Wednesday, March 28, 2018

टिरीटोम्बा टिरीटोम्बा


डिसेंबर २०१७ मध्ये तुंबाडचे खोत या महाकादंबरीची, राव्हेल या फ्रेंच संगीतकाराच्या बोलेरो या रचनेशी संगती लावणारी चार भागांची मालिका लिहिली होती. त्यावर प्रतिसाद देताना माझे सन्मित्र अनिल गोविलकरांनी आंद्रे रिऊ (André Rieu) या डच व्हायलनिस्ट आणि ऑर्केस्ट्रा कंडक्टरच्या कार्यक्रमाची आठवण झाली अशी नोंद केली होती. त्याआधी आंद्रेच्या कार्यक्रमांचे व्हिडीओ युट्युबवर बघितले होते. पण गोविलकरांनी सांगितले म्हणून जास्त लक्ष देऊन बघू लागलो.

केवळ संगीतावर भर न देता आंद्रे सादरीकरणालाही तितकेच महत्व देतो. त्याच्या ताफ्यातील कलाकार सगळेच हसत असतात, नाचणे, फटके मारणे, पडणे, खळखळून हसणे या सगळ्याला आपल्या संगीतात आंद्रे छानपैकी गुंफतो. त्याचा प्रचंड संख्येने उपस्थित असलेला प्रेक्षकवर्गही आंद्रेच्या कार्यक्रमात टाळ्या वाजवतो, सुरात सूर मिसळतो, उत्स्फूर्तपणे नाचतोदेखील; पण सगळं कसं शिस्तीत. त्यामुळे आंद्रेचा कार्यक्रम केवळ श्रवणभक्तीचा न रहाता बघण्यालायक असतो.

आंद्रेच्या कार्यक्रमाची प्लेलिस्ट लावून काम करत बसलो असताना, एकदा एक उडत्या चालीचं गाणं लागलं. कामाची विंडो मिनिमाईझ करून आंद्रेचं सादरीकरण बघू लागलो. नेहमीप्रमाणे आंद्रे आणि कलाकार रंगात आलेले होते. गाणं मला खूप आवडलं होतं. एक शब्द पुन्हा पुन्हा वापरून गाण्यात नुसती धमाल चालली होती. भाषा कुठली होती ते न कळल्याने माझ्यासाठी गाण्याचा अर्थ अगम्य होता. पण प्रेक्षक आणि कलाकार सगळ्यांच्या चेहऱ्यावरील खळाळत्या हास्यामुळे काहीतरी मजेदार प्रकार होता इतकंच मला कळलं होतं. गाण्यात पुन्हा पुन्हा वापरला जाणारा शब्द होता टिरीटोम्बा (tiritomba). गाण्यात मध्येच किशोरकुमारच्या पद्धतीने यॉडलिंगदेखील केलेलं होतं. नंतर ते गाणं अनेकवेळा ऐकलं. घरच्या मंडळींना कंटाळा येईपर्यंत टिरीटोम्बा टिरीटोम्बा गुणगुणणून झालं. शेवटी एकदा बायकोने वैतागून टिरीटोम्बाचा अर्थ विचारला. आणि गुणगुणणं बंद करून मी अर्थ शोधायच्या मागे लागलो. (नवऱ्याची बोलती कशी बंद करायची ते बायकोला चांगलं माहिती असतं यावरचा माझा विश्वास अजून वाढला आहे)

आता अर्थ शोधणं कठीण होतं. कारण भाषा वेगळी होती. कुठली होती ते कळत नव्हतं. शब्द समजत नव्हते. गाण्याचे बोल समोर नव्हते. फक्त टिरीटोम्बा माहिती होतं. मग गूगल बाबाला शरण गेलो. थोड्या शोधाशोधीनंतर कळलं की हे इटालियन लोकगीत आहे. कदाचित तिथल्या नेपल्स या शहरात याची पाळंमुळं असावीत. रोमन लिपीत लिहिलेले गाण्याचे बोल मिळाले. ते असे होते.

Sera jette, sera jette a la marina
Pe' trovà 'na 'nnamorata,
Janca e rossa, janca e rossa, aggraziata,
Fatta proprio pe' scialà.

Tiritomba, tiritomba,
Tiritomba n'è lu vero nio tè.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba a ll'aria va.

Spassianno, spassianno pe' llà ttuorno
Sento fà 'no sordeglino.
Mme ne accosto, mme ne accosto chiù bicino
Pe' poterla smiccià.

Tiritomba, tiritomba,
Tiritomba n'è lu vero nio tè.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba a ll'aria va.

Era bella, era bella, chiù che bella,
Parea stella de l'ammore.
Era chiuovo, era chiuovo che lo core
Te sa dinto spertusà.
Tiritomba, tiritomba,

Tiritomba n'è lu vero nio tè.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba a ll'aria va.

Io la guardo, io la guardo ed essa ride.
Io la parlo, essa risponne.
E già stevo e già stevo miezo a ll'onne
De l'ammore p'affonnà.

Tiritomba, tiritomba,
Tiritomba n'è lu vero nio tè.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba a ll'aria va.

Quanno veco, quanno veco 'nnitto 'nfatto
Assommarme Tata 'nnante.
Co 'na mazza, co 'na mazza faudiante
Mme voleva dissossà.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba n'è lu vero nio tè.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba a ll'aria va.

De carrera, de carrera scappo e sferro
Accossì da chelle botte.
Ma la bella, ma la bella juorno e note
Sempe 'ncore me starrà.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba n'è lu vero nio tè.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba a ll'aria va.

आंद्रेच्या कलाकारांनी सादर केलेलं गाणं ऐकत ऐकत कराओके करून झालं. पण अजून अर्थ सापडलेला नाही हे लक्षात होतं. म्हणून शोधाशोध चालू ठेवली. मग गूगलबाबा प्रसन्न झाले आणि अगदी समश्लोकी नाही म्हणता येणार पण Natalia Chernega यांनी केलेला आणि मूळ रचनेच्या वेगाशी मेळ खाणारा इंग्रजी अनुवाद मिळाला. आंद्रेचे कलाकार, स्वतः आंद्रे आणि हजारोंच्या संख्येने असलेला तो प्रेक्षकसमुदाय ह्या गाण्याच्या वेळी इतका खूष का होता ते अनुवाद वाचताना लगेच लक्षात आलं.

In the evening I've come to the seaside
To find a bride for myself,
A graceful blonde with rosy cheeks,
With whom I can live my life in joy.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.

Walking and walking around,
I feel a desire to whistle.
I'm going nearer and nearer
To see a girl better.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.

She was beautiful, more than beautiful,
She was like a star of love.
As if a thorn, as if a thorn
She has stuck into my heart.

Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.

I'm looking at her and she is laughing,
I'm speaking with her and she is answering.
I've already lost myself
In the waves of love.

Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.

Suddenly I see, suddenly I see
Her father, an enormous man.
Brandishing a stick,
He wants to beat me.

Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.

Rapidly I'm running away
And dodging his blows.
But the beauty night and day
Will be always in my heart.

Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.



संध्याकाळची वेळ आहे. गुलाबी गालाच्या आणि सोनेरी केसाच्या स्वप्नसुंदरीच्या शोधात एक तरुण समुद्रकिनाऱ्यावरून चालला आहे. त्याच्या मनातील ओसंडून वाहणाऱ्या प्रेमामुळे त्याला वातावरणात एक उत्साह दाटून आलेला जाणवतो आहे. जणू सगळी सृष्टी त्याच्याबरोबर स्वप्नसुंदरीच्या शोधात निघाली आहे. गाणं म्हणते आहे. टिरीटोम्बा टिरीटोम्बा.

मग त्याला ती दिसते. त्याला शीळ घालावीशी वाटते. तिला जवळून बघण्यासाठी तो उतावीळ होतो. पुढे जाऊ लागतो. गाणं म्हणत ‘टिरीटोम्बा टिरीटोम्बा’.

ती फार सुंदर आहे. फार फार सुंदर. ती प्रेमाचा तारा आहे. ती त्याच्या काळजात घुसलेला सुखद काटा आहे. आता तो फक्त एकंच गाणं म्हणतो आहे. ‘टिरीटोम्बा टिरीटोम्बा’.

तो तिच्याशी बोलतो तेव्हा ते हसते आहे. तो तिला प्रश्न विचारतो तेव्हा ती उत्तरं देते आहे. आणि प्रेमाच्या उसळणाऱ्या लाटात तो हरवून गेला आहे. ‘टिरीटोम्बा टिरीटोम्बा’

एकदम त्याला दिसतो तिचा बाप. मोठ्ठाला थोराड. हाती घेऊन काठी धावतोय त्याच्याकडे. आपल्या देखण्या लेकीच्या मागे लागलेल्या रोमिओला पळवून लावण्यासाठी. ‘टिरीटोम्बा टिरीटोम्बा’

आता तो पळू लागतो. बापाचे वार चुकवत. स्वप्नसुंदरीपासून दूर. पण ती संध्याकाळ तो कधी विसरणार नाही. तिचं सौंदर्य कायम त्याच्या स्मरणात राहील. ‘टिरीटोम्बा टिरीटोम्बा’

तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलाचं परकीय भाषेतील हे गाणं ऐकताना मला एकदम जवळचं मराठी भाषेतील गाणं आठवलं. यातलं वर्णन इतकं तपशीलवार नाही आणि हे लोकगीत नाही. आहे खरंतर चित्रपटगीत. पण भावना तीच. इथे बाप आणि आई गाण्याच्या सुरवातीलाच येतात. आणि एका भजनाने गाणं संपतं.

चडवा तुझा बापूस लय खविस हाय गो
येतां जाता तुझ्यामागे तुझी आई साय गो
माका मातुर इतूर बितूर कुणी वाली नाय गो नाय गो नाय गो …।।

एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती …
नाक्यावरती पाहिली होती … मन्नामध्ये भरली होती ।।

तिचे गोरे गोरे गाल
तिचे काळे काळे बाल ।।
लचकत मुरडत चालली होती … पायली होती … चालली होती …
एक पोरगी….

वारियाने कुंडल हाले ।।
डोळे मोडीत राधा चाले ।।

एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती …
नाक्यावरती पाहिली होती … मनामध्ये भरली होती



हे गाणं आठवलं म्हणून मग युट्युबवर ऐकत बसलो आणि लहानपणी सकाळी शाळेची तयारी करताना रेडिओवर स्नेहल भाटकरांच्या आवाजात ऐकलेलं वारियाने कुंडल हाले आठवलं.

वारियाने कुंडल हाले । डोळे मोडित राधा चाले
राधा पाहून भुलले हरी । बैल दुभवी नंदाघरी
फणस जंबिर कर्दळी दाटा । हाति घेऊन नारंगी फाटा
हरि पाहून भुलली चित्ता । राधा घुसळी डेरा रिता
ऐसी आवडी मिनली दोघा । एकरूप झाले अंगा



यातलं ‘बैल दुभवी नंदाघरी’ चं न सुटलेलं कोडं आठवलं. दुभवीचा अर्थ जर दूध काढणे असेल तर मग साक्षात हरी बैलाचं दूध काढतोय असा अर्थ होतो. लहानपणी वाटायचं की नाथ महाराजांचं काहीतरी चुकलं असावं. बैलाचं दूध कसं काय काढणार. पण मग नाथांच्या एका पैची गोष्ट ऐकली आणि इतके काटेकोर नाथ महाराज अशी चूक करणार नाही याची खात्री पटली. असे असले तरीही आळस हा स्थायीभाव असल्याने, माझ्या लहानपणी इंटरनेट नसल्याने आणि गुणगुणायच्या आधी अर्थ माहिती करुन घे असा आग्रह धरणारी बायको लहानपणी नसल्याने तो प्रश्न तसाच सोडलेला होता. आता टिरीटोम्बाच्या उत्साहात ते कोडंपण सोडवावंसं वाटलं आणि वारियाने कुंडल हाले ऐकत पुढे शोधत राहिलो.

तेव्हा कळलं की राधा गौळण चालली आहे. वाऱ्याने तिच्या कानातील कुंडलं हलत आहेत. तिचे डोळे चंचल आहेत. ते पाहून हरी भुलले आहेत. आणि चक्क बैलाचं दूध काढायला बसले आहेत. हरीचं रूप पाहून राधाही भुलली आहे आणि रिकाम्या डेऱ्यात रवी घुसळून लोणी काढायला बसली आहे. त्या दोघांचे प्रेमात देहभान हरपले आहे आणि ते प्रेमात एकरूप झाले आहेत. मधुराभक्तीचा अर्थ दाखवणारी ही रचना वाचताना तिसऱ्या आणि पाचव्या ओळीत आजही अडकलो. रेडिओवर ऐकलेल्या गाण्यापेक्षा पाठभेद असलेल्या रचना नेटवर मिळाली.

वारियाने कुंडल हाले । डोळे मोडित राधा चाले
राधा पाहून भुलले हरी । बैल दोहितो अपुल्या घरी
फणस जंबिर कर्दळी दाट । हाति घेऊन सारंगी पाट
हरि पाहून भुलली चित्ता । राधा घुसळी डेरा रिता
मन मिळालेसे मना । एका भुलला जनार्दना

यातलं जंबिर म्हणजे लिंबू हे कळलं आहे पण सारंगी पाट किंवा नारंगी फाटाचा काय अर्थ आहे तो काही अजून कळला नाही. इथे कुणाला माहिती असेल तर समजून घ्यायला आवडेल. आणि तो पटला तर पोस्ट एडिट करीन.

टिरीटोम्बाच्या नादात इतकं सगळं वाचलं काही कोडी थोडी उलगडली म्हणून खूष होतो आणि स्वतःच्या प्रेमाची आठवण झाली. माझी ही माझी लग्नाची बायको असल्याने ती माझी राधा नाही. आमच्याकडे बैल नाहीत आणि तिच्याकडे डेरा रवी वगैरे साधनं नाहीत. त्यामुळे हरपलेले देहभान कधी दाखवता आले नाही.

माझे सासरे खवीस नाहीत. मी माझ्या बायकोला मी नाक्यावर पाहिलं नाही. आणि तिला पाहण्याआधी किंवा नंतर नाक्यावर उभा राहिलो नाही. सी एच्या अभ्यासाने नाक्यावरची मजा करायची राहून गेली.

डोम्बिवलीत समुद्र नाही. मला शीळ घालता येत नाही. माझे सासरे मोठ्ठाले व थोराड नाहीत. त्यांच्याकडे रट्ट्टे हाणायला काठी नाही. त्यामुळे माझं ‘टिरीटोम्बा टिरीटोम्बा’ म्हणायचं राहून गेलं.

लहानपणापासूनच पुस्तकांची गोडी लागली. जसजसा वाचू लागलो तसतसा पुनर्जन्मावरचा विश्वास कमी होत गेला. हे एकमेव आयुष्य आहे हा विश्वास वाढत गेला. पण आज पुनर्जन्मावर विश्वास ठेवावासा वाटतोय. किमान तीन पुनर्जन्म मिळावेत.

पहिल्या पुनर्जन्मात समुद्रकिनारी शीळ वाजवत जाताना सोनेरी केसांच्या गोड मुलीने हसून आपल्याशी बोलावं आणि काठी घेऊन धावत आलेल्या तिच्या बापापासून आपण पळत दूर जावं. पुन्हा ती कधी भेटली नाही तरी ती संध्याकाळ कायमची स्मरणात रहावी.

दुसऱ्या पुनर्जन्मात गोऱ्या गालांची काळ्या केसांची मुलगी नाक्यावरती दिसावी.

आणि तिसऱ्या पुनर्जन्मात ते बैल दोहण्याइतकं, रिता डेरा घुसळण्याइतकं एकरूपत्व अनुभवता यावं.

असं कधी होणार नाही हे माहिती आहे. पण आज खूप आनंद झाला आहे म्हणून आज त्या आनंदासाठी म्हणतो आहे ‘टिरीटोम्बा टिरीटोम्बा’.

Tuesday, March 13, 2018

Long March

Chinese Long March of 1934
Image Courtesy: Internet

Maharashtra Kisan Long March 2018
Image Courtesy : Internet

दोन कामं होती म्हणून काल ऑफिसच्या कामासाठी पुण्याला गेलो होतो. खरं तर मित्राकडे रहाण्याचा कार्यक्रम होता. पण अर्ध्या रस्त्यात असताना एका मित्राने वैयक्तिक अडचणीमुळे येऊ शकणार नसल्याचं सांगितलं. लगेच घरी फोन करून बायकोला कळवलं की रात्री घरी परत येतो आहे. पुण्यात ज्याच्याकडे मुक्कामाला थांबणार होतो त्या मित्रालाही फोन लावून कार्यक्रम बदलल्याची माहिती दिली. आणि ए सी गाडीने आवडतं संगीत ऐकत सकाळी झपाझप गेलो. पहिलं काम पूर्ण केलं. मित्रांना भेटलो आणि संध्याकाळी तसाच परतलो. तरीही थोडा थकलो. सकाळी फेसबुक चेक केलं. मार्कबाबाने सांगितलं की आज तापमान ४० अंश सेल्सियस असणार आहे. त्यामुळे क्लासला दुपारी येणारी मुलं दमलेली असतील, यंदाचा उन्हाळा तीव्र असेल, एप्रिलमध्ये व्हेकेशन बॅचेस सुरु होण्यापूर्वी वर्गातले ए सी पाण्याने नीट स्वच्छ करून घेतले पाहिजेत वगैरे मुद्दे डोक्यात आले. 

तोपर्यंत फेसबुक टाइमलाईनवर शेतकऱ्यांच्या मोर्चाचे Alka Dhupkar यांनी शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ आले. उन्हातान्हात फिरणारी माणसं पाहिली. म्हाताऱ्या स्त्रिया पाहिल्या. रात्री रस्त्यावर झोपलेले हजारो लोक पाहिले. तुटक्या चपलेचे. जखमी पायाचे, धुळीने माखलेल्या पायांचे फोटो पाहिले. मनातल्या मनात ए सी गाडीतून आवडतं संगीत ऐकत, शेवटच्या क्षणी कार्यक्रम बदलल्यावर सगळ्यांना कळवून, ज्या कामासाठी गेलो होतो ते काम पूर्ण करून आणि जे अर्धवट राहिले त्याबद्दल पुढच्या भेटीची योजना करून पूर्ण झालेल्या कालच्या माझ्या प्रवासाची आणि शेतकऱ्यांच्या या मोर्च्याची तुलना झाली. स्वतःला आलेल्या शिणवट्याची लाज वाटली. 

कसलीच शाश्वती नसताना, कुठलंही काम होईल याची खात्री नसताना, राजकीय स्वार्थासाठी कोण आपला कश्याप्रकारे वापर करून घेईल याबद्दल काही कल्पना नसताना हजारो लाखो लोक रणरणत्या उन्हात एकत्र चालतात. कोण आपला नेता? बोलणी करण्यासाठी सरकार त्याला मान्यता देणार का? सरकारतर्फे कोण बोलणी करणार? काय मिळालं की मोर्चा विसर्जित केला जाणार? जे तोंडी किंवा लेखी मिळेल ते प्रत्यक्षात हाती केव्हा पडणार? आणि ते नाही मिळालं तर आपण पाठपुरावा कसा लावणार? मोर्च्याचं नेतृत्व करणाऱ्यांना सत्तेत किंवा विरोधात कसं बसवणार? आपले हक्क मिळवण्यात यांना अपयश आलं तर तर दुसरा पर्याय कोणता? आणि इतर कुठले मार्ग वापरणार? त्यांच्यामागे असलेलं आपलं संख्याबळ कमी होऊ नये म्हणून स्वतः कितीवेळ तग धरणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याजवळ असतील का? हे प्रश्न महत्वाचे आहेत असं त्यांना वाटत असेल का? या विचाराने मीच अस्वस्थ झालो. 

यांना आदिवासी म्हणावं की वनवासी? शेतकरी कर भरतात की नाही? शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी की नाही? कर्जमाफीचा लाभ बडे शेतकरीच घेतात की नाही? या मोर्च्यात राजकीय पक्षांचे झेंडे असावेत की नाहीत? हे सगळे प्रश्न म्हणजे चक्रीवादळात उडणाऱ्या धुळीसारखे आहेत. चक्रीवादळाची खरी ताकद वादळाबरोबर उडणाऱ्या धुळीत नसून त्या वाऱ्यांना वाहू देणाऱ्या परिस्थितीत असते. आणि सध्या आपली सामाजिक परिस्थिती अशी आहे की वेगवेगळे गट सतत लढत आहेत. कुणी अस्तित्वाची लढाई लढतंय तर कुणी अस्मितेची. अस्मितेच्या लढायांकडे समाजाने तिरस्काराने पाहणं आवश्यक आहे तर कुठल्याही एका गटाच्या अस्तित्वाच्या लढाईकडे मात्र संपूर्ण समाजाने सहानुभूतीने पाहणं आवश्यक आहे. 

दुर्दैवाने आपल्या देशातील अस्तित्वाच्या लढायांसाठी आपण आपलं स्वतःचं, इथल्या लोकांना जवळचं वाटेल असं तत्वज्ञान तयार करण्यात अपयशी ठरलो आहोत. सध्याच्या मोर्चाचं नावदेखील लॉन्ग मार्च वापरून मोर्चेकरी नसता विरोध ओढवून घेत आहेत. भारतातील कम्युनिस्ट विरोधकांच्या नजरेत अपयशी असतील, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आणि त्यानंतरही काही वर्षे त्यांचा किंवा त्यांच्यातील काही गटांचा इतिहास फारसा उज्वल नसेल. पण त्यामुळे त्यांनी ज्यांची बाजू घेतली आहे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न तिरस्कारयोग्य ठरत नाही. 

इतके प्रश्न आपल्या समाजात आहेत यावर बहुसंख्यांचा विश्वास न बसणं. सगळे प्रश्न भांडवलशाही किंवा राष्ट्रवाद सोडवू शकेल इतकं भाबडं सामाजिक आकलन असणं, ही आपल्या देशाची शोकांतिका आहे. 

खरंतर लोकशाही मानणारे कम्युनिस्ट, विरोधी पक्ष म्हणून काम करणारे कम्युनिस्ट, लॉन्ग मार्च काढून सरकारकडे निवेदन देणारे कम्युनिस्ट ही खास भारतीय निर्मिती आहे. हिचा वापर आपण करून घेऊ शकलो तर इथल्या सर्वांचं भलं होणार आहे. त्यामुळे या मोर्च्याला पाठिंबा देऊन आगामी निवडणुकीत सर्व पक्षांना या प्रश्नाबाबत आपली भूमिका स्पष्ट करायला लावणं, आणि सारासार विचार करून मतदान करणं आपलं कर्तव्य आहे.

Thursday, March 8, 2018

गाणी आणि वर्तमान (भाग ३.५)

----
----

जेव्हा आपल्या कलाकृतीचे किंवा विचाराचे किंवा रचनेचे विडंबन होते तेव्हा आपण उत्कृष्ट निर्मिती केली असं समजायला हरकत नसते.

काल गाणी आणि वर्तमान ही सिरीज पूर्ण केली. विषय थोडा नाजूक असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे कमी प्रतिसाद मिळाला. पण माझ्या काही आवडत्या गाण्यांची, सद्यकाळातील घटनांशी आणि समाजमाध्यमांवर होणाऱ्या हाणामारीशी ज्या प्रकारे माझ्या डोक्यात संगती लागली होती, त्याच प्रकारे मी ती शब्दात उतरवू शकलो होतो. म्हणून मी खूष होतो.

आणि आता इंद्रनीलचा मेसेज आला. त्रिपुरा निकाल, लेनिन पुतळा, पेरियार पुतळा आणि श्यामाप्रसाद मुखर्जी पुतळा प्रकरण त्यावरून समाजमाध्यमांत रोज बदलत जाणाऱ्या भूमिका, सर्वपक्षीय समर्थकांची होणारी गोची आणि तरीही त्यांच्या उत्साहाला कधी न लागणारी ओहोटी पाहून त्याला जे वाटलं ते त्याच्याच शब्दात मांडतो.
--
Please write the next part of your current series on the cycle of social media outrages.

First an incident happens.

Day 1 goes on utter shock and condemnation.

By day 2 the other side gets ready and start proving how the incident is either not that big a deal, how other side has done same things in the past, or how what happened was totally justified, and then social media is filled with counter arguments.

Day three is utter chaos with both the sides hitting each other left and right.

By day four, both of them are somewhat tired and when it seems the issue is going away, someone discovers the comic side to it, and next thing you know your timeline is filled with memes and jokes about the same incident. By this time the anger has also gone down a little bit and the urge to fight is also going away, and both sides find this new wave of memes a little bit relieving.

By day 5th the memes are getting stale and people are losing interest in general in topic. The timeline seems boring, and just when you are going back to your daily mundane life, a new incident happens and the cycle starts again.

The song for this would be "apun jaisa tapori" from Munnabhai MBBS "Fir kya, agale din apne mohalle me Aishwarya Aai"
------


वाचून आणि गाणं बघून पोट धरून हसलो.

आणि मग Ralph E. Wolf and Sam Sheepdog - A Sheep In The Deep आठवलं. समाजमाध्यमांवरील सर्वपक्षीय समर्थक असेच आहेत याची उगाच खात्री पटली.


इंद्रनील, माझ्या लेखनावर विडंबन सुचवून माझ्या लेखनाचं महत्व वाढवल्याबद्दल धन्यवाद ;-)

गाणी आणि वर्तमान (भाग ३)

-------
------
समाजमाध्यमांबाहेरही जग आहे आणि ते इथल्या जगापेक्षाही कित्येक पटीने मोठं आहे हे मला माहिती आहे. इथे व्यक्त होताना लोक वास्तवापेक्षा अधिक उथळपणे व भडकपणे व्यक्त होतात हे मला माहिती आहे. हे असे का होत असावे याबद्दल विचार करत असताना मला जाणवले की राजकीय पक्ष, त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे समाजमाध्यमांवरील समर्थक या तिघांचे परस्परसंबंध पूर्णतयः भिन्न स्वरूपाचे असतात.

राजकीय पक्ष आपली जाहीर भूमिका घेतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांना वैयक्तिक आयुष्यात ती मान्य असेलच अशी स्थिती कायम नसते. कार्यकर्त्याला लोकांना भेटायचे असते. त्यांच्यात राहायचे असते. त्यांच्याबरोबर राहून काम करायचे असते. त्यामुळे कित्येकदा पक्षाची जाहीर भूमिका वेगळी असली तरी कार्यकर्ता आपल्या वैयक्तिक हितसंबंधांमुळे त्या भूमिकेची धार थोडी बोथट करून वर्तन करतो. त्यामुळे पक्ष जरी कडवी भूमिका घेत असला तरी प्रत्यक्षात मात्र ती भूमिका तितकी कडवी रहात नाही. म्हणजे कार्यकर्ता पक्षाच्या भूमिकेतील कडवटपणाला कमी करतो. पक्षाला सुसह्य करतो.

पक्षाच्या कार्यकर्त्याचे वर्तन असे असले तरी समाजमाध्यमांवरील पक्षाच्या समर्थकांचे वर्तन असेच असेल याची खात्री नसते. किंबहुना ते अनेकदा उलटेच असते. इथे सगळेच आभासी प्रतिमेशी बोलत असतात. त्यामुळे आपले बोलणे समोरच्यावर ठसवण्यासाठी अधिक तीव्रतेचा आधार घेतला जातो. प्रत्यक्ष हितसंबंध गुंतलेले नसल्याने समोरच्याला नामोहरम करण्यात काहीच वावगे वाटत नाही. त्यामुळे पक्षाच्या भूमिकेला बोथट करून ती समाजाच्या सध्याच्या ग्रहणक्षमतेइतकी सौम्य करण्याऐवजी ती आहे त्यापेक्षा अधिक जहाल आणि तीव्र स्वरूपात मांडली जाते.

एकाची पोस्ट पाहून दुसऱ्याला पोस्ट सुचते त्यामुळे इथे एकाच विषयावर असंख्य पोस्टींच्या लाटा उसळत असतात. ऑनलाईन आणि रियलटाइम असल्याने हा संवाद समकालीन (synchronous) आहे असा आपल्याला भास झाला तरी त्या पोस्टवर येणाऱ्या कमेंट्स वेगवेगळ्या वेळेला येत असल्याने प्रत्यक्षात तो संवाद विषमकालीन (asynchronous) असतो. त्यामुळे आपण ऑफलाईन गेल्यावर आलेल्या विरोधी प्रतिसादांना उत्तर देताना अनेकांची भाषा अजून भडक होत जाते. आणि मग प्रतिध्वनीचा प्रतिध्वनी येत राहून सर्व वाचकांच्या मनावर ओरखडे पडतात. तोपर्यंत नवीन विषयाची सुरवात होते आणि मागच्या विषयवार निघालेल्या ओरखड्याची किंमत पुढच्या पोस्टवर वसूल केली जाते. त्यातून राजकीय विषयांवर लिहिणाऱ्या लोकांचे त्यांच्याही नकळत कंपू बनत जातात. आणि मग प्रत्येकाच्या पोस्टमधील विखार वाढतो आणि आपापल्या कंपूतील लोकांच्या टाळ्या घेऊन समोरच्या कंपूतील लोकांचे मतपरिवर्तन न करता आपण जिंकलो म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतो. पण प्रत्यक्षात मात्र पक्षाच्या समर्थकाने आपल्या वर्तनाने त्या पक्षाला समाजासाठी असह्य केलेले असते.

प्रत्येक राजकीय पक्ष हा सत्तेसाठी राजकारण करतो. किंबहुना त्यासाठीच राजकारण केले पाहिजे. पण मग सत्ता कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर मात्र, ‘आपापल्या मतदारांच्या आणि पाठिराख्यांच्या उत्कर्षासाठी’ असे असल्याने ‘संपूर्ण समाजाचा उत्कर्ष’ हे कुठल्याही पक्षाचे धोरण असू शकते अशी कल्पना करणेदेखील भारतात अशक्य झाले आहे. त्यामुळे हा पक्ष शेटजी भटजींचा, तो पक्ष शेतकऱ्यांचा, तो पक्ष उपेक्षितांचा, तो पक्ष अल्पसंख्यांकांचा असे वर्गीकरण झालेले आहे. समाजमाध्यमे आल्यामुळे या वर्गीकृत पक्षांच्या समर्थकांना आपापली भूमिका रोज समोर मांडावीशी वाटते आहे. पूर्वी एखाद्या पक्षाला मत दिल्यावर पाच वर्षे त्याचे रोज समर्थन करण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे पक्ष, नेते, कार्यकर्ते आणि मतदार अशी विभागणी होती. आता मात्र केवळ मतदार असून चालत नाही. जर तुम्ही समाजमाध्यमांवर ऍक्टिव्ह असाल तर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पक्षाचे समर्थकही व्हावे लागते. फार कमी लोक या ताणापासून स्वतःला वाचवू शकतात. आणि वाचवू न शकलेले अनेकजण शेवटी कंपूत अडकतात. त्यामुळे दिशाहीन पक्ष, त्यांचे कडवे आणि वाचाळ समर्थक आणि बावचळलेले कार्यकर्ते असे काहीसे चित्र सध्या दिसून येते. आणि संधीसाधू नेत्यांचे फावते.

मी पक्षांना दिशाहीन म्हणतो कारण, सत्ता जाताच ते सैरभैर होतात. त्यांचे दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेते लगोलग त्यांना सोडून नव्या सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला बसतात. म्हणजे समाजवाद, साम्यवाद, भांडवलशाही हे शब्द कितीही वेळा वापरले तरीही कुठल्याही राजकीय पक्षाकडे यापैकी एकही संकल्पना भारतीय लोकशाहीच्या चौकटीत कश्याप्रकारे राबवायची त्याचा ठोस कार्यक्रम नाही. आपल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेत्यांसाठी यांच्याकडे कुठली योजना नाही. ज्यांच्याकडे स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी योजना नाहीत ते देशासाठी काही दूरगामी योजना आखून सर्व समाजासाठी काही करतील ही आशा भाबडी ठरते. किंबहुना आपल्या लोकशाहीत देशातील सर्व लोक येतात हेच या राजकीय पक्षांना मान्य नाही.

मध्ययुगातून आधुनिक युगात येण्याची पूर्ण तयारी व्हायच्या आधीच स्वातंत्र्य मिळालेल्या या देशाकडे स्वतःचे राजकीय तत्वज्ञान नाही. राजकीय तत्वज्ञान म्हणजे समाज कोणत्या मूल्यांवर उभा करावा? ती मूल्ये कशी निवडावीत? त्या मूल्यांना प्रतिष्ठा कश्याप्रकारे मिळवून द्यावी? त्या मूल्यांसाठी व्यवस्था कशी उभारावी? आणि त्यासाठी लागणारे भांडवल कसे उभे करावे? याचा कुठलाही ठोस कार्यक्रम एकाही राजकीय पक्षाकडे आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे मध्ययुगीन सामंतशाहीचे मूल्य आणि विषमतेचे तत्व हाडीमासी खिळलेल्या समाजात घटनेने आणलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूल्ये म्हणजे बुजगावण्याला घातलेल्या सुटाबुटासारखी आहेत.

चीन किंवा व्हिएतनाम सारखे देशही साम्यवाद राबवताना स्वतःच्या देशातील लोकांच्या मानसिकतेचा विचार करतात. नेत्यांनी निवडलेल्या मूल्यावर आधारित समाज हे जर गंतव्य स्थानक असेल तर, आज आपला समाज कुठे आहे? प्रवास नक्की किती मोठा आहे? त्या प्रवासात समाजात पूर्वीपासून रुळलेली कुठली मूल्ये अडथळा बनू शकतात? त्यांना दूर करताना त्या मूल्यांमुळे ज्यांना लाभ होतो आहे त्या सर्व समाजघटकांचा जो विरोध होईल त्या विरोधाला कश्या प्रकारचे हाताळायचे? यासारख्या कुठल्याही प्रश्नाला हात न घालता, त्याची स्वतः शोधलेली उत्तरे जनतेसमोर न ठेवता, त्याबद्दल कुठलीही चर्चा न करता; आपले राजकीय पक्ष काम करतात म्हणून मला ते दिशाहीन वाटतात. त्यांचे बहुतेक सर्व निर्णय दीर्घकालीन नसून तत्कालीन असतात, दोन निर्णयात सुसूत्रता नसते परिणामी त्यांच्या समर्थकांना वाचीवीर होण्याशिवाय पर्याय उरत नाही.

ही स्थिती जरी फार उत्साहवर्धक नसली तरी रोज समाजमाध्यमांवर आक्रस्ताळेपणाने व्यक्त होण्याच्या सवयीमुळे, आपण किंवा आपल्या मित्रांनी घेतलेली भूमिका योग्य आहे की नाही त्याचा अनेकांना रोज धांडोळा घ्यावासा वाटू लागेल, अशी मला खात्री आहे. अमुक एक पक्ष सत्तेवर आला की रामराज्य येईल अशी आशा ठेवणाऱ्या सगळ्यांचा भ्रमनिरास होण्याची प्रक्रिया समाजमाध्यमांमुळे वेगवान होते आहे. काँग्रेसच्या शासनकाळातील अनागोंदीबद्दल लोकांना चीड येण्यास सत्तर वर्षे लागली असतील (सत्तर हा आकडा अचूक नाही याची मला कल्पना आहे) तरी भाजपाबद्दल किंवा त्यानंतर पुढे सत्तेवर येणाऱ्या कुठल्याही पक्षाबद्दल तसे होणार नाही. समूहाची स्मृती क्षणिक असते हे जरी खरे असले तरी समाजमाध्यमांमुळे तिला जिवंत राखता येऊ शकते. आपण ज्या पक्षाचे समर्थन करतो त्या पक्षाचे इतर समर्थक कश्याप्रकारे वागतात हे समाजमाध्यमांमुळे सगळ्यांसमोर पुन्हा पुन्हा येत रहाते. त्यामुळे समर्थन करणाऱ्यांचा आवेश भविष्यात आटोक्यात येईल याचीदेखील मला खात्री आहे. फक्त आवश्यकता आहे ती समाज, राजकारण आणि लोकशाही कशी चालते त्याबद्दलचे आपले सगळ्यांचे आकलन सुधारून घेण्याची.

इतर देशांना गुलाम न करता स्वदेशाला संपन्नतेच्या शिखराकडे नेणे म्हणजे डोंगराळ प्रदेशातील घाटरस्त्यावर गाडी चालवण्यासारखे आहे. सतत गिअर बदलावे लागतात. ब्रेक आणि क्लच यांचा ताळमेळ ठेवावा लागतो. आणि यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतील असे मला वाटते. हतोत्साहित करणाऱ्या सध्याच्या वातावरणात समाजमाध्यमांना उद्देशून एकंच गाणं म्हणावंसं वाटतं.

Edelweiss, Edelweiss
Every morning you greet me
Small and white, clean and bright
You look happy to meet me

Blossom of snow may you bloom and grow
Bloom and grow forever
Edelweiss, Edelweiss
Bless my homeland forever

द साउंड ऑफ म्युझिक या चित्रपटाला प्रदर्शित होऊन नुकतीच ५३ वर्षे होऊन गेली. त्या चित्रपटात हे गाणे दोनदा येते. जर्मनीने ऑस्ट्रियाला विलीन करून घेतल्यावर ऑस्ट्रियन नागरिक असलेल्या कॅप्टन व्हॅन ट्रॅप एकदा आपल्या कुटुंबासमवेत हे गाणं म्हणतो. आणि दुसऱ्या वेळी साल्झबर्ग येथील उत्सवात हे गाणे तिथे जमलेले सर्व लोक गातात.

या गाण्यातील Edelweiss हे आल्प्स पर्वतराजीमध्ये मिळणारे एक नाजूक फूल आहे. ऑस्ट्रियात हे फूल संराक्षित आहे. ते तोडणे कायद्याने गुन्हा आहे. काही सैनिक तुकड्यांच्या टोपीवर त्याची मुद्रा वापरली जाते. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी विरोधी काम करणाऱ्या संघटनांनी Edelweiss हे नाव वापरले होते.

माझ्यासाठी किमान आजतरी Edelwiess म्हणजे समाजमाध्यमे आहेत. आणि नाझी म्हणजे कुठलाही एक पक्ष नसून सर्व पक्षीय विखारी आणि आततायी समर्थक आहेत. त्या सगळ्यांनी इथली लोकशाही नष्ट करू नये म्हणून मी माझ्या Edelweiss ला उद्देशून हे गाणं गुणगुणतो. 



Edelweiss, Edelweiss
Every morning you greet me
Small and white, clean and bright
You look happy to meet me

गाणी आणि वर्तमान (भाग २)

------
------
जेव्हा भाजप समर्थक विजयानंदाच्या पोस्ट्स टाकत होते त्याचवेळी कित्येक मित्रांना ईशान्येकडच्या राज्यांनी चूक केली असे वाटल्याचे त्यांच्या पोस्टवरून जाणवत होते. त्रिपुराच्या लोकांनी लोकशाहीतील मतदानाचा हक्क सुयोग्यरित्या बजावला असं काही पोस्टकर्त्यांचं मत होतं तर संभाव्य हुकूमशाहीच्या वावटळीत आपण तग धरायची तयारी केली पाहिजे असं इतर मित्रांचं मत होतं. भाजपचे समर्थक वाचाळ आहेत. मेनस्ट्रीम मीडिया भाजपने विकत घेतलेला आहे अश्या अर्थाच्या पोस्ट्स देखील वाचायला मिळाल्या.

आणि मग काही मित्रांनी बीफ जनता पार्टीची We choose to stand with the defeated ही पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमधील संयत भाषा, त्यावरचे भाजप समर्थकांचे आणि विरोधकांचे तीव्र प्रतिसाद वाचले. त्या प्रतिसादांमधील तीव्र विरोध वाचून डोकं बधीर होत चाललं होतं. म्हणून तिथून बाहेर पडलो. मग भाजपचे नेते फेकू आहेत, त्यांनी गोबेल्सनीती आत्मसात केलेली आहे आणि ईशान्येकडची राज्ये या भूलथापांना बळी पडली आहेत अश्या अर्थाची एक पोस्ट वाचली. या सगळ्या गदारोळामुळे गोबेल्स, हिटलर, पितृभूमी, एकचालकानुवर्तित्व, हुकूमशाही, फॅसिस्ट या शब्दांनी डोक्यात फेर धरला. आणि एकदम ‘कॅब्रे’ या हॉलीवूडच्या चित्रपटातील एक गाणं आठवलं.

क्रिस्तोफर इशरवूड (Christopher Isherwood) या लेखकाचं ‘द बर्लिन स्टोरीज’ (The Berlin ‘stories) नावाचं एक पुस्तक १९३९ साली प्रसिद्ध झालं होतं. १९६६ साली जॉन कँडर (John Kander) आणि फ्रेड एब्ब (Fred Ebb) या ज्यू जोडगोळीने त्याची कॅब्रे (Cabret) या नावाने एक संगीतिका बनवून ब्रॉडवेवर आणली. आणि मग १९७२ ला त्यावर आधारित त्याच नावाचा एक चित्रपट निघाला.

या चित्रपटात १९३१ च्या जर्मनीचा काळ रंगवलेला आहे. तेव्हा जर्मनीत वायमार प्रजासत्ताक होते. आणि नाझी लोकांचा जोर वाढू लागलेला होता. या पोस्टसाठी चित्रपटाची कथा महत्त्वाची नसल्याने ती इथे सांगत बसत नाही. पण चित्रपटात एक बीअर गार्डनचा सीन आहे. सकाळची प्रसन्न वेळ आहे. कोवळं ऊन आहे. गावातील एक बाग आहे. गावातील आबालवृद्ध बागेत जमले आहेत. सगळीकडे उत्साहाचं प्रसन्न वातावरण आहे. आणि मिसरूडही न फुटलेला सोनेरी केसांचा आणि निळ्या डोळ्यांचा एक तरुण मुलगा उभा राहतो. कॅमेरा त्याच्या चेहऱ्यावर रोखलेला असतो. आणि तो गाणं म्हणायला सुरवात करतो. संथ लयीत पण स्पष्ट सुरात.

The sun on the meadow is summery warm.
The stag in the forest runs free.
But gather together to greet the storm.
Tomorrow belongs to me.

The branch of the linden is leafy and green,
The Rhine gives its gold to the sea.
But somewhere a glory awaits unseen.
Tomorrow belongs to me.

The babe in his cradle is closing his eyes
The blossom embraces the bee.
But soon, says a whisper;
Arise, arise,
Tomorrow belongs to me.

आणि या तिसऱ्या कडव्याच्या शेवटी एक छोटी मुलगी उभी राहून त्या तरुणाच्या आवाजात स्वतःचा आवाज मिसळून गाऊ लागते. एव्हाना कॅमेरा झूम आऊट होऊन पूर्ण मुलगा दिसू लागलेला असतो. त्याने स्काऊटसारखे कपडे घातलेले असतात. पण त्याच्या दंडावर नाझी स्वस्तिकाचे चिन्ह असलेली पट्टी असते. तो हिटलर यूथ या संस्थेचा सदस्य असतो हे स्पष्ट होते. आता चौथे कडवे सुरु होते. बीअर गार्डन मधील इतर लोकही एकेक करून उठून उभे राहू लागतात आणि गाण्यात भाग घेतात.

Oh Fatherland, Fatherland,
Show us the sign
Your children have waited to see
the morning will come when the world is mine,
Tomorrow belongs to me !

आता गाण्याची लय वाढते. वाद्यमेळ वाढतो. मुख्य गायक आणि कोरसचा स्वर टिपेला पोहोचतो. चौथे कडवे पुन्हा पुन्हा म्हटले जाते. बसलेले लोक उभे राहत जातात. काही स्वेच्छेने काही अनिच्छेने. एक म्हातारा मात्र बसलेलाच राहतो. शेजारची व्यक्ती उभी राहिल्यावर तिच्याकडे काहीश्या विमनस्कपणे आणि हताशेने पाहतो. किंचित नकारात्मक मान हलवतो. बीअर गार्डन गाण्याच्या सुराने दुमदुमून जाते. गाणे सुरु करणारा युवक काखेत धरून ठेवलेली टोपी डोक्यावर घालतो आणि आता कुप्रसिद्ध झालेला हात उंचावण्याचा नाझी सॅल्यूट करतो.

मला हे गाणं आठवलं म्हणजे सध्याच्या भारतीय प्रजासत्ताकाची स्थिती १९३१ च्या वायमार प्रजासत्ताकासारखी आहे असं माझं मत नाही. पण समाजमाध्यमांवर उसळणाऱ्या लाटा आणि त्यातील भाजप समर्थकांचा जल्लोष व विरोधकांची हतबलता पाहून, कर्नाटक मधील निवडणुकांसाठीचा भाजपचा वाढलेला विश्वास आणि शेवटी केरळलाही जिंकून घेण्याच्या त्यांच्या पोस्ट्स वाचून हे गाणं मला आठवलं खरं.

खरंतर हे गाणं (fatherland चा उल्लेख जसा हवा तसा बदलून) सर्वपक्षांच्या समर्थकांनी म्हणायला हवं पण सध्या तरी भाजपचे समाजमाध्यमांवरील समर्थक Tomorrow belongs to me म्हणत आहेत असं मला वाटतं.

गाणी आणि वर्तमान (भाग १)

--------
-------
ईशान्येकडील राज्यांतील निवडणुकांचा निकाल लागला. समाजमाध्यमांवर विविध पक्षांच्या समर्थकांच्या मतांच्या फैरी झडू लागल्या. आवडत्या पक्षाप्रमाणे किंवा पटलेल्या विचारधारेप्रमाणे कुणाला हा निकाल फॅसिस्ट हुकूमशाहीच्या आगमनाची नांदी वाटला तर कुणाला राष्ट्रवादाच्या आगमनाची नांदी वाटला. कुणाला ही लोकशाहीची मृत्युघंटा वाटली तर कुणाला छद्म धर्मनिरपेक्षतेची मृत्युघंटा वाटली. माझ्या मित्रांत विविध पक्षांचे समर्थक आणि विविध विचारधारांशी बांधिलकी असणारे सर्वजण असल्याने प्रत्येकाच्या पोस्ट्स वाचून माझ्या मनात वेगवेगळे विचार येत होते. आणि मग या विचारांना अनुसरून कुठलं गाणं त्या मित्रांच्या मनोवस्थेसाठी योग्य ठरेल त्याच्या जोड्या माझ्या मनात लागू लागल्या.

भाजप समर्थक मित्रांच्या पोस्टमधील ऊर्जा आणि विजयोन्माद पाहिला. या निवडणुकीत श्री सुनील देवधरांनी काय काम केलं याबद्दल कौतुकमिश्रित वर्णनं वाचली. संघ कार्यकर्ते कशाप्रकारे ईशान्येकडील राज्यांत निरलसपणे कार्य करत आहेत याबद्दलची आदरयुक्त वर्णनं वाचली. आणि मला 'वंदे मातरम' हे गीत आठवलं. रोज शाळा सुटताना म्हणतात त्या संथ लयीतील नाही तर बंकिमचंद्र चॅटर्जींच्या आनंदमठ या कादंबरीवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटात हेमंतकुमारांनी गायलेलं द्रुतलयीतलं वीरश्रीपूर्ण वंदे मातरम. बंकिमचंद्र बंगालमधील होते. आणि ईशान्य भारताच्या सध्याच्या निवडणूक क्षेत्राच्या आसपास त्यांची कादंबरी घडते. म्हणून वाटलं की हे गाणं चपखल बसतंय.



पण थोडा विचार केला आणि जाणवलं की ते वीरश्रीपूर्ण गीत या मित्रांसाठी लागू पडत नाही. कारण वंदे मातरम मध्ये मातेला वंदन आहे. भारत माता आहे. तिच्या भूमीचे वर्णन आहे. तिच्या रिपुदमन करण्याच्या शक्तीचे वर्णन आहे. तिच्या दुर्गारूपाचा गौरव आहे. तिच्यासाठी काय करू त्याचे वर्णन नसून ती कशी आहे त्याचे वर्णन आहे. त्यामुळे ते वीरश्रीपूर्ण असले तरी मातेचे गौरवगीत आहे. आपल्याला काय करायचे आहे त्याचे योजनागीत नाही.

मग दुसरंच गीत आठवलं. हिंदीतील प्रसिद्ध छायावादी कवी किंबहुना ज्यांना छायावादाचाया चार खांबांपैकी एक खांब मानलं जातं, ज्यांनी 'कामायनी' या महाकाव्याची रचना केली त्या जशंकर प्रसाद यांनी ही कविता लिहिली आहे. त्यांनी स्कंदगुप्त. चंद्रगुप्त अशी ऐतिहासिक नायकांबद्दलची नाटके लिहिली. कदाचित त्यांच्या 'चंद्रगुप्त' या नाटकातील रचना असू शकेल. जुन्या चाणक्य सिरीयल मधे ही रचना चंद्रगुप्त म्हणतो आणि मग त्याचे मित्र साथ देतात असं चित्रिकरण केलं आहे.

या रचनेत राष्ट्र हा शब्द महत्वाचा आहे. भौगोलिक संदर्भ असलेला देश हा शब्द नाही, तर सांस्कृतिक संदर्भ असलेला राष्ट्र हा शब्द वापरलेला आहे. स्त्रीलिंगी जन्मभूमी किंवा मातृभूमी नाही. तर पुल्लिंगी राष्ट्र शब्द वापरलेला आहे. सुरवातीला पुल्लिंगी राष्ट्र शब्द वापरणाऱ्या या गीताच्या शेवटी मात्र स्त्रीलिंगी माँ शब्द येतो. पण ही माँ वंदे मातरम सारखी सुजलाम सुफलाम नाही, बहुबल धारिणीं रिपुदलवारिणीं नाही.

या गाण्यात ती सर्वशक्तिमान दुर्गा नसून तिच्या पुत्रांनी तिला शत्रूंच्या रुधिराने अभिषेक केलेला होता आणि शत्रूंच्या मुंडक्याची माळ घालून तिचा शृंगार केलेला होता. पुत्रांनी दिलेल्या सांस्कृतिक सिंहासनावर बसून ती जगावर राज्य करत होती. कालचक्राच्या गतीने हे सिंहासन मोडकळीस आलेले आहे आणि तिच्या पुत्रांवर जबाबदारी आहे की आपले तन मन धन अर्पून तिला तिचा नष्ट झालेला गौरव पुन्हा प्राप्त करून द्यायचा आहे. म्हणजे ती वंदे मातरम मधील सर्वशक्तिमान माँ नसून; तन मन धन अर्पण करण्यास तयार असलेल्या सर्वशक्तिमान पुत्रांची ती माँ आहे.

जुन्या चाणक्य सिरियलमध्ये या गीताचं चित्रीकरण ज्या प्रकारे केलेलं होतं त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील माझ्या मित्रांना हे गाणे आपलेसे वाटणे स्वाभाविक आहे. आणि संघविरोधकांना संघाची वैशिष्ट्ये धारण करणारे वाटणेही स्वाभाविक आहे. संघाचे विरोधक संघाला जी दूषणे देतात ती सर्व या गीतात ठळकपणे दिसून येतात. शेंडीवाल्यांचा गट. जानवेधाऱ्यांचा गट. स्त्रियांना दुय्यम स्थान देणाऱ्यांचा गट. गुरुआज्ञा शिरसावंद्य मानणाऱ्यांचा गट. भूमी पेक्षा अमूर्त राष्ट्रसंकल्पनेला महत्व देणाऱ्यांचा गट, वगैरे गोष्टी या चित्रीकरणात दिसून येतात.

गाणे सुरु होते तेव्हा रात्रीची वेळ आहे. आश्रमात मशालींचा उजेड आहे. सर्व विद्यार्थी आणि गुरुजन आपापल्या कक्षात विश्राम करत आहेत. एकटा चंद्रगुप्त सचिंत मुद्रेत एका खांबाला टेकून शून्यात नजर लावून बसलेला आहे. आणि तो सहज संथ सुरात स्वगत असल्याप्रमाणे म्हणतो

अन्तर से मुख से कृती से
निश्र्चल हो निर्मल मति से
श्रद्धा से मस्तक नत से
हम करें राष्ट्र अभिवादन....

आणि आश्रमाला जाग येते. एकामागून एक विद्यार्थी आपापल्या कक्षातून बाहेर येऊ लागतात. आतापर्यंत शांत आणि संथ असलेलं स्वगत आता वीररसपूर्ण गीतात बदलतं. सस्मित आचार्यही आपल्या कक्षातून बाहेर येतात. विद्यार्थी कवायत करत असल्याप्रमाणे शिस्तबद्ध रीतीने राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या भावना एकसुरात मांडतात. हे गाणं बघताना भावनाप्रधान प्रेक्षकांना आपोआप स्फुरण चढतं. आपण काहीतरी करावं ही ऊर्मी दाटून येते.

हम करें राष्ट्र आराधन
तन से मन से धन से
तन मन धन जीवनसे
हम करें राष्ट्र आराधन ।।धृ।।

अन्तर से मुख से कृती से
निश्र्चल हो निर्मल मति से
श्रद्धा से मस्तक नत से
हम करें राष्ट्र अभिवादन ।। १।।

अपने हंसते शैशव से
अपने खिलते यौवन से
प्रौढता पूर्ण जीवन से
हम करें राष्ट्र का अर्चन ।।२।।

अपने अतीत को पढकर
अपना ईतिहास उलटकर
अपना भवितव्य समझकर
हम करें राष्ट्र का चिंतन ।।३।।

है याद हमें युग युग की जलती अनेक घटनायें
जो मां के सेवा पथ पर आई बनकर विपदायें
हमने अभिषेक किया था जननी का अरिशोणित से
हमने शृंगार किया था माता का अरिमुंडो से

हमने ही उसे दिया था सांस्कृतिक उच्च सिंहासन
मां जिस पर बैठी सुख से करती थी जग का शासन
अब काल चक्र की गति से वह टूट गया सिंहासन
अपना तन मन धन देकर हम करें पुन: संस्थापन ।।४।।



कम्युनिस्ट पार्टीला त्रिपुरात धूळ चारण्यात आलेल्या यशामुळे अनेक तरुण भाजप समर्थक ज्या प्रकारे व्यक्त होत होते ते पाहून मला वाटले की त्यांच्या डोक्यात वंदे मातरम मधील सर्वशक्तिमान माँ नसून हम करे राष्ट्र आराधन मधील माँ आहे.

गुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग ३)

----
----
मागील भागात मी केलेलं विश्लेषण अनेकांना पटलं तरी मी केलेली सूचना मात्र अनेकांना पटणे कठीण आहे.

एका समाजगटाला हिशोब राखणे आणि तो तपासणे या क्षेत्रात अधिक निर्बंध असावेत याचा अर्थ ते क्षेत्र त्यांच्यासाठी कायमचेच काय पण तात्पुरतेही बंद करावे असा होत नाही. आणि सीएचे काम केवळ हिशोब तपासणी नसून इतर अनेक क्षेत्रात सीए काम करतात ज्यावर निर्बंध आणावेत असं मी सुचवलेलं नाही. कुणालाही सीए होण्यात आडकाठी नसावी पण काहींना हिशोबतपासनीस होण्यासाठी अधिकचे निर्बंध हवेत इतकाच मुद्दा होता.

आजही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत किंवा जमीन व्यवहारात नगद आणि चेकच्या बाबतीत किती जण मारवाडी सीएला प्राधान्य देतील याचा विचार केला की माझा मुद्दा समजायला सोपा जाईल.

यातून नवा चातुर्वर्ण्य तयार होईल अशी भीती कुणी व्यक्त केली आहे. पण माझ्या मते आता कुठलाही उपाय अमलात न आणताही काही व्यवसाय एकेका समाजगटाच्या ताब्यात जात आहेतंच. त्यामुळे मी रोगापेक्षा इलाज भयंकर असे काही सांगितलेले नाही याबद्दल मला खात्री आहे. तरीही हा उपाय स्वप्नाळू आहे हे मला मान्य आहे.

यापेक्षा इतर उपाय कुणाला सुचत असतील आणि ते अधिक व्यावहारिक असतील तर त्यांचे श्रेष्ठत्व मान्य करण्यात मला काही कमीपणा वाटणार नाही.

जर कुठल्याही समाजगटावर कसलीही बंदी करायची नसेल (कारण ते अनैसर्गिक आहे) तर अजून एक उपाय मी सुचवू शकेन जो स्वार्थभावनेला पूरक आहे.

ज्या मारवाड्यांनी आपल्या व्यवसायात सर्व भागीदार / कर्मचारी स्वसमाजाबाहेरील घेतले असतील त्या व्यवसायाला करात अधिकची सूट द्यावी किंवा भांडवल पुरवठा सवलतीच्या दरात व्हावा.

अर्थात या उपायातही त्रुटी शोधून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहेच.

गैरवापर होण्याचे मुख्य कारण भारतीय समाजाची नियमांबद्दलची उदासीनता असून त्याची धार्मिक आणि सांस्कृतिक अंगाने थोडक्यात कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न मी पोस्टमधे केला आहे. त्याशिवाय नियमबाह्य वर्तनाबद्दल उदासीनतेच्या कारणाची आर्थिक बाजू समजून घेताना मला असे जाणवते की भांडवलाची निर्मिती मार्क्सबाबाने सांगितल्याप्रमाणे कष्टकऱ्यांच्या रक्त आणि घामातून तर होतेच आहे पण भारतात ती भ्रष्टाचारातूनही होते आहे.

ज्या समाजगटाच्या हातात भांडवल एकवटले आहे त्याला ते स्वतःकडे टिकावे आणि वाढावे म्हणून नियमपालन महत्त्वाचे वाटत नाहीत. तर ज्या समाजगटांकडे भांडवलाचा अभाव आहे ते नियमबाह्य वर्तन करुन आपल्यासाठी भांडवलाची निर्मिती करतात. पण अशा प्रकारे भांडवरनिर्मिती झाली तरी ती वैयक्तिक होते. नवभांडवलदाराच्या समाजगटात उद्यमशीलता नसल्याने नियमबाह्य वर्तन करुन भांडवल गोळा करणारा वंचित समाजातील पहिल्या पिढीचा नवभांडवलदार शेवटी जुन्या भांडवलदारांच्या बरोबर रहाण्यात धन्यता मानतो. आणि नियमबाह्य वर्तन, नव्या भांडवलदारांच्या वैयक्तिक फायदा करून देत असले तरी जुन्या भांडवलदारांच्या समाजगटाचा अधिक फायदा करून देते.

म्हणजे हे दुष्टचक्र भेदण्यासाठी आपल्या देशात विविध समाजगट आहेत. त्यांच्याकडे उद्यमशीलता वेगवेगळ्या प्रमाणात आहे. भांडवल फार कमी समाजगटांकडे एकवटले आहे. आणि नियमबाह्य वर्तन हे भारतात वैयक्तिक भांडवरनिर्मितीचे साधन झाले आहे ही वस्तुस्थिती मान्य करुन मगंच उपाययोजना करावी लागेल. नुसते नवीन कायदे करून काही फरक पडणार नाही. आणि कायदापालन करुन घेणाऱ्या संस्थात काम करणारे बहुसंख्य लोक पिढ्यान पिढ्या भांडवलापासून वंचित होते हे देखील ध्यानात घ्यावे लागेल.

मागे पडलेल्या समाजगटांत उद्यमशीलता वाढवणे, त्यांना भांडवलाचा पुरवठा करणे आणि बाजार हाच देव, दिलेला शब्द पाळणे आणि नियम पाळणे हीच त्याची पूजा हे तत्व सर्व भारतीयांत रुजवणे... याला पर्याय नाही.

तोपर्यंत सुचवलेले सर्व उपाय अव्यावहारिक वाटत रहातील.

कुठल्याही समाजाप्रती द्वेषभावना न करता जर आपल्याला कमीत कमी घोटाळे आणि जास्तीत जास्त विकास हवा असेल तर रस्ता लांबलचक आहे आणि थोडा कंटाळवाणादेखील. पण पर्याय नाही.

गुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग २)

-----
----

सगळ्यात प्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो. सध्या गाजत असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याशी संबंधित व्यक्ती मारवाडी नाहीत. पण अनेकांचा समज आहे की त्या व्यक्ती मारवाडी आहेत.

असा समज होण्याचे कारण गुजराथ आणि राजस्थान ही राज्ये स्वतंत्र भारतात जरी वेगळी असली तरी अनेक भारतीयांच्या दृष्टीने ती एकत्र आहेत. जसे दक्षिणेकडच्या सगळ्या लोकांना अनेक भारतीय मद्रासी समजतात आणि ईशान्येकडच्या राज्यांतील आसामी, मणिपुरी, नागा, मेघालयी आणि अरुणाचली लोक इतर बहुसंख्य भारतीयांना सारखेच वाटतात. तसेच गुजराथी आणि मारवाडी लोक अनेकांना सारखेच वाटतात. त्याशिवाय या दोन्ही प्रदेशातील प्रचलित भाषा एकाच कुळातील आहेत. या दोन्ही प्रदेशात जैन धर्माचा प्रभाव आहे. या दोन्ही प्रदेशातील अनेक लोक नोकरीपेशा किंवा कलोपासना किंवा मुलुखगिरीसाठी फार प्रसिद्ध नसून व्यापार उदिमासाठी प्रसिद्ध आहेत. व्यवसायाचे हिशोब ठेवण्याची स्वतःची अशी वेगळी पद्धत (हिला पर्था किंवा परता असं म्हणतात) या प्रदेशात विकसित करण्यात आली होती. दोन्ही प्रदेशातील लोक आपापल्या व्यावसायिकांचे गट करण्यात आणि त्या गटांत इतरांना सहजासहजी सामील न करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. दोन्ही प्रदेशातील व्यावसायिक एकत्र कुटुंब पद्धतीची व्यवस्था अजूनही मोठ्या प्रमाणावर वापरतात. त्यामुळे गुजराथी, कच्छी, राजस्थानी, मारवाडी यात पोटभेद असले आणि प्रत्येक समूहाची गुणवैशिष्ट्ये वेगवेगळी असली तरी बहुसंख्य भारतीयांच्या दृष्टीने गुजराथी हिंदू, गुजराथी जैन, मारवाडी हिंदू, मारवाडी जैन, किंवा कच्छी समाज यांच्यात फार फरक नाही.

मारवाडी समाजाबद्दल विचार करताना माझ्या डोक्यात ज्यू लोकांचा विचार येण्याचे एकमेव कारण होते बँकिंग. ज्यू हा धर्म आहे आणि मारवाडी हा धर्म नाही हे मला माहिती आहे. ज्यू लोक बँकिंगमध्ये येण्याचे प्रमुख कारण इतर संधींचा अभाव हे होते याउलट मारवाडी लोक बँकिंगमध्ये येण्यामागे असे कुठलेही कारण नव्हते.

किंबहुना जगत सेठ सारखी मारवाडी पेढी मुघलांना पैसा पुरवत होती. प्लासीच्या लढाईत ब्रिटिशांना जगत सेठ पेढीची मदत मिळाली होती. पुढे ताराचंद घनश्यामदास सारखी मारवाडी पेढी; लोकर आणि अफूचा व्यापार, ठोक व्यापार, अंगडिया सेवा, कर्ज, ठेवी, इन्शुरन्स, हुंडी सारख्या विविध सेवा पुरवून एखाद्या युरोपियन बहुराष्ट्रीय कंपनीसारखी बलाढ्य कंपनी झाली होती. आजच्या बिर्ला, मित्तल आणि सिंघानिया घराण्यांचे पूर्वज याच ताराचंद घनश्यामदासमध्ये तयार झाले होते. आणि स्वातंत्र्यलढ्यात त्यांची सहानुभूती व सहकार्य काँग्रेसला होते.

१९५६ च्या भाषावार प्रांतरचनेच्या योजनेला भारतभर पसरलेल्या मारवाड्यांचा विरोध होता आणि त्याकाळात त्यांनी अनेक प्रादेशिक वर्तमानपत्रे विकत घेऊन त्यावर आपली पकड बसवली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र मारवाडी लोकांनी बँकिंगऐवजी आणि व्यापाराऐवजी उत्पादनक्षेत्रात लक्ष घातले. त्या काळात भारतात उत्पादन क्षेत्रात दोन समाजांनी पैसा ओतला. एक म्हणजे पारशी आणि दुसरा म्हणजे मारवाडी. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९९१ च्या उदारीकरणाच्या काळापर्यंत मारवाड्यांनी जवळपास २५% उत्पादनक्षेत्र काबीज केलेले होते. आता डिजिटल क्षेत्रातही ऑनलाईन व्यापारात मारवाडी लोक पुढे आहेत. म्हणजे मूळ व्यापार, मग बँकिंग पेढी, त्यातून राजा महाराजांना कर्ज पुरवठा, मग त्या जोडीने व्यापार,मग बँकिंगच्या उद्योगातून काढता पाय घेऊन उत्पादन आणि मिडीया आणि आता पुन्हा ऑनलाईन व्यापार अश्या विविध क्षेत्रात मारवाडी समाजाने बस्तान बसवले.

इतके असूनही लेबले लावण्याच्या भारतीय समाजाच्या सवयीत; मराठी म्हणजे डोक्यात राख घालून घेणारे, दक्षिण भारतीय म्हणजे नियमांच्या बाबतीत कट्टर, पंजाबी म्हणजे दिलखुलास असे करता करता मारवाडी म्हणजे कंजूष असे लेबल चटकन लागते. याच्यामागचे कारण काय असावे? याचा विचार करताना मला खालील गोष्टी जाणवल्या.

मुळात राजस्थान, नेपाळ आणि कलकत्ता याठिकाणी एकवटलेला हा समाज, ब्रिटिश आमदानीत भारतभर पसरला. मोठया पेढ्यांच्या धर्तीवर अनेक मारवाडी कुटुंबे ब्रिटिश आमदनीत सावकारी धंद्यात शिरली. हिशोब ठेवण्याच्या त्यांच्या पर्था (किंवा परता) पद्धतीमुळे, चक्रवाढ व्याजावर कायदेशीर नियंत्रण नसल्यामुळे आणि कर्जवसुलीसाठी विशिष्ट नियम नसल्यामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ होत गेली. आणि छोट्या खेड्यातील सर्वसामान्य भारतीयांना पैशाला चोख असणारा मारवाडी माणूस दिसला. ज्याच्या उद्योगासाठी पैसा हीच वस्तू आहे त्याने हिशोबाला पक्के राहणे आवश्यक आहे. याला कुणी चिकट म्हणेल किंवा कुणी स्वार्थी पण मला यात काही वावगे दिसत नाही. किंबहुना जो समाज स्वार्थी नसतो तो आपल्या उत्कर्षासाठी इतरांवर अवलंबून असतो. मारवाड्यांच्या बाबतीत एक नक्की झालं की जितक्या चटकन ते युरोपियनांनी आणलेल्या बाजाराच्या व्यवस्थेशी एकरूप होऊ शकले आणि आपल्या एकत्र कुटुंब पद्धतीत त्या व्यवस्थेला रुजवू शकले तितक्या वेगाने इतर कुठलाही भारतीय समाज बाजार व्यवस्थेशी एकरूप होऊ शकला नाही. त्यामुळे या समाजातील उद्यमी आणि क्षुद्रबुद्धी अश्या दोन्ही प्रकारच्या लोकांना भारतात मोकळं रान मिळालं. आणि न्यून ते पुरते अधिक ते सरते या न्यायाने मारवाडी समाज चिकूपणाबद्दल, कंजूषपणाबद्दल बदनाम झाला.

असे असूनही त्यांच्याबद्दल संपूर्ण भारतात रोष का निर्माण होत नाही? ह्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळल्यावर मला जाणवले की,

जसा मारवाडी समाज आहे तसेच भारतात इतर अनेक समाज आहेत. मग तो आगरी असो, कोळी असो, शेट्टी असो वा अजून कोणी. आणि या प्रत्येक समाजाला मारवाडी समाजाच्या व्यवसायाच्या मॉडेलचे कौतुक असते, मारवाडी समाजाला नावे ठेवणारे सर्वजण आपल्या समाजात तशी एकी नाही, एकमेकांना सांभाळून घेण्याची तशी कुवत नाही याबद्दल मनोमन हळहळत असतात. म्हणजे तशी संधी निर्माण झाल्यास आज मारवाडी नसलेले सर्वजण व्यवसायाचे मारवाडी मॉडेल वापरण्यास मनोमन तयार असतात. त्यामुळे भारतीयांना मारवाड्यांबद्दल असूया वाटली तरी द्वेष वाटत नाही.

आणि त्याचमुळे मारवाडी भ्रष्ट आहेत, स्वार्थी आहेत, त्यांची निष्ठा पैशाशी आहे हे सर्व आरोप मला बिन बुडाचे वाटतात. जर तसे असेल तर ती बहुसंख्य भारतीयांची प्रवृत्ती आहे. आणि तिचे कारण कुणी मारवाडी असणे किंवा नसणे नसून आपल्या समाजाच्या पापपुण्याच्या धारणेत आहे असे मला वाटते.

अब्राहमिक धर्मात देवाशी केलेला करार आणि अंतिम न्यायाचा दिवस या दोन गोष्टींमुळे माणसाला आपण कुणाला तरी आपल्या वर्तणुकीबाबत उत्तर देण्यास बांधील आहोत असे वाटते. त्यामुळे पाप पुण्याच्या संकल्पना फिकट असल्या तरी

समाजव्यवहारावर सामाजिक कायद्यांचे आणि देवाशी केलेलया कराराचे नियंत्रण रहाते. जो नियमबाह्य वर्तन करेल त्याला शिक्षा व्हावी अशी इच्छा स्वाभाविक ठरते.

याउलट प्रमुख भारतीय धर्म; यात हिंदू, जैन, बौद्ध व शीख सगळे आले. या सर्व धर्मात देवाशी करार नाही. अंतिम न्यायाचा दिवस नाही. या दोन्हीच्या ऐवजी आपल्याकडे पुनर्जन्म ही कल्पना आहे. आणि या जन्मातील पापांची शिक्षा किंवा पुण्याचे फळ पुढील जन्मात मिळण्याची सोय आहे. त्यामुळे नियमबाह्य वर्तनाला तात्काळ शिक्षा व्हावी अशी कुणाला इच्छादेखील होत नाही. किंबहुना दानधर्म, भूतदया, देवभक्ती करून आपण केलेल्या पापाचे प्रायश्चित्त याच जन्मी घेणे आणि पुढील जन्मातील शिक्षेचे पारडे हलके करणे आपल्या धार्मिक धारणांना मान्य आहे. म्हणजे पूर्णपणे वेगळ्या धार्मिक धारणांशी बांधील असलेल्या आपल्या समाजावर आपण अब्राहमिक धर्माशी बांधील अशा धारणांवर आधारित कायदे लादण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्यामुळे भ्रष्टाचार, स्वार्थ यांचे भारतीय अर्थ इतर समाजांपेक्षा वेगळे ठरतात. आणि आपल्यापैकी अनेकांना मारवाडी समाजाबद्दल असूया असूनही त्यांच्याबद्दल द्वेष वाटत नाही.

याचाच अर्थ एखादी जादूची काडी फिरली आणि भारतातील मारवाडी समाज एका रात्रीत बदलला तरी त्यांच्या जागी येणारा दुसरा समाज तीच गुणवैशिष्ट्ये धारण करेल. युरोपियनांनी आणलेली बाजारव्यवस्था जर मारवाडी समाजाआधी कोकणस्थ ब्राह्मण, किंवा शहाण्णव कुळी मराठा किंवा दलित किंवा फासेपारधी किंवा नंबुद्री किंवा नागा लोकांना इतर भारतीयांपेक्षा जास्त लवकर आत्मसात करता आली असती तर तेही मारवाड्यांसारखेच वागले असते आणि आपण त्यांच्याबद्दल असूयाग्रस्त झालो असतो. आणि आज जसे आपल्याला अनेक घोटाळ्यात एका समाजाचे लोक दिसून येतात तसे दुसऱ्या समाजाचे लोक दिसून आले असते.

म्हणजे ही स्थिती काळापुढे धावण्याच्या केवळ गुजराथ्यांच्या किंवा मारवाड्यांच्या वृत्तीमुळे येत नसून इतर सर्व समाजांच्या काळामागे राहण्याच्या वृत्तीमुळे तयार होते आहे. यातून बाहेर येण्यासाठीचे पहिले पाऊल तर आपण टाकलेले आहेच. ते म्हणजे गुजराथ्यांना किंवा मारवाड्यांना आपण ज्यू लोकांसारखे वागवत नाही. आता पुढची पावले टाकणे आवश्यक आहे. गुजराथी किंवा मारवाडी लोकांना त्यांचा वेग कमी करायला सांगणे मूर्खपणाचे ठरेल. पण त्याचबरोबर हा वेग खरा आहे तो फुगवटा नाही याची खात्री पटवण्यासाठी सरकारला जास्त काळजी घ्यावी लागेल.

मी सांगितलेल्या उपायांवर अमल करावा इतका मोठा मी नाही हे मला माहिती आहे. पण ऑडिटमध्ये इंटर्नल कंट्रोलचे एक तत्व मी शिकलो आहे आणि ते नेहमी शिकवतो देखील. त्यानुसार, काम करणाऱ्यालाच ते लिहून ठेवायची आणि तपासायची जबाबदारी द्यायची नसते. सध्या शब्दात पेपर लिहिणाऱ्याला तो तपासायच्या कामावर नेमायचे नसते. जर एक समाज म्हणून मारवाडी उद्योगात पुढे असतील तर हिशोब राखणे आणि तो तपासणे या क्षेत्रात त्यांना प्रवेश देताना जास्त निर्बंध असले पाहिजेत. अर्थव्यवस्थेतील उद्योगाचे काम हे ऍक्सिलरेटरचे असते तर हिशोबतपासनीसाचे काम ब्रेकचे असते. एकाच समाजातील व्यक्ती दोन्ही कामे करत असतील तर दोघांपैकी एकाचे काम मागे पडून संपूर्ण अर्थव्यवस्थेला धक्का लागू शकतो. असे अनेक धक्के आपण १९९१च्या आर्थिक उदारीकरणापासून खातो आहोत. कारण उदारीकरण यशस्वी होण्यासाठी करारांचे बंधन पाळणारा समाज अपेक्षित आहे. आणि आपला समाज करारांचे बंधन पाळण्यासाठी प्रसिद्ध नाही.

आर्थिक घोटाळे सर्व देशात होतात. अगदी युरोपीय देशात सुद्धा होतात. पण विकसित देशांच्या तुलनेत भारतात घोटाळे करणे अधिक सोपे आहे आणि घोटाळ्यानंतर शिक्षा चुकवून पळून जाणेदेखील भारतात अधिक सोपे आहे. आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत आणि बाजारव्यवस्थेच्या आकलनाच्याबाबतीत विविध पातळीवर असलेल्या विविध सामाजिक गटांनी आपला देश बनलेला आहे, त्यापैकी विविध सामाजिक गटांत भांडवलाची उपलब्धता वेगवेगळी आहे हे जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत घोटाळेबाजांसाठी भारत हा एक स्वर्ग असेल. आपण कधी मारवाड्यांच्या नावे तर कधी गुजराथ्यांच्या नावे तर कधी अजून कुणाच्या नावे खडे फोडत बसू आणि आपल्या धार्मिक धारणांनुसार आपल्याच नशीबाला बोल लावत बसू.

गुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग १)

----
----

ज्यूंबद्दल, ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजात अविश्वास आणि तिरस्कार कायम होता. त्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे व्याजावर पैसे देण्याचा धर्मबाह्य व्यवसाय ज्यूंच्या हाती एकवटलेला होता.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, सामान्य जनतेच्या मनात असलेल्या या असंतोषाचे जर्मनीतील सत्ताधाऱ्यांनी त्याचे भांडवल केले.

ज्या वेगाने आर्थिक घोटाळ्यांत मारवाडी समाजातील व्यावसायिकांची नावे येत आहेत ते पाहता मारवाडी म्हणजे भारतातील ज्यू होऊ शकले असते.


पण त्यांचे मारवाडरुपी मातृभूमीवर प्रेम असले तरी ज्यूंप्रमाणे त्यासाठी ते झुरत नाहीत.

आधुनिक बॅंकिंगमधे मारवाड्यांना रस नाही. बॅंका चालवण्याऐवजी ते या आधुनिक बॅंकांकडून कर्जे घेतात.

व्यापार उदीम सोडून कला विज्ञान गणित यासारख्या जीवनाच्या इतर क्षेत्रात मारवाडी रस घेत नाहीत.

हिशोब तपासणीच्या क्षेत्रातील केंद्रीय संस्था म्हणजे सी ए इन्स्टिटय़ूट त्यांच्याच ताब्यात आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

सर्व राजकीय पक्षांना ते आर्थिक मदत करतात. परिणामी कुठल्याही राजकीय पक्षाला त्यांच्याविरुद्ध आघाडी उघडाविशी वाटत नाही.

त्यामुळे अजूनतरी हा समाज इतर समाजाच्या असंतोषाचा आणि तिरस्काराचा धनी होत नाही.

भारताच्या प्रगतीत मारवाडी समाजाचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे अधोगतीचे खापर फक्त त्यांच्या डोक्यावर फुटू नये असे वाटते.