Saturday, November 7, 2020

हरारी आणि आशुतोष

प्रिय आशुतोष,

मागच्या आठवड्यात तुझ्या पोस्टला लगेच उत्तर देता आलं नाही. आज जरा मोकळा झालो म्हणून उशिरा उत्तर देतोय.

हरारी आशादायक चित्र उभं करत नाहीत हे तर निर्विवाद आहे. किंबहुना २०१८ मध्ये न्यू यॉर्क टाइम्सच्या एका कार्यक्रमात हरारी आणि थॉमस फ्रीडमनची संयुक्त मुलाखत होती. त्यात आशावादी राहण्याचा फ्रीडमन साहेबांचा प्रयत्न ज्या सहजतेने हरारी उडवून लावत होते त्यामुळे मी एकाच वेळी आश्चर्यचकित आणि थोडा निराशही झालो होतो. आपल्याला ज्याचे विचार चिंतनीय वाटतात त्याच्याकडून आपल्याला आशावादी राहण्यासाठी जर पाठबळ मिळालं नाही तर होणारं दुःख ती मुलाखत ऐकल्यावर मी जवळपास एक आठवडाभर सहन करत होतो.

त्याआधी २००८ मध्ये मला जॉर्ज कार्लिन हा स्टँडअप कॉमेडियन सापडला होता यूट्यूबवर. त्याचे सगळे व्हिडीओ बघायचा सपाटा लावला होता. पण शेवटी त्याचे life is worth losing आणि it's bad for you हे दोन प्रोग्रॅम्स बघताना मला नकोसं झालं होतं. कारण तेच. मानवजातीबद्दल आत्यंतिक निराशावाद.

अर्थात कार्लीन आणि हरारी या दोघांच्यात तुलना करत नाही मी. कारण एक विनोदाच्या माध्यमातून समाजातील विसंगतींवर बोट ठेवणारा शब्दांचा खेळिया तर दुसरा विचारांशी खेळणारा आणि इतिहास व जीवशास्त्र या दोन विद्याशाखांचा संगम घडवून आणणारा अभ्यासक. तरीही दोघांच्या विचारांतील अंतिम निराशा मला खटकत होती आणि अजूनही खटकते हे अगदी खरं आहे.

अशाप्रकारे त्या बाबतीत मी तुझ्या बरोबर असूनही तू पोस्टमध्ये मांडलेले मुद्दे आणि शेअर केलेल्या लिंकमधील मुद्दे मला पटलेले नाहीत. का?, ते थोडक्यात मांडायचा प्रयत्न करतो. तुझ्या विचारांपेक्षा वेगळा विचार वाचायला तू तयार असतोस म्हणून मी तुझ्या पोस्टबाबत डेव्हिल्स ऍडव्होकेट होतोय.

डेव्हिल्स ऍडव्होकेट मोड ऑन.
१) <<<माणूस कितीही विचारवंत झाला तरी त्याच्या बालपणीच्या श्रद्धा त्याच्या मनात मागे रेंगाळत असतात. तिन्ही अब्राहमीक धर्मांमध्ये जगाचा अंत ही संकल्पना आहे. ..... जगण्याची जोरकस आशा ! साहेब ती देत नाहीत.>>>

बालपणीच्या श्रद्धा आणि हरारींच्या लेखनातील निराशावादी सूर हा मुद्दा मला मान्य आहे. भैरप्पांच्या उत्तरकांड या पुस्तकावरील माझ्या पोस्टमध्ये मीही तो मांडला आहे. पण हरारींनी आपल्या ज्यू धर्मातील धारणांना अनुसरून जगाच्या अंताबद्दल भाकीत वर्तवणे आपल्याला मान्य नसणे हे आपल्या बालपणीच्या संस्कारांचा तर परिणाम नसेल ना? आपल्या हिंदू संस्कृतीत प्रलयानंतर पिंपळाच्या पानावर पायाचा अंगठा चोखत असलेला श्रीकृष्ण हे नवसृजनाचे प्रतीक आहे. आणि कदाचित ते आपल्या मनाच्या तळाशी इतके खोल जाऊन रुजले आहे की आपण त्याला छेद जाणारी कुठलीही कल्पना स्वीकारू शकत नाही. जेव्हा माझ्या डोक्यात असा विचार आला तेव्हा मी हरारी ज्यू धारणांप्रमाणे लिहीत असतील ही शक्यता मान्य करायचं ठरवलं. मग त्यांच्या विचारांची धार्मिक सत्यासत्यता बाजूला ठेवून वास्तव आयुष्यात जीवशास्त्रीय पुराव्यांशी सांगड घालायचा प्रयत्न केला. त्यासाठी माझ्या मनातील बाळकृष्णाला बाजूला ठेवला. तेव्हा मला पृथ्वीवरील कुठल्याही जीवमात्रांशी भावनिक बंध नसलेला निसर्ग दिसतो. पृथ्वीवर आपल्याला माहित असलेल्या प्राण्यांच्या असंख्य प्रजाती माणसाने पृथ्वीचा अनिर्बंध उपभोग घ्यायला सुरवात करायच्या आधी अशाच नष्ट झालेल्या आहेत. पण त्यांच्याबद्दल निसर्ग हळहळ करीत बसलेला आहे असं कुठे जाणवत नाही. त्यामुळे आपल्या मनातील पिंपळपानावरचा बाळकृष्ण बाजूला ठेवला तर हरारींनी मांडलेला जगाचा अंत ही केवळ धर्मकल्पना न वाटता निरीक्षण आणि अनुमान वाटू लागतं.

२) <<< हरारी त्याच्या अलिप्त पावित्र्यामध्ये गंभीर चेहऱ्याने म्हणतो : "करोनाच्या निमित्ताने उघडकीस आलं आहे की जागतिक नेतृत्व नाही ....... त्या नेतृत्वाची ताकतच मुळात केवढी असेल! किती सहज शक्य असेल त्या सत्तेला सगळ्यांनाच गुंडाळणं .>>>

माझ्या मते हरारी इथे नेतृत्व म्हणजे व्यक्तींबद्दल बोलत नसून नेतृत्व या गुणविशेषाबद्दल आणि तो निर्माण करताना आणाव्या लागणाऱ्या व्यवस्थांबद्दल, मूल्यांबद्दल बोलत आहेत. सध्याची राष्ट्र राज्य संकल्पना आणि त्यानुसार तयार झालेली मूल्यव्यवस्था जागतिक अरिष्टांसाठी अपुरी आहे असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला जाणवला. जर नवी मूल्यव्यवस्था आणि त्याप्रमाणे संस्थात्मक व्यवस्था निर्माण केली तर तू म्हणतोस त्याप्रमाणे हुकूमशाही नेतृत्व तयार होणार नाही. अर्थात हे होणे नजीकच्या काळात शक्य नाही त्यामुळे हरारींचा सूर निराश होणे अगदी स्वाभाविक आहे. सध्याच्या मूल्यव्यवस्था आणि शासनव्यवस्था तशाच ठेवून जर आपण जागतिक नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न करणार असू तर तू म्हणतोस त्याप्रमाणे हुकूमशहा तयार होणे अटळ आहे. पण सर्व बाबींचा सूक्ष्म विचार करून मत मांडणारे हरारी या बाबतीत वरवरचा विचार करून सार्वजनिक व्यासपीठावर मत मांडतील असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या मनातील जागतिक नेतृत्व हे नव्या मूल्यव्यवस्था आणि संस्थांही उभ्या कराव्या लागतील या गृहितकावर आधारित आहेत असं मला वाटलं. किंबहुना इथे मला ज्यू हरारी चक्क हिंदूंची वसुधैव कुटुंबकम् ही संकल्पना जागतिक नेतृत्व उभं करण्यासाठी महत्वाची आहे असं मांडताहेत असं वाटलं.

३)<<<सध्या हरारी नेत्यानाहू सरकारवर सारखा टीका करतो. नेत्यानाहूच्या तरुण मुलाने त्याला ट्विटरवरती झोडलंही. अनेक विचारवंत बघता बघता अलगद ट्रॅपमध्ये अडकून किंवा स्वखुशीने अशा आडपडद्याच्या राजकारणात उतरतात. .... का तो विचारवंतांच्या स्वधर्माला जागतो आहे ?>>>

हरारी आपल्या मतासाठी जर समाजमाध्यमांवर सक्रिय असेल तर त्यामुळे त्याच्या मतांचं महत्व कमी न होता उलट ते अजून वाढतं. हरारी पैसे घेऊन इतरांच्या उद्दिष्टाला साजेशी लोकभावना तयार करण्याचे कारस्थान करत असेल हा आरोप मला मान्य करायला कठीण वाटतो. पण एका क्षणासाठी तो खरा आहे असं मानलं तरीही केवळ त्याने सुपारी घेऊन असे लेख लिहिले असं मान्य केलं तरीही त्याच्या लेखात त्याने मांडलेल्या मुद्द्यांत तथ्य आहे की नाही हे शोधणे आणि ते नसल्यास तसे हरारींच्या निर्विकारपणे मांडणे हे हरारी विरोधकांचे कर्तव्य आहे. त्याने सुपारी घेऊन असं लिखाण केलं असेल असं म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

तू जो लेख शेअर केला आहेस, तो मी वाचला. पण त्यातही मला आशावादी राहण्याची आपली मानसिक गरज पूर्ण करण्याची धडपड जास्त जाणवली. आपण आशावादी राहणं ही आपली गरज आहे, निसर्गाची नाही हे मी आता मान्य केलं आहे. किंबहुना आपण आशावादी आहोत ही देखील निसर्गाची आपोआप तयार झालेली एक गुंतागुंत आहे हेही मला मान्य आहे. कदाचित निसर्गाने दिलेल्या या आशावादाच्या बळावरच आपण किंवा आपल्या भावी पिढ्यांतील कुणी वंशज प्रलयानंतरच्या पाण्यावर तरंगणाऱ्या पिंपळपानावरच्या श्रीकृष्णाला पाहू शकणार आहेत ही शक्यताही मला मान्य आहे. पण म्हणून पृथ्वीपासून दूर दहाहजार किलोमीटरवर असलेल्या यानातून पृथ्वीकडे निर्विकारपणे बघत इथल्या सजीवांचा इतिहास आणि भविष्य सांगण्याची हरारींनी विकसित केलेली विचारपद्धती नाकारून काहीच फायदा नाही. किंबहुना त्यामुळेच आपण येणारे संभाव्य धोके लवकर ओळखून त्यावर उपाय शोधून जगाचा अंत टाळू शकतो. असं मला वाटतं.

डेव्हिल्स ऍडव्होकेट मोड ऑफ.

माझ्या पोस्टच्या सुरवातीला मी हरारींच्या एका मुलाखतीचा उल्लेख केला आहे. ती खाली देतो. 

थोडी निराशाजनक आहे. पण फ्रीडमन साहेबांनी ज्या पद्धतीने आशावादाचा किल्ला लढवला आहे ते मला फार आवडलं आहे. आणि शेवटी त्यावरची हरारींची प्रतिक्रयाही मला आवडली आहे. मुलाखत थोडी मोठी आहे (साधारण सव्वा तास). त्यामुळे तुला मोकळा वेळ असेल तेव्हा बघ.

गब्बर सिंग

सोसायटीत दहा मजले. प्रत्येक मजल्यावर चार बिऱ्हाडं. कमिटीने ठरवलं की रोज सकाळी प्रत्येक मजला निर्जंतुक करण्यासाठी डेटॉल वापरून लिफ्ट, जिन्याची रेलिंग्ज आणि लादी साफ करायची. प्रत्येक घरावर आळीपाळीने आपापल्या मजल्याची जबाबदारी. 

रोज कोणी ना कोणी सोसायटीच्या ग्रुपवर आपापला मजला स्वच्छ केल्याचा मेसेज टाकायचा. मी तेव्हा लेक्चर्स घेत असल्याने मला या स्वच्छतासंग्रामात भाग घेऊन मर्दुमकी दाखवण्याची संधी मिळत नव्हती. 

आज रविवार. लेक्चर्स नसल्याने सकाळी मला मोकळा वेळ होता. म्हणून मी कालच ग्रुपवर मेसेज टाकला होता की रविवारी सकाळी आमचा मजला मी स्वच्छ करणार. माझा स्वभावच तसा आहे. इतर कुणी काम केलं की मलाही करावंसं वाटतं. 

पण नेमकी मी काल सेंटर टेबलच्या अवस्थेची पोस्ट इथे फेसबुकवर टाकली. आणि आज सकाळी बघतो तर काय! 

माझे तीनही शेजारी दारात उभे.. त्यांच्या चेहर्‍यावर विलक्षण ताण. हा बाबा साफ करणार म्हणजे काय तोडणार असे भाव स्पष्टपणे वाचता येत होते. 

मी फ्लोरिंगवर मॉप चालवायला घेतला तर प्रत्येकाने आपापल्या चपला उचलून चटकन घरात घेतल्या. मी रेलिंग्ज साफ करायला गेलो सगळे आपापल्या घराच्या उंबरठ्यावर टाचा उंचावून मी रेलिंग्ज वाकवतो की काय ते बघू लागले. आणि जेव्हा मी लिफ्टची बटणं पुसायला सुरवात केली तेव्हा तर सगळेजण उंबरठ्यावर न आखलेली लक्ष्मणरेषा ओलांडून लिफ्टच्या दाराजवळ उभे राहिले. 'सावकाश.. हळू... आरामात... जोर नका लावू' अशा उद्गारांचा एकंच गलबला झाला. मी लिफ्टमधून बाहेर आलो आणि बघितलं तर बाहेरच्या विस्कळीत गर्दीत नवव्या आणि दहाव्या मजल्यावरचे लोक, माझ्या जड असलेल्या हातानं एकदाचं नाजूक काम केलं आणि त्यांच्या पुढील पंधरा दिवसांच्या आयुष्यात जिने चढ उतार करायला न लावल्याबद्दल साश्रू नयनांनी माझं कौतुक करत होते. एकदोघांनी तर फक्त लोटांगण घालणंच बाकी ठेवलं होतं. 

मला एकदम गब्बर सिंग असल्याचा फील आला. 

Saturday, April 11, 2020

हुकमी एक्का

सकाळी झाडू मारत होतो. बायको कौतुकाने माझ्याकडे बघत होती. आई माझ्याकडे काळजीयुक्त वात्सल्याने आणि कौतुकाने बघत होती. सासरे माझ्याकडे विजयी वात्सल्याने आणि स्वतःच्या लेकीकडे कौतुकाने बघत होते.

चार चाकं असलेलं काचेचं सेंटर टेबल मी जोरात सरकवलं. कडाडकड असा आवाज आला. घरातल्या दशदिशा दुमदुमल्या. सगळे चपापले. व्हिडिओ गेम खेळणारा धाकटा लेक दचकला आणि गेममधला त्याचा सैनिक गतप्राण झाला. व्हॉटस अॅपवर चॅटिंग करत असलेला मोठा लेकही दचकला. चुकून त्याने भलतीच स्मायली चॅटवर पाठवली असावी. कारण नंतर त्याच्या तोंडून चक् चक् असा विषाददर्शक उद्गार आला आणि एकाएकी त्याची फोनवरची धावपळ वाढली.

ज्याची भीती होती तेच झालं. माझ्या डौलदार सेंटर टेबलच्या चार चाकांपैकी एक चाक मोडून पडलं होतं. आणि शिवधनुष्य मोडून सीतेकडे प्रेमाने पहाणार्‍या विजयी रामाऐवजी, ते छातीवर पडलेल्या पराभूत रावणासारखा चेहरा करून उभा राहिलो. (रामायण बघण्याचे अप्रत्यक्ष फायदे होतात ते असे)

बायकोच्या चेहऱ्यावरील कौतुक मावळून तिथे क्रोधाग्नी प्रकटला. आईच्या चेहर्‍यावरील कौतुक मावळून तिथे काळजी आणि चिंतेने घर केलं. सासऱ्यांच्या चेहऱ्यावरील विजयी कौतुकाची भावना जाऊन तिथे 'तरी मला वाटलंच होतं की याच्यापेक्षा चांगला मुलगा मी माझ्या राजकुमारीला नवरा म्हणून शोधून दिला असता. पण काय करणार माझ्या छोट्या परीला हाच गडबड्या आवडला' असे भाव आले.

आणि एकाएकी मला जाणवलं की वॉशिंग मशीन, कपडे वाळत घालण्याच्या दोऱ्या वरखाली करुन देणं, भांडी घासणं, केर काढणं आणि लादी पुसणं यातल्या कित्येक कामांपासून सुटका करून घेण्याचा हुकमी एक्का माझ्या हाती लागला आहे. आता विजयी हास्य करायची पाळी माझी होती.

हरारी, कोरोना आणि कायद्याचा अर्थ

सकाळी अमेय गोखलेनी चॅनेल 4 या ब्रिटिश टिव्ही कंपनीच्या, एक आठवड्यापूर्वीच्या एका कार्यक्रमाची लिंक फेसबुकवर शेअर केली होती. कोरोनाच्या निमित्ताने युआल नोहा हरारींच्या मुलाखतीची ती लिंक होती. हरारींनी मांडलेले मुद्दे मला महत्वाचे वाटले. 



1) कोरोनाच्या काळात आपण कुठले निर्णय घेतो त्यावर आपलं पुढील जग कसं असेल ते ठरेल.
2) सध्या सर्व गोष्टींचा वेग अचानकपणे आत्यंतिक प्रमाणात वाढला आहे. ज्या गोष्टींवर वीस वीस वर्षे केवळ चर्चा होत होती त्या गोष्टी आता एकेका आठवड्यात अमलात आणल्या जात आहेत.
3) यातून बाहेर पडण्यासाठी सरकारे सर्वाधिकार आपल्याकडे घेऊ शकतात किंवा नागरिकांना अधिकार देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतात.
4) नागरी स्वातंत्र्याचा संकोच इतक्या सहजपणे करता आला आहे, तर सरकारे हे नियंत्रण सहजासहजी आणि चटकन सोडणार नाहीत.
5) अशा साथीच्या रोगात आपल्याला आवश्यक असलेलं जागतिक नेतृत्व आपल्याकडे नाही. आपल्याकडे उपलब्ध असलेलं नेतृत्व देशपातळीवरील आहे.
6) आताच्या देशपातळीवरील नेतृत्वाने कात टाकून जरी जागतिक जबाबदारी घेण्याचा प्रयत्न केला तरी इतर देशांना त्याबद्दल विश्वास वाटणार नाही. त्यामुळे जागतिक नेतृत्वाची आत्यंतिक गरज असूनही ते नजीकच्या भविष्यात उपलब्ध होणार नाही.
7)सर्व देशातील राजकीय नेतृत्व आपल्या संपूर्ण देशाचं नेतृत्व न करता त्यातील एका गटाचं नेतृत्व करतात. साधारण राजकीय आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी ही बहुमताची व्यवस्था कामाला येऊ शकते पण साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी बहुमताची नसून सर्वांच्या एकमताची गरज आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी आपला गट - विरोधी गट अशी मांडणी करणं थांबवलं पाहिजे.

मुलाखत संपवली आणि वर्गात गेलो. आज इंटरप्रिटेशन अॉफ स्टॅच्यूट्स (कायद्यांचा अर्थ कसा लावावा) हा विषय होता. त्यात एक महत्त्वाचा मुद्दा येतो की कायद्याचा अर्थ लावताना न्यायाधीशाने कायद्यात नसलेले शब्द किंवा कलमे स्वतः घालू नये आणि असलेले शब्द किंवा कलमे स्वतःहून गाळू नयेत. न्यायाधीशाचं काम दिलेल्या कायद्याचा अर्थ लावणं आहे, कायदा बनवणं नाही. कायदा बनवण्याचं काम संसदेचं आहे.

मुलांनी विचारलं, 'न्यायाधीशांनी जर न्यायशास्त्राचं शिक्षण घेतलेलं आहे तर ते निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींपेक्षा अधिक ज्ञानी आहेत. मग कायद्यातील त्रुटी दूर करण्याचं किंवा कायदा बनवण्याचं काम न्यायाधीशांना न देता, कायद्याची जुजबी किंवा काहीच माहिती नसलेल्या त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतलेल्या लोकप्रतिनिधींना का दिलं आहे?'

त्यांना उत्तर देताना म्हणालो,
'कायदा म्हणजे समाजाला वळण देण्याचं शास्त्र आहे. हे गणित किंवा भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा खगोलशास्त्राप्रमाणे नैसर्गिक विज्ञान नाही.

नैसर्गिक विज्ञानात बहुमत आणि तज्ज्ञ यांच्या तुलनेत बहुमतापेक्षा तज्ज्ञांचं पारडं कायम जड असतं. संपूर्ण मानवजात जरी पृथ्वीभोवती विश्व फिरत आहे असं म्हणत असली तरी पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी नसून ती सूर्याभोवती फिरते हे सांगणारा एकटा कोपर्निकस बरोबर असतो. म्हणजे नैसर्गिक शास्त्रात बहुमताकडे दुर्लक्ष केल्याने समाजाचं नुकसान होईलंच याची खात्री नसते; झालाच तर फायदा होणार असतो.

याउलट सामाजिक शास्त्रांत मागील परंपरांना वळण देत भविष्य साकारायचे असते. त्यामुळे मागील परंपरांना, चालीरीतींना. रितीरिवाजांना, मान्यतांना. धारणांना धक्का लावताना फार काळजी घ्यावी लागते. तशी घेतली नाही तर लोकांना कायदा पाळावासा वाटत नाही. तो कागदावरच रहातो परिणामी शेवटी संपूर्ण समाज कागदोपत्री गुन्हेगार ठरु शकतो आणि भ्रष्टाचाराला मोकळं कुरण मिळतं. त्यामुळे कायदा तयार करताना न्यायशास्त्रातील एका तज्ज्ञाऐवजी लोकांतून आलेली शंभर डोकी डोकी असतील तर अतिशय आदर्श पण सामाजिक वास्तवापासून दूर असलेली व्यवस्था न बनता कदाचित कमी आदर्श पण लोकांच्या धारणांतून तयार झालेली व्यवस्था बनू शकते. आणि अशी व्यवस्था जास्त प्रमाणात अंगिकारली जाऊ शकते. कालांतराने तिच्यात पुन्हा बदल करून तिला अजून आदर्शवत करता येऊ शकते.

म्हणजे सामाजिक शास्त्रांचा उद्देश नैसर्गिक सत्याची प्रतिष्ठापना नसून सामाजिक सलोख्यातून समाजोन्नती असा असतो. नैसर्गिक शास्त्रे सत्य प्रस्थापित करुन पुढे जात असतात. याउलट सामाजिक शास्त्रे सत्य पुढे ठेवून आता त्याला गाठण्यासाठी महामार्ग तयार करत असतात.

त्यामुळे सामाजिक शास्त्रांचे नियम बनवताना एका तज्ज्ञापेक्षा अनेक साधारण लोकांच्या मतांना जास्त किंमत असते.'

मुलांचं शंकानिरसन झालं. मी पुढे शिकवत राहिलो. पण सकाळी ऐकलेली हरारांची मुलाखत डोक्यात होती. त्यातला समाजातील बदलांची गती वाढण्याचा आणि एका गटाचं नेतृत्व करत संपूर्ण समाजावर आपली मतं लादणाऱ्या कोत्या नेतृत्वाचा मुद्दा, मी मुलांना दिलेल्या उत्तराबरोबर खेळू लागला.

आणि मनात विचार आला की भविष्यात व्यवस्था आणि नेतृत्व कसं असावं याचा निर्णय सामाजिक शास्त्रांचा भाग असूनही आता कदाचित तो नैसर्गिक शास्त्रांपणे बहुमताऐवजी तज्ज्ञांकडे सोपवणं अधिक योग्य ठरेल का?

भैरप्पांचं उत्तरकांड आणि माझं रामायण (भाग २)


रामकथा भारतीय उपखंडात पसरलेली आहे. वेगवेगळ्या प्रदेशात तिची वेगवेगळी रूपं दिसतात आणि लोककथांतही तिची अनेक उपकथानकं सापडतात. आता जरी मला आठवत नसलं तरी आई सांगते की लहानपणी रोज रात्री बाबांच्या मांडीवर झोपताना गोष्ट सांगायचा हट्ट करायचो आणि त्यात जेव्हा श्रावणबाळाची गोष्ट यायची तेव्हा हमखास रडत रडत झोपी जायचो. मला खात्री आहे की दूरदर्शन आणि मनोरंजनाची अन्य साधने नसलेल्या अनेक शतकांत भारतीय उपखंडातील अनेक पालकांना रामायणाने हात दिला आहे आणि आपापल्या लेकरांचा किंवा नातवंडांचा, गोष्टींचा हट्ट पुरा करण्यात मदत केली आहे. अर्थात यामुळे प्रत्येक घरात रामकथेत भर पडत गेली असावी.

जितकी प्रसिद्ध रामायणे आहेत आणि रामाच्या बाबतीत जितक्या लोककथा आहेत त्या सगळ्या वाचणं मला शक्य नाही. तसेच देशोदेशींच्या पुराणकथांत मला रस असला तरी त्यात माझा व्यासंग नाही. पण जितकं तोडकंमोडकं वाचन मी केलेलं आहे त्यावरून मला जाणवलं आहे की प्रत्येक समूहाच्या पुराणकथांतून त्या समूहाच्या मान्यतांचा आणि संकल्पनांचा अंतःप्रवाह वाहात असतो. आणि जसजशा त्या कथा लोकप्रिय होऊ लागतात तसतसे हे अंतःप्रवाह अजून ठळक होऊ लागतात.

नियती ही जागतिक संकल्पना आहे. त्यामुळे जगातील सर्व पुराणकथांत नियती आपलं अस्तित्व दाखवत असते. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील घटना या नियतीच्या अदृश्य धाग्याने बांधलेल्या असतात ही कल्पना आपल्याला अनाकलनीय आयुष्यात आधार देत असते. पण नियती ही शक्ती सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यातील सर्वसामान्य प्रसंगांना उलगडण्यासाठी इतरांपेक्षा अधिक समर्पकपणे केवळ भारतीय परंपरेने वापरली आहे. कारण आपण नियती नामक शक्तीला कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म या दोन चाकांवर चालणाऱ्या व्यवस्थेत बसवले आहे. त्यामुळे आपल्याकडे नियतीबरोबर प्राक्तन नावाची अजून एक संकल्पना तयार होते.

संस्कृती म्हणजे जीवनपद्धती मानली तर धर्म म्हणजे संस्कृती निर्माण करण्यारी व्यवस्था आहे असं मला वाटतं. धर्म साधारणपणे दोन प्रश्नांचं उत्तर देतो. 'एखादी गोष्ट अशी का घडली?' आणि 'कुणी कसं वागावं?'

पाश्चात्य जगात अनेक संस्कृती नांदत होत्या पण त्या सर्वांना मध्यपूर्वेत जन्म घेतलेल्या तीन अब्राहमिक धर्मानी गिळून टाकले आहे. त्यामुळे त्या मृत संस्कृतीतील पुराणकथांतून या दोन प्रश्नांची जी उत्तरे मिळतात ती आता निरुपयोगी ठरली आहेत. अब्राहमिक धर्मात 'एखादी गोष्ट अशी का घडली?' याचं उत्तर 'नियती किंवा परमेश्वराची इच्छा' असं दिलं जातं. तर 'कुणी कसं वागावं?' याचं उत्तर 'देवाबरोबर केलेला करार'असं दिलं जातं. त्यामुळे तुमच्या नियतीचे शिल्पकार तुम्ही नसता. तुमची नियती अशी का आहे? या प्रश्नालाही उत्तर कायम 'देवाची इच्छा' इतकंच असतं. प्राप्त नियतीला स्वीकारून तुम्ही कराराचं पालन करणं इतकंच तुमच्या हातात असतं. आणि तुम्ही ते व्यवस्थितरित्या केलेलं आहे की नाही याचा निर्णय अंतिम निवाड्याच्या दिवशी केला जाणार असतो.

या अंतःप्रवाहामुळे माणसे चांगली किंवा वाईट वागतात. अवतार वगैरेची भानगड नसते. माणूस आणि देव असा सरळसोट मामला असतो. माणसे देवाशी नवा करार करू शकतात. माणसे स्वतःला प्रेषित घोषित करू शकतात. आणि इतर माणसे त्याला खोटं ठरवू शकतात. अनेक तोतये प्रेषित तयार होतात. एखादा प्रेषित समाजमान्य व्हायला त्याची हयात उलटून जावी लागते. प्रेषिताला त्याच्या हयातीत विरोधकांकडून आणि अनुयायांकडूनही त्रास भोगावा लागतो. त्याचं कारणही परमेश्वराची इच्छा इतकंच असतं.

प्रेषिताला जे अनुयायी मिळालेले असतात त्यांच्या सामाजिक स्थानावरून प्रेषिताचा संदेश बहुसंख्यांना मान्य होणार की नाही ते ठरते. लोक जुना प्रेषित सोडून नवा प्रेषित घेऊ शकतात. जुन्या प्रेषिताला मानणारे आणि नव्या प्रेषिताला मानणारे अश्या अनेक सरळ रेषा समाजात तयार होतात. ग्रंथप्रामाण्य वाढते. प्रेषिताचं आयुष्य आदर्श मानल्यामुळे त्याच्यासारखं वागण्याची जबाबदारी इतरांवर येते. पण या सर्वांहून सर्वात महत्वाचं म्हणजे म्हणजे प्रेषिताच्या आयुष्यातील प्रसंगांची जबाबदारी प्रेषितांवर पडते. त्यामुळे ते प्रसंग जर सद्यकाळाशी सुसंगत असतील तर त्यांचा उदोउदो होत राहातो. आणि विसंगत असतील पण प्रचलित इतिहासातून त्यांना वगळणं अशक्य असेल तर त्यांचं दुबळं समर्थन केलं जातं किंवा मग त्याबद्दल मौन बाळगलं जातं. त्यामुळे प्रेषितांच्या मागे कदाचित थोड्या वेगळ्या रेषेत चालणाऱ्या लोकांचा समूह तयार होतो. पण प्रेषितापासून कितीही तिरक्या कोनात चालले तरी सगळे प्रेषितांच्या मागे चालणारे असतात. समांतर चालणारे कुणीच नाही.

याउलट भारतात मात्र एकाच वेळी अनेक संस्कृती नांदत होत्या आणि इथेच अनेक धर्मांचा जन्मही झाला. इथे जन्म झालेल्या प्रमुख धर्मांपैकी शीख धर्म सोडल्यास इतर प्रत्येक धर्माने या दोन प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न जरी वेगवेगळ्या प्रकारे केला असला तरी त्या सर्व धर्मात एक सूत्र समान दिसतं की त्यांनी 'एखादी गोष्ट अशी का घडली?' आणि 'कुणी कसं वागावं?' या दोन्ही प्रश्नांना एकत्र गुंफलं आहे. आत्मा न मानणारा बौद्ध धर्म असो किंवा आत्मा मानणारा जैन धर्म असो किंवा मग अनेकेश्वरवाद आणि आपापल्या पूर्वजपरंपरा जपणाऱ्या पुराणप्रिय लोकांचा इतरांनी नाव दिलेला हिंदू धर्म असो. या सर्वात पुनर्जन्म आणि कर्मसिद्धांत यांना नियतीबरोबर महत्व आहे.

त्यामुळे 'एखादी गोष्ट अशी का घडली?' याचं उत्तर नियती असलं तरी 'कुणी कसं वागावं?' याचं उत्तर मात्र 'या जन्मीच्या उत्तम कर्माचं फळ पुढील जन्मात मिळणार आहे.त्यामुळे पुढील जन्म हीनयोनीत न होता उत्तमयोनीत मिळावा आणि त्या जीवनात सर्व सुखे मिळावीत म्हणून तुम्हाला धर्म सांगेल त्या पद्धतीने वागणं आवश्यक होतं. या पद्धतीने तुम्ही या जीवनातील तुमच्या सुखदुःखांचे शिल्पकार नसलात तरी पुढील जन्मातील सुखदुःखांचे शिल्पकार असता. त्यामुळे तुमच्या पुनर्जन्मातील सुखदुःखाची जबाबदारी तुमच्या या जन्मातील कृत्यांवर सोपवून आपल्या भूमीत जन्माला आलेले तीनही प्रमुख धर्म मोकळे झालेले आहेत.

अश्या प्रकारच्या व्यवस्थेत प्रेषिताचा जन्म होण्याची गरजच संपून जाते. देवाशी करार करण्याचीही आवश्यकता नाही. मग आदर्श जीवन कसे जगावे ते सांगण्यासाठी जैन आणि बौद्ध धर्म सोडल्यास इतर भारतीय लोकांना मान्य असणाऱ्या, पूर्वजपरंपरा मानणाऱ्या लोकांच्या धर्मात पुरुषोत्तम स्वरूपात अवतार घेण्याची जबाबदारी प्रत्यक्ष देवावर येते. आणि मग अधर्माचा प्रभाव वाढू लागला की विविध युगात परमेश्वर अवतार घेतो.

परमेश्वराच्या त्या अवताराचे आयुष्य हा अनेकांसाठी आदर्श ठरते पण त्याचे अनुकरण करणे मात्र अपेक्षित नसते. जे प्रत्यक्ष परमेश्वराने अधर्माचा नायनाट करण्यासाठी घेतलेल्या अवतारात केलं ते आता मी करायची गरज नसते. मी आपला माझ्या पुढील जन्मातील सुखांची बेगमी करण्यात स्वतःला गुंगवून ठेवू शकतो. अश्या प्रकारे आदर्श आणि त्याला मानणारे यांची आयुष्ये एकमेकांना समांतर चालत राहतात. लोक देवाची आणि त्याची अवताराची पूजा करतात पण त्याचे अनुकरण करत नाहीत. त्याच्या गोष्टी पिढ्यानपिढ्या सांगत राहतात पण त्या कथाकथनाचा उद्देश मात्र केवळ भक्ती वाढावी, नम्रता अंगी यावी, आणि पूर्वजपरंपरा चालत राहावी इतकाच असतो.

या पूर्वजपरंपराअनुयायी धर्मात इथपर्यंत सर्व काही ठीक असतं. पण एकदा का अवतार संकल्पना आली की 'तूच आहेस तुझ्या पुढल्या जन्माचा शिल्पकार' या मान्यतेला सुरुंग लागतो. कारण या अवताराला त्याच्या आयुष्यात जे दुःख भोगावे लागते त्याचं कारण म्हणून त्याच्या पूर्वजन्मातील कृत्यांची कारणपरंपरा सांगता येत नाही. अवताराला पूर्वजन्म आणि पुनर्जन्म नसल्याने त्याला कर्मसिद्धांत लागू होत नाही. त्यामुळे मग अवताराला दुःख का भोगावं लागलं? आणि अवताराने चांगलं का वागावं? यांची उत्तरं देणं कठीण होऊन जातं.

'अवताराने चांगलं का वागावं?' यासाठी धर्मसंस्थापना असा उद्देश पुढे ठेवला की काम सोपं होतं. पण अवताराला दुःख का सहन करावं लागलं? या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण होऊन बसतं. म्हणून मग शाप संकल्पना वापरली जाते. मग श्रावणबाळ येतो. शब्दवेधी बाण येतो आणि शेवटी पुत्रवियोग येतो.

अश्या प्रकारे सर्वसामान्य माणसांचे प्राक्तन त्यांच्या पूर्वजन्मावरुन ठरते याउलट अवतारांचे प्राक्तन त्यांना किंवा त्यांच्या जवळच्यांना मिळालेल्या शापावरून ठरते.

अर्थात भारतीय पुराणकथांत आणि अब्राहमिक धर्मांच्या पुराणकथांत एक समान धागा असतो की, चरित्रनायकाच्या आयुष्यातील कथांचे पूर्ण कार्यकारणभाव दिले आणि त्यांच्या भावभावनांचे चित्रण केले तरी त्यांच्याबरोबरच्या लोकांचे भावविश्व् आणि त्यांची झालेली फरफट याबद्दल सर्व पुराणकथा मौन बाळगतात. त्यामुळे कौसल्या, लक्ष्मण, सीता, तारा, मंदोदरी, कुंभकर्ण, इंद्रजीत या सगळ्यांचे भावविश्व् आपल्यासमोर लोकप्रिय ग्रंथातून येत नाही. त्याचप्रमाणे येशूची आई मेरी किंवा पिता जोसेफ किंवा प्रेषित मुहम्मदांची अल्पवयीन पत्नी आयेषाचे भावविश्व् तितक्याच बारकाईने आपल्या समोर येत नाही. अब्राहमिक धर्मात ग्रंथप्रामाण्य असल्याने त्यात लोककथांना फार स्थान नाही. याउलट आपल्याकडे ग्रंथप्रामाण्य नसल्याने लोककथांनी अनेक प्रक्षेप मूळ कथेत घुसडले आहेत.

अब्राहमिक धर्मात प्रेषितांच्या हातून घडलेल्या चुकांबद्दलही परमेश्वराची इच्छा हे स्पष्टीकरण देता येते. प्राक्तनाची झंझट नसल्याने, प्रेषित प्रवृत्तीप्रवण असूनही ते नियतीशरण दाखवता येतात. पण अवतारी पुरुषांच्या आयुष्यातील चमत्कारांचे आवरण बाजूला काढून त्यांच्या आयुष्यातील कार्यकारणभाव उलगडणे अतिशय कर्मकठीण असते. कारण इथला समाज आता नियतीशरण आहे. प्राक्तन आता आपल्या नेणिवांचा भाग झालेले आहे. इथला समाज आपल्या पूर्वजन्मातील कर्मफळांना भोगण्यास तयार आहे. त्या समाजाचा आदर्श आता नियतीशरण दाखवावा की प्रवृत्तीप्रवण दाखवावा? ही मोठी गुंतागुंत आहे. त्याला प्रवृत्तीप्रवण दाखवणे आवश्यक आहे. कारण तो धर्मसंस्थापना करण्यासाठी आलेला आहे. पण त्याला नियतीशरण दाखवणे अशक्य आहे. शाप उ:शाप कल्पना वापरून आपण फारतर त्यांनी भोगलेल्या दु:खाचं स्पष्टीकरण देऊ शकतो. पण त्यांनी जवळच्या व्यक्तींवर आणि संपूर्ण समाजावर केलेल्या अन्यायाचं समर्थन करणं अशक्य असतं. म्हणून अवतारी पुरुषांचे सगळे वर्तन दैवी ठरवून आपण त्याला योग्यायोग्यतेच्या कसोट्या लावणं टाळतो.

अश्या वेळी जेव्हा भैरप्पा सीतेच्या दृष्टिकोनातून चमत्कार बाजूला करून रामकथा सांगायचा प्रयत्न करतात, आणि त्यांच्या डोळ्यासमोर सध्याचे सत्ताधारी असतात तेव्हा पूर्ण पुस्तक वाचताना अजून नवनवीन प्रश्न पडत जातात. किंबहुना, हे प्रश्न भैरप्पांना पडले नाहीत का? आणि त्यांना उत्तरे देणे त्यांना महत्वाचे का वाटले नसावे? हा प्रश्न सतत पडत राहतो.

लक्ष्मण, वसिष्ठ, सीता, गुहराजा, सुमंत या सगळ्यांबरोबर राम ज्या वेळी चर्चा करतो तेव्हा तो सारासार विचार करणारा राजा न वाटता; एककल्ली, हेकेखोर आणि बेजबाबदार राजपुत्र वाटतो. आपल्या निर्णयांचा सीतेवर, लक्ष्मणावर, कौसल्येवर, दशरथावर काय परिणाम होईल त्याचा विचार तर सोडाच पण आपल्या निर्णयाचा प्रजेवर, राज्यावर काय परिणाम होईल याचाही विचार करू न शकणारा, प्रजेला भ्रष्टाचार करु शकणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हातात सोडणारा आणि प्रजेला साठेबाजीच्या व करचुकवेगिरीच्या सवयींकडे ढकलणारा राजा म्हणून समोर येतो. वनवासाहून परत आल्यावर तो अयोध्येच्या राज्यकारभाराची घडी पूर्ववत करू शकत नाही. ते करण्यासाठी भैरप्पा शेवटी लक्ष्मणालाच पुढे आणतात आणि राम एकांतवासात दु:खी आहे असं दाखवतात. त्याचा शेवटही एकाकी करून दाखवतात.

वडिलांचा शब्द खाली पडू नये आणि राज्यलोभी असा शिक्का आपल्यावर पडू नये म्हणून भैरप्पांचा राम अन्य सर्व आप्तस्वकीयांना, प्रजाजनांना आणि राज्याला ज्या गर्तेत ढकलतो ते बघून रामचरित्र वापरून सध्याच्या पंतप्रधानांच्या कठोर निर्णयांचं समर्थन करण्याचा भैरप्पांचा प्रयत्न असला तर तो किमान माझ्यासारख्या वाचकांपुरता तरी साफ फसला आहे.

रामकथा माझ्या जीवनाचा भाग आहे. लहानपणी अंधारातून जाताना वाटणारी भीती मी रामरक्षा म्हणत पळवून लावलेली आहे. अजूनही कधी देवळात गेलो तर 'ध्यात्वा नीलोत्पल श्यामं रामं राजीवलोचनं' अशी ती राममूर्ती पाहून माझे हात पूर्वसंस्कारामुळे आपोआप जोडले जातात. पण रामाच्या राजकीय आयुष्यातील कुठल्या भागाचा आदर्श सध्याच्या किंवा कुठल्याही काळातील राज्यकर्त्यांनी घ्यावा ? या प्रश्नाचं माझ्यासाठीच उत्तर तरी एकाही भागाचा आदर्श घेऊ नये असंच आहे. आणि भैरप्पांच्या उत्तरकांडाने ते अधोरेखित केलं आहे.

समाप्त