Sunday, January 31, 2016

एअरलिफ्ट

(Image Courtsey : IMDB)
एअरलिफ्ट पाहिला. तो बघायचा हे तर ट्रेलर बघतानाच ठरवलं होतं. काल रात्री एका मैत्रिणीने आणि आज सकाळी एका मित्राने अल्पाक्षरी रिव्ह्यू दिला होता. "छान आहे. आवडला. तू नक्की बघ." म्हणून. त्यामुळे आज सकाळी तिकीट मिळणार की नाही या धाकधुकीत असताना संध्याकाळच्या शो ची तिकीट हिने काढून आणली आणि पिक्चर बघायला गेलो.
पिक्चर बघत होतो. आणि अनेक गोष्टी एकामागून एक आठवू लागल्या. १९९० म्हणजे मी ९ वीत होतो. तेंव्हा रात्री बातम्यांमध्ये युद्धाचे काही प्रसंग दाखवायचे. शुक्रवारी रात्री लागणाऱ्या वर्ल्ड धिस वीक मध्ये अजून जास्त. पण ते सगळे रात्रीचे प्रसंग असायचे. अंधारात उडणारी स्कड मिसाईल्स. प्रकाशाचे गोळे वगैरे. त्या युद्धाची एकदम मोठी ठळक आठवण म्हणजे गल्लोगल्ली सुरु झालेले पी सी ओ / एस टी डी / आय एस डी चे फोन बूथ. मोबाईल अजून यायचे बाकी होते. म्हणून गल्फ मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या नातेवाईकांसाठी संवाद करण्याचा तो महत्वाचा दुवा होता. माझा प्रिय मित्र ओंकार पत्की याचे बाबा सौदी अरबला असायचे. जेंव्हा अमेरिकेने चढाई सुरु केली त्या दिवशी ते सौदीला परत गेले होते. त्यानंतर ओंकार आणि त्याची आई यांची जीवाची घालमेल जवळून पाहिली होती. युद्ध तसे दूरच होते ते जवळ आले होते केवळ ओंकारच्या बाबांमुळे.
नंतर करीअर आणि अभ्यास करताना हे दूरचे युद्ध विसरलो. जवळपास १० वर्षांनी स्वतःचा क्लास चालू केला क्लासमध्ये मुलांना १९९१ च्या आर्थिक उदारीकरणामागची कारणे शिकवताना, भारतापुढील परकीय चलनाचे संकट गल्फ युद्धाने वाढले हे सांगताना युद्धाचे आर्थिक परिणाम वाचायला मिळाले. आणि दूरचे युद्ध आर्थिक अंगाने दिसू लागले. एअरलिफ्टमुळे झाले काय की या दूरच्या आणि केवळ आर्थिक बाजू दिसलेल्या युद्धाला माझ्या मनात मानवी स्पर्श मिळाला. आणि गेल्या दहा वर्षात वाचनामुळे कल्पिलेल्या आणि आंतरजालामुळे वाचू किंवा बघू शकलेल्या अनेक गोष्टी अधिक परिणामकारकपणे अनुभवता आल्या. त्यांची दाहकता अंगावर आली. आपण किती सुरक्षित जीवन जगत आहोत ते जाणवले.
२०१५ च्या एप्रिल मध्ये झालेले "ऑपरेशन राहत", ज्यात येमेनमधून ४६४० भारतीयांना आणि ९६० परदेशी लोकांना बाहेर काढले गेले त्या सुटकेचे आपण सर्व साक्षीदार होतो. आता २४ तास चालणारी माध्यमे आणि त्याशिवाय सोशल मिडियाद्वारा सतत हातात मिळणाऱ्या अपडेट्स यामुळे आपण त्याचा थरार अनुभवू शकलो होतो. पण जेंव्हा संपर्काची साधने तुटपुंजी होती त्या काळात १,७०,००० लोकांना १३ दिवस दिशाहीन आणि नंतरचे ५९ दिवस त्या युद्धकाळात वाळवंटात कसे वाटले असतील त्याची जाणीव एअरलिफ्ट अगदी यथार्थपणे करून देतो.
मागच्या आठवड्यात एका मैत्रिणीशी मोझेस बद्दल बोललो होतो. इजिप्तच्या राजदरबारात वाढलेला मोझेस. रामसिस राजाच्या भावासारखा वाढलेला मोझेस. ४०,००,००० लोकांना केवळ देवाच्या वचनावर विश्वास ठेवून इजिप्तच्या गुलामगिरीतून बाहेर काढणारा मोझेस. मग वचनात सांगितलेल्या दुधा मधाच्या प्रदेशापर्यंतची सिनाई च्या वाळवंटातील ४० वर्षाची दिशाहीन, कंटाळवाणी आणि असुरक्षित वाटचाल करणारा मोझेस. अन्न धान्याची टंचाई. अनुयायांचा अविश्वास, त्यांच्या कटकटी सहन करणारा मोझेस. देवाकडून स्पष्ट दिशानिर्देश मिळत नाही म्हणून हतबल झालेला मोझेस. जोशुआ सारख्या मदतनीसांच्या आधारे सर्व अडचणीना पुरून उरणारा मोझेस. यातील अनेक गोष्टी मला रणजीत काट्याल मध्ये दिसल्या.
(Image Courtesy : Free Bible Images)

इराकी सैनिक निशस्त्र कुवेती नागरिकांना जवळून डोक्यात गोळ्या घालताना पाहिले आणि दक्षिण व्हिएतनामच्या National Police चा प्रमुख असलेला लोन ग्युएन चे एडी अॅडम्स ने काढलेले जगप्रसिद्ध छायाचित्र आठवले.
(image courtesy : Iconic Photos
"टिपू सुलतान" जहाज युनोच्या बंदीनंतर वळताना बघितले. ५०० लोक भंगार जहाजात बसून कुवेत बाहेर पडताना बघितले आणि तीन रात्री जागून रडत रडत वाचलेली “लिऑन युरिस” या लेखकाची “बाळ भागवत” यांनी भाषांतरित केलेली “एक्झोडस” ही कादंबरी आठवली. त्यातला "आरी बेन कनान" हा कणखर नायक आठवला. त्यात "आलिया बेत" (homecoming) च्या योजनेंतर्गत दोन आठवड्याच्या रेशनवर ४५०० पेक्षा जास्त ज्यू लोकांना घेऊन आखाती समुद्रात अडकलेल्या “एस एस एक्झोडस” ह्या जहाजावरील प्रवाश्यांची वेदना आणि असुरक्षितता पुन्हा जाणवली. त्यावेळी ब्रिटीश रॉयल एअर फोर्स आणि इतर ब्रिटीश सरकारी संस्थाचे, अजून ज्याला देश म्हणून मान्यता मिळाली नाही पण ज्यांनी महायुद्धाची प्रचंड झळ सोसली आहे त्या व्यक्तीसमूहाशी नियम न तोडता कसे वागावे या बद्दलची घुसमट आणि हतबलता देखील जाणवली.
सगळ्यात शेवटी अम्मानच्या विमानतळावर जाण्यासाठी जॉर्डनच्या वेशीवर भारतीयांच्या बसेस आणि कार्स येतात आणि सीमेवरचा जवान गेट उघडतो तेंव्हा या सुखांतामुळे डोळ्यात आनंदाश्रू आले तरी कुठेतरी याच्या विरुद्ध अत्यंत दुर्दैवी शोकांतिकेचा नायक असलेला तीन वर्षाचा आयलान कुर्दि आणि त्याचे कुटुंबीय आठवून खूप हळहळ वाटली. अम्मानच्या विमानतळावरची भकास चेहऱ्याची गर्दी बघून सिरियन रीफ्युजी क्रायसिस काय असू शकतो, ते दृश्य स्वरूपात जाणवले.
(Image Courtsey : The Daily Star Net)


चित्रपटाचे माझ्यासाठी सगळ्यात मोठे यश कुठले असेल तर त्याने सर्वांना माणसातच ठेवले आहे. कुणालाही नायक किंवा खलनायक बनविण्याचा प्रयत्न केलेला नाही. पासपोर्ट नसलेल्या लोकांना ओळखायचे कसे? ही समस्या असलेल्या भारतीय दूतावासाचा राग येत नाही. जेवणाच्या वेळी फोन न उचलणाऱ्या कोहली नामक सरकारी कर्मचाऱ्याचा, मलेशियाला जा सांगणाऱ्या सेक्रेटरीचा, कोहलीला टाळणाऱ्या मंत्र्याचा, प्रत्येक माणशी २०० डॉलर घेऊन ५०० लोकांना घेऊन जाणाऱ्या भंगार जहाजवाल्याचा, युद्ध क्षेत्रात जायला सुरवातीला नकार देणाऱ्या एअर इंडियाच्या वैमानिकांचा, अम्मानच्या विमानतळावर "गर्मी मत खाओ, मुझे भी कुछ पता नही" असे अजीजीने सांगणाऱ्या कर्मचाऱ्याचा, सतत कटकट करणाऱ्या जॉर्ज किंवा पूनावालाचा, इतकेच काय शेवटी कुवेती स्त्रीला पाहून भडकलेल्या आणि नंतर भारतीय लोकांची गर्दी पाहून वरमलेल्या इराकी सैनिकाचा; कुणाचाच राग येत नाही. सगळेच त्या परिस्थितीचे बळी वाटतात. कथेच्या नायकाला देखील पळून जाण्याची किंवा हे सगळं सोडून द्यावंसं वाटणं, त्याच्या पत्नीने आधी विरोध नंतर साथ देणं; सगळं नैसर्गिक वाटतं. कटकट्या जॉर्ज शेवटी विमानात बसल्यावरसुद्धा स्वभावानुसार हवाई सुंदरीला, "फर्स्ट क्लासमध्ये कोण बसणार हे कसे ठरवले?" असे विचारतो आणि ही सगळी आपल्या आजू बाजूला वावरणाऱ्या अनेक लोकांची गोष्ट आहे याची खात्री पटते.
अक्षय कुमारचे चाहते हा पिक्चर तर बघतीलच आणि कदाचित निम्रत कौरचे देखील. पण आपल्या आजूबाजूला सद्य काळात घडत असणाऱ्या घटनांची भीषणता जाणवून घेण्यासाठी आणि व्यवस्था आपले काम कसे करते, त्यात इच्छाशक्ती आणि भावना किती महत्वाचा भाग पार पाडते ते समजण्यासाठी तर हा चित्रपट सर्वांनी पहायला हवा.

राशोमोन (भाग ३) - भिक्षू

------------------

मी राशोमोनवर दुसरा भाग लिहून थांबलो होतो. पण मन शांत झाले नव्हते. आणि फेसबुकवर दुसऱ्या भागाच्या खाली, मंदार काळेंचा प्रतिसाद आला.  त्याचा स्क्रीन शॉट खाली देतोय. 

हा प्रतिसाद वाचला आणि मनातली अडकलेली जागा सापडली. मग मनात काही विचार त्यासाठी हा तिसरा भाग लिहिला आहे. 
तुम्ही 'हरण्याऐवजी' ,'गमावणे' हा शब्द सुचवला आणि माझ्या मनातले विचार अजून स्पष्ट होण्यास मदत झाली म्हणून जे लेखन मी काल संपवले होते त्याचा अजून एक धागा लिहावासा वाटला. मला आशा आहे की ह्या धाग्यातील विचारावर कमेंट केल्यास मी अजून काही लिहित राहीन अशी भीती तुम्हाला वाटणार नाही.

भाग २ मध्ये चित्रपटावर माझे मत मांडताना मी राशोमोनचा खरा नायक भिक्षू आहे असे मला वाटते ते लिहिले होते. त्याचा मुद्दा तुम्ही सुचवलेल्या 'गमावणे' मुळे अजून स्पष्ट झाला. राशोमोन म्हणजे नगराचे द्वार. जे आता भग्न अवस्थेत आहे. दारही भग्न आतील नगरही भग्न. निसर्गाच्या लहरीपणाविरुद्ध मानवाच्या विजयाचे प्रतीक म्हणजे सुव्यवस्थित नगर. नगराच्या आत मानवाने वसवलेला संस्कृतिपूर्ण समाज. नगराभोवती बांधलेली संरक्षक दगडी भिंत. आणि त्या संस्कृतिपूर्ण शहरात प्रवेश करण्यासाठीचे द्वार म्हणजे राशोमोन. जंगल आणि शहराला वेगळी करणारी भिंत आणि त्या भिंतीतून शहरात प्रवेश करण्यासाठी असलेले द्वार म्हणजे राशोमोन. निसर्गावर विजय मिळवत माणूस नगरे वसवण्यात उत्तुंग यश मिळवतो. या नगरात जंगलाला प्रवेश नाही. अव्यवस्थित, अनियंत्रित, अक्राळ विक्राळ जंगल नगरच्या बाहेर ठेवण्यात माणूस यशस्वी होतो. नगरात सुरचित रस्ते, सावली देणारी झाडे सगळं कसं अगदी सुव्यवस्थित. माणसाची ही निसर्गावर मात करणारी थक्क करून सोडणारी प्रवृत्ती अनेक कवींना प्रेरणा देणारी. मानवाचा जन्म निसर्गाच्या निरर्थक, अनियमित आणि निर्हेतुक जगात व्यवस्था निर्माण करण्यासाठी झालाय असा आशावाद देऊन आपल्या जन्माला हेतूची जोड देणारी हे प्रवृत्ती कवींना माणसावर, त्याच्या आयुष्यावर, त्याच्या चांगुलपणावर विश्वास ठेवावा अशी सुखद कल्पना करू देते.

पण निसर्ग आणि त्याची अनियमितता, जंगल आणि त्याची अव्यवस्था कदाचित राशोमोन मधूनच नगरात शिरते. हे जंगल गर्द झाडाझुडपांचे नव्हे आणि हे नगर रस्ते आणि घरांचे नव्हे. हे जंगल आहे ते आपल्या नकळत आपल्यावर राज्य करणाऱ्या शारीर वासनांचे आणि हे नगर  आहे माणसाने माणसाशी कसे वागावे ते ठरवणाऱ्या समाजनियमांचे. एक छोटीशी वाऱ्याची झुळूक येते आणि झाडाखाली झोपलेल्या ताजोमारूला प्रत्यक्षात अतिसुंदर नसलेल्या स्त्रीचा मोह पाडते. मोह देखील असला की तिचा उपभोग तो एकांतात घ्यायच्या ऐवजी तिच्या बांधून ठेवलेल्या नवऱ्यासमोर घेतो. जंगल ताजोमारूमध्ये शिरते. जंगल ताजोमारूच्या रूपाने स्त्रीच्या आणि सामुराई च्या आयुष्यात शिरते. त्यांची झटापट पाहणाऱ्या आणि शेवटी खंजीर उचलून घेणाऱ्या लाकूडतोड्यामध्ये शिरते. त्या सर्वांचे सुव्यवस्थित आयुष्य गिळंकृत करते आणि आत्तापर्यंत कमावलेले त्यांचे संस्कारांचे नगर गमावून बसतात. ताजोमारू, अजिंक्य दरोडेखोराची कीर्ती आणि शिक्षेनंतर प्राण दोन्ही गमावतो. सामुराई, गौरव आणि प्राण दोन्ही गमावतो. स्त्री, शील आणि नवरा दोन्ही गमावते तर लाकूडतोड्या खंजीर उचलून, खोटी साक्ष देऊन मन:शांती गमावतो.

आपल्यातल्या पशूला कसे सांभाळायचे आणि त्याला पुन्हा संस्कारांच्या नगरीत कसे आणायचे ते न कळल्याने त्यांची कृत्य त्यांच्या स्वभावाविरुद्ध होऊ लागतात आणि त्या कृत्यांना त्यांनी लावलेले अर्थ वेगवेगळे होऊ लागतात. जे झाले ते समर्थनीय संस्कारांच्या कक्षेत बसवण्याचा त्यांचा अट्टाहास सुरु होतो आणि ते सत्यकथनाच्या ऐवजी सत्योत्पादनाच्या मागे लागतात.
ताजोमारू : स्त्री लढाऊ होती, माझ्या पौरुषाला आव्हान देणारी होती, सामुराई  शूर होता, मी त्याला वीराचे मरण दिले असले सत्य गुंफतो.
स्त्री : स्वतःला अबला, परपुरुषाकडून बलात्कारित झाल्यामुळे  नवऱ्याने झिडकारल्याने  मूर्च्छित होणारी आणि संपूर्ण घटनेत शरीराने आणि मनाने जखमी झालेली व्यक्ती असले सत्य गुंफते.
सामुराई : स्त्री नालायक होती, तिला मीच काय ताजोमारूने देखील झिडकारले आणि मी सामुराई परंपरेचा निर्वाह करीत मृत्यू पत्करला असले सत्य गुंफतो.
लाकुडतोड्या : ताजोमारूची नागरी गृहस्थ आयुष्य जगण्याची इच्छा, त्यासाठी पापाने कमावलेला पैसा नको असेल तर सरळ काम करण्याची इच्छा, आणि त्यायोगे ताजोमारू, स्त्री आणि सामुराई च्या प्रसंगात जो राहून गेला तो खंजीर आपल्या नागरी जीवनाला आधार देण्यासाठी उचलण्याच्या स्वतःच्या कृतीचे समर्थन करतो.

यात अजून एक गोष्ट लक्षात येते. की ताजोमारूला, स्त्रीला आणि सामुराईला त्यांनी एकमेकांनी सांगितलेले सत्य वेगवेगळे का आहे ? सत्याचे खरे स्वरूप काय?, हे प्रश्न पडतंच नाही. हे प्रश्न पडतात ते फक्त लाकूडतोड्याला.  “सगळे असे वेगवेगळे का बोलले?”, हा प्रश्न छळतो फक्त लाकूडतोड्याला. भिक्षूला देखील प्रश्न पडतो पण तो सत्याच्या स्वरूपाबद्दल नाही तर जंगलाने नगरावर, आदिम पशुतुल्य प्रेरणांनी संस्कृतीवर इतक्या सहज विजय मिळवल्यावर माणसावर विश्वास ठेवायचा कसा ?” अश्या स्वरूपाचा.  माणूस, “मनातल्या जंगलावर कायम स्वरूपी नगर व्यवस्था तयार करू शकेल का?” हा प्रश्न त्याला छळतो.

भग्न राशोमोन हे मला त्या भिक्षूच्या मनाचे प्रतीक वाटते. त्याला माहिती आहे की त्या माणसाप्रमाणे अनेक जण त्याच्या बोलण्याला प्रवचन, फुकाची बडबड म्हणून हेटाळणार आहेत. म्हणून त्याला स्वतःच्या शब्द्दात प्राण फुंकण्यासाठी, आधी स्वतःला मानवावरचा आणि त्याच्या चांगुलपणावरचा विश्वास कमावणे महत्वाचे वाटते.

एक संस्कृती तिच्या चरम उत्कर्षापर्यंत पोहोचून जेंव्हा नामशेष होते, काही मूल्यांना शिरोधार्य मानून यशाची कमान चढलेले एक युग संपून जेंव्हा युगांत होतो, कोण चूक कोण बरोबर याचा निवाडा जेंव्हा कठीण होतो, किंबहुना सगळेच चूक आणि सगळेच बरोबर असे वाटून कुठलीही व्यवस्था बनणे जेंव्हा अशक्य होते, जेंव्हा माणसाला स्वार्थ, स्वतःला जगविणे, नवीन पिढीचा देखील विचार न करता त्यांच्या वाट्याचे देखील ओरबाडून खाणे अश्या पशुपेक्षाही खालच्या पातळीवर राहणेदेखील योग्य वाटू लागते, जेंव्हा राशोमोनची पडझड होते, जंगल आणि नगराची सीमा पुसली जाते, त्यावेळी यातूनही काही व्यवस्था निर्माण होऊ शकते असे विचार केवळ प्रचंड आशावादी आणि बेदरकार निर्णय घेऊन, सर्वव्यापी राखाडी रंगाच्या छटांमधून कोण शुभ्र धवल पांढरे, कोण मुळापासून कुट्ट काळे, असे वेगळे करणारा माणूसच करू शकतो. या निर्णयासाठी त्याला हवा असतो तो केवळ विश्वास. माणसाच्या चांगुलपणावरचा विश्वास.

मग तो भविष्यात होणाऱ्या रामकथेचे वर्णन करून ठेवणारा महर्षी वाल्मिकी असो किंवा वर्तमानात घडणाऱ्या महाभारताला शब्दबद्ध करून ठेवणारा वेदव्यास असो किंवा भग्न क्योटो शहराच्या राशोमोन वर बसून माणसावर विश्वास कसा ठेवायचा त्या विचारात पडलेला भिक्षू असो.

वाल्मिकी किंवा त्यांच्या नावाखाली आपण सर्व, स्त्रीला अग्निपरीक्षा करायला लावणाऱ्या, राजाचे नागरिकांप्रती असलेले कर्तव्य पितृवचनाखातर टाळणाऱ्या, वालीला कपटाने मारण्यात सुग्रीवाला मदत करणाऱ्या आणि शेवटी जिच्यासाठी युद्ध करून प्रचंड संहार घडविला तिला केवळ धोब्याने काही बोलले गेले म्हणून गर्भारशी असताना वनात सोडून येणाऱ्या श्रीरामाला मर्यादापुरुषोत्तम ठरवतो आणि सोन्याची लंका वसवणाऱ्या शिवभक्त रावणाला स्त्रीलंपट ठरवून मोकळा होतो.

तीच गत व्यासमुनींच्या नावाने आपण लावलेल्या महाभारताच्या संगतीची. बीज क्षेत्र न्यायाने आणि नियोगाच्या समाजमान्य असणाऱ्या रुढींचे पालन न केल्याने ज्यांच्या कुरु कुलीन असण्यावर प्रश्नचिन्ह लागते, ज्यांच्यातील एकजूट केवळ एक स्त्री एकाच भावाला मिळाली तर भंगू शकते, जे भिल्लीणीच्या कुटुंबाला लाक्षागृहात आपल्या जागी जाळतात,  जे द्यूत खेळताना स्वतःवरचा ताबा सोडून बसतात, जे खांडववनदाहाच्या वेळी मूळ स्थानिकांना हुसकून लावतात, जे  स्वतःच्या गुरूला, पितामहांना इतकेच काय पण स्वतःच्या मामाला देखील युद्धासाठी स्वतःच्या पक्षात वळवू शकत नाहीत,  त्यांना देवपुत्र ठरवून त्यांच्या मागे भगवान श्रीकृष्णाचे पाठबळ देवून; थोरल्या राजकुमारच्या थोरल्या राजपुत्राचा हक्क डावलून त्याला उर्मट, अहंकारी, अतिमानी आणि स्त्रीची मानखंडना करणारा ठरवून व्यासांच्या नावाखाली आपण मोकळे होतो.

या सर्व मोकळे होण्यामागे मला एक समान सूत्र दिसते ते म्हणजे; एक बाजू घेतली, एक मूल्य महत्वाचे ठरवले, एक वृत्ती घातक ठरवली की पुन्हा संस्कृतीरूपी नगर वसवण्याचे काम सुरु करता येते. मग त्या बाजूने ते मूल्य खरोखरच शिरोधार्य मानले असो किंवा नसो, त्यांची वर्तणूक त्या मूल्याचे चालते बोलते जिवंत स्वरूप असो किंवा नसो.

राशोमोनच्या भिक्षूपुढचा प्रश्न अजूनच गुंतागुंतीचा ठरतो कारण लाकुडतोड्या सोडल्यास जंगलाने नगरावर केलेल्या त्या घटनेतले कोणीच बाके राहिलेले नसते. सामुराई मरतो, स्त्री नाहीशी होते, ताजोमोरूला शिक्षा होते. उरतो तो फक्त लाकुडतोड्या. त्यानेपण साक्ष खोटी दिली हे कळल्याने भिक्षू अजूनच गोंधळात पडतो. आता पुढची संगती लावायची कशी? चांगले मूल्य  म्हणायचे कशाला ? आणि वाईट वृत्ती म्हणायची कोणती? भिक्षू भोवती चे सगळे राखाडी रंग काळ्या रंगाकडे झुकत चाललेले. म्हणून तो भविष्याला कुशीत घेऊन सांभाळून उभा असतो. आणि मग ज्या क्षणी लाकूडतोड्या पांढऱ्या रंगाकडे झुकण्याची थोडी तयारी दाखवतो ती भिक्षूसाठी सुटकेची वेळ ठरते. खंजीर उचलणारा लाकूडतोड्या, मानवच्या चांगुलपणाचे प्रतीक ठरतो. सामुराई, ताजोमारूआणि स्त्री एक दु:स्वप्न ठरतात आणि किमोनो घेऊन पळणारा तो माणूस ठरतो - खलनायक.

कदाचित राशोमोन चित्रपट दोन गोष्टींच्या एकत्रीकरणातून तयार झालाय त्यामुळे असेल पण तुम्हाला जाणवलेल्या सत्य प्रकटीकरणाच्या मर्यादेच्या कथेत मला राखाडी रंगाच्या एका छटेला पांढरा आणि बाकी सर्वांना काळ्या रंगात रंगवून आपल्या संस्कृतीरूपी नगरीवर होणाऱ्या आदिम शारीर प्रेरणांचे आक्रमण थोपवण्याची माणसाची मर्यादा जाणवली. किंवा कदाचित एकाच जंगलात, एकाच प्रकाश स्त्रोतापासून येऊन माझ्यावर पडलेले कवडसे तुमच्यावर पडलेल्या कवडशांपेक्षा थोडे वेगळे निघाले असे वाटते.

जरी मला कवडशांनी थोडे वेगळे सत्य दाखवले असले तरी तुम्हाला खुळावणाऱ्या राशोमोनने मला देखील तितकेच खुळावले हेच खरे.
------------------


राशोमोन (भाग २) - चित्रपट

------------------


मी चित्रपट पाहणार नव्हतो. आणि न पाहताच जर त्यावर काही लिहिले असते तर माझ्या मतावर तुमच्या मताची दाट छाया पडली असती किंवा माझे मत परप्रकाशित राहिले असते. याचा अर्थ असा नव्हे की मला जाणवलेला चित्रपटाचा अर्थ तुम्हाला जाणवलेल्या अर्थाच्या पूर्ण विरुद्ध आहे. पण इतके मात्र खरे की काही काही ठिकाणी तुम्ही दिलेली संगती मला तितकी जाणवली नाही आणि काही ठिकाणी मला वेगळी संगती लागली.


आपापली साक्ष झाल्यावर लाकूडतोड्या आणि भिक्षू मागे बसून राहण्यामागे त्यांना सत्याचे स्वरूप जाणून घ्यायचे होते आणि ताजोमारू बसत नाही कारण तो घटनेचा केवळ साक्षीदारच नव्हे तर स्वतःच घटनाकर्ता होता, हे जे मत तुम्ही मांडले आहे ते मला तितकेसे पटले नाही. किंबहुना हे दोघे का बसले आणि ताजोमारू का नाही बसला हा प्रश्नच मला पडला नाही. म्हणून त्याचे दुसरे कुठलेही उत्तर मला सुचले नाही. याशिवाय चित्रपटभर धो धो कोसळणारा पाउस शेवटी थांबतो याबाबत तुम्ही काहीच निरीक्षण नोंदवले नाहीत याचे मला आश्चर्य वाटले.  या दोन गोष्टी सोडल्यास तुमच्या रसग्रहणाचा मला चित्रपट पहाताना प्रचंड फायदा झाला. आणि मी चित्रपटाच्या कथेशी अधिक समरस होऊ शकलो.


हर्षद चे आभार की त्याने राशोमोन या नावातील मोन चा अर्थ दार असा सांगितला मग मी थोडे शोधल्यावर कळले की राशो म्हणजे शहराची भिंत आणि मोन म्हणजे दार. थोडक्यात राशोमोन म्हणजे शहराचे मुख्य दार. चित्रपटातले प्रसंग जंगलात आणि कोर्टात घडत असले तरी खरी कथा क्योटो आणि नारा शहरांच्या मध्ये असलेल्या, वाईट आत्म्यांचे घर बनलेल्या आणि कथेच्या वेळी पडझड झालेल्या ह्या दिंडी दरवाजातच घडते. दरवाजाच्या एका बाजूला जंगल आहे आणि बाजूला उध्वस्त झालेले क्योटो शहर. चित्रपटाची सुरवात होते ती दरवाजात बसलेल्या लाकूडतोड्या आणि भिक्षूकडे जंगलातून आलेल्या त्या माणसाने आणि शेवट होतो लहान बाळाला घेऊन लाकूडतोड्या शहरात परतण्याने आणि तो माणूस शहराबाहेर निघून जाण्याने. जो बाळ सांभाळण्याची जबाबदारी घेतो तो शहरात आणि जो दाराची लाकडे बेदरकारपणे तोडून शेकोटी पेटवतो, बाळाच्या आई वडिलांना ते दारात सोडून जाताना किती दु:ख झाले असेल त्याबद्दल विचार करण्यास नकार देऊन फक्त किमोनो घेण्यात स्वारस्य दाखवतो तो शहराबाहेर जाताना दाखवून एका अर्थाने शेवट उध्वस्त शहराला भविष्यकाळ आहे हे दाखवतो, आणि भिक्षूने मानवतेवर विश्वास का ठेवावा ? याचे आपल्याला देखील एक उत्तर देतो.


चित्रपटभर धो धो कोसळणारा पाऊस मला अविरत कोसळणाऱ्या विचारांचे प्रतीक वाटला आणि शेवटी जेंव्हा विचार कोसळण्याचे थांबतात, लाकूड्तोड्याला कानफटात बसते, त्या माणसाला किमोनो मिळतो, तो माणूस किमोनो घेताना लाकूडतोड्या खंजीर घेताना लुटारू नाही मग मी पण किमोनो घेताना लुटारू नाही, खरंतर आपले सर्वांचे वागणे परिस्थितीजन्य आहे आणि म्हणून योग्य आहे हे सिद्ध करतो, लाकूडतोड्या मुलाची जबाबदारी घेताना भिक्षूचे कटू शब्द परीस्थितीजन्य आहेत हे मान्य करून त्याचा राग धरत नाही आणि भिक्षूला माणसावर विश्वास ठेवायला कारण मिळते तेंव्हा पाऊसही थांबतो. म्हणून मला तो पाऊस त्यांच्या गोंधळलेल्या मनाचे त्यातील विचारांच्या आवर्ताचे प्रतीक वाटला.


संपूर्ण कथेचे तुम्ही अतिशय सुंदर रसग्रहण केल्यामुळे मला एका दिशेने गेल्यावर हा चित्रपट कसा दिसू शकतो हे कळत होते आणि म्हणून कदाचित नकळत मी थोडा वेगळा विचार करू शकलो. आता तो खरोखरच वेगळा आहे की नाही ते तुम्ही ठरवा.


मला संपूर्ण चित्रपटाचा गाभा म्हणजे स्त्रीवर झालेला अतिप्रसंग, सामुराई ची झालेली हत्या आणि त्याचे ताजोमारू, स्त्री आणि सामुराई यांनी केलेलं वेगवेगळे वर्णन म्हणजे ज्या युद्धात सगळेच हरतात त्यात प्रत्येकजण आपले हरणे उदात्त करण्याचा प्रयत्न करताना सत्याचा अपलाप कसा करतात त्याचे चित्रण वाटले.


ताजोमारू हरला कारण इतका प्रसिद्ध डाकू एका य:कश्चित शिपायाकडून पकडला गेला तेदेखील कुठलाही प्रतिकार न करता, पोट दुखीने व्याकूळ झालेला असताना. सामुराई हरला कारण तो सहजगत्या एका डाकूकडून फारशी लढत न देता बंदी झाला आणि त्याची स्त्री त्याच्यासमोर त्या डाकूने भोगली. स्त्री हरली कारण तिच्या नवऱ्यासमोर तिचे शील लुटले गेले. ज्यांच्या आयुष्यात घटना घडते ते तिघेही हरले.


एक क्षण आपण जर स्त्री व सामुराई ची कहाणी खोटी मानली. त्याऐवजी ताजोमारू व लाकूडतोड्याची कहाणी खरी मानली तर; रामायणात रामाऐवजी रावण जिंकला असता तर सीतेची, महाभारतात पांडवांऐवजी कौरव जिंकले असते तर द्रौपदीची आणि बॅटमॅनच्या गोष्टीत जर जोकर जिंकला असता तर गोथॅमच्या रहिवाश्यांची अवस्था काय झाली असती त्याची कल्पना करता येते. जो नायक येणार, जो आपल्याला बंदिवासातून सोडवणार, जो आपल्यावरच्या अत्याचाराचा बदला घेणार म्हणून आपण इतके दिवस धीर धरला तो कुचकामी निघाला. ज्याला आपण खलनायक मानले तोच जिंकला आणि म्हणून तोच नायक ठरणार हे कळले तर मूळच्या खलनायकाला (जो आता विजयामुळे नायक ठरला आहे) विरोध करून जिवंत राहिलेल्या लोकांच्या मनस्थितीची कल्पना करावी लागेल.


आता मंदोदरी महाराणी. आणि आपले शील मातीमोल. आता दुर्योधन राजा आणि आपण पाच पतींनी भोगलेली भरसभेत विवस्त्र केली गेलेली एक य:कश्चित दासी. आता कारच्या मागे उगाचच धावणाऱ्या कुत्र्याप्रमाणे आयुष्याच्या कुठल्याही निर्णयामागे कुठलिही योजना नसणारा जोकर नायक आणि मुखवट्यामागे रहात सर्वांची काळजी घेणारा बॅटमॅन आणि त्याचे साथीदार मूर्ख. मग जिवंत राहिलेल्यांच्या नशिबी काय लिहून ठेवले असणार? या मूळच्या खलनायकाशी (जो आता विजयामुळे नायक ठरला आहे) जुळवून घ्यायचे तर कसे? आपल्या वागण्याचे स्पष्टीकरण द्यायचे तर कसे? त्यात सुसंगती ठेवायची तर कशी? आपण संधीसाधू नाही, वाऱ्याबरोबर पाठ फिरवणारे नाही हे पुढच्या पिढीला सांगायचे कसे ? आपण उच्च आदर्शांना सोडले नाही, किंबहुना आपले जीवन उच्च आदर्शांचे निदर्शक आहे, हे जगाला पटवायचे कसे ? हे सगळे प्रश्न त्यांना आपापल्या सत्याचे उत्पादन करायला भाग पाडतात.


आता जर आपण ताजोमारूची कथा खरी आहे असे मानले तर जिंकलेला रावण समजा नंतर अयोध्येहून आलेल्या भरताकडून किंवा जिंकलेला दुर्योधन पांडवांच्या कुठल्या दुर्लक्षित वंशजाकडून किंवा जिंकलेला जोकर रॉबिनकडून पकडला गेला तर तो स्वतःला धर्मयुद्ध खेळणारा म्हणून प्रस्थापित करण्यासाठी आपल्या एका सत्याचे उत्पादन करेल.


आणि जर आपण लाकूडतोड्याची कथा खरी आहे असे मानले तर युद्धाआधी रावणाकडे युद्ध टाळण्यासाठी दूत पाठवणारा, युद्धानंतर अग्निपरीक्षा घेणारा आणि धोब्याने संशय घेतला म्हणून गर्भार राणीला वनात सोडून येणारा राम, राज्यासाठी नातेवाईकांवर शास्त्र चालवावे लागणार ह्या कल्पनेने गलितगात्र होऊन शस्त्र खाली ठेवणारा अर्जुन आणि नको असलेल्या स्त्रीसाठी युद्ध करायला लडखडत तयार झालेले विचलीतबुद्धी ताजोमारू व सामुराई यांची जातकुळी एकच वाटते. आणि धरणीमाते मला तुझ्या पोटात घे म्हणून विनवणी करणारी सीता, दुर्योधनाच्या मांडीच्या रक्ताने केस धुण्यासाठी थांबलेली द्रौपदी आणि आपण कुणालाच नको आहोत या विचाराने दु:ख्खी झालेली आणि वेडीपिशी होऊन इतरांना लढण्यास प्रवृत्त करणारी सामुराई योद्ध्याची स्त्री, एकच दु:ख उपभोगताना दिसतात. आणि त्यात लाकूडतोड्या मात्र आपल्या सहा मुलांची जबाबदारी पेलण्यासाठी युद्धभूमीवर मिळणाऱ्या शस्त्रांच्या विक्रीतून फायदा करून घेणाऱ्या सामान्य नागरिकांप्रमाणे दिसू लागतो. आणि मग आपले केवळ जीवन जगवत राहण्याचे क्षुद्र हेतू उदात्त भासवण्यासाठी लाकूडतोड्या देखील आपल्या एका सत्याचे उत्पादन करेल ही शक्यता नाकारता येत नाही.


मला या चित्रपटाचा खरा नायक वाटला तो म्हणजे भिक्षू. त्याचा मानवतेवर विश्वास आहे. त्याने पूर, दुष्काळ, भूकंप अश्या आपत्तीत देखील माणसांना एकमेकांना धरून राहताना पहिले आहे. म्हणून त्याचा माणसाच्या चांगुलपणावर विश्वास आहे. नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर मानवातील समाजधारणेसाठीचे उत्तम गुण जेंव्हा त्याला शारीर वासनांच्या, अहंकाराच्या आणि मानापमानाच्या समोर लीन झालेले दिसतात तेंव्हा त्याला काळजी पडते ती उघड्या पडलेल्या विसंगतीची. आणि जेंव्हा त्याला लाकूडतोड्याने खोटी साक्ष दिली हे कळतं तेंव्हा तो अधिकच विकल होतो. सत्य काय हा प्रश्न त्याला फार छळताना दिसत नाही. त्याला छळणारा प्रश्न आहे तो माणसावर विश्वास कसा ठेवायचा ?त्याच्या चांगुलपणावर विश्वास कसा ठेवायचा ?


जेंव्हा त्याला छोटं बाळ दिसतं तेंव्हा तो ज्या पद्धतीने धरतो ते पाहून तर मला असा वाटलं की तो जणू त्या बाळाला लाकूडतोड्या आणि त्या माणसापासून वाचवतोय. त्यांच्या अविश्वासी वागण्यापासून वाचवतोय. या जगाच्या असहनीय, निरर्थक आणि दाहक सत्याच्या रूपापासून वाचवतोय. सर्व संग परित्याग केलेला भिक्षू त्या मुलाचे जगापासून रक्षण करण्यासाठी कृतीशील होणारच असतो पण जेंव्हा त्याला लाकूडतोड्या सांगतो की माझ्या सहा मुलांमध्ये हे एक मला जड जाणार नाही, तेंव्हा तो कथेतून चटकन दूर होतो. आणि आपल्या वाल्मिकीच्या, व्यासाच्या भूमिकेत जाऊन सत्य काहीही असले तरी चालेल पण माणसाने माणसावर विश्वास ठेवला पाहिजे कारण तो विश्वास ठेवण्याच्या लायकीचा आहे, त्यातूनच समाज घडेल, शहर वसेल, पडलेल्या दाराच्या आत उध्वस्त झालेल्या शहराच्या राखेतून, करपलेल्या मनाच्या माणसांना दाराबाहेर ठेवून, जे जबाबदारी घ्यायला तयार आहेत त्या माणसांच्या साथीने भविष्य घडेल, असले आशावादी गीत, आयुष्याच्या सुसंगतीबद्दल बोलणारे विचार करण्यासाठी आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी मोकळा होतो.

मी लेख एकदाच वाचले आहेत. मी चित्रपट एकदाच बघितला आहे. त्यामुळे माझे हे अंतिम आकलन आहे असे मी स्वत: देखील म्हणणार नाही. कदाचित अजून काही दिवसांनी मला माझे आजचे सुसंगत वाटणारे विचार अपूर्ण वाटतील आणि मी पुन्हा कवडशांवरून प्रकाशाचा स्त्रोत शोधायच्या मागे लागीन. तोपर्यंत काळे गुरुजींनी माझ्या पन्नास मार्काच्या पेपराला सहृदयपणे तपासावे ही विनंती.
--------------------

राशोमोन (भाग १) - प्रास्ताविक

------------------

Mandar Kale, जेंव्हा आपण शिक्षकाच्या खिजगणतीत देखील नसतो तेंव्हा त्यांचे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो पण जेंव्हा तो शिक्षक आपण बेसावध असताना अख्ख्या वर्गासमोर एकदम "हां, तू पुढे ये रे, तुला हे माझ्यासाठी करायचे आहे" असे सांगतो तेंव्हा आपली जी काही पाचावर धारण, तंतरणे, बोबडी वळणे, पोटात खड्डा पडणे अश्या शब्दात व्यक्त होण्यासारखी अवस्था होते, तशीच काहीशी अवस्था आज सकाळी मंदार काळेंचे नोटिफिकेशन पाहून मी अनुभवली. नेमका मोकळा वेळ होता आणि बऱ्याच दिवसापासून मनात ठरवून ठेवलेली कामगिरी काळे गुरुजींनी सोपवली म्हणून गांगरलेल्या अवस्थेतही आनंद झाला. आणि राशोमोनच्या मागे लागलो.


काही काही गोष्टी जुळून येतात. मी आधीच राशोमोन पाहिलेला असता तर कदाचित तो मला इतका भिडलादेखील नसता. पण माझ्या सुदैवाने मी आधी तुमची लेखमाला वाचली आणि मग चित्रपट यु ट्युबवर पाहिला म्हणून मी त्याला एका वेगळ्या पातळीवर अनुभवू शकलो. कदाचित मी शब्दचित्र समजणारा माणूस असीन आणि तुम्ही अतिशय चांगले शब्दचित्रकार असल्याने चित्रपट पाहताना त्यातील बारकावे, त्यात वापरलेली प्रतीकांची भाषा, दिग्द्शर्काचे चित्रभान आणि पटकथेची रंगत अगदी चटकन समजत होती. एका जाणकार रसिकाकडून एखादा चित्रपट पूर्ण समजून घेऊन मग तो पाहण्याचा माझा हा माझा पहिलाच अनुभव आणि तो कमालीचा आनंददायी होता. हा कल्पनातीत आनंद माझा अगदी हात धरून आग्रहाने भरभरून दिल्याबद्दल तुमचे आभार, अगदी मनापासून आभार.




तुमच्या लेखमालेबद्दल बोलायचे झाल्यास मला त्याचे दोन भाग दिसतात. एक म्हणजे तुमचे अतिशय अभ्यासपूर्ण आणि समर्पक प्रास्ताविक जे पहिल्या लेखात आहे आणि दुसरा म्हणजे तुम्ही संपूर्ण चित्रपटाचे केलेले वर्णन जे उरलेल्या सात भागात आहे.


सत्य निश्चिती / प्रस्थापना


लेखमालेचे प्रास्ताविक तुमच्या व्यासंगाची प्रचीती देणारे आहे. एखादी गोष्ट सत्य म्हणून प्रस्थापित करण्याच्या तुम्ही पाच पद्धती सांगितल्या आहेत.
१)  सिद्ध करूच द्यायचे नाही, आणि हे स्वयंसिद्ध आहे म्हणूनच सत्य आहे असेच मांडायचे.
२) जे आपण समजतो ते आपल्या मनात नैसर्गिकरीत्या आले म्हणजे ते सत्यच असणार ही समजूत.
३) जे विश्वासार्ह व्यक्तींकडून आले ते सत्य असणारच ही समजूत.
४) जास्तीत जास्त लोक जे मानतात ते सत्य असे लोकशाहीसारखे सत्य.
५) जास्तीत जास्त लोक जे सत्य मानत असतील असा आपला समज असतो ते आपोआपच आपल्याला सत्य वाटू लागते.


यात मला अजून एक सांगावेसे वाटते की सर्वसामान्य माणूस त्याच गोष्टीला सत्य म्हणून मान्यता देतो जी त्याला त्याच्या परंपरांच्या सरळ रेषेत ठेवता येते. उदाहरणार्थ सार्वजनिक गणेशोत्सव, सार्वजनिक दही हंडी उत्सव, सार्वजनिक नवरात्रोत्सव; मान्य करायला आपल्याला प्रेषिताची गरज लागली नाही कारण हे सगळे आपल्या परंपरांच्या सरळ रेषेत होते. हे सत्य चटकन प्रस्थापित होते कारण ते परंपरांच्या सरळ रेषेत असते.


परंपरांना छेद देणारी गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्यासाठी आपल्याला प्रेषितांची गरज भासते. असे प्रेषित जे केल्या कामाची फळे चाखत नाहीत, बलिदान देतात किंवा मग त्यांच्या कामाला त्यांच्या हयातीतच इतकी प्रचंड फळे येतात की त्यांनी चाखलेली फळे नगण्य वाटू लागतात. उदाहरण द्यायचे झाल्यास, मोझेसने त्याच्या हयातीत ज्यू लोकांना इजिप्त मधून बाहेर काढले नसते आणि यहोवाच्या प्रार्थनेत वळवले नसते तर अजून हजारो वर्षे ज्यू लोक इजिप्शियन देवांची पूजा करत गुलामीचे जीवन जगणे सत्य मानत राहिले असते. जर येशूने नवा करार आणला नसता तर ख्रिश्चन जुन्या कराराखाली ज्यू म्हणूनच जगणे सत्य मानून राहिले असते. जर मुहम्मदांनी त्यांच्या हयातीत जेरुसलेमच्या दिशेने प्रार्थना करणे बंद करून मक्केची दिशा पकडली नसती तर आजही मुस्लिम समाज जेरुसलेमच्या दिशेने नमाज अदा करणे आपल्या ईश्वराप्रती समर्पणाची सत्य अभिव्यक्ती आहे असे समजून राहिला असता. किंवा अनेक अरबी टोळ्या काबाच्या देवालयात आपापल्या कुल / टोळी देवतेच्या मूर्तीची पूजा करत राहिल्या असत्या.


परंपरांना छेद देणारी गोष्ट प्रेषिताशिवाय गळी उतरवण्याचा प्रयत्न केला की त्या पुन्हा पुन्हा डोके वर काढीत रहातात. मग ती सतीबंदी असो किंवा अस्पृश्यता असो किंवा जाती प्रथा असोत. एका झटक्यात प्रवाहाचे सत्य बदलत नाही, त्यासाठी प्रेषिताचे बलिदान लागते किंवा विजयी संस्कृतीचा पराभूतांवर सर्वंकष विजय लागतो.


सत्याचे अन्वेषण / आकलन


या प्रस्तावनेत तुम्ही सत्याचे खंडश: प्रकट होणारे आणि अंशात्मक सत्य (या ठिकाणी मला 'अंशतः सत्य' हा शब्द जास्त चपखल वाटतो) असे दोन प्रकार सांगितले आहेत, ते या विषयावर मी आत्तापर्यंत वाचलेले सर्वात परिष्कृत विचार आहेत.


सत्याचे अन्वेषण करण्याच्या संदर्भात आपण जी मते मांडली आहेत त्या संदर्भात मला अजून एक सांगावेसे वाटते की, एखाद्या गोष्टीचे आकलन आपल्याला ज्ञानेन्द्रीयांद्वारे होते. म्हणजे ज्ञानेन्द्रीयांद्वारे घटना आपल्याला जाणवतात. ही ज्ञानेंद्रिये सगळ्यांना सारखी असतील याची खात्री नाही. त्यामुळे डोळस, आंधळा, रंगांधळा यांची होणारी फसगत आणि त्यामुळे होणारे सत्याचे अपूर्ण दर्शन हा मुद्दा आपण छान मांडला आहे.


त्यापुढे जाऊन मी असे म्हणीन की, जरी आपण सर्व साक्षीदारांना सर्व ज्ञानेंद्रिये सारख्याच क्षमतेची दिली, त्यांची आकलनक्षमता  सारखीच असू दिली तर त्या सर्वांना होणारे सत्याचे दर्शन सारखेच असले तरी ते पूर्ण सत्य असेल याची खात्री नाही. कारण ज्ञानेद्रीयांची सत्य ग्रहण करण्याची मर्यादा हा मुद्दा आपण विचारात घेतला नाही.


आत्ता या क्षणी माझ्या घरात आम्ही पाच जण नाक, कान, डोळे यांची पूर्ण क्षमता वापरू शकणारे असलो तरीही आम्ही या क्षणी घरात फिरणाऱ्या रेडीओ लहरींना रेडीओ न लावता ऐकू शकत नाही आणि केबल कनेक्शन व टी व्ही शिवाय आम्हाला वेढून टाकणाऱ्या टी व्हीच्या लहरी आम्हाला जाणवत नाहीत. पूर्ण विकसित ज्ञानेंद्रिय असून देखील आम्हा पाचजणांना या लहरींचे सत्य अस्तित्व जाणवत नाही. थोडक्यात आपल्या ज्ञानेंद्रियांच्या मर्यादा हा देखील आपल्याला सत्याचे संपूर्ण स्वरूप समजून घेण्याच्या मार्गातील अडथळा असतो.


सत्याचे प्रकटीकरण


जी गत ज्ञानेन्द्रीयांची तीच गत कर्मेंद्रियांची. जर जाणवलेच अर्धे मुर्धे, त्यातले आकळलेच अजूनही थोडे मग त्याचे पुन्हा प्रकटीकरण करण्यासाठी वापरायची साधने शब्द, चित्र, शिल्प, नृत्य, अभिनय अशी एकांगी आणि तुटपुंजी तर मग आपल्यासमोर प्रकटलेले सत्य इतरांसमोर जसेच्या तसे प्रकट करण्यात आपण अपयशी ठरलो नाही तरच नवल. वर ते सत्य जर आपल्या स्वतः संबंधी असेल तर मग अहंकार आणि स्व- प्रतिमा प्रेम, जाणवलेल्या सत्यावर आरूढ होतात. समाजाने मानलेल्या आदर्शांप्रमाणेच आपले वागणे होते हे दाखवण्याच्या नादात आपण जे प्रकट करतो ते जाणवलेले सत्य (experienced truth)  नसून आपण उत्पादन केलेले सत्य (manufactured truth) असते.


जंगल वाटांवरचे कवडसे


चित्रपटाचे मध्यवर्ती सूत्र म्हणजे एकच प्रसंग विविध व्यक्तींच्या दृष्टीकोनातून वेगवेगळा दिसत असताना त्यातले त्या प्रसंगाचे सत्य स्वरूप कोणते मानायचे? हा आहे. आणि मग या मध्यवर्ती सूत्राची, तुम्ही, मला माहित नसलेला बंडखोर हा प्रवचन संग्रह, माझ्या आवडीच्या, जी एंच्या ठिपका, कळसूत्र, विदूषक आणि यात्रिक या कथांबरोबरच ऑस्कर वाईल्डचा डोरायन ग्रे; या विविध संदर्भांबरोबर, केलेली गुंफण तुमच्यातील सृजनशीलतेची साक्ष देणारा आहे.


इथे एक प्रश्न येतो की, सृजनशीलता म्हणजे तरी नक्की काय? दोन गोष्टींमधला संबंध चटकन जाणवत नसला तरीही तो उलगडून दाखवणे किंबहुना विस्कळीत, स्वयंपूर्ण गोष्टींना एका सूत्रात गोवून त्यांची एक सुसंगती निर्माण करणे म्हणजेच सृजनशीलता. जेंव्हा आपण कुठल्या तरी गोष्टीचे सृजन करीत असतो तेंव्हा प्रत्यक्षात विस्कळीत आणि स्वयंपूर्ण गोष्टींना एकत्र रचत असतो. जितकी आपली रचना मनाला सुसंगत वाटते तितकी ती कृत्रिम न वाटता सत्य वाटू लागते. या अर्थाने सृजन हे देखील एक प्रकारे सत्यापलाप ठरते. परंतू स्वभावतः विसंगत गोष्टींमध्ये सुसंगती मानून त्यात अस्तित्वाचा अर्थ शोधण्याची मानवाची प्रवृत्ती नैसर्गिक असल्याने आपण सृजनशीलतेला सत्याचा अपलाप करणारा दुर्गुण न मानता; निरर्थक सत्याला मान्य करण्यासाठी, त्याची दाहकता कमी करण्यासाठी निसर्गाने माणसाला दिलेले वरदान समजूया.


या अर्थाने जेंव्हा मी संपूर्ण लेखमालेचे शीर्षक वाचतो तेंव्हा मला खरेच तुमच्या समर्पक शब्दयोजनेने अतिशय आनंद होतो. आपला सत्याला जाणण्याचा प्रवास म्हणजे, जंगलात पडलेल्या पाचोळ्यात जन्म घेऊन त्या पाचोळ्यातच मरण पावणाऱ्या क्षुद्र किड्याने, प्रकाशाच्या मार्गात अनेक अडथळे आल्याने तयार झालेल्या कवडश्यांकडे पाहून त्या प्रकाशाचा स्त्रोत कसा असेल याचे आडाखे बांधण्यासारखा आहे.

भलेही आपण या सत्यान्वेषणामध्ये असफल होऊ आणि भलेही जी एंच्या यात्रिक मधला न्हावी सॅंचोला सांगत असेल की 'शेवटी अंधारात सगळीच मांजरे काळी'. तरीही प्रकाशात ती कशी दिसत असतील याचा शोध आपण घेतच राहू. मग तो प्रकाश कवडशांच्या रूपात का असेना.


------------------

‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ४) - उद्योगातून भांडवल

 भाग १ । भाग २ । भाग ३ । भाग ५ । भाग ६ । भाग ७ भाग ८

--------------------

भांडवल तयार होण्याची सुरुवात

सध्या प्रचलित असलेली भांडवल तयार होण्याची, बचत >> गुंतवणूक >>भांडवल ही साखळी, या आदिम टोळ्यांच्या आणि कुटुंबांच्या आणि भांडवलशाहीच्या उदयाच्या काळात अस्तित्वात असणे शक्यच नव्हते. पैशाचा उगम व्हायचा बाकी होता. जमीन आणि पशुधन हिच उत्पादनाची साधने होती म्हणजे तेच भांडवल होते. मग "सबै भूमी गोपालकी"च्या त्या काळात जो जितकी जमीन लागवडीखाली आणेल, आणि जितक्या जास्त गुरांना माणसाळवू शकेल तेच त्याचे भांडवल बनू लागले. आणि त्याच्या मृत्यूनंतर ते संचित भांडवल त्याच्या वंशजांचे भांडवल बनू लागले.

उद्योग गुंतागुंतीचे नव्हते. निसर्गावर अवलंबून रहाणारे होते.  उद्योगासाठी लागणारा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे "जमीन", मुबलक प्रमाणात उपलब्ध होता. पशुधनाची संख्या वाढविण्यासाठी निसर्ग कार्यरत होता.  त्यामुळे आधी भांडवल उभारावे, त्यातून मालमत्ता खरेदी करावी आणि मग त्यातून उद्योग सुरु करावा हा सध्या प्रचलित असलेला मार्ग त्या काळात गैरलागू होता. याउलट, आधी उद्योग करण्याची इच्छा, मग त्यासाठी जिथे सुपीक जमीन आणि मुबलक पाणी मिळेल तिथे स्थलांतर, मग त्या जमिनीवर वसाहत, मग पशुपालन, अशी मालमत्तेची निर्मिती होत होती. या मालमत्तेच्या संचायातून मग भांडवलाची निर्मिती असा आजच्या दृष्टीने उलटा प्रवास त्या काळी चालू होता. पैसा महत्वाचा ठरण्या आधीच्या काळात देखील भांडवल तयार होत होते आणि ते उद्योगातून जन्म घेत होते. भांडवलाच्या जन्माच्या / निर्मितीच्या ह्या प्रक्रियेत अधिक उद्यमशील किंवा लढवय्ये असणारे लोक पहिले भांडवलदार ठरले, तर त्यांचे वंशज भांडवलदार म्हणूनच जन्माला आले.

कुटुंबसंस्थेचा उदय आणि तिचे भारतातील वेगळेपण

गर्भधारण आणि त्यानंतर मुलांचे संगोपन करण्याची उपजत क्षमता यामुळे प्राथमिक अवस्थेत कुटुंबव्यवस्थेचे स्वरूप स्त्रीकेंद्रित किंवा मातृसत्ताक होते. आणि त्याशिवाय भटक्या लोकांच्या पुरुषसत्ताक टोळ्या देखील होत्या. मातृसत्ताक पद्धतीमध्ये स्त्री स्थिर आणि पुरुष संचारी अशी व्यवस्था असते. मुले आणि मुली आपल्या आईच्या-मामाच्या घरी राहतात. पुरुष स्वतःच्या सासरी येउन जाउन असतो. घरातील स्त्रियांचे आपसातील नाते आई, बहिण, मावशी या स्वरूपाचे असते. या व्यवस्थेमुळे कुटुंबाचा आकार वाढतो आणि तो शेतीला आवश्यक ते मनुष्यबळ पुरवू शकतो. याउलट पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये पुरुष स्थिर आणि स्त्री संचारी अशी व्यवस्था असते मुले आणि मुली आपल्या वडिलांच्या-काकांच्या घरी राहतात. स्त्री सासरी येते, कायमची. घरातील स्त्रियांचे आपसातील नाते सासू-सून, नणंद - भावजई, जावा-जावा असे असते. यामुळे कुटुंब विभक्त होण्याचे प्रमाण थोडे अधिक असते. कुटुंबाचा आकार मर्यादित राहतो. आणि शेतीपेक्षा पशुपालनास तो जास्त उपयुक्त असतो.

जगाच्या बऱ्याचश्या भागात पुरुषसत्ताक टोळ्यांनी स्त्रीसत्ताक कुटुंबांवर निर्णायक विजय मिळवला. त्यामुळे पाश्चात्य जगात कुटुंबव्यवस्था टोळीइतकीच तकलादू राहिली. आणि तिच्यावर टोळीचे किंवा बाह्य समाजाचे कायम वर्चस्व राहिले. तिथला कुटुंब हा एकक भारतीयांच्या तुलनेत बराच ठिसूळ राहिला. लग्न हा सामाजिक उपचार राहिला. कुटुंबाचा आकार बहुतांशी छोटाच राहिला.

बहुतांश जगात पुरुषसत्ताक विरुद्ध स्त्रीसत्ताक असा संघर्ष चालू राहिला असला तरी, भारतात मात्र, मूळच्या स्त्रीसत्ताक आणि बाहेरून आलेल्या आक्रमकांच्या पुरुषसत्ताक पद्धतीत संकर होत राहिला. आणि त्यातून जन्माला आली एक संकरीत कुटुंबपद्धती. जी पुरुषसत्ताक होती, तिच्यात विभक्तीच्या वाटा खुल्या होत्या तरीही त्यातील अनेक कुटुंबे पिढ्यान पिढ्या अविभक्त रहात होती. त्यामुळे, कुटुंबाचा गाडा कसा चालेल ? एकाच छताखाली अनेक पिढ्या कश्या नांदतील? पुढील पिढीत ज्ञानाचे संक्रमण कश्या प्रकारे होईल? आणि मागील पिढी निवृत्त कधी आणि कशी होईल? हे प्रश्न भारतात महत्वाचे ठरले. प्राचीन भारताने पाश्चात्यांच्यापेक्षा अधिक दूरचा विचार करत, चार आश्रमांची निर्मिती करून कुटुंबव्यवस्था म्हणजे दीर्घकाळ टिकू शकणारी एक स्वचालित व्यवस्थाच तयार करून दाखवली.

अनुत्पादकांच्या प्रश्नाचा उदय

ठिसूळ किंवा स्वचालित कुठल्याही प्रकारच्या कुटुंबव्यवस्थेत, स्थिर जीवन आणि स्थावर मालमत्तेचा परिणाम म्हणून आयुर्मान वाढते. जन्माचा वेग वाढतो तर मृत्यूचा वेग मंदावतो. परिणामी मुलांची आणि वृद्धांची संख्या वाढू लागते. माणूस जन्मापासून मृत्यूपर्यंत ग्राहक असतोच पण वृद्ध आणि मुले, अनुत्पादक किंवा अल्प-उत्पादक ग्राहक असतात. कुटुंब व्यवस्थेने टोळी आणि सदस्य या सरळ नात्यात कुटुंब हा नवा घटक आणल्याने, टोळीतील वृद्ध आणि मुले आता कुटुंबातील वृद्ध आणि मुले बनतात. त्यांची जबाबदारी आता टोळीकडून कुटुंबाकडे येते. आणि मग काही नवे प्रश्न समोर येऊ लागतात.
  1. वस्तूंचे वाटप कसे करायचे? आणि वस्तू पण कश्या? निसर्गतः तयार झालेल्या आणि आपण फक्त गोळा करून आणलेल्या नव्हे, तर आपण उत्पादन केलेल्या वस्तू.
  2. श्रमानुसार मोबदला की गरजेनुसार मोबदला?
असे टोळीमध्ये सहसा पडत नाहीत आणि पडल्यास टोळी फोडून किंवा हिंसेने सोडवले जातात. पण कुटुंब तयार झाल्यावर हे प्रश्न थोडे जटील स्वरूप धारण करतात. जटील अश्यासाठी की कुटुंबात हिंसा समर्थनीय नसते आणि कुटुंब फोडणे देखील तितकेसे सोपे नसते. प्रेम, वात्सल्य या नैसर्गिक भावना आणि टोळीमुळे तयार झालेली जबाबदारी, कृतज्ञता, बांधिलकी ही मूल्ये वापरून, अश्या अनुत्पादक आणि अल्पउत्पादक ग्राहकांना देखील कुटुंबात सामावून घेतले जाते. म्हणजे अनुत्पादक आणि अल्पउत्पादक घटकांना सामावून घेणारी कुटुंब व्यवस्था समाजवादीच असते असे म्हणावे लागेल.

मालक नसलेल्या कामगाराचा उदय

कुटुंबाचा आकार वाढल्यावर, कामाचे, सश्रम - श्रमविरहित, कौशल्यपूर्ण - कौशल्यविरहीत असे वर्गीकरण होते. श्रम आणि कौशल्य विरहित कामे लहान मुलांकडे, तसेच कमी श्रमाची कामे वृद्धांकडे जाऊ लागतात. मग निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी आणि वाढत्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त उत्पादनाची गरज भासू लागते. त्यासाठी अधिकचे पशुधन, अधिकची शेत जमीन आणि त्यांना सांभाळण्यासाठी, कसण्यासाठी मनुष्यबळ लागते. घरातील मनुष्यबळ अपुरे पडते.

म्हणजे, निसर्गासमोरची हतबलता हे एकट्या माणसांनी टोळ्या बनविण्यामागचे सर्वात महत्वाचे कारण होते. टोळीने माणसाला जीवनसंघर्षात टिकून राहण्यास मदत केली. टोळीने शिकार करायला शिकवले. ती शिकार वाटून खायला शिकवले. टोळीने पशुपालन शिकवले. टोळीने शेती शिकवली. टोळीने लहान मुलांची आणि वृद्धांची काळजी घ्यायला शिकवले. टोळीने, टोळीतला तो आपला आणि टोळीबाहेरचा तो परका असा भेद करायला शिकवले. टोळीने युद्ध करायला शिकवले. टोळीने जिंकलेल्यांना गुलाम करायला शिकवले. टोळीने कुटुंब व्यवस्था निर्माण होण्यास मदत केली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे टोळीने उद्योगातून भांडवल तयार करून दाखवले. उद्योग >> मालमत्ता >> संचित मालमत्तेचे टोळीच्या पुढील पिढीसाठी भांडवल अशी रचना अस्तित्वात आली. हळू हळू टोळीचा माणसावरील प्रभाव कमी होऊन त्याऐवजी कुटुंबाचा प्रभाव वाढू लागला. सुखाची लालसा तर नैसर्गिक होतीच पण ते थोड्या फार प्रमाणात मिळू लागल्यावर त्याच्या सातत्याची गरज भासू लागली. त्यामुळे कुटुंब व्यवस्थेने जगभरातील मानव समूहांवर आपला पगडा बसविला. माणसे टोळीचा घटक म्हणून काम करण्याऐवजी कुटुंबाचा घटक म्हणून काम करू लागली. वृद्ध, लहान मुले आणि अपंगांच्या काळजीची जबाबदारी टोळीकडून कुटुंबाकडे सरकली. आणि उद्योगातून भांडवल बनण्याच्या त्या दिवसात कुटुंबामुळे उद्योग आणि उद्योगासाठी कुटुंब अशी एक वर्तुळाकार साखळी तयार झाली. माणसाच्या जीवनाला श्रेयस आणि प्रेयस अश्या दोन्ही प्रकारचे प्रयोजन मिळाले. आणि आपल्या कुटुंबातील अनुत्पादक माणसाच्या गरजा भागविण्यासाठी परक्या उत्पादक माणसाच्या श्रमांना वापरणे आवश्यक होऊन बसले.

टोळीतून मानवसमूहांची वाटचाल कुटुंब व्यवस्थेकडे झाली याचा अर्थ असा नव्हे की, सगळ्या माणसांनी आपापले कुटुंब बनवायला सुरवात केली. पण ज्यांना मालमत्ता उभारायची आहे त्यांना त्यासाठी कुटुंब ही एक सुयोग्य व्यवस्था ठरली. ज्यांनी आपापली कुटुंबे बनवली त्यांना आपल्या सुखाच्या सातत्यासाठी इतर अनेकांचे श्रम वापरायचे असल्याने अश्या इतरांनी कुटुंबे न बनवणे अधिक फायद्याचे होते. त्यामुळे गुलामांना कुटुंबे बनविण्याचा हक्क नाकारला गेला. त्यांची अवस्था इतर पाळीव प्राण्यांच्या पातळीवर नेण्यात आली. जगण्यासाठी आवश्यक तितकेही न देता केवळ शस्त्र बळाचा वापर आणि हिंसेबद्दल अपार प्रेम या दोन गोष्टी वापरून गुलामीची शोषणकारी व्यवस्था शहरराज्यांच्या (city-states) प्रगतीस कारणीभूत ठरली.

गुलाम काम करत होते पण तो विनामोबदला. पाळीव प्राण्यांसारखे. म्हणून त्यांना कामगार म्हणणे योग्य ठरणार नाही. पण गुलामांकडून कामे करून घेणाऱ्या आणि विशिष्ट प्रकारचे कौशल्य अंगी असणाऱ्या लोकांचा एक वर्ग हळू हळू तयार होत चालला होता. यातील काही स्वतःची कुटुंबे राखून होते तर काही एकेकटे राहण्यात खूष होते. या सर्वांमधील समान सूत्र म्हणजे ते टोळी सदस्य असल्याने गुलाम नव्हते. त्यांच्या अंगी शेती किंवा पशुपालानास उपयोगी असे एक तरी कौशल्य किंवा त्यासाठी भरपूर मोकळा वेळ होता. आणि त्यांना शेतीची किंवा गुरांची मालकी राखण्यात रस नव्हता. हे सर्वजण, उद्योगी कुटुंबाला आपले कौशल्य किंवा वेळ मोबदल्याच्या बदल्यात देण्यास तयार होते. हे पहिले कामगार होते. आपल्या श्रमातून तयार झालेले संपूर्ण उत्पादन हा मोबदला त्यांना महत्वाचा महत्वाचा वाटत नव्हता. त्याउलट, कामाआधी ठरवलेला आणि उत्पादनाच्या पटीशी संबंध नसलेला मोबदला त्यांनी काम करण्याचे कारण होता.

मग गुरांचा मालक म्हणजे गुराखी, जमिनीचा मालक हाच त्या जमिनीवरच मजूर हे समीकरण बदलण्यास सुरुवात झाली. स्वतःची गुरे नसताना केवळ गुराख्याचे काम करणाऱ्या किंवा स्वतःची जमीन नसताना शेत कसणाऱ्या, कुठलाही मालकी हक्क न सांगणाऱ्या गुलामांबरोबर, कामगार लोकांचा गट तयार होऊ लागला. अश्या तऱ्हेने मालमत्ताधारक, विनामोबदला काम करणारे गुलाम आणि ठराविक मोबदल्यावर काम करणारे कामगार असे तीन वर्ग तयार करून भांडवलशाही आपला शिक्का गडद करू लागली.

---------------------

‎समाजवाद आणि भारत‬ (भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का


--------------------

मागच्या भागात मी समाजवादाचे - साम्यवादाचे तत्वज्ञान हे जरी भांडवलशाहीला टक्कर देताना दिसले तरी ते ज्या देशांत शोषणकारी वसाहती वसवल्या गेल्या त्या जित देशात उगम पावलेले नाही. याउलट भांडवलशाहीचा उदो उदो करणाऱ्या वसाहतवादी, जेत्या देशांतच उगम पावले, ही खुली गुपिते माझे निरीक्षण म्हणून नोंदवून ठेवली.

प्रवाही भांडवलशाही

भांडवलशाही ही एक अशी व्यवस्था आहे जिचे स्वतःचे त्याच नावाचे तत्वज्ञान आहे. ही व्यवस्था माणसातल्या उपजत गुणांना वापरत असल्याने हिला रुजायला फार मोठी समाजरचना लागत नाही. किंबहुना स्वतःला हवी तशी समाजरचना तयार करून घेण्यास भांडवलशाही समर्थ असते. हिच्या तत्वज्ञानाला शिकायला उन्नत मनाची किंवा मेंदूची आवश्यकता लागत नाही. केवळ निरीक्षणातून देखील हे तत्वज्ञान शिकता येते. जगाच्या ज्या भागात ही व्यवस्था नव्हती त्या भागातील लोक या व्यवस्थेच्या राक्षसी महत्वाकांक्षेपुढे नामशेष तरी झाले किंवा ते देखील या तत्वज्ञानाचा अंगिकार  करून या व्यवस्थेचे पाइक झाले.

उपजत गुणांवर आधारित, व्यवस्थेचे शरीर असलेल्या भांडवलशाही तत्त्वज्ञानाच्या तुलनेत समाजवाद हे उच्च मूल्यांवर आधारित परंतू शरीरविरहीत असे केवळ तत्वज्ञान आहे.  आजच्या भाषेत बोलायचे झाले तर भांडवलशाही अॅपलच्या आय फोन आणि त्याच्यासाठी बनलेले आय ओएस सारखे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही आहे. तर समाजवाद हे गुगलच्या अँड्रॉइड सारखे केवळ सॉफ्टवेअर आहे. भांडवलशाही ही मनुष्याच्या उपजत गुणांवर आधारित व्यवस्था आणि तिला विषद करणारे तत्वज्ञान असल्याने, ती स्थिर नसून प्रवाही आहे. याउलट समाजवाद आणि त्याच्या अंतर्गत येणारा साम्यवाद हे मूल्यांवर आधारीत तत्वज्ञान असल्याने तुलनात्मक रित्या स्थिर भासते.

व्याख्या

१९७६ च्या  ४२व्या घटनादुरुस्तीने  भारताचे प्रजासाताक अधिकृतरित्या समाजवादी झालेले असले तरी त्याआधी देखील घटनेत असलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे, भारतीय प्रजासत्ताक समाजवादीच होते असे आपण म्हणू शकतो. स्वातंत्र्यानंतर पहिली ५० वर्षे भारताने मिश्र अर्थ व्यवस्थेचा अंगिकार केला होता, ज्यात भांडवलशाही आणि साम्यवादाच्या वळणाने जाणारा समाजवाद यांचे मिश्रण, अशी रचना तत्कालीन सरकारी पक्षाने राबवली होती. याशिवाय, अजूनही भारतात साम्यवादी विचारसरणीचे राजकीय पक्ष आपला प्रभाव राखून असल्यामुळे भारतीय समाजवादाचा विचार करताना आपल्याला भांडवलशाही, समाजवाद आणि साम्यवाद या तिघांची व्याख्या समजून घेणे आवश्यक ठरते.

भांडवलशाही

मी भांडवलशाहीचे वर्णन प्रवाही व्यवस्थेचे प्रवाही तत्वज्ञान असे केल्याने तिची, "वैयक्तिक नफ्याचे, खाजगी मालमत्तेचे आणि सरकारी हस्तक्षेप नसलेल्या खुल्या बाजाराचे समर्थन करणारी व्यवस्था" अशी व्याख्या करताना ह्या व्याख्येतले गुणविशेष भांडवलशाहीत कसे आले असावेत त्याचे शब्दचित्र रंगवायचा प्रयत्न करतो आहे. मी जे मुद्दे त्यासाठी मांडत आहे ते संपूर्ण जगात, एकाच वेळी, काळाच्या रेषेवर एकामागोमाग एक घडले असा माझा दावा नाही याउलट, हे सर्व मुद्दे जगाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळी एकमेकांच्या आगे मागे घडत होते आणि अजूनदेखील घडत आहेत, हे वाचकांनी ध्यानात  घ्यावे ही अपेक्षा आहे. मी भांडवलशाहीच्या आज सर्वमान्य झालेल्या वैशिष्ट्यांना एकत्र गुंफणारी जी व्याख्या वर दिली आहे त्यातील सर्व वैशिष्ट्ये एकाच वेळी घेऊन भांडवलशाही प्रकट झाली नाही. तर इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी भांडवलशाहीने वेगवेगळी वैशिष्ट्ये धारण केली आणि तिला तिचे आजचे स्वरूप प्राप्त झाले आहे असे माझे मत आहे. त्यामुळे भांडवलशाहीला प्रवाही व्यवस्था म्हणताना मी, कालौघात वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये धारण करीत जाण्याचा तिचा हा गुण विचारात घेऊनंच मी हे शब्दचित्र रंगवतो आहे.

चंचुप्रवेश ते हलका शिक्का

माणूस जेंव्हा छोट्या टोळ्यांच्या रूपात एकत्र येतो भटका, शिकारी आणि निसर्गात आढळणारे अन्न गोळा करणारा असतो, किंवा अजून सुलभीकरण केले तर, जेंव्हा तो उत्पादक नसून केवळ ग्राहक असतो तेंव्हा  टोळीतील सर्वांचे परस्परसंबंध समाजवादाच्या किंवा साम्यवादाच्या धर्तीवर नैसर्गिकरीत्या तयार होतात आणि नैसर्गिकरित्या तयार झाल्याने ते मान्य करणाऱ्या टोळी सदस्यांची संख्या जास्त असते. मग या समाजवादी रचना असणाऱ्या टोळ्यांमध्ये भांडवलशाहीचा उगम होतो कसा काय?

या समाजवादी टोळ्यात सगळेच निसर्गाचे ग्राहक असतात. विवाह संस्थेचा उदय अजून झालेला नसतो. आपला किंवा परका हा भेद केवळ ती व्यक्ती टोळी सदस्य आहे की नाही यावरून ठरतो. दुसरे कुठलेही नाते नसते. नवरा - बायको, पालक - मुले अशी मूळ नातीच अस्तित्वात नसल्याने बाकीची नातीदेखील अस्तित्वात यायची बाकी असतात. टोळीतील स्त्रिया, पुरुष आणि मुले हे सर्व जण टोळीचे असतात. एकमेकांचे नाही. त्यामुळे टोळी हाच एक एकक असतो. इतर टोळ्यांशी संबंध क्वचितच येतो. आणि आला तरी तो संघर्षाचा असतो, वस्तूंच्या देवाणघेवाणीचा नसतो. अजून बाजाराला सुरवात झालेली नसते. जे हवे ते घ्यावे. निसर्गच उत्पादक असल्याने मालकी हक्क नावाची गोष्ट नसते. त्याशिवाय, आपल्याला जे हवे ते दुसऱ्याकडे असेल आणि तो ते आपल्याला देण्यास तयार नसेल तर शारीरिक बळाचा वापर करून ते हिसकावून घेण्याचा पर्याय टोळीबाहेर आणि टोळी अंतर्गतदेखील उपलब्ध असतो. बळी तो कान पिळीचा नियम सर्वमान्य असतो. भटके शिकारी निसर्गाच्या कृपेने जगत असतात. रानोमाळ भटकताना सुरवात होते पशुपालनाची. कुत्रे आणि घोडे हे पहिले उपयुक्त पाळीव प्राणी. अन्न गोळा करण्याच्या आणि शिकार करण्याच्या वेळी हे दोन प्राणी उपयोगी पडतात. त्यानंतर या पाळीव प्राण्यांच्या यादीत येतात गाई, बकऱ्या, कोंबड्या आणि त्या पाठोपाठ या सर्व पाळीव प्राण्यांचे नर. आता दूध, मांस आणि अंडी या सर्व अन्न पदार्थावर या टोळीची हुकुमत सुरु होते. शिकारीचे महत्व किंचित उणावते. पशुपालन महत्वाचे ठरू लागते. टोळीकडे पहिला संचय होऊ लागतो. या संचयाला आपण नाव देऊया, "पशुधन".

आता टोळी अन्न-वस्त्रासाठी निसर्गावर पूर्णतया अवलंबून नसून थोड्याफार प्रमाणात ती स्वावलंबी होऊ लागलेली असते. टोळी आता दूध, मांस आणि चामड्याची वस्त्रे यांची उत्पादक बनू लागलेली असते. आता रानोमाळ भटकण्याऐवजी आपल्या पशुधनाला आवश्यक असा चारा आणि पाणी जिथे मुबलक मिळेल अश्या पाणवठ्याजवळ स्थिर होणे टोळीसाठी सोयीस्कर ठरते. अश्या स्थिर टोळीत अंगमेहनतीची कामे पुरुषांकडे जाऊ लागतात आणि अष्टावधानाची कामे स्त्रियांकडे जातात. स्त्रियांना निरीक्षण आणि अनुमान काढायला वेळ मिळतो. माझ्या मते शेतीचा शोध माणसाला लागण्याचे कारण, प्रचंड निरीक्षणशक्ती असलेल्या स्त्रिया आहेत. शेतीचा शोध माणसांच्या टोळीला अजून स्वावलंबी बनवतो. शिकार आणि निसर्गात आढळणारे अन्न गोळा करण्याच्या बेभरवशाच्या कामापेक्षा शेती आणि पशुपालन अधिक खात्रीशीर उद्योग ठरतात. अश्या प्रकारे जेंव्हा माणूस त्याच्या जन्मसिद्ध ग्राहकाच्या भूमिकेबरोबरच उत्पादकाच्या भूमिकेत शिरू लागतो  तेंव्हा समाजवादी टोळ्यांमध्ये भांडवलशाहीचा चंचुप्रवेश होतो.

निसर्गाचे निरीक्षण करताना काही कल्पक टोळीसदस्यांना तंत्रज्ञानाचे शोध लागतात. उत्पादकता वाढू लागते. प्रचंड श्रमानंतर मिळणारे थोडके अन्न तेदेखील बेभरवशाचे, ही अवस्था जाऊन, तुलनेने कमी श्रमाचे आणि जास्त भरवशाचे अन्नाचे स्त्रोत टोळीच्या हातात येऊ लागतात. उत्पादन घरगुती प्रमाणात असल्याने आणि मालक स्वतःच मजूर असल्याने भांडवलशाहीने आपली मुळे इथे रुजवली आहेत हे चटकन लक्षात येत नाही.

काय बनवावे? किती बनवावे? कसे बनवावे? आणि कुणासाठी बनवावे? या अर्थशास्त्रातील मुलभूत प्रश्नांच्या आधी तयार होते ती मालकी हक्काची संकल्पना. कारण जो गुरे राखतो, जो जमीन कसतो तो वस्तू गोळा करणाऱ्यापेक्षा आता आपल्या कृतीत जास्त गुंतलेला असतो. आणि त्याच्या या गुंतवणुकीचे फळ त्याला त्याच्या गरजेपेक्षा जास्त प्रमाणात झालेल्या उत्पादनाच्या स्वरूपात मिळालेले असते. या जास्तीच्या उत्पादनावर त्याला त्याचा हक्क वाटणे स्वाभाविक असते. इतक्या छोट्या टोळ्यांच्या आदिम समाजात तंत्रज्ञानाच्या स्वामित्व हक्काचे प्रश्न येत नसले तरी जमिनीच्या आणि पशुधनाच्या मालकीचे हक्क नक्कीच तयार होतात.

भिन्नलिंगी व्यक्तीचे नैसर्गिक आकर्षण, त्यातून तयार होणारी प्रेम नावाची क्षणभंगुर भावना त्यापायी विनामोबदला केले जाणारे काम आणि मग केवळ प्रेमाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या अश्या विनाश्रमाच्या कामाच्या सातत्याची ओढ, टोळीमध्ये छोटे गट तयार करू लागते. त्या शिवाय अपत्यांच्या बद्दल असलेल्या नैसर्गिक प्रेमामुळे आणि गरोदरपणात घेतलेल्या काळजीमुळे स्त्री बद्दल तयार होणाऱ्या स्वामित्वाच्या भावनेमुळे, टोळीत स्त्री पुरुषांच्या जोड्यांच्या स्वरूपात उपटोळ्या तयार होतात. आपण त्यांना "कुटुंब" असे नाव देऊया.

जेंव्हा कुटुंब हा एकक तयार होतो आणि एका पिढीने राखलेले पशुधन, कुठल्याही मनुष्याने निर्माण न केलेली, निसर्गतः कुणाच्या नावे नसलेली जमीन, त्या पिढीच्याच वंशजांकडे हस्तांतरीत होते तेंव्हा समाजवादी असलेल्या टोळीवर भांडवलशाही आपला हलका शिक्का मारून ठेवते.
---------------------