Thursday, March 8, 2018

गुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग ३)

----
----
मागील भागात मी केलेलं विश्लेषण अनेकांना पटलं तरी मी केलेली सूचना मात्र अनेकांना पटणे कठीण आहे.

एका समाजगटाला हिशोब राखणे आणि तो तपासणे या क्षेत्रात अधिक निर्बंध असावेत याचा अर्थ ते क्षेत्र त्यांच्यासाठी कायमचेच काय पण तात्पुरतेही बंद करावे असा होत नाही. आणि सीएचे काम केवळ हिशोब तपासणी नसून इतर अनेक क्षेत्रात सीए काम करतात ज्यावर निर्बंध आणावेत असं मी सुचवलेलं नाही. कुणालाही सीए होण्यात आडकाठी नसावी पण काहींना हिशोबतपासनीस होण्यासाठी अधिकचे निर्बंध हवेत इतकाच मुद्दा होता.

आजही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत किंवा जमीन व्यवहारात नगद आणि चेकच्या बाबतीत किती जण मारवाडी सीएला प्राधान्य देतील याचा विचार केला की माझा मुद्दा समजायला सोपा जाईल.

यातून नवा चातुर्वर्ण्य तयार होईल अशी भीती कुणी व्यक्त केली आहे. पण माझ्या मते आता कुठलाही उपाय अमलात न आणताही काही व्यवसाय एकेका समाजगटाच्या ताब्यात जात आहेतंच. त्यामुळे मी रोगापेक्षा इलाज भयंकर असे काही सांगितलेले नाही याबद्दल मला खात्री आहे. तरीही हा उपाय स्वप्नाळू आहे हे मला मान्य आहे.

यापेक्षा इतर उपाय कुणाला सुचत असतील आणि ते अधिक व्यावहारिक असतील तर त्यांचे श्रेष्ठत्व मान्य करण्यात मला काही कमीपणा वाटणार नाही.

जर कुठल्याही समाजगटावर कसलीही बंदी करायची नसेल (कारण ते अनैसर्गिक आहे) तर अजून एक उपाय मी सुचवू शकेन जो स्वार्थभावनेला पूरक आहे.

ज्या मारवाड्यांनी आपल्या व्यवसायात सर्व भागीदार / कर्मचारी स्वसमाजाबाहेरील घेतले असतील त्या व्यवसायाला करात अधिकची सूट द्यावी किंवा भांडवल पुरवठा सवलतीच्या दरात व्हावा.

अर्थात या उपायातही त्रुटी शोधून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहेच.

गैरवापर होण्याचे मुख्य कारण भारतीय समाजाची नियमांबद्दलची उदासीनता असून त्याची धार्मिक आणि सांस्कृतिक अंगाने थोडक्यात कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न मी पोस्टमधे केला आहे. त्याशिवाय नियमबाह्य वर्तनाबद्दल उदासीनतेच्या कारणाची आर्थिक बाजू समजून घेताना मला असे जाणवते की भांडवलाची निर्मिती मार्क्सबाबाने सांगितल्याप्रमाणे कष्टकऱ्यांच्या रक्त आणि घामातून तर होतेच आहे पण भारतात ती भ्रष्टाचारातूनही होते आहे.

ज्या समाजगटाच्या हातात भांडवल एकवटले आहे त्याला ते स्वतःकडे टिकावे आणि वाढावे म्हणून नियमपालन महत्त्वाचे वाटत नाहीत. तर ज्या समाजगटांकडे भांडवलाचा अभाव आहे ते नियमबाह्य वर्तन करुन आपल्यासाठी भांडवलाची निर्मिती करतात. पण अशा प्रकारे भांडवरनिर्मिती झाली तरी ती वैयक्तिक होते. नवभांडवलदाराच्या समाजगटात उद्यमशीलता नसल्याने नियमबाह्य वर्तन करुन भांडवल गोळा करणारा वंचित समाजातील पहिल्या पिढीचा नवभांडवलदार शेवटी जुन्या भांडवलदारांच्या बरोबर रहाण्यात धन्यता मानतो. आणि नियमबाह्य वर्तन, नव्या भांडवलदारांच्या वैयक्तिक फायदा करून देत असले तरी जुन्या भांडवलदारांच्या समाजगटाचा अधिक फायदा करून देते.

म्हणजे हे दुष्टचक्र भेदण्यासाठी आपल्या देशात विविध समाजगट आहेत. त्यांच्याकडे उद्यमशीलता वेगवेगळ्या प्रमाणात आहे. भांडवल फार कमी समाजगटांकडे एकवटले आहे. आणि नियमबाह्य वर्तन हे भारतात वैयक्तिक भांडवरनिर्मितीचे साधन झाले आहे ही वस्तुस्थिती मान्य करुन मगंच उपाययोजना करावी लागेल. नुसते नवीन कायदे करून काही फरक पडणार नाही. आणि कायदापालन करुन घेणाऱ्या संस्थात काम करणारे बहुसंख्य लोक पिढ्यान पिढ्या भांडवलापासून वंचित होते हे देखील ध्यानात घ्यावे लागेल.

मागे पडलेल्या समाजगटांत उद्यमशीलता वाढवणे, त्यांना भांडवलाचा पुरवठा करणे आणि बाजार हाच देव, दिलेला शब्द पाळणे आणि नियम पाळणे हीच त्याची पूजा हे तत्व सर्व भारतीयांत रुजवणे... याला पर्याय नाही.

तोपर्यंत सुचवलेले सर्व उपाय अव्यावहारिक वाटत रहातील.

कुठल्याही समाजाप्रती द्वेषभावना न करता जर आपल्याला कमीत कमी घोटाळे आणि जास्तीत जास्त विकास हवा असेल तर रस्ता लांबलचक आहे आणि थोडा कंटाळवाणादेखील. पण पर्याय नाही.

1 comment: