण सगळ्यांनी कृष्णाला भगवंत मानून टाकलेलं आहे त्यामुळे त्याने केलेल्या कृत्याला अधर्म म्हणणं आपल्या कुवतीबाहेरचं आहे. त्यामुळे अनीतीचं उत्तर अनीतीनेच आणि अधर्माचं उत्तर अधर्मानेच प्रभावीपणे देता येऊ शकतं असा आपण आपला गैरसमज करून घेतला आहे. त्याला साक्ष म्हणून आपण कृष्णाला उभं केलं आहे आणि ती साक्ष सर्वमान्य व्हावी म्हणून आपण कृष्णाला भगवंत म्हणून प्रश्न संपवला आहे. परिणामी आपण कवी दिनकरांच्या कर्णाने पुढे भगवान कृष्णाला दिलेलं उत्तर आपण नजरेआड करतो. कर्ण म्हणतो,

'वृथा है पूछना, था दोष किसका ?
खुला पहले गरल का कोष किसका ?
जहर अब तो सभी का खुल रहा है,
हलाहल से हलाहल धुल रहा है ।'

जहर की कीच में ही आ गये जब,
कलुष बन कर कलुष पर छा गये जब,
दिखाना दोष फिर क्या अन्य जन में,
अहं से फूलना क्या व्यर्थ मन में ?'

'सुयोधन को मिले जो फल किये का,
कुटिल परिणाम द्रोहानल पिये का,
मगर, पाण्डव जहां अब चल रहे हैं,
विकट जिस वासना में जल रहे हैं,'

'अभी पातक बहुत करवायेगी वह,
उन्हें जानें कहां ले जायेगी वह ।
न जानें, वे इसी विष से जलेंगे,
कहीं या बर्फ में जाकर गलेंगे ।'

Image Credit : Internet 
मग यातून बाहेर पडायचं कसं? मला वाटतं याचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला आपल्या पुराणकथांचं महत्व समजून घेतलं पाहिजे. कितीही आधुनिक प्रकारचं तंत्रशिक्षण आणि समाजव्यवस्थाशिक्षण घेतलं तरी अजूनही आपली मूल्यव्यवस्था आपल्या जुन्या पुराणकथांवरच अवलंबून आहे. त्यामुळे केवळ गावखेड्यातील बेरकीच नव्हे तर शहरांतील उच्चविद्याविभूषित लोकही नवीन पेचप्रसंगात आपल्या वर्तनाचं किंवा आपल्या असहाय्यतेचं समर्थन करताना पुराणकथांतील दाखले देतात. आपली भाषा आपल्या नकळत तेच प्रश्न विचारते. तेच दाखले देते. पुराणातील विजेत्याला देवत्व दिल्यामुळे आपल्याला आपल्या वर्तनातील विरोधाभासांची जाणीव होत नाही.

राजकारणी, मग ते भारतातील असोत वा जगातील कुठल्याही देशातील, त्यांचे वर्तन फार वेगळे असेल असं मला वाटत नाही. व्यावसायिकांकडून स्वतःसाठी किंवा पक्षासाठी पैसे घेऊन निवडून आलेले राजकारणी शेवटी खाल्ल्या मिठाला जागणार आणि स्वतःच्या सत्तालालसेच्या हाकेलाच ओ देणार याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. मग ते घराणेशाहीतून आलेले असोत किंवा मग कुठल्याही सांस्कृतिक संघटनेतून आलेले असोत. त्यामुळे त्यांच्याकडून माझा काही फार मोठा अपेक्षाभंग झालेला नाही. त्यांना वेसण घालण्यासाठी गरज आहे ती इतरांच्या अनीतीतून आपल्या किंवा आपल्या लाडक्या पक्षाच्या अनीतीला नैतिक अधिष्ठान न देण्याची. विरोध करायचा नसेल तरी किमान नापसंती दर्शविण्याची.

आपली लोकशाही अजून तारुण्यात आहे. त्यामुळे ती अशी गोंधळलेली असणं फार नवलाचं नाही. तिचा गोंधळ भांडवलदारांकडून, राजकारण्यांकडून किंवा प्रत्यक्ष भगवंतांकडून दूर केला जाणार नाही. तो दूर होईल तो केवळ शिकल्या सवरलेल्या लोकांच्या पसंती किंवा नापसंतीच्या हुंकारामुळे.

शिवाजी महाराजांनी आपल्यासारखा विचार केला असता तर एतद्देशियांचं राज्य स्थापन झालंच नसतं. किंबहुना मला तर असं वाटतं की तत्कालीन सामान्य माणसांनी आजच्यासारखाच विचार केला असावा ज्यामुळे माझ्या लाडक्या शिवाजीराजाला अविरत संघर्ष करावा लागला. म्हणून भक्तीमार्गाच्या संतांची, शक्तीमार्गाच्या रामदासांची शेवटी स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांची स्वप्ने अपूर्ण राहिली. आणि आता आपल्यातील अनेकांची स्वप्नही अपूर्ण राहतील. पण करणार काय? शेवटी कलियुग आहे. आणि आपण ते स्वीकारलं आहे. आपले नेते घोर कली आहेत. आणि त्यांच्याविरुद्ध एक नापसंतीचा कटाक्ष टाकण्यासही घाबरतो आहोत. दुसऱ्या कुणी टाकला तर आपण त्यालाही निरुत्तर करणार आहोत, दिनकरांच्या कृष्णाचं वाक्य त्याच्या तोंडावर फेकणार आहोत, 'हमीं धर्मार्थ क्या दहते रहेंगे ?' मग ते भलेही कितीका चुकीचं असेना.

Thursday, November 14, 2019

गंगावतरण आणि बालदिन

रोज सकाळी टेकडीवर चालायला जातो. तिथे आता छान पायवाटा पडल्या आहेत. काही अतिशय तीव्र उताराच्या आहेत, काही समतल आहेत. काहीवर असंख्य छोटेमोठे दगड आहेत त्यामुळे जरा दुर्लक्ष झालं की घसरुन कपाळमोक्ष होणं ठरलेलं आहे तर काहींवर दगड खडे वगैरे काही नसून अगदी छान मातीचा रस्ता तयार झाला आहे.

इथे चालायला येणारे जुने लोक सांगतात की या पायवाटा गेल्या चारपाच वर्षात पडल्या आहेत. आधी नुसतं जंगल होतं. माझ्या मनात विचार आला की जंगल असल्याने किमान पायवाटा बनल्या तरी त्या टिकून आहेत. आधीच्या लोकांनी सतत चालून मळून ठेवलेल्या पायवाटा आता माझ्यासारख्या नवमॉर्निंगवॉकरला वापरता येतात आणि त्यातली कुठली सोपी, कुठली कठीण तेही ठरवता येतं. जर इथे वाळवंट असतं तर कदाचित आधीच्या वाटसरूंमुळे तयार होणाऱ्या पायवाटा, रोजच्या वाऱ्यांमुळे नाहीशा झाल्या असत्या. आणि आकाशातील ताऱ्यांच्या मदतीशिवाय मार्गक्रमण करणे अशक्य झाले असतं. त्यांच्यामुळेही फक्त दिशा कळली असती. पण पायाखालच्या वाळूत कुठे साप, कुठे विंचू आणि कुठे लपलेले खड्डे आहेत त्याची कल्पना आली नसती. त्यामुळे मी वाळवंटात रहात नसून वनराईजवळ रहातो याचं मला हायसं वाटलं. पूर्वसुरींचं संचितज्ञान, त्यांनी मळलेल्या पायवाटा वापरायला मिळणं हेदेखील एक भाग्यच की!

पण जर जंगल बदलत असेल तर? ठिकठिकाणी दरडी कोसळून पूर्वसुरींच्या मळलेल्या वाटा कालबाह्य होत असतील तर? वादळ आणि अतिवृष्टीमुळे जुन्या पायवाटांशेजारी असलेले वृक्ष उन्मळून पडले असतील तर? त्यांनी पूर्वसुरींच्या पायवाटा बंद करून टाकल्या असतील तर?





आपण आपल्या वनराईत चालत किंवा बैलगाडीने जात असलो पण इतरांनी त्यांच्या वनराईत सायकली, मोटारगाड्या नेणं सुरू केलं असेल तर? इथल्या पिढीने पूर्वजपरंपरेला चिकटून रहावं आणि पायवाट, बैलवाट सांभाळत बसावं का? इतरांना आपल्या वनराईत येण्यात रस नसेल तरीही आपण आपल्या पिढ्यांचा पुढचा प्रवास आपल्यापेक्षा सुखकर व्हावा म्हणून प्रयत्न करावा की करु नये? आणि जर आपण असा विचार करत नसू तर इतरांनी आपल्या वनराईत ढवळाढवळ केली तर आपल्याला चालेल का? जर इतरांनी केलेली ढवळाढवळ न आवडल्याने आपण त्यांना पिटाळून लावलं तर भविष्यासाठी आपण काय टिकवून ठेवायचं? आपल्या पूर्वजांच्या पायवाटा ज्या इतरांच्या आगमनाला रोखू शकल्या नाहीत? की इतरांकडून शिकलेल्या नव्या तंत्राला वापरून आपण नव्या पायवाटा तयार करायच्या?

जुन्या पायवाटा असताना आता त्या नवीन जगासाठी कामाच्या नाहीत म्हणून नवीन पायवाटा पाडणं सोपं नाही. पण असं काम दुसर्‍या महायुद्धानंतर अफ्रिका आणि आशियातल्या अनेक देशातल्या नेत्यांवर आपोआप येऊन पडलं. त्या त्या देशातील नेत्यांनी आपापल्या लोकांच्या मूळ स्वभावाला साजेल असे निर्णय घेत ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. मग तो चीन असो की व्हिएतनाम की इस्त्राएल की कंबोडिया की दक्षिण अफ्रिका.

या सर्व देशात हे निर्णय घेणाऱ्या पहिल्या पिढीतील नेत्यांनी सर्व निर्णय अचूक घेतले असं कुणीच म्हणणार नाही. त्यातल्या सगळ्यांनी आपापल्या समाजातील सर्व नागरिकांवर किंवा काही गटांवर अनन्वित अत्याचारही केलेत. त्यांच्या धोरणांमुळे त्या त्या देशातील काही पिढ्यांची आयुष्ये दहशतवाद किंवा बेरोजगारी किंवा सांस्कृतिक क्रांती किंवा अनन्वित क्रौर्य आणि हिंसा यांत भरडून निघाली. असं असूनही त्या त्या देशात ते पूजनीय आहेत. चीनमधील माओ असो किंवा कंबोडियातील नोरोदोम सिंहनुक किंवा इस्राएलमधील डेव्हिड बेन गुरियन. या सगळ्यांनी आपापल्या समाजातील पूर्वसुरींच्या वाटा नाहिशा करत आपापल्या समाजाला येणाऱ्या भविष्यासाठी तयार करण्याकडे लक्ष दिलं. आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी त्यांचं हे मोठेपण मान्य करत त्यांनी आखून दिलेल्या नवीन पायवाटांचे हमरस्ते करण्याकडे लक्ष दिलं. त्यांच्याकडून झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली पण त्यांच्या चुकांसाठी त्यांच्यावर सातत्याने कोरडे ओढून त्यांची प्रतिमा मलीन करण्यात आपला व समाजाचा वेळ घालवला नाही. जो पायवाट पाडण्यास सुरुवात करतो त्यानेच हमरस्ता बनवून द्यावा असा आतताई आणि अशक्यप्राय आग्रह धरला नाही. हमरस्ते बनणं हे अनेक पिढ्यांचं संचित आहे, त्यात आपलीही जबाबदारी आहे, सगळी जबाबदारी पहिलं पाऊल उचलणाऱ्याची नाही हे मान्य करून ते समाज पुढे चालत राहिले. गंगावतरणाची कथा कधी ऐकली नसूनही त्यांनी आपले हे पहिल्या पिढीचे नेते म्हणजे राजा सगर आहेत. गंगावतरणाआधीच ते स्वर्गवासी झाले म्हणून त्यांना दोष द्यायचं टाळून स्वतः अंशुमन किंवा दिलीप किंवा भगीरथ होण्याकडे अधिक लक्ष दिलं.

पण या सगळ्यात एकंच देश असा आहे जिथे मळलेल्या पायवाटा सोडून भविष्यसन्मुख नवीन पायवाटा पाडण्यात पुढाकार घेणारे नेते कमनशिबी ठरले. त्यांच्या अनुयायांनी त्यांना देवत्व देऊन थिजवलं तर विरोधकांनी त्यांना दानव ठरवण्यात कुठलीच कमतरता ठेवली नाही. गंगावतरणाची कथा माहिती असूनही गंगा आणू शकले नाहीत म्हणून त्यांना नावे ठेवण्यात समाजातील अनेकांनी धन्यता मानली.

आपल्या समाजाचा आत्मा चीनची भिंत बांधणाऱ्या आत्यंतिक कष्ट सहन करणाऱ्या माणसांचा बनलेला नाही. कंबोडियाच्या आणि व्हिएतनामच्या आत्यंतिक अत्याचारी आणि हिंसक माणसांचा बनलेला नाही. तर तो एकाचवेळी सबै भूमी गोपालकी असा संदेश देणाऱ्या देवाची सुंदर लेणी, मंदीरे बांधणाऱ्या आणि त्याचवेळी मोठाल्या जनसमूहाला गावकुसाबाहेर ठेवणाऱ्या माणसांचा आहे. एकाचवेळी जिवाशिवाचं अद्वैत आणि प्राण्यांतही देव शोधणाऱ्या आणि त्याचवेळी परजातीतील माणसांना अस्पृश्य मानणाऱ्या माणसांचा आहे. स्वातंत्र्य मिळण्याच्या दशकानुसार समवयस्क असलेल्या चीन, कंबोडिया, इस्राएल, व्हिएतनाम इथल्या नेत्यांप्रमाणे आपल्या देशात वागून चालणार नाही. हे उमजून निर्णय घेणाऱ्या या पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एकाचा आज जन्मदिवस.

हमरस्ता बांधण्याची जबाबदारी पहिलं पाऊल उचलणाऱ्यावर नसते, ही जाणीव या नेत्याने भविष्याचा मार्ग दाखवलेल्या समाजाला लवकर प्राप्त होवो आणि अंशुमन, दिलीप व भगीरथाची परंपरा या समाजात टिकून राहो, हीच या वाढदिवसाच्या निमित्ताने या समाजाला शुभेच्छा

Sunday, November 10, 2019

बेरीज वजाबाकी

बेरजेचं राजकारण :
१) एक मध्यवर्ती सावध नेता
२) सर्वपक्षीय सलोख्याचे संबंध
३) वतनदारीचं आधुनिक प्रारुप
४) घराणेशाही मिरवत घराणेशाहीकडे वाटचाल
५) सरकारी संस्थांचा वापर बहुतकरुन आपल्या व शरणागताच्या गैरकृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी. विरोधकांनाही सामावून घेण्याकडे कल असल्याने अडकलेल्याने शरण जाणे आणि मग त्याचे पुनर्वसन करुन एका क्षेत्रापुरतं मर्यादित करुन ठेवण्याकडे कल.
६) घराणेशाहीमुळे कार्यकर्ते कायम सतरंजी उचलण्याच्या भूमिकेत. आपापल्या भौगोलिक क्षेत्रात नेत्याचं नाव वापरुन आपापली कामं करुन घेता येतात याचा कार्यकर्त्यांना आनंद.
७)समाजात राजकारणावरुन भांडणं कमी. समाजात आधीपासून अस्तित्वात असलेली जातीय, आर्थिक, धार्मिक भांडणं वापरून आपापली राजकीय स्थानं बळकट करण्याकडे राजकीय नेत्यांचा कल.
८) नेता व कार्यकर्ता यापैकी कुणाच्याही लैंगिक आयुष्याची अधिकृत व अनधिकृत व्यासपीठावरुन चर्चा नाही. किंबहुना असं काही उजेडात आलं तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याकडे कल.
९) जैसे थे प्रवृत्ती समाजात आणि राजकारणात प्रबळ.
१०) मोठे बदल घडण्यासाठी किंवा नवीन नेतृत्व उभे रहाण्यासाठी आर्थिक किंवा नैसर्गिक अरिष्टाची गरज.


वजाबाकीचं राजकारण :
१) एक मध्यवर्ती सर्वशक्तिमान नेता
२) सर्वपक्षीय नेत्यांशी दबावाचे संबंध
३) राजकारणाचं कॉर्पोरेट प्रारुप
४) घराणेशाही नाकारत घराणेशाहीकडे वाटचाल
५) सरकारी संस्थांचा वापर विरोधकांना नामोहरम करण्यासाठी आणि त्यांचं अस्तित्व संपवण्यासाठी. विरोधकांना संपवण्याकडे कल असल्याने ज्यांना पावन करुन घेतलं आहे त्यांच्याही डोक्यावर टांगती तलवार.
६) अघोषित घराणेशाहीमुळे कार्यकर्ते कायम सतरंजी उचलण्याच्या भूमिकेत पण सतरंज्यांची प्रतवारी असल्याने कार्यकर्त्यांमधे उर्ध्वगामी व्यवस्थेत असल्याचा आनंद.
७) समाजात राजकारणांवरुनही भांडणं आणि जुन्या जातीय, आर्थिक, धार्मिक भांडणांना राजकारणाचाही पदर.
८) स्वपक्षीय व अन्यपक्षीय नेता व कार्यकर्ता या सर्वांच्या लैंगिक आयुष्याची अनधिकृत व्यासपीठावरुन चर्चा. किंबहुना असं काही नसलं तरी त्याचा गवगवा करण्याकडे कल. त्यामुळे राजकारणात ब्रह्मचर्याचं किंवा संसारमोहत्यागाचं वाढलेलं प्रस्थ. नेतृत्वाची मेहेरनजर होण्याची शक्यता वाढल्यास आपापल्या लैंगिक आयुष्याचे पुरावे नष्ट करण्याकडे व्यवस्थेची वाटचाल.
९) जैसे थे प्रवृत्तीबद्दल तिटकारा. कुठलीही किंमत देऊन बदल हवा असं मानणारा लोकप्रिय.
१०) मोठे बदल घडण्यासाठी धनिकांचं पाठबळ आवश्यक.

Sunday, October 20, 2019

गरिबीचे अर्थशास्त्र

जन्म, शिक्षण आणि अभ्यासाचे अनेक विषय यामुळे भारताशी नाळ जुळलेले अर्थअभ्यासक श्री अभिजीत बॅनर्जी यांना २०१९ चा स्वेरीजेस रिक्सबँक पुरस्कार मिळाला आहे. १९६८ ला स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेच्या देणगीतून सुरु झालेला हा पुरस्कार आता अनौपचारिकपणे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो.

विकासाचे अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या उपशाखेतील आपल्या महत्वपूर्ण योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवलेले भारतीय श्री अमर्त्य सेन यांच्याप्रमाणेच श्री बॅनर्जीदेखील कलकत्त्यातील प्रेसिडेन्सी कॉलेज आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे स्नातक होते. आणि कल्याणकारी अर्थशास्त्र व विकासाचे अर्थशास्त्र (Welfare Economics & Development Economics) हे दोघांच्या अभ्यासाचे विषय आहेत.



यंदाचा नोबेल पुरस्कार श्री बॅनर्जी त्यांच्या पत्नी श्रीमती एस्थर डफ्लो आणि श्री मायकेल क्रेमर यांना संयुक्तपणे मिळालेला आहे. दोघेही मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून सेंधील मुलईनाथन या सहकाऱ्याबरोबर मिळून दोघांनी अब्दुल लतीफ जमील पॉव्हर्टी ऍक्शन लॅब नावाचा उपक्रम सुरु केला आहे.

विकासाचे अर्थशास्त्र (Development Economics) या विद्याशाखेत विकसनशील देशाच्या आर्थिक, सामाजिक रचनांचा आणि कररचनांचा अभ्यास केला जातो. ही विद्याशाखा कल्याणकारी अर्थशास्त्राच्या (Welfare Economics) जवळची असल्यामुळे तिचा मुख्य भर आर्थिकदृष्टया मागासगटाच्या उत्थानासाठी सरकारची आणि गैरसरकारी संस्थांची जबाबदारी आणि सरकारी योजनांचे मूल्यमापन या दोन गोष्टींवर असतो. सरकारी योजना यशस्वी झाली की अयशस्वी ते योजना राबवून झाल्यावर कळते. ती जर अयशस्वी झाली तर समाजाचा पैसा आणि वेळ वाया गेलेला असतो. त्यामुळे योजना राबवण्यापूर्वी आपली उद्दिष्टे प्रत्यक्षात उतरवण्यात ती यशस्वी होऊ शकेल का? ते प्रयोगाद्वारे सिद्ध करता आल्यास योजनेची परिणामकारकता वाढवता येऊ शकते त्यामुळे समाजाच्या पैशाचा व वेळेचा अपव्यय टाळता येणं शक्य होतं. परंतु अर्थशास्त्र सामाजिक शास्त्रांच्या गटातील विषय असल्याने त्यात प्रयोगसिद्ध ज्ञानाऐवजी गृहितकाधारित सिद्धांतावर आणि तदनुषंगिक निर्णयांवर भर दिला जातो. ही अर्थशास्त्राची मर्यादा ठरते.

श्री बॅनर्जी यांनी औषध निर्माण क्षेत्रातील रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल्सचे (Randomised Control Trials) तंत्र कल्याणकारी योजनांत कश्याप्रकारे वापरता येईल ते दाखवून दिले आणि आपल्या पॉवर्टी ऍक्शन लॅब (Poverty Action Lab) या उपक्रमाखाली ते विविध देशांत यशस्वीरीत्या राबवले आहे. वैद्यक क्षेत्राशी संबंधित ही संकल्पना अर्थशास्त्रात यशस्वीरीत्या राबवून अर्थशास्त्राची अचूकता आणि उपयुक्तता वाढवल्याबद्दल त्यांना या वर्षीचे नोबेल पारितोषिक दिले गेले आहे. रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल्स ही संकल्पना समजून घेण्यासाठी आधी आपल्याला गरिबांच्या उत्थानाबाबत अर्थशास्त्रात काय विचार प्रबळ आहेत हे समजून घेतले पाहिजेत.

युनाइटेड नेशन्सचे सल्लागार जेफ्री सॅक्स यांच्या मते गरीब राष्ट्रे गरीब असतात कारण ती गरिबीच्या सापळ्यात अडकलेली असतात. चारीबाजूंनी जमिनीने वेढलेली, नापीक जमिनीची, मलेरिया आदी रोगांनी ग्रासलेली उष्ण कटिबंधातील ही राष्ट्रे गरिबीमुळे त्यांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या पहिल्या उडीसाठी मानवी बळ, सुपीक जमीन आणि पायाभूत सुविधा यांत गुंतवणूक करू शकत नाही. गरिबीमुळे त्यांना कर्ज मिळत नाही आणि मिळाल्यास ते फेडणे जमत नाही. त्यामुळे गरिबी आहे म्हणून सुरवात नाही. सुरवात नाही त्यामुळे गरिबी टिकून आहे. त्यामुळे कर्ज परवडत नाही. त्यामुळे पुन्हा गरिबी टिकून राहते अश्या प्रकारे आतून अभेद्य असलेल्या गरिबीच्या दुष्टचक्रात ही राष्ट्रे अडकलेली असतात. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या नागरिकांना किमान सुरवातीला तरी मदत करणे त्यांच्या सरकारचे आणि जगाचे कर्तव्य आहे.

आपल्या मताच्या समर्थनार्थ श्री सॅक्स, अफ्रिकेतील शेतकऱ्यांची उदाहरणे देतात. या शेतकऱ्यांना सुरवातीला रासायनिक खते फुकटात दिली गेली. त्यामुळे त्यांचे उत्पादन वाढले. आणि त्यातून बचत करून त्यांनी मग पुढच्या वेळी खते विकत घेतली. आता त्यांना मदतीची गरज नाही पण सुरवातीला जर त्यांना रासायनिक खते फुकटात मिळाली नसती तर विकासाच्या वाटेवरची त्यांची वाटचाल सुरूच होऊ शकली नसती.

याउलट विल्यम इस्टरली यांच्या नेतृत्वाखाली अर्थशास्त्र्यांचा दुसरा गट मानतो की अश्या प्रकारे केलेली मदत अविकसित देशांसाठी फायद्यापेक्षा जास्त नुकसान देणारी ठरते. कारण तिथले लोक स्वतःचे मार्ग शोधायच्या ऐवजी फुकटात मिळणाऱ्या बाह्य मदतीवर अवलंबून राहतात. ऐदी आणि आळशी बनतात. आणि जेव्हा ही बाह्य मदत मिळणे बंद होते तेव्हा ते पुन्हा गरिबीच्या गर्तेत कोसळतात. तेव्हा गरीब देशांनी बाजाराचे तत्व अंगिकारले पाहिजे. उत्तम ते टिकते या तत्वावर विश्वास ठेवला पाहिजे. बाह्य संस्था किंवा सरकारनेदेखील आपल्या देशातील गरिबांना काही फुकट देणे टाळले पाहिजे. फुकट देण्याची योजना शेवटी भ्रष्टाचाराला आणि आळशीपणाला जन्म देते. गरिबीचे दुष्टचक्र वगैरे काही नसते, खरं तर ‘उत्तम ते टिकेल, म्हणून उत्तमाची कास धरा’ हा बाजाराचा मंत्रच गरिबांना गरिबीतून बाहेर काढू शकतो.

आपल्या मताच्या समर्थनार्थ श्री इस्टरली अफ्रिकेतील अनेक देशांची उदाहरणे देतात की जिथे फुकटात खते मिळण्याची सवय लागल्याने काहीजणांना त्याचे महत्व कळले नाही, किंवा मग फुकटात मिळण्याची सवय लागल्याने नंतर ती आपल्याला विकत घ्यावी लागतील यासाठी त्यांची मानसिकता तयार झाली नाही, किंवा ती फुकट असल्याने मधल्या मधे गडप झाली आणि योग्य लोकांपर्यंत पोचलीच नाहीत . त्यापेक्षा त्याच शेतकऱ्यांना छोट्या प्रमाणावर खते विकत घ्यायला लावून, त्यातून वाढलेल्या उत्पन्नातून थोडी अजून विकत घ्यायची सवय लावून त्यांचे उत्पन्न टप्प्याटप्प्याने वाढण्याची त्यांना सवय लावली पाहिजे. जेणेकरून ते स्वावलंबी होतील आणि खतांच्या उद्योगालाही धक्का लागणार नाही. थोडक्यात म्हणजे गरिबीचे दुष्टचक्र अभेद्य नसून फक्त गरिबीतून बाहेर पडण्याची इच्छाशक्ती लागते.

पहिल्या मताचे लोक म्हणतात गरिबांना मोफत शिक्षण द्या, शाळांमधे मोफत कॉम्प्युटर पुरवा, मुलांना फुकट खाणं द्या, गरीब उद्योजकांना कर्ज न देता अनुदान द्या.

तर दुसऱ्या मताचे लोक या सर्वांच्या विरुद्ध असतात. त्यांचे म्हणणे असते की ही मदत त्यांना पांगळं करेल आणि अधिकारी वर्गाच्या भ्रष्टाचाराला जन्म देईल. त्याशिवाय ज्या उद्योगाचे उत्पादन आज फुकट दिले आहे त्या उद्योगाला उद्याच्या मागणीची शाश्वती नसेल त्यामुळे अर्थव्यवस्थेचा डोलारा कोसळून पडेल.

इथेच श्री बॅनर्जी रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल्सची संकल्पना वापरायला सांगतात. वर मांडलेल्या दोन मतांत ते स्पष्टपणे गरिबीच्या अभेद्य दुष्टचक्राचे अस्तित्व मान्य करतात. पण त्याच वेळी फुकट मिळत असल्यामुळे शक्य असलेल्या भ्रष्टाचाराचे अस्तित्वही मान्य करतात.

गरिबीचे दुष्टचक्र असते हे मान्य केल्याने ते भेदण्यासाठी सरकारने किंवा बाह्य संस्थांनी मदत करणे त्यांना योग्य वाटते. पण फुकट मदत पांगुळगाड्याची सवय लावते हेही त्यांना मान्य आहे. त्यामुळे ते मदत करावी की नाही? असा सरधोपट प्रश्न विचारणं टाळतात. त्याऐवजी तीन प्रश्न विचारतात.

१) जर फुकट उपलब्ध करून दिली नाही तर गरिबांना कधीही त्या गोष्टीचा वापर करावासा वाटेल का?

२) जर उपयुक्त वस्तू फुकट किंवा अनुदानित स्वरूपात उपलब्ध करून दिली तर लोक ती वाया घालवातील का?
३) आज फुकट किंवा अनुदानित स्वरूपात मिळालेली वस्तू उद्या पूर्ण किमतीला विकत घ्यावी लागली तर लोक त्या वस्तूसाठी पूर्ण किंमत द्यायला तयार होतील का?

या तीन प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मग ते दोन देशांचा विचार न करता, एकाच देशातील दोन वेगवगळ्या गटांचा अभ्यास करतात. अभ्यासासाठी निवडलेली व्यक्ती रँडमली निवडलेली असते आणि ती कोणत्या गटात जाईल तेही रॅंडमली ठरतं. एका गटाला वस्तू फुकट किंवा अनुदानित स्वरूपात दिल्या जातात आणि दुसऱ्या गटाला नाही. त्यांच्या वर्तणुकीवरून मग किती उत्पन्न असलेल्या व्यक्तींच्या गटाला किती अनुदान दिल्यास भविष्यात ते स्वावलंबी होऊन पूर्ण किंमत द्यायला तयार होतील? आणि अनुदानाची कुठली पातळी त्यांना पांगळे बनवेल याबद्दल अनुमान काढले जाते. म्हणजे इथे सरकारी धोरण काय असावे त्याचा निर्णय हस्तीदंती मनोऱ्यात बसलेल्या विचारवंतांनी मनाशी धरलेल्या गृहीतकांवर आधारित नसून तो प्रत्यक्ष प्रयोगांती उपलब्ध झालेल्या निष्कर्षांवर आधारलेला आहे. त्यामुळे तो वास्तवाच्या अधिक जवळ आणि म्हणून परिणामकारक असण्याची शक्यता अधिक आहे.

श्री बॅनर्जी सरधोपट प्रश्न विचारून सर्वव्यापी उत्तरे शोधण्याच्या विरोधात आहेत. त्यांचे म्हणणे आहे की प्रत्येक सरकारी निर्णय हा त्याची उद्दिष्टे, त्याची व्याप्ती, त्यावरचा खर्च, उपलब्ध यंत्रणा या सर्वांवर अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येक निर्णयाला यशस्वी करण्यासाठी वेगवेगळे प्रश्न विचारावे लागतील. त्यांची उत्तरे पडताळण्यासाठी वेगवेगळे गट बनवावे लागतील आणि त्यात वेगवेगळ्या लोकांना सामील करून घ्यावे लागेल. एका यशस्वी निर्णयाचे प्रश्न दुसऱ्या नवीन निर्णयासाठी तसेच्या तसे वापरणे चुकीचे आहे.

इथे हे लक्षात घेतले पाहिजे की श्री बॅनर्जी यांचा गरिबीबाबतचा विचार श्री अमर्त्य सेन यांच्यासारखाच आहे. गरिबी म्हणजे केवळ उत्पन्नाची वानवा नसून व्यक्तीला आपल्या समग्र क्षमतांचा वापर करण्यापासून रोखणारं अभेद्य दुष्टचक्र आहे. त्यामुळे ते भेदण्यासाठी त्याला सरकारची किंवा बाह्य संस्थांची मदत मिळाल्यास त्याचे उत्थान लवकर होऊ शकेल.

बहुसंख्य अर्थशास्त्रज्ञांच्या मते व्यक्तीच्या उत्पन्नाच्या आलेख खालील आकृतीप्रमाणे असतो.
वरील आकृतीत आडव्या अक्षावर व्यक्तीचे सध्याचे उत्पन्न मांडले आहे तर उभ्या अक्षावर त्याचे भविष्यकालीन उत्पन्न मांडले आहे. या आकृतीत पंचेचाळीस अंशाच्या कोनात एक निळी रेघ आखलेली आहे. ही निळी रेघ स्थिरस्थितीदर्शक आहे. म्हणजे या रेघेवरील व्यक्तीचे आजचे उत्पन्न आणि उद्याचे उत्पन्न सारखेच असेल. परंतू असे होत नाही. व्यक्तीच्या वास्तविक उत्पन्नाचा आलेख दाखवण्यासाठी या आकृतीत लाल रेघ वापरली आहे. व्यक्ती आज जितक्या उत्पन्नापासून सुरु करते त्यापेक्षा तिचे उद्याचे उत्पन्न जास्त असते. उत्पन्नाच्या या वाढीचा वेग सुरवातीला जोरदार असतो नंतर त्याचा जोर थोडा कमी होत जातो. (दरमहा रु ६००/- कमविणारी व्यक्ती जितक्या चटकन आपले मासिक उत्पन्न रु १,२००/- करू शकते तितक्या चटकन तीच व्यक्ती आपले मासिक उत्पन्न रु ३०,०००/- वरून रु. ६०,०००/- करू शकत नाही) म्हणून लाल रेघ सुरवातीला तीव्र वेगाने वर जाते पण नंतर मात्र तिच्या वाढीचा वेग मंदावतो. या आकृतीत कुठेही श्री सॅक्स यांना अभिप्रेत असलेला गरिबीचा सापळा नाही. त्यामुळे ही आकृती श्री इस्टरली यांच्या मताचे प्रतिनिधित्व करते.

जर समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नाचा प्रवास असाच होतो असे मानले तर कुठल्याही व्यक्तीला सरकारने कुठलीही मदत करणे फारतर त्याचा वेग वाढवू शकेल पण त्याच्या उत्पन्नाचा आलेख बदलू शकणार नाही. त्यामुळे श्री सॅक्स यांना महत्वाची वाटणारी सरकारी मदत श्री इस्टरलींना अनाठायी आणि अन्याय्य वाटते.

श्री बॅनर्जींनी गरिबीच्या सापळ्याचे अस्तित्व मान्य केल्यामुळे त्यांच्या मते वरील आकृती समाजातील सर्व व्यक्तींच्या उत्पन्नाचा आलेख म्हणून वापरता येत नाही. आपले मत स्पष्ट करण्यासाठी ते वरील आकृतीत काही बदल करतात. त्यांनी सुचवलेल्या बदलाप्रमाणे आकृती आता खालीलप्रमाणे दिसते.

पहिल्या आकृतीत व्यक्तीच्या वास्तविक उत्पन्नाची लाल रेघ सरळ वर चढून मग तिच्या ऊर्ध्वगमनाचा वेग मंदावतो. त्यामुळे ती इंग्रजी अक्षर L आडवे केल्यावर जसे दिसेल त्यासारखी दिसते. पण श्री बॅनर्जी यांनी सुचवलेले बदल आकृतीत वापरले तर मात्र या L च्या जागी तिरके केलेले S हे अक्षर दिसू लागते.

या नवीन आकृतीत समाजातील व्यक्तींचे दोन गट केलेले आहेत. पॉवर्टी ट्रॅपमधे अडकलेले लोक (राखाडी रंगाच्या चौकोनात सामावलेले) आणि त्याबाहेरचे लोक. पॉवर्टी ट्रॅपमधे अडकलेल्या लोकांसाठी उत्पन्नाचा प्रवास उजवीकडून डावीकडे होतो. म्हणजे आजच्यापेक्षा त्यांचे उद्याचे उत्पन्न अजून कमी होते (माहितीचा,औषधांचा, शिक्षणाचा अभाव आणि वाढती महागाई ही त्यांच्या उत्पन्नाच्या अधोगतीची कारणे असतात) याउलट पॉवर्टी ट्रॅपच्या बाहेर असलेल्या व्यक्तींच्या उत्पन्नाचा प्रवास मात्र आधीच्या आकृतीप्रमाणेच होतो. म्हणजे त्यांचे उत्पन्न आधी जोरदार वाढते आणि नंतर त्यांच्या उत्पन्नाच्या वाढीचा वेग मंदावतो. पॉवर्टी ट्रॅपचे अस्तित्व मान्य केले की त्यात अडकलेल्या लोकांच्या उत्पन्नाच्या अधोगतीची कारणे शोधता येतात आणि त्यांवर उपाययोजना करणे शक्य होते.

पुढे जाऊन श्री बॅनर्जी असेही सांगतात की पॉवर्टी ट्रॅपची व्याप्ती, तो तयार होण्याची कारणे आणि त्यांच्या निर्मूलनाचे उपाय हे प्रत्येक निर्णयाप्रमाणे वेगवेगळे असतात. म्हणजे अनुदानित स्वरूपात खते द्यावीत की नाही? या निर्णयासाठी ज्या व्यक्ती पॉवर्टी ट्रॅपमध्ये आहेत असे समजून उपाययोजना केली जाईल त्याच व्यक्ती सकस आहारासंबंधीच्या किंवा बचतगटआणि अनुदानीत घरांच्या कल्याणकारी योजनेसाठी पॉवर्टी ट्रॅपमधे अडकलेल्या आहेत असे समजणे चुकीचे ठरेल आणि त्याआधारे केलेल्या उपाययोजना सफल होणार नाहीत.प्रत्येक योजनेसाठी आधी पॉवर्टी ट्रॅपचे अस्तित्व मान्य करून त्या योजनेसंदर्भात पॉवर्टी ट्रॅपची व्याप्ती, त्याची कारणे स्वतंत्रपणे नोंदवून मग रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल्सचे तंत्र वापरून निर्णयाची परिणामकारकता तपासून पहावी लागेल.

थोडक्यात सर्वव्यापी उत्तरे नसतात.प्रत्येक प्रश्नासाठी वेगळी स्वतंत्र उत्तरे शोधावी लागतात.एका योजनेसाठी गरीब म्हणजे बाकी सर्व योजनांसाठी गरीब असे वर्गीकरण केल्यास ते योजनांच्या परिणामकारकतेस अपायकारक ठरते.

गरीब माणूस म्हणजे एकतर आळशी, लाचार किंवा नियमांचे महत्व नाकारणारा मूर्ख अशी प्रतिमा रंगवली जाते तिला श्री बॅनर्जी कडाडून विरोध करतात. ज्याला खायची भ्रांत आहे, ज्याला निवृत्तीवेतन नाही तो आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल सुखवस्तू घरातील माणसासारखा विचार करेल हे गृहीतक चुकीचे आहे. त्यामुळे त्याचे निर्णय आपल्याला जरी आत्मघातकी वाटले तरी त्याच्या दृष्टीने त्यांना कार्यकारणभाव आहे. आणि तो त्याच्या दृष्टीने तितकाच योग्य आहे जितका सुखवस्तू घरातील माणसाने स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेला निर्णय. किंबहुना त्याची खायची भ्रांतच त्याला वेगळ्या जगात फिरवत राहते. ज्यातून बाहेर पडण्याच्या मार्ग उघडणे त्याच्या हातात नसून बाहेरच्या लोकांच्या हातात आहे. गरिबांचे जग त्यातील कार्यकारणभावाच्या विविधतेबाबतीत श्रीमंत आहे. आपल्या जगातील योग्यायोग्यतेच्या पूर्वग्रहांना बाजूला सारून जर त्या जगातील कार्यकारणभाव समजून घेतले तर राष्ट्राच्या विकासात अडसर बनणाऱ्या गरिबीला आपण दूर करू शकतो. अर्थात गरज आहे ती सरधोपट प्रश्न न विचारण्याची आणि मिळालेल्या उत्तरांना सर्वव्यापी व सार्वकालिक न मानता डोळसपणे राबवण्याची.

याच विचारातून प्रथमसारख्या संस्थेबरोबर काम करताना श्री बॅनर्जी, प्रथमने राबवलेली बालसखी संकल्पना अधिक प्रभावी करण्यासाठी मदत करतात. आणि अभ्यासात मागे पडणाऱ्या गरीब मुलांकडून शाळेच्या वेळेहून वेगळ्या वेळेत बालसखींच्या साहाय्याने जादाचा सराव करून घेतात आणि त्या मुलांच्या गणिताच्या अभ्यासात लक्षणीय प्रगती करून घेतात. किंवा मग गरिबांसाठी महिना अडीच हजार रुपये मोफत उत्पन्न ही संकल्पना मांडून खेडोपाड्यात पसरलेल्या भारताच्या क्रयशक्तीला चालना देण्याचा मार्ग सुचवतात.

विद्यमान सरकारच्या मागील कार्यकाळातील नोटबंदीच्या निर्णयावर श्री बॅनर्जी यांनी निःसंदिग्धपणे टीका केली होती आणि सध्याच्या कार्यपद्धतीवरही ते फारसे समाधानी नाहीत. आपली नाराजी ते सार्वजनिक व्यासपीठांवर बोलूनही दाखवतात त्यामुळे त्यांच्याबाबतीत सरकारसमर्थक फारसे खूष नसतात. साधारणपणे अनेक सरकारसमर्थक मानतात की गरिबांसाठी कल्याणकारी योजना म्हणजे डावा आर्थिक विचार. त्यात श्री बॅनर्जी कलकत्त्याचे, अमर्त्य सेन यांना मानणारे, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे, पुन्हा काँग्रेसचे सल्लागार आणि विद्यमान सरकारच्या आर्थिक धोरणांचे विरोधक. त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिलेला अर्थविचार हा डावाच असणार, त्यामुळे तो निरुपयोगीच असणार. पण श्री बॅनर्जी यांना जेएनयूमधे असताना, व्हाईस चॅन्सलरला घेराव घातल्याबद्दल दहा दिवस तिहारमधे तुरुंगवासही भोगावा लागला होता. आणि काँग्रेस सरकारच्या आशीर्वादाने पोलिसी फटकेही खावे लागले होते. त्यावेळी त्यांच्या आंदोलनाचे स्वरूपही सरकारच्या सर्वंकष हुकूमशाहीविरोधात होते. हे ध्यानात ठेवले की त्यांच्या डावेपणाचा आणि विद्यमान सरकारविरोधाबाबतच्या आपल्या पूर्वग्रहाची योग्यायोग्यता तपासणे सोपे जाईल. त्यामुळे सरकारसमर्थक असोत व सरकारविरोधक, या सर्वांनी श्री बॅनर्जींचा अर्थशास्त्रातील अधिकार मान्य करताना त्यांना पक्षीय राजकारणाच्या रंगात न रंगवणेच त्यांचे कार्य समजून घेण्यासाठी उपयोगी ठरेल.

Wednesday, October 16, 2019

सुष्ट दुष्ट आणि फुलांच्या माळा


 नवरात्रीत आमच्या घरी घट बसतात. माझी कानडी बायको हौशी असल्याने ज्यात नटणे मुरडणे किंवा खाणेपिणे या गोष्टींना महत्त्व असते ते सगळे सण आमच्या घरी साजरे होतात. नटून खुश झालेल्या हिचं कौतुक करणे किंवा मग तिने बनवलेले चविष्ट पदार्थ चापणे, या दोन्ही गोष्टी मला सारख्याच आवडत असल्याने, कुठलाही उत्सव साजरा करण्यास माझी ना नसते.

कॉलेजात असताना रोज रात्री गरबा खेळायला उत्सुक असलेली मुलगी ते आता नऊ दिवस उपवास करणारी मुलगी हा तिचा प्रवास मला स्त्रीच्या कायम बदलत रहाण्याच्या आणि सदैव आनंदी राहण्याच्या वृत्तीचं प्रत्ययकारी दर्शन घडवतो. अर्थात इतक्या वर्षात मी फारसा बदललो नाही हेही तितकंच खरं आहे. एका अर्थाने ती नित्यनूतन प्रकृती आहे आणि मी जड पुरुष.

माझ्यात फार बदल न होण्यात माझ्या तीर्थरुपांचा फार मोठा हात आहे. 'मुलाला सोळापर्यंत आणि मुलीला सोळानंतर सांभाळावं लागतं' ही म्हण त्यांना कुणीतरी वाढवून 'एकवीसपर्यंत' अशी सांगितली असावी. त्यामुळे 'फाल्गुनी पाठकच्या तालावर नाचताना आनंद मोरे' अशी छायाचित्र कधीच कुठल्याही वर्तमानपत्रात झळकली नाहीत. अर्थात मला कधी कधी वाटतं की मी गरब्यात न नाचल्यानेच फाल्गुनी पाठक टिकली असावी, कारण माझं विलक्षण नृत्यकौशल्य जर मी सार्वजनिक व्यासपीठावर प्रगट केलं असतं तर फाल्गुनीने संगीतसंन्यास घेतला असता. जर गरबा भगवान श्रीकृष्णाच्या रासलीलेवरुन प्रेरित असेल तर साक्षात भगवंतानी रासलीला खेळून असा पायंडा पाडून मला नृत्यसंधी दिल्याबद्दल भारतवर्षाची माफी मागितली असती आणि लगोलग 'हा पहा शेवटचा कौरव' असं अर्जुनाला सांगून मला शरपंजरी निजवून मग अवतारकार्य संपवलं असतं. तसंच, जर गरबा आणि देवीचं काही नातं असेल तर देवीने महिषासुराला जरा टाईमप्लीज घालून आधी माझ्याकडे मोर्चा वळवला असता. नृत्याच्या बाबतीत अशा प्रकारे मी सनी देओलचाही गुरु असल्याने कॉलेजच्या दिवसात माझी प्रेयसी 'पंखिडा तू मोतियोंकी ला बहार रे' वगैरेवर गिरक्या घेत असताना मी सातच्या आत घरात असे. आणि आजही मी सनी देओलचं गुरुपद टिकवून आहे त्यामुळे गरब्यात मी कधी रमलो नाही.

उपवास या गोष्टीची मला साबुदाणा खिचडी आणि केळीचे तिखट मीठ लावलेले लांब वेफर्समुळे पडलेली भुरळ अजूनही कायम आहे. त्यामुळे हिच्यात होणारे बदल बघत, तिला नऊ रंगाच्या साड्या, नारळपाणी वगैरे आणून देत आणि स्वतः नेहमीचा नाश्ता करून वरुन पुन्हा साबुदाण्याची खिचडी खात मी जसाच्या तसा राहिलो आहे.

तात्पर्य काय? तर भारताच्या विविध भागात नवरात्र साजरी करण्याचे विविध प्रकार अजमावणाऱ्या आणि विश्वातील आनंदाचे ब्रह्मज्ञान अनुभवणाऱ्या माझ्या अर्धांगासमोर मी बराच कोरडा पाषाण आहे. असो. हे विषयांतर झालं. मुद्दा होता घरच्या घटस्थापनेचा. ती जरी घटस्थापनेचा हा उत्सव मनोभावे करत असली तरी माझा वाटा तिला शहाळ्याचे पाणी आणून देणे, आरतीच्या वेळी टाळ्या वाजवणे आणि 'जयदेवी जयदेवी' असे जोरात ओरडणे इथपर्यंतच आहे.

या वर्षी हिने घटावर टांगण्यासाठी एक लाकडी छत्र करून घेतलं होतं. त्याला खालच्या बाजूला भरपूर हुक्स होते. दर दिवशी फुलांची एक एक माळ ओवून ती त्या हुक्सना अश्या प्रकारे अडकवायची की त्यातील झेंडूची फुले देवीच्या मुखवट्याला लागली पाहिजेत. देवी युद्ध करत असताना तिच्या मस्तकाचा दाह होतो म्हणून आपण तिला फुलांनी शांत करत राहायचं. सुष्ट आणि दुष्टांच्या या युद्धात आपण सुष्टांच्या बाजूला आहोत हे आपल्या कृतीने सिद्ध करायचं आणि आपल्यासाठी लढणाऱ्या देवीची ताकद वाढवायची, अशी ही कल्पना.

कुठल्यातरी सुताराने आणि कुठल्यातरी फुलवाल्याने आपला व्यवसाय वाढावा म्हणून पुढे केलेल्या कल्पनेला सुष्ट आणि दुष्टाच्या चिरंतन लढ्याचं कोंदण लाभल्याने घटावर छत्र आणि छत्राला फुलांच्या माळा आता एक परंपरा बनली आहे , असे विचार माझ्या मनात आले. नंतर रोज देवीच्या मुखवट्याभोवती वाढत जाणाऱ्या माळा बघून मला माझ्या बायकोच्या हौसेचे कौतुक वाटत होते.

 

दसऱ्याच्या दिवशीच्या पहाटे लवकर उठलो होतो. पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेलो. वातावरण थंड होते. सगळीकडे शांतता होती. घरात आणि घराबाहेर अजूनही कुठला प्रकाश नव्हता. फक्त देव्हाऱ्याजवळ समयांचा मंद प्रकाश पसरला होता. त्या मंद प्रकाशात पाटावरची परडी, तिच्यातील मातीत उगवलेले नऊ धान्यांचे तुरे, त्यांच्यामधे ठेवलेला घट, त्यावरचा देवीचा मुखवटा, त्यावरचं छत्र आणि त्याला लटकून देवीच्या चेहऱ्याला स्पर्श करणाऱ्या माळा दिसत होत्या. मन प्रसन्न करणारं ते दृश्य बघत मी तिथेच उभा राहिलो. मग वाटलं. आज दहावा दिवस म्हणजे सिंहारूढ होऊन 'अंबा निघे सीमोल्लंघनी हो, शुंभनिशुंभादीक राक्षसा किती मारशी रणी हो' हे वर्णन आज लागू होणार. आणि त्या प्रसन्न क्षणीही मला हसू फुटलं.

म्हणजे बघा, दहावा दिवस आहे. देवी गेले नऊ दिवस रोज युद्ध करते आहे. अनेक राक्षस देवीवर तुटून पडत आहेत. देवी सगळ्यांना पुरून उरते आहे. आज राक्षसांनी शेवटचा निकराचा हल्ला चढवायचं ठरवलं आहे. त्यांच्या गटात रात्रभर व्यूहरचनेबद्दल खलबतं चालली आहेत. सकाळ झालेली आहे. दोन्ही बाजूला रणभेरी, संबळ, तुतारी, शंख वगैरे रणवाद्ये वाजू लागलेली आहेत. रणक्षेत्राच्या आजूबाजूचे पक्षी घाबरून ओरडू लागले आहेत आणि तिथून उडून चालले आहेत. त्यांच्या थव्यामुळे किंचिंत काळ रणक्षेत्र अंधारले आहे. दोन्ही बाजूचे हिंस्त्र प्राणी डरकाळ्या फोडत आहेत. जंगलातील कोल्हेकुत्रे भेसूर आवाजात ओरडून वातावरणातील ताण वाढवत आहेत. देवीला युद्धज्वर चढू लागलेला आहे. देवी आता असुरनिर्दालन करण्यासाठी सिंहावर आरूढ होते आहे. सिंह आता शेपटी आपटतो आहे. मान हलवून आयाळ उडवतो आहे. दृश्य मोठं भीतीदायक होत आहे. इतक्यात घरा घरातील सुगृहिणी आपापल्या हाताने बनवलेल्या झेंडूच्या फुलांच्या माळा देवीच्या चेहऱ्याला लागतील अश्या प्रकारे घरातील घटावरील छत्रीला अडकवत आहेत. आणि रणक्षेत्रावरील देवीला त्याची जाणीव होत आहे.

काय वाटेल अश्या वेळी देवीला? काय म्हणत असेल ती?

"अरे जरा थांबा. काय हे मधेच फुलं आणि माळा वगैरे. इथे समोर शुंभनिशुंभ उभे आहेत. माझा क्रोध अनावर होतो आहे आणि तुम्ही माळा लावून माझा युध्दज्वर उतरवताहात? अशाने युध्द संपायचं नाही. आणि काय रे भक्तांनो, या माळांमुळे माझ्या नजरेत अडथळा येणार नाही का? तुमच्या लग्नात मुंडावळ्या बांधलेल्या असताना इकडे तिकडे बघताना तुमचं जजमेंट चुकत होतं की नाही? मग मला का त्रास देताय? सुष्टांच्या बाजूने उभं राहताना शेवटी दुष्टांना सहाय्य करताय ते कळत नाही का तुम्हाला?"

मी असा विचार करून हसत होतो. तितक्यात हीदेखील देवघराजवळ आली. नित्यकर्माला सुरवात करण्याआधी देवीला भक्तिभावाने नमस्कार करत एक क्षण उभी राहिली. माझं हसू तिला दिसलं नव्हतं. आपण सुष्टांच्या बाजुने लढणाऱ्या देवीची मनोभावे सेवा करतो आहोत याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता. तिच्या चेहऱ्यावर दिसणारा तो आनंद पाहून माझ्या मनात आलेले विचार सांगून तिची थट्टा करण्याचा मोह मी आवरला. माझ्या विचारांच्या मुंडावळ्या काढून टाकल्या आणि मनातल्या मनात म्हणालो की ज्या कुणी सुताराने आणि फुलवाल्याने ही माळांची कल्पना सुरु केली असेल त्यावरही देवी प्रसन्न होवो.