Friday, December 14, 2018

आग पोटात घेणारा माणूस

मग जेवण झालं. आठवडाभर घरी असलेले सासू सासरे स्वगृही जायला निघाले. बायकोने भुवई उचलली आणि मी धावत जाऊन कार काढली. पंधरा वीस मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सासुरवाडीला जाऊन दोन्ही तीर्थस्वरुपांना सोडलं आणि घराकडे वळलो. खरं तर त्यांचं वजन फार वाटत नाही पण का कोण जाणे मला गाडी फार हलकी वाटत होती. माझा रथ असता तर आता तो रस्त्यापासून चार अंगुळे वर चालला असता आणि लोकांनी आपल्याला युधिष्ठिर म्हटलं असतं नंतर FTII चा चेअरमन म्हणून ओळखलं असतं वगैरे विचार डोक्यात आले असताना शेजारी बसलेली ही उदासपणे म्हणाली की आता घर ओकं ओकं वाटेल.

वर्गात एखादा विद्यार्थी सीएच्या अभ्यासामुळे गांगरून गप्प झाला की त्याला / तिला पुन्हा माणसांत कसं आणायचं त्याच्या विविध क्लृप्त्या गाठीशी असलेला मी, हिच्या उदासपणाला मात्र फार घाबरतो. कारण तो घालवण्यासाठी माझ्या खिशाला किती मोठी कात्री लागू शकते याचा अनुभव मी लग्नाची अठरा आणि त्याआधीच्या चार वर्षात घेतला आहे. म्हणून मी ही 'ह्म्म्म्म' हा व्हॉटस अॅपवर शिकलेला उद्गार काढून गाडी चालवत राहिलो. गाडीतल्या एफ एमचं चॅनेल बदलत राहिलो.

एके ठिकाणी गाणं लागलं 'पान खायो सैंया हमारो. मलमलके कुडते पे छीट लाल लाल' आणि मी पण ते गाणं गुणगुणू लागलो. हे जुन्या काळचे नायक फार ग्रेट असावेत. म्हणजे दिवसभर काम करुन घरी आल्यावर हात पाय धुवून पुन्हा मलमलचे कुडते, अत्तराचा फाया वगैरे जामानिमा करुन पानाच्या गादीवर जायचे आणि त्यांच्या कपड्यांवर चक्क पानाचे डाग पडले तरी त्यांची प्रेयसी सर्फ एक्सेल नसलेल्या काळातही प्रेमानं गाणीगिणी म्हणायची. म्हणजे खरोखर तो काळ फार रोमॅन्टिक असावा. इथे मी घरी आलो की थ्री फोर्थ आणि जुना टीशर्ट घालून बसतो आणि अगदीच खांद्यावर टॉवेल टाकला की कुणालाही रामू चाचा आहे असं वाटेल म्हणून तेवढं न करण्याची खबरदारी घेतो तरीही केवळ भृकुटीच्या इशाऱ्याने माझ्या सासऱ्यांची लेक माझा रामू चाचा करते हे जाणवून मी खिन्न होत होतो. स्त्री स्वतंत्र झाली आणि जग बदललं. वगैरे विचार माझ्या मनात येत होते. तेवढ्यात मला एक पानाचं दुकान दिसलं.

छान एसी वगैरे असलेलं पानाचं दुकान नवीनंच उघडलं होतं. मग माझ्या उदासीन अर्धांगाला पुन्हा माणसात आणण्यासाठी आणि नुकत्याच ऐकलेल्या गाण्याच्या प्रभावाने मी पान खाण्याचा बेत जाहीर केला. जरा आढेवेढे, किंचित त्रागा, शेवटी 'बरं चल तुला हवंय तर' वगैरे म्हणत अर्धांग गाडीतून उतरायला तयार झालं.

दुकान नवीन असल्याने कदाचित जास्त लोकांना माहिती नसावं. त्यामुळे गर्दी नव्हती. आम्ही दोघं आणि पानवाला अशी त्रिमूर्ती त्या पान बुटिकमधे होती. वर टिव्ही लावला होता त्यावर वेगवेगळ्या गिऱ्हाईकांची क्षणचित्रे फिरत होती. मधेच काही गिऱ्हाईकांचे जळतं पान खातानाचे व्हिडिओदेखील होते. दुकानाची पहाणी करून झाल्यावर मी काऊंटरकडे वळलो. आजकालचे पानवाले फार मॉडर्न झाले आहेत हा विचार डोक्यात आला असतानाच पानवाल्याने मॉडर्नपणाची परमावधी करत मेनुकार्ड समोर ठेवलं आणि फावल्या वेळात स्वतःच पान खात असल्याप्रमाणे तोंडात गुळणी धरल्यागत गप्प उभा राहिला.

मी जगात कशाला भीत नाही इतका निवड करण्याला भितो. मला सगळ्यात काही ना काही आवडतं मग काय घ्यावं ते न कळल्याने मी जास्तीत जास्त महागाची गोष्ट निवडून खिसा हलका करुन परततो. यामुळे मी हॉटेलात मेनू कार्ड टाळतो. केस कापायला एकाच न्हाव्याकडे वर्षानुवर्ष जाऊन एकाच प्रकारचा हेअरकट करुन घेतो. चपला बूट कपड्यांची खरेदी पहिल्यांदा जे काऊंटरवर येईल त्यावरंच आटपतो. इतकंच काय पण आवडलेल्या पहिल्याच मुलीला मागणी घालून तिच्याशीच लग्न करून मोकळा झालेलो आहे. त्यामुळे मेनू कार्ड नेहमीप्रमाणे बायकोकडे सरकवून मी दुकानातील चकचकीत बाटल्या बघत होतो.

मग हिने गोल्ड वर्ख असलेल्या पानाबद्दल चौकशी सुरू केली. ओझरत्या नजरेने मेनू कार्ड बघून मला कळलं की आज सासू सासरे परतण्याचा उदासपणा मला काही हजारात पडू शकतो. ज्या गाढवाने एफ एम चॅनलवर 'पान खायो सैंया हमारो' हे गाणं लावलं त्या रेडिओ जॉकीला मी मनातल्या मनात भरपूर शिव्या घातल्या. मुसलमान दिसणाऱ्या पानवाल्याच्या घरी आज देवदिवाळीही साजरी होईल, त्याची कच्चीबच्ची मला दुवा देतील वगैरे, अशा तऱ्हेने मी दोन्ही धर्मातील सेतू बनलो आहे वगैरे कल्पना करुन मी स्वतःचं समाधान करुन घेत होतो. पण प्रत्यक्षात मात्र हिने चॉकलेट पान घेतल्याने मी बांधू शकत असलेला सेतू कोसळला.

तिनं काय घ्यावं याचा निर्णय झाला होता आता माझ्यासाठी निवड करायची होती. तेवढ्यात हिचं लक्ष दुकानातील टिव्हीकडे गेलं. तिथे कुठल्यातरी गिऱ्हाईकाला आगीचं पान खाऊ घालण्याचा व्हिडिओ लागला होता. आणि हिच्या डोळ्यात एक विलक्षण चमक आली. त्यात मला माझं भविष्य दिसलं. मला एकाएकी अमेरिकाज् फनिएस्ट व्हिडिओज, डोन्ट ट्राय धिस वाले डिस्कव्हरीचे व्हिडिओ आठवू लागले. देवदिवाळी साजरी करता न आल्याने आणि घरी कच्ची बच्ची काय म्हणतील या विचाराने गांगरलेल्या पानवाल्याचा नेम चुकला आणि आगीचं पान आपल्या तोंडात न जाता दाढीला मशालीसारखं पेटवून उठलं तर काय घ्या? या विचाराने माझा थरकाप उडाला. आपली दाढी फार वाढली आहे. खरं तर डिसेंबर लागताच आपण सफाचट करायला हवं होतं अशी हताशेची भावना डोक्यात आली. मी क्षीणपणे नकार द्यायचा प्रयत्न केला पण स्वतःच्या निवडीबाबत चोखंदळ असणारं माझं अर्धांग माझ्याबाबत मात्र ठाम असतं. त्यामुळे मी आगीला तोंड द्यायला तयार झालो.

उंच काउंटरमागे पानवाला काहीतरी करत होता आणि मी भविष्यात काय वाढून ठेवलंय त्या विचाराने दहावीच्या परीक्षेला पहिल्यांदा बसलेल्या आणि अभ्यास न झालेल्या मुलासारखा घाबरलेलो होतो. एकाएकी काउंटरमागे जाळ दिसला आणि पानवाल्याने मला तोंड उघडण्याची आज्ञा केली. मी घाबरून डोळे बंद करून तोंड उघडलं. आणि हलाहल प्राशन करणाऱ्या शिवशंकराचं स्मरण केलं. मला उगाचच अग्निकाष्ठ भक्षण करणाऱ्या खंडनमिश्र की मंडनमिश्र नावाच्या विद्वानाची आठवण झाली. गो नी दांडेकर की अजून कुणीतरी लेखकाच्या पुस्तकात वाचलेल्या "होष्यमाणास तयार होणाऱ्या' नायकाची आठवण झाली. आणि मग टाळूला काहीतरी गरम गरम लागतंय ही जाणीव झाली. 'तोंड बंद करा तोंड बंद करा' असे हाकारे ऐकू आले. आणि त्या अवस्थेतही आपला पानवाला भैय्या नसून मराठी आहे याची जाणीव झाली. तोंड बंद केलं, डोळे उघडले आणि परीक्षा संपल्यावर येणाऱ्या सुटकेचा अनुभव घेतला. मग शांतपणे तोंडात कोंबलेले कलकत्ता पान चावत विजयी वीराच्या आवेशात इकडे तिकडे बघू लागलो.

आता सगळं झालं असं वाटत असतानाच ही म्हणाली, 'अय्या, मी व्हिडीओ काढायची विसरले. आता हो काय करायचं?' मी केलेला इतका मोठा पराक्रम कॅमेऱ्यात बंद न झालेल्याचं कळून मी उदास झालो. अखंड मोरे घराण्यात आगीचं पान खाल्लेला मी पहिला पुरुष होतो. असं असूनही माझी गणना 'अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात' मध्ये होणार हे जाणवून मला वेडात दौडलेल्या सात मराठ्यांबद्दल अजूनच कणव दाटून आली. माझ्या चेहऱ्यावर दाटलेली उदासी पाहून हिच्या डोळ्यात पुन्हा एकदा तशीच चमक आली.

'अहो, माझं ऐका. तुम्ही अजून एकदा पान खा. मी आता व्हिडीओ काढते.' हा सल्ला देऊन माझ्या होकार नकाराची वाट न पाहता तिने अजून एका अग्निपानाची ऑर्डर दिलीसुद्धा. पानवाल्याने पडत्या फळाची आज्ञा मानून पुन्हा एक कलकत्ता पान लावायला घेतलं आणि मी तोंडातला तोबरा संपवायच्या मागे लागलो. आता मी दहावीच्या परीक्षेला दुसऱ्यांदा बसणाऱ्या विद्यार्थ्या इतका सराईत झाल्याने काउंटरपालिकडे डोकावून बघू लागलो. पानवाल्याने पानाच्या एका बाजूला टूथपिक टोचून दुसऱ्या बाजूला तीन लवंगा टोचल्या. त्यावर कसलं तरी जेल टाकलं आणि लायटरने त्या लवंगा पेटवल्या. मी तोंड उघडलं आणि पुन्हा, पायतळी अंगार तुडवणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांपेक्षा अधिक शौर्य दाखवत मुखामध्ये अंगार घेतला. बायकोकडे विजयी वीराच्या मुद्रेने पाहिले. तिचं व्हिडीओ रेकॉर्डिंग झालं होतं. ते बघत मी खूष झालो. एवढ्यात पानवाला बोलला, 'अरे मॅडम, तुम्ही स्लो मोशनमध्ये व्हिडीओ काढायला हवा होता. मग तुम्हाला अजून व्यवस्थित दिसलं असतं.'

माझ्या कुठल्याही सल्ल्याची व्यवस्थित चिरफाड करून स्वतःला हवं तेच करणाऱ्या हिने लगेच 'अय्या हो की' म्हणत माझ्याकडे पाहत भुवई वर केली आणि मला जाणवलं की हा मराठी पानवाला मला अग्नीपान खाऊ घालत देवदिवाळी ला स्वतःच्या बायकोला सोन्याने मढवण्याच्या बेतात आहे. सोनेरी वर्खवालं पान मी न घेतल्याचं नुकसान तो अश्या प्रकारे भरून काढतो आहे. 'मराठी माणूस व्यापारात मागे का?' हे परिसंवाद आता बंद करण्याची वेळ झालेली आहे. असे सगळे विचार डोक्यात आले. आता मी इतका सराईत झालो होतो की मीच त्याला पान लावण्याच्या सूचना देऊ शकलो असतो. वारंवार तुरुंगात जाणारे गुन्हेगार जसे सराईतपणे हवालदार, वकील, न्यायाधीश वगैरे लोकांसमोर' गीतापे हात रखके सच बोलनेकी कसम' घेतात, त्याच सराईतपणे मी आगीला तोंड द्यायला तिसऱ्यांदा तयार झालो. सगळं साग्रसंगीत पार पाडून शेवटी दुकानाच्या बाहेर पडलो.

गाडीत बसलो. घरच्या ग्रुपवर तो व्हिडीओ पाठवून नातेवाईकांशी गप्पा मारण्यात बायको गुंगली. तिची उदासी पळून गेलेली जाणवली. ऑक्सिजन न मिळाल्याने तोंडात आग लगेच विझली असली तरी एका पानामागे तीन अशा दराने नऊ लवंगा गेल्याने पोटात आग पडली होती. आणि एकाएकी जाणवलं की जर कधी मी आत्मचरित्र लिहायचं ठरलं तर त्याचं शीर्षक 'आग पोटात घेणारा माणूस' असं ठेवता येईल आणि त्याच्या भोजपुरी भाषांतराचं नाव 'आग खायो सैंया हमारो' असं ठेवता येईल.

Sunday, December 2, 2018

लग्नाला चला

माणसांना सगळ्यात जास्त काय आवडतं?

माझ्या मते माणसांना सगळ्यात जास्त लग्न आवडतं. लग्न करावं असं सगळ्या माणसांचं स्वप्न असतं. विशेषतः भारतीयांच्या जीवनात तर लग्न हा अविभाज्य घटक आहे. मुलांना लग्न करावंसं वाटतं. मुलींना लग्न करावंसं वाटतं. आपल्या मुलामुलींची लग्न झाली की आईबापांना कृतकृत्य वाटतं. मग ते इतरांच्या मुलामुलींची लग्न लावण्याच्या उद्योगाला लागतात. इंटरनेटचा वापर करुन एकीकडे जगभरात डेटिंग साईट्स बनल्या तर भारतात मात्र सरळ लग्न जुळवून देण्यासाठीच वेबसाईट्स तयार झाल्या.

ज्यांची लग्न झाली नाहीत त्यांच्याकडे भारतीय समाज एकतर सहानुभूतीने बघतो नाहीतर त्यांना डोक्यावर घेऊन त्यांच्या कथित ब्रह्मचर्याचे गोडवे गात वैवाहिक आयुष्य कसे जगावे त्याचे धडे या अविवाहितांकडून घेतो. ज्याला एखाद्या क्षेत्राचा अजिबात अनुभव नाही त्याला त्या क्षेत्राचा तज्ञ मानण्याची भारतीय परंपरा मोठी नवलाची आहे. भारतीयांना अनुभवजन्य ज्ञानापेक्षा कल्पनाजन्य ज्ञानाबद्दल जास्त आदर आहे. आणि यशस्वी माणसापेक्षा अयशस्वी माणसाच्या शब्दांना भारतीय लोक झुकतं माप देतात. पुलंनी एका ठिकाणी म्हटलं आहे की ‘प्रपंच करावा नेटका म्हणणारे रामदास बोहल्यावरून पळून गेले होते आणि जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी म्हणणारे तुकाराम दिवाळं काढून मोकळे झाले आणि बायकोकडून बोलणी खात होते.’ (पुलंनी म्हटलंय सांगितल्यामुळे समर्थभक्त आणि तुकोबाभक्त माझ्यावर चवताळून येणार नाहीत आणि सध्या पुलं हयात नसल्याने कुणावर चवताळून जावं ते न कळल्याने निरुपाय होऊन पुढे वाचतील. मला जे म्हणायचं होतं ते आधीच म्हणून ठेवून पुलंनी माझ्यावर जे उपकार केले आहेत त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.) हे थोडं विषयांतर झालं. पण मूळ मुद्दा आहे तो भारतीयांच्या लग्नप्रेमाचा.

कुणाच्या लग्नात काय जेवण होतं? किती हुंडा दिला? किती पाकिटं आली? अहेर आणू नये असं पत्रिकेत सांगणाऱ्या माणसाला आपण गनिमीकाव्याने भेटवस्तू कशी दिली? याच्या चर्चा रंगतात. नात्यागोत्यातील लग्नांबरोबर शेजारपाजाऱ्यांची, ऑफिसमधल्या सहकाऱ्यांची लग्न आपल्या जीवनात विविध भावनांचे कल्लोळ घडवून आणतात. चोवीस तास बातम्या देणाऱ्या असंख्य चॅनेलच्या आणि समाजमाध्यमांच्या आधुनिक काळात अजून एका लग्नाला आपण आपल्या जीवनात स्थान दिलेलं आहे. ते म्हणजे सेलिब्रिटीजचं लग्न. इंग्लंडच्या राजपुत्राचं लग्न असो की विराट अनुष्काचं की दिपिका रणवीरचं; भारतीयांना या सर्व लग्नांतही फार रस असतो.

बहुचर्चित असलेल्या दिपिका रणवीरच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ वर्गातली मुलं गेल्या आठवडय़ात इंस्टावर बघत होती. आणि घरी बायको सव्यसाचीच्या लेहेंग्याबद्दल बोलत होती. (त्याला लेंगा म्हणालो म्हणून तिने माझ्याकडे मेलेल्या उंदराकडे पहावं तसा कटाक्ष टाकला होता) मला इंस्टाग्राम वापरताना अवघडलेपण येत असल्याने आणि लेंगा व लेहेंग्यातील फरक कळत नसल्याने दिपिका आणि रणवीरच्या लग्नात फार रस वाटत नव्हता. ज्या लग्नात आपण मुलीकडचेही नाही आणि मुलाकडचेही नाही अश्या लग्नात फार रस दाखवणे मला कालपर्यंत तरुण आणि मध्यमवर्गाची चैन वाटत होती.

पण काल रात्री पुण्याहून डोंबिवलीला परत येत होतो. डोंबिवलीच्या वेशीवर केवळ लायटिंगच्या सहाय्याने बनवलेलं गणपतीचं एक भलंमोठं चित्र आणि त्यामागे त्याला वीजपुरवठा करणारा किर्लोस्करचा फिरता जनरेटर दिसला. रस्त्यातील खड्डे चुकवत या चित्राचं कारण काय असावं हा विचार करत पुढे गेलो तर जागोजागी विविध देवी देवतांची अशी लायटिंगवाली चित्र दिसली. रस्त्याला लायटिंगचं छत केलेलं होतं. रस्त्याच्या कडेला सर्वत्र भगवे झेंडे लावलेले दिसले. ठिकठिकाणी तात्पुरते मंच उभे केलेले दिसले. रस्त्याच्या वाहतुकीला बांधण्यासाठी मधोमध बांबूचे डिव्हायडर उभे केलेले दिसले. मी आनंद चित्रपटाची गाणी ऐकत येत होतो. तर एकाएकी दक्षिण भारतीय पद्धतीची भक्तिगीतं त्यात मिसळू लागली म्हणून शेवटी गाडीतील ऑडिओ सिस्टीम बंद केली तर रस्त्यावर ठिकठिकाणी लागलेल्या लाऊड स्पीकरवरून वाजणारी गाणी माझ्या गाडीत घुमू लागली. शेवटी जिथे दोन वर्षांपूर्वी साहित्य संमेलन झालं होत त्या सावळाराम महाराज क्रीडा संकुलापर्यंत पोहोचलो तर उलगडा झाला. डोंबिवलीत श्रीनिवास मंगल महोत्सव होऊ घातला होता. श्रीनिवास मंगल महोत्सव म्हणजे तिरुपती बालाजीचं त्याच्या दोन पत्नींबरोबर लग्न. लग्न १ डिसेंबरला होणार होतं पण वातावरणात उत्साह भरून राहिला होता. भगव्या रंगावर स्वार होऊन राजकारण करणारे दोन्ही राजकीय पक्ष या कार्यक्रमात सहभागी होते असं सगळीकडे लागलेल्या होर्डिंग्सवरून कळत होतं. या विवाहाचं आमंत्रण सगळ्या समाजाला होतं.









तिरुपतीला गेलो असताना तेथील स्थलमहात्म्य सांगणारी कथा मला आठवली. बालाजीला लग्न करायचं असतं. आता देवाचं लग्न म्हटलं की मोठा समारंभ आलाच. मग खर्चही तितकाच मोठा. मग बालाजीने देवांच्या सावकाराकडे म्हणजे कुबेराकडे कर्ज मागितलं. बालाजी जरी देवाधिदेव असला तरी सावकाराचं काम चोख, म्हणून कर्ज फेडणार कसं? हा प्रश्न कुबेराने विचारलाच. तेव्हा बालाजी म्हणाला की मी तिरुमलाच्या डोंगरावर भक्तांसाठी उभा राहीन. त्यांच्या इच्छा पूर्ण करीन. त्या बदल्यात ते मला जी धनदौलत अर्पण करतील ती वापरून मी तुझं कर्ज फेडीन. तेव्हापासून बालाजी तिरुमलाच्या डोंगरावर भक्तांना दर्शन देण्यासाठी उभा आहे. फक्त रात्रीचे दोन तास सोडल्यास तो दिवसभर भक्तांना दर्शन देत असतो. तो आपल्या इच्छा पूर्ण करतो आणि आपण त्याला धनदौलत अर्पण करून त्याचं कर्ज फेडायला त्याला मदत करत असतो. आणि आताशी कुठे पूर्ण कर्जाचा एक शतांश भाग फेडून झाला आहे. देव इतका भांडवलवादी तर त्याचे भक्तही तितकेच भांडवलवादी. बालाजीचे कित्येक भक्त बालाजीलाच भागीदार म्हणून दाखवतात. त्यामुळे धंद्यात होणाऱ्या फायद्याचा एक हिस्सा देवस्थानाला दिला जातो परिणामी बालाजीचे कर्ज फेडायला मदत होते. आणि कर्ज फिटावे म्हणून बालाजी धंद्यात नुकसान होऊ देत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

रात्री घरी पोचलो. मुलांना तिरुपतीच्या लग्नाची आणि कर्जाची गोष्ट सांगितली. म्हटलं दिपिका रणवीरचं लग्न त्याची तीन तीन रिसेप्शन सगळी त्यांच्या स्पॉन्सरच्या पैशाने साजरी होत आहेत. लग्नाच्या निमित्ताने वेगवेगळे डिझायनर्स, ज्वेलर्स आपापली जाहिरात करून घेत आहेत. दिपिका रणवीरला लग्न साजरं करायला मिळतं आहे, जाहिरातदारांना जाहिरात करायला मिळते आहे आणि आपल्याला लग्न बघायला मिळतं आहे. अर्थव्यवस्थेचं चाक फिरतं आहे. थोर्स्टीन व्हेब्लेनने सांगितलेली कॉन्स्पिक्युअस कंजम्पशनची थियरी लागू होताना दिसते आहे. (Theory of Conspicuous Consumption म्हणजे उल्लेखनीय खरेदीचा सिद्धांत : सगळ्यांच्या नजरेत येईल अश्या उल्लेखनीय आणि उधळपट्टीच्या राहणीमानामुळे धनिक लोक समाजात रोजगार निर्माण करतात. धनिकांच्या छानछोकी आणि उधळपट्टीमुळे समाजाचे नुकसान होत नसून एका प्रकारे समाजातील निम्न आर्थिक गटांतील लोकांना काम मिळतं असा या सिद्धांताचा गाभा आहे)

बालाजीने (किंवा मग तिथल्या पुजाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी) या थियरीला ओलांडून पुढचा टप्पा गाठला. जे लग्न कधी झालं की नाही याची खात्री नाही त्याचा आधार करून प्रचंड वेगाने फिरणारं आर्थिक व्यवहाराचं एक केंद्र तिरुमला तिरुपतीच्या डोंगरात उभं केलं. त्याला गती देण्यासाठी वापरली भारतीयांच्या श्रद्धेची ऊर्जा. आणि आताचे राज्यकर्ते त्याच चाकाला पुढे ढकलताहेत. आता त्याच देवाच्या लग्नाचे खेळ गावोगावी भरवून लोकांच्या आयुष्यात भावनांचे कल्लोळ घडवून आणत आहेत. धर्ममार्तंडांना आपलं धर्मकार्य पूर्ण केल्याचा आनंद आहे. राजकारण्यांना आपला मतदार बांधला गेल्याचा आनंद आहे, सामान्यांना एक दिवस पुण्य केल्याचा आणि सेलिब्रिटी लग्नाचा भाग होता आलं याचा आनंद आहे. मंडपावले, लायटिंगवाले, खुर्च्यावाले, फुलवाले, लाऊड स्पीकरवाले, आरोग्य सुरक्षावाले, नृत्य गायन करणारे, किराणा माल विकणारे, कापडचोपड विकणारे या सगळ्यांना आपापला व्यवसाय वाढल्याचा आनंद आहे. देवाच्या लग्नाला केंद्रात ठेवून, धर्म आणि परंपरांच्या आरी वापरून बनवलेलं चाक वापरून अर्थव्यवस्था गरगर फिरते आहे.

मुलांना किती कळलं ते ठाऊक नाही पण नेहमी उशीरापर्यंत जागणारी माझी दोन्ही मुलं काल फार लवकर झोपी गेली. आणि मला जाणवलं की दिपिका रणवीरचं लग्न जरी तरुण मध्यमवर्गाच्या चैनीचा भाग असला तरी डोंबिवलीत होऊ घातलेलं बालाजीचं लग्न गरीब श्रीमंत सगळ्यांसाठी आहे. किंबहुना या सगळ्यांना एक सेलिब्रिटी लग्न अनुभवायला मिळणार आहे.

सकाळी बायकोबरोबर बाहेर पडलो. सगळी होर्डिंग्स बघून बायको वैतागून म्हणाली डोंबिवलीचे रस्ते नीट करायला या राजकारण्यांकडे वेळ आणि पैसे नाहीत पण देवमूर्तीच्या लग्नासाठी पैसे आहेत आणि त्यांना भरभरून डोनेशन द्यायला लोक तयारही आहेत. आपल्या देशातील लोकांचं काही खरं नाही. देवाच्या नावाखाली कुठेही कितीही पैसा सोडतील पण एकदा पुण्य करून आले की नंतर पुन्हा समाजाचे नियम मोडायला तयार होतील. एकीकडे देव एकंच आहे असं सांगणारे; देवाच्या ब्रह्मचारी रूपाच्या देवळात बायकांनी जावं की नाही यावर परंपरेच्या पडद्यामागे लपतात आणि दुसरीकडे त्याच एकमेव देवाच्या संसारी रूपाचं मैदानात लग्न लावून त्यासाठी अख्ख्या गावाला आमंत्रण देतात. यातला विरोधाभास कुणाला कळत नाही हीच आपल्या शोकांतिका आहे.

तिचं म्हणणं मला पटलं होतं. पण कुठलाही समाज उत्सवप्रिय असतो. त्यामुळे लोकांनी लग्नात उत्साह दाखवला यात मला भारतीय समाजाची घोडचूक दिसत नव्हती. पण देवाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी, पुण्य पदरी पाडून घेण्यासाठी एका पायावर तयार असलेला समाज नंतर आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी मात्र मागे हटतो ही मात्र आपली घोडचूक आहे. कदाचित या साऱ्यांच मूळ आपल्या सुखाच्या कल्पनांमध्ये असावं.

आयुष्य सोपं होणं म्हणजे सुख असं न मानता पुण्य पदरी पडणं म्हणजे सुख अशी आपल्या समाजाची धारणा असावी. हा विचार मनात आला आणि विठ्ठल उमप यांनी गायलेल्या लोकगीताच्या ओळी आठवल्या. लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला या लोकगीतात ते म्हणतात

लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला
नाक नाही नथीला अन भोक पाडा भितिला
लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला

बसायला तुम्हाला मेणाची गाडी
गाडीला वढायला मुंगळ्याची जोडी
तुम्ही गाडीखाली बसा
पोरं बापं खांबाला कुत्री घ्या काखंला
लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला

इकडं काही जेवायचं नाही तिकडं काही खायचं नाही
हात बांधून जेवायचं तोंड बांधून खायाचं
जेवल्याशिवाय न्हाई जायचं चाळणीनं पाणी प्यायचं
लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला 



हे गाणं बहिर्जी नाईकाने शत्रूची खबरबात देण्यासाठी सांकेतिक भाषेत रचलं होतं असं म्हणतात. यातील बहिर्जीला अभिप्रेत असलेली सांकेतिकता वगळली तरी एक डिसेंबरला संध्याकाळी डोंबिवलीतील अनेक लोक याच प्रकारे या लग्नात उपस्थित राहतील. व्यापाऱ्यांचा व्यापार होईल. राजकारण्यांचं राजकारण, धर्ममार्तंडांची मान उंचावेल पण सामान्य जनता मात्र चाळणीनं पाणी पिऊन पुण्य पदरी पडल्याचं काल्पनिक सुख पदरात पाडून घरी परतेल.

इथली जनता जगातील इतर कुठल्याही जनतेपेक्षा जास्त अडाणी नाही, जास्त अंधश्रद्ध नाही. गरज आहे ती तिच्या श्रद्धेचा वापर करून तिच्या सुखाच्या कल्पना बदलण्याची. आपल्या पूर्वजांनी सुखाचं पुण्याशी लावलेलं लग्न जर आपण मोडू शकलो तर भौतिक सुखांची कुचेष्टा न करता आपण आपली आवड पूर्ण करू शकू.
लग्न लावण्याची आवड, इतरांचं लग्न लागलेलं बघण्याची आवड.

Saturday, November 24, 2018

Circle of Life

शाळेत होतो तेव्हा चित्रपट आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रावर तुफान फटकेबाजी करणाऱ्या एक मराठी लेखकाचा मी फॅन झालो होतो. पण एका वर्तमानपत्रात त्या लेखकाचं सदर सुरु झाल्यावर मात्र माझा फॅनज्वर उतरला. त्याला महत्वाचं कारण होतं अनेक लेखांमधून त्या लेखकाच्या वडिलांचा होणारा उल्लेख. ‘उत्तुंग वडिलांचा मी करंटा मुलगा’ असा सूर त्यांनी लावला होता. वडिलांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला आपण साजेसे नाही ही भावना साधारणपणे सर्व मुलांच्या मनात असते. त्याप्रमाणे ती माझ्याही मनात होती. त्यामुळे तो लेख वाचून माझे डोळे भरून आले होते पण जेव्हा तोच सूर पुन्हा पुन्हा प्रत्यक्ष लेखातून ऐकू येऊ लागला तेव्हा मात्र माझ्या मनातला हळवा कोपरा निबर झाल्यासारखा झाला. कदाचित लेखक आपल्या दिवंगत वडिलांबद्दल लिहीत होता आणि माझ्या सुदैवाने त्यावेळी माझे वडील हयात होते, माझ्या कच्च्या मडक्याला आकार देत होते आणि स्वतःपेक्षा पुढे जाण्यासाठी मला प्रोत्साहन देत होते त्यामुळे माझ्या आयुष्यातील त्या लेखकाचं स्थान अल्पजीवी ठरलं. 

पुढे सीएच्या अभ्यासासाठी मुलुंडच्या वझे कॉलेजात एक वर्ष जाणं झालं. एके दिवशी तिथल्या ऑडिटोरियमपुढे भरपूर गर्दी दिसली. माझ्याबरोबरच्या मित्राने चौकशी केली तर कळलं की कॉलेजात चित्रपट दाखवत होते. कॉलेजात चित्रपट दाखवतायत या घटनेचं मला फार कौतुक वाटलं होतं. तिथली गर्दी बघून आम्ही तिथून काढता पाय घेतला. पण त्याक्षणी माझ्या आयुष्यात त्या चित्रपटाने प्रवेश केला आणि अजूनही माझ्या मनाच्या बिलबोर्डवरून तो अजिबात खाली उतरलेला नाही. या चित्रपटाचा त्या लेखकाशी असलेला संबंध म्हणजे या चित्रपटाचा नायकही स्वतःला ‘उत्तुंग वडिलांना न शोभणारा मुलगा’ समजत असतो. पण जीवनाच्या अंतहीन वर्तुळातील त्याचं स्थान घेण्यासाठी त्याचे दिवंगत वडील त्याला दृष्टांत देतात आणि ज्या भूतकाळाला पाठ दाखवून तो पळून गेलेला असतो त्याला सामोरं जाऊन तो आपलं हिरावून घेतलं गेलेलं स्थान पुन्हा मिळवतो. शेक्सपिअरच्या हॅम्लेटवर या चित्रपटाचं कथानक बेतलेलं असलं तरी चित्रपट शोकांतिका नसून सुखांतिका आहे.

आज सकाळी झोपेतून जागा झाल्यावर ‘कराग्रे वसते मोबाईल’ हा श्लोक म्हणत फोन हातात घेतला तर गूगल न्यूजने सांगितलं की आज या चित्रपटाच्या पुनर्निमितीचं ट्रेलर रिलीज झालं आहे. आणि मग अत्यानंदाने बिछान्यातून उठत दोन्ही मुलांच्या कानाशी यूट्यूबवरील ट्रेलर वाजवून त्यांना जागं केलं. संध्याकाळी जुन्या चित्रपटाची डीव्हीडी काढून पुन्हा एकदा बघितला आणि या चित्रपटाने काय काय दिलं त्या सगळ्या गोष्टी आठवल्या.

प्रेमळ राजा. त्याचा दुस्वास करणारा भाऊ. राजाचा गोडुला निरागस धाडसी राजपुत्र. कारस्थानी काकाच्या भूलथापांना बळी पडून राजपुत्र संकटात सापडणे. त्याला वाचवायला पराक्रमी राजा धावून जाणे. आणि त्यावेळी कपटी भावाने राजाला मरून टाकण्यात यश मिळवणे. ‘वडिलांचा मृत्यू तुझ्यामुळे झाला आहे त्यामुळे तू पळून जा’, असे चिमुकल्या राजपुत्राला पटवून देणे. काकाने मग राज्य हस्तगत करून संपूर्ण व्यवस्थेला स्वार्थासाठी वेठीस धरून सगळ्यांच्या आयुष्याचा समतोल बिघडवणे. आकस्मिकरित्या राजाचा मृत्यू आणि राजपुत्राचं नाहीसं होणं हे दोन आघात सहन न करू शकलेली प्रजा हतबल होणे. पळून गेलेल्या राजपुत्राला बेफिकीर आणि आनंदी मित्र मिळणे. त्यांच्या सोबतीत राजपुत्राने भूतकाळावर पडदा टाकून मस्तमौला होऊन जगणे. आणि मग एक दिवस त्याला गतायुष्यातील काहीजण पुन्हा भेटणे. मोकळ्या माळरानावर रात्रीच्या आकाशात उसळत्या ढगातून त्याच्या वडिलांनी त्याला स्वत्वाची जाणीव करून देणे. आणि मग पुन्हा राज्यात परतून कपटी काकाचं कारस्थान इतरांबरोबर स्वतः जाणून घेत, वडिलांच्या मृत्यूला आपण जबाबदार नव्हतो हे कळल्यावर काकाला शिक्षा करणे आणि मग हर्षोल्हासित प्रजेच्या साक्षीने राजपुत्राने जीवनचक्रातील आपलं स्थान पुन्हा घेणे. इतकी साधी कथा. पण डिस्नीने ती ज्या ताकदीने पडद्यावर मांडली आहे की The Lion King हा केवळ आफ्रिकन सव्हानाचाच नव्हे तर माझ्या आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांच्या मनाचा अनभिषिक्त सम्राट झालेला आहे.


लायन किंगने मला दिलेलं Circle of life, मी एका सहकाऱ्याला लग्नाच्या भेटीबरोबर शुभेच्छापत्रात लिहून दिलं होतं. Can you feel the love tonight हे गाणं बायकोबरोबर म्हटलं होतं. (पहिलं वाक्य सहकाऱ्याबद्दल असलं तरी दुसरं स्वतःच्या बायकोबद्दल आहे. वाचकांनी स्वतःचा गोंधळ करून घेऊ नये).

ऑफिसातून घरी आल्यावर कित्येक वेळा मुलांबरोबर I Just want to be king म्हटलं आहे. बिझनेसमध्ये चिंताजनक प्रसंग आले तेव्हा Hakuna Matata म्हणून स्वतःला बळ दिलं आहे. हिटलवरच्या कित्येक डॉक्युमेंटरी बघताना मनात “Be prepared’ म्हटलं आहे. ‘Simba, it is to die for’ हे कपटी स्कारचं वाक्य ऐकून मनातल्या मनात चरकलो आहे. पोटावर ठेवलं तरी आरामात मावतील इतकी छोटी असल्यापासून ते आता माझ्या उंचीला आलेल्या मुलांबरोबर Wildebeest च्या stampedeचा प्रसंग रडत रडत बघितला आहे. छोटा सिंबा stampede मध्ये वाळलेल्या झुडपाच्या फांदीवर स्वतःचा तोल सांभाळायचा प्रयत्न करतो तेव्हा त्या फांदीवर त्याच्या नखांचे उमटणारे ओरखडे पाहून चित्रपटाच्या ऍनिमेटर्स आणि दिग्दर्शकाबद्दल कौतुकमिश्रित आदर दाटून आलेला आहे. ‘Help, somebody, anybody’ म्हणणाऱ्या सिंबाला बघून आतडं पिळवटून निघालं आहे. Que pasa आणि mufasa ची गंमत करणाऱ्या ed, edd आणि eddy बद्दल हसू, कीव, तिरस्कार अश्या संमिश्र भावना मनात दाटून आलेल्या आहेत. जेव्हा मुफासा सिंबाला ‘remember who you are’ असं म्हणतो तेव्हा ऊर भरून आला आहे. आणि आपल्या प्राईडलँडकडे परतणाऱ्या सिम्बाबरोबर मी मनातल्या मनात सव्हानाच्या त्या गवतात धावलो आहे. हे सगळं किती वेळा केला आहे त्याची गणती नाही.

या चित्रपटामुळे मला मिस्टर बीनवाला रोवन ऍटकिन्सन पहिल्यांदा भेटला. सर एल्टन जॉन भेटले. Circle of life लिहिणारा टीम राईस भेटला. Stampede च्या दृश्याचं अंगावर येणारं संगीत देणारा हॅन्स झिमर भेटला. आणि या लोकांनी माझ्या आयुष्यात आपल्या कलेने रंग भरणं जे सुरु केलं ते अजूनही थांबलेलं नाही.

आज सकाळी ट्रेलर पाहून, हे सगळं पुन्हा एकदा आठवलं. आता हयात नसलेले वडील आठवले. शेवटच्या दिवसापर्यंत धडधाकट असलेले वडील आठवले. ज्या दिवशी त्यांना प्राणघातक हार्ट अटॅक आला होता त्या दिवशी त्या दुःखद घटनेच्या दहा मिनिटं आधी मी मुलांसोबत stampede चा सीन बघत होतो ते आठवलं. आणि त्यानंतर गांगरलेल्या मुलांना समजावून सांगताना रात्रीच्या आकाशात दिसणाऱ्या ढगात आजोबा आहेत आणि ते आपल्याला ‘रडू नका. remember who you are’ सांगतायत हे सांगत होतो ते आठवलं.

२०१९ला जेव्हा हा चित्रपट रिलीज होईल तेव्हा मी सहकुटुंब सहपरिवार थिएटरात जाऊन कधी आनंदाचे तर कधी दु:खाचे अश्रू ढाळत हा चित्रपट बघणार आहे. आणि नेहमी मला स्वतःच्या पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणारे बाबा माझ्या रूपाने The Lion King बघणार आहेत. ‘वडिलांचा अपेक्षाभंग करणारा करंटा मुलगा’ ही नैसर्गिक भावना आपल्या मुलांच्या मनात येऊ न देण्याचं कसब जर मी पुढे चालवू शकलो तर लायन किंगच्या रफिकीने सिंबाला सांगितलेलं ‘he lives in you’ हे गुपित माझ्या बाबतीत खरं होईल. ते तसं खरं व्हावं आणि माझ्यासाठी वडिलांनी सुरु केलेलं हे circle of life पुढे चालू रहावं म्हणून लायन किंगकडे शुभेच्छा मागेन.

Friday, November 23, 2018

भंवरे ने खिलाया फूल

प्रत्यक्ष आयुष्यात आणि इथे फेसबुकवरही माझं मित्रवर्तुळ फार मोठं नाही. पण या मर्यादित मित्रवर्तुळातील खूपजण मला सांगतात की त्यांना माझा फेसबुकवरचा वावर आवडतो. जे असं सांगत नाहीत ते केवळ भिडस्तपणामुळे सांगत नसतील अशी माझी समजूत आहे. यापूर्वी मला ते माझं कौतुक वाटून मी सुखावत असे. आणि खोटं कशाला बोला पण थोडासा गर्वही अनुभवत असे. पण आज सकाळी बायकोशी बोलत होतो. या महिन्यात येऊ घातलेल्या लग्नाच्या वाढदिवसासाठी तिला काय भेट द्यायची त्याबद्दल बोलत असताना ती पटकन म्हणाली ‘आनंद, फेसबुकवर लिहू लागल्यापासून तू खूप बदलला आहेस. आधीपेक्षा खूप कमी आक्रस्ताळा आणि शांत झाला आहेस. छान वाटतं तुझ्याशी बोलायला.’ 

भेटवस्तूचा निर्णय झाला. ती तिच्या कामाला लागली. आणि मी माझ्या. पण तिचं माझ्या स्वभावाबद्दलचं निरीक्षण डोक्यातून जाईना. त्याबद्दल विचार करत असताना मला लहानपणी न आवडलेलं एक गाणं आठवलं.

माझ्या जन्माच्या आसपास राजकपूर साहेबांनी समस्त जगाला ‘सत्यं शिवं सुंदरं’ चा साक्षात्कार घडवला असल्याने आणि मी टीपकागदासारखा सगळं काही टिपून घेत असल्याने माझ्या संस्कारक्षम मनाची अतिकाळजी करणाऱ्या माझ्या तीर्थरुपांनी राजकपूरचं आमच्या घरातील राज्य संपवून टाकलं होतं. अर्थात थोडा अजून मोठा झाल्यावर, घरी व्हीसीआर असलेल्या आणि आई बाबा दिवसभर बाहेर असणाऱ्या मित्रांशी दोस्ती करून मी अपुरे संस्कार पूर्ण करून घेतले तो भाग सोडा. पण साधारणपणे १९८२-८३ मध्ये आरके स्टुडिओजचा प्रेमरोग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याची गाणी रेडिओवर लागत असत. आणि आमचे चाळकरी स्वार्थी नसल्याने ज्यांच्याकडे रेडिओ होते त्या सर्वानी प्रेमरोगची गाणी आमच्याकडून पाठ करून घेण्याची जबाबदारी स्वतःवर असल्याप्रमाणे आपापल्या रेडिओचे आवाज कायम टीपेला पोहोचलेले ठेवून आम्हाला ती गाणी ऐकवली. त्यातली गाणी, गाणी कमी आणि कविता जास्त असल्याने; पाठ होणं कठीण होतं. पण कळत नसूनही एका गाण्याचं धृवपद कायम मनात रेंगाळत राहिलं. ‘भंवरे ने खिलाया फूल, फूल को ले गया राज कुंवर’.


कॉलेजात असताना मित्रांबरोबर गप्पा मारताना या गाण्याच्या ध्रुवपदाचा मी लावलेला अर्थ आठवला.

मुलगी जर फूल असेल (मराठीतील फूल, इंग्रजीतील नाही) तर तिच्या जन्मापासून तिचे आई-वडील, भाऊ-बहिणी, काका-मामा-मावश्या, शेजारी-पाजारी, मित्रमंडळी जणू तिच्यासाठी त्या भुंग्याचं काम करतात. तिच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलतात. तिच्या व्यक्तिमत्वाला आकार देतात. आणि मग कुणीतरी या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडतं. इतक्या सगळ्यांनी फुलवलेलं व्यक्तिमत्व मग हा प्रियकर आपल्यासोबत घेऊन जातो.

पण याचा अर्थ कायम मुलगी फूल आणि मुलगा राजकुमार असा करता येणार नाही. प्रेयसी भेटायच्या आधी मुलगादेखील एक उमलणारं व्यक्तिमत्व असतं. आणि त्याच्या साथी सोबत्यांबरोबर राहून तो घडतो. मग कुणी मुलगी त्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडून त्याला आपला जोडीदार बनवते. त्या व्यक्तिमत्वाचे फायदे ती उपभोगते किंवा मग तोटे सहन करते. म्हणजे जगाला जरी माहेर सोडून सासरी जाणारी मुलगी म्हणजे फूल आणि तिचा नवरा म्हणजे राजकुमार वाटला तरी प्रत्यक्षात ते दोघे एकाचवेळी फूल असतात आणि राजकुमारदेखील.

कॉलेजच्या ग्रुपमध्ये सएकही सुबक ठेंगणी नसल्याने डोळ्याच्या पापण्यांची पिटपिट वगैरे माझ्या नशीबात नव्हतं. त्यामुळे माझ्या मित्रांनी म्हटलेल्या ‘बरं’ या एकमेव प्रतिसादाचा अर्थ समजून मी माझा उत्साह आवरता घेतला होता.

पण आज लग्नाच्या वाढदिवसाच्या आसपास असताना, बायकोच्या वाक्यामुळे मला त्याच ध्रुवपदाचा थोडा अजून वेगळा अर्थ लागला.

मुलगा आणि मुलगी एकमेकांसाठी फूल आणि राजकुमार तर असतातंच. पण ते केवळ काही काळापुरते. एकदा ते एकमेकांच्या आयुष्यात सातत्याने आले की त्यांची फुलाची भूमिका संपत नसली तरी राजकुमाराची भूमिका मात्र संपते. आणि त्यांच्याही नकळत ते एकमेकांसाठी भुंग्याच्या भूमिकेत शिरतात. एकमेकांच्या व्यक्तिमत्वाला आकार देऊ लागतात. यातून तयार होणारे व्यक्तिमत्व मग अजून नवनवीन मित्र मैत्रिणी तयार करते. आणि मग ते मित्र मैत्रिणी म्हणजे तात्पुरते राजकुमार बनतात. त्यातले जे आयुष्यात दीर्घकाळ राहतात, त्यांचीही राजकुमाराची भूमिका तात्पुरती असते. मग तेही आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत आपला वाटा उचलतात.

म्हणजे जर माझ्या प्रेयसीला मी आवडलो तर त्यात माझ्या विवाहपूर्व आयुष्यातील नातेवाईकांचा आणि मित्रमंडळींचा मोठा हात असावा. आणि इथे कुणाला माझा वावर आनंददायी वाटत असेल तर त्यात माझ्या बायकोचाही मोठा हात असावा. आणि आता जर तिला माझ्यातील आक्रस्ताळेपणा कमी झाल्यासारखा वाटत असेल तर त्यात माझ्या फेसबुकवरील मित्रमंडळींचाही मोठा हात असावा.

असलं काहीतरी सुचलं आणि ते मी बायकोला ऐकवलं तर तिनेही ‘बरं’ असा प्रतिसाद देऊन ‘भेटवस्तूची यादी अजून फायनल नाही. काही सुचलं तर उद्या सांगते.’ असा धक्का दिला. या धक्क्याने माझ्या व्यक्तिमत्वाला काय आकार मिळेल कुणास ठाऊक?

Saturday, October 13, 2018

सारं काही परत येतं (भाग ५)

सिद्धार्थाने जरी श्रमणजीवनाचा त्याग केला असला तरी ज्याप्रमाणे ऐहिक जगाकडे श्रमण तुच्छतेने पाहतात त्याचप्रमाणे जगाचे सत्य स्वरूप जाणून घेण्यासाठी ऐंद्रिय अनुभवांचा रस्ता निवडलेला सिद्धार्थ, नेणिवेत भावनांचे प्राबल्य असलेल्या सामान्य लोकांच्या जीवनाकडे तुच्छतेने पाहात असतो. वैराग्यातून उमललेला तुच्छताभाव मनी बाळगून तो संसारात रममाण होत जातो. प्रचंड पैसा गाठीला जमवतो. वाडेहुडे, नोकरचाकर आणि अमाप रतिसुख मिळवतो. आणि सुखासीन होत जातो.

मातीच्या गोळ्याला आकार देणारे चाक कुंभाराने फिरवल्यावर आधी अतिवेगाने आणि मग हळूहळू कमी होत जाणाऱ्या वेगाने फिरू लागावे तसे त्याच्या हृदयी वसणारे वैराग्यचक्र हळूहळू मंदगतीने फिरू लागते. वठलेल्या झाडाच्या बुंध्यात ओल शिरावी आणि तिने हळूहळू संपूर्ण झाड कुजवून टाकावे त्याप्रमाणे संसार त्याच्यातील ज्ञानपिपासू सिद्धार्थावर ताबा मिळवतो. ज्या सामान्य लोकांचा तो तिरस्कार करत होता त्यांच्यातील सर्व अवगुण आता त्याच्यात घर करतात. आता सिद्धार्थ मांसाशन आणि मद्यपान करू लागतो. जुगार खेळू लागतो. व्यापाऱ्यांची देवी म्हणजे लक्ष्मी आपल्याला तुच्छ आहे हे दाखवण्यासाठी मोठमोठ्या रकमेचा एकेक डाव लावून डाव जिंकू की हरू ही हुरहूर अनुभवण्यात धन्यता मानू लागतो. ती आतुरता आणि अनिश्चितता त्याला आवडू लागते आणि तिचा अनुभव घेण्यासाठी तो पुन्हापुन्हा मोठमोठ्या रकमेचे डाव लावू लागतो. अनेकदा तो स्वतःकडची संपत्ती हरतो आणि अनेकदा तो ती जिंकून आणतो. जुगारातील अनिश्चिततेने मिळणाऱ्या आनंदासाठी मग तो आपल्या दैनंदिन व्यापारात क्रूर होऊ लागतो. भरमसाठ व्याज लावणे, व्याज आणि मुद्दल वसूल करण्यात हयगय न करणे हा त्याचा स्वभाव बनतो आणि दानधर्म, गोरगरिबांची मदत या त्याच्या सवयी नाहीश्या होतात.

आणि एके दिवशी कमलेच्या कुशीत असताना ती सिद्धार्थला गौतम बुद्धाबद्दल विचारते. आणि या विषयाबाबत तत्पूर्वी कधी फार न बोलल्याने सिद्धार्थ तिला गौतम बुद्धाची शांत चर्या, त्याची निर्मल दृष्टी, प्रसन्न स्मित, अक्षुब्ध आणि अचंचल वागणूक या सर्वांबद्दल विस्ताराने सांगतो. ते सर्व ऐकून ‘आपणही कधी गौतम बुद्धाची अनुयायी होऊ आणि हे क्रीडोद्यान त्याला अर्पण करू’ असा निश्चय ती सिद्धार्थला बोलून दाखवते आणि कामक्रीडेतील माधुर्याचा शेवटचा थेंबही निसटू नये अश्या आवेगाने त्याच्याशी रत होते. कामक्रीडेनंतर शांत झोपलेल्या कमलेचे मुख सिद्धार्थ जवळून पाहतो. त्याला त्यावर वृद्धत्वाच्या खुणा दिसून येतात. वासना आणि मरण एकमेकांच्या किती जवळ आहेत याचा त्याला प्रत्यय येतो. आजवर आपण जो मार्ग अंगिकारला तो साकल्याचा नाही हे कमलेला कळले आहे असे तिच्या चर्येवरुन सिद्धार्थला जाणवतं. आणि सिद्धार्थ तिथून निघतो.

मनात उद्भवलेल्या अस्वथतेला विसरण्यासाठी भरपूर मद्यपान करतो.मदिराक्षींना जवळ करतो पण त्याला त्या साऱ्याची शिसारी येते. तो झोपण्याचा प्रयत्न करतो. आणि पहाटेच्या वेळी त्याला जे स्वप्न पडतं त्यामुळे त्याला आपल्यातील काहीतरी मेल्याची जाणीव होते.

तो स्वतःच्या मालकीच्या आम्रवनात जातो. एका झाडाखाली बसतो. आणि आपल्याला यापूर्वी आनंद कधी अनुभवायला मिळाला होता याची उजळणी करू लागतो. बालपणी मंत्र पाठांतरात सवंगड्यांना हरवताना, यज्ञप्रसंगी वडीलधाऱ्यांना मदत करताना त्याने आनंद चाखला होता. आणि ब्राह्मणधर्म सोडून श्रमणमार्ग अनुसरतानाही त्याला ‘पुढे जा. हाच तुझा मार्ग आहे’, याची आनंददायी जाणीव झाली होती. गौतम बुद्धाचा उपदेश ऐकून त्याला आनंदाची जाणीव झाली होती आणि तसे असूनही संघदीक्षा न घेता तिथून निघून जातानाही त्याला त्या प्रस्थानातच स्वतःचा उत्कर्ष दिसला होता. पण आता त्याच्यापुढे कुठलंही ध्येय नव्हतं. त्याचा जीवनमार्ग ओसाड झाला होता.

सामान्य लोकांप्रमाणे सुखाच्या मागे धावूनही त्यांचे जीवितहेतू न अंगिकारल्यामुळे तो सामान्य जीवनात झोकून न देता त्यातील सुखदुःखांचा केवळ साक्षी बनून राहिला होता. ते जीवन त्याचे नव्हते. त्याला सामान्य लोक आणि जीवितहेतू परके होते आणि सामान्य लोकांना तो परका होता. कमला हीच त्याची एकमेव सहचरी होती. पण तिच्याबरोबर खेळत असलेल्या खेळात कितीही आनंद मिळाला तरी त्यात कायमचे मशगूल होऊन राहण्यासारखे काही आहे काय? हा प्रश्न त्याच्या डोक्यात येतो. आणि सिद्धार्थचा निश्चय होतो. त्याला बालपणापासूनचे त्याचे सर्व आयुष्य आणि सर्व निर्णय आठवतात. हे सुखासीन नागर जीवन त्यागण्याचा निर्णय पक्का होतो. त्याला कडकडून भूक लागते. पण तो घराकडे न परतता नगरापासून दूर जाऊ लागतो.

सिद्धार्थ नगर सोडून पुढे पुढे जातो. त्याला स्वतःच्या अध:पातामुळे स्वतःची शिसारी येते. आपलं अस्तित्व व्यर्थ आहे. ते वन्य पशूंच्या किंवा दरोडेखोरांच्या हल्यात नष्ट झालं तर चांगलं होईल असे विचार त्याच्या मनात येऊ लागतात. तो नदीजवळ पोहोचतो. तिच्या शेवाळलेल्या पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहतो. वृद्धत्वाकडे झुकलेला आणि सुखासीनतेमुळे आंतरिक तेज हरवून बसलेला चेहरा पाहून त्याला नदीत उडी मारून आत्महत्या करण्याची इच्छा होते. तो स्वतःच्या प्रतिबिंबावर थुंकतो. आणि तो जीव देणार इतक्यात त्याच्या मनात ओंकाराचा ध्वनी होतो. न उच्चारता उमटलेल्या त्या ओंकाराच्या लखलखाटामुळे सिद्धार्थला आपले गतायुष्य दिसते आणि त्याला गाढ झोप लागते. झोपेतून उठतो तो त्याला आपले गतायुष्य फार दूर आहे असे वाटू लागते. कदाचित जुना सिद्धार्थ मरून गेला असून त्याचं नवं रूप जन्माला आलं होतं असं त्याला वाटतं. या नव्या सिद्धार्थातील जुना अहं तोच असला तरी सिद्धार्थ आता बदलला होता. तो जागा झाला होता आणि जिज्ञासूदेखील.

झोपेतून उठल्यावर सिद्धार्थला दिसतं की त्याच्याजवळ एक भिक्षू बसला आहे. तो गोविंद आहे हे सिद्धार्थ लगेच ओळखतो पण गोविंद त्याला ओळखत नाही. नदीकिनारी वन्यजीवांचे भय असताना एक मनुष्य झोपलेला आहे तेव्हा त्याचे रक्षण करण्याच्या भावनेने गोविंद तिथे बसलेला असतो. सिद्धार्थने आपली ओळख दिल्यावर गोविंदाला आनंद होतो. पण ते दोघे आपापल्या रस्त्याने निघून जातात. एक संघनियम पाळून जीवनाचा अर्थ शोधणारा प्रवासी तर दुसरा सर्व नियम तोडून जीवनाचा अर्थ शोधणारा प्रवासी.

सिद्धार्थाला पुन्हा भुकेची जाणीव होते. उपास, प्रतीक्षा आणि चिंतन हे त्याचे गुण देऊन त्याने संपत्ती, विलास आणि इंद्रियसुख इत्यादी नतद्रष्ट गोष्टींचा सौदा केला होता. भलताच मार्ग त्याने चोखाळला होता. त्यामुळे आपण एक सामान्य माणूस आहोत याची त्याला खात्री पटते.

पण आपण बालपणाप्रमाणे पुन्हा एकदा निःसंग होऊन नव्याने सुरवात करत आहोत. आपण पुन्हा परतीच्या वाटेने बालपणीच्या अवस्थेकडे, नव्याने सुरवात करण्याकडे चाललो आहोत याची विलक्षण जाणीव त्याला होते. समोरून वाहणारी नदीदेखील आनंदाने परतीचा प्रवास करीत सागराकडे जात आहे असे त्याला जाणवते. आपण ब्राह्मणधर्म, श्रमणधर्म, ऐन्द्रियसुख, व्यापारउदीम, अविवेक आणि कुबुद्धी या चक्रातून फिरत पुन्हा ओंकार ऐकून आपल्या शैशवाकडे चाललो आहोत याची त्याला अनुभूती होते.

'ऐहिक सुख आणि संपत्ती श्रेयस्कर नाहीत' हे तो लहानपणीच शिकलेला असला तरी त्याची प्रचिती मात्र त्याला त्याक्षणी होते. आता ती गोष्ट केवळ बुद्धिगम्य न राहता भावगम्य आणि इंद्रियगम्य झाली आहे, हेही त्याला जाणवतं. आणि ज्या अहंकारापासून मुक्ती मिळवायचा तो आजन्म प्रयत्न करत होता त्याचे स्वरूप त्याला दिसून येतं. ब्राह्मणधर्मात त्याने पाठांतराचा, कर्मकांडाचा आणि श्रमणधर्मात शरीरक्लेशाचा अतिरेक केला. मूळच्या हुशारीमुळे तो सर्वात अग्रेसर राहिला त्यामुळे त्याच्या आढ्यतेत आणि बुद्धीमत्तेत त्याच्या अहंकाराने घर केलं होतं. त्या हुशारीच्या जोरावरच त्याने ‘ कुणीही गुरु तुला मुक्ती देऊ शकणार नाही’ हा निर्णय घेतला होता. परिणामी त्याला जुगारी, मद्यपी, सुखलोलुप सावकार होणं भाग होतं. जीवनाचा वेडेपणा न भोगता त्याला जीवनाचं स्वरूप कळणं अशक्य होतं.

आपल्या जीवनाचा लंबक इतका एका बाजूला झुकण्याचं कारण आपण बुद्धी आणि तर्काच्या जोरावर त्याला दुसऱ्या बाजूला घेऊन गेलो होतो हे कळल्यावर सिद्धार्थाला स्वतःबद्दल स्वतःच्या परतीच्या प्रवासाबद्दल ममत्व वाटू लागते. आणि ज्या नदीच्या काठी त्याला हा परतीचा प्रवास असा का आहे ते कळतं त्या नदीला सोडून जायचं नाही असा निर्णय तो घेतो.

आता गोष्ट संपणार असं मला वाटू लागलं होतं. आणि आनंद बक्षींनी परदेस चित्रपटासाठी लिहिलेल्या एका गाण्यातील 'जीने का है शौक तो मरने को हो जा तैयार' हे वाक्य मला आठवत होतं. पण मी किती तोकडा विचार करतो ते मला लगेच जाणवलं. कारण, सिद्धार्थ नाहीसा झाला हे कळताच कामस्वामी त्याचा शोध घेऊ लागतो. पण सिद्धार्थ सापडत नाही. सिद्धार्थचे जाणे कमला मात्र लगेच स्वीकारते. तो मुळात अनिकेत श्रमण आहे हे तिने जाणलेले असते. आणि काही दिवसांनी तिला कळते की त्या दोघांच्या शेवटच्या भेटीत तिच्या पोटी सिद्धार्थचा गर्भ राहिला आहे. आता आनंद बक्षींच्या गाण्यातील 'नै होणा था, लेकिन हो गया यार... हो गया है मुझे प्यार' ही वाक्य सिध्दार्थला लागू होतात की काय? तो पुन्हा कमलेकडे जातो की काय? या प्रश्नांनी माझी उत्सुकता वाढवली.

सारं काही परत येतं (भाग ४)

गोविंदला सोडून आणि गौतम बुद्धाचा निरोप घेऊन सिद्धार्थ जैतवनातून निघतो. ज्ञानियांचा गुरु भेटूनही आपण त्याला सोडून का चाललो आहोत? या प्रश्नावर विचार करताना त्याला जाणवतं की ब्राह्मण आणि श्रमण जीवनाचा त्याग करणे, बालमित्र भिक्षूसंघात प्रवेश करत असताना गुरूपदेश नाकारून तिथून निघून जाणे या सर्वामागे एकंच कारण होते. अहम्, त्याचे स्वरूप, त्याची लक्षणे जाणण्याची त्याची इच्छा होती. आणि यज्ञयाग, व्रत वैकल्ये, किंवा इंद्रियदमन यातून त्याला अहम् शी लपंडाव खेळता आला असला तरी ‘मी सिद्धार्थ आहे’ या जाणिवेपासून त्याची कायमस्वरूपी सुटका झालेली नव्हती. म्हणजे अहम् ला जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या सिद्धार्थला अजून सिद्धार्थची ओळख पटलेली नव्हती. त्याला जीव शिवाचे ऐक्य असते हा विचार माहीत होता पण त्यातील 'जीव असतो कसा?' याबद्दल काहीही माहिती नसल्यामुळे तो ते ऐक्य अनुभवू शकत नव्हता.

आधी विचारांच्या व परंपरांच्या सहाय्याने त्याने जिवाशिवाचे अद्वैत अनुभवायचा प्रयत्न केला होता. ते न साधल्यामुळे त्याने जीवाच्या सर्व ऐंद्रिय इच्छांचे दमन करून जीव नष्टप्राय करून पाहिला होता. परंतु या सर्व झटापटी स्वस्वरूप न ओळखता केल्यामुळेच तो अनिकेत अवस्थेत होता.

इथपर्यंत पोहोचल्यावर मग या अस्थिरतेतून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला दिसतो. स्वतःला अनुभवणे. जगाला अनुभवणे.

सत्य, विचारांच्या मागे किंवा भावनांच्या मागे कुठेतरी आत दडलेले नसून ते सर्वत्र आहे. 'जग माया आहे आणि इंद्रिये योगायोग आहेत असे मानणे' म्हणजे स्वतःची फसगत करून घेणे आहे. जर स्वतःचे सत्य स्वरूप जाणून घ्यायचे असेल तर जगणे नाकारून चालणार नाही. सर्व विचार, इच्छा, भावना आणि भौतिक जग म्हणजे स्वस्वरूपाच्या पुस्तकातील विरामचिन्हे आहेत. विरामचिन्हांचा तिरस्कार करत पुस्तक वाचणे आणि जीवनाला माया समजून जीवनविन्मुख होणे दोन्ही सारखेच निरुपयोगी आहे.

विचारांच्या या नव्या दिशेमुळे सिद्धार्थ आनंदित होतो आणि त्याचवेळी आपण असंग आहोत. आपल्याला आता कोणीही नातेवाईक, मित्र, श्रद्धा, वेष नाहीत हे जाणवून त्याला अथांग विश्वातील स्वतःच्या एकाकीपणाची जाणीव होते.

जग अनुभवण्यासाठी आता तो पुढे सरसावतो. निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा रंग, गंध, तापमान तो आसुसून अनुभवू लागतो. शिकारी प्राण्यांच्या आणि त्यांच्या भक्ष्यांच्या परस्परविरोधी जीवनेच्छेचा आवेग त्याला जाणवतो. आणि मग थकलेला सिद्धार्थ नदीकिनारी एका नावाड्याच्या खोपटात झोपी जातो. त्याला स्वप्न पडते. स्वप्नात त्याचा बालमित्र गोविंद दिसतो. सिद्धार्थ त्याला एकटा सोडून गेल्यामुळे तो दु:खी आहे असे सिद्धार्थला दिसते. सिद्धार्थ त्याला स्वप्नातच मिठीत घेतो, प्रेमाने त्याचे चुंबन घेतो. आणि त्याला गोविंदाच्या जागी एक स्त्री आहे असे जाणवते. स्वप्नात सिद्धार्थला पहिला स्रीस्पर्श घडतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी नगाराकडे जाण्यास निघालेला सिद्धार्थ नावाड्याच्या मदतीने नदी पार करतो. त्यावेळी त्याला नदी फार सुंदर भासते. आणि नावडीही त्याला दुजोरा देतो. 'नदी आपल्याशी बोलते. तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखे असते', असे नावाडी सिद्धार्थला सांगतो.

सिद्धार्थ नगरात जातो. आणि त्याचे लौकिक जीवन सुरु होते. (आतापर्यंत लहान लहान प्रसंगात मोठमोठ्या घटना सांगून गोष्टीला वेग देणारा लेखक आता मात्र गोष्टीचा वेग कमी करतो.) सिद्धार्थचे लौकिक जीवन हेसेंनी मोठ्या बारकाईने रंगवले आहे. नावाड्याला द्यायला पैसे नसलेल्या सिद्धार्थची नगरात पहिली भेट होते नगरवधू असलेल्या कमलेबरोबर. तिच्याकडून प्रेमदीक्षा मिळवतो. तिच्याच ओळखीने नगरातील धनाढ्य व्यापारी असलेल्या कामस्वामींचा भागीदार बनतो. त्याच्या हातात पैसा खेळू लागतो. तरीही त्याच्यासाठी पैसा हे साध्य नसून साधन असते. गोरगरीबांना पैसे देण्यात तो हात कधीही आखडता घेत नाही. त्याच्या बेहिशोबी वागण्यामुळे कामस्वामी गोंधळतो पण सिद्धार्थ लोकांच्या प्रेमादरास पात्र होतो. जीवनाचा आनंद घेत असलेल्या सिद्धार्थला लोकांच्या व्यवहाराची मोठी मौज वाटत असते. त्याच्यासाठी व्यापार, व्यवहार म्हणजे जणू खेळ असतो. इतरांना बेहिशोबी आणि बेभान वाटावे अशा आवेगाने तो हा खेळ खेळत असतो.

सिद्धार्थच्या जीवनातील हा भाग वाचताना कुणीही गुंगून जाईल इतक्या तपशीलाने तो लेखकाने रंगवलेला आहे. पण यातील काही वाक्ये माझ्या मनात घर करून राहिली आहेत.

‘तुला काय येतं?’ या कमलेच्या प्रश्नावर सिद्धार्थ म्हणतो ‘मी वाट पाहू शकतो. मला चिंतन करता येतं आणि मला उपास करता येतो.’

आणि रतिसुखाचा आवेग ओसरल्यावर जेव्हा कमला सिद्धार्थला उद्देशून म्हणते ‘तुमचं कुणावरंच खरं प्रेम नाही’. तेव्हा सिद्धार्थ म्हणतो, ‘तू ही प्रेम करू शकत नाहीस. करू शकत असतीस तर तुला कलावंतीण होता आलं नसतं. सामान्य माणसं प्रेम करू शकतात हेच त्यांच्या जीवनाचं रहस्य आहे.’

ही वाक्ये वाचनाच्या ओघात जेव्हा येतात तेव्हा वाचकाला दणदणीत धक्के देऊन जागं करतात. मला त्या धक्क्यांमध्ये अजून गोष्ट दिसली की अहम् च्या शोधात जीवनसन्मुख झालेला सिद्धार्थ अजूनही अहम् चं स्वरूप ओळखू शकलेला नाही; हेच लेखक आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो आहे.

सिद्धार्थचं व्यवहाराकडे खेळ म्हणून पाहणं. सामान्य लोकांच्या जीवनेच्छेचं त्याला कौतुक वाटणं, कमलेबरोबर प्रेमरंग खेळताना त्याकडेही खेळ म्हणून पाहणं आणि सामान्यांना प्रेम करता येतं हेच त्यांचं जीवनरहस्य आहे हे कबूल करणं; यातून लेखक आपल्याला एकंच मुद्दा सांगत असतो की अहम् चं स्वरुप जाणून घेण्यासाठी जीवनसन्मुख झालेला सिद्धार्थ कर्माला खेळ समजत असल्याने, 'मी सिध्दार्थ आहे' या भावनेपासून त्याची सुटका न झाल्याने त्याचा प्रवास अजून संपलेला नाही.

Sunday, September 9, 2018

सारं काही परत येतं (भाग ३)

श्रावस्ती नगरीजवळील जैतवनात गौतम बुद्धाचा निवास असतो. त्याचा संदेश ऐकण्यासाठी आलेल्या अनेक यात्रिकांची श्रावस्तीत गर्दी झालेली असते. गुरूमुखातून कुठलाही संदेश ऐकण्याची इच्छा न उरलेला, गुरूपदेशातून आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते यावर विश्वास न उरलेला सिद्धार्थ आणि गौतम बुद्धाला पाहण्यासाठी, त्याचा संदेश ऐकण्यासाठी अधीर झालेला गोविंद असे दोघे श्रावस्तीत पोहोचतात. पहिल्याच झोपडीत भिक्षा मागण्यासाठी थांबतात. तिथल्या वृद्ध स्त्रीच्या तोंडून मौन पाळणाऱ्या, एकभुक्त, पीतवस्त्रधारी, सस्मित चर्येच्या ज्ञानी गौतम बुद्धाचं वर्णन ऐकून आपला उद्धार जवळ आला आहे याची गोविंदला खात्री पटते. त्या झोपडीतून सिद्धार्थच गोविंदला जवळजवळ खेचूनच बाहेर काढतो. वनवासाची सवय झालेले पूर्वाश्रमीचे ते दोन श्रमण रात्री श्रावस्तीत आसरा शोधतात. त्यातील एक बुद्धाचा संदेश ऐकण्यासाठी आतुर असतो तर दुसरा बुद्धाला बघण्यासाठी उत्सुक असतो.

सकाळ होते. जैतवनात पीतवस्त्रधारी अनेक भिक्षू फिरत असतात. आणि त्या अनेक भिक्षूंतून गौतम बुद्ध कोण ते सिद्धार्थला प्रथम जाणवतं. उत्फुल्ल किंवा उदासीन नसलेली त्याची शांत चर्या, त्यावर विलसणारं मृदू स्मित, त्याची धीरोदात्त चाल बघून सिद्धार्थला बुद्धाची ओळख पटते. गोविंदला तो बुद्ध दाखवतो. आणि मग गोविंदलाही बुद्धाची ओळख पटते. ते दोघे दिवसभर बुद्धाच्या मागोमाग फिरतात. काहीही न शोधणारी त्याची शांत नजर, त्याची गती, अवनत दृष्टी, खाली लोंबणारा पण हेलकावे न घेणारा त्याचा एक हात; कसलीही धडपड, इच्छा, खोटेपणा किंवा कशाचाही शोध घेण्याची इच्छा नसलेली त्याची देहाकृती बघून या महात्म्याला सत्य उमगले आहे याची सिद्धार्थला खात्री पटते. इतर कुठल्याही पुरुषाबद्दल कधीही अनुभवायला न मिळालेली गौरवबुद्धी गौतम बुद्धाच्याबद्दल सिद्धार्थच्या मनात उमटते. गौतम बुद्धाचा संदेश त्यांनी कर्णोपकर्णी ऐकलेला असतो पण तरीही तो गौतम बुद्धाच्या मुखातून ऐकण्यासाठी गोविंद अजून आतूर होतो.

संध्याकाळ होते. गौतम बुद्धाचे प्रवचन सुरु होते. धीरगंभीर पण शांत आवाजात गौतम बोलू लागतो. नक्षत्रांचा मंद प्रकाश यावा तसा त्याचा स्वच्छ आणि संथ आवाज श्रोत्यांपर्यंत पोहोचत असतो. दुःख, त्याचा उगम, त्यापासून मुक्तीचा मार्ग याबद्दल बुद्ध बोलतो. आणि प्रवचन संपल्यावर बुद्धाच्या संघात प्रवेश घेण्यासाठी यात्रिकांची गर्दी होते. लाजरा बुजरा गोविंदही पुढे सरसावतो आणि भिक्षुसंघात प्रवेश द्या म्हणून गौतम बुद्धाला विनंती करतो. गोविंद भिक्षु होतो. पण सिद्धार्थ मात्र संघात प्रवेश करत नाही. गौतम बुद्धाच्या संदेशात खोट काढणे शक्य नाही अशी ग्वाही सिद्धार्थ, गोविंदला देतो. तो दुसऱ्या दिवशी जैतवन सोडून निघणार असतो. त्यामुळे गौतम बुद्धाचा संदेश ऐकून संघप्रवेश केलेला गोविंद दु:खी असतो. याउलट संघप्रवेश न केलेला सिद्धार्थ मात्र शांत असतो.

यज्ञ, व्रत वैकल्ये, उपास तापास यामुळे पापक्षालन होते हे नाकारून; कलंकहीन होण्यासाठी ब्राह्मणधर्म सोडून सिद्धार्थ श्रमण होतो. मग इंद्रियनियमन करून वासना, विकार आणि विचारांवर मिळालेला विजय तात्पुरता आहे पण त्यातून अहंभावापासून मुक्ती मिळत नाही. श्रमणमार्गातून झालेलं आत्मज्ञान अतूट शांती देत नाही, ते मादक द्रव्यांच्या सेवनामुळे मिळणाऱ्या तात्पुरत्या गुंगीसारखे आहे; म्हणून तो मार्गही सोडणारा सिद्धार्थ, बुद्धाचे प्रवचन ऐकतो. त्या विचारात खोट नाही हे मित्राला सांगतो पण दीक्षा न घेता जेव्हा तो निघून जात असतो तेव्हा लेखकाने त्याची प्रत्यक्ष बुद्धाशी गाठभेट घालून दिली आहे. मी तत्वज्ञानाचा अभ्यासक नाही पण गौतम बुद्ध आणि सिद्धार्थाचे संवाद वाचताना भारतीय तत्वज्ञान शिकायचे बाकी आहे. तत्वज्ञान रुक्ष विषय वाटत असला तरी तो तसा नाही याची हेसेंनी आणि सरदेशमुखांनी मला जाणीव करून दिली. (अर्थात अंगभूत आळशीपणामुळे अजूनही मी त्याचा अभ्यास सुरु करू शकलेलो नाही, हा भाग अलाहिदा.)

सिद्धार्थ गौतमाला म्हणतो, ‘जग म्हणजे एक शाश्वत शृंखला आहे हे बुद्धाचे मत जर मान्य केले तर मग बुद्धाने सांगितलेले निर्वाणाचे तत्व त्या शृंखलेला तोडते. म्हणजे जग एक शाश्वत शृंखला आहे हे मान्य केले तर निर्वाण अमान्य करावे लागते आणि निर्वाण होणे शक्य आहे हे मानले तर शाश्वत शृंखलेचे तत्व भंगते’. सिद्धार्थाचा हा युक्तिवाद ऐकून गौतम बुद्धाची शांती ढळत नाही. त्याला गौतमाने जे उत्तर दिले आहे ते शब्दात मांडण्याची सिद्धी माझ्याकडे नाही. त्यासाठी हेसेंचेच शब्द वाचावेत.

गौतम बुद्धाचे उत्तर पटल्यावर सिद्धार्थ पुढे विचारतो की जी शांती गौतम बुद्धाने स्वानुभवातून मिळवली आहे, त्याच शांतीचा अनुभव केवळ त्याचा उपदेश ऐकून इतरांना होऊ शकेल काय? म्हणजेच अनुभवाअंती मिळणारे ज्ञान, स्वतः जगाचा अनुभव न घेता, केवळ गुरूपदेश ऐकून कुणालाही शाश्वत शांतीचा अनुभव देऊ शकणार नाही अशी आपली खात्री पटली आहे.

सिद्धार्थाच्या या मतप्रदर्शनावर आणि आपले ज्ञान स्वतः मिळवण्याच्या त्याच्या निर्णयाचे गौतम बुद्ध स्वागत करतो. पण जाताजाता तो सिद्धार्थाला अतिचातुर्यापासून सांभाळून राहण्यास सांगतो आणि त्या दोघांचा संवाद संपतो.

सिद्धार्थही तिथून निघतो आणि त्याला जाणवतं की गौतमाने त्याचा मित्र जरी त्याच्यापासून हिरावून घेतलेला असला तरी त्याने सिद्धार्थाला सिद्धार्थाचे दान दिले आहे.

अंतिम ज्ञान आणि शाश्वत शांती शोधणारा सिद्धार्थ, पूर्वज परंपरा किंवा इंद्रियदमन किंवा गुरूपदेश या तीनही मार्गांना सोडून आता पुढे निघतो. आता त्याचा मार्ग असतो तो स्वानुभवाचा. आणि त्या मार्गावर तो आता एकटा असतो. त्याच्याबरोबर त्याचा परममित्रही नसतो.

माझं एक फार आवडतं वाक्य आहे, ‘जेव्हा शिष्य तयार होतो तेव्हा गुरु अवतरतो’. बुद्धसंदेश ऐकण्यापूर्वीची गोविंदची आतुरता आणि बुद्धसंदेश ऐकण्यासाठी सिद्धार्थचा निरुत्साह वाचून मला वाटू लागलं होतं की बुद्धभेटीनंतर गोविंद आणि सिद्धार्थची साथ सुटणार. आणि तसेच झाल्यावर माझा इगो थोडा सुखावला होता. पण त्यानंतर बुद्ध आणि सिद्धार्थाचे संवाद वाचून, या पुस्तकाची किल्ली आपल्या हातात आली आहे हा माझा फाजील विश्वास आपोआप नाहीसा झाला आणि पुढे काय होणार? याबद्दलची माझी उत्सुकता वाढली.

Sunday, September 2, 2018

सारं काही परत येतं (भाग २)

कुशाग्र बुद्धिमत्तेच्या आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या सिद्धार्थचे वडील एक वेदशास्त्रपारंगत ब्राह्मण. आपल्या मातापित्यांच्या लाडक्या सिद्धार्थाची यज्ञविधीतील निपुणता आणि अर्थ समजून वेदपठण करण्याच्या त्याच्या सवयीमुळे सिद्धार्थ सगळ्यांच्या कौतुकास पात्र झालेला असतो. आपला मुलगा ब्रह्मर्षी होणार याची वडिलांना खात्री असते. गोविंद हा सिद्धार्थचा जीवश्च कंठश्च मित्र. इतका जवळचा की जणू सिद्धार्थची सावली. अर्थ समजून न घेता केवळ उच्चारवात वेदमंत्रांचे पठण करून अहंकाराने भरलेल्या ब्राह्मणांच्या कळपात कुठल्याही परिस्थितीत सिद्धार्थ शिरणार नाही याची गोविंदला खात्री आणि त्यांच्यात सहभागी व्हायला गोविंदही नाराज असतो. सगळ्यांच्या कौतुकास पात्र असलेला आणि तरुणींच्या हृदयात कामव्यथा जागवणाऱ्या सिद्धार्थचं मन मात्र अशांत असतं.

अर्घ्यदानाने पापक्षालन कसं काय होणार? जर विविध रूपात प्रकटलेला तो परमात्मा एकंच असेल तर मग त्याच्या विविध रूपांची आराधना करून त्या परमतत्वाचे ज्ञान कसे होणार? मनात उमटणाऱ्या सर्व विकार, विचार आणि वासनांचे शमन केवळ आराधनेने कसे होणार? आणि यज्ञ, याग, उपास, व्रत, वैकल्ये यामुळे पापक्षालन होत असले हे मान्य केले तरी पाप पुन्हा पुन्हा उत्पन्न का होते? ज्यांनी आपला आत्मा म्हणजेच जग हे सत्य जाणून घेतले, ज्यांनी निद्रावस्थेत परमसत्याचा अनुभव घेतला आणि जागृतावस्थेत ज्यांच्या हातून पुन्हा कुठलेही पाप घडले नाही, असे ज्ञानी ऋषी कुठे भेटतील? त्यांच्या हृदयी वसत असलेल्या असीम शांततेचा उद्भव आपल्या ठायी करून घेण्यासाठी काय करावे लागेल? कलंकहीनाला पापक्षालन ते कसले; म्हणून कलंकहीन व्हायचा मार्ग कोणता? या प्रश्नांनी सिद्धार्थला अशांत केलेले असते. आणि एक दिवस त्याच्या नगरातून श्रमणांचा तांडा जातो. विरक्त जीवन जगणारे, तहान-भूक आणि अन्य शारीरजाणिवांचे चोचले न पुरवता सर्व देहोपभोगांना कस्पटासमान लेखून, वासनांना पायदळी तुडवून जगणारे श्रमण पाहून सिद्धार्थाला जणू त्याच्या प्रश्नांचं उत्तर मिळतं. ‘आत्मसंयमन’.

आणि तो गोविंदला आपला निग्रह सांगतो. श्रमण होण्याचा. वडिलांची परवानगी घेण्यासाठी तो त्यांच्याकडे जातो. अपेक्षेनुसार वडील परवानगी नाकारतात. त्याच्यावर चिडतात. त्याला निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. पण सिद्धार्थाचा निर्णय झालेला असतो. तो पुन्हा पुन्हा नम्रपणाने परवानगी मागत राहतो. ‘माझी परवानगी न मिळाल्यास तू काय करशील? विनापरवानगी जाशील का?’, वडिलांच्या या प्रश्नाला नकारार्थी उत्तर देऊन सिद्धार्थ त्यांना निरुत्तर करतो. रात्रभर आपल्या कक्षाबाहेर परवानगीची वाट पाहत निश्चल उभा राहिलेल्या आपल्या मुलाला पाहून वडिलांना कळून चुकते की आपला मुलगा मनाने कधीच श्रमण झालेला आहे. आता तो आपल्याबरोबर थांबला तरीही ते केवळ शरीर असेल. त्यात पूर्वीचा सिद्धार्थ नसेल. म्हणून ते जड अंतःकरणाने श्रमणांबरोबर जाण्यास परवानगी देतात.

इथे मला जी ए कुलकर्णींचा ऑर्फियस आठवला. युरीडीसीला मृत्युदेवतेच्या राज्यातून परत पृथ्वीलोकात घेऊन चाललेल्या ऑर्फियसला जेव्हा जाणवतं की मृत्यूपूर्वीची युरीडीसी आणि आताची युरीडीसी वेगळी आहे, तेव्हा तो मागे वळून पाहतो, मृत्युदेवतेच्या अटीचा भंग करतो आणि त्याच्या लाडक्या युरीडीसीला परत पाठवतो, कारण त्याला जाणवलेलं असतं की आता त्याच्याबरोबर येतंय ते युरीडीसीचं शरीर. त्यातील मन पूर्णपणे बदललेलं आहे.

आपल्या कक्षाबाहेर परवानगीची वाट पाहात निश्चल उभ्या राहणाऱ्या सिद्धार्थला पाहून त्याच्या वडिलांनाही ऑर्फियससारखाच साक्षात्कार झालेला असावा. ते परवानगी देतात आणि म्हणतात, ‘वनात जा आणि श्रमण हो. तिथे सुखसर्वस्व सापडलं तर परत ये आणि माझा गुरु हो. तिथंही मृगजळच दिसलं तर परत ये आपण दोघे मिळून देवांना यज्ञाहुती देऊ’

सिद्धार्थ निघतो आणि त्याच्याबरोबर त्याची सावलीदेखील असते. गोविंद. त्यानेही घर सोडलेलं असतं. तोही सिद्धार्थाबरोबर श्रमण होण्यास निघतो. सिद्धार्थ सगळं काही सोडून निघतो पण त्याचा मित्र मात्र त्याच्याबरोबर असतो. जणू त्याचा भूतकाळ अजूनही त्याच्यासोबत असतो.

सिद्धार्थ श्रमण होतो. शारिरवासनांकडे तुच्छतेने बघू लागतो. शरीरोपभोगांच्या मागे लागलेल्या सामान्य जनतेकडे तुच्छतेने पाहू लागतो. वासनांमुळे पाप आणि मग पापक्षालनासाठी व्रत वैकल्ये या चक्रातून सुटण्याची त्याची धडपड चालू होते. आत्मसंयमनाच्या श्रमणांच्या सर्व विद्या तो शिकून घेतो. गोविंदही या मार्गावर सिद्धार्थच्या खांद्याला खांदा लावून चालत असतो. गोविंद आनंदी असतो पण सिद्धार्थमात्र अशांत.

सिद्धार्थाच्या मते अहंभाव विसरण्याचे श्रमणांचे सर्व मार्ग अहंभावापासून क्षणिक मुक्ती देतात. ज्याप्रमाणे एखादा मद्यपी मद्याच्या अमलाखाली स्वतःला विसरतो आणि मद्याचा अंमल ओसरला की पुन्हा नेहमीसारखा होतो त्याप्रमाणेच सिद्धार्थ समाधीअवस्थेत असताना अहंभाव विसरतो पण समाधीअवस्था ओसरली की पुन्हा त्याच अहंभावाने ओतप्रोत भरून जातो. त्याला जाणवते की त्याचे गुरूंनीदेखील अहंभावापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळवलेली नाही. आणि त्याला आंतरिक शांतीसाठी श्रमणांचा आत्मसंयमनाचा मार्ग तोकडा वाटू लागतो.

त्यातच शाक्यवंशातील एक महानुभाव; ज्याने जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवली आहे, ब्राह्मणपुत्र आणि राजपुत्र दोघेही ज्याच्या चरणी लीन होतात, अशा महाज्ञानी गौतम बुद्धाविषयी विविध वार्ता आता वनापर्यंत पोहोचू लागतात. हा बुद्ध म्हणवला जाणारा गौतम कधी काळी श्रमण होता आणि त्याने श्रमणमार्ग सोडल्यानंतर त्याला महाज्ञान प्राप्त झाले असे कळल्यामुळे सिद्धार्थच्या गुरूंच्या मनात गौतम बुद्धाबद्दल राग असतो. त्यांच्यासमोर गौतम बुद्धाबद्दल कुठलाही विषय काढलेला त्यांना पसंत नसतो.

भिक्षेसाठी नगरात गेलेल्या गोविंदला गौतम बुद्धाचा उपदेश एका घरात ऐकायला मिळतो. त्यामुळे प्रभावित होऊन परत आल्यावर तो गौतम बुद्धाचा उपदेश ऐकण्यासाठी वन सोडून मगध देशाला जाण्याची आपली इच्छा सिध्दार्थाला सांगतो. सिद्धार्थासाठी जणू ही योग्य संधी असते. ब्राह्मणधर्म सोडून आपल्याबरोबर श्रमणधर्म स्वीकारलेल्या गोविंदाने श्रमणधर्मात आनंदी असताना गौतम बुद्धाचा मार्ग ऐकायला उत्सुकता दाखवावी या संधीचा तो फायदा घेतो आणि श्रमण मार्ग सोडण्याचे ठरवतो.

बुद्धाचा संदेश ऐकण्याची गोविंदला उत्सुकता असते. याउलट प्रत्यक्ष बुध्दमुखातून संदेश न ऐकताच केवळ त्याबद्दल ऐकल्याने बुद्धाने आपल्याला श्रमणधर्माच्या कक्षेतून बाहेर खेचले. म्हणजे बुद्धसंदेश न ऐकताही त्याचे फळ आपल्या पदरात पडले आहे हे जाणवलेला सिद्धार्थ उदास हसतो आणि श्रमणमार्ग सोडण्याचा आपला निर्णय गोविंदाला सांगतो.

श्रमणमार्ग सोडण्यासाठी तो दोघांच्या वतीने वृद्ध श्रमणगुरूंकडून परवानगी मागतो. गुरु आश्चर्यचकित होतात. रागावतात. त्यामुळे त्यांनी अजून आत्मशांती मिळवलेली नाही याबद्दलचे सिद्धार्थाचे मत अजूनच पक्के होते. त्यांच्याकडूनच शिकलेल्या विद्येचा वापर करून सिद्धार्थ गुरूंच्या जिभेवर, मनावर आणि वाणीवर ताबा मिळवतो आणि श्रमणमार्ग सोडण्याची परवानगी त्यांच्या मुखातून वदवून घेतो.

वडिलांकडून परवानगी मिळवताना आज्ञापालन हा वडिलांकडून शिकलेला गुण वापरून सिद्धार्थ ब्राह्मणधर्म सोडण्याची परवानगी मिळवतो. तर श्रमण गुरूंकडून परवानगी मिळवताना सिद्धार्थ त्यांच्याचकडून शिकलेल्या परकायाप्रवेशसदृश विद्येचा वापर करतो. सिद्धार्थ निघतो. आणि जोडीला त्याची सावलीदेखील निघते. अहंभावाच्या नाशाबाबत श्रमणमार्गाचे अपयश हे सिद्धार्थाचे प्रतिपादन पटल्यामुळे गोविंदही सिद्धार्थाबरोबर निघतो.

पाण्यावरून चालण्याची विद्या आत्मसात करण्याचे नाकारून सिद्धार्थ श्रावस्ती नागरीकडे निघतो. आणि त्याच्यासोबत असतो त्याचा बालमित्र गोविंद. बदललेल्या रूपात का असेना पण अजूनही सिद्धार्थाचा भूतकाळ त्याच्याबरोबर असतो.

Friday, August 31, 2018

सारं काही परत येतं (भाग १)

शिक्षणाच्या निमित्ताने वाघिणीचं दूध पिणं झालं पण मातृभाषा आणि संस्काराची भाषा मराठी असल्याने विचारांची भाषा मराठीच राहिली. त्यामुळे अनुवादात मूळ लेखनाचा आत्मा जसाच्या तसा उतरेल याची खात्री नसली तरी इंग्रजी पुस्तकांच्या अनुवादाकडे माझं मन ओढ घेतं. कित्येकदा तर अनुवाद वाचून झाल्यावर मी मूळ पुस्तक घेतलेलं आहे. माझ्या नशीबाने मराठीत उत्तमोत्तम अनुवादक असल्याने माझ्यासारख्या धेडगुजरी (किंवा मग धेडइंग्रजी म्हणतो) माणसाची चांगली सोय झाली आहे. त्यामुळे पुस्तकांच्या दुकानात माझी एक तरी चक्कर अनुवाद सेक्शनकडे जातेच.

सात आठ वर्षांपूर्वी असाच डोंबिवलीच्या मॅजेस्टिकमध्ये रमलो असताना, खरेदी आटोपली आणि निघताना अनुवादाच्या सेक्शनमध्ये असलेल्या एका पुस्तकाच्या एकुलत्या एका प्रतीकडे लक्ष गेलं. काळ्या रंगाच्या मुखपृष्ठावर सेपिया टोनमध्ये लेखकाचा फोटो, त्यावर पिवळसर रंगात लेखकाचं नाव, खाली गडद आकाशी रंगात पुस्तकाचं नाव आणि पुन्हा पिवळसर रंगात अनुवादकाचं नाव अशी मांडणी असलेलं पुस्तक होतं. शब्दांच्या प्रभावाने गुंग होणारा मी, चित्रकलेत यथातथा असलो तरी मुखपृष्ठावरील चित्रभाषा मला पुस्तकाकडे खेचते. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील कृश युरोपियन माणसाचा सेपिया रंगातील फोटो फारसा आकर्षक वाटला नसला तरी कुठल्यातरी अगम्य कारणामुळे मी ते पुस्तक माझ्या हातातील गठ्ठ्यावर ठेवलं आणि बिल बनवून घरी परतलो. आमच्या घरी माझ्या खरेदीची दोन प्रमुख गिऱ्हाइकं म्हणजे मी आणि माझे बाबा. मी इतर पुस्तकं सुरु केली आणि बाबांनी हे अनुवादित पुस्तक.

त्यांचं वाचून झाल्यावर मोजकं बोलण्याच्या आपल्या सवयीनुसार त्यांनी, ‘फार सुंदर पुस्तक आहे, नक्की वाच’ म्हणून मला सांगितलं. मी कामाच्या धबडग्यात अडकलेलो होतो आणि मुखपृष्ठाची चित्रभाषा माझ्यासारख्या प्रेक्षक वाचकासाठी अनाकर्षक होती म्हणून ते पुस्तक माझ्या हातात येत नव्हतं. तोपर्यंत बाबांनी तीनदा वाचून काढलं. प्रत्येक वेळी ते एकंच सांगत होते, ‘ फार सुंदर पुस्तक आहे, आनंद. नक्की वाच’.

नंतर बाबा गेले पण पुस्तकाची आणि माझी वेळ जुळत नव्हती. आणि एक दिवस (पुस्तक विकत घेतल्यानंतर जवळपास तीन वर्षांनी) माझ्या आयुष्यात या पुस्तकाची वेळ आली.

पुस्तकाचं नाव ‘सिद्धार्थ. पूर्वेची यात्रा’. लेखकाचं नाव हरमन हेसे आणि अनुवादकाचं नाव त्र्यं वि सरदेशमुख.

प्रस्तावना, लेखकाचं मनोगत वगैरे वाचून मग पुस्तक वाचायचं हा माझा नेहमीचा शिरस्ता; पण या पुस्तकाच्या वेळी का कोण जाणे तो मोडला गेला. त्यामुळे पुस्तकाबद्दल मनात कुठलीही पूर्वपीठिका नव्हती. दिवसभराच्या लेक्चरनंतर रात्री पुस्तक हातात घेऊन सुरवातीची अठ्ठावीस तीस पानं वाचून झाली. बहुतेक रात्रीच्या गुंगीमुळे असावं पण गौतम बुद्धाच्या आयुष्यातील अनेक प्रसंग सारखे नसूनही मला मात्र ही कथा गौतम बुद्धाची वाटत होती. नायक क्षत्रिय नसून ब्राह्मण असणे, अविवाहित असणे, त्याला जीवनातील चार दुःखे न दिसता त्याने घर सोडण्याचा निर्णय घेणे हे सारे वाचून ही गोष्ट गौतम बुद्धाची नाही हे अगदी लहान मुलालाही कळणे सहज शक्य होते पण माझ्या आकलनक्षमतेवर गुंगीचा पडदा पडला होता. उपवास करून शरीर कष्टवणारा सिद्धार्थ मला गौतम बुद्धच वाटत होता. त्याच गुंगीत पुढे वाचत असताना मग सिद्धार्थ, गौतम बुद्धाला भेटतो असा प्रसंग आला. आणि माझी गुंगी खाडकन उडाली. पुन्हा पहिलं पान उघडलं आणि प्रस्तावनेपासून वाचायला सुरवात केली.

बाबा जे सांगत होते ते अख्ख्या जगानेही सांगितलेलं होतं. मुखपृष्ठावरील सेपिया रंगातील कृश युरोपियन माणूस म्हणजे लेखक हरमन हेसे यांनी अनुवादकाला पाठवलेले स्वतःचे छायाचित्र होते. हरमन हेसे यांना १९४६ साली साहित्याचे नोबेल मिळालेले होते. १९२२ साली प्रसिद्ध झालेली, ‘सिद्धार्थ’ ही त्यांची अतिशय गाजलेली कादंबरी आहे. माझ्या हातातील एका पुस्तकात त्यांच्या सिद्धार्थ या कादंबरीचा आणि पूर्वेची यात्रा या दीर्घकथेचा किंवा दीर्घकाव्याचा अनुवाद होता. म्हणजे मी ज्याला एक पुस्तक समजत होतो ती खरंतर दोन पुस्तके होती.

हरमन हेसे जर्मन, फ्रेंच आणि स्विस रक्ताचे होते. त्यांचे वडिलांचे वडील डॉक्टर तर आईचे वडील मिशनरी आणि प्राच्यविद्येचे अभ्यासक होते. हेसेंचे वडील आणि आईदेखील मिशनरी होते. आणि त्यांनी आपल्या कवीमनाच्या लहान मुलासोबत काही काळ भारतात घालवलेला होता.

हिटलरच्या जर्मनीने हरमन हेसेंचा तीव्र तिरस्कार केला पण त्यांनी आपल्या लेखनाने मानव आणि समाज यांच्या परिवर्तनाबद्दल अतिशय मूलगामी विचार मांडले. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातील अतीव नरसंहाराच्या काळात ‘अस्तित्वसत्याला न नाकारता भावसौंदर्य कसे जपायचे’ (अवतारणातील वाक्य अनुवादकाच्या मनोगतातील आहे) ते सांगणाऱ्या काही मोजक्या साहित्यिकातील एक महत्वाचे नाव म्हणजे हरमन हेसे.

प्लेटो, स्पिनोझा, शोपेनहोअर आणि नित्शे यांच्या प्रभावाचे ऋणी असणाऱ्या हेसेंनी 'भारतीय आणि चिनी दर्शनांचा आपल्यावरील प्रभाव अधिक वरचढ होता', असे प्रांजळपणे मान्य केले आहे. मिशनरी लोकांच्या कार्यपद्धतीमुळे दुखावल्या गेलेल्या अनेक भारतीयांना एका मिशनरी जोडप्याच्या मुलाने भारतीय दर्शनांना वापरून लिहिलेली ही कादंबरी वाचून काय वाटेल त्याची कल्पना करून मला मौज वाटली. कदाचित न वाचलेल्या भारतीय दर्शनांबद्दलची कुणाची अस्मिता जागृत होईल आणि सगळं आमच्याकडे पूर्वीपासून आहेच याचा गजर होईल किंवा मग या कादंबरीमुळे मिशनरी लोकांच्या इतर कृत्यांवर पडदा टाकता येणार नाही असा निषेधाचा सूरही निघेल. पण काहीही असो या कवीमनाच्या लेखकाचे वर्णन करताना अनुवादकाने त्यांना ज्ञानेश्वरांच्या भाषेत ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीत बसवलेले आहे, ते मला पूर्णपणे पटलेले आहे.

गौतम बुद्धाच्या काळात, जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी, अस्तित्वाचे प्रयोजन शोधण्यासाठी एक युवक घराबाहेर पडतो. त्याच्या या शोधात तो ब्राह्मण, श्रमण, आणि बौद्ध या विचारांचा अनुनय करतो. साधक, संसारी, व्यापारी, आसक्त आणि विरक्त अश्या अवस्थांतून जातो. त्याच्या शोधप्रवासाची छोटेखानी काव्यात्म कादंबरी म्हणजे सिद्धार्थ. कादंबरीची ही मध्यवर्ती कल्पनाच मला अतिशय आवडली. आणि मी हेसेंच्या नजरेतून सरदेशमुखांच्या सहाय्याने सिद्धार्थाच्या प्रवसाची गोष्ट वाचायला सुरवात केली.


Monday, July 30, 2018

फेसबुकची छळछावणी

लग्नाचा समारंभ आहे. आमंत्रित आनंदी आहेत. हास्य विनोद चालू आहे. वातावरणात उत्साह भरलेला आहे आणि एकाएकी काही आमंत्रितांना गुदमरायला होऊ लागतं. नक्की काय होतं आहे ते कळण्याआधी आमंत्रितांपैकी पंधरा व्यक्ती गुदमरून मृत्युमुखी पडतात. काय घडले असेल त्याचा शोध घेणाऱ्या तपास अधिकाऱ्यांना एक योगायोग दिसून येतो की मृत्युमुखी पडलेल्या सर्व व्यक्ती नवऱ्यामुलाकडील असतात आणि नाझी छळछावणीतून वाचलेल्या एका वृद्ध महिलेशी रक्ताच्या नात्याने जोडलेले असतात.

मग काही दिवसांनी एका कॉफी शॉपमध्ये अशाच प्रकारे अनेक लोक मृत्युमुखी पडतात. सगळ्यांच्यात एक सामान धागा असतो की या सगळ्या व्यक्तींचे डोळे तपकिरी रंगाचे असतात.

तपास अधिकाऱ्यांना मग पत्ता लागतो तो एका अश्या रासायनिक हत्याराचा की जे प्रचंड गर्दीतही केवळ विशिष्ट गुणसूत्र असणाऱ्या व्यक्तींनाच लक्ष्य करू शकेल. बाकी कुणालाही काहीही न होता केवळ विशिष्ट गुणसूत्रे असणाऱ्या व्यक्तींची जीवनयात्रा संपवू शकेल. अॅमेझॉन प्राईमवर असलेल्या फ्रिन्ज नावाच्या सिरियलच्या दुसऱ्या सीझनच्या चौदाव्या भागाचे हे कथासूत्र आहे.


मला सिरियलमध्ये रस नाही, किंबहुना तो या लेखाचा विषयही नाही. पण एका प्रिय मित्राशी फेसबुकच्या जाहिरात मॉडेलबद्दल बोलत असताना त्याला हा एपिसोड आठवला आणि मला जे सांगायचे आहे त्याची व्याप्ती समजून घेण्यासाठी हा एपिसोड अतिशय चपखल उदाहरण आहे. शेजारी उभ्या असलेल्या माणसाला काही होत नाही पण तुमच्यातील विशिष्ट शारीरिक गुणांमुळे तुमचे जीवन संपवेल इतका घातक परिणाम घडवून आणता येऊ शकतो, ही कल्पना अतिशय भयानक आहे. असं एखादं तंत्रज्ञान जर नाझी जर्मनीच्या हाती लागलं असतं तर विविध ठिकाणी छळछावण्या उभारून जगभरातील ज्यूंना तिथे आणून मग त्यांच्यावर अत्याचार करण्यापेक्षा त्यांनी जगभर असे घातक विषारी वायू सोडून, इतर कुणाच्या नखालाही धक्का न लावता आरामात ज्यू लोकांचे प्राण घेतले असते.

असे रासायनिक तंत्रज्ञान अजून प्रगत झालेले नाही हे आपले सुदैव आहे पण समाजमाध्यमांवर मात्र या तंत्राच्या जवळपास जाऊ शकेल अशी प्रगती झालेली आहे. २०१९ ला भारतात पुन्हा निवडणुका होतील. त्याचे पडघम आता वाजायला सुरवात होईल आणि यावेळी या निवडणुकांच्या निमित्ताने सर्व राजकीय पक्षांकडून समाजमाध्यमांवरही मोठा धुरळा उडेल. आणि कदाचित त्यातून समाजातील अनेकांची मने एकमेकांबद्दल कायमची दूषित होऊन बसतील. सरकार कुणाचेही येवो पण समाजमाध्यमांवर उडू शकणाऱ्या या धुरळ्यामुळे कुणाच्याही मनात कायमचे विष कालवले जाऊ नये या इच्छेपोटी हा लेख लिहिला आहे.

या लेखात मी जी शक्यता मांडली आहे तसेच होईल याची मला खात्री नाही. किंबहुना असे झाले नाही तर त्यामुळे सगळ्यात जास्त आनंद मला होईल. पण दुर्दैवाने कुठल्याही पक्षाकडून हा मार्ग चोखाळला गेला तर किमान माझ्या मित्रांनातरी त्याचा त्रास न व्हावा अशी इच्छा आहे.

गूगल आणि फेसबुकच्या जाहिरातींचे मॉडेल पूर्णपणे वेगळे आहे. तुम्हाला कुठली जाहिरात दाखवायची हे गुगलला; तुम्ही काय शोधता? तुम्ही काय बघता? तुम्ही कुठल्या वेबसाईट्सना भेट देता; यावरून कळते. गूगल तुम्हाला दाखवत असलेल्या जाहिराती ‘तुम्ही कोण आहात?’ यावर अवलंबून नसतात. तर 'तुम्ही सध्या काय शोधताय?' यावर अवलंबून असतात. गुगलच्या जाहिराती संपूर्ण इंटरनेटवर विविध वेबसाईट्सवर पसरलेल्या असतात. गुगलच्या जाहिराती बघायला तुम्ही गुगलच्या वेबसाईट्सवर जात नाही तर तुम्ही जिथं जाल तिथे तुम्हाला गुगलच्या जाहिराती दिसतील. म्हणजे मी दाढीच्या सामानाबद्दल गूगल सर्च करून मग नंतर युट्युबवर अंदाज अपना अपना हा चित्रपट बघायला गेलो तर मला चित्रपटाच्या खाली आणि मधेमधे दाढीच्या सामानाच्या जाहिराती दिसतील पण माझ्या बायकोने लिपस्टिकबद्दल गूगल सर्च करून नंतर अंदाज अपना अपना बघायला युट्युब वापरले तर जिथे मला दाढीच्या जाहिराती दिसत आहेत तिथे तिला लिपस्टिकच्या जाहिराती दिसतील. आणि ज्या वेबसाईट्सवर गूगलच्या जाहिराती दाखवतात त्या सर्व वेबसाईट्सवर आम्ही आपापल्या लॅपटॉपवरून किंवा मोबाईलवरून गेलो तर तिथेही हाच प्रकार होईल.

गंमत म्हणजे समजा आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला भेट म्हणून मी हिला लिपस्टिक आणि हिने मला दाढीसाठी ट्रीमर देण्याचं ठरवून त्याबद्दल गूगल सर्च केलं असेल तर तिला पुढे ट्रीमरच्या तर मला लिपस्टिकच्या जाहिराती दाखवून गूगल शांत होईल. याचा अर्थ गूगल तुमचे प्रोफाईल बनवत नाही असा नाही पण जितक्या स्पष्टपणे आपण फेसबुकवर आपली माहिती स्वतःहून देतो तितक्या स्पष्टपणे स्वतःहून गुगलकडे माहिती देत नाही. अॅड्रॉईड, क्रोम आणि विविध अॅप्सच्या माध्यमातून गूगल आपल्याबद्दल विश्वास बसणार नाही इतकी माहिती गोळा करत असते. याउलट फेसबुकवर ही माहिती आपण फेसबुकसाठी, तिथल्या जाहिरातदारांसाठी आणि उर्वरित जगासाठी स्वतःहून देत असतो.

म्हणजे सर्च करणारा पुरुष आहे की स्त्री? तरुण आहे की वृद्ध? सिंगल आहे की मॅरिड याचा उपयोग गूगलच्या जाहिरातींपेक्षा फेसबुकच्या जाहिराती अधिक प्रभावीपणे करतात.

कारण फेसबुक वापरण्याची आपण सगळ्यांची पध्दत गूगल वापरण्याच्या पध्दतीपेक्षा वेगळी आहे. आपण गूगलच्या वेबसाईटवर थांबत नाही, सर्च करून पुढे जातो. याउलट आपण फेसबुकवर रमतो. दिवसाचे तासन् तास इथे घालवतो. आपण कुठे रहातो, कुठल्या भाषा बोलतो, आपला फोन नंबर काय, आपल्याला कुठली पुस्तके आवडतात, चित्रपट आवडतात, संगीत आवडते, आपले शिक्षण कुठपर्यंत झाले आहे, आपण कुठल्या हुद्द्यावर काम करतो; याची माहिती नोंदवून ठेवतो. आपला आवडता नट, नटी, राजकीय पुढारी, राजकीय पक्ष, चित्रपट, चित्रपटविषयक कार्यक्रम वगैरेंची पेजेस असतील तर तीही लाईक करून ठेवतो. आणि रासायनिक अस्त्राला लाजवेल अशी स्फोटक तयारी फेसबुकला आणि फेसबुकवरील जाहिरातदारांना करून देत असतो. कारण आपली शारीरिक गुणसूत्रे कुणाला कळली नाहीत तरी आपली सामाजिक गुणसूत्रे आपण जगजाहीर करुन ठेवतो.

फेसबुकवर तुम्हाला दिसणारी जाहिरात तुम्ही काय शोधता यावर अवलंबून नसते, तर तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठे राहता, तुमचे वय, लिंग, हुद्दा, भाषा, मूळगाव, आवडी निवडी यासारख्या घटकांवर म्हणजे तुम्ही जाहीर केलेल्या सामाजिक गुणसुत्रांवर अवलंबून असते.

फेसबुकच्या अॅड मॅनेजरमध्ये जेव्हा एखादी जाहिरात तयार केली जाते तेव्हा ती कुणाला दिसावी याचे परिपूर्ण नियोजन करण्याची संधी जाहिरातदाराला मिळते. म्हणजे माझ्या क्लासची जाहिरात फेसबुकर करताना मी फेसबुकला असे सांगू शकतो की माझ्या क्लासची जाहिरात फक्त डोंबिवली आणि पुणे या शहरात राहणाऱ्या, फक्त १८ ते २० वयोगटातील मुलं आणि मुलींना दाखव. मला क्लासमध्ये केवळ उच्चभ्रू पालकांची मुलं हवी असतील तर मी फेसबुकला असेही सांगू शकतो की ही जाहिरात फक्त इंग्रजी भाषा येणाऱ्यांना दाखव, किंवा मग ज्यांनी व्होडाफोनच्या पेजला लाईक केलं आहे त्याच लोकांना दाखव, किंवा मग ज्यांना ऑडी गाडी आवडते आहे, ज्यांनी क्लब महिंद्राच्या पेजला लाईक केले आहे त्यांनाच दाखव.

यावर कुणी म्हणेल की यात वाईट काय आहे? धुरळा, रासायनिक अस्त्राला लाजविणारी ताकद कुठे आहे?

तर थोडा विचार करून बघा. जाहिरात फक्त वस्तू किंवा सेवांची नसते. जे गूगलवर सहजी शक्य नाही ती ताकद फेसबुकवर सगळ्यांना मिळते. फेसबुकवर कुणीही कुठल्याही विषयाला वाहिलेलं पेज तयार करू शकतो. आणि मग त्या पेजची जाहिरात करुन त्या पेजवरील बातम्या, चित्रे, फोटो, व्हिडिओ इतरांनी पहावेत म्हणून मी फेसबुकवरुनंच जाहिरात करू शकतो.

म्हणजे समजा मला समाजात तेढ पसरवायची आहे. मग मी माझ्या पेजची, अॅपची, वेबसाईटची जाहिरात कुणाला दाखवायची ते फेसबुकला सांगताना असे सांगू शकतो की, 'हे झुकरबर्ग माझी जाहिरात मुंबईत राहणाऱ्या, पण मूळच्या उत्तर प्रदेशातील, आणि संजय निरुपम यांचे पेज लाईक करणाऱ्या वय वर्षे २५ ते ४५ मधील, पुरुषांनाच दाखव. किंवा मग माझी जाहिरात ‘I hate Modi’ किंवा ‘I hate Rahul Gandhi’ किंवा ‘I love Modi’ किंवा ‘I love Rahul Gandhi’ किंवा तत्सम पेज लाईक करणाऱ्या, १८ ते ७५ वयोगटातील स्त्री पुरुषांना दाखव. किंवा माझी जाहिरात बहुजन समाज पार्टीचे पेज लाईक करणाऱ्या लोकांनाच दाखव.' त्यामुळे तुम्हाला फेसबुकवर दिसणाऱ्या जाहिराती तुमच्या शेजारी बसलेल्या तुमच्या मित्राला दिसणाऱ्या जाहिरातींपेक्षा वेगळ्या असू शकतील. या जाहिराती त्याला न्यूजफीडमध्ये दिसू शकतील किंवा मेसेंजरमध्ये दिसतील.

आणि या जाहिराती, जाहिरातदाराच्या विषयाला पुढे आणण्यासाठीच असाव्यात असे बंधन फेसबुक घालत नाही. किंबहुना निवडणुकीच्या निमित्ताने दुष्प्रचार करणारी, खोट्या बातम्या देणारी पेजेस तयार केली जातात. आणि ट्रोल्सचे सैन्य सर्व चर्चांमधे घुसून भडक कमेंट्स करून सर्वसामान्य माणसांच्या मनात विष पेरत रहाते. हाच प्रकार अमेरिकेतील निवडणुकांच्या वेळी केंब्रिज अॅनालिटिकाने आणि रशियन हॅकर्सने केला होता.

म्हणजे आपल्याकडे दलितांवर अत्याचार झाला अश्या खऱ्या किंवा खोट्या बातम्या देणाऱ्या पेजची जाहिरात केवळ एका राजकीय पक्षाच्या पेजला लाईक करणाऱ्या लोकांना दिसतील, तर मुसलमानांनी काय खरे खोटे अत्याचार केले याच्या बातम्या देणाऱ्या पेजच्या, वेबसाईट्सच्या जाहिराती एका धर्माचे अनुयायी असणाऱ्या लोकांना दिसतील. हिंदू, बौद्ध, जैन, मुसलमान, शीख अश्या विविध धर्माच्या अनुयायांना वेगवेगळ्या जाहिराती दिसतील आणि त्यातही पुरुषांना, स्त्रियांना, तरुणांना, वृद्धांना, अधिकाऱ्यांना, कारकुनांना, डॉक्टरांना, वकिलांना वेगवेगळ्या जाहिराती दिसतील. आणि प्रत्येकाच्या मनात इतर समाजाविषयी चुकीच्या धारणा पसरविणे सोपे जाईल.

मग यातून बाहेर कसे पडायचे?

प्रश्न कठीण वाटला तरी उत्तरे सोपी आहेत.

१) कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या hate pages ना लाईक न करणे.
२) कुठलीही बातमी, शहानिशा न करता शेअर न करणे
३) भडक चित्रे, चिथावणीखोर भाषा किंवा व्हिडीओ असलेल्या बातम्या देणाऱ्या पेजेसना लाईक न करणे. त्यांच्या पोस्ट्स शेअर न करणे.
४) कुठलीही पाशवी अत्याचाराची बातमी आली तर त्यावरून रान पेटवण्याआधी, जर फेसबुक नसते तर अश्या बातम्या कानी पडल्यावर आपण काय केले असते असा प्रश्न स्वतःला विचारणे, आणि मग मन शांत झाल्यावर योग्य शब्दात व्यक्त होऊ याची खात्री झाल्यावर समाजमाध्यमांवर आपले मत किंवा विचार मांडणे.
५) सरकार कुठलेही येवो आपल्या समाजातील लोकांच्या चांगुलपणावरील आपला विश्वास ढळू न देणे.

हे करू शकलो तर अनेक निवडणुका आणि अनेक वादळे आपण सहज पचवू शकू.

Wednesday, July 25, 2018

चपखल

भिकबाळी (किंवा बिगबाळी जे काय असेल ते) घातलेले, हातात मोठाली कडी किंवा ब्रेसलेट घातलेले किंवा गळ्यात पदक असलेल्या चेन घातलेले पुरुष जेव्हा मी बघतो तेव्हा मला त्यांचा अतिशय आदर वाटतो. म्हणजे हे लोक हे असं सगळं कसं काय बरं वागवत असतील? या प्रश्नाने मी हैराण होतो. कामासाठी घराबाहेर गेल्यावर थोड्या वेळातच हातातील घड्याळ आणि खिशातील पाकिटाचंही मला ओझं होतं. घाम आल्यावर घड्याळ नकोसं होतं आणि खुर्चीवर बसताना मागील खिशातील पाकीट अनावश्यक ऍक्युप्रेशर करतंय असं वाटल्याने मी अस्वस्थ होतो.

केसांच्या वेगळ्या रचना करणारे किंवा केस रंगवणारे किंवा पोनीटेल बांधणारे किंवा शाळकरी मुलींसारखा हेअरबॅण्ड घालणारे पुरुष जेव्हा मी पहातो किंवा झिरमिळ्यांची ओढणी घेऊन सलवार कुडते घालून सराईतपणे वावरणारे पुरुष पाहतो तेव्हा मला मनातल्या मनात त्यांच्याबद्दल हेवा वाटतो. पुढे जाऊन मी हिंदी सिनेमाच्या हिरोसारखे मधोमध भांग पाडून त्याचा कोंबडा मिरवू नये याची काळजी घेत परमेश्वराने माझे केस साळींदराच्या काट्यांच्या गुणधर्माचे बनवून मला या भूतलावर पाठवले. आणि दाढीच्या बाबतीत आपल्याला दाढी नीट दिसेल का? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत दाढी पांढरी होण्याची वेळ झाली. डोकं आणि खांदे या दोघांच्या मध्ये मान नावाचा एक अवयव देताना विधात्याने हात आखडता घेतल्याने आणि आमच्या मालीशवाल्या बाईंचा ‘ईश्वरेच्छा बलियसी’ वर विश्वास असल्याने ओढणी कुठे लटकवावी हा प्रश्न माझ्या बाबतीत माझ्या हयातीत सुटणार नाही. त्याशिवाय त्या झिरमिळ्यांच्या ओढणीत नेहमी काहीतरी अडकते किंवा मग ती ओढणी स्वतःच कशाततरी अडकते आणि माझ्या कूर्ममानेला ओढ देऊन आपले ओढणी हे नाव सार्थ करते.

केवळ ली कूपर किंवा हश पपीजचे बूट वापरणारे, अॅरो किंवा व्हॅन हयूसेनचेच शर्ट्स वापरणारे, फुलशर्टच्या बाह्या जोडण्यासाठी बटन न वापरता महागाचे कफलिंक्स वापरणारे, रेबॅनचा गॉगल वापरणारे किंवा मग टॉमी हिलफिगरचं घड्याळ वापरणारे, फोन कंपनीने नवीन मॉडेल बाजारात उतरवताच ते विकत घेणारे लोक पाहून मी अचंबित होतो. अर्थशास्त्रातील उपयोगितेचे तत्व यांना आणि ध्यानाकर्षी खरेदीचे तत्व मला शिकवू न शकलेल्या शिक्षकांबद्दल मला सहानुभूती वाटावी की राग यावा ते न कळल्याने मी गोंधळात पडून गप्प बसतो.

मादक पेयांची माझी व्याख्या ही द्राक्षासवापर्यंतच संपत असल्याने टकीला, शॉट्स, पेग, क्वार्टर असे शब्द वापरणारे, वेगवेगळ्या ब्रॅंड्सची नावं आणि त्यांची वैशिष्ट्ये माहिती असणारे पुरुष जेव्हा मी पाहतो आणि विशेषतः हॉटेलमध्ये वेटर अदबीने बाटली घेऊन आल्यावर त्याला हात लावून कसला तरी विचार करून त्याला होकार किंवा नकार देणारे पुरुष जेव्हा मी पाहतो तेव्हा मला माझ्या अज्ञानाचा महासागर किती अथांग आहे याची जाणीव होते.

कुठल्याही संगीताच्या मैफलीत माना डोलावणाऱ्या, वा वा करणाऱ्या लोकांबद्दल तर मला अतीव आदर आहे. म्हणजे ही जागा वाहवा करण्याची आहे हे यांना कसं कळत असेल त्याचं मला भयंकर कुतूहल आहे. रागांची नावे चटकन ओळखणारे, कुठली गाणी कुठल्या रागावर बांधली आहेत ते चटकन सांगू शकणारे लोक पाहून माझी मती गुंग होते. इथे मला गाण्याचे बोल लक्षात रहायची मारामार आणि यांना राग, त्याची द्रुतलय की मध्यलय वगैरे गोष्टीही इतक्या आरामात समजतात ते पाहून यांच्याबद्दल आणि यांच्या संगीतशिक्षकांबद्दल माझ्या मनात अपार आदर दाटून येतो.

आपण अभिनय करू शकतो, गाणं म्हणू शकतो, चित्र काढू शकतो, कविता करू शकतो, लेखन करू शकतो, मूर्ती घडवू शकतो; आणि पुढे आयुष्यभर आपल्याला हेच करायचं आहे; हे काही लोकांना नक्की केव्हा कळत असेल हादेखील एक न सुटलेला प्रश्न आहे. म्हणजे मला या सर्व कलांपैकी एकही कला येत नाही हे माझ्या शिक्षकांनी कमी मार्क देऊन किंवा विविध गुणदर्शनच्या स्पर्धेत शिरकाव करण्याच्या माझ्या सर्व प्रयत्नांना हाणून पाडून जाहीर रित्या सुचवायचा प्रयत्न केला. आणि मी ही गुर्वाज्ञा शिरसावंद्य मानून या कलांच्या वाट्याला गेलो नाही.

आपण कुणालाही गाढवात काढू शकतो, आपण फेसबुकवरून मोठमोठ्या राजकारण्यांना सल्ले देऊ शकतो, त्यांना आणि त्यांच्या अनुयायांना शाब्दिक चिमटे, गुद्दे, कोपरखळ्या, धपाटे इतकेच काय पण लाथाळ्याही करू शकतो अशी खात्री असलेल्या अनेक फेसबुकी विद्वानांबद्दल तर मला अतीव भीतीयुक्त आदर आहे. इथे मी सोसायटीच्या सेक्रेटरीला साधं पत्र लिहिताना डिअर सर लिहू की रिस्पेक्टेड सर लिहू यावर अडखळतो. त्यामुळे फेसबुकवर काही लोक नेत्यांना पप्पू, फेकू, उठा, पेंग्विन अश्या शेलक्या विशेषणांनी संबोधताना बघून मला हे सगळे लोक दाऊदपेक्षा जास्त धैर्यशील वाटतात. नावडत्या पक्षाच्या नेत्याबद्दल आणि त्याच्या अनुययांबद्दल बोलताना यांच्या वाणीला जो त्वेष चढतो तो पाहून आज लोकमान्य असते तर त्यांनी पुनश्च हरिओम वगैरे करण्याऐवजी अग्रलेख लिहिण्याच्या कामी यांची नेमणूक करुन स्वतः पुन्हा गणित किंवा गीतेत डोकं घातलं असतं आणि यांच्या अग्रलेखातील ज्वल्जहाल भाषेला टरकून स्वदेशीयांचं सरकारही इंग्रजांबरोबर भारत सोडून इंग्लंडला परतलं असतं.

यांच्या घरी कधी काही साधा प्रॉब्लेम झाला तर ही मंडळी सरळ फोन उचलून पप्पूला किंवा फेकूला किंवा उठांना आज्ञा करतील आणि त्या आज्ञेतील जरब ओळखून हे नेतेही धावत धावत, तातडीने, विजेच्या वेगाने, निमिषार्धात यांची कामं करून देतील याची मला खात्री आहे. किंबहुना यांच्या घरची कोथिंबीर, घेवडा, गवार वगैरे निवडून झाल्यावर, दिवसातून अर्धाच तास पाणी येणाऱ्या यांच्या बाथरूममधील ड्रम भरून झाल्यावर मग ही नेतेमंडळी देशाच्या कारभारात लक्ष घालत असावीत असा माझा कयास आहे.

फेसबुकवर सक्रिय होण्याअगोदर आपण ३६ आणि ३८ च्या मधील कंबर असल्याने रेडिमेड पॅन्ट जशीच्या तशी वापरू न शकणारे, ९ आणि १० च्या मधील मापाचा पाय असल्याने मोठे बूट घेऊन पुढे कापूस घालून वापरणारे असे जन्मजात कुठेही चपखल न बसणारे आहोत हे समजून चुकले होते.

पण आता फेसबुकवर सक्रिय झाल्यानंतर ‘आपल्याला नक्की काय हवंय? आपल्याला जे हवंय तेच योग्य का आहे? आणि आपल्याला जे नकोय ते टाकाऊच का आहे?’ याबद्दल आपल्याला काहीच ठाम मते नसल्याने आपण इथेही चपखल न बसणारे आहोत हे नक्की कळले आहे.

Wednesday, July 18, 2018

पुनः त्वम् मूषक: भव

आज तीन घटना घडल्या.

एका जिवलग मित्राने माझ्या पोस्टवर चर्चा सुरु करून लगेच स्वतः थांबवली.

एका मैत्रिणीच्या पोस्टवर मी दंगा करत असताना अजून एका मित्राने मी आऊट ऑफ लीग आहे असे मला बजावले.

(स्वतःच्या) कारमधून (स्वतःच्या) बायकोबरोबर (स्वतःच्या) घरी येत येतो. एफ एम वर अमिताभ बच्चन झीनत अमानला आरडीच्या आवाजात पटवून देत होता की बाई गं ‘समुद्रात न्हायल्यामुळे तू चविष्ट झाली आहेस.’ ‘नमकीन हो गयी हो’ चं भाषांतर मी, ‘चविष्ट झाली आहेस’ असं केल्यामुळे बायको हसू लागली. मग मला स्फुरण चढलं. ‘माझ्या नजरेची तू ही आता शौकीन झाली आहेस’, हे सध्याच्या काळात, ‘माझ्या व्हॉट्सअप किंवा मेसेंजर किंवा अजून कुठल्यातरी मेसेजची तू पण वाट बघत असतेस’ असं रूपांतर झालेलं आहे असा सिद्धांत मांडून मी गाण्यावर, प्रेमाच्या अभिव्यक्तीच्या बदलत्या रूपावर, शारीर स्वरूपावर निरूपण करत गेलो. थोड्या वेळाने बायकोकडे वळून पाहिलं तर कळलं की ती पेंगत होती.

आणि या तीन घटनांचा परिपाक म्हणून एकदम शाळेतल्या संस्कृत विषयाच्या पुस्तकातील एका धड्याचं शीर्षक, एखादा जटा कमंडलूधारी ऋषी हातात अभिमंत्रित जल घेऊन माझ्या दिशेने भिरकावत शापवाणी उच्चारल्याप्रमाणे म्हणतोय “पुनः त्वम् मूषक: भव’; असंच वाटलं.

गोष्ट अशी होती की एक ऋषी असतो. त्याला एक उंदीर सापडतो. मग त्या उंदराला तो सांभाळतो. एकदा उंदीर म्हणतो की मला मांजराची भीती वाटते म्हणून तो दयाळू ऋषी त्या उंदराला मांजर करतो. काही दिवसांनी मांजर म्हणते की मला कुत्र्याची भीती वाटते म्हणून तो दयाळू ऋषी त्या मांजराला कुत्रा करतो. मग काही दिवसांनी कुत्रा म्हणतो की मला वाघाची भीती वाटते म्हणून तो दयाळू ऋषी त्या कुत्र्याला वाघ करतो. वाघ झाल्यावर तो ऋषीकडे बघून गुरगुरतो आणि ऋषीवर झेप घेतो. ऋषी कमंडलूतील पाणी हातात घेतो, त्याला अभिमंत्रित करून वाघावर फेकतो आणि शापवाणी उच्चारतो की, ‘वाघा रे, पुनः त्वम् मूषक: भव’ आणि वाघाचा पुन्हा उंदीर होतो.

मी गाणी बिणी म्हणायचो. सुलटी आणि उलटीही. मी भरपूर पुस्तकं वाचायचो. पण मित्र फार नव्हते. त्यामुळे स्वतःशीच गप्पा मारायचो. शाळेच्या नाटकांत काम करायचो. त्यातही मला सालस मुलगा, पांढरा रंग अश्या भूमिका मिळायच्या. मग डोक्यात येणारे विचार धाकट्या भावाला, आईला आणि बाबांना ऐकवायचो. त्याचे महत्व जाणून किंवा मग त्याचा कंटाळा येऊन त्यांनी मला ‘तू हे सगळं लिहून ठेव’ असा सल्ला द्यायला सुरवात केली.

पण तोपर्यंत माझी प्रेयसी आयुष्यात आली. डोळ्याच्या पापण्यांची पिटपिट करत ती ज्याप्रमाणे माझ्याकडे बघत होती त्यामुळे तिला माझे विचार आवडतात असा माझा समज बळकट व्हायला सुरवात झाली. म्हणून मी घरच्यांशी बोलण्याऐवजी तिच्याशी भरपूर बोलू लागलो. कदाचित त्याचमुळे आई बाबा आणि धाकटा भाऊ या तिघांना ती फार चटकन आवडली असावी. मग तिच्याशी लग्न झालं. ती घरकाम करते आहे आणि मी बडबड करतो आहे असं आमच्याकडचं कायमचं दृश्य असायचं. कधी कधी मी बोलण्यात इतका गुंग होऊन जायचो की ती काम संपवून झोपी गेली आहे हे मला कळायचं सुद्धा नाही. शेवटी ती आमच्या घरात पूर्णपणे एकजीव झाली आणि तिनेही तोच सल्ला द्यायला सुरवात केली की, ‘अहो, नुसतं बोलून वाया घालवू नका. तुम्ही हे सगळं लिहून ठेवा’

तसा मी आज्ञाधारक नवरा असल्याने मी फेसबुकवर लिहू लागलो. इथे अनेक मित्र आहेत. त्यांच्या भिंती बघत होतो. त्यावर कमेंट करू लागलो. मग स्वतःच्या भिंतीवरही लिहू लागलो. आता बघतो तर मला जाणवतं आहे की इतरांच्याच काय पण माझ्या पोस्टवरील कमेंटमध्येही भरपूर दंगामस्ती करणारा मी, पोस्टचे विषय मात्र बहुतेकदा गंभीर निवडतो. मग अजून एक गंमत जाणवली की शाळेत भरपूर उपक्रमात भाग घेऊनही माझा मित्रपरिवार फार छोटा होता. इथे फेसबुकवरही भरपूर बडबड करूनही माझा मित्रपरिवार फार मर्यादित आहे. शाळेतील नाटकात माझ्या वाटेला सोज्वळ माणूस, पांढरा रंग अश्याच भूमिका यायच्या. आणि माझा मित्र सुयश म्हणतो त्याप्रमाणे फेसबुकवरही माझी प्रतिमा सोज्वळ माणसाचीच आहे. आणि या सर्वावर चेरी ऑन द केक असावी तशीच माझी इथली ओळखही माझ्या #आपुला_संवाद_आपणाशी या सिरीजमुळेच आहे.

म्हणजे शाळेत असो वा घरी वा प्रेयसीबरोबर वा बायकोबरोबर वा आता इथे समाजमाध्यमांवर प्रत्येक नवीन चक्राचा शेवट स्वतःशीच बोलण्यात होतो आहे. जणू प्रत्येक वेळी ऋषी सांगतोय की कुठल्याही गटात, नात्यात तू कितीही मोठं वर्तुळ तयार केलंस तरी शेवटी तू शेवटी स्वसंवाद करण्याच्या लायकीचा आहेस.

सगळी वर्तुळं अशीच पूर्ण होताना बघून एकदम चपराक बसल्यासारखं झालं. म्हणून गुपचुपपणे अमेझॉन प्राईमवर मिस्टर रोबोट ही इंटरनेट हॅकिंगवर असलेली सिरीयल मुलांबरोबर बघायला बसलो. एपिसोड संपला. आणि मुलांना टीसीपी आयपी मधील थ्री वे हॅन्डशेक, डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक वगैरे संकल्पना समजावून सांगू लागलो. मुलांचे डोळे कुतूहलाने आणि नवीन काहीतरी कळतंय या आनंदाने भरलेले दिसत होते. त्यामुळे स्फुरण चढून अजून रंगवून रंगवून सांगू लागलो. आणि एकाएकी मला जाणवलं की नवीन वर्तुळ चालू झालं आहे. कदाचित याचा शेवटही स्वसंवादात होईल. कदाचित इथेही मुलं चर्चा सुरु करून मधेच मागे सरतील. कदाचित त्यांनाही झोप लागेल. कदाचित तेही मला सांगतील, ‘बाबा, तू हे सगळं लिहून ठेव.’ आणि मग मला नवनवीन वर्तुळात टाकणारा अदृश्य ऋषी मंद स्मितहास्य करत असेल. कारण त्याला आता मंतरलेलं पाणी माझ्यावर फेकून शापवाणी उच्चारायची गरज पडणार नाही. कारण आता मला शेवट माहिती आहे.

शेवटी मी स्वसंवादासाठी बनलो आहे.

अमृतातेही पैजा जिंके

दिवसभर धो धो पाऊस कोसळत असतो.

आपण आठवडाभर घरात मदत न केल्याने आज अंग चोरुन बसणं शक्य नसतं. त्यामुळे आपण घरच्यांसाठी निमूटपणे दिवसभर वाहनचालक बनणं मान्य करतो.

सकाळपासून चार फेऱ्या मारुन होतात. मग आपल्याला वाढलेल्या दाढीची आठवण होते. आपण पुन्हा चारचाकी काढतो. तेवढ्यात अर्धांगाला अजून एक काम आठवतं. मग आपण वाहनचालकाच्या भूमिकेत शिरतो.

पाऊस कोसळत असतो.

कामं पूर्ण होतात. बाजारात असताना, अर्धांग शेजारी बसलेलं असताना आपण दुकानात फोन करुन गर्दी आहे का ते विचारतो. त्यावर गेली 26 वर्षे आपली श्मश्रू / क्षौर करुन मित्र झालेला दुकानदार आपल्याला लगेच बोलावतो. सकाळपासून आपण केलेल्या सेवेमुळे प्रसन्न झालेलं अर्धांग गाडीत बसून वाट पहायला तयार होतं.

पाऊस कोसळत असतो. आपण कशीबशी जागा शोधून गाडी उभी करतो. दुकानाकडे धाव घेतो. आपला मित्र समोर बसलेल्या गिऱ्हाईकाला बांधलेलं फडकं काढत असतो.

आपल्याला खुर्चीत बसायला सांगतो. पांढरं शुभ्र कापड आपल्या गळ्याभोवती बांधून दाढीवर पाणी मारतो. आता तो वस्तरा हातात घेणार इतक्यात आधीचं गिऱ्हाईक झालेल्या कामात सुधारणा सुचवतो. आपल्याला तसंच सोडून मित्र आधीच्या गिऱ्हाईकाकडे पुन्हा वळतो.

एका गिऱ्हाईकाची अर्धी दाढी करुन दुसर्‍या गिऱ्हाईकाकडे वळणाऱ्या रस्त्याकडेच्या न्हाव्याच्या गोष्टीची आठवण आपल्या डोक्याचा ताबा घेते.

जुन्या गिऱ्हाईकाने वेळ खातं. आणि इतका वेळ गाडीत थांबलेल्या अर्धांगाचा फोन येतो. गुंडाळलेल्या पांढऱ्या कापडातून शर्टाच्या खिशातील फोन आपण कसा बसा बाहेर काढतो. 'हो. हो. आलोच आलोच' म्हणत आपण फोन समोर आरशाखालच्या टेबलावर ठेवतो. अर्धांग गाडीत बसलं आहे ही सत्यपरिस्थिती आपण 26 वर्ष जुन्या मित्राला सांगतो.

बाका प्रसंग ओळखून तोही कामाची घाई करतो. इतक्यात त्याला लागोपाठ दोन फोन येतात. वेळ गेल्याने आपण चुळबुळ सुरु करतो. मग तो घाईघाईने आपल्याकडे वळतो.

इतक्यात आपण समोर ठेवलेला आपला फोन वाजतो. 'वहिनींचा फोन आलाय वाटतं. घ्या लवकर.' असं आपला मित्र सांगतो.

परदेशी असलेल्या आणि यापूर्वी एकदाच बोलणं झालेल्या आपल्या एका सुस्वरूप वर्गमैत्रिणीने कधी नव्हे तो आज व्हॉटस अॅप कॉल केलेला आहे हे बघून आणि मित्राने 'वहिनींचा फोन' असं म्हटल्याने किंचित रोमांचित होऊन आपण फोन उचलतो. हॅलो हॅलोत वेळ जातो. 'थोड्या वेळाने फोन करु का? आता मी सलूनमधे आहे' किंवा 'आता मी बार्बरकडे आहे' किंवा 'आता मी पार्लरमधे आहे' अशा विविध वाक्यरचना निमिषार्धात डोक्यात तयार होतात.

पण अर्धी दाढी करुन गिऱ्हाईकाला अडकवून ठेवणाऱ्या आणि काही क्षणांपूर्वी डोक्याचा ताबा घेतलेला न्हावी पुढे येतो. आणि 'थोड्या वेळाने फोन करु का? जरा न्हाव्याकडे बसलोय' असं वाक्य आपण त्या परदेशस्थ सुस्वरूप मैत्रिणीस ऐकवतो.

इंप्रेशन मारण्यात कायम गडबड करणाऱ्या आपल्याला त्याचवेळी समोरच्या आरशात स्वतःचा गोरामोरा झालेला चेहरा दिसतो. आणि 26 वर्ष श्मश्रू / क्षौर करणारा तो नाभिक / वारिक मित्र आपल्या शब्द योजनेमुळे विचलित होऊन वस्तरा परजताना दिसातो. की मग एकाएकी अमृतातेही पैजा जिंकेवरचं आणि एकाच वेळी अनेक गोष्टी आठवणाऱ्या स्मरणशक्तीवरचं आपलं प्रेम आटू लागतं.

Monday, June 11, 2018

Avengers Infinity War


Source : Internet 
आपल्याकडे कॉमिक्स ही लहान मुलांनी वाचायची गोष्ट आहे. त्यामुळे कॉमिक्सवरुन चित्रपट बनले तरी ते लहान मुलांसाठीच असतात.

हिंदीतला क्रिशसारखा किंवा G1 सारखा सुपरहिरो प्रेम करतो, गाणी म्हणतो आणि खलनायकाशी लढताना संतपदाला पोचल्यासारखा वागतो. त्याचा आणि त्याच्या खलनायकाचा लढा तात्विक नसतो. खलनायक तंत्रज्ञानकुशल असला तरी कुठल्याही विचारधारेशी बांधलेला वगैरे नसून लहानपणी झालेल्या अन्यायामुळे विकृत झालेला असतो.

भारतीय सुपरहिरोंचे चित्रपट म्हणजे देव - असुर, सुष्ट दुष्ट प्रवृत्ती यांच्यातल्या झगड्याचं सत्प्रवृत्ती आणि खलप्रवृत्तीमधील किंवा प्रकृती आणि विकृतीमधील झगड्याचं तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रंगवलेलं रुप असतं.

भारतीय सुपरहिरोला लोकप्रिय करण्यासाठी एखाद्या स्टार कलाकाराची गरज असते. लोकप्रिय सुपरहिरोचं काम करुन एखादा अनाम कलाकार प्रकाशझोतात आला असं अजून भारतात घडायचं बाकी आहे.

याउलट मार्व्हल किंवा डिसी कॉमिक्समधले सुपरहिरो आणि खलनायक तत्त्वासाठी झगडताना दिसतात. आपल्याला सत्य समजलं आहे हा त्यांचा दावा असतो. झगडा सत्प्रवृत्ती विरुध्द खलप्रवृत्ती असा नसून दोन प्रवृत्तीमधला असतो. कित्येकदा नायक आणि खलनायक यांच्यातील कोण बरोबर हेदेखील प्रेक्षकाला कळेनासे होते.

बॅटमॅनचा जोकर असो किंवा अॅव्हेंजर्सचा थॅनोस, त्यांच्या वागण्याला विकृतीऐवजी विचारांचं अधिष्ठान असतं.

विश्व आणि त्यातील साधनसामुग्री सांत आहे पण सतत मोठ्या संख्येने जन्म घेत रहाणार्‍या जीवांमुळे जीवन अनंत आहे. या सर्व जीवांना साधनसामुग्री पुरणार नाही. अमर्याद जीवन शेवटी सर्व जीवांसाठी साधनसामुग्रीचा तुटवडा तयार करेल. त्यावेळी सर्व जीवांचा हालहाल होऊन मृत्यू होईल. म्हणून विश्वातील निम्मे जीव भावनिक न होता संपवले पाहिजेत. त्यामुळे उरलेल्यांना साधनसामग्री पुरेल हा विचार करणारा थॅनोस. तर अमर्याद जीवनाला आपण संपवणे अयोग्य असे मानणारे अॅव्हेंजर्स, यापैकी कोण बरोबर? असा प्रश्न घेऊन प्रेक्षक सिनेमाबाहेर पडतो.

माझ्या डोक्यात अजून दोन प्रश्न आले. मराठी सुपरहिरो कधी येतील? आणि ते कुठल्या वाटेने जातील, बॉलीवूडच्या की हॉलीवूडच्या?

Wonderful Wonderful

विशीत पदार्पण करायच्या आधी मी प्रेमविवाहातला अर्धा भाग पूर्ण करून प्रेमात पडलो होतो. विवाह करायचा होता पण त्याआधी स्वतःच्या पायावर उभं राहायचं बाकी होतं. त्यावेळी माझ्या तत्कालीन प्रेयसीवर (जिला चार वर्षे चाललेल्या कोर्टशिपनंतरही माझा कंटाळा न आल्याने किंवा चार वर्षात माझा इतका धाक बसला की नंतर माझ्याशी विवाह करण्यास नकार देऊ न शकल्याने जी पुढे माझी अर्धांगिनी बनली आणि माझ्या पूर्ण आयुष्यावर जिने ताबा मिळवला) इम्प्रेशन मारण्यासाठी भरपूर बडबड करत असे. एकदा बोलता बोलता तिला सहज म्हणालो होतो की ‘We are the history of future’. ते वाक्य माझं मलाच आवडलं. त्यामुळे मग अजून एक जाणीव झाली की पुढे छान भविष्य हवं असेल तर आज छान काम करायची जबाबदारी आपल्यावर आहे. मग तर अशी सवयंच झाली की पुढे काय हवं ते ठरवायचं आणि त्याप्रमाणे काम करायचा प्रयत्न करायचा.
त्यात कित्येकदा असं व्हायचं (आणि अजूनही होतं) की मला दिसणारं भविष्य मी इतरांना सांगू शकायचो नाही. तिकडे कसा काय पोहोचणार तेही मला नीट कळलेलं नसायचं, पण ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी उतावीळ झालेलो असायचो. त्यामुळे मग मी घरातल्यांवर आणि विशेषतः सप्तपदी करून आलेल्या माझ्या प्रेयसीवर झटकन चिडायचो. पण बहुतेक माझ्या बायकोचं गोत्र विश्वामित्र किंवा जमदग्नी असावं. कारण तिनेही प्रत्येक वेळी न चुकता ‘शस्त्राघाता शस्त्रची उत्तर’ हा न्याय वापरला. दोघांपैकी एकाला अंधुक दिसणाऱ्या आणि शब्दात पकडता न येणाऱ्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणायचं कसं? या समस्येमुळे आम्ही एकमेकांना ज्या प्रेमादराने शहाण्यांत काढायचो की ‘प्रेमविवाहाचे फायदे तोटे’ या विषयावर आम्ही दोघे तीन तासाचा द्विपात्री कार्यक्रम करून; ‘आपण प्रेमविवाह करावा’, असं तरुणांना आणि ‘आपल्या लेकाने / लेकीने प्रेमविवाह करू नये’ असं त्यांच्या पालकांना एकाच वेळी पटवू शकतो.

आता माझ्या अर्धांगाने जितकं आयुष्य तिच्या माहेरी काढलं जवळपास तितकंच आयुष्य माझ्याबरोबर पूर्ण करून झालं आहे. मनाने आम्ही दोघं अजूनही विशीतंच असलो तरी अनुभवांनी आता चाळिशी गाठलेली आहे. दोन मुलांची काळजी घेताना आम्हा दोघांनाही भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमातील No First Use policy चं महत्व पटलेलं आहे. आता ‘जिंकू किंवा मरू’ चा आवेश सरलेला आहे आणि ‘हानी न होवो, होवो शुभंकर’ अशी नवी ओळ आम्ही गदिमांच्या समरगीतात घुसडून तहाचं निशाण कायम हाताशी ठेवतो आहोत. आता आम्हाला आमचं भविष्य अगदी स्पष्ट दिसत नसलं तरी ते जितकं दिसतं तितकं आपल्या जोडीदाराला कुठल्या शब्दांत मांडलेलं अधिक चांगल्या प्रकारे समजेल याचा बऱ्यापैकी अंदाज आलेला आहे.

अजून काही आयुष्याचं सिंहावलोकन करण्याची वेळ आलेली नाही पण मध्यंतरी बायको एक इंग्रजी टीव्ही सिरीयल बघत होती. बरेच दिवस (खरं तर बरीच वर्ष) चाललेली ती सिरीयल एकदाची संपली. सिरीयल बघताना नंतर बायको कंटाळूनही गेली होती. मधले कित्येक बेचव भाग सहन करून शेवटी जेव्हा ती सिरीयल संपली तेव्हा नेमका मी घरी होतो. ही सिरीयल बघत होती आणि मी फेसबुकवर टाईमपास करत होतो. एकाएकी थोड्या राकट पुरुषी आवाजातलं गाणं घरात वाजू लागलं. त्या आवाजाने माझं लक्ष वेधून घेतलं. गाणं फार मस्त होतं. चटकन आम्हा दोघांच्या डोळ्यात पाणी आलं.

मग माझ्या स्वभावाला अनुसरून ते गाणं, त्याचे बोल इंटरनेटवर शोधणं वगैरे उद्योग केले. आणि त्या गाण्यामागच्या कल्पनेने मला मोहून टाकलं.

आयुष्याची संध्याकाळ आहे. सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. पाखरांना दिलेल्या बळाचं त्यांनी चीज केलं आहे. कृतकृत्य म्हातारा आणि म्हातारी एकटे एकमेकांच्या सोबतीने रहात आहेत. आणि अशात एके दिवशी म्हातारा आपल्या सुरकुतलेल्या म्हातारीला उद्देशून म्हणतो की,

‘बाई गं, कधी कधी समुद्रकिनाऱ्यावरून हातात हात घालून चालताना जेव्हा मी तुझं चुंबन घेतो तेव्हा मिळणारा आनंद माझ्यासाठी अवर्णनीय असतो. मोकळ्या आकाशाखाली, एखाद्या टेकडीवर जेव्हा मी तुला मिठीत घेतो आणि त्यावेळी त्याक्षणी तिथे केवळ आपण दोघेच असतो तेव्हा मिळणारा आनंद माझ्यासाठी अवर्णनीय असतो. मला जाणवतं की हे जग अनेक आनंददायी गोष्टींनी भरलेलं आहे पण तू जर जवळ नसशील तर त्या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाही. काही शांत संध्याकाळी जेव्हा आपण दोघे एकमेकांशेजारी बसलेलो असतो तेव्हा माझ्यावर तू करत असलेल्या प्रेमाची प्रभा तुझ्या चेहऱ्यावर दिसते आणि त्यावेळी मी किती मोठ्या भाग्याचा धनी आहे ते मला जाणवतं. आणि मग मी म्हणतो की बाई गं, तू आहेस म्हणून सगळं आनंददायी आहे. ‘

Sometimes we walk hand in hand by the sea
And we breathe in the cool salty air,
You turn to me with a kiss in your eyes
And my heart feels a thrill beyond compare
Then your lips cling to mine, it's wonderful, wonderful
Oh, so wonderful my love.

Sometimes we stand on the top of a hill
And we gaze at the earth and the sky
I turn to you and you melt in my arms
There we are, darling, only you and I
What a moment to share, it's wonderful, wonderful
Oh, so wonderful my love

The world is full of wondrous things it's true
But they wouldn't have much meaning without you

Some quiet evenings I sit by your side
And we're lost in a world of our own
I feel the glow of your unspoken love
I'm aware of the treasure that I own
And I say to myself, it's wonderful, wonderful
Oh, so wonderful my love!


आपल्या समाजातील वृद्धांना संध्याछाया भिववू लागल्या की भक्तीरस, अध्यात्म यात गोडी निर्माण व्हावी अशी आपल्या समाजाची अपेक्षा असते. आणि ती अपेक्षा इतकी प्रखर असते की म्हातारा आणि म्हातारी एकमेकांवर अजूनही प्रेम करत असतील ही कल्पनाही आपण करू शकत नाही.

आपले कृतकृत्य वृद्ध बहुतेकदा एकारलेले असतात. किंवा मग ‘लाख चुका असतील केल्या’ असं म्हणत पश्चात्तापदग्ध असतात. किंवा मग ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ अशी आर्जवे करत आपल्या दूर गेलेल्या पाखरांच्या आठवणीत दुःखी असतात. किंवा मग ‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी’ असं म्हणत जोडीदाराऐवजी विश्वाबरोबर आपले अद्वैत अनुभवायचा प्रयत्न करतात. या पार्श्वभूमीवर जेव्हा मी या इंग्रजी म्हाताऱ्याचे शब्द ऐकले तेव्हा आत कुठेतरी सुखावलो. माझा पिंड जरी भारतीय मातीतला असला, इथल्या तत्वज्ञानाने जरी मला वेळोवेळी साथ दिली असली तरी प्रेमविवाह केल्याने आणि आपल्या निर्णयाची जबाबदारी स्वतःवर आहे हे जाणवल्याने; आयुष्याच्या संध्याकाळी माझी नाळ विश्वाच्या पसाऱ्याशी, किंवा उडून गेलेल्या चिमण्यांशी जोडण्याऐवजी किंवा केलेल्या चुकांबद्दल माफी मागत राहण्याऐवजी, घेतलेल्या योग्य निर्णयांना आनंददायी करण्याचं श्रेय आपल्या म्हातारीला देणारा म्हातारा मला जास्त जवळचा वाटतो.

We are the history of future हे मला जाणवलेलं सत्य आहे. म्हणून भविष्याला छान करण्यासाठी आज छान काम करणं माझी जबाबदारी आहे हे मला मान्य आहे. आयुष्याच्या संध्याकाळी कुठलं गाणं म्हणायचं आहे ते मला सापडलं आहे. त्यामुळे कदाचित माझं आजचं वागणं अजून सजग होईल या जाणीवेने मी खूष झालोय. Life is wonderful आणि ते wonderful का आहे त्याचं एक कारण मला कळलं आहे.

समाजाचे अनारोग्य

अनारोग्य शब्दात आरोग्यात झालेला बिघाड अभिप्रेत असतो. व्यक्तीच्या संदर्भात बोलताना हा बिघाड शारीरिक असू शकतो किंवा मानसिक. शरीराला दृश्य अस्तित्व आहे तर मन अदृश्य असल्याने आपण मनाला एक संकल्पना मानू शकतो. असे असले तरी निरोगी शरीर आणि निरोगी मन म्हणजे काय याची व्याख्या सुस्पष्ट असते आणि ती देशकालपरत्वे बदलत नाही. त्यामुळे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक अनारोग्याची व्याख्यादेखील सुस्पष्ट रहाते.

सर्व व्यक्तींची शरीरे विविध रसायनांना कमी अधिक प्रमाणात का होईना पण ठरविक पद्धतीने प्रतिसाद देतात. त्यामुळे शारीरिक अनारोग्यावर उपाय करणे शक्य असते. मन जरी अदृश्य असले तरी मनाच्या घावावर कधी मनाची फुंकर तर कधी औषधांचा मारा उपयोगी पडताना दिसतो. त्यामुळे व्यक्तीचे अनारोग्य शारीरिक असो वा मानसिक, वाईट सवयींमुळे असो वा बाह्य घटकांमुळे, त्याला दुरुस्त करता येणे किंवा त्याची तीव्रता कमी करणे शक्य असते.

मात्र समाजाच्या बाबतीत जेव्हा आपण आरोग्य आणि अनारोग्य या संकल्पना वापरतो तेव्हा समाज हीच एक संकल्पना आहे. त्यामुळे समाजाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य - अनारोग्याची व्याख्या करणे कठीण होते. मग या संकल्पनारूपी समाजशरीराचे आणि समाजमनाचे आरोग्य बिघडले की नाही ते ठरवायचे कसे? आणि त्याला पूर्ववत किंवा अधिक सक्षम बनवायचे कसे? या प्रश्नांची अचूक उत्तरे मिळण्याची शक्यता धूसर होत जाते. समाज जरी अशरिरी संकल्पना असली आणि समाजाच्या आरोग्य अनारोग्याच्या व्याख्येपासून उपायांपर्यंत अचूकतेचा अभाव असला, तरी व्यक्तीच्या जीवनावर समाजाचा प्रभाव पडत असल्याने समाजाच्या अनारोग्याबद्दल विचार करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे.

विचारांच्या सोयीसाठी समाजातील आबालवृद्ध स्त्री पुरुषांच्या शरीरांची एक मोळी बांधून मी त्याला समाजाचे शरीर म्हणतो. तर या सर्वांच्या मनाची गोळाबेरीज म्हणजे समाजमन आहे अशी कल्पना करतो.

आता समाजाचे शरीर दृश्य झाल्यावर आपण त्याच्या आरोग्याची व्याख्या करू शकतो. माणसांना आपल्या सर्व गरजा एकट्याने पूर्ण करणे अशक्य असते त्यामुळे समाजाची निर्मिती होते. पण समाजाच्या सहाय्याने आपल्या गरजा पूर्ण करून घेताना समाजातील इतरांच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर येते. समाजशरीराच्या वर केलेल्या व्याख्येप्रमाणे समाजशरीराचे स्त्री व पुरुष हे दोन प्रमुख भाग होतात. आणि या दोन्ही भागांत विविध वयाच्या अनेक व्यक्ती येतात. त्याशिवाय समाजशरीराची अव्यंग व अपंग अश्या दोन भागात विभागणी करता येणे शक्य असते. या दोन्ही भागात मग स्त्री - पुरुष, बाल - तरुण - वृद्ध अशी विभागणी करता येते. वय, व्यंग आणि लिंग यात भेद असूनही गरजा सगळ्यांना असतात पण इतरांच्या गरजा पूर्ण करण्याची प्रत्येकाची ताकद वेगवेगळी असते. त्यामुळे लोकसंख्या वाढत गेल्यावर समाजात गरजांची मागणी वाढत गेली तरीही गरजांच्या पूर्तीचा पुरवठा पुरेसा होईल याची खात्री नसते. परिणामी समाजाचे शारीरिक आरोग्य बिघडते.

म्हणजे स्त्री पुरुष लोकसंख्येचा समतोल बिघडणे; बहुसंख्य जनता अपंग निपजणे; समाजातील वृद्धांची लोकसंख्या तरुणांपेक्षा वाढणे; समाजातील लहान मुलांची संख्या कमावत्या व्यक्तींपेक्षा वाढणे; ही सर्व समाजाचे शारीरिक आरोग्य बिघडल्याची लक्षणे आहेत. कारण यातील प्रत्येक घटितामुळे गरजांची मागणी करणाऱ्यांची संख्या वाढते तर गरजांची पूर्ती करणाऱ्यांची संख्या कमी होत जाते. परिणामी सक्षम लोकसंख्येवरचा ताण वाढतो आणि समाजाचे शारीरिक आरोग्य धोक्यात येते. पुढे जाऊन मानसिक आरोग्यही धोक्यात येण्यास सुरुवात होते.

जननदर नियंत्रित करणे, वृद्धापकाळासाठी पैशाची बचत करण्याची सवय समाजाला लावणे, लोकसंख्येतील स्त्री आणि पुरुषांचे प्रमाण सारखे राखणे, सर्व स्त्री पुरुषांना अर्थार्जनासाठी सक्षम बनविणे या उपायांनी शारीरिक अनारोग्याला दुरुस्त करणे शक्य आहे. हे सर्व उपाय दीर्घकालीन आहेत. त्यामुळे ज्या पिढीत अनारोग्याची समस्या जन्माला येईल त्याच पिढीत हे उपाय अमलात आणले तरीही त्यांचा फायदा साधारणपणे तिसऱ्या पिढीत दिसून येतो. आणि यातील काही उपायांचा अतिरेक नवीन समस्यांना जन्म देणारा असतो. उदाहरणार्थ, 'हम दो हमारा एक' च्या उपायाने चीनच्या एका पिढीची समस्या सोडवली असली तरी आता पुढील पिढीसाठी तरुणांपेक्षा दुप्पट वृद्ध ही समस्या तयार केली आहे. याचा अर्थ इतकाच की, समाजशरीरात अनारोग्य कशामुळे निर्माण होते? त्याचे निर्मूलन करून समाजशरीराला पूर्ववत करण्याचे उपाय कोणते? आणि कुठल्या उपायांच्या अतिरेकाने नवीन प्रकारचे अनारोग्य तयार होऊ शकते? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली गेली आहेत. ती दीर्घकालीन असली तरी ती परिणामकारक आहेत.

मग प्रश्न उरतो तो समाजमनाच्या अनारोग्याचा.

सर्वसाधारणपणे भारतातील सर्वच पिढ्या "आमच्याकाळी असं नव्हतं" हे वाक्य आपल्या पुढल्या पिढीला ऐकवतात. आणि याचा खरा अर्थ असतो "आमच्याकाळी समाज आजच्याइतका बिघडलेला नव्हता". भारतातील सर्व पिढ्यांची येणाऱ्या काळाबद्दल जर अशीच नकारात्मक भावना असेल तर याचा एकंच अर्थ निघतो की 'भारतीय समाजाचे मानसिक आरोग्य बिघडलेले आहे', असा किमान भारतीयांचा तरी समज आहे.

असे का होत असावे? नव्या जुन्या पिढीत संघर्ष ही देशकालनिरपेक्ष गोष्ट आहे. असे असताना भारतीय समाज या संघर्षातील विजेत्यांचे कौतुक करण्याऐवजी त्यांना वाट चुकलेले मानण्यात धन्यता का मानत असावा?संपूर्ण जगात सगळ्यात जास्त समाजसुधारक भारतात जन्माला आलेले असूनही प्रत्येक पिढीला गतकालीन समाज वर्तमानकालीन समाजापेक्षा अधिक योग्य का वाटत असावा? समाजसुधारक आहेत, आपण त्यांना वंदन करतो, त्यांच्यामुळे आपले जीवन सुखकर झाले हेही मान्य करतो परंतु "आमच्याकाळी असं नव्हतं" हे पालुपद मात्र आपण सोडत नाही. हे असे का? याचा विचार करताना आपल्याला भारतीय समाजमनाच्या गुंतागुंतीकडे लक्ष द्यावे लागेल.

प्रत्येक समाजात नवनवीन विचारांचे आगमन होत असते. ते जर समाजाच्या आतून असेल तर त्या विचाराला समाजाकडून प्रखर विरोध होतो. विरोधामुळे त्या विचारातील तीव्र टोकाचा भाग गाळून जातो आणि समाजाच्या मानसिक वयाला सहन होईल असा भाग टिकून रहातो. पुढील पिढीला वारसा म्हणून मिळतो. याचाच अर्थ जेव्हा समाजाच्या आतून एखादा विचार जन्माला येतो तेव्हा त्या विचाराची आणि समाजाच्या तत्कालीन धारणांची जी झटापट होते त्यामुळे तो विचार आणि समाजाच्या धारणा दोन्ही एकमेकांना घडवतात. म्हणजे विचार आणि समाज या दोघांची उत्क्रांती होते. वैचारिक उत्क्रांती जैविक उत्क्रांतीप्रमाणे हळूहळू चालणारी गोष्ट असल्याने नवीन विचारांचा टिकण्यासाठीचा संघर्ष दीर्घकालीन असतो आणि विचाराबरोबर उन्नत होत जाण्याचे भाग्य समाजाला लाभते. पाश्चात्य जगातील एकेश्वरवाद, भांडवलशाही, शिक्षणव्यवस्था, व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, स्त्री पुरुष समानता, प्रौढ मतदानावर आधारित लोकशाही या सर्व कल्पनांनी, त्यांच्या उद्गात्यांनी आणि समर्थकांनी आजच्या काळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रखर संघर्ष केला. त्यात कित्येकदा प्रत्यक्ष आयुष्यातील त्यांचे वर्तन आणि ज्या कल्पनेला ते पाठिंबा देत होते यांत तफावत होती. परंतू सततच्या संघर्षामुळे आपल्या आचार विचारातील विसंगतीवर उपाय शोधणे त्या समाजांना शक्य झाले. हे उपाय म्हणजे त्यांनी स्वतःच्या अपूर्णतेवर मिळवलेला विजय होता. त्यामुळे त्यांना गतकाळापेक्षा वर्तमानकाळाचे प्रेम अधिक असणे स्वाभाविक आहे.

भारतीय समाजाच्या बाबतीत भारताबाहेरून सातत्याने दोन गोष्टींचे आगमन झाले. एक म्हणजे राजे आणि दुसरे म्हणजे नवीन विचार. आणि या दोघांच्या आगमनात एक साम्य होते. प्रत्येक नवीन जेत्याने पराभूतांचे, त्यांच्या संस्कृतीचे पूर्णपणे शिरकाण न करता त्यांना केवळ राज्यकारभारातून बाजूला सारून आपले राज्य वसवले. जसजसे नवनवीन जेते येत गेले तसतसे पूर्वीचे जेते पराभूत होऊन, ज्यांना पूर्वी धूळ चारली त्यांच्या बरोबरीने राहू लागले. त्यामुळे भारतात एकेकाळी जेते असलेले पण नंतर पराभूत झालेले अनेक समूह एकाशेजारी एक नांदू लागले. जी गोष्ट पराभूत समूहांची तीच गोष्ट विचारांची. नवनवीन जेते नवनवीन संकल्पना आणत होते. जेत्याने त्या आणल्यामुळे किमान तत्वतः मान्य करण्याशिवाय भारतीय समाजाला गत्यंतर नव्हते. परंतू व्यवहारात मात्र जुन्या चालीरीतीच चालू राहिल्या.

म्हणजे नवीन विचाराला रुजण्यासाठी भारतीय समाजमनाची आवश्यक ती मशागत झालेली नसताना केवळ राजकीय किंवा आर्थिक सामर्थ्याने अनेक विचारांचे भारतीय समाजात आगमन झाले तेही समाजाबाहेरून. विचार जेत्यांकडून आलेले होते. परिणामी त्या विचाराबरोबरचा संघर्ष हा स्वतःच्या धारणांबरोबरचा संघर्ष न ठरता केवळ आक्रमकांबरोबरच संघर्ष ठरला. आणि त्यात कुणाचाही निर्णायक विजय होण्याआधी नवीन आक्रमक नवीन विचार घेऊन भारतात येत राहिले. आणि प्रत्येक भारतीय पिढीत "आमच्याकाळी असं नव्हतं" ही भावना दृढ होत गेली.

आधुनिक जगात फार क्वचित राजकीय किंवा सैनिकी आक्रमण केले जाते. आता इतर समाजांवर आक्रमण करण्यासाठी नवनवीन आर्थिक आकृतीबंध हेच प्रभावी हत्यार आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’, सारखा उच्च सामाजिक विचार विचार मांडू शकणाऱ्या भारतात दुर्दैवाने स्वतःचे आर्थिक विचार नाहीत. लोकांनी एकत्र का यावे? काय बनवावे? किती बनवावे? कसे वाटावे? याबाबत भारतीयांनी स्वतःचा कुठलाही नवीन विचार मांडलेला नाही. इतकेच काय पण पाश्चात्य देशांतील विचार राबवताना त्यांचे पुरेसे भारतीयीकरण करण्याचे कष्टही घेतलेले नाहीत. त्यामुळे भारतीयांच्या प्रत्येक पिढीत 'पैसा हाच खरा देव असूनही', 'पैसा झाला मोठा' याबद्दल आश्चर्य, दुःख आणि शोक व्यक्त केला जातो.

इंटरनेटमुळे, वाहतुकीच्या जलद साधनांमुळे आणि आर्थिक उदारीकरणामुळे जग आणि भारतीय यातील सीमारेषा पुसल्या जात आहेत. भारतीय समाजात पाश्चात्य समाजातील उन्मुक्तपणाचा संचार होत आहे. पण या उन्मुक्तपणाचे आगमनही भारतीय समाजमनाची पुरेशी मशागत झालेली नसताना भारतीय समाजाबाहेरून होते आहे. त्यामुळे भारतीयांची तरुण पिढी बिघडलेली आहे का? भारतीय तरुण समाजमन उन्मुक्तपणाच्या अनारोग्याने ग्रस्त झाले आहे का? हे प्रश्न कुणाला पडू शकतात. चटकन हे प्रश्न योग्य वाटले तरी मला ते अवास्तव वाटतात. आपण उन्मुक्तपणाच्या या विचारांचे भारतीयीकरण कश्या प्रकारे करू शकू? आपण भारतीय समाजमनाला नवीन विचारांशी संघर्ष करत त्या विचाराबरोबर स्वतःला उत्क्रांत व्हायला कश्या प्रकारे शिकवू शकू? हे प्रश्न माझ्या मताने अधिक महत्वाचे आहेत.

माणसाच्या सर्व शारीरिक आणि मानसिक गरजा योग्य कश्या आहेत ते सांगणाऱ्या आणि त्या गरजांना पूर्ण करण्यासाठी नवनवीन सामाजिक आणि आर्थिक आकृतिबंधांना आकार देणाऱ्या नवनवीन संकल्पनांच्या लाटा जगभरात निर्माण होत राहाणार आहेत. त्या जगभर फिरणार आहेत. मग त्या लाटांना आपण कश्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो? आणि अश्याच लाटा आपण तयार करू शकतो का? हे आपल्या समाजापुढले महत्वाचे प्रश्न आहेत. जर यांचे उत्तर नाही असेल तर आपण समाजमनाच्या मोठ्या अनारोग्याला आमंत्रण देत आहोत.

आपण निर्णय घेतो आहोत, आपण आपल्या मनाचे राजे आहोत ही भावना फार सुखावह असते. या भावनेने परिपूर्ण मन आरोग्यपूर्ण राहते. पण राजा होण्यासाठी तुमचा अधिकार इतरांनी मान्य करावा लागतो. म्हणजे आपल्याला राजा होण्याचा अधिकार कुणी दिला? या प्रश्नाचे उत्तर, राजा होण्याची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आणि समाजाला द्यावी लागते. सध्याच्या काळात तो अधिकार फक्त जास्तीत जास्त लोकांसाठी उपयोगी पडणाऱ्या समाजालाच मिळतो. त्यामुळे भारतीय समाजमन अनारोग्याने ग्रस्त होऊ नये असे आपल्याला वाटत असेल तर आपल्या समाजातील लहानग्यांना, तरुणाईला आणि वृद्धांना; स्त्रियांना आणि पुरुषांना; जगासाठी कायम उपयोगी कसे रहायचे ते शिकवणे आपल्याला क्रमप्राप्त आहे.

पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक विवेक (एप्रिल २०१८)