Saturday, April 11, 2020

हुकमी एक्का

सकाळी झाडू मारत होतो. बायको कौतुकाने माझ्याकडे बघत होती. आई माझ्याकडे काळजीयुक्त वात्सल्याने आणि कौतुकाने बघत होती. सासरे माझ्याकडे विजयी वात्सल्याने आणि स्वतःच्या लेकीकडे कौतुकाने बघत होते.

चार चाकं असलेलं काचेचं सेंटर टेबल मी जोरात सरकवलं. कडाडकड असा आवाज आला. घरातल्या दशदिशा दुमदुमल्या. सगळे चपापले. व्हिडिओ गेम खेळणारा धाकटा लेक दचकला आणि गेममधला त्याचा सैनिक गतप्राण झाला. व्हॉटस अॅपवर चॅटिंग करत असलेला मोठा लेकही दचकला. चुकून त्याने भलतीच स्मायली चॅटवर पाठवली असावी. कारण नंतर त्याच्या तोंडून चक् चक् असा विषाददर्शक उद्गार आला आणि एकाएकी त्याची फोनवरची धावपळ वाढली.

ज्याची भीती होती तेच झालं. माझ्या डौलदार सेंटर टेबलच्या चार चाकांपैकी एक चाक मोडून पडलं होतं. आणि शिवधनुष्य मोडून सीतेकडे प्रेमाने पहाणार्‍या विजयी रामाऐवजी, ते छातीवर पडलेल्या पराभूत रावणासारखा चेहरा करून उभा राहिलो. (रामायण बघण्याचे अप्रत्यक्ष फायदे होतात ते असे)

बायकोच्या चेहऱ्यावरील कौतुक मावळून तिथे क्रोधाग्नी प्रकटला. आईच्या चेहर्‍यावरील कौतुक मावळून तिथे काळजी आणि चिंतेने घर केलं. सासऱ्यांच्या चेहऱ्यावरील विजयी कौतुकाची भावना जाऊन तिथे 'तरी मला वाटलंच होतं की याच्यापेक्षा चांगला मुलगा मी माझ्या राजकुमारीला नवरा म्हणून शोधून दिला असता. पण काय करणार माझ्या छोट्या परीला हाच गडबड्या आवडला' असे भाव आले.

आणि एकाएकी मला जाणवलं की वॉशिंग मशीन, कपडे वाळत घालण्याच्या दोऱ्या वरखाली करुन देणं, भांडी घासणं, केर काढणं आणि लादी पुसणं यातल्या कित्येक कामांपासून सुटका करून घेण्याचा हुकमी एक्का माझ्या हाती लागला आहे. आता विजयी हास्य करायची पाळी माझी होती.

हरारी, कोरोना आणि कायद्याचा अर्थ

सकाळी अमेय गोखलेनी चॅनेल 4 या ब्रिटिश टिव्ही कंपनीच्या, एक आठवड्यापूर्वीच्या एका कार्यक्रमाची लिंक फेसबुकवर शेअर केली होती. कोरोनाच्या निमित्ताने युआल नोहा हरारींच्या मुलाखतीची ती लिंक होती. हरारींनी मांडलेले मुद्दे मला महत्वाचे वाटले. 



1) कोरोनाच्या काळात आपण कुठले निर्णय घेतो त्यावर आपलं पुढील जग कसं असेल ते ठरेल.
2) सध्या सर्व गोष्टींचा वेग अचानकपणे आत्यंतिक प्रमाणात वाढला आहे. ज्या गोष्टींवर वीस वीस वर्षे केवळ चर्चा होत होती त्या गोष्टी आता एकेका आठवड्यात अमलात आणल्या जात आहेत.
3) यातून बाहेर पडण्यासाठी सरकारे सर्वाधिकार आपल्याकडे घेऊ शकतात किंवा नागरिकांना अधिकार देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतात.
4) नागरी स्वातंत्र्याचा संकोच इतक्या सहजपणे करता आला आहे, तर सरकारे हे नियंत्रण सहजासहजी आणि चटकन सोडणार नाहीत.
5) अशा साथीच्या रोगात आपल्याला आवश्यक असलेलं जागतिक नेतृत्व आपल्याकडे नाही. आपल्याकडे उपलब्ध असलेलं नेतृत्व देशपातळीवरील आहे.
6) आताच्या देशपातळीवरील नेतृत्वाने कात टाकून जरी जागतिक जबाबदारी घेण्याचा प्रयत्न केला तरी इतर देशांना त्याबद्दल विश्वास वाटणार नाही. त्यामुळे जागतिक नेतृत्वाची आत्यंतिक गरज असूनही ते नजीकच्या भविष्यात उपलब्ध होणार नाही.
7)सर्व देशातील राजकीय नेतृत्व आपल्या संपूर्ण देशाचं नेतृत्व न करता त्यातील एका गटाचं नेतृत्व करतात. साधारण राजकीय आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी ही बहुमताची व्यवस्था कामाला येऊ शकते पण साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी बहुमताची नसून सर्वांच्या एकमताची गरज आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी आपला गट - विरोधी गट अशी मांडणी करणं थांबवलं पाहिजे.

मुलाखत संपवली आणि वर्गात गेलो. आज इंटरप्रिटेशन अॉफ स्टॅच्यूट्स (कायद्यांचा अर्थ कसा लावावा) हा विषय होता. त्यात एक महत्त्वाचा मुद्दा येतो की कायद्याचा अर्थ लावताना न्यायाधीशाने कायद्यात नसलेले शब्द किंवा कलमे स्वतः घालू नये आणि असलेले शब्द किंवा कलमे स्वतःहून गाळू नयेत. न्यायाधीशाचं काम दिलेल्या कायद्याचा अर्थ लावणं आहे, कायदा बनवणं नाही. कायदा बनवण्याचं काम संसदेचं आहे.

मुलांनी विचारलं, 'न्यायाधीशांनी जर न्यायशास्त्राचं शिक्षण घेतलेलं आहे तर ते निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींपेक्षा अधिक ज्ञानी आहेत. मग कायद्यातील त्रुटी दूर करण्याचं किंवा कायदा बनवण्याचं काम न्यायाधीशांना न देता, कायद्याची जुजबी किंवा काहीच माहिती नसलेल्या त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतलेल्या लोकप्रतिनिधींना का दिलं आहे?'

त्यांना उत्तर देताना म्हणालो,
'कायदा म्हणजे समाजाला वळण देण्याचं शास्त्र आहे. हे गणित किंवा भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा खगोलशास्त्राप्रमाणे नैसर्गिक विज्ञान नाही.

नैसर्गिक विज्ञानात बहुमत आणि तज्ज्ञ यांच्या तुलनेत बहुमतापेक्षा तज्ज्ञांचं पारडं कायम जड असतं. संपूर्ण मानवजात जरी पृथ्वीभोवती विश्व फिरत आहे असं म्हणत असली तरी पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी नसून ती सूर्याभोवती फिरते हे सांगणारा एकटा कोपर्निकस बरोबर असतो. म्हणजे नैसर्गिक शास्त्रात बहुमताकडे दुर्लक्ष केल्याने समाजाचं नुकसान होईलंच याची खात्री नसते; झालाच तर फायदा होणार असतो.

याउलट सामाजिक शास्त्रांत मागील परंपरांना वळण देत भविष्य साकारायचे असते. त्यामुळे मागील परंपरांना, चालीरीतींना. रितीरिवाजांना, मान्यतांना. धारणांना धक्का लावताना फार काळजी घ्यावी लागते. तशी घेतली नाही तर लोकांना कायदा पाळावासा वाटत नाही. तो कागदावरच रहातो परिणामी शेवटी संपूर्ण समाज कागदोपत्री गुन्हेगार ठरु शकतो आणि भ्रष्टाचाराला मोकळं कुरण मिळतं. त्यामुळे कायदा तयार करताना न्यायशास्त्रातील एका तज्ज्ञाऐवजी लोकांतून आलेली शंभर डोकी डोकी असतील तर अतिशय आदर्श पण सामाजिक वास्तवापासून दूर असलेली व्यवस्था न बनता कदाचित कमी आदर्श पण लोकांच्या धारणांतून तयार झालेली व्यवस्था बनू शकते. आणि अशी व्यवस्था जास्त प्रमाणात अंगिकारली जाऊ शकते. कालांतराने तिच्यात पुन्हा बदल करून तिला अजून आदर्शवत करता येऊ शकते.

म्हणजे सामाजिक शास्त्रांचा उद्देश नैसर्गिक सत्याची प्रतिष्ठापना नसून सामाजिक सलोख्यातून समाजोन्नती असा असतो. नैसर्गिक शास्त्रे सत्य प्रस्थापित करुन पुढे जात असतात. याउलट सामाजिक शास्त्रे सत्य पुढे ठेवून आता त्याला गाठण्यासाठी महामार्ग तयार करत असतात.

त्यामुळे सामाजिक शास्त्रांचे नियम बनवताना एका तज्ज्ञापेक्षा अनेक साधारण लोकांच्या मतांना जास्त किंमत असते.'

मुलांचं शंकानिरसन झालं. मी पुढे शिकवत राहिलो. पण सकाळी ऐकलेली हरारांची मुलाखत डोक्यात होती. त्यातला समाजातील बदलांची गती वाढण्याचा आणि एका गटाचं नेतृत्व करत संपूर्ण समाजावर आपली मतं लादणाऱ्या कोत्या नेतृत्वाचा मुद्दा, मी मुलांना दिलेल्या उत्तराबरोबर खेळू लागला.

आणि मनात विचार आला की भविष्यात व्यवस्था आणि नेतृत्व कसं असावं याचा निर्णय सामाजिक शास्त्रांचा भाग असूनही आता कदाचित तो नैसर्गिक शास्त्रांपणे बहुमताऐवजी तज्ज्ञांकडे सोपवणं अधिक योग्य ठरेल का?

भैरप्पांचं उत्तरकांड आणि माझं रामायण (भाग २)


रामकथा भारतीय उपखंडात पसरलेली आहे. वेगवेगळ्या प्रदेशात तिची वेगवेगळी रूपं दिसतात आणि लोककथांतही तिची अनेक उपकथानकं सापडतात. आता जरी मला आठवत नसलं तरी आई सांगते की लहानपणी रोज रात्री बाबांच्या मांडीवर झोपताना गोष्ट सांगायचा हट्ट करायचो आणि त्यात जेव्हा श्रावणबाळाची गोष्ट यायची तेव्हा हमखास रडत रडत झोपी जायचो. मला खात्री आहे की दूरदर्शन आणि मनोरंजनाची अन्य साधने नसलेल्या अनेक शतकांत भारतीय उपखंडातील अनेक पालकांना रामायणाने हात दिला आहे आणि आपापल्या लेकरांचा किंवा नातवंडांचा, गोष्टींचा हट्ट पुरा करण्यात मदत केली आहे. अर्थात यामुळे प्रत्येक घरात रामकथेत भर पडत गेली असावी.

जितकी प्रसिद्ध रामायणे आहेत आणि रामाच्या बाबतीत जितक्या लोककथा आहेत त्या सगळ्या वाचणं मला शक्य नाही. तसेच देशोदेशींच्या पुराणकथांत मला रस असला तरी त्यात माझा व्यासंग नाही. पण जितकं तोडकंमोडकं वाचन मी केलेलं आहे त्यावरून मला जाणवलं आहे की प्रत्येक समूहाच्या पुराणकथांतून त्या समूहाच्या मान्यतांचा आणि संकल्पनांचा अंतःप्रवाह वाहात असतो. आणि जसजशा त्या कथा लोकप्रिय होऊ लागतात तसतसे हे अंतःप्रवाह अजून ठळक होऊ लागतात.

नियती ही जागतिक संकल्पना आहे. त्यामुळे जगातील सर्व पुराणकथांत नियती आपलं अस्तित्व दाखवत असते. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील घटना या नियतीच्या अदृश्य धाग्याने बांधलेल्या असतात ही कल्पना आपल्याला अनाकलनीय आयुष्यात आधार देत असते. पण नियती ही शक्ती सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यातील सर्वसामान्य प्रसंगांना उलगडण्यासाठी इतरांपेक्षा अधिक समर्पकपणे केवळ भारतीय परंपरेने वापरली आहे. कारण आपण नियती नामक शक्तीला कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म या दोन चाकांवर चालणाऱ्या व्यवस्थेत बसवले आहे. त्यामुळे आपल्याकडे नियतीबरोबर प्राक्तन नावाची अजून एक संकल्पना तयार होते.

संस्कृती म्हणजे जीवनपद्धती मानली तर धर्म म्हणजे संस्कृती निर्माण करण्यारी व्यवस्था आहे असं मला वाटतं. धर्म साधारणपणे दोन प्रश्नांचं उत्तर देतो. 'एखादी गोष्ट अशी का घडली?' आणि 'कुणी कसं वागावं?'

पाश्चात्य जगात अनेक संस्कृती नांदत होत्या पण त्या सर्वांना मध्यपूर्वेत जन्म घेतलेल्या तीन अब्राहमिक धर्मानी गिळून टाकले आहे. त्यामुळे त्या मृत संस्कृतीतील पुराणकथांतून या दोन प्रश्नांची जी उत्तरे मिळतात ती आता निरुपयोगी ठरली आहेत. अब्राहमिक धर्मात 'एखादी गोष्ट अशी का घडली?' याचं उत्तर 'नियती किंवा परमेश्वराची इच्छा' असं दिलं जातं. तर 'कुणी कसं वागावं?' याचं उत्तर 'देवाबरोबर केलेला करार'असं दिलं जातं. त्यामुळे तुमच्या नियतीचे शिल्पकार तुम्ही नसता. तुमची नियती अशी का आहे? या प्रश्नालाही उत्तर कायम 'देवाची इच्छा' इतकंच असतं. प्राप्त नियतीला स्वीकारून तुम्ही कराराचं पालन करणं इतकंच तुमच्या हातात असतं. आणि तुम्ही ते व्यवस्थितरित्या केलेलं आहे की नाही याचा निर्णय अंतिम निवाड्याच्या दिवशी केला जाणार असतो.

या अंतःप्रवाहामुळे माणसे चांगली किंवा वाईट वागतात. अवतार वगैरेची भानगड नसते. माणूस आणि देव असा सरळसोट मामला असतो. माणसे देवाशी नवा करार करू शकतात. माणसे स्वतःला प्रेषित घोषित करू शकतात. आणि इतर माणसे त्याला खोटं ठरवू शकतात. अनेक तोतये प्रेषित तयार होतात. एखादा प्रेषित समाजमान्य व्हायला त्याची हयात उलटून जावी लागते. प्रेषिताला त्याच्या हयातीत विरोधकांकडून आणि अनुयायांकडूनही त्रास भोगावा लागतो. त्याचं कारणही परमेश्वराची इच्छा इतकंच असतं.

प्रेषिताला जे अनुयायी मिळालेले असतात त्यांच्या सामाजिक स्थानावरून प्रेषिताचा संदेश बहुसंख्यांना मान्य होणार की नाही ते ठरते. लोक जुना प्रेषित सोडून नवा प्रेषित घेऊ शकतात. जुन्या प्रेषिताला मानणारे आणि नव्या प्रेषिताला मानणारे अश्या अनेक सरळ रेषा समाजात तयार होतात. ग्रंथप्रामाण्य वाढते. प्रेषिताचं आयुष्य आदर्श मानल्यामुळे त्याच्यासारखं वागण्याची जबाबदारी इतरांवर येते. पण या सर्वांहून सर्वात महत्वाचं म्हणजे म्हणजे प्रेषिताच्या आयुष्यातील प्रसंगांची जबाबदारी प्रेषितांवर पडते. त्यामुळे ते प्रसंग जर सद्यकाळाशी सुसंगत असतील तर त्यांचा उदोउदो होत राहातो. आणि विसंगत असतील पण प्रचलित इतिहासातून त्यांना वगळणं अशक्य असेल तर त्यांचं दुबळं समर्थन केलं जातं किंवा मग त्याबद्दल मौन बाळगलं जातं. त्यामुळे प्रेषितांच्या मागे कदाचित थोड्या वेगळ्या रेषेत चालणाऱ्या लोकांचा समूह तयार होतो. पण प्रेषितापासून कितीही तिरक्या कोनात चालले तरी सगळे प्रेषितांच्या मागे चालणारे असतात. समांतर चालणारे कुणीच नाही.

याउलट भारतात मात्र एकाच वेळी अनेक संस्कृती नांदत होत्या आणि इथेच अनेक धर्मांचा जन्मही झाला. इथे जन्म झालेल्या प्रमुख धर्मांपैकी शीख धर्म सोडल्यास इतर प्रत्येक धर्माने या दोन प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न जरी वेगवेगळ्या प्रकारे केला असला तरी त्या सर्व धर्मात एक सूत्र समान दिसतं की त्यांनी 'एखादी गोष्ट अशी का घडली?' आणि 'कुणी कसं वागावं?' या दोन्ही प्रश्नांना एकत्र गुंफलं आहे. आत्मा न मानणारा बौद्ध धर्म असो किंवा आत्मा मानणारा जैन धर्म असो किंवा मग अनेकेश्वरवाद आणि आपापल्या पूर्वजपरंपरा जपणाऱ्या पुराणप्रिय लोकांचा इतरांनी नाव दिलेला हिंदू धर्म असो. या सर्वात पुनर्जन्म आणि कर्मसिद्धांत यांना नियतीबरोबर महत्व आहे.

त्यामुळे 'एखादी गोष्ट अशी का घडली?' याचं उत्तर नियती असलं तरी 'कुणी कसं वागावं?' याचं उत्तर मात्र 'या जन्मीच्या उत्तम कर्माचं फळ पुढील जन्मात मिळणार आहे.त्यामुळे पुढील जन्म हीनयोनीत न होता उत्तमयोनीत मिळावा आणि त्या जीवनात सर्व सुखे मिळावीत म्हणून तुम्हाला धर्म सांगेल त्या पद्धतीने वागणं आवश्यक होतं. या पद्धतीने तुम्ही या जीवनातील तुमच्या सुखदुःखांचे शिल्पकार नसलात तरी पुढील जन्मातील सुखदुःखांचे शिल्पकार असता. त्यामुळे तुमच्या पुनर्जन्मातील सुखदुःखाची जबाबदारी तुमच्या या जन्मातील कृत्यांवर सोपवून आपल्या भूमीत जन्माला आलेले तीनही प्रमुख धर्म मोकळे झालेले आहेत.

अश्या प्रकारच्या व्यवस्थेत प्रेषिताचा जन्म होण्याची गरजच संपून जाते. देवाशी करार करण्याचीही आवश्यकता नाही. मग आदर्श जीवन कसे जगावे ते सांगण्यासाठी जैन आणि बौद्ध धर्म सोडल्यास इतर भारतीय लोकांना मान्य असणाऱ्या, पूर्वजपरंपरा मानणाऱ्या लोकांच्या धर्मात पुरुषोत्तम स्वरूपात अवतार घेण्याची जबाबदारी प्रत्यक्ष देवावर येते. आणि मग अधर्माचा प्रभाव वाढू लागला की विविध युगात परमेश्वर अवतार घेतो.

परमेश्वराच्या त्या अवताराचे आयुष्य हा अनेकांसाठी आदर्श ठरते पण त्याचे अनुकरण करणे मात्र अपेक्षित नसते. जे प्रत्यक्ष परमेश्वराने अधर्माचा नायनाट करण्यासाठी घेतलेल्या अवतारात केलं ते आता मी करायची गरज नसते. मी आपला माझ्या पुढील जन्मातील सुखांची बेगमी करण्यात स्वतःला गुंगवून ठेवू शकतो. अश्या प्रकारे आदर्श आणि त्याला मानणारे यांची आयुष्ये एकमेकांना समांतर चालत राहतात. लोक देवाची आणि त्याची अवताराची पूजा करतात पण त्याचे अनुकरण करत नाहीत. त्याच्या गोष्टी पिढ्यानपिढ्या सांगत राहतात पण त्या कथाकथनाचा उद्देश मात्र केवळ भक्ती वाढावी, नम्रता अंगी यावी, आणि पूर्वजपरंपरा चालत राहावी इतकाच असतो.

या पूर्वजपरंपराअनुयायी धर्मात इथपर्यंत सर्व काही ठीक असतं. पण एकदा का अवतार संकल्पना आली की 'तूच आहेस तुझ्या पुढल्या जन्माचा शिल्पकार' या मान्यतेला सुरुंग लागतो. कारण या अवताराला त्याच्या आयुष्यात जे दुःख भोगावे लागते त्याचं कारण म्हणून त्याच्या पूर्वजन्मातील कृत्यांची कारणपरंपरा सांगता येत नाही. अवताराला पूर्वजन्म आणि पुनर्जन्म नसल्याने त्याला कर्मसिद्धांत लागू होत नाही. त्यामुळे मग अवताराला दुःख का भोगावं लागलं? आणि अवताराने चांगलं का वागावं? यांची उत्तरं देणं कठीण होऊन जातं.

'अवताराने चांगलं का वागावं?' यासाठी धर्मसंस्थापना असा उद्देश पुढे ठेवला की काम सोपं होतं. पण अवताराला दुःख का सहन करावं लागलं? या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण होऊन बसतं. म्हणून मग शाप संकल्पना वापरली जाते. मग श्रावणबाळ येतो. शब्दवेधी बाण येतो आणि शेवटी पुत्रवियोग येतो.

अश्या प्रकारे सर्वसामान्य माणसांचे प्राक्तन त्यांच्या पूर्वजन्मावरुन ठरते याउलट अवतारांचे प्राक्तन त्यांना किंवा त्यांच्या जवळच्यांना मिळालेल्या शापावरून ठरते.

अर्थात भारतीय पुराणकथांत आणि अब्राहमिक धर्मांच्या पुराणकथांत एक समान धागा असतो की, चरित्रनायकाच्या आयुष्यातील कथांचे पूर्ण कार्यकारणभाव दिले आणि त्यांच्या भावभावनांचे चित्रण केले तरी त्यांच्याबरोबरच्या लोकांचे भावविश्व् आणि त्यांची झालेली फरफट याबद्दल सर्व पुराणकथा मौन बाळगतात. त्यामुळे कौसल्या, लक्ष्मण, सीता, तारा, मंदोदरी, कुंभकर्ण, इंद्रजीत या सगळ्यांचे भावविश्व् आपल्यासमोर लोकप्रिय ग्रंथातून येत नाही. त्याचप्रमाणे येशूची आई मेरी किंवा पिता जोसेफ किंवा प्रेषित मुहम्मदांची अल्पवयीन पत्नी आयेषाचे भावविश्व् तितक्याच बारकाईने आपल्या समोर येत नाही. अब्राहमिक धर्मात ग्रंथप्रामाण्य असल्याने त्यात लोककथांना फार स्थान नाही. याउलट आपल्याकडे ग्रंथप्रामाण्य नसल्याने लोककथांनी अनेक प्रक्षेप मूळ कथेत घुसडले आहेत.

अब्राहमिक धर्मात प्रेषितांच्या हातून घडलेल्या चुकांबद्दलही परमेश्वराची इच्छा हे स्पष्टीकरण देता येते. प्राक्तनाची झंझट नसल्याने, प्रेषित प्रवृत्तीप्रवण असूनही ते नियतीशरण दाखवता येतात. पण अवतारी पुरुषांच्या आयुष्यातील चमत्कारांचे आवरण बाजूला काढून त्यांच्या आयुष्यातील कार्यकारणभाव उलगडणे अतिशय कर्मकठीण असते. कारण इथला समाज आता नियतीशरण आहे. प्राक्तन आता आपल्या नेणिवांचा भाग झालेले आहे. इथला समाज आपल्या पूर्वजन्मातील कर्मफळांना भोगण्यास तयार आहे. त्या समाजाचा आदर्श आता नियतीशरण दाखवावा की प्रवृत्तीप्रवण दाखवावा? ही मोठी गुंतागुंत आहे. त्याला प्रवृत्तीप्रवण दाखवणे आवश्यक आहे. कारण तो धर्मसंस्थापना करण्यासाठी आलेला आहे. पण त्याला नियतीशरण दाखवणे अशक्य आहे. शाप उ:शाप कल्पना वापरून आपण फारतर त्यांनी भोगलेल्या दु:खाचं स्पष्टीकरण देऊ शकतो. पण त्यांनी जवळच्या व्यक्तींवर आणि संपूर्ण समाजावर केलेल्या अन्यायाचं समर्थन करणं अशक्य असतं. म्हणून अवतारी पुरुषांचे सगळे वर्तन दैवी ठरवून आपण त्याला योग्यायोग्यतेच्या कसोट्या लावणं टाळतो.

अश्या वेळी जेव्हा भैरप्पा सीतेच्या दृष्टिकोनातून चमत्कार बाजूला करून रामकथा सांगायचा प्रयत्न करतात, आणि त्यांच्या डोळ्यासमोर सध्याचे सत्ताधारी असतात तेव्हा पूर्ण पुस्तक वाचताना अजून नवनवीन प्रश्न पडत जातात. किंबहुना, हे प्रश्न भैरप्पांना पडले नाहीत का? आणि त्यांना उत्तरे देणे त्यांना महत्वाचे का वाटले नसावे? हा प्रश्न सतत पडत राहतो.

लक्ष्मण, वसिष्ठ, सीता, गुहराजा, सुमंत या सगळ्यांबरोबर राम ज्या वेळी चर्चा करतो तेव्हा तो सारासार विचार करणारा राजा न वाटता; एककल्ली, हेकेखोर आणि बेजबाबदार राजपुत्र वाटतो. आपल्या निर्णयांचा सीतेवर, लक्ष्मणावर, कौसल्येवर, दशरथावर काय परिणाम होईल त्याचा विचार तर सोडाच पण आपल्या निर्णयाचा प्रजेवर, राज्यावर काय परिणाम होईल याचाही विचार करू न शकणारा, प्रजेला भ्रष्टाचार करु शकणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हातात सोडणारा आणि प्रजेला साठेबाजीच्या व करचुकवेगिरीच्या सवयींकडे ढकलणारा राजा म्हणून समोर येतो. वनवासाहून परत आल्यावर तो अयोध्येच्या राज्यकारभाराची घडी पूर्ववत करू शकत नाही. ते करण्यासाठी भैरप्पा शेवटी लक्ष्मणालाच पुढे आणतात आणि राम एकांतवासात दु:खी आहे असं दाखवतात. त्याचा शेवटही एकाकी करून दाखवतात.

वडिलांचा शब्द खाली पडू नये आणि राज्यलोभी असा शिक्का आपल्यावर पडू नये म्हणून भैरप्पांचा राम अन्य सर्व आप्तस्वकीयांना, प्रजाजनांना आणि राज्याला ज्या गर्तेत ढकलतो ते बघून रामचरित्र वापरून सध्याच्या पंतप्रधानांच्या कठोर निर्णयांचं समर्थन करण्याचा भैरप्पांचा प्रयत्न असला तर तो किमान माझ्यासारख्या वाचकांपुरता तरी साफ फसला आहे.

रामकथा माझ्या जीवनाचा भाग आहे. लहानपणी अंधारातून जाताना वाटणारी भीती मी रामरक्षा म्हणत पळवून लावलेली आहे. अजूनही कधी देवळात गेलो तर 'ध्यात्वा नीलोत्पल श्यामं रामं राजीवलोचनं' अशी ती राममूर्ती पाहून माझे हात पूर्वसंस्कारामुळे आपोआप जोडले जातात. पण रामाच्या राजकीय आयुष्यातील कुठल्या भागाचा आदर्श सध्याच्या किंवा कुठल्याही काळातील राज्यकर्त्यांनी घ्यावा ? या प्रश्नाचं माझ्यासाठीच उत्तर तरी एकाही भागाचा आदर्श घेऊ नये असंच आहे. आणि भैरप्पांच्या उत्तरकांडाने ते अधोरेखित केलं आहे.

समाप्त

भैरप्पांचं उत्तरकांड आणि माझं रामायण (भाग १)


लेक्चर संपवून बाहेर आलो. फेसबुकवर फेरफटका मारला. सरकारने रामायण सिरीयल पुन्हा दाखवायचं ठरवल्याचं कळलं. आणि लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.

दर रविवारी सकाळी कराटेच्या क्लासवरून लगबगीने घरी जायचं. कारण रामायणाचा एपिसोड बघायचा असायचा. ते 'सीता राम चरित अति पावन' सुरु होत असताना आम्ही चाळीच्या जवळपास पोहोचलेलो असू. घराघरातून त्या शीर्षक गीताचे सूर येऊ लागत आणि मग मी व माझा धाकटा भाऊ घराकडे अक्षरश: धाव घेत असू. दारासिंगचा हनुमान, हनुमान उडण्याचे स्पेशल इफेक्ट्स, रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेदी आधी पानाचं दुकान चालवत ही माहिती, विजय अरोराचा नाटकी इंद्रजीत आणि ती हवेतल्या हवेत होणारी बाणांची लढाई; सगळ्या गोष्टी आठवल्या. बालपणीचा काळ सुखाचा म्हणावं अश्या रम्य आठवणींच्या अवस्थेत काही क्षण गेले. आणि मग वीस जानेवारीला पुण्यात एस एल भैरप्पांच्या पुस्तकांच्या प्रकाशनाला गेलो होतो ते आठवलं.

कुठल्याही व्यक्तीबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात जे घडतं तेच भैरप्पांच्या बाबतीत माझ्या मनातही घडलं होतं. 'वंशवृक्ष' नंतर 'पर्व' नंतर 'माझं नाव भैरप्पा'' नंतर 'सार्थ' नंतर 'मंद्र असा प्रवास केल्याने माझा आवडता झालेला हा लेखक नंतर 'धर्मश्री', 'परिशोध', 'काठ' वाचताना थोडा रटाळ वाटू लागला. त्यांची स्त्रियांबद्दलची मतं आपल्याला पटत नाहीत हे जाणवू लागलं होतं. 'आवरण' वाचायच्या आधी अनंतमूर्तीची त्यांच्याबद्दलची आणि आवरण या पुस्तकाबद्दलची मतं वाचली होती. पण 'माझं नाव भैरप्पा', वाचलेलं असल्याने, आवरण पुस्तकाबद्दल ते न वाचताच एक सहानुभूतीचा कोपरा तयार झाला होता.

त्यानंतर जेव्हा आवरण वाचलं तेव्हा मात्र स्त्रियांप्रमाणेच इतिहासाबद्दलची भैरप्पांची मतं आपल्याला पटत नाहीत हे जाणवलं. तत्वज्ञानाचा अभ्यासक असलेला हा लेखक ज्या सहजतेने प्राचीन पुराणांवरील चमत्काराचं आवरण दूर करू शकतो त्याच सहजतेने अर्वाचीन इतिहासावर भाष्य करू शकेल हा माझा विश्वास डळमळीत झाला. भैरप्पा म्हणजे, 'स्वतःला दिसणारं सत्य आणि वाचक यामध्ये आपले पूर्वग्रह आणि आपले हेतू येणार नाहीत याची काळजी घेणारा लेखक', याऐवजी 'वाचकांना जे पटवायचं आहे त्याची समर्थपणे मांडणी करू शकणारा लेखक' असू शकतात ही शक्यता मी मान्य केली. त्यानंतर त्यांचं पारखा आणि तंतू वाचताना जरी सार्थ किंवा मंद्र इतकाच आनंददायी अनुभव आला तरी याही लेखकावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकत नाही आणि त्याचे पूर्वग्रह आपल्या नकळत आपण स्वीकारू नयेत याची जबाबदारी आपल्यावर आहे ही खूणगाठ मनाशी बांधून ठेवली होतीच.

'भैरप्पा शब्द प्रमाण' अशी आता जरी माझी अवस्था नसली, तरी या लेखकाने आपल्याला कित्येकदा अपरिमित आनंद दिलेला आहे हे मान्य असल्याने जेव्हा त्यांना त्यांच्याच पुस्तक प्रकाशनात प्रत्यक्ष बघायला मिळेल आणि त्या दिवशी कुठलंही लेक्चर नाही हे लक्षात आलं तेव्हा मी पुस्तक प्रकाशनाला जायचं निश्चित केलं.

दोन पुस्तकांचं प्रकाशन होतं. साक्षी आणि उत्तरकांड. मी साक्षी आधी वाचलं आणि त्याबद्दल मी याआधीच लिहिलं आहे. 



महाभारतावरील चमत्काराचं आवरण दूर करणारा हा लेखक रामायणावर लिहीत आहेत हे साधारणपणे दोनेक वर्षांपूर्वी कळलं होतं तेव्हाच माझं कुतूहल चाळवलं होतं. साक्षीबद्दल काहीच कल्पना नव्हती. असं असूनही उत्तरकांड आधी वाचायला न घेता मी आधी साक्षी वाचायला घेतलं त्याला कारण प्रकाशनसोहळा. या सोहोळ्यात शेवटी उत्सवमूर्ती बोलले. जेव्हा त्यांचा आवाज ऐकला, तेव्हा या माणसाचे शब्द आपण अनुवादित स्वरूपात केवळ वाचले होते आता त्याचा आवाज ऐकतो आहोत यामुळे माझे डोळे भरून आले होते. भैरप्पा चाळीस पंचेचाळीस मिनिटे बोलले. त्यातला बहुतेक भाग मी त्यांची पुस्तके आणि आत्मचरित्र वाचलेलं असल्याने मला परिचीत होता. नंतर जेव्हा ते साक्षी आणि उत्तरकांड यांच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल बोलले तेव्हा मात्र माझ्या भावविभोर अवस्थेत मिठाचा खडा पडल्यासारखं झालं.

'राम वनवासाला गेला. भरत राज्य करायला समर्थ नव्हता. त्यामुळे चौदा वर्षे अयोध्येत अनागोंदी माजली. समर्थ राजाच्या अनुपस्थितीमुळे लोक करभरणा चुकवू लागले. साठेबाजी करू लागले. राम जेव्हा वनवासाहून परतला तेव्हा त्याला या अनागोंदीतून मार्ग काढायचा असल्याने त्याने कठोर निर्णय अमलात आणायला सुरवात केली. त्यामुळे कर चुकवणारे व्यापारी आणि त्यांचे सहाय्यक अधिकारी यांना त्रास होऊ लागला. परिणामी त्यांनी रामाला बदनाम करायची मोहीम सुरु केली. पण राम तर निष्कलंक. त्याच्यावर चिखल कसा काय उडवणार?, म्हणून मग त्यांनी रामाचं चारित्र्यहनन करून त्याच्या कायद्यांबद्दल सामान्य जनतेत अप्रीती निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केले. म्हणून मग त्यांनी सीतेच्या चारित्र्यावर शंका घ्यायला सुरवात केली. म्हणजे सीतेच्या चारित्र्यावर शंका घेणारा सामान्य धोबी नव्हता तर तत्कालीन भ्रष्ट अधिकारी आणि व्यापारी यांनी ही कुजबुज मोहीम सुरु केली होती. त्यामुळे आपल्या निर्णयांच्या अंमलबजावणीत अडथळा येऊ नये आणि प्रजेत कायद्याचा धाक राहावा म्हणून प्रभू रामाने कठोर निर्णय घेऊन सीतेचा त्याग केला.' असं माझं आकलन आहे हे भैरप्पांच्या बोलण्याचं सार होतं.

मला ते पटत असतानाच भैरप्पा पुढे म्हणाले. 'आताही तसंच चालू आहे. जेव्हा शासक कडक असतो आणि भ्रष्टाचार करण्याच्या संधी कमी होत जातात तेव्हा समाजातील वाईट प्रवृत्तीचे लोक आणि भ्रष्ट अधिकारी त्या शासकाबद्दल कुजबुज मोहिमा राबवून त्याच्याबद्दल जनमानस कलुषित करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ आपल्या पंतप्रधानांनी निश्चलनीकरण किंवा अन्य कित्येक कठोर निर्णय घेतल्याने त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची फळी सक्रिय झाली आहे.' भैरप्पा पुढे बोलले असते परंतु व्यासपीठावरील अन्य निमंत्रितांनी त्यांना आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे याची जाणीव करून दिल्याने त्यांनी आवरतं घेतलं आणि उपस्थितांना पुस्तक वाचा अशी विनंती केली.

त्यांच्या त्या शेवटच्या वाक्यांमुळे त्यांच्या मनात प्राचीन कर्तव्यकठोर राम म्हणजे कुटुंबमोहापासून दूर असलेले सध्याचे आपले पंतप्रधान असावेत असा माझा ग्रह झाला. आणि प्रेक्षकांत बसलेल्या अनेकांनी ज्याप्रमाणे त्या वक्तव्याचं स्वागत केलं ते ऐकून बाकी सगळ्यांनाही तसंच वाटलं याबद्दल माझी खात्री झाली.

निश्चलनीकरण आणि जीएसटीच्या वेळी बँकर्स आणि सर्व्हिस टॅक्स ऑफिसर्स कश्या प्रकारे वागले हे माहीत असल्याने, आणि हे असं होईल याची पूर्वकल्पना शीर्षस्थ नेतृत्वाला आणि त्यांच्या सल्लागार मंडळाला अजिबात नसेल यावर माझा विश्वास बसणं अशक्य असल्याने उत्तरकांड वाचायचा माझा उत्साह अगदी मावळून गेला. २०१७च्या जानेवारीत कन्नड भाषेत प्रसिद्ध झालेलं पुस्तक लिहायला भैरप्पांनी कधी सुरवात केली हे मला निश्चित माहिती नसलं तरी हे पुस्तक लिहायला पर्व इतका मोठा काळ लागला नसेल हे मला बातम्यांवरून माहिती होतं. त्यामुळे आपल्या आवडत्या नेत्याला समर्थन देण्यासाठी भैरप्पांनी हे पुस्तक लिहिलं असावं हे मान्य करून मी थोडा खटटू झालो. कुणीही आपल्या लाडक्या नेत्याचं समर्थन करण्याला माझी ना नाही. पण ते प्रच्छन्न असावं असं माझं मत आहे. इतर लोक ज्याला साहित्यिक मूल्य आहे असं समजून वाचतील त्यात आपले हेतू मिसळू नयेत असंही माझं मत आहे. वाचणाऱ्याला माहिती असावं की आपण जे वाचतो आहेव ते नक्की काय आहे.

अर्थात माझ्या मताप्रमाणे भैरप्पांनी वागावं इतकं मोठं माझं कर्तृत्व नाही आणि अधिकारही नाही. त्यामुळे उत्तरकांड घरात आलं खरं पण ते वाचायचा उत्साह मावळला होता.

(क्रमशः)

रंगासाई सर आणि कोरोना

अकरावी ते तेरावी गणेश क्लासला जायचो. रंगासाई सर होते इकॉनॉमिक्स शिकवायला. ठाण्याला राहणारे रंगासाई सर केळकर कॉलेजात शिकवायचे आणि संध्याकाळी डोंबिवलीत गणेश क्लासमध्ये आमच्या डोक्यात इकॉनॉमिक्स भरायचा प्रयत्न करायचे. मराठी त्यांना येत नसावं आणि अकरावीच्या मुलांसमोर आपलं तोडकं मोडकं हिंदी वापरलं तर खिल्ली उडवायला या अर्धवट वयातील मुलांच्या हाती आयतं कोलीत दिल्यासारखं होईल हे त्यांना माहिती असावं त्यामुळे त्यांचं लेक्चर कायम दाक्षिणात्य हेल असलेल्या इंग्रजीत असायचं. सरांचा फोटो माझ्याकडे असण्याचं कारण नाही, त्यामुळे आता सरांची मूर्ती अंधूक आठवते. तामिळ सिनेमातील नासर नावाचा गुणी अभिनेता जसा दिसतो तसं माझ्या स्मृतीतील सरांचं चित्र आता दिसू लागलं आहे.

पूर्ण इंग्रजीत असलेल्या लेक्चरमुळे त्या काळच्या डोंबिवलीतील कॉमर्स शिकणाऱ्या मुलामुलींमध्ये सर लोकप्रिय होणं जरा कठीणच होतं. त्यात सरांचा विषय इकॉनॉमिक्स, जो तत्कालीन डोंबिवलतीलच काय पण आजही असंख्य भारतीयांच्या नावडीचा विषय आहे. त्यामुळे इतर विद्यार्थीप्रिय शिक्षकांच्या गराड्यात रंगासाई सर एकटे पडलेले असत. पण त्यामुळे त्यांच्या शिकवण्यावर परिणाम झाला नाही. आपला विषय ऐकण्यात फार रस नसलेल्या विद्यार्थ्यांसमोरही ते कायम नावाप्रमाणेच रंगात येऊन शिकवत. साधारणपणे 'कमी तिथे आम्ही' असा माझा स्वभाव लहानपणापासून असल्याने विद्यार्थीप्रिय नसलेल्या रंगासाई सरांकडे मी ओढला जाणं स्वाभाविक होतं. त्यामुळे मी त्यांच्या लेक्चरला जरा जास्त लक्ष द्यायचो. परिणामी इकॉनॉमिक्स हा विषय किमान थोड्या फार प्रमाणात का होईना पण डोक्यात शिरू लागला आणि मग त्याची गोडी लागली.

मग एकदा डोंबिवलीत एका पुस्तक प्रदर्शनात 'रॉबर्ट हेलब्रॉनर' यांच्या 'Worldly Philosophers' या पुस्तकाचा बाळ गाडगीळ यांनी 'अर्थशास्त्राचे शिल्पकार' या नावाने केलेला अनुवाद मिळाला. कमी कळत असलं तरी मित्रांसमोर स्टाईल मारायची म्हणून घेतलं आणि वाचायला सुरवात केली. त्यातलं चौथं प्रकरण वाचायला सुरवात करायला आणि लोकसंख्येचा सिद्धांत रंगासाई सरांनी शिकवायला एकच गाठ पडली. परिणामी इकॉनॉमिक्स आणि रंगासाई सरांवरच प्रेम वाढलं आणि ते अजूनही टिकून आहे.

१६९६ च्या सुमारास इंग्लंडमधील ग्रेगरी किंग नावाच्या एका नकाशा तज्ज्ञ आणि संख्याशास्त्रीने त्यावेळच्या उपलब्ध साधनांवरून इंग्लंडची लोकसंख्या किती असावी याचा अंदाज बांधला होता. साडेपाच दशलक्ष हा किंगचा अंदाज आश्चर्यकारकरीत्या सत्याजवळ जाणारा होता. पण किंग साहेबांना केवळ तत्कालीन लोकसंख्येत रस नव्हता तर ती लोकसंख्या किती वेगाने वाढेल याबद्दलही त्यांनी अंदाज बांधला होता. त्यांच्या अंदाजाप्रमाणे इंग्लंडची तत्कालीन लोकसंख्या दुप्पट व्हायला इसवीसन २३०० उजाडलं असतं आणि इसवीसन ३५००च्या आधी ती चौपट होऊ शकली नसती.

किंग साहेबांचा अंदाज हा तत्कालीन इंग्लंडातील समाजधुरिणांच्या चिंतेचा विषय होता. इंग्लंडची लोकसंख्या अतिशय कमी वेगाने वाढते आहे आणि इंग्लंडच्या साम्राज्याच्या शत्रूंची लोकसंख्या मात्र झपाट्याने वाढते आहे असे सर्वमान्य मत होते. परिणामी या शत्रू देशांकडून इंग्लंडच्या साम्राज्यावर हल्ले होणं वाढत जाणार आहे आणि शेवटी इंग्लंड हे महान राष्ट्र लयाला जाऊ शकतं अशी भीती प्रतिष्ठित लोकांच्या मनात होती. त्यात डॉ प्रिन्स नावाच्या एका संख्याशास्त्र्याने उपलब्ध पुराव्याने सिद्ध करून दाखवलं की इंग्लंडची लोकसंख्या ग्रेगरी किंगच्या काळापेक्षा चक्क तीस टक्क्याने कमी झाली होती. आता मात्र इंग्लंडमधील नेत्यांनी लोकसंख्येच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. लोकसंख्या घटल्याने देशाचा ऱ्हास होतो तर ती वाढल्याने देशाचा विकास होईल असा विचार उदयाला आला. आणि विल्यम पिट (यंगर) या तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधानाने चक्क गरिबांची लोकसंख्या वाढावी म्हणून गरिबांना लग्न करण्यासाठी आणि मुलं होण्यासाठी मदत देणारं "Poor Relief Bill" संसदेत आणलं होतं.

त्या वेळी इंग्लंडमध्ये अजून एक विचारवंत आणि मंत्री होता. त्याच नाव विल्यम गॉडविन. फ्रँकेस्टाईन लिहिणाऱ्या मेरी शेलीचा पिता आणि जगप्रसिद्ध कवी पी बी शेलीचा सासरा असणारा हा गॉडविन आपल्या अराजकवादी 'anarchist' (माझ्या मते खरं तर ते अराज्यवादी असायला हवं) बंडखोर विचारांसाठी प्रसिद्ध होता. त्याने 'पॉलिटिकल जस्टीस' या नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्यात त्याने इंग्लंडची लोकसंख्या वाढवण्याचे फायदे रंगवून सांगितले होते. भरपूर लोकसंख्या असेल. सगळ्यांना खाऊ पिऊ घालण्यासाठी उत्पादन करावं लागेल. परिणामी सगळ्यांना रोजगार मिळेल. युद्ध होणार नाहीत. राज्यसंस्था लयाला जाईल. लोक सुखी असतील. वगैरे मुद्दे त्याने सप्रमाण सिद्ध करून दाखवले होते. पुस्तक राज्यसंस्थेच्या विरोधी असलं तरी त्यात भविष्याबद्दल आशादायी चित्र रंगवल्याने त्यावर इंग्लंडमधील उच्च्भ्रू वर्तुळात भरपूर चर्चा होऊ लागली.

डेव्हिड ह्यूम आणि जीन रूसो यासारख्या विचारवंतांशी मैत्री असलेल्या डॅनियल माल्थस या प्रतिष्ठित गृहस्थालाही या पुस्तकातील प्रतिपादन पटलं. (अनेकजण या आडनावाचा उच्चार माल्थुस असा करतात. पण रंगसाई सर माल्थस म्हणायचे म्हणून मीही माल्थस म्हणतो.) तर डॅनियल माल्थस या पुस्तकाबद्दल आपल्या लाडक्या मुलाशी गप्पा मारू लागले. 

थॉमस माल्थस
फोटो सौजन्य : इंटरनेट 
केम्ब्रिज विद्यापीठात शिकलेला, लॅटिन आणि ग्रीक भाषेवर प्रभुत्व असलेला आणि गणितात रँग्लर असलेल्या या बुद्धिमान मुलाचं नाव होतं थॉमस माल्थस. पुढे १९२९ मध्ये जागतिक मंदीच्या काळात जॉन मेनार्ड केन्सने मांडलेली "general glut", सार्वजनिक उत्पादनातिरेक ही संकल्पनादेखील याच थॉमस माल्थसला जाणवली होती. पण तो त्याच्या काळाच्या इतका पुढे होता की त्या संकल्पनेचं काय करायचं ते त्याला आणि त्याच्या समकालीन विचारवंताना कळलं नाही. थॉमस माल्थसची थोरवी सांगण्यासाठी फक्त इतकंच सांगतो की ख्रिस्ती धर्मगुरू असलेल्या माल्थसबाबाच्या विचारांनी चार्ल्स डार्विनही प्रभावित झाला होता.

गॉडविनने पुस्तकात सांगितलेल्या मुद्द्यांचा वडिलांशी बोलताना प्रतिवाद करताना थॉमस माल्थसने जे मुद्दे मांडले त्यामुळे डॅनियल माल्थस इतके प्रभावित झाले की त्यांनी आपल्या मुलाला आपले विचार पुस्तकरूपाने प्रसिद्ध करायला सांगितले. त्यातून तयार झालेलं पुस्तक म्हणजे 'An Essay in to Principles of Population', लोकसंख्येच्या नियमांवरचा निबंध.

त्यानंतर थॉमस माल्थसने या निबंधाची सात संस्करणे काढली. प्रत्येक वेळी त्याने मागील संस्करणातील त्रुटी सुधारल्या किंवा निबंधावरील आक्षेपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. माल्थसने मांडलेले लोकसंख्यावाढीचे नियम थोडक्यात या प्रकारे सांगता येतील.

१) लोकसंख्या गुणाकार श्रेणीने वाढते. जेव्हा अनुकूल वातावरण मिळतं, तेव्हा मनुष्यप्राण्यांचं लैंगिक आचरण लोकसंख्या वाढीचं गुणोत्तर अतिशय वेगाने बदलवून टाकतं.

२) याउलट अन्नधान्य मात्र बेरीज श्रेणीने वाढतं

३) म्हणजे लोकसंख्या जर २ > १० > ५० > २५० > ७५० या पद्धतीने वाढत जात असेल तर अन्नधान्य मात्र २ > ५ > ८ > ११ > १४ या पद्धतीने वाढत जाते. परिणामी वाढत्या लोकसंख्येला पुरेसा अन्नपुरवठा मिळू शकत नाही.

४) मग या लोकसंख्या आणि अन्नपुरवठा यांच्या बिघडलेल्या समतोलाला पुन्हा ताळ्यावर आणण्याचं काम दोन नियंत्रक करतात.
पहिला म्हणजे पॉझिटिव्ह किंवा नैसर्गिक नियंत्रक. बिघडलेल्या असमतोलामुळे गरिबी, दैन्य, दुष्काळ, भूकबळी, रोगराई, युद्ध होतात आणि लोकसंख्या पूर्ववत होते.
किंवा मग दुसरा म्हणजे प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रतिबंधात्मक नियंत्रक म्हणजे माणसांनी घेतलेले निर्णय. यात लग्नाचं वय लांबवणे, संतती नियमन, ब्रह्मचर्यपालन, कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणं वगैरे बाबी येतात.
जो समाज हे प्रतिबंधात्मक उपाय करणार नाही त्याच्यावर निसर्ग आपले उपाय लागू करतो आणि शेवटी लोकसंख्येला ताळ्यावर आणतो.

५) जेव्हा सुबत्ता येते तेव्हा माणसे कुटुंबनियोजनाकडे दुर्लक्ष करतात परिणामी गुणाकारश्रेणीने लोकसंख्या वाढायला सुरवात होते. वाढत्या लोकसंख्येला कमी पडू नये म्हणून अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणली जाते. त्यामुळे अन्नधान्य मुबलक मिळू लागतं. परिणामी पुन्हा लोकसंख्या वाढू लागते. लोकसंख्येचा विस्फोटच होतो म्हणा ना. पण या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात जमीन वाढत नाही. परिणामी वाढलेल्या लोकसंख्येला पुरेल इतकं अन्न मिळत नाही. परिणामी लोकसंख्या एक आपत्ती बनते. आणि या आपत्तीत भरडले जातात ते सामाजिक उतरंडीतील तळागाळाचे लोक. त्यांच्याकडे अगोदरच संसाधनांचा तुटवडा असतो त्यामुळे ते अन्नधान्याच्या टंचाईच्या काळात टिकून राहण्यासाठी असमर्थ ठरतात. आणि ज्यांच्याकडे संसाधनांची विपुलता आहे किंवा ज्यांच्याकडे क्रयशक्ती आहे ते टिकाव धरतात. म्हणून सरकारने लोकसंख्यावाढीसाठी उत्तेजन देऊ नये. (डार्विन बाबामुळे आता सगळ्यांना माहिती झालेल्या हर्बर्ट स्पेन्सर यांच्या 'सर्वायवल ऑफ द फिटेस्ट' या संकल्पनेचं एक मूळ इथेही असावं असं मला वाटतं)

अश्या तऱ्हेने गॉडविनने रंगवलेलं लोकसंख्यावाढीतून आर्थिक सुबत्तेचं चित्र माल्थसने उध्वस्त केलं. माल्थसने मांडलेले मुद्दे इतके प्रभावी पण नकारात्मक होते की त्या काळात त्याने समाजधुरिणांवर दडपण आणलं. इतकंच काय पण हेलब्रॉनर यांनी आपल्या पुस्तकात माल्थसच्या प्रकरणाचं नावंही The Gloomy Presentiments of Parson Malthus and David Ricardo म्हणजे 'धर्मोपदेशक माल्थस व डेव्हिड रिकार्डोचं उदास विचारविश्व' असं दिलं आहे.

माल्थसच्या या लोकसंख्यावाढीच्या सिध्दांतावर भरपूर टीका झाली. तो कालबाह्य झाला आहे असं प्रतिपादन कित्येकदा केलं गेलं. जागतिकीकरण, शेतीत झालेल्या सुधारणा, शेतीचं औद्योगिकीकरण, हरितक्रांती आणि आता जीएम बीबियाणं यामुळे आपण माल्थसच्या काळापेक्षा कित्येकपट लोकसंख्या असूनही अन्नधान्याच्या तुटवड्यावर मात केली आहे. आता जर कुठे भूकबळी असतील तर ते अन्नधान्याच्या उत्पादनाच्या तुटवड्यामुळे नसून वितरणव्यवस्थेतील त्रुटींमुळे आहेत. असं असलं तरी हरितक्रांतीमागे किंवा भारतासारख्या विकसनशील देशांतील कुटुंबनियोजनाच्या कार्यक्रमांमागे वैचारिक भूमिका माल्थसच्या लोकसंख्येच्या सिध्दांतातील प्रतिबंधात्मक उपायांची होती हे अनेकांना पटेल.

आज जेव्हा कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात थैमान घालतो आहे तेव्हा यामुळे कराव्या लागणाऱ्या लॉक आऊटमधे सगळ्यात जास्त भरडले जाणार आहेत ते समाजातील आर्थिक उतरंडीतील सगळ्यात खालच्या थरातील लोक. ज्या ज्या देशात कोरोनामुळे आरोग्यव्यवस्थेवर अतिरिक्त बोजा पडला आहे किंवा पडणार आहे त्या त्या देशातील आर्थिक उच्चस्तरातील लोकांना उपचार करुन घेणं परवडतं आहे किंवा परवडणार आहे. अडकले आहेत किंवा अडकतील केवळ आर्थिक निम्नस्तरातील लोक.

आज जर माल्थस असता तर त्याने आपल्या निबंधाचं आठवं संस्करण केलं असतं आणि मुबलक अन्नधान्य उपलब्ध असूनही लोकसंख्या समतोल करण्याच्या निसर्गाच्या नियमांना शब्दबद्ध केलं असतं. आणि अशा परिस्थितीत सरकारची जबाबदारी ही आर्थिक दुर्बळ घटकांकडे अधिक लक्ष देण्याची आहे हे ठासून सांगितलं असतं.

लोकसंख्या वाढण्यासाठी प्रयत्न करु नका. वाढलेल्या लोकसंख्येवर नियंत्रण आणा. संसाधने केवळ मूठभर लोकांच्या हातात एकवटू देऊ नका आणि असलेल्या लोकसंख्येची क्रयशक्ती खालावू देऊ नका अन्यथा सार्वजनिक उत्पादनातिरेकामुळे येणाऱ्या आर्थिक मंदीला सामोरे जावे लागेल असंही त्याने समजावलं असतं.

आज संध्याकाळी बायकोमुलांबरोबर कोरोनाबद्दल बोलताना माल्थस आठवला. मग हेलब्रॉनरांच्या पुस्तकातील माल्थसवरचं प्रकरण पुन्हा चाळलं. तेव्हा रंगासाई सरांची आठवण आली.

चराचरात ईश्वर

भरपूर चालून हनुमान मंदिरापाशी आलो. सक्तीची सुट्टी असल्यामुळे की काय कोण जाणे पण मंदिरासमोरच्या तीनही चौथऱ्यांवर भरपूर गर्दी होती. सुडौल शरीराचे लोक व्यायाम करत होते. मलाही कधी नाही ते सूर्यनमस्कार घालायची इच्छा झाली.

मी एका चौथऱ्यावर चढलो आधीचे लोक बाजूला होऊन माझ्या विस्तीर्ण देहाला सूर्यनमस्कार घालायची जागा होईपर्यंत वाट पाहू लागलो. समोर 'हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी' सूर्याकडे तोंड करून उभे होते. माझ्या डोक्यात गाणं वाजू लागलं...

धन्य तुझी रामभक्ती दिव्य तुझी काया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
हादरली ही धरणी थरथरले आसमानं
एकमुखानं बोला बोला जयजय हनुमान

माझ्या मागे ते सफरचंदासारखं लाल गुलाबी पिवळसर सूर्यबिंब उगवताना मला जाणवत होतं.

माझ्या समोरच्या माणसाचा व्यायाम संपत आला होता. एकाएकी मनात विचार आला की कुठे तोंड करून सूर्यनमस्कार घालावेत? मारुतीरायाकडे तोंड केलं तर भगवान सहस्ररश्मीकडे पाठ होईल आणि सूर्यनारायणाकडे तोंड केलं तर अंजनीसुताकडे पाठ होईल. आणि मला चराचरात ईश्वर असणे म्हणजे काय ते जाणवलं.
मग या चराचरातील ईश्वराकडे पाठ नको म्हणून मी हात जोडून उभ्या उभ्या एक प्रदक्षिणा मारत सूर्यनारायण आणि पवनसुताला नमस्कार केला आणि माझ्यापुढच्या माणसाबरोबर चौथऱ्यावरून खाली उतरून घराच्या रस्त्याला लागलो.

माझ्या शरीरसाधनेत अध्यात्म हाच मोठा अडसर आहे, हेच खरं. नाहीतर आज भारताला एखादा मिस्टर युनिव्हर्स मिळाला असता.