Saturday, November 7, 2020

हरारी आणि आशुतोष

प्रिय आशुतोष,

मागच्या आठवड्यात तुझ्या पोस्टला लगेच उत्तर देता आलं नाही. आज जरा मोकळा झालो म्हणून उशिरा उत्तर देतोय.

हरारी आशादायक चित्र उभं करत नाहीत हे तर निर्विवाद आहे. किंबहुना २०१८ मध्ये न्यू यॉर्क टाइम्सच्या एका कार्यक्रमात हरारी आणि थॉमस फ्रीडमनची संयुक्त मुलाखत होती. त्यात आशावादी राहण्याचा फ्रीडमन साहेबांचा प्रयत्न ज्या सहजतेने हरारी उडवून लावत होते त्यामुळे मी एकाच वेळी आश्चर्यचकित आणि थोडा निराशही झालो होतो. आपल्याला ज्याचे विचार चिंतनीय वाटतात त्याच्याकडून आपल्याला आशावादी राहण्यासाठी जर पाठबळ मिळालं नाही तर होणारं दुःख ती मुलाखत ऐकल्यावर मी जवळपास एक आठवडाभर सहन करत होतो.

त्याआधी २००८ मध्ये मला जॉर्ज कार्लिन हा स्टँडअप कॉमेडियन सापडला होता यूट्यूबवर. त्याचे सगळे व्हिडीओ बघायचा सपाटा लावला होता. पण शेवटी त्याचे life is worth losing आणि it's bad for you हे दोन प्रोग्रॅम्स बघताना मला नकोसं झालं होतं. कारण तेच. मानवजातीबद्दल आत्यंतिक निराशावाद.

अर्थात कार्लीन आणि हरारी या दोघांच्यात तुलना करत नाही मी. कारण एक विनोदाच्या माध्यमातून समाजातील विसंगतींवर बोट ठेवणारा शब्दांचा खेळिया तर दुसरा विचारांशी खेळणारा आणि इतिहास व जीवशास्त्र या दोन विद्याशाखांचा संगम घडवून आणणारा अभ्यासक. तरीही दोघांच्या विचारांतील अंतिम निराशा मला खटकत होती आणि अजूनही खटकते हे अगदी खरं आहे.

अशाप्रकारे त्या बाबतीत मी तुझ्या बरोबर असूनही तू पोस्टमध्ये मांडलेले मुद्दे आणि शेअर केलेल्या लिंकमधील मुद्दे मला पटलेले नाहीत. का?, ते थोडक्यात मांडायचा प्रयत्न करतो. तुझ्या विचारांपेक्षा वेगळा विचार वाचायला तू तयार असतोस म्हणून मी तुझ्या पोस्टबाबत डेव्हिल्स ऍडव्होकेट होतोय.

डेव्हिल्स ऍडव्होकेट मोड ऑन.
१) <<<माणूस कितीही विचारवंत झाला तरी त्याच्या बालपणीच्या श्रद्धा त्याच्या मनात मागे रेंगाळत असतात. तिन्ही अब्राहमीक धर्मांमध्ये जगाचा अंत ही संकल्पना आहे. ..... जगण्याची जोरकस आशा ! साहेब ती देत नाहीत.>>>

बालपणीच्या श्रद्धा आणि हरारींच्या लेखनातील निराशावादी सूर हा मुद्दा मला मान्य आहे. भैरप्पांच्या उत्तरकांड या पुस्तकावरील माझ्या पोस्टमध्ये मीही तो मांडला आहे. पण हरारींनी आपल्या ज्यू धर्मातील धारणांना अनुसरून जगाच्या अंताबद्दल भाकीत वर्तवणे आपल्याला मान्य नसणे हे आपल्या बालपणीच्या संस्कारांचा तर परिणाम नसेल ना? आपल्या हिंदू संस्कृतीत प्रलयानंतर पिंपळाच्या पानावर पायाचा अंगठा चोखत असलेला श्रीकृष्ण हे नवसृजनाचे प्रतीक आहे. आणि कदाचित ते आपल्या मनाच्या तळाशी इतके खोल जाऊन रुजले आहे की आपण त्याला छेद जाणारी कुठलीही कल्पना स्वीकारू शकत नाही. जेव्हा माझ्या डोक्यात असा विचार आला तेव्हा मी हरारी ज्यू धारणांप्रमाणे लिहीत असतील ही शक्यता मान्य करायचं ठरवलं. मग त्यांच्या विचारांची धार्मिक सत्यासत्यता बाजूला ठेवून वास्तव आयुष्यात जीवशास्त्रीय पुराव्यांशी सांगड घालायचा प्रयत्न केला. त्यासाठी माझ्या मनातील बाळकृष्णाला बाजूला ठेवला. तेव्हा मला पृथ्वीवरील कुठल्याही जीवमात्रांशी भावनिक बंध नसलेला निसर्ग दिसतो. पृथ्वीवर आपल्याला माहित असलेल्या प्राण्यांच्या असंख्य प्रजाती माणसाने पृथ्वीचा अनिर्बंध उपभोग घ्यायला सुरवात करायच्या आधी अशाच नष्ट झालेल्या आहेत. पण त्यांच्याबद्दल निसर्ग हळहळ करीत बसलेला आहे असं कुठे जाणवत नाही. त्यामुळे आपल्या मनातील पिंपळपानावरचा बाळकृष्ण बाजूला ठेवला तर हरारींनी मांडलेला जगाचा अंत ही केवळ धर्मकल्पना न वाटता निरीक्षण आणि अनुमान वाटू लागतं.

२) <<< हरारी त्याच्या अलिप्त पावित्र्यामध्ये गंभीर चेहऱ्याने म्हणतो : "करोनाच्या निमित्ताने उघडकीस आलं आहे की जागतिक नेतृत्व नाही ....... त्या नेतृत्वाची ताकतच मुळात केवढी असेल! किती सहज शक्य असेल त्या सत्तेला सगळ्यांनाच गुंडाळणं .>>>

माझ्या मते हरारी इथे नेतृत्व म्हणजे व्यक्तींबद्दल बोलत नसून नेतृत्व या गुणविशेषाबद्दल आणि तो निर्माण करताना आणाव्या लागणाऱ्या व्यवस्थांबद्दल, मूल्यांबद्दल बोलत आहेत. सध्याची राष्ट्र राज्य संकल्पना आणि त्यानुसार तयार झालेली मूल्यव्यवस्था जागतिक अरिष्टांसाठी अपुरी आहे असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला जाणवला. जर नवी मूल्यव्यवस्था आणि त्याप्रमाणे संस्थात्मक व्यवस्था निर्माण केली तर तू म्हणतोस त्याप्रमाणे हुकूमशाही नेतृत्व तयार होणार नाही. अर्थात हे होणे नजीकच्या काळात शक्य नाही त्यामुळे हरारींचा सूर निराश होणे अगदी स्वाभाविक आहे. सध्याच्या मूल्यव्यवस्था आणि शासनव्यवस्था तशाच ठेवून जर आपण जागतिक नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न करणार असू तर तू म्हणतोस त्याप्रमाणे हुकूमशहा तयार होणे अटळ आहे. पण सर्व बाबींचा सूक्ष्म विचार करून मत मांडणारे हरारी या बाबतीत वरवरचा विचार करून सार्वजनिक व्यासपीठावर मत मांडतील असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या मनातील जागतिक नेतृत्व हे नव्या मूल्यव्यवस्था आणि संस्थांही उभ्या कराव्या लागतील या गृहितकावर आधारित आहेत असं मला वाटलं. किंबहुना इथे मला ज्यू हरारी चक्क हिंदूंची वसुधैव कुटुंबकम् ही संकल्पना जागतिक नेतृत्व उभं करण्यासाठी महत्वाची आहे असं मांडताहेत असं वाटलं.

३)<<<सध्या हरारी नेत्यानाहू सरकारवर सारखा टीका करतो. नेत्यानाहूच्या तरुण मुलाने त्याला ट्विटरवरती झोडलंही. अनेक विचारवंत बघता बघता अलगद ट्रॅपमध्ये अडकून किंवा स्वखुशीने अशा आडपडद्याच्या राजकारणात उतरतात. .... का तो विचारवंतांच्या स्वधर्माला जागतो आहे ?>>>

हरारी आपल्या मतासाठी जर समाजमाध्यमांवर सक्रिय असेल तर त्यामुळे त्याच्या मतांचं महत्व कमी न होता उलट ते अजून वाढतं. हरारी पैसे घेऊन इतरांच्या उद्दिष्टाला साजेशी लोकभावना तयार करण्याचे कारस्थान करत असेल हा आरोप मला मान्य करायला कठीण वाटतो. पण एका क्षणासाठी तो खरा आहे असं मानलं तरीही केवळ त्याने सुपारी घेऊन असे लेख लिहिले असं मान्य केलं तरीही त्याच्या लेखात त्याने मांडलेल्या मुद्द्यांत तथ्य आहे की नाही हे शोधणे आणि ते नसल्यास तसे हरारींच्या निर्विकारपणे मांडणे हे हरारी विरोधकांचे कर्तव्य आहे. त्याने सुपारी घेऊन असं लिखाण केलं असेल असं म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

तू जो लेख शेअर केला आहेस, तो मी वाचला. पण त्यातही मला आशावादी राहण्याची आपली मानसिक गरज पूर्ण करण्याची धडपड जास्त जाणवली. आपण आशावादी राहणं ही आपली गरज आहे, निसर्गाची नाही हे मी आता मान्य केलं आहे. किंबहुना आपण आशावादी आहोत ही देखील निसर्गाची आपोआप तयार झालेली एक गुंतागुंत आहे हेही मला मान्य आहे. कदाचित निसर्गाने दिलेल्या या आशावादाच्या बळावरच आपण किंवा आपल्या भावी पिढ्यांतील कुणी वंशज प्रलयानंतरच्या पाण्यावर तरंगणाऱ्या पिंपळपानावरच्या श्रीकृष्णाला पाहू शकणार आहेत ही शक्यताही मला मान्य आहे. पण म्हणून पृथ्वीपासून दूर दहाहजार किलोमीटरवर असलेल्या यानातून पृथ्वीकडे निर्विकारपणे बघत इथल्या सजीवांचा इतिहास आणि भविष्य सांगण्याची हरारींनी विकसित केलेली विचारपद्धती नाकारून काहीच फायदा नाही. किंबहुना त्यामुळेच आपण येणारे संभाव्य धोके लवकर ओळखून त्यावर उपाय शोधून जगाचा अंत टाळू शकतो. असं मला वाटतं.

डेव्हिल्स ऍडव्होकेट मोड ऑफ.

माझ्या पोस्टच्या सुरवातीला मी हरारींच्या एका मुलाखतीचा उल्लेख केला आहे. ती खाली देतो. 

थोडी निराशाजनक आहे. पण फ्रीडमन साहेबांनी ज्या पद्धतीने आशावादाचा किल्ला लढवला आहे ते मला फार आवडलं आहे. आणि शेवटी त्यावरची हरारींची प्रतिक्रयाही मला आवडली आहे. मुलाखत थोडी मोठी आहे (साधारण सव्वा तास). त्यामुळे तुला मोकळा वेळ असेल तेव्हा बघ.

गब्बर सिंग

सोसायटीत दहा मजले. प्रत्येक मजल्यावर चार बिऱ्हाडं. कमिटीने ठरवलं की रोज सकाळी प्रत्येक मजला निर्जंतुक करण्यासाठी डेटॉल वापरून लिफ्ट, जिन्याची रेलिंग्ज आणि लादी साफ करायची. प्रत्येक घरावर आळीपाळीने आपापल्या मजल्याची जबाबदारी. 

रोज कोणी ना कोणी सोसायटीच्या ग्रुपवर आपापला मजला स्वच्छ केल्याचा मेसेज टाकायचा. मी तेव्हा लेक्चर्स घेत असल्याने मला या स्वच्छतासंग्रामात भाग घेऊन मर्दुमकी दाखवण्याची संधी मिळत नव्हती. 

आज रविवार. लेक्चर्स नसल्याने सकाळी मला मोकळा वेळ होता. म्हणून मी कालच ग्रुपवर मेसेज टाकला होता की रविवारी सकाळी आमचा मजला मी स्वच्छ करणार. माझा स्वभावच तसा आहे. इतर कुणी काम केलं की मलाही करावंसं वाटतं. 

पण नेमकी मी काल सेंटर टेबलच्या अवस्थेची पोस्ट इथे फेसबुकवर टाकली. आणि आज सकाळी बघतो तर काय! 

माझे तीनही शेजारी दारात उभे.. त्यांच्या चेहर्‍यावर विलक्षण ताण. हा बाबा साफ करणार म्हणजे काय तोडणार असे भाव स्पष्टपणे वाचता येत होते. 

मी फ्लोरिंगवर मॉप चालवायला घेतला तर प्रत्येकाने आपापल्या चपला उचलून चटकन घरात घेतल्या. मी रेलिंग्ज साफ करायला गेलो सगळे आपापल्या घराच्या उंबरठ्यावर टाचा उंचावून मी रेलिंग्ज वाकवतो की काय ते बघू लागले. आणि जेव्हा मी लिफ्टची बटणं पुसायला सुरवात केली तेव्हा तर सगळेजण उंबरठ्यावर न आखलेली लक्ष्मणरेषा ओलांडून लिफ्टच्या दाराजवळ उभे राहिले. 'सावकाश.. हळू... आरामात... जोर नका लावू' अशा उद्गारांचा एकंच गलबला झाला. मी लिफ्टमधून बाहेर आलो आणि बघितलं तर बाहेरच्या विस्कळीत गर्दीत नवव्या आणि दहाव्या मजल्यावरचे लोक, माझ्या जड असलेल्या हातानं एकदाचं नाजूक काम केलं आणि त्यांच्या पुढील पंधरा दिवसांच्या आयुष्यात जिने चढ उतार करायला न लावल्याबद्दल साश्रू नयनांनी माझं कौतुक करत होते. एकदोघांनी तर फक्त लोटांगण घालणंच बाकी ठेवलं होतं. 

मला एकदम गब्बर सिंग असल्याचा फील आला. 

Saturday, April 11, 2020

हुकमी एक्का

सकाळी झाडू मारत होतो. बायको कौतुकाने माझ्याकडे बघत होती. आई माझ्याकडे काळजीयुक्त वात्सल्याने आणि कौतुकाने बघत होती. सासरे माझ्याकडे विजयी वात्सल्याने आणि स्वतःच्या लेकीकडे कौतुकाने बघत होते.

चार चाकं असलेलं काचेचं सेंटर टेबल मी जोरात सरकवलं. कडाडकड असा आवाज आला. घरातल्या दशदिशा दुमदुमल्या. सगळे चपापले. व्हिडिओ गेम खेळणारा धाकटा लेक दचकला आणि गेममधला त्याचा सैनिक गतप्राण झाला. व्हॉटस अॅपवर चॅटिंग करत असलेला मोठा लेकही दचकला. चुकून त्याने भलतीच स्मायली चॅटवर पाठवली असावी. कारण नंतर त्याच्या तोंडून चक् चक् असा विषाददर्शक उद्गार आला आणि एकाएकी त्याची फोनवरची धावपळ वाढली.

ज्याची भीती होती तेच झालं. माझ्या डौलदार सेंटर टेबलच्या चार चाकांपैकी एक चाक मोडून पडलं होतं. आणि शिवधनुष्य मोडून सीतेकडे प्रेमाने पहाणार्‍या विजयी रामाऐवजी, ते छातीवर पडलेल्या पराभूत रावणासारखा चेहरा करून उभा राहिलो. (रामायण बघण्याचे अप्रत्यक्ष फायदे होतात ते असे)

बायकोच्या चेहऱ्यावरील कौतुक मावळून तिथे क्रोधाग्नी प्रकटला. आईच्या चेहर्‍यावरील कौतुक मावळून तिथे काळजी आणि चिंतेने घर केलं. सासऱ्यांच्या चेहऱ्यावरील विजयी कौतुकाची भावना जाऊन तिथे 'तरी मला वाटलंच होतं की याच्यापेक्षा चांगला मुलगा मी माझ्या राजकुमारीला नवरा म्हणून शोधून दिला असता. पण काय करणार माझ्या छोट्या परीला हाच गडबड्या आवडला' असे भाव आले.

आणि एकाएकी मला जाणवलं की वॉशिंग मशीन, कपडे वाळत घालण्याच्या दोऱ्या वरखाली करुन देणं, भांडी घासणं, केर काढणं आणि लादी पुसणं यातल्या कित्येक कामांपासून सुटका करून घेण्याचा हुकमी एक्का माझ्या हाती लागला आहे. आता विजयी हास्य करायची पाळी माझी होती.

हरारी, कोरोना आणि कायद्याचा अर्थ

सकाळी अमेय गोखलेनी चॅनेल 4 या ब्रिटिश टिव्ही कंपनीच्या, एक आठवड्यापूर्वीच्या एका कार्यक्रमाची लिंक फेसबुकवर शेअर केली होती. कोरोनाच्या निमित्ताने युआल नोहा हरारींच्या मुलाखतीची ती लिंक होती. हरारींनी मांडलेले मुद्दे मला महत्वाचे वाटले. 



1) कोरोनाच्या काळात आपण कुठले निर्णय घेतो त्यावर आपलं पुढील जग कसं असेल ते ठरेल.
2) सध्या सर्व गोष्टींचा वेग अचानकपणे आत्यंतिक प्रमाणात वाढला आहे. ज्या गोष्टींवर वीस वीस वर्षे केवळ चर्चा होत होती त्या गोष्टी आता एकेका आठवड्यात अमलात आणल्या जात आहेत.
3) यातून बाहेर पडण्यासाठी सरकारे सर्वाधिकार आपल्याकडे घेऊ शकतात किंवा नागरिकांना अधिकार देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतात.
4) नागरी स्वातंत्र्याचा संकोच इतक्या सहजपणे करता आला आहे, तर सरकारे हे नियंत्रण सहजासहजी आणि चटकन सोडणार नाहीत.
5) अशा साथीच्या रोगात आपल्याला आवश्यक असलेलं जागतिक नेतृत्व आपल्याकडे नाही. आपल्याकडे उपलब्ध असलेलं नेतृत्व देशपातळीवरील आहे.
6) आताच्या देशपातळीवरील नेतृत्वाने कात टाकून जरी जागतिक जबाबदारी घेण्याचा प्रयत्न केला तरी इतर देशांना त्याबद्दल विश्वास वाटणार नाही. त्यामुळे जागतिक नेतृत्वाची आत्यंतिक गरज असूनही ते नजीकच्या भविष्यात उपलब्ध होणार नाही.
7)सर्व देशातील राजकीय नेतृत्व आपल्या संपूर्ण देशाचं नेतृत्व न करता त्यातील एका गटाचं नेतृत्व करतात. साधारण राजकीय आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी ही बहुमताची व्यवस्था कामाला येऊ शकते पण साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी बहुमताची नसून सर्वांच्या एकमताची गरज आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी आपला गट - विरोधी गट अशी मांडणी करणं थांबवलं पाहिजे.

मुलाखत संपवली आणि वर्गात गेलो. आज इंटरप्रिटेशन अॉफ स्टॅच्यूट्स (कायद्यांचा अर्थ कसा लावावा) हा विषय होता. त्यात एक महत्त्वाचा मुद्दा येतो की कायद्याचा अर्थ लावताना न्यायाधीशाने कायद्यात नसलेले शब्द किंवा कलमे स्वतः घालू नये आणि असलेले शब्द किंवा कलमे स्वतःहून गाळू नयेत. न्यायाधीशाचं काम दिलेल्या कायद्याचा अर्थ लावणं आहे, कायदा बनवणं नाही. कायदा बनवण्याचं काम संसदेचं आहे.

मुलांनी विचारलं, 'न्यायाधीशांनी जर न्यायशास्त्राचं शिक्षण घेतलेलं आहे तर ते निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींपेक्षा अधिक ज्ञानी आहेत. मग कायद्यातील त्रुटी दूर करण्याचं किंवा कायदा बनवण्याचं काम न्यायाधीशांना न देता, कायद्याची जुजबी किंवा काहीच माहिती नसलेल्या त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतलेल्या लोकप्रतिनिधींना का दिलं आहे?'

त्यांना उत्तर देताना म्हणालो,
'कायदा म्हणजे समाजाला वळण देण्याचं शास्त्र आहे. हे गणित किंवा भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा खगोलशास्त्राप्रमाणे नैसर्गिक विज्ञान नाही.

नैसर्गिक विज्ञानात बहुमत आणि तज्ज्ञ यांच्या तुलनेत बहुमतापेक्षा तज्ज्ञांचं पारडं कायम जड असतं. संपूर्ण मानवजात जरी पृथ्वीभोवती विश्व फिरत आहे असं म्हणत असली तरी पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी नसून ती सूर्याभोवती फिरते हे सांगणारा एकटा कोपर्निकस बरोबर असतो. म्हणजे नैसर्गिक शास्त्रात बहुमताकडे दुर्लक्ष केल्याने समाजाचं नुकसान होईलंच याची खात्री नसते; झालाच तर फायदा होणार असतो.

याउलट सामाजिक शास्त्रांत मागील परंपरांना वळण देत भविष्य साकारायचे असते. त्यामुळे मागील परंपरांना, चालीरीतींना. रितीरिवाजांना, मान्यतांना. धारणांना धक्का लावताना फार काळजी घ्यावी लागते. तशी घेतली नाही तर लोकांना कायदा पाळावासा वाटत नाही. तो कागदावरच रहातो परिणामी शेवटी संपूर्ण समाज कागदोपत्री गुन्हेगार ठरु शकतो आणि भ्रष्टाचाराला मोकळं कुरण मिळतं. त्यामुळे कायदा तयार करताना न्यायशास्त्रातील एका तज्ज्ञाऐवजी लोकांतून आलेली शंभर डोकी डोकी असतील तर अतिशय आदर्श पण सामाजिक वास्तवापासून दूर असलेली व्यवस्था न बनता कदाचित कमी आदर्श पण लोकांच्या धारणांतून तयार झालेली व्यवस्था बनू शकते. आणि अशी व्यवस्था जास्त प्रमाणात अंगिकारली जाऊ शकते. कालांतराने तिच्यात पुन्हा बदल करून तिला अजून आदर्शवत करता येऊ शकते.

म्हणजे सामाजिक शास्त्रांचा उद्देश नैसर्गिक सत्याची प्रतिष्ठापना नसून सामाजिक सलोख्यातून समाजोन्नती असा असतो. नैसर्गिक शास्त्रे सत्य प्रस्थापित करुन पुढे जात असतात. याउलट सामाजिक शास्त्रे सत्य पुढे ठेवून आता त्याला गाठण्यासाठी महामार्ग तयार करत असतात.

त्यामुळे सामाजिक शास्त्रांचे नियम बनवताना एका तज्ज्ञापेक्षा अनेक साधारण लोकांच्या मतांना जास्त किंमत असते.'

मुलांचं शंकानिरसन झालं. मी पुढे शिकवत राहिलो. पण सकाळी ऐकलेली हरारांची मुलाखत डोक्यात होती. त्यातला समाजातील बदलांची गती वाढण्याचा आणि एका गटाचं नेतृत्व करत संपूर्ण समाजावर आपली मतं लादणाऱ्या कोत्या नेतृत्वाचा मुद्दा, मी मुलांना दिलेल्या उत्तराबरोबर खेळू लागला.

आणि मनात विचार आला की भविष्यात व्यवस्था आणि नेतृत्व कसं असावं याचा निर्णय सामाजिक शास्त्रांचा भाग असूनही आता कदाचित तो नैसर्गिक शास्त्रांपणे बहुमताऐवजी तज्ज्ञांकडे सोपवणं अधिक योग्य ठरेल का?

भैरप्पांचं उत्तरकांड आणि माझं रामायण (भाग २)


रामकथा भारतीय उपखंडात पसरलेली आहे. वेगवेगळ्या प्रदेशात तिची वेगवेगळी रूपं दिसतात आणि लोककथांतही तिची अनेक उपकथानकं सापडतात. आता जरी मला आठवत नसलं तरी आई सांगते की लहानपणी रोज रात्री बाबांच्या मांडीवर झोपताना गोष्ट सांगायचा हट्ट करायचो आणि त्यात जेव्हा श्रावणबाळाची गोष्ट यायची तेव्हा हमखास रडत रडत झोपी जायचो. मला खात्री आहे की दूरदर्शन आणि मनोरंजनाची अन्य साधने नसलेल्या अनेक शतकांत भारतीय उपखंडातील अनेक पालकांना रामायणाने हात दिला आहे आणि आपापल्या लेकरांचा किंवा नातवंडांचा, गोष्टींचा हट्ट पुरा करण्यात मदत केली आहे. अर्थात यामुळे प्रत्येक घरात रामकथेत भर पडत गेली असावी.

जितकी प्रसिद्ध रामायणे आहेत आणि रामाच्या बाबतीत जितक्या लोककथा आहेत त्या सगळ्या वाचणं मला शक्य नाही. तसेच देशोदेशींच्या पुराणकथांत मला रस असला तरी त्यात माझा व्यासंग नाही. पण जितकं तोडकंमोडकं वाचन मी केलेलं आहे त्यावरून मला जाणवलं आहे की प्रत्येक समूहाच्या पुराणकथांतून त्या समूहाच्या मान्यतांचा आणि संकल्पनांचा अंतःप्रवाह वाहात असतो. आणि जसजशा त्या कथा लोकप्रिय होऊ लागतात तसतसे हे अंतःप्रवाह अजून ठळक होऊ लागतात.

नियती ही जागतिक संकल्पना आहे. त्यामुळे जगातील सर्व पुराणकथांत नियती आपलं अस्तित्व दाखवत असते. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील घटना या नियतीच्या अदृश्य धाग्याने बांधलेल्या असतात ही कल्पना आपल्याला अनाकलनीय आयुष्यात आधार देत असते. पण नियती ही शक्ती सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यातील सर्वसामान्य प्रसंगांना उलगडण्यासाठी इतरांपेक्षा अधिक समर्पकपणे केवळ भारतीय परंपरेने वापरली आहे. कारण आपण नियती नामक शक्तीला कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म या दोन चाकांवर चालणाऱ्या व्यवस्थेत बसवले आहे. त्यामुळे आपल्याकडे नियतीबरोबर प्राक्तन नावाची अजून एक संकल्पना तयार होते.

संस्कृती म्हणजे जीवनपद्धती मानली तर धर्म म्हणजे संस्कृती निर्माण करण्यारी व्यवस्था आहे असं मला वाटतं. धर्म साधारणपणे दोन प्रश्नांचं उत्तर देतो. 'एखादी गोष्ट अशी का घडली?' आणि 'कुणी कसं वागावं?'

पाश्चात्य जगात अनेक संस्कृती नांदत होत्या पण त्या सर्वांना मध्यपूर्वेत जन्म घेतलेल्या तीन अब्राहमिक धर्मानी गिळून टाकले आहे. त्यामुळे त्या मृत संस्कृतीतील पुराणकथांतून या दोन प्रश्नांची जी उत्तरे मिळतात ती आता निरुपयोगी ठरली आहेत. अब्राहमिक धर्मात 'एखादी गोष्ट अशी का घडली?' याचं उत्तर 'नियती किंवा परमेश्वराची इच्छा' असं दिलं जातं. तर 'कुणी कसं वागावं?' याचं उत्तर 'देवाबरोबर केलेला करार'असं दिलं जातं. त्यामुळे तुमच्या नियतीचे शिल्पकार तुम्ही नसता. तुमची नियती अशी का आहे? या प्रश्नालाही उत्तर कायम 'देवाची इच्छा' इतकंच असतं. प्राप्त नियतीला स्वीकारून तुम्ही कराराचं पालन करणं इतकंच तुमच्या हातात असतं. आणि तुम्ही ते व्यवस्थितरित्या केलेलं आहे की नाही याचा निर्णय अंतिम निवाड्याच्या दिवशी केला जाणार असतो.

या अंतःप्रवाहामुळे माणसे चांगली किंवा वाईट वागतात. अवतार वगैरेची भानगड नसते. माणूस आणि देव असा सरळसोट मामला असतो. माणसे देवाशी नवा करार करू शकतात. माणसे स्वतःला प्रेषित घोषित करू शकतात. आणि इतर माणसे त्याला खोटं ठरवू शकतात. अनेक तोतये प्रेषित तयार होतात. एखादा प्रेषित समाजमान्य व्हायला त्याची हयात उलटून जावी लागते. प्रेषिताला त्याच्या हयातीत विरोधकांकडून आणि अनुयायांकडूनही त्रास भोगावा लागतो. त्याचं कारणही परमेश्वराची इच्छा इतकंच असतं.

प्रेषिताला जे अनुयायी मिळालेले असतात त्यांच्या सामाजिक स्थानावरून प्रेषिताचा संदेश बहुसंख्यांना मान्य होणार की नाही ते ठरते. लोक जुना प्रेषित सोडून नवा प्रेषित घेऊ शकतात. जुन्या प्रेषिताला मानणारे आणि नव्या प्रेषिताला मानणारे अश्या अनेक सरळ रेषा समाजात तयार होतात. ग्रंथप्रामाण्य वाढते. प्रेषिताचं आयुष्य आदर्श मानल्यामुळे त्याच्यासारखं वागण्याची जबाबदारी इतरांवर येते. पण या सर्वांहून सर्वात महत्वाचं म्हणजे म्हणजे प्रेषिताच्या आयुष्यातील प्रसंगांची जबाबदारी प्रेषितांवर पडते. त्यामुळे ते प्रसंग जर सद्यकाळाशी सुसंगत असतील तर त्यांचा उदोउदो होत राहातो. आणि विसंगत असतील पण प्रचलित इतिहासातून त्यांना वगळणं अशक्य असेल तर त्यांचं दुबळं समर्थन केलं जातं किंवा मग त्याबद्दल मौन बाळगलं जातं. त्यामुळे प्रेषितांच्या मागे कदाचित थोड्या वेगळ्या रेषेत चालणाऱ्या लोकांचा समूह तयार होतो. पण प्रेषितापासून कितीही तिरक्या कोनात चालले तरी सगळे प्रेषितांच्या मागे चालणारे असतात. समांतर चालणारे कुणीच नाही.

याउलट भारतात मात्र एकाच वेळी अनेक संस्कृती नांदत होत्या आणि इथेच अनेक धर्मांचा जन्मही झाला. इथे जन्म झालेल्या प्रमुख धर्मांपैकी शीख धर्म सोडल्यास इतर प्रत्येक धर्माने या दोन प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न जरी वेगवेगळ्या प्रकारे केला असला तरी त्या सर्व धर्मात एक सूत्र समान दिसतं की त्यांनी 'एखादी गोष्ट अशी का घडली?' आणि 'कुणी कसं वागावं?' या दोन्ही प्रश्नांना एकत्र गुंफलं आहे. आत्मा न मानणारा बौद्ध धर्म असो किंवा आत्मा मानणारा जैन धर्म असो किंवा मग अनेकेश्वरवाद आणि आपापल्या पूर्वजपरंपरा जपणाऱ्या पुराणप्रिय लोकांचा इतरांनी नाव दिलेला हिंदू धर्म असो. या सर्वात पुनर्जन्म आणि कर्मसिद्धांत यांना नियतीबरोबर महत्व आहे.

त्यामुळे 'एखादी गोष्ट अशी का घडली?' याचं उत्तर नियती असलं तरी 'कुणी कसं वागावं?' याचं उत्तर मात्र 'या जन्मीच्या उत्तम कर्माचं फळ पुढील जन्मात मिळणार आहे.त्यामुळे पुढील जन्म हीनयोनीत न होता उत्तमयोनीत मिळावा आणि त्या जीवनात सर्व सुखे मिळावीत म्हणून तुम्हाला धर्म सांगेल त्या पद्धतीने वागणं आवश्यक होतं. या पद्धतीने तुम्ही या जीवनातील तुमच्या सुखदुःखांचे शिल्पकार नसलात तरी पुढील जन्मातील सुखदुःखांचे शिल्पकार असता. त्यामुळे तुमच्या पुनर्जन्मातील सुखदुःखाची जबाबदारी तुमच्या या जन्मातील कृत्यांवर सोपवून आपल्या भूमीत जन्माला आलेले तीनही प्रमुख धर्म मोकळे झालेले आहेत.

अश्या प्रकारच्या व्यवस्थेत प्रेषिताचा जन्म होण्याची गरजच संपून जाते. देवाशी करार करण्याचीही आवश्यकता नाही. मग आदर्श जीवन कसे जगावे ते सांगण्यासाठी जैन आणि बौद्ध धर्म सोडल्यास इतर भारतीय लोकांना मान्य असणाऱ्या, पूर्वजपरंपरा मानणाऱ्या लोकांच्या धर्मात पुरुषोत्तम स्वरूपात अवतार घेण्याची जबाबदारी प्रत्यक्ष देवावर येते. आणि मग अधर्माचा प्रभाव वाढू लागला की विविध युगात परमेश्वर अवतार घेतो.

परमेश्वराच्या त्या अवताराचे आयुष्य हा अनेकांसाठी आदर्श ठरते पण त्याचे अनुकरण करणे मात्र अपेक्षित नसते. जे प्रत्यक्ष परमेश्वराने अधर्माचा नायनाट करण्यासाठी घेतलेल्या अवतारात केलं ते आता मी करायची गरज नसते. मी आपला माझ्या पुढील जन्मातील सुखांची बेगमी करण्यात स्वतःला गुंगवून ठेवू शकतो. अश्या प्रकारे आदर्श आणि त्याला मानणारे यांची आयुष्ये एकमेकांना समांतर चालत राहतात. लोक देवाची आणि त्याची अवताराची पूजा करतात पण त्याचे अनुकरण करत नाहीत. त्याच्या गोष्टी पिढ्यानपिढ्या सांगत राहतात पण त्या कथाकथनाचा उद्देश मात्र केवळ भक्ती वाढावी, नम्रता अंगी यावी, आणि पूर्वजपरंपरा चालत राहावी इतकाच असतो.

या पूर्वजपरंपराअनुयायी धर्मात इथपर्यंत सर्व काही ठीक असतं. पण एकदा का अवतार संकल्पना आली की 'तूच आहेस तुझ्या पुढल्या जन्माचा शिल्पकार' या मान्यतेला सुरुंग लागतो. कारण या अवताराला त्याच्या आयुष्यात जे दुःख भोगावे लागते त्याचं कारण म्हणून त्याच्या पूर्वजन्मातील कृत्यांची कारणपरंपरा सांगता येत नाही. अवताराला पूर्वजन्म आणि पुनर्जन्म नसल्याने त्याला कर्मसिद्धांत लागू होत नाही. त्यामुळे मग अवताराला दुःख का भोगावं लागलं? आणि अवताराने चांगलं का वागावं? यांची उत्तरं देणं कठीण होऊन जातं.

'अवताराने चांगलं का वागावं?' यासाठी धर्मसंस्थापना असा उद्देश पुढे ठेवला की काम सोपं होतं. पण अवताराला दुःख का सहन करावं लागलं? या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण होऊन बसतं. म्हणून मग शाप संकल्पना वापरली जाते. मग श्रावणबाळ येतो. शब्दवेधी बाण येतो आणि शेवटी पुत्रवियोग येतो.

अश्या प्रकारे सर्वसामान्य माणसांचे प्राक्तन त्यांच्या पूर्वजन्मावरुन ठरते याउलट अवतारांचे प्राक्तन त्यांना किंवा त्यांच्या जवळच्यांना मिळालेल्या शापावरून ठरते.

अर्थात भारतीय पुराणकथांत आणि अब्राहमिक धर्मांच्या पुराणकथांत एक समान धागा असतो की, चरित्रनायकाच्या आयुष्यातील कथांचे पूर्ण कार्यकारणभाव दिले आणि त्यांच्या भावभावनांचे चित्रण केले तरी त्यांच्याबरोबरच्या लोकांचे भावविश्व् आणि त्यांची झालेली फरफट याबद्दल सर्व पुराणकथा मौन बाळगतात. त्यामुळे कौसल्या, लक्ष्मण, सीता, तारा, मंदोदरी, कुंभकर्ण, इंद्रजीत या सगळ्यांचे भावविश्व् आपल्यासमोर लोकप्रिय ग्रंथातून येत नाही. त्याचप्रमाणे येशूची आई मेरी किंवा पिता जोसेफ किंवा प्रेषित मुहम्मदांची अल्पवयीन पत्नी आयेषाचे भावविश्व् तितक्याच बारकाईने आपल्या समोर येत नाही. अब्राहमिक धर्मात ग्रंथप्रामाण्य असल्याने त्यात लोककथांना फार स्थान नाही. याउलट आपल्याकडे ग्रंथप्रामाण्य नसल्याने लोककथांनी अनेक प्रक्षेप मूळ कथेत घुसडले आहेत.

अब्राहमिक धर्मात प्रेषितांच्या हातून घडलेल्या चुकांबद्दलही परमेश्वराची इच्छा हे स्पष्टीकरण देता येते. प्राक्तनाची झंझट नसल्याने, प्रेषित प्रवृत्तीप्रवण असूनही ते नियतीशरण दाखवता येतात. पण अवतारी पुरुषांच्या आयुष्यातील चमत्कारांचे आवरण बाजूला काढून त्यांच्या आयुष्यातील कार्यकारणभाव उलगडणे अतिशय कर्मकठीण असते. कारण इथला समाज आता नियतीशरण आहे. प्राक्तन आता आपल्या नेणिवांचा भाग झालेले आहे. इथला समाज आपल्या पूर्वजन्मातील कर्मफळांना भोगण्यास तयार आहे. त्या समाजाचा आदर्श आता नियतीशरण दाखवावा की प्रवृत्तीप्रवण दाखवावा? ही मोठी गुंतागुंत आहे. त्याला प्रवृत्तीप्रवण दाखवणे आवश्यक आहे. कारण तो धर्मसंस्थापना करण्यासाठी आलेला आहे. पण त्याला नियतीशरण दाखवणे अशक्य आहे. शाप उ:शाप कल्पना वापरून आपण फारतर त्यांनी भोगलेल्या दु:खाचं स्पष्टीकरण देऊ शकतो. पण त्यांनी जवळच्या व्यक्तींवर आणि संपूर्ण समाजावर केलेल्या अन्यायाचं समर्थन करणं अशक्य असतं. म्हणून अवतारी पुरुषांचे सगळे वर्तन दैवी ठरवून आपण त्याला योग्यायोग्यतेच्या कसोट्या लावणं टाळतो.

अश्या वेळी जेव्हा भैरप्पा सीतेच्या दृष्टिकोनातून चमत्कार बाजूला करून रामकथा सांगायचा प्रयत्न करतात, आणि त्यांच्या डोळ्यासमोर सध्याचे सत्ताधारी असतात तेव्हा पूर्ण पुस्तक वाचताना अजून नवनवीन प्रश्न पडत जातात. किंबहुना, हे प्रश्न भैरप्पांना पडले नाहीत का? आणि त्यांना उत्तरे देणे त्यांना महत्वाचे का वाटले नसावे? हा प्रश्न सतत पडत राहतो.

लक्ष्मण, वसिष्ठ, सीता, गुहराजा, सुमंत या सगळ्यांबरोबर राम ज्या वेळी चर्चा करतो तेव्हा तो सारासार विचार करणारा राजा न वाटता; एककल्ली, हेकेखोर आणि बेजबाबदार राजपुत्र वाटतो. आपल्या निर्णयांचा सीतेवर, लक्ष्मणावर, कौसल्येवर, दशरथावर काय परिणाम होईल त्याचा विचार तर सोडाच पण आपल्या निर्णयाचा प्रजेवर, राज्यावर काय परिणाम होईल याचाही विचार करू न शकणारा, प्रजेला भ्रष्टाचार करु शकणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हातात सोडणारा आणि प्रजेला साठेबाजीच्या व करचुकवेगिरीच्या सवयींकडे ढकलणारा राजा म्हणून समोर येतो. वनवासाहून परत आल्यावर तो अयोध्येच्या राज्यकारभाराची घडी पूर्ववत करू शकत नाही. ते करण्यासाठी भैरप्पा शेवटी लक्ष्मणालाच पुढे आणतात आणि राम एकांतवासात दु:खी आहे असं दाखवतात. त्याचा शेवटही एकाकी करून दाखवतात.

वडिलांचा शब्द खाली पडू नये आणि राज्यलोभी असा शिक्का आपल्यावर पडू नये म्हणून भैरप्पांचा राम अन्य सर्व आप्तस्वकीयांना, प्रजाजनांना आणि राज्याला ज्या गर्तेत ढकलतो ते बघून रामचरित्र वापरून सध्याच्या पंतप्रधानांच्या कठोर निर्णयांचं समर्थन करण्याचा भैरप्पांचा प्रयत्न असला तर तो किमान माझ्यासारख्या वाचकांपुरता तरी साफ फसला आहे.

रामकथा माझ्या जीवनाचा भाग आहे. लहानपणी अंधारातून जाताना वाटणारी भीती मी रामरक्षा म्हणत पळवून लावलेली आहे. अजूनही कधी देवळात गेलो तर 'ध्यात्वा नीलोत्पल श्यामं रामं राजीवलोचनं' अशी ती राममूर्ती पाहून माझे हात पूर्वसंस्कारामुळे आपोआप जोडले जातात. पण रामाच्या राजकीय आयुष्यातील कुठल्या भागाचा आदर्श सध्याच्या किंवा कुठल्याही काळातील राज्यकर्त्यांनी घ्यावा ? या प्रश्नाचं माझ्यासाठीच उत्तर तरी एकाही भागाचा आदर्श घेऊ नये असंच आहे. आणि भैरप्पांच्या उत्तरकांडाने ते अधोरेखित केलं आहे.

समाप्त

भैरप्पांचं उत्तरकांड आणि माझं रामायण (भाग १)


लेक्चर संपवून बाहेर आलो. फेसबुकवर फेरफटका मारला. सरकारने रामायण सिरीयल पुन्हा दाखवायचं ठरवल्याचं कळलं. आणि लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.

दर रविवारी सकाळी कराटेच्या क्लासवरून लगबगीने घरी जायचं. कारण रामायणाचा एपिसोड बघायचा असायचा. ते 'सीता राम चरित अति पावन' सुरु होत असताना आम्ही चाळीच्या जवळपास पोहोचलेलो असू. घराघरातून त्या शीर्षक गीताचे सूर येऊ लागत आणि मग मी व माझा धाकटा भाऊ घराकडे अक्षरश: धाव घेत असू. दारासिंगचा हनुमान, हनुमान उडण्याचे स्पेशल इफेक्ट्स, रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेदी आधी पानाचं दुकान चालवत ही माहिती, विजय अरोराचा नाटकी इंद्रजीत आणि ती हवेतल्या हवेत होणारी बाणांची लढाई; सगळ्या गोष्टी आठवल्या. बालपणीचा काळ सुखाचा म्हणावं अश्या रम्य आठवणींच्या अवस्थेत काही क्षण गेले. आणि मग वीस जानेवारीला पुण्यात एस एल भैरप्पांच्या पुस्तकांच्या प्रकाशनाला गेलो होतो ते आठवलं.

कुठल्याही व्यक्तीबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात जे घडतं तेच भैरप्पांच्या बाबतीत माझ्या मनातही घडलं होतं. 'वंशवृक्ष' नंतर 'पर्व' नंतर 'माझं नाव भैरप्पा'' नंतर 'सार्थ' नंतर 'मंद्र असा प्रवास केल्याने माझा आवडता झालेला हा लेखक नंतर 'धर्मश्री', 'परिशोध', 'काठ' वाचताना थोडा रटाळ वाटू लागला. त्यांची स्त्रियांबद्दलची मतं आपल्याला पटत नाहीत हे जाणवू लागलं होतं. 'आवरण' वाचायच्या आधी अनंतमूर्तीची त्यांच्याबद्दलची आणि आवरण या पुस्तकाबद्दलची मतं वाचली होती. पण 'माझं नाव भैरप्पा', वाचलेलं असल्याने, आवरण पुस्तकाबद्दल ते न वाचताच एक सहानुभूतीचा कोपरा तयार झाला होता.

त्यानंतर जेव्हा आवरण वाचलं तेव्हा मात्र स्त्रियांप्रमाणेच इतिहासाबद्दलची भैरप्पांची मतं आपल्याला पटत नाहीत हे जाणवलं. तत्वज्ञानाचा अभ्यासक असलेला हा लेखक ज्या सहजतेने प्राचीन पुराणांवरील चमत्काराचं आवरण दूर करू शकतो त्याच सहजतेने अर्वाचीन इतिहासावर भाष्य करू शकेल हा माझा विश्वास डळमळीत झाला. भैरप्पा म्हणजे, 'स्वतःला दिसणारं सत्य आणि वाचक यामध्ये आपले पूर्वग्रह आणि आपले हेतू येणार नाहीत याची काळजी घेणारा लेखक', याऐवजी 'वाचकांना जे पटवायचं आहे त्याची समर्थपणे मांडणी करू शकणारा लेखक' असू शकतात ही शक्यता मी मान्य केली. त्यानंतर त्यांचं पारखा आणि तंतू वाचताना जरी सार्थ किंवा मंद्र इतकाच आनंददायी अनुभव आला तरी याही लेखकावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकत नाही आणि त्याचे पूर्वग्रह आपल्या नकळत आपण स्वीकारू नयेत याची जबाबदारी आपल्यावर आहे ही खूणगाठ मनाशी बांधून ठेवली होतीच.

'भैरप्पा शब्द प्रमाण' अशी आता जरी माझी अवस्था नसली, तरी या लेखकाने आपल्याला कित्येकदा अपरिमित आनंद दिलेला आहे हे मान्य असल्याने जेव्हा त्यांना त्यांच्याच पुस्तक प्रकाशनात प्रत्यक्ष बघायला मिळेल आणि त्या दिवशी कुठलंही लेक्चर नाही हे लक्षात आलं तेव्हा मी पुस्तक प्रकाशनाला जायचं निश्चित केलं.

दोन पुस्तकांचं प्रकाशन होतं. साक्षी आणि उत्तरकांड. मी साक्षी आधी वाचलं आणि त्याबद्दल मी याआधीच लिहिलं आहे. 



महाभारतावरील चमत्काराचं आवरण दूर करणारा हा लेखक रामायणावर लिहीत आहेत हे साधारणपणे दोनेक वर्षांपूर्वी कळलं होतं तेव्हाच माझं कुतूहल चाळवलं होतं. साक्षीबद्दल काहीच कल्पना नव्हती. असं असूनही उत्तरकांड आधी वाचायला न घेता मी आधी साक्षी वाचायला घेतलं त्याला कारण प्रकाशनसोहळा. या सोहोळ्यात शेवटी उत्सवमूर्ती बोलले. जेव्हा त्यांचा आवाज ऐकला, तेव्हा या माणसाचे शब्द आपण अनुवादित स्वरूपात केवळ वाचले होते आता त्याचा आवाज ऐकतो आहोत यामुळे माझे डोळे भरून आले होते. भैरप्पा चाळीस पंचेचाळीस मिनिटे बोलले. त्यातला बहुतेक भाग मी त्यांची पुस्तके आणि आत्मचरित्र वाचलेलं असल्याने मला परिचीत होता. नंतर जेव्हा ते साक्षी आणि उत्तरकांड यांच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल बोलले तेव्हा मात्र माझ्या भावविभोर अवस्थेत मिठाचा खडा पडल्यासारखं झालं.

'राम वनवासाला गेला. भरत राज्य करायला समर्थ नव्हता. त्यामुळे चौदा वर्षे अयोध्येत अनागोंदी माजली. समर्थ राजाच्या अनुपस्थितीमुळे लोक करभरणा चुकवू लागले. साठेबाजी करू लागले. राम जेव्हा वनवासाहून परतला तेव्हा त्याला या अनागोंदीतून मार्ग काढायचा असल्याने त्याने कठोर निर्णय अमलात आणायला सुरवात केली. त्यामुळे कर चुकवणारे व्यापारी आणि त्यांचे सहाय्यक अधिकारी यांना त्रास होऊ लागला. परिणामी त्यांनी रामाला बदनाम करायची मोहीम सुरु केली. पण राम तर निष्कलंक. त्याच्यावर चिखल कसा काय उडवणार?, म्हणून मग त्यांनी रामाचं चारित्र्यहनन करून त्याच्या कायद्यांबद्दल सामान्य जनतेत अप्रीती निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केले. म्हणून मग त्यांनी सीतेच्या चारित्र्यावर शंका घ्यायला सुरवात केली. म्हणजे सीतेच्या चारित्र्यावर शंका घेणारा सामान्य धोबी नव्हता तर तत्कालीन भ्रष्ट अधिकारी आणि व्यापारी यांनी ही कुजबुज मोहीम सुरु केली होती. त्यामुळे आपल्या निर्णयांच्या अंमलबजावणीत अडथळा येऊ नये आणि प्रजेत कायद्याचा धाक राहावा म्हणून प्रभू रामाने कठोर निर्णय घेऊन सीतेचा त्याग केला.' असं माझं आकलन आहे हे भैरप्पांच्या बोलण्याचं सार होतं.

मला ते पटत असतानाच भैरप्पा पुढे म्हणाले. 'आताही तसंच चालू आहे. जेव्हा शासक कडक असतो आणि भ्रष्टाचार करण्याच्या संधी कमी होत जातात तेव्हा समाजातील वाईट प्रवृत्तीचे लोक आणि भ्रष्ट अधिकारी त्या शासकाबद्दल कुजबुज मोहिमा राबवून त्याच्याबद्दल जनमानस कलुषित करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ आपल्या पंतप्रधानांनी निश्चलनीकरण किंवा अन्य कित्येक कठोर निर्णय घेतल्याने त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची फळी सक्रिय झाली आहे.' भैरप्पा पुढे बोलले असते परंतु व्यासपीठावरील अन्य निमंत्रितांनी त्यांना आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे याची जाणीव करून दिल्याने त्यांनी आवरतं घेतलं आणि उपस्थितांना पुस्तक वाचा अशी विनंती केली.

त्यांच्या त्या शेवटच्या वाक्यांमुळे त्यांच्या मनात प्राचीन कर्तव्यकठोर राम म्हणजे कुटुंबमोहापासून दूर असलेले सध्याचे आपले पंतप्रधान असावेत असा माझा ग्रह झाला. आणि प्रेक्षकांत बसलेल्या अनेकांनी ज्याप्रमाणे त्या वक्तव्याचं स्वागत केलं ते ऐकून बाकी सगळ्यांनाही तसंच वाटलं याबद्दल माझी खात्री झाली.

निश्चलनीकरण आणि जीएसटीच्या वेळी बँकर्स आणि सर्व्हिस टॅक्स ऑफिसर्स कश्या प्रकारे वागले हे माहीत असल्याने, आणि हे असं होईल याची पूर्वकल्पना शीर्षस्थ नेतृत्वाला आणि त्यांच्या सल्लागार मंडळाला अजिबात नसेल यावर माझा विश्वास बसणं अशक्य असल्याने उत्तरकांड वाचायचा माझा उत्साह अगदी मावळून गेला. २०१७च्या जानेवारीत कन्नड भाषेत प्रसिद्ध झालेलं पुस्तक लिहायला भैरप्पांनी कधी सुरवात केली हे मला निश्चित माहिती नसलं तरी हे पुस्तक लिहायला पर्व इतका मोठा काळ लागला नसेल हे मला बातम्यांवरून माहिती होतं. त्यामुळे आपल्या आवडत्या नेत्याला समर्थन देण्यासाठी भैरप्पांनी हे पुस्तक लिहिलं असावं हे मान्य करून मी थोडा खटटू झालो. कुणीही आपल्या लाडक्या नेत्याचं समर्थन करण्याला माझी ना नाही. पण ते प्रच्छन्न असावं असं माझं मत आहे. इतर लोक ज्याला साहित्यिक मूल्य आहे असं समजून वाचतील त्यात आपले हेतू मिसळू नयेत असंही माझं मत आहे. वाचणाऱ्याला माहिती असावं की आपण जे वाचतो आहेव ते नक्की काय आहे.

अर्थात माझ्या मताप्रमाणे भैरप्पांनी वागावं इतकं मोठं माझं कर्तृत्व नाही आणि अधिकारही नाही. त्यामुळे उत्तरकांड घरात आलं खरं पण ते वाचायचा उत्साह मावळला होता.

(क्रमशः)

रंगासाई सर आणि कोरोना

अकरावी ते तेरावी गणेश क्लासला जायचो. रंगासाई सर होते इकॉनॉमिक्स शिकवायला. ठाण्याला राहणारे रंगासाई सर केळकर कॉलेजात शिकवायचे आणि संध्याकाळी डोंबिवलीत गणेश क्लासमध्ये आमच्या डोक्यात इकॉनॉमिक्स भरायचा प्रयत्न करायचे. मराठी त्यांना येत नसावं आणि अकरावीच्या मुलांसमोर आपलं तोडकं मोडकं हिंदी वापरलं तर खिल्ली उडवायला या अर्धवट वयातील मुलांच्या हाती आयतं कोलीत दिल्यासारखं होईल हे त्यांना माहिती असावं त्यामुळे त्यांचं लेक्चर कायम दाक्षिणात्य हेल असलेल्या इंग्रजीत असायचं. सरांचा फोटो माझ्याकडे असण्याचं कारण नाही, त्यामुळे आता सरांची मूर्ती अंधूक आठवते. तामिळ सिनेमातील नासर नावाचा गुणी अभिनेता जसा दिसतो तसं माझ्या स्मृतीतील सरांचं चित्र आता दिसू लागलं आहे.

पूर्ण इंग्रजीत असलेल्या लेक्चरमुळे त्या काळच्या डोंबिवलीतील कॉमर्स शिकणाऱ्या मुलामुलींमध्ये सर लोकप्रिय होणं जरा कठीणच होतं. त्यात सरांचा विषय इकॉनॉमिक्स, जो तत्कालीन डोंबिवलतीलच काय पण आजही असंख्य भारतीयांच्या नावडीचा विषय आहे. त्यामुळे इतर विद्यार्थीप्रिय शिक्षकांच्या गराड्यात रंगासाई सर एकटे पडलेले असत. पण त्यामुळे त्यांच्या शिकवण्यावर परिणाम झाला नाही. आपला विषय ऐकण्यात फार रस नसलेल्या विद्यार्थ्यांसमोरही ते कायम नावाप्रमाणेच रंगात येऊन शिकवत. साधारणपणे 'कमी तिथे आम्ही' असा माझा स्वभाव लहानपणापासून असल्याने विद्यार्थीप्रिय नसलेल्या रंगासाई सरांकडे मी ओढला जाणं स्वाभाविक होतं. त्यामुळे मी त्यांच्या लेक्चरला जरा जास्त लक्ष द्यायचो. परिणामी इकॉनॉमिक्स हा विषय किमान थोड्या फार प्रमाणात का होईना पण डोक्यात शिरू लागला आणि मग त्याची गोडी लागली.

मग एकदा डोंबिवलीत एका पुस्तक प्रदर्शनात 'रॉबर्ट हेलब्रॉनर' यांच्या 'Worldly Philosophers' या पुस्तकाचा बाळ गाडगीळ यांनी 'अर्थशास्त्राचे शिल्पकार' या नावाने केलेला अनुवाद मिळाला. कमी कळत असलं तरी मित्रांसमोर स्टाईल मारायची म्हणून घेतलं आणि वाचायला सुरवात केली. त्यातलं चौथं प्रकरण वाचायला सुरवात करायला आणि लोकसंख्येचा सिद्धांत रंगासाई सरांनी शिकवायला एकच गाठ पडली. परिणामी इकॉनॉमिक्स आणि रंगासाई सरांवरच प्रेम वाढलं आणि ते अजूनही टिकून आहे.

१६९६ च्या सुमारास इंग्लंडमधील ग्रेगरी किंग नावाच्या एका नकाशा तज्ज्ञ आणि संख्याशास्त्रीने त्यावेळच्या उपलब्ध साधनांवरून इंग्लंडची लोकसंख्या किती असावी याचा अंदाज बांधला होता. साडेपाच दशलक्ष हा किंगचा अंदाज आश्चर्यकारकरीत्या सत्याजवळ जाणारा होता. पण किंग साहेबांना केवळ तत्कालीन लोकसंख्येत रस नव्हता तर ती लोकसंख्या किती वेगाने वाढेल याबद्दलही त्यांनी अंदाज बांधला होता. त्यांच्या अंदाजाप्रमाणे इंग्लंडची तत्कालीन लोकसंख्या दुप्पट व्हायला इसवीसन २३०० उजाडलं असतं आणि इसवीसन ३५००च्या आधी ती चौपट होऊ शकली नसती.

किंग साहेबांचा अंदाज हा तत्कालीन इंग्लंडातील समाजधुरिणांच्या चिंतेचा विषय होता. इंग्लंडची लोकसंख्या अतिशय कमी वेगाने वाढते आहे आणि इंग्लंडच्या साम्राज्याच्या शत्रूंची लोकसंख्या मात्र झपाट्याने वाढते आहे असे सर्वमान्य मत होते. परिणामी या शत्रू देशांकडून इंग्लंडच्या साम्राज्यावर हल्ले होणं वाढत जाणार आहे आणि शेवटी इंग्लंड हे महान राष्ट्र लयाला जाऊ शकतं अशी भीती प्रतिष्ठित लोकांच्या मनात होती. त्यात डॉ प्रिन्स नावाच्या एका संख्याशास्त्र्याने उपलब्ध पुराव्याने सिद्ध करून दाखवलं की इंग्लंडची लोकसंख्या ग्रेगरी किंगच्या काळापेक्षा चक्क तीस टक्क्याने कमी झाली होती. आता मात्र इंग्लंडमधील नेत्यांनी लोकसंख्येच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. लोकसंख्या घटल्याने देशाचा ऱ्हास होतो तर ती वाढल्याने देशाचा विकास होईल असा विचार उदयाला आला. आणि विल्यम पिट (यंगर) या तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधानाने चक्क गरिबांची लोकसंख्या वाढावी म्हणून गरिबांना लग्न करण्यासाठी आणि मुलं होण्यासाठी मदत देणारं "Poor Relief Bill" संसदेत आणलं होतं.

त्या वेळी इंग्लंडमध्ये अजून एक विचारवंत आणि मंत्री होता. त्याच नाव विल्यम गॉडविन. फ्रँकेस्टाईन लिहिणाऱ्या मेरी शेलीचा पिता आणि जगप्रसिद्ध कवी पी बी शेलीचा सासरा असणारा हा गॉडविन आपल्या अराजकवादी 'anarchist' (माझ्या मते खरं तर ते अराज्यवादी असायला हवं) बंडखोर विचारांसाठी प्रसिद्ध होता. त्याने 'पॉलिटिकल जस्टीस' या नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्यात त्याने इंग्लंडची लोकसंख्या वाढवण्याचे फायदे रंगवून सांगितले होते. भरपूर लोकसंख्या असेल. सगळ्यांना खाऊ पिऊ घालण्यासाठी उत्पादन करावं लागेल. परिणामी सगळ्यांना रोजगार मिळेल. युद्ध होणार नाहीत. राज्यसंस्था लयाला जाईल. लोक सुखी असतील. वगैरे मुद्दे त्याने सप्रमाण सिद्ध करून दाखवले होते. पुस्तक राज्यसंस्थेच्या विरोधी असलं तरी त्यात भविष्याबद्दल आशादायी चित्र रंगवल्याने त्यावर इंग्लंडमधील उच्च्भ्रू वर्तुळात भरपूर चर्चा होऊ लागली.

डेव्हिड ह्यूम आणि जीन रूसो यासारख्या विचारवंतांशी मैत्री असलेल्या डॅनियल माल्थस या प्रतिष्ठित गृहस्थालाही या पुस्तकातील प्रतिपादन पटलं. (अनेकजण या आडनावाचा उच्चार माल्थुस असा करतात. पण रंगसाई सर माल्थस म्हणायचे म्हणून मीही माल्थस म्हणतो.) तर डॅनियल माल्थस या पुस्तकाबद्दल आपल्या लाडक्या मुलाशी गप्पा मारू लागले. 

थॉमस माल्थस
फोटो सौजन्य : इंटरनेट 
केम्ब्रिज विद्यापीठात शिकलेला, लॅटिन आणि ग्रीक भाषेवर प्रभुत्व असलेला आणि गणितात रँग्लर असलेल्या या बुद्धिमान मुलाचं नाव होतं थॉमस माल्थस. पुढे १९२९ मध्ये जागतिक मंदीच्या काळात जॉन मेनार्ड केन्सने मांडलेली "general glut", सार्वजनिक उत्पादनातिरेक ही संकल्पनादेखील याच थॉमस माल्थसला जाणवली होती. पण तो त्याच्या काळाच्या इतका पुढे होता की त्या संकल्पनेचं काय करायचं ते त्याला आणि त्याच्या समकालीन विचारवंताना कळलं नाही. थॉमस माल्थसची थोरवी सांगण्यासाठी फक्त इतकंच सांगतो की ख्रिस्ती धर्मगुरू असलेल्या माल्थसबाबाच्या विचारांनी चार्ल्स डार्विनही प्रभावित झाला होता.

गॉडविनने पुस्तकात सांगितलेल्या मुद्द्यांचा वडिलांशी बोलताना प्रतिवाद करताना थॉमस माल्थसने जे मुद्दे मांडले त्यामुळे डॅनियल माल्थस इतके प्रभावित झाले की त्यांनी आपल्या मुलाला आपले विचार पुस्तकरूपाने प्रसिद्ध करायला सांगितले. त्यातून तयार झालेलं पुस्तक म्हणजे 'An Essay in to Principles of Population', लोकसंख्येच्या नियमांवरचा निबंध.

त्यानंतर थॉमस माल्थसने या निबंधाची सात संस्करणे काढली. प्रत्येक वेळी त्याने मागील संस्करणातील त्रुटी सुधारल्या किंवा निबंधावरील आक्षेपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. माल्थसने मांडलेले लोकसंख्यावाढीचे नियम थोडक्यात या प्रकारे सांगता येतील.

१) लोकसंख्या गुणाकार श्रेणीने वाढते. जेव्हा अनुकूल वातावरण मिळतं, तेव्हा मनुष्यप्राण्यांचं लैंगिक आचरण लोकसंख्या वाढीचं गुणोत्तर अतिशय वेगाने बदलवून टाकतं.

२) याउलट अन्नधान्य मात्र बेरीज श्रेणीने वाढतं

३) म्हणजे लोकसंख्या जर २ > १० > ५० > २५० > ७५० या पद्धतीने वाढत जात असेल तर अन्नधान्य मात्र २ > ५ > ८ > ११ > १४ या पद्धतीने वाढत जाते. परिणामी वाढत्या लोकसंख्येला पुरेसा अन्नपुरवठा मिळू शकत नाही.

४) मग या लोकसंख्या आणि अन्नपुरवठा यांच्या बिघडलेल्या समतोलाला पुन्हा ताळ्यावर आणण्याचं काम दोन नियंत्रक करतात.
पहिला म्हणजे पॉझिटिव्ह किंवा नैसर्गिक नियंत्रक. बिघडलेल्या असमतोलामुळे गरिबी, दैन्य, दुष्काळ, भूकबळी, रोगराई, युद्ध होतात आणि लोकसंख्या पूर्ववत होते.
किंवा मग दुसरा म्हणजे प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रतिबंधात्मक नियंत्रक म्हणजे माणसांनी घेतलेले निर्णय. यात लग्नाचं वय लांबवणे, संतती नियमन, ब्रह्मचर्यपालन, कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणं वगैरे बाबी येतात.
जो समाज हे प्रतिबंधात्मक उपाय करणार नाही त्याच्यावर निसर्ग आपले उपाय लागू करतो आणि शेवटी लोकसंख्येला ताळ्यावर आणतो.

५) जेव्हा सुबत्ता येते तेव्हा माणसे कुटुंबनियोजनाकडे दुर्लक्ष करतात परिणामी गुणाकारश्रेणीने लोकसंख्या वाढायला सुरवात होते. वाढत्या लोकसंख्येला कमी पडू नये म्हणून अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणली जाते. त्यामुळे अन्नधान्य मुबलक मिळू लागतं. परिणामी पुन्हा लोकसंख्या वाढू लागते. लोकसंख्येचा विस्फोटच होतो म्हणा ना. पण या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात जमीन वाढत नाही. परिणामी वाढलेल्या लोकसंख्येला पुरेल इतकं अन्न मिळत नाही. परिणामी लोकसंख्या एक आपत्ती बनते. आणि या आपत्तीत भरडले जातात ते सामाजिक उतरंडीतील तळागाळाचे लोक. त्यांच्याकडे अगोदरच संसाधनांचा तुटवडा असतो त्यामुळे ते अन्नधान्याच्या टंचाईच्या काळात टिकून राहण्यासाठी असमर्थ ठरतात. आणि ज्यांच्याकडे संसाधनांची विपुलता आहे किंवा ज्यांच्याकडे क्रयशक्ती आहे ते टिकाव धरतात. म्हणून सरकारने लोकसंख्यावाढीसाठी उत्तेजन देऊ नये. (डार्विन बाबामुळे आता सगळ्यांना माहिती झालेल्या हर्बर्ट स्पेन्सर यांच्या 'सर्वायवल ऑफ द फिटेस्ट' या संकल्पनेचं एक मूळ इथेही असावं असं मला वाटतं)

अश्या तऱ्हेने गॉडविनने रंगवलेलं लोकसंख्यावाढीतून आर्थिक सुबत्तेचं चित्र माल्थसने उध्वस्त केलं. माल्थसने मांडलेले मुद्दे इतके प्रभावी पण नकारात्मक होते की त्या काळात त्याने समाजधुरिणांवर दडपण आणलं. इतकंच काय पण हेलब्रॉनर यांनी आपल्या पुस्तकात माल्थसच्या प्रकरणाचं नावंही The Gloomy Presentiments of Parson Malthus and David Ricardo म्हणजे 'धर्मोपदेशक माल्थस व डेव्हिड रिकार्डोचं उदास विचारविश्व' असं दिलं आहे.

माल्थसच्या या लोकसंख्यावाढीच्या सिध्दांतावर भरपूर टीका झाली. तो कालबाह्य झाला आहे असं प्रतिपादन कित्येकदा केलं गेलं. जागतिकीकरण, शेतीत झालेल्या सुधारणा, शेतीचं औद्योगिकीकरण, हरितक्रांती आणि आता जीएम बीबियाणं यामुळे आपण माल्थसच्या काळापेक्षा कित्येकपट लोकसंख्या असूनही अन्नधान्याच्या तुटवड्यावर मात केली आहे. आता जर कुठे भूकबळी असतील तर ते अन्नधान्याच्या उत्पादनाच्या तुटवड्यामुळे नसून वितरणव्यवस्थेतील त्रुटींमुळे आहेत. असं असलं तरी हरितक्रांतीमागे किंवा भारतासारख्या विकसनशील देशांतील कुटुंबनियोजनाच्या कार्यक्रमांमागे वैचारिक भूमिका माल्थसच्या लोकसंख्येच्या सिध्दांतातील प्रतिबंधात्मक उपायांची होती हे अनेकांना पटेल.

आज जेव्हा कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात थैमान घालतो आहे तेव्हा यामुळे कराव्या लागणाऱ्या लॉक आऊटमधे सगळ्यात जास्त भरडले जाणार आहेत ते समाजातील आर्थिक उतरंडीतील सगळ्यात खालच्या थरातील लोक. ज्या ज्या देशात कोरोनामुळे आरोग्यव्यवस्थेवर अतिरिक्त बोजा पडला आहे किंवा पडणार आहे त्या त्या देशातील आर्थिक उच्चस्तरातील लोकांना उपचार करुन घेणं परवडतं आहे किंवा परवडणार आहे. अडकले आहेत किंवा अडकतील केवळ आर्थिक निम्नस्तरातील लोक.

आज जर माल्थस असता तर त्याने आपल्या निबंधाचं आठवं संस्करण केलं असतं आणि मुबलक अन्नधान्य उपलब्ध असूनही लोकसंख्या समतोल करण्याच्या निसर्गाच्या नियमांना शब्दबद्ध केलं असतं. आणि अशा परिस्थितीत सरकारची जबाबदारी ही आर्थिक दुर्बळ घटकांकडे अधिक लक्ष देण्याची आहे हे ठासून सांगितलं असतं.

लोकसंख्या वाढण्यासाठी प्रयत्न करु नका. वाढलेल्या लोकसंख्येवर नियंत्रण आणा. संसाधने केवळ मूठभर लोकांच्या हातात एकवटू देऊ नका आणि असलेल्या लोकसंख्येची क्रयशक्ती खालावू देऊ नका अन्यथा सार्वजनिक उत्पादनातिरेकामुळे येणाऱ्या आर्थिक मंदीला सामोरे जावे लागेल असंही त्याने समजावलं असतं.

आज संध्याकाळी बायकोमुलांबरोबर कोरोनाबद्दल बोलताना माल्थस आठवला. मग हेलब्रॉनरांच्या पुस्तकातील माल्थसवरचं प्रकरण पुन्हा चाळलं. तेव्हा रंगासाई सरांची आठवण आली.

चराचरात ईश्वर

भरपूर चालून हनुमान मंदिरापाशी आलो. सक्तीची सुट्टी असल्यामुळे की काय कोण जाणे पण मंदिरासमोरच्या तीनही चौथऱ्यांवर भरपूर गर्दी होती. सुडौल शरीराचे लोक व्यायाम करत होते. मलाही कधी नाही ते सूर्यनमस्कार घालायची इच्छा झाली.

मी एका चौथऱ्यावर चढलो आधीचे लोक बाजूला होऊन माझ्या विस्तीर्ण देहाला सूर्यनमस्कार घालायची जागा होईपर्यंत वाट पाहू लागलो. समोर 'हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी' सूर्याकडे तोंड करून उभे होते. माझ्या डोक्यात गाणं वाजू लागलं...

धन्य तुझी रामभक्ती दिव्य तुझी काया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
हादरली ही धरणी थरथरले आसमानं
एकमुखानं बोला बोला जयजय हनुमान

माझ्या मागे ते सफरचंदासारखं लाल गुलाबी पिवळसर सूर्यबिंब उगवताना मला जाणवत होतं.

माझ्या समोरच्या माणसाचा व्यायाम संपत आला होता. एकाएकी मनात विचार आला की कुठे तोंड करून सूर्यनमस्कार घालावेत? मारुतीरायाकडे तोंड केलं तर भगवान सहस्ररश्मीकडे पाठ होईल आणि सूर्यनारायणाकडे तोंड केलं तर अंजनीसुताकडे पाठ होईल. आणि मला चराचरात ईश्वर असणे म्हणजे काय ते जाणवलं.
मग या चराचरातील ईश्वराकडे पाठ नको म्हणून मी हात जोडून उभ्या उभ्या एक प्रदक्षिणा मारत सूर्यनारायण आणि पवनसुताला नमस्कार केला आणि माझ्यापुढच्या माणसाबरोबर चौथऱ्यावरून खाली उतरून घराच्या रस्त्याला लागलो.

माझ्या शरीरसाधनेत अध्यात्म हाच मोठा अडसर आहे, हेच खरं. नाहीतर आज भारताला एखादा मिस्टर युनिव्हर्स मिळाला असता.

Sunday, March 15, 2020

कंबोडिया, फ्लॅश मॉब, ओ फॉर्च्युना आणि लाईफ इज ब्यटिफुल

सकाळी चालायला जाण्यापूर्वी फेसबुक उघडलं. एका ज्येष्ठ मित्राने कंबोडियाच्या अंगकोर मंदिरांचा व्हिडिओ शेअर केलेला पाहिला. त्यांच्याच पोस्ट्स बघून दोन वर्षांपूर्वी कंबोडिया व्हिएतनामला गेलो होतो. 

कंबोडियाच्या अंगकोर वट आणि अंगकोर थॉमच्या देवळानंतर 'टा प्र्हॉम' देवळात गेलो होतो. (या देवळाच्या दुरुस्तीचं काम भारत सरकार करत आहे आणि अॅंजेलीना जोलीच्या टूम्ब रेडर्स या चित्रपटाचं चित्रीकरण या देवळातही झालं होतं). 'टा प्र्हॉम'च्या भव्य भग्न वास्तूत फिरताना मोबाईलवर 'ओ फॉर्च्युना' लावून हिंडलो होतो. आजूबाजूला कुणी नाही ते पाहून इअरफोन बंद करून त्या भग्न वास्तूलाही 'ओ फॉर्च्युना' ऐकवलं होतं. कार्ल अॉफच्या संगीताची जादू, ओ फॉर्च्युनाचे न कळणारे लॅटिन शब्द आणि जुन्या देवळांच्या भिंतीतून उगवून आकाशापर्यंत पोचलेले वटवृक्ष या सगळ्याचा परिणाम होऊन मनात उसळलेला भावनांचा कल्लोळ डोळ्यातून घळाघळा वाहू दिला होता.आणि माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून बावरलेल्या दोन्ही मुलांकडे पाहून खूप हसूही आलं होतं. 


आठवणी जाग्या झाल्या म्हणून म्हणून युट्यूबवर ओ फॉर्च्यूना शोधलं. समोर नेहमीचे व्हिडीओ आले आणि नेहमीपेक्षा एक वेगळा व्हिडीओ आला फ्लॅश मॉब या नावाने. 



माझ्या आयुष्यात फ्लॅश मॉब ही गोष्ट कधी प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली नाही. अगदीच तोंडी लावायला म्हणून जेव्हा पिझ्झा हट भारतात नवीन होतं आणि माझं लग्न व्हायचं होतं तेव्हा हिला घेऊन पिझ्झा हटला गेलेलो असताना आम्हाला वाढणारा वेटर टेबलाजवळ येऊन आपलं काम करत असताना एकाएकी बाकीच्या वेटर्सनी ताल धरून नाचायला सुरवात केली होती आणि तिथे आलेल्यापैकी कुणाच्या तरी वाढदिवसासाठी एक गाणं म्हणत टेबलामधल्या जागेत नाच करून दाखवला होता. 

माझ्या तालाशी जुळवून घेणं अशक्य आहे हे नृत्यदेवतेला माझ्या लहानपणीच कळल्यामुळे तिने माझ्या आयुष्यातून फार लवकर काढता पाय घेतला होता. त्यामुळे इतर कुणी नाचू लागलं तरी मला अवघडल्यासारखं होतं. त्याशिवाय आपण, नाच आवडणाऱ्या आपल्या प्रेयसीला घेऊन त्या काळात न परवडणाऱ्या हॉटेलात गेलेलो असताना वेटर्सनी छान नाच करून दाखवल्याने माझी अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली होती. त्यानंतर मी कायम डॉमिनोजचा ग्राहक झालो आणि पिझ्झा हटला 'नाचता येईना ते गिऱ्हाईक होई वाकडे' ही मराठी म्हण शिकवली होती. 

त्यानंतर साधारण २०११ ला सीएसटी स्थानकावर संध्याकाळी पाचच्या सुमारास तरुणांच्या एका समूहाने रंग दे बसंतीच्या गाण्यावर समूहनृत्य केलेलं होतं. त्याचा व्हिडीओ टिव्हीवर बातम्यांत बघताना, आपल्याला नाचता आलं असतं तरी आपण असं चारचौघात नाचू शकलो नसतो याची खात्री पटून त्या गाण्यावर सगळ्यात पहिल्यांदा नाचायला सुरवात करणाऱ्या मुलीचं कौतुक वाटलं होतं. 



नंतर कळलं होतं की बघणाऱ्यांसाठी जरी तो उत्स्फूर्त अविष्कार असला तरी त्यात भाग घेणाऱ्यांनी त्यासाठी बरीच पूर्वतयारी केलेली असते. त्यांचं सादरीकरण रेकॉर्ड करून ठेवण्यासाठी प्रशिक्षित कॅमेरामन मोक्याच्या ठिकाणी पेरलेले असतात आणि ते केवळ सादरीकरणाला रेकॉर्ड करत नसून प्रेक्षकांच्या प्रतिक्रियादेखील रेकॉर्ड करत असतात. अनपेक्षित ठिकाणी अनपेक्षितरित्या आपल्या बाजूला संगीत किंवा नृत्याचा अविष्कार सुरु झाला की माणसांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे बदलतात ते बघणं मोठं मनोरंजक असतं. आज ओ फॉर्च्यूनाच्या फ्लॅश मॉबचा व्हिडीओ बघताना त्यातल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया बघताना असाच हरखून गेलो. 

फोन खिशात टाकून चालायला सुरवात केली. यूट्यूबच्या अल्गोरिदमला माझी आवड कळली आणि त्याने ऑटो प्ले मोडवर फ्लॅश मॉबच्या सादरीकरणाचे व्हिडीओ दाखवायला सुरवात केली. पश्चिमी देशात हे फ्लॅश मॉब साधारणपणे एअरपोर्ट किंवा मॉल किंवा रेल्वे स्टेशन किंवा शहरातील एखादा प्रसिद्ध चौक अश्या ठिकाणी आपलं सादरीकरण करतात. सुरवातीला तिथल्या गिऱ्हाईकांचे किंवा प्रवाश्यांचे आवाज, नेहमीच्या सूचनांचे आवाज असा सगळा मामला चालू असतो. आणि कुठेतरी कोपऱ्यातून कुणीतरी व्हायोलिन किंवा बासरी किंवा ट्रम्पेट किंवा छोटा ड्रम वाजवायला सुरवात करतं. लोक लक्ष देत नाहीत. मग अजून कुणीतरी दुसरं वाद्य घेऊन येतं. ठरलेल्या क्रमाने एका मागून एक इतर वाद्यवृंद गोळा होत जातो. आणि मूळ सुरावटीत आपलं वाद्य मिसळवू लागतो. आता लोक शांत होऊ लागतात. बहुतेक लोक एका ठिकाणी उभे राहून त्या सादरीकरणाचा आनंद घेऊ लागतात. इतस्ततः धावणाऱ्या लहान मुलांचे आईबाप त्यांना पकडून उभे रहातात. संगीताची जादू आणि वातावरणातील भारलेपणा असा असतो की इतका वेळ गोंधळ घालणारी मुलंही शांतपणे उभी राहतात. वाद्यमेळ वाढत जातो. आता वाद्यवृंदाचा संगीत संयोजकही समोर येतो आणि त्या सुरावटीत तेथील सर्वजण गुंगून जातात. शेवट होतो आणि मग टाळ्यांचा जल्लोष, शिट्ट्या किंवा प्रोत्साहनपर हाकारे यांचा कल्ला होतो आणि रोमांचित प्रेक्षक पुन्हा आपापल्या कामाला लागतात. सगळ्या फ्लॅश मॉब व्हिडिओचा फॉरमॅट साधारणपणे असाच असतो. 

मोबाईल खिशात होता. त्यामुळे पुढे काय सुरु होणार ते माहिती नव्हतं. प्रत्येक वेळी युट्यूब जे ऐकवेल त्यासाठी तिथल्या प्रत्यक्षदर्शींइतकाच मी देखील अनभिज्ञ होतो. एकामागून एक वेगवेगळ्या सुरावटी वाजत होत्या. ओ फॉर्च्यूनाची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी केलेली सादरीकरणं झाली. मग बोलेरो झालं. मग ब्ल्यू डॅन्यूब झालं. मग बीथोव्हेनच्या नवव्या सिम्फनीतील ओड टू जॉय झालं. क्वीनचं बोहेमियन ऱ्हाप्सोडी झालं. 

चढ चढून धाप लागली होती. पण कानात वाजणाऱ्या सुरावटींमुळे अंगावर रोमांच उभे राहात होते. जरा थांबलो. घाम पुसता पुसता पुन्हा एकदा मगाशी लागून गेलेलं बोलेरो लावलं. मेक्सिकोतील कुठल्यातरी शहरातील चौकात एका वाद्यवृंदाने रावेलची ही रचना सादर केली होती. संध्याकाळच्या गर्दीतून एक मुलगी पुढे येते. ड्रम्स मांडते आणि बोलेरोचा मध्यवर्ती ताल चालू करते. 



बोलेरोमध्ये तो ताल संपूर्ण वेळ चालू राहतो. जवळपास पंधरा मिनिटांच्या त्या संगीतात मध्यवर्ती असणारा एकच ताल, संगीताच्या कार्यक्रमांसाठी बांधलेल्या विशेष सभागृहात असतानाही पुन्हा पुन्हा वाजवत राहायचं म्हणजे अजिबात खायचं काम नाही. आणि लोकांच्या गर्दीत एकट्याने येऊन आपले ड्रम्स मांडून तो ताल धरायचा म्हणजे तर अजून कठीण. आजूबाजूला अगदी जवळ उभे असलेले प्रेक्षक, त्यामुळे जरा ताल किंवा ठोका चुकला की नाचक्की ठरलेली. रंग दे बसंती गाण्यावर नाचायला सुरवात करणार्या पहिल्या मुलीप्रमाणेच या ड्रम वाजवणाऱ्या मुलीबद्दल मला फार कौतुक वाटू लागलं. वाटलं की अश्या कुठल्या फ्लॅश मॉबच्या सादरीकरणाच्या वेळी आपणही तिथे असलं पाहिजे. त्या वाद्यवृंदातील कलाकारांचं तोंडभरून कौतुक करताना मी थकणार नाही याची माझी मलाच खात्री पटली. 

आणि एकदम जाणवलं की फेसबुक म्हणजे एक प्रकारचा फ्लॅश मॉब आहे. फक्त या मॉबमधे जो तो एकटा असतो. आणि इथे बहुतेक जण फारसा सराव न करता येतात. आपापल्या भिंतीवर खरडणारा प्रत्येकजण एकटाच वेगवेगळी वाद्य वाजवत असतो. आणि आपापल्या कामात गुंतलेले लोक मधेच तिथे डोकावतात. आपण कलाकार आहोत की नाही हे माहिती नसलेल्या कलाकारांचं सादरीकरण बघत असतात. काहींचे ताल चुकतात. काहींचा एकट्याचा वाद्यवृंद फारसा रंग भरत नाही. काहींचा वाद्यवृंद मात्र कमालीचा रंगतो. लिहिणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला दोघांना खूष करून जातो. तुलना करून माझा मीच हसलो. बोलेरो संपलं. 

चेकॉव्हस्कीची रचना सुरु झाली. ही रचना मात्र कुठल्या एअरपोर्ट किंवा मॉलमध्ये नसून चक्क एका हॉस्पिटलमध्ये सादर केली होती. 



वेदनेने बेजार झालेल्या रुग्णांना आणि आप्तेष्टांच्या दुखण्याने चिंतेत पडलेल्या नातेवाईकांना हे स्वर्गीय संगीत ऐकून किंचित काळ का होईना पण वेदनेचा आणि चिंतेचा विसर पडला असेल, असा विचार करून, त्या वाद्यवृंदाच्या कल्पकतेचं मला कौतुक वाटलं. माझ्या आवडत्या शॉशँक रिडम्प्शन चित्रपटातील मोझार्ट ऑपेराचा सीन आठवला. जिथे जीवन म्हणजे त्याच त्याच कंटाळवाण्या गोष्टींची अंतहीन मालिका असते, जिथे आयुष्याला पुढे चालवणारी आशा नावाची अद्भुत साखळी नाहीशी झालेली असते, त्या रुक्ष आणि भकास तुरुंगात अँडी जेव्हा काही काळापुरता मोझार्टची सिम्फनी वाजवतो तेव्हा ती काय आहे ते कळलं नाही तरी तेथील कैद्यांच्या मनात आशेचं इवलंसं फूल फुलवते, ते आठवलं. 



आणि त्याचवेळी हे देखील जाणवलं की हॉस्पिटलमधील फ्लॅश मॉबच्या त्या संगीताने अनेकांना काहीकाळ चिंतामुक्त केलेलं असलं तरी कदाचित असह्य वेदनेने तळमळणाऱ्या काही जणांना त्याचा त्रास झालेला असू शकतो. आपल्याला सुखावणारे सूर इतरांना सुखावत असतीलंच हे गृहीतक मोठं धोकादायक आहे. ते इतरांच्या आवडीनिवडीबद्दल, त्रासाबद्दल, आणि त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक मनःशांतीबद्दल आपल्याला आंधळं बनवू शकतं. तल्लीनतेने गायलं जाणारं भारतीय शास्त्रीय संगीत कित्येकांना नीरस वाटू शकतं. बेभान होऊन ढोल वाजवणारे स्वतः जरी खूष होत असतील तरीही त्या तालाचा त्रास होणारे अनेकजण असू शकतात. कुणाची अजान तर कुणाची आरती एकाच वेळी कुणाची मन:शांती वाढवत असताना इतर कुणासाठी मात्र डोकेदुखी होऊ शकते. कॉलेज जीवनातील माझा आवडता मायकेल जॅक्सन माझ्या वडिलांना आवडत नव्हता. इतकंच काय पण मगाशी लागून गेलेलं क्वीनचं बोहेमियन ऱ्हाप्सोडी मला समजत नसल्याने फार आवडत नसलं तरी ते माझ्या मुलांना आवडतं हे मला काही कारण नसताना खटकतं. 

चेकॉव्हस्कीची रचना हॉस्पिटलात सादर करणाऱ्या फ्लॅश मॉबमुळे सकाळपासूनच्या माझ्या सकारात्मक विचारात अशा तऱ्हेने थोडा खंड पडला. आणि मी फोन पुन्हा खिशात ठेवून उताराला लागलो. ऑटो प्लेलिस्ट चालू होती. सहासात मिनिटं कुठलंतरी संगीत चालू होतं. सकाळच्या रोमांचकारी संगीताबरोबर केलेल्या रोलरकोस्टर राईडनंतर आलेल्या विचारांमुळे थोडा खिन्न झालो होतो. आणि एकाएकी लहान मुलांच्या आवाजात गाणं चालू झालं. धून ओळखीची होती. पण कुठली ते लक्षात येईना. शेवटी फोन खिशातून बाहेर काढला. संगीताच्या त्या रचनेचं नाव होतं 'ला विटा इ बेला' या इटालियन वाक्याचा अर्थ होतो 'लाईफ इज ब्युटीफुल'. 


रॉबर्टो बेनिग्निच्या लाईफ इज ब्युटीफुल या चित्रपटात ओफेनबाख या जर्मन - फ्रेंच संगीतकाराच्या रचनेचा वापर केलेला आहे. माझी अतिशय आवडती रचना लहान मुलांच्या तोंडून ऐकताना मला जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात करता येणं अशक्य आहे. मगाशी आलेली खिन्नता कुठच्या कुठे पळून गेली. आणि मी टेकडीच्या त्या निर्जन उतारावर, कानात वाजणाऱ्या गाण्याच्या तालावर झुलत झुलत, हात हवेवर हलवत हलवत झोकात उतरू लागलो. जर त्या वेळी मला कुणी पाहिलं असेल तर 'आजकाल लोक मॉर्निंग वॉकलाही ढोसून येतात', असं त्याच ठाम मत झालं असतं. आपला पदन्यास हा झोकांड्या या सदरात जातो आहे हे जाणवूनही त्या संगीताच्या तालावर झुलण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही. आणि मला अजून एक गोष्ट जाणवली की माझ्या मनात आधीपासून असलेली, पिझ्झा हटमधील अनपेक्षित नाचण्यामुळे अजून घट्ट बसलेली नाचण्याविषयीची अढी त्या वाकड्या उतारावर मला नाचता येत नसूनही करत असलेल्या झुलण्यामुळे किंचित सैल झाली होती.

Monday, March 9, 2020

नंदीबैल, माझ्या आयुष्यातील मुली आणि महिला दिन

माझ्या लहानपणी नंदीबैल घेऊन दारोदार फिरणाऱ्या आणि लोकांचं भविष्य सांगणाऱ्या एका ज्योतिष्याने 'तुमच्या लेकराला मुलींकडून फायदा होईल ताई' असं माझ्या आईला सांगितलेलं मला आठवतं. हे वाक्य आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर (म्हणजे मी अजून वानप्रस्थाश्रम घेण्याइतका म्हातारा झालेलो नाही. तरीही वयाच्या पाचव्या वर्षानंतरच्या आतापर्यंतच्या आयुष्याचे दहा दहा वर्षांचे चार टप्पे केले तर) त्या त्या वयातील कुमारसुलभ किंवा तारुण्यसुलभ किंवा गृहस्थसुलभ भावनांमुळे मला आशावादी राहण्यात मदत करत आलेलं आहे. असं असलं तरी त्या वाक्याची मला प्रचिती आलेली नाही असं माझं मत होतं. पण आज महिला दिनावरच्या इतरांच्या पोस्ट्स पाहून मला मुलींमुळे झालेल्या फायद्याबद्दल विचार करावासा वाटला. तेव्हा जाणवलं की,

माझ्या आयुष्यात भरपूर मुली येतील याची काळजी माझ्या जन्माअगोदरच माझ्या आजी आजोबांनी घेतली आणि मला पाच मावश्या असतील अशी व्यवस्था करुन ठेवली होती. आजी आजोबांच्या थोरल्या मुलीचा मी पहिला मुलगा असल्याने मी 'पुतना मावशी' असं म्हटलं तरी कौतुकाने धपाटे घालत आपल्या पहिल्या भाच्याचं कौतुक करण्यात सगळ्या मावश्या दंग असायच्या. अशी माझ्या आयुष्याची सुरुवात भरपूर कौतुक करणाऱ्या मुलींमधेच झाली. आजोबांच्या सहाही मुलींचा मी लाडका आहे आणि आपलं हे लेकरू किंवा भाचरू चांगलं आहे या त्यांच्या माझ्यावरच्या विश्वासामुळे आत्यंतिक निराशेच्या कित्येक क्षणांत मला आधार दिलेला आहे.

नंतर शाळेत गेलो. मुलामुलींची एकत्र शाळा असली तरी एकाच बाकावर आपापल्या आवडत्या मित्र मैत्रिणींशेजारी बसण्याची मुभा नव्हती. त्यामुळे वर्गात एका अदृष्य रेषेच्या डावीकडे मुलं आणि उजवीकडे मुली अशी दहा वर्षे काढली. मी डाव्या विचारांकडे ओढ घेणारा मुलगा असावा हे माझ्या शिक्षकांना कसं काय कळलं कुणास ठाऊक? पण कदाचित डाव्या विचारांना डोंबिवलीत मूळ धरता येऊ नये म्हणून किंवा मग मी अतिशय निरुपद्रवी आहे याची खात्री पटल्यामुळे मला कायम या अदृष्य रेषेवर बसायला मिळालं. त्यामुळे डावीकडचं हृदय मुलांच्या बाजूला असूनही माझ्या उजव्या मेंदूवर मुलींच्या कोलाहलाचे कोमल घाव दहाही वर्षं पडत राहिले.

वर्गात मुलींच्या बाजूला पेन किंवा पेन्सिल पडली तर आता ती कायमची गेली असं समजावं हे सांगणाऱ्या शाळेत दहा वर्षे गेल्याने कुमारसुलभ भावनांना तोंड फोडणं मला जमलं नाही. पण कधीतरी चुकून किंवा जाणूनबुजून उजव्या बाजूला पडणारी माझी पेन्स, पेन्सिली आणि खोडरबरं मी न मागताही मला कायम परत मिळत होती. त्यामुळे जगात चांगुलपणा आहे यावरचा माझा विश्वास टिकून राहिला.

शाळेची दहा वर्षे शब्देविण संवादात गेल्याने कॉलेजात गेल्यावर, परमेश्वराने सृष्टीचं चालन करण्यासाठी तयार केलेल्या आणि आपल्या मनोरम विभ्रमांनी माझ्या ज्ञानयज्ञात अडथळे आणणाऱ्या अप्सरांशी कसं बोलावं ते मला कळत नसे.

बाईक असलेल्या मुलाच्या आजूबाजूला कोंडाळे करुन उभे असलेल्या या अप्सरांपैकी कुणालाही सायकल चालवणाऱ्या मी जर 'चल डबलसीट गं लांब लांब लांब' म्हणालो असतो तर त्या सर्वांनी जो जीता वही सिकंदरमधील पूजा बेदीला न्यूनगंड येईल अश्या पद्धतीने माझ्याकडे पाहिलं असतं आणि मला माझ्या पायजमाछाप असण्याची जाणीव करून दिली असती. त्यानंतर मला लक्ष्यामामा म्हणून हाका मारायला सुरुवात केली असती. याची कल्पना असल्याने मी तसं काही न करता माझा मुक्काम कॉलेजच्या गेटऐवजी रीडिंग रुममधेच ठेवला. 'लवकर सीए होऊ. पैसे कमवू आणि मग बाईक घेऊन ऐटीत कॉलेजच्या गेटवर येऊ', अश्या विचारामुळे मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं सोपं गेलं. त्यामुळे माझ्या लवकर सीए होण्यातही एका तऱ्हेने मुलींचाच अदृश्य हात होता.

स्वतः फार देखणा नसताना केवळ गप्पा मारण्याच्या आणि स्वप्न रंगवून सांगण्याच्या बळावर जेव्हा मी एका अठरा वर्षाच्या मुलीला 'तुम जो पकड लो हाथ मेरा दुनिया बदल सकता हूं मै' हे पटवू शकलो तेव्हा आपण असं करू शकतो यावर माझा विश्वास पक्का करण्यात माझ्या त्या प्रेयसीचा मोठा हात होता. जेव्हा तिचा हात मागायला तिच्या घरी एकटा गेलो होतो तेव्हा आपला नवरा कदाचित नाही म्हणेल हे जाणवून त्याला माजघरात बोलवून तसं न करण्याची सूचना देणाऱ्या सासूबाईंमुळे, 'केवळ माझ्या आजोबांच्या मुलीच नव्हे तर जगातील इतर ज्येष्ठ स्त्रियाही मायाळू असतात' यावरचा माझा विश्वास वाढला होता.

आणि त्यानंतर आजतागायत 'मी आणि माझ्या आईने तू मला सुखात ठेवशील या तुझ्या शब्दावर विश्वास ठेवला होता त्यामुळे आता तुझा शब्द पूर्ण कर', असं केवळ नजरेने सांगून मला आळशीपणापासून दूर ठेवण्यातही माझ्या तत्कालीन प्रेयसीचा आणि सध्याच्या अर्धांगिनीचा हात आहे.

कॉमर्सचे क्लासेस सुरू केले आणि सायन्सपेक्षा कॉमर्सकडे मुलींचा जास्त ओढा असल्याने वर्गात मुलीच जास्त असतात. परिणामी माझ्या बँकेत येणारी लक्ष्मी ही मुलींच्या पावलानेच आली.

पुण्यात क्लासची शाखा काढायचं ठरवलं तेव्हाही शाळेच्या वर्गातील आता पुण्यात स्थायिक झालेल्या मैत्रीणींनी आणि फेसबुकवर ओळख झालेल्या मैत्रिणींनी आणि त्यांच्या नवऱ्यांनीही खूप मदत केली.

आता जाणवतं आहे की त्या नंदीबैलवाल्याची बत्तीशी अगदीच काही खोटी ठरली नाही. खरोखरंच मला मुलींकडून भरपूर फायदा झाला आहे. त्यामुळे माझा फायदा करून देणाऱ्या आणि जसा मी आहे तसा होण्यास मला मदत करणाऱ्या सर्व ज्ञात आणि अज्ञात मुलींना महिला दिनाच्या शुभेच्छा.

Sunday, February 9, 2020

भैरप्पांची साक्षी आणि कुरोसावांचा राशोमोन

भैरप्पांची साक्षी ही नवीन प्रसिद्ध झालेली कादंबरी वाचली. नवीन म्हणजे मराठीत नवीन. कारण मूळ कानडी कादंबरी तीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली होती. तिचा मराठी अनुवाद आता प्रसिद्ध झाला.


स्त्री पुरुष संबंध. एका माणसाची टोकाची अनिर्बंध कामेच्छा आणि त्यातून झालेला त्याचा खून. एक माणसाचा टोकाचा सत्यवादीपणा आणि त्यातून त्याने केलेली आत्महत्या; एका माणसाचा टोकाचा कंजूषपणा आणि त्यातून झालेली त्याच्या मोजक्या कुटुंबियांची कुचंबणा; एका स्त्रीचा टोकाचा हट्टीपणा आणि त्यातून झालेली तिची परवड; एका माणसाचा टोकाचा निरिच्छपणा आणि त्यातून त्याच्या कुटुंबीयांची होणारी घुसमट; एका स्त्रीचा टोकाचा राग आणि त्यामुळे तिच्या हातून घडलेला नृशंस खून; हे साक्षीचे मुख्य खांब आहेत. आणि या खांबांच्या बरोबर भारतीय पुराणातील चित्रगुप्ताची कल्पना वापरत भैरप्पा सत्य या संकल्पनेचे पदर उलगडण्याचा प्रयत्न करतात. 

कादंबरीचा मराठी अनुवाद नुकताच प्रसिद्ध झालेला असल्याने कादंबरीचा गोषवारा देऊन वाचकांचा रसभंग करणं मला योग्य वाटत नाही. त्याचप्रमाणे मी रूढार्थाने समीक्षकही नाही. त्यामुळे कादंबरीच्या कथावस्तूबद्दल न बोलता कादंबरी वाचताना माझ्या आयुष्यातील काही प्रसंगांमुळे माझ्या मनात कोणकोणते विचार आले तेव्हढेच मांडायचा प्रयत्न करतो आहे. 

भारतीय परंपरेत, चित्रगुप्ताकडे सगळ्यांच्या पाप पुण्याचा हिशोब असतो आणि मृत्यूनंतर आत्म्याला स्वर्गात पाठवायचे की नरकात याचा निर्णय घेण्यासाठी यमधर्माला या हिशोबाचा उपयोग होतो असं मानलं जातं. भैरप्पा या संकल्पनेचा विस्तार करत चित्रगुप्त ही एक व्यक्ती नसून एक व्यवस्था आहे असं चित्र रंगवतात. प्रत्येक व्यक्तीबरोबर एक चित्रगुप्त त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अदृश्य साक्षी म्हणून वावरत असतो. मृत्यूनंतर जेव्हा त्या व्यक्तीचा आत्मा यमधर्मासमोर उभा राहतो तेव्हा त्याला आपल्या आयुष्याचा लेखाजोखा स्वतःच मांडायचा असतो. हे करत असताना जर त्या व्यक्तीच्या आत्म्याने असत्याचा आधार घेतला तर मात्र चित्रगुप्ताचा नम्र आणि गंभीर आवाज मधे येतो आणि घडलेल्या घटनांवर व्यक्तीने चढवलेले असत्याचे आवरण दूर करतो असा भैरप्पांचा कल्पनाविस्तार आहे. 

पुनर्जन्म ही भारतीय परंपरेला मान्य असलेली संकल्पना आहे. त्यामुळे पहिला जन्म संपल्यावर त्याचा पाढा यमधर्मासमोर वाचायचा मग स्वर्ग किंवा नरकवास. पुण्यक्षय किंवा पापक्षयानंतर स्वर्ग किंवा नरकवास संपवून मग दुसरा जन्म मग पुन्हा मृत्यूनंतर पुन्हा आयुष्यातील घटनांची उजळणी मग पुन्हा स्वर्ग किंवा नरकवास. हे चक्र मोक्ष मिळेपर्यंत चालू राहणार आहे अशी भारतीय मान्यता आहे. त्यात आयुष्याची उजळणी करताना मनुष्य असत्य बोलू शकतो हे गृहीत धरलेलं आहे. म्हणजे असत्याचा जन्म माणसाच्या जन्माआधीच झालेला असतो आणि माणसाच्या मृत्यूनंतरही असत्याचा मृत्यू होत नाही. किंबहुना सत्य आणि असत्य हे सृष्टीचे मूळ घटक असावेत आणि त्यापैकी कशाचा वापर करावा ते व्यक्ती ठरवते. त्यामुळे व्यक्ती सत्य सांगते आहे की असत्य ते प्रत्यक्ष यमधर्मालाही माहीत नसते. ते माहीत करून घेण्यासाठी मग यमधर्माला गरज पडते ती साक्षीची. 

अर्थात इथे भैरप्पा घटनेच्या सर्व बाजू त्या घटनेत सहभागी असलेल्यांना माहिती असतातंच पण तरीही व्यक्ती असत्य बोलतात असा मुद्दा मांडत नाहीत. याउलट एखाद्या घटनेत आपला सहभाग किती होता आणि का होता याचं स्पष्टीकरण देताना व्यक्ती असत्याचा आधार घेऊ शकते असा मुद्दा मांडतात. म्हणजे कादंबरीत सत्य असत्याची केलेली चर्चा ही घटनेच्या सत्य स्वरूपाबद्दल नसून घटनेतील सहभागी व्यक्तींनी आपापल्या वर्तणुकीच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याच्या सत्यासत्यतेबद्दल आहे. मग हे समर्थन सत्य आहे की असत्य ते ठरवणार कसं? त्यासाठी भैरप्पा चित्रगुप्त या व्यवस्थेची योजना करतात. 

जो सर्व घटनांच्या वेळी होता पण कुठल्याही घटनेत कुठल्याही प्रकारे ज्याची भावनिक गुंतवणूक नव्हती, कुठल्याही घटनेतून ज्याला कुठलाही फायदा अगर तोटा होणार नसतो तोच खरा साक्षी असू असतो. आणि त्याने साक्ष देताना केलेलं व्यक्तीच्या मनोव्यापारांचं वर्णन हेच सत्यकथन असू शकतं असा एक मुद्दा भैरप्पांनी मांडला आहे. 

कादंबरी वाचून संपली. सत्य असत्याबद्दल आणि सत्यकथनाबद्दल भैरप्पांचे विचार मनात घोळत राहिले. 

मग एके दिवशी चुलत सासू सासऱ्यांना पुण्याहून डोंबिवलीला घेऊन जात असताना भरपूर गप्पा मारत होतो. बोलता बोलता बोलेरो या संगीताचा विषय निघाला. म्हणून यूट्यूबवर त्यांना बोलेरो लावून ऐकवलं. 


मग त्याबद्दल बोललो. मग हे कुठे कुठे वापरलं आहे ते सांगताना राशोमोनचा विषय निघाला. म्हणून राशोमोनमधे वापरलेला जपानी बाजाचा बोलेरोचा तुकडा त्यांना ऐकवला. 



मग राशोमोनबद्दल बोललो. गाडीचं स्टीयरिंग माझ्या हातात असल्याने, मी जे ऐकवीन आणि सांगीन ते निमूटपणे ऐकण्यापलीकडे त्यांच्या हातात काही नव्हतं. पण घरी गेल्यावर जेव्हा मी त्यांना राशोमोन पाहणार का? असं विचारलं तेव्हा त्यांनी चटकन हो म्हटलं त्यामुळे मी त्यांना अगदीच बोअर केलं नाही हे जाणवून मला थोडं हायसं वाटलं. 

राशोमोन सुरु केला. लाकूडतोड्याची साक्ष संपली. पोलिसाची साक्ष संपली. सामुराई योद्ध्याच्या बायकोची साक्ष संपली. सासरे आणि मुलं तल्लीन होऊन राशोमोन पाहत होते. आणि त्यांना आपण एक महान आनंद मिळवून दिला आहे असा विचार करून मी खूष होत होतो. मग राशोमोनमधला महत्वाचा प्रसंग सुरु झाला. मृत सामुराई योद्ध्याच्या आत्म्याला साक्ष देण्यासाठी कोर्टांत बोलावलं गेलं. आणि मी चपापलो. मृताम्याची साक्ष. चार दिवसांपूर्वी भैरप्पांनी शब्दरूपात रंगवलेली मृत व्यक्तीची साक्ष वाचली होती आणि आता कुरोसावांनी चित्रपटात रंगवलेली मृत व्यक्तीची साक्ष बघत होतो. 

माझ्या नकळत मनातल्या मनात या दोन्ही साक्षींची तुलना सुरु झाली. 

साक्षीमधे आणि राशोमोनमध्ये सत्य काय असत्य काय? हे समान सूत्र आहे. पण त्यांचा विस्तार मात्र वेगवेगळ्या दिशेने जातो. 

राशोमोनमधील साक्ष मानवी न्यायालयात आहे. 

घटनेचे अनेक पदर असतात. आणि प्रत्येक व्यक्ती जेव्हा तिच्या बाजूने घटना मांडते तेव्हा एकाच घटनेबद्दल वेगवेगळ्या कथा समोर येतात. मग त्यातील सत्य कुठली आणि असत्य कुठली?, हे कसं ठरवायचं? वेगवेगळ्या कथनांमधून कुणावर विश्वास ठेवायचा? हे मुद्दे राशोमोमधे मांडलेले आहेत. लाकूडतोड्या असत्य सांगत आहे हे यात्रेकरूला लगेच कळतं. त्यामुळे बुद्ध भिक्षूलाही लाकूडतोड्या, पोलीस, ताजोमारू, बलात्कारित स्त्री, सामुराईचा आत्मा यापैकी कुणीच संपूर्ण सत्य सांगत नाही आहे याचा उलगडा होतो. आणि तिथेच राशोमोन पुढचा प्रश्न टाकतो. 

जेव्हा सगळेच खोटं बोलत आहेत हे कळून चुकतं तेव्हा माणसाने कुणावरही विश्वास ठेवण्यासाठी कशाचा आधार घ्यायचा? लाकूडतोड्याकडे लहान मूल सोपवून बुद्ध भिक्षू त्याची निर्णय घेण्याची पद्धत आपल्याला सांगतो. जेव्हा सगळे जण खोटं बोलत आहेत असं कळतं तेव्हा ज्याच्याकडे खोटं बोलण्यासाठी सबळ कारण आहे आणि ते जीवनाला पुढे नेणारं आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा अशी मांडणी राशोमोनने केली आहे, असं माझं आकलन आहे. 

म्हणजे माझ्या मते सत्य काय? असत्य काय? या प्रश्नांवरून सुरु होणारा राशोमोनचा प्रवास सगळेच आपापल्या वर्तनाचे समर्थन करण्यासाठी असत्याचा आधार घेत असताना विश्वास कुणावर ठेवावा? या प्रश्नापर्यंत पोहोचतो.

राशोमोनच्या माध्यमातून असत्याचा जन्म कसा होतो ते कुरोसावा आपल्याला सांगतात आणि त्यापासून सुटका नाही हेही समजावतात. व्यक्तीला दिसणारी घटना अर्धसत्य असते. त्या घटनेचं स्वतःच्या प्रतिमेला सुसंगत असं चित्र प्रत्येक व्यक्ती तयार करते आणि त्यालाच सत्य मानते. त्यामुळे घटनेची न दिसलेली बाजू आणि स्वप्रतिमाप्रेम यातून असत्याचा जन्म होतो. मूळ घटना आणि व्यक्तीने सांगितलेली घटना यात किती अंतर आहे हे सांगणं कुणालाही शक्य नाही; अशी सिद्धता मांडून मग वेगवेगळ्या असत्यांत जगत असताना माणसाने आजूबाजूंच्यापैकी कोणावर आणि कशाच्या आधारावर विश्वास ठेवावा ? या प्रश्नाकडे कुरोसावा आपलं लक्ष वेधतात. 

याउलट साक्षी कादंबरीतील साक्ष यमधर्मासमोर आहे. 

साक्षी कादंबरीमध्ये मृत व्यक्तीने केलेलं वर्णन सत्य आहे की असत्य आहे हे सांगण्यासाठी चित्रगुप्त या दैवी साक्षीदाराची योजना केलेली आहे. आणि यमधर्माच्या तोंडी, 'इथे चित्रगुप्ताचा शब्द प्रमाण मानला जातो', या अर्थाचं वाक्य आहे. 

म्हणजे साक्षीत असत्य हा जीवनाचा एक घटक मानला आहे. त्याची निवड करावी अगर नाही तो व्यक्तीचा निर्णय असतो. व्यक्तीला जे दिसतं ते अर्धसत्य आहे हे भैरप्पांनाही मान्य आहे. पण आपल्याला दिसलेलं अर्धसत्य जसं आहे तसंच सांगावं की त्यात स्वतःची प्रतिमा वाचवणारे आणि स्वतःचे हेतू दडवणारे रंग मिसळून त्याला बदलावं हा व्यक्तीचा निर्णय असतो. आणि व्यक्तीने असे रंग मिसळले आहेत की नाहीत ते सांगणं चित्रगुप्ताला शक्य असतं, असं प्रतिपादन साक्षी कादंबरी करते. जर सत्य काय आहे ते शोधणं शक्य असेल तर वेगवेगळ्या असत्यांच्या जगात विश्वास कुणावर आणि कशाच्या आधारावर ठेवायचा?, हा प्रश्न भैरप्पांच्या पात्रांना पडत नाही. 

म्हणजे राशोमोनमध्ये घटना सत्य, तिचा अनुभव घेणाऱ्यांना होणारं तिचं आकलन अर्धसत्य तर त्यांच्या कथनातून जगाला त्या घटनेची होणारी वेगवेगळी दर्शनं म्हणजे असत्याची वेगवेगळी रूपं असा मुद्दा आहे. याउलट साक्षीमध्ये घटना सत्य, तिचा अनुभव घेणाऱ्यांना होणारं तिचं आकलन भलेही अर्धसत्य असलं तरी त्याच्यापुरतं ते सत्य आणि जर त्याने त्याच कथन करताना आपले रंग त्यात मिसळले तर ते असत्य असा मुद्दा आहे. 

राशोमोनमध्ये असत्यापासून सुटका नाही. याउलट साक्षीमध्ये चित्रगुप्त साक्षीदार असल्याने आणि त्याचा शब्द प्रमाण मानणे हाच नियम असल्याने असत्याला झिडकारणे शक्य आहे. 

असा विचार करत मी भानावर आलो. तोपर्यंत सासरे झोपी गेले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा काही सांगण्यासाठी झोपेतून उठवणं मला जीवावर आलं होतं. त्यामुळे माझ्या मनात आलेला शेवटचा प्रश्न अनुत्तरीत राहिला. 'जर भैरप्पा जपानी परंपरेत वाढलेले असते तर चित्रगुप्ताशिवाय त्यांनी साक्षी कादंबरी कशाप्रकारे मांडली असती? आणि जर कुरोसावा भारतीय परंपरेत वाढलेले असते तर चित्रगुप्त वापरून त्यांनी राशोमोनचा शेवट कसा केला असता?


विविध परंपरा आणि अध्यक्षीय लोकशाही

वेगवेगळ्या चालीरीती, परंपरा, आहारविहार पध्दती असूनही सलग भूभागामुळे व एकसदृश संस्कृतीने आणि युरोपियनांच्या कृपेने आधुनिक कायदापध्दतीने एक देश म्हणून एकत्र होणाऱ्या प्रदेशांतून देशनिर्माण होण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून आणि परंपरांतील भिन्नत्वामुळे विघटनवादी विचार भविष्यात प्रबळ होऊ नयेत म्हणून, 'ताकदवान केंद्रीय सत्ता आणि किंचित कमी ताकदवान प्रादेशिक सत्ता', असं प्रारूप भारतीय घटनेने स्वीकारलं.

स्वातंत्र्य चळवळीत दीर्घकालीन सक्रिय सहभाग आणि भारतीय जनतेच्या मूळ भावनिक व वैचारिक बैठकीशी सांधा जुळलेल्या कॉंग्रेस पक्षाला स्वातंत्र्यचळवळीनंतर या घटनात्मक प्रारुपाचा फायदा झाला. परिणामी प्रबळ केंद्रीय सत्ता आणि किंचित कमी ताकदवान प्रादेशिक सत्ताही हाती आलेला कॉंग्रेस, हा एक प्रबळ राजकीय पक्ष होत गेला. त्याचबरोबर देशात सत्ता राबवायची तर केंद्र आणि राज्य या दोन्ही ठिकाणी एकंच पक्ष हवा हा विचारही दृढ होत गेला.
भिन्न परंपरा आणि भिन्न राजकीय अस्मिता असलेल्या या नवजात देशात घटनाकारांना ज्याचा अंदाज आला होता त्याप्रमाणे हळूहळू प्रादेशिक पक्षही जन्म घेऊ लागले. आणि स्वातंत्र्यचळवळीतील 'आपण एक देश आहोत' ही जाणीव हळूहळू हरपू लागली आणि आपापल्या प्रदेशाची अस्मिता उच्चारवात मांडणाऱ्या राजकीय पक्षांकडे लोक ओढले जाऊ लागले. यातून कॉंग्रेस पक्षाला अन्य राजकीय पक्षांचे टेकू घेणं आणि आपल्या देशाला एकामागून एक कडबोळं सरकार मिळणं असा काळ सुरू झाला. सध्या केंद्रात प्रबळ असलेल्या भाजपलाही प्रादेशिक पक्षांबरोबर हातमिळवणी करत करतंच आपलं राष्ट्रीय स्वरुप प्राप्त करता आलं आहे.
म्हणजे कॉंग्रेसचा प्रवास प्रबळ राष्ट्रीय पक्षाकडून प्रादेशिक पक्षांच्या टेकूवर चालणारा राष्ट्रीय पक्ष असा होत असताना भाजपचा प्रवास मात्र प्रादेशिक पक्षांच्या टेकूवर चालणाऱ्या पक्षाकडून प्रबळ केंद्रीय पक्ष असा होत गेला. तुम्ही ज्यांच्याशी स्पर्धा करता त्यांच्यासारखेच तुम्ही बनत जाता या नियमाला अनुसरूनंच दोन्ही पक्षांची वाटचाल झाली आहे. प्रादेशिक पक्षांच्या अरेरावीमुळे आणि संकुचित दृष्टिकोनामुळे वैतागलेल्या नागरिकांच्या पाठिंब्याने भाजपची वाटचाल अधिक वेगवान होत गेली आणि त्याचबरोबर अजून एक विचारप्रवाह सुरू झाला की आपल्या देशात अमेरिकेप्रमाणे अध्यक्षीय प्रारुप आणि द्विपक्षीय राजकीय पध्दत अमलात यावी.
प्रबळ एक धर्म, मोठ्या जनसमूहाची एक भाषा आणि बहुतांश समाजाचा एक देव असलेल्या अमेरिकेचं हे प्रारुप व पध्दत आपल्याला आवडणं यात चुकीचं काहीच नाही. देखणी बायको दुसऱ्याची याप्रमाणे चांगली राजकीय पध्दतही दुसऱ्याचीच असते. विशेषतः संकुचित मानसिकतेचे प्रादेशिक पक्ष आणि आपापल्या गटातटांना फायदा करुन देण्यासाठी सत्ता वापरण्याची त्यांची मानसिकता दिसत राहिली की अमेरिकन घटना आणि अमेरिकन राजकीय पक्षप्रणाली आवडली नाही तर नवलच.
हा विचारप्रवाह भाजप आणि कॉंग्रेस या दोघांच्या पथ्यावर पडणारा असल्याने त्यांचे समर्थक या विचाराला कळतनकळत पुढे रेटत रहाणार हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे.
पण ती पध्दत, प्रणाली व प्रारुप एक भाषा, एक धर्म, एक अस्मिता तयार करून(कुठलेही अत्याचार करुनका होईना) झाल्यानंतर अधिक प्रभावीपणे वापरणं शक्य आहे. आणि जर ते आपल्याला मान्य असेल तर आपल्या या नवजात देशातील कित्येक परंपरा, धर्म, आहारविहार पध्दती यांच्यावर वरवंटा फिरवणंही आपल्याला मान्य करावं लागेल. हे वेगवेगळ्या परंपरांचे पर्वतप्राय उंचवटे आपल्याला समतल करावे लागतील. कुणी कितीही सांगो पण ती प्रक्रिया अन्यायकारीच असणार आहे. जर हा अन्याय करण्याचं पातक आपल्या माथी नको असेल तर मग प्रादेशिक अस्मितांच्या जंजाळात न गुंतवता आणि दमनकारी समतलतेचा आग्रह न धरणाऱ्या प्रबळ केंद्रीय सत्तेच्या वरवंट्याखाली जाऊ न देता, या देशाला प्रगतीपथावर नेण्याचा मार्ग कुठला? या प्रश्नाने मलाही छळलं होतं.
पण दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने निवडणूक लढण्यासाठी ज्या मुद्द्यांची निवड केली आणि प्रचार संपेपर्यंत त्यापासून न ढळता आपली बांधिलकी घट्ट केली ते पहाता या प्रश्नाचं उत्तर सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे असं मला वाटतं.
प्रादेशिक पक्षांनी आपापल्या अस्मिता जपताना केवळ विकासाकडे आणि नागरी जीवन सुखकर करण्याकडे लक्ष दिलं तर अनेकानेक प्रादेशिक पक्ष असूनही; विविध परंपरा, भाषा, धर्म, आहारविहार पध्दती असूनही ; त्यांच्यावर वरवंटा न फिरवता प्रगती साधणं कठीण असलं तरी अशक्य नाही. आणि त्यात ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्माप्रमाणे एकमेव मार्गाचा आग्रह नसून 'विप्रा बहुधा वदन्ति' चा भारतीय सूर आहे.
त्यामुळे 'आप'ला दिल्ली निवडणुकीसाठी शुभेच्छा आणि अन्य राज्यांतील भाजपेतर पक्षांच्या सरकारांना आपचे निवडणूक मॉडेल आपापल्या परंपरांच्या कोंदणात कसे बसवता येईल ते लवकर सुचो या शुभेच्छा. त्याचबरोबर विरोधी विचारांना देशद्रोही न ठरवता व कुठलाही धरबंद न ठेवता कुणालाही जवळ करण्याची सवय सोडून प्रबळ केंद्रीय सत्तेचं काय करायचं याचं उत्तर भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनाही सुचो अशा त्यांना शुभेच्छा. आणि सर्वात शेवटी 'केंद्रात व राज्यात एकाच पक्षाची सत्ता असावी' याऐवजी 'केंद्रात पूर्ण बहुमत असलेल्या राष्ट्रीय पक्षाची तर राज्यात पूर्ण बहुमत असलेल्या प्रादेशिक पक्षाची सत्ता असावी' हा विचार भारतीय मातीतून मोठा होऊन प्रगतीचा नवा मार्ग जगाला मिळो ही सर्वांना शुभेच्छा.

Sunday, February 2, 2020

भाकरी फिरली

आजच्या अर्थसंकल्पातील सगळ्यात जास्त चर्चा झालेला मुद्दा म्हणजे आयकराच्या दरांची नवीन रचना.

अर्थशास्त्रात भांडवलाची उभारणी करण्याचे तीन टप्पे मानले जातात. बचत > गुंतवणूक > भांडवल. ज्या देशात नागरिकांना बचतीची सवय नसते, किंवा त्यांची बचत दागिने अथवा तळघरातील हंड्यात अडकलेली असते तिथे गुंतवणूक होणं आणि नंतर त्यातून भांडवलाची निर्मिती होणं हे पुढचे दोन्ही टप्पे प्रत्यक्षात येणं अशक्य असतं.

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात बचतीबाबत व मुख्य प्रवाहात तिच्या गुंतवणुकीबाबत कमालीचं औदासिन्य होतं. लोक साधा आयुर्विमा काढायला नकार द्यायचे. आयुर्विमा काढणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण अशी धारणा असलेली कित्येक वडिलधारी मंडळी माझ्या ओळखीची आहेत. मेडिक्लेम, म्युच्युअल फंड, घरबांधणी, मुलांचं शिक्षण यासारख्या समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या कित्येक बाबतीत, आपल्या देशातल्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पहिल्या कर्त्या पिढीत काहीही आकर्षण नव्हते.

त्यातून सुरु झाला आयकर कायद्याचा कल्पक वापर. आयुर्विमा काढा, मेडिक्लेम काढा, घर बांधा, सरकारी कर्जरोखे घ्या, मुलांच्या शिक्षणावर खर्च करा आणि यातल्या बहुतेक सर्व गोष्टी तुमच्यासाठी गुंतवणूक असली तरी ती तुमच्या उत्पन्नातून वजा करा आणि मग उरलेल्या उत्पन्नावर कर भरा. करही कमी आणि चांगल्या भविष्याची हमी अशी ही व्यवस्था होती.

यातून भांडवल निर्मितीच्या पहिल्या दोन टप्प्यांवर आपल्या अर्थव्यवस्थेने पुढे जाण्यास सुरुवात केली. पण तिसरा टप्पा म्हणजे भांडवलाची निर्मिती; तिथे मात्र आपण अडखळलो.

उत्पादन क्षेत्रात भरारी न घेता आपण सेवाक्षेत्रात उड्डाण केलं. काही लोकांच्या हातात खेळता पैसा आला. त्यावरचा आयकर कमी करण्यासाठी बचतीचा मार्ग खुला होता. त्यामुळे रियल इस्टेट सेक्टरमधे झुकाव निर्माण झाला. बहुसंख्य लोकांना परवडतील अशी छोटी आणि मध्यम आकाराची घरे बांधण्याऐवजी मोठी घरे बांधण्याकडे आणि ती विकली जात नसल्यास किंमत कमी करण्याऐवजी त्यांना तसेच पडून राहू देण्याकडे या क्षेत्राचा कल वाढला. भांडवल तयार होण्याऐवजी अडकू लागलं.

रियल इस्टेटमधे अनैसर्गिक भाववाढ होत असताना लोक आयकरात सूट मिळावी म्हणून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतंच होते, एलआयसीत करत होते आणि मग या संस्थेकडील रकमेला पाय फुटत होते. सरकारातील चलाख लोक या संस्थांचा पैसा आपल्या हेतूंसाठी वापरून घेत होते. आयकरातील सवलतीमुळे नवीन गुंतवणूकदार येत असल्याने जुन्यांच्या पैशाची परतफेड करणं शक्य होत होतं. पण अर्थव्यवस्था केवळ भगवानभरोसे चालत होती. चांगली भाजायला घेतलेली भाकरी करपायला लागली होती.

या सरकारने घेतलेला कराच्या नवीन दरांचा निर्णय मात्र भाकरी फिरवायची सुरुवात आहे. आज ज्यांच्या डोक्यावर गृहकर्ज आहे ते नवीन कररचनेचा फायदा घेणार नाहीत हे सरकारला माहिती आहे. किंबहुना ही कररचना त्यांच्यासाठी नाही. आजच्या बजेटमुळे त्यांना कुठल्याही नवीन सवलती मिळालेल्या नाहीत. पण ज्यांच्या डोक्यावर कर्ज नाही त्यांनी ते घेताना पुन्हा विचार करावा. ज्यांच्या प्रपंचाच्या बहुतेक जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या आहेत त्यांनी केवळ आयकरात सूट मिळावी म्हणून गुंतवणूक न करता आता ते पैसे सरळ खर्च करावेत अशी व्यवस्था आज अस्तित्वात आली आहे.

पुढे जाऊन सर्व वजावटी आणि सुटी रद्द करण्याचा सरकारचा मानस असल्याने येत्या काही वर्षांत ज्यांच्या नावावर अजून एकही घर नाही ते लोकही घर विकत घेणं आणि भाड्यावर घेणं यात खरोखर फायदेशीर काय त्याचं गणित मांडून मगंच कर्जाचं ओझं डोक्यावर घेतील. एलआयसीत किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी शंभरदा विचार करतील याची शक्यता जास्त आहे. अनेक लोक आयुर्विमा काढणं बंद करतील असं मी म्हणत नसून. आयुर्विमा विकणं आता अधिक कठीण होत जाणार आहे.

बाजार स्वतःहून आपल्या फायद्याचा झुकाव सोडणं अशक्य आहे. त्यामुळे ही फिरलेली भाकरी आता तो झुकाव मोडते का? ते बघणं मोठं औत्सुक्याचं ठरेल.

सरकारने आज जे निर्णय घेतले आहेत त्यामुळे रियल इस्टेट सेक्टरमधे मागणी घटणे, विमा व अन्य गुंतवणूक क्षेत्रात लोकांचा रस कमी होणे हे परिणाम घडताना दिसतील. पण भारतीय जनता या उरलेल्या पैशाचे काय करेल? त्यावर आपली भाकरी कच्ची राहील की चांगली शेकून निघेल ते ठरेल. आणि आजपासून पन्नास साठ वर्षांनी आपल्या व्यवस्थेतील वृध्दांकडे जर पुरेशी गुंतवणूक नसेल तर तेव्हाच्या कुटुंबव्यवस्थेतील वृध्दांचं स्थान दयनीय असेल.

Thursday, January 9, 2020

विश्वाचा पसारा

गजर झाला. जाग आली. पण अंथरुणात लोळत राहिलो. काल एका मैत्रिणीने पाठवलेलं 'झोपणे इज अ थिंग बट लोळणे इज अ फीलिंग' मीम अनुभवत होतो. बायनरी म्हणजे काय यावरचा टेड एडचा व्हिडिओ बघण्यात वेळ गेला. मग घाईघाईत उठलो. चालायला जायला उशीर झाला असं वाटलं होतं पण मोबाईलवर अॉडियोबुक सुरु करताना बघितलं तर नेहमीच्याच वेळेवर पोचलो होतो.

टेकडीच्या पायथ्यापासून वर चालायला निघालो. अॉडियोबुकची फाईल बहुतेक करप्ट झाली होती. त्यामुळे ते बंद केलं. अजून झुंजूमुंजू झालेलं नव्हतं त्यात आज वीकडे त्यामुळे रस्त्यावर चिटपाखरुही नव्हतं. रात्र वाटावी असा पहाटेचा काळोख, नीरव शांतता, हवीहवीशी पण किंचित बोचरी थंडी आणि भरपूर धुकं. त्यातून चाललेला मी.

मग मधलं मैदान आलं. इथली जागा अशी आहे की एका बाजूला जंगल, मधे रस्ता, दुसऱ्या बाजूला मैदान त्याच्या पुढे पुन्हा जंगल. त्या जंगलातून माझी नेहमीची पायवाट जाते म्हणून तिथे वळलो. समोरचं दृश्य खरोखर अवर्णनीय होतं. तरी थोडा प्रयत्न करतो.

मैदान. त्यात माझ्या आधी आलेल्या लोकांच्या उभ्या केलेल्या तुरळक कार्स. पुढे निस्तब्ध झाडं. झाडांवर तरंगणारा धुक्याचा ढग. आणि त्या सगळ्यापुढे उभा असलेला एकटा मी. सोबतीला माझ्याच श्वासाचा आवाज. मला एकदम हॅरी पॉटरमधला मेझ सीन आठवला.



मग ख्रिस्तोफर नोलानच्या कुठल्यातरी सिनेमातला मी नायक आहे असं वाटून मी खूष झालो आणि जंगलात शिरलो.

पुढे एका ठिकाणी अरुंद वाट आहे आणि दोन्ही बाजूच्या झाडांच्या फांद्या एकमेकांत गुंफल्या गेल्याने एखाद्या लांबलचक गुहेतून किंवा कमानीखालून गेल्यासारखं वाटतं तो भाग आला. धुकं अजूनंच दाट झालं होतं. रस्ता नेहमीचा असूनही मी वेग कमी करुन थोडा हळू जाऊ लागलो.

त्या अंधाऱ्या थंडीत झाडांच्या कमानीखाली माझ्या पायाखालच्या ओलसर पाचोळ्याचा माझ्याच चालण्यामुळे झालेला आवाज ऐकू आला. आणि वाटलं या पाचोळ्याखाली असलेल्या लहान किडा मुंग्यांचं आणि कृमी किटकांचं अस्तित्व मला जाणवतही नाही आहे. त्यांच्यासाठी मी गलिव्हर आहे. एखादा महाकाय राक्षस आहे. घटोत्कच किंवा बकासूर.

किडामुंगीच्या तुलनेत स्वतःच्या महाकाय आकाराची जाणीव होऊन उगाच खूष झालेलो असताना एकाएकी मला असं वाटलं की आता या जंगलावरून एखादं विमान जात असेल तर त्यांना खाली फक्त धुक्याची चादर दिसेल. त्या चादरीखालची टेकडी, टेकडीवरचं जंगल, जंगलातली झाडांच्या दाटीची छोटीशी पायवाट, त्यावरुन एकटाच चालणारा मी; यातलं काहीच त्या विमानातल्या प्रवाश्यांना दिसणार नाही. हा विचार आला आणि या विश्वाच्या पसाऱ्यात आपण किती क्षुद्र आहोत ते जाणवलं.

अणूपासोनी ब्रह्मांडाऐवजी, ब्रह्मांडापासोनी अणूपर्यंत माझ्या विचारांनी एका क्षणात केलेल्या या प्रवासामुळे मी उगाच आनंदी झालो. मनात आलेल्या असंख्य विचारांतील 'विश्वाचा पसारा' या शब्दांचा प्रतिध्वनी पुन्हा पुन्हा ऐकू येत राहिला.

आठवीत असताना शाळेत खगोल मंडळ या संस्थेने एक छोटं व्याख्यान ठेवलं होतं. ते द्यायला तर बारकेला तरुण आला होता. प्रदीप नायक म्हणजे माझा प्रदीप दादा. त्या व्याख्यानानंतर खगोल मंडळाचा पहिला सभासद म्हणून मी नाव नोंदवलं होतं. मग प्रदीप दादाबरोबर दर महिन्याच्या अमावस्येच्या आसपास येणाऱ्या शनिवारी आकाशदर्शनाला जाऊ लागलो. तिथे आकाशदर्शन घडवून आणणारे अनेक मार्गदर्शक यायचे. त्यांच्या सगळ्यांच्या तोंडी हा शब्द कायम असायचा 'विश्वाचा पसारा'. ते सगळं आठवलं.

माझी स्मरणशक्ती बरी असली तरी मी पुढच्या अमावस्येपर्यंत आकाशाचा सगळा नकाशा मी विसरलेला असायचो. 'विश्वाचा पसाराच इतका मोठा आहे की कसा काय लक्षात ठेवणार?' असं म्हणत मी ज्यांना नक्षत्रांचे आकार लक्षात रहातात त्यांचा हेवा करायचो. पडणाऱ्या उल्का मोजत रहायचो. एका रात्री दिडशेच्यावर उल्का मोजल्या होत्या. आणि ते करताना मी इतका रंगून गेलो होतो की मी मधेच 'एकोणपन्नास, पन्नास' वगैरे ओरडत होतो त्यामुळे आकाशदर्शन घडवणारे त्या रात्री माझ्या व्यत्ययामुळे किंचित कावले होते हे मला दुसऱ्या दिवशी घरी जाताना प्रदीप दादाने सांगितलं होतं तेव्हा कळलं. नंतरही बरेच दिवस मला तिथे डोंबिवलीचा उल्का मोजणारा म्हणून ओळखत होते. पुढे एकदा कुणीतरी शंका विचारली असताना प्रमुख वक्त्यांना टिळक पंचांगाचं स्पर्धक पंचांग असलेल्या दाते पंचांगाचं नाव चटकन आठवेना तेव्हा मी जोरात आगरकर पंचांग बोललो आणि माझा लौकिक बदलून आगरकर पंचागाचा मुलगा झाला, ते आठवलं. तीन चार वर्षापूर्वी फेसबुकवर अॉस्ट्रेलियातील मैत्रिण, वाई धोत्रेने मृग नक्षत्रातील बीटलगीज या ताऱ्याबद्दल लिहिलेलं ते आठवलं.

मग प्रदीप दादाने त्याच्याकडचं राहुल सांकृत्यायन असं नाव असलेल्या लेखकाचं वोल्गा ते गंगा नावाचं पुस्तक वाचायला दिलं होतं ते आठवलं. त्या पुस्तकातील प्रवाहण नावाच्या प्रकरणातील ऋषी प्रवाहण आणि लोपमुद्रा व गार्गी यांच्यातील संवाद वाचून पांडुरंगशास्त्री आठवलेंच्या ऋषीस्मरणावर पोसलेल्या माझ्या मनावर खोलवर झालेला परिणाम आठवला. नववीतल्या उमलत्या वयात पिवळी पुस्तके वाचलेली नसल्याने वोल्गा ते गंगातील एका राजाच्या कामजीवनाचं वर्णन वाचून गरम झालेली कानशीलं आठवली. मग पैसे कमवायला लागल्यावर राहुलजींची भरपूर विकत घेऊन ठेवलेली पण हिंदीत असल्याने पूर्ण वाचून न झालेली घरातली पुस्तकं आठवली.

टेकडीवरुन परतताना दूर डोंगरावर दाटलेलं धुकं दिसत होतं. बाईकच्या सीटवर दव पडलेलं होतं. गाडी चालू न करता नुसती उतारावर लोटली. आज रस्त्यावर गर्दी नसल्याने अगदी मेनरोडपर्यंत गाडी चालू न करता यायचं माझं छोटंसं स्वप्न पार पडलं. त्यामुळे खूष झालो. आणि टेकडीचा रस्ता संपून जिथे मुख्य रस्ता सुरू होतो तिथे आमनेसामने असलेल्या दोन टपरीवजा दुकानांसमोर झाडलोट चालू असलेली दिसली. जेमतेम एक माणूस उभा राहील इतकी ती दुकानं छोटी असली तरी एकाच्या नावात मार्केट तर दुसऱ्याच्या नावात सुपरमार्केट आहे हे वाचून मागे एकदा मी हसलो होतो ते आठवलं.

पण आज एकाचवेळी गलिव्हरची भव्यता आणि विश्वाच्या पसाऱ्यातील क्षुद्रता अनुभवल्यामुळे आणि आठवीपासून ते आजपर्यंतचा कालप्रवास व डोंबिवली ते वांगणी ते अॉस्ट्रेलिया ते पुणे असा स्थलप्रवास मनाने केल्यामुळे त्या दोन्ही अनोळखी दुकानदारांबद्दल मनात भरपूर प्रेम दाटून आलं.

त्यांची दुकानं भरपूर चालोत. आपल्या मुलाबाळांना ते भरपूर शिकवोत. मार्केट मेकर, मार्केट रेग्युलेटर आणि मार्केट पार्टिसिपंट या संकल्पना माहीत नसताना आपल्या दुकानाला मार्केट किंवा सुपरमार्केट म्हणत त्यांनी लावलेल्या त्या रोपट्याचा वटवृक्ष करण्याचं बीज त्या मुलाबाळांत रुजो... अशा सदिच्छा मनातल्या मनात व्यक्त करत मी हमरस्त्याला लागलो.