Sunday, May 13, 2018

तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ८)

_________

सर्वसाधारणपणे समाजशास्त्र म्हटल्यावर शाळेत इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र (इभूनाशा) असे विषय शिकवले जातात. त्यामुळे समाजशास्त्र म्हणजे सनावळ्या, घराणी, जमीनीची व हवामानाची वैशिष्ट्ये आणि नागरिकांची हक्क व कर्तव्ये, विविध घटनात्मक पदांसाठीची किमान वयोमर्यादा; इतक्याच गोष्टींचा अभ्यास अशी आपली समजूत असते. पण ती फारच अपूर्ण आणि फसवी आहे. समूहांसाठी कुठलेही निर्णय घ्यायचे असतील तर कसे घ्यावेत? कुठल्या गोष्टींचा विचार करावा? हे मुद्दे समाजशास्त्रात फार महत्वाचे असतात. त्यामुळे इभूनाशा सोडून समाजशास्त्रात समाजाचा अभ्यास दोन अंगाने केला जातो. एकाला डेमोग्राफिक दुसऱ्याला सायकोग्राफिक अभ्यास असं म्हणतात. यात व्यक्तींपेक्षा समूहाच्या लक्षणांचा अभ्यास केला जातो.

डेमोग्राफिक अभ्यासात समूहातील व्यक्तींचे वय, लिंग, भाषा, धर्म, शिक्षण, उत्पन्न, आयुष्यमान, जन्म-मृत्यूदर इत्यादी बाबींची नोंद केली जाते. आणि मग त्यावर स्टॅटिस्टिक्सच्या (सांख्यिकी) सहाय्याने संपूर्ण समाजाच्या गरजांबाबत निष्कर्ष काढले जातात. डेमोग्राफिक अभ्यास ही सर्व सरकारांची आत्यंतिक गरज असते. यासाठी दर दहा वर्षांनी सरकार जनगणना करते. त्यानुसार आपली वेगवेगळी धोरणे आखते.

याउलट सायकोग्राफिक अभ्यासात मूल्य, मत, दृष्टिकोन, आवड निवड इत्यादी बाबींची नोंद केली जाते. या अभ्यासाचा उपयोग जाहिराती आणि जनमानसावर प्रभाव पाडण्यासाठी केला जातो.

डेमोग्राफिक अभ्यासात नोंद केली गेलेली लक्षणे तुलनात्मक दृष्ट्या स्थिर असतात आणि बाह्य वातावरणात काही दीर्घकालीन बदल झाले तरंच त्यांच्यात फरक पडतो. पण सायकोग्राफिक अभ्यासात नोंद केली गेलेली लक्षणे मात्र कायम बदलती असू शकतात आणि बाह्य वातावरणातील अल्पकालीन बदलांचाही त्यांच्यावर मोठा परिणाम होत असतो. उदाहरणार्थ, २०१० च्या जनगणनेत भारतातील स्त्री पुरुषांचे गुणोत्तर, शिक्षित अशिक्षितांचे गुणोत्तर, अल्प मध्यम उच्च उत्पन्न गटांचे परस्परांशी असलेले गुणोत्तर आणि २०११ मधील याच मुद्द्यांची उत्तरे फारशी वेगळी नसतील. याउलट २०१० च्या जानेवारीतील भारतीयांची मते, आवडी निवडी, दृष्टिकोन नंतर आलेल्या नवीन तंत्रज्ञानामुळे, नवीन माहितीमुळे, प्रचारामुळे लगेच फेब्रुवारी २०१० मध्ये बदलू शकतात.

थोडक्यात डेमोग्राफिक अभ्यास बऱ्यापैकी स्थिर बाबींची नोंद आणि अभ्यास असतो तर सायकोग्राफिक अभ्यास चंचल मनाची नोंद आणि अभ्यास असतो. परिणामी डेमोग्राफिक अभ्यास दहा वर्षातून एकदा आणि संपूर्ण लोकसंख्येच्या बाबतीत केला जातो. तर सायकोग्राफिक अभ्यास वारंवार करावा लागतो आणि तो संपूर्ण लोकसंख्येच्या बाबतीत करण्याऐवजी लोकसंख्येतील एका नमुना गटाचा (सॅम्पलचा) केला जातो. मग त्यावरून संपूर्ण लोकसंख्येसाठी निष्कर्ष काढले जातात.

हे सगळं २००० सालापूर्वी तंतोतंत लागू होतं. पण एकविसाव्या शतकात फेसबुक आलं. त्यामागोमाग मोबाईल क्रांती झाली. फेसबुकने ग्राफ एपीआय सगळ्या यूजर्ससाठी खुला केला आणि अत्यंत कमी खर्चात सायकोग्राफिक अभ्यास करणे सहजशक्य झाले. आता लोक व्यक्त होत होते, पोस्ट्सना लाईक करत होते, कुठे लव्ह, कुठे हाहा, कुठे अँग्री होत होते. हॅशटॅग वापरून एकेक ट्रेंड चालू करत होते किंवा इतरांनी सुरु केलेल्या हॅशटॅगच्या ट्रेंडमध्ये सामील होत होते. वयोगट तेरापासून ते कायमची शुद्ध हरपेपर्यंतचे अगणित लोक फेसबुकवर आपापल्या मतांची पिंक टाकत होते. प्रायव्हसी सेटिंग्ज देऊन फेसबुकने त्यांना एक आभासी सुरक्षा कवच दिलेलं होतं. पण फेसबुकच्या सर्व्हरवर जमा होणारी ही समाजमनाची प्रतिबिंब कोण बघू शकतं याकडे ना यूजर्सचं लक्ष होतं ना फेसबुकचं.

कुणाला वाटेल की फेसबुकवर व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादामुळे काय फारसा फरक पडेल? तर फक्त असा विचार करा की तुम्ही मुंबईच्या किंवा कुठल्याही महानगराच्या सगळ्यात मोठ्या डम्पिंग ग्राऊंडच्या मध्यभागी उभे आहात. किंवा मग मणिकर्णिका घाटावर उभे आहात. किंवा मग कायम निर्माल्य फेकले जाते अश्या तलावाच्या काठी उभे आहात. किंवा मग सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी नाशकात आहात. किंवा सबरीमालाच्या किंवा हज यात्रेला गेला आहात.

घरोघरी थोडा वाटणारा कचरा डम्पिंग ग्राउंडवर एकत्र आला की त्रासदायक ठरतो. गावोगावी स्मशानात होणारे अंत्यविधी जेव्हा गंगेच्या किनारी एकाच जागी होऊ लागले की ती जागाही भेसूर होते आणि नदीही प्रदूषित होते. घरोघरी जमा होणारे ओंजळीभर निर्माल्य जेव्हा देवस्थानच्या तलावात पडते तेव्हा त्या तलावाला कुजवून टाकते. आपापल्या गावात असेलेले साधू, बाबा, बैरागी आणि भाविक जेव्हा कुंभमेळ्याच्या निमित्ताने एकाच वेळी एकाच ठिकाणी जमतात तेव्हा ते नेहमीपेक्षा जास्त घाण करत नसले तरी एकाजागी एकाच वेळी इतके लोक आल्याने तेथील सांडपाण्याच्या व्यवस्थेवर ताण पडतो. सबरीमाला किंवा हजला इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आल्यावर एक छोटीशी चूकही चेंगराचेंगरीला आणि दुर्घटनेला कारणीभूत होऊ शकते.

मोबाईलक्रांती, इतरत्र गुंतलेले स्पर्धक आणि डेटा सुरक्षेच्या बाबतीत तीस वर्षे जुन्या संकल्पना व तितकेच जुने कायदे असल्याने सामाजिक व कायदेशीर नियंत्रणाचा अभाव आणि व्यक्त होण्याचा मोफत प्लॅटफॉर्म यामुळे अल्पावधीत फेसबुक अभूतपूर्वरीत्या लोकप्रिय झालं. विचारांपेक्षाही आपल्या भावना व्यक्त करायला फेसबुक वापरलं जाऊ लागलं. आणि आपल्याला जरी फेसबुक ही समविचारी मित्र मिळवण्याची सोन्याची खाण वाटली तरी एकाच ठिकाणी जमा होणाऱ्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादांमुळे फेसबुक म्हणजे समाजाच्या भावनांचं डम्पिंग ग्राउंड बनत चाललं होतं. व्यक्तीला उपयुक्त वाटलं तरी समूहासाठी विषारी ठरू शकणारं. एका चुकीमुळे अनेकांची चेंगराचेंगरी करू शकणारं.

जागतिक महायुद्धांचं वर्णन करताना पाठयपुस्तकात एक वाक्य होतं की पहिल्या महायुद्धापूर्वी युरोपची अवस्था दारूगोळ्याने भरलेल्या कोठारासारखी होती. आणि ऑस्ट्रियाचा युवराज आर्च ड्यूक फर्डिनांड याच्या खुनाने त्यावर ठिणगी पडली. त्याच धर्तीवर मी म्हणू शकतो की २०१३ पूर्वी फेसबुकची अवस्था दारुगोळ्याने भरलेल्या कोठारासारखी होती. आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या अलेक्झांडर कोगनने ‘धिस इज युअर लाईफ’ नावाचा एक सर्व्हे फेसबुकवर सुरु केल्याने त्यावर ठिणगी पडली.

अलेक्झांडर कोगन हा जुन्या सोव्हिएत रशियाच्या मोल्डाविया प्रांतात जन्मलेला पण अमेरिकेत आणि हॉंगकॉंगमध्ये मानसशास्त्राचे शिक्षण पूर्ण करून केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर म्हणून काम करत असलेला डेटा सायंटिस्ट आहे. लोकांच्या आवडीनिवडीवरून त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्यांच्या निर्णयांबद्दल अचूक अनुमान काढता येते का? हा त्याच्या अभ्यासाचा विषय आहे. त्यासाठी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने आपल्याकडील डेटा वापरण्यास त्याला परवानगी नाकारली. म्हणून २०१३ मध्ये कोगनने ग्लोबल सायन्स रिसर्च नावाने एक कंपनी सुरु केली. या कंपनीत केम्ब्रिज ऍनालिटिकने पैसे गुंतवले. काम एकंच अमेरिकेतील लोकांचे शक्य तितके डेमोग्राफिक आणि सायकोग्राफिक डिटेल्स गोळा करणे. मग ग्लोबल रिसर्च कंपनीने एक ऍप लॉंच केले. त्याचं नाव ‘धिस इज युअर लाईफ’.

इंटरनेटवर काही कामे “मानवी बुद्धिमत्तेची कामे” म्हणून ओळखली जातात. जसे की एखादे चित्र पोर्नोग्राफिक आहे की नाही? किंवा सर्च रिझल्ट्स मधून इमेल ऍड्रेस शोधणे, वगैरे. अशी कामे जगभरातील फ्री लान्सर्स करत असतात (एका चित्राला / ईमेल ऍड्रेसला १ ते १५ सेंट्स या दराने) या फ्री लान्सर्ससाठी एक अॉनलाईन प्लॅटफॉर्म आहे मेकॅनिकल टर्क. हा प्लॅटफॉर्म ऍमेझॉन कंपनीच्या मालकीचा आहे. ज्यांना काम द्यायचे आहे ते फ्री लान्सर्सना या प्लॅटफॉर्मवर भेटतात. ग्लोबल सायन्स रिसर्चने आपले ‘धिस इज युअर लाईफ’ या मेकॅनिकल टर्कवर लॉन्च केले. त्यात एक छोटा सर्व्हे होता. तुमचं नाव, वय, शहर, अशी जुजबी माहिती त्यात भरायची. फक्त काही अटी होत्या.
  1. तुमचं फेसबुक अकाउंट असलं पाहिजे. 
  2. ‘धिस इज युअर लाईफ’ मध्ये माहिती भरताना तुम्ही तुमचं फेसबुक लॉगिन वापरलं पाहिजे. 
  3. ‘धिस इज युअर लाईफ’ तुमचा जो डेटा फेसबुककडून मागेल तो द्या, अशी मुक्त परवानगी तुम्ही फेसबुकला द्यायला पाहिजे. 
बदल्यात तुम्हाला १ ते ४ डॉलर्स मिळतील.

जेव्हा कुणी फ्री लान्सर हे काम घेत असे तेव्हा त्याचे, त्याच्या मित्रांचे फेसबुकवर जमा झालेले सर्व डिटेल्स ‘धिस इज युअर लाईफ’ ला मिळू लागले. अगदी त्यांनी कशा कशाला लाईक केले आहे पासून ते त्यांच्या मेसेजेसपर्यंत. साधारणपणे एका व्यक्तीला २०१४ मध्ये ३४० मित्र होते असं मानलं तरी एका फॉर्ममधून ‘धिस इज युअर लाईफ’ला ३४१ लोकांचा डेटा त्यांच्या नकळत मिळायला सुरवात झाली. थोडक्यात सांगायचं म्हणजे डेटा चोरीला सुरवात झाली. पण काही युजर्सनी याची तक्रार ऍमेझॉनकडे केली. प्लॅटफॉर्मच्या अटींचा भंग करणारे ऍप म्हणून ऍमेझॉनने ‘धिस इज युअर लाईफ’ला प्लॅटफॉर्मवरून हाकलले.

मग ग्लोबल सायन्स रिसर्चने आपले ऍप सरळ फेसबुकवर लॉन्च केले. आणि अनेक अमेरिकन लोकांनी आपली आपल्या मित्रांची माहिती स्वखुशीने या ऍपला दिली. सर्व्हेत भाग घेणाऱ्या प्रत्येकामुळे त्याच्या मित्रांचीही माहिती त्यांच्या नकळत अगदी सहजगत्या ग्लोबल सायन्स रिसर्चकडे परिणामी केम्ब्रिज ऍनालिटीकाकडे जमा होत होती.

यात फेसबुककडून झालेली मोठी गडबड म्हणजे सुरवातीला केवळ सर्वव्यापी परवानगी दिली की पुढे कुठलीही परवानगी मागण्याची गरज कुठल्याही ऍपला लागत नव्हती. आपण आपल्या कुठल्या डेटाला वापरण्याची परवानगी देतो आहोत याची यूझर्सना अजिबात कल्पना नव्हती, कारण आपला किती डेटा फेसबुककडे जमा झालेला आहे हेदेखील कुणाला माहित नव्हते. जेव्हा फेसबुकला ही गडबड कळली तेव्हा घाईघाईत ग्राफ एपीआय बदलण्यात आला. ग्लोबल सायन्स रिसर्चला तोपर्यंत जमवलेला डेटा डिलीट करण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे डेटा डिलीट केला आहे या कबुलीवर विश्वास ठेवला गेला. पण तोपर्यंत ग्लोबल सायन्स रिसर्चकडे ५ कोटी लोकांचा, त्यांच्या लाईक्ससह इतर सगळा डेटा जमा झाला होता. आणि तो केम्ब्रिज ऍनालिटिकाकडे दिला गेला होता. हा डेटा आम्हीपण डिलीट केला आणि २०१६च्या अमेरिकन निवडणुकीत वापरला नाही असं केम्ब्रिज ऍनालिटिकादेखील म्हणते.

म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवर ऍप काय करत आहेत इथे फेसबुकचे लक्ष नसल्यामुळे डेटाची चोरी झाली;
आपण कुठले ऍप वापरतो आहोत? ते ऍप आपल्याकडे कुठल्या आणि किती प्रकारच्या परवानगी मागते आहे? इथे यूजर्सचे लक्ष नसल्यामुळे डेटाची चोरी झाली; हे तर नक्की आहे.

पण या चोरीमागे उद्देश काय होता? आणि २०१४ मध्ये झालेल्या चोरीबद्दल इतका आरडा ओरडा आता २०१८ मध्ये का होतो आहे? या प्रश्नांची उत्तरे पुढील भागात शोधण्याचा प्रयत्न करूया.

No comments:

Post a Comment