Thursday, September 29, 2016

आस्तिक आणि नास्तिकचा सी-सॉ

आस्तिक आणि नास्तिक वाद भरपूर चालू असतात. माझ्या आस्तिक मित्रांना मी नास्तिक वाटतो पण माझ्या नास्तिक मित्रांना मी आस्तिक वाटतो.


मला वाटतं आस्तिक आणि नास्तिक हे माझ्या मनात सी-सॉ खेळणारे दोन खेळाडू आहेत. आणि मी कुणाचीही बाजू न घेता, कुणी जिंकावा असा विशेष प्रयत्न न करता ह्या दोघांनी चालवलेल्या खेळाचा आनंद घेणारा प्रेक्षक आहे. आई, बायको, मुलं, भाऊ, भावजय, पुतण्या आणि इतर जिवलग यांच्यापैकी कुणालाही बरं नसलं की डॉक्टरांचा सल्ला ऐकताना हळूच देवाला मनोभावे नमस्कार करतो. पण व्यवसायात नुकसान झालं की स्वतःला धारेवर धरतो. देवासाठी काही करत नाही पण माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांच्या भावनेसाठी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या समाधानासाठी भक्तिभावाने देवाला नमस्कार करतो. सासू सासरे बायको जेंव्हा मी पूजा करावी असा हट्ट धरतात तेंव्हा त्यांना मूर्खात काढत नाही आणि मुलं जेव्हा देवाच्या अस्तित्वाला प्रश्नचिन्ह लावणारी मतं मांडतात तेंव्हा त्यांना न ओरडता त्यांचं कौतुक करत भावनेला जपत नास्तिक कसं व्हायचं ते शिकवायचा प्रयत्न करतो. भविष्यात, जर माझ्या दोन्ही मुलांच्या कट्टर नास्तिक मित्रांना ते आस्तिक आणि कट्टर आस्तिक मित्रांना ते नास्तिक वाटले तर बहुतेक मी जिंकलेलो असेन. हे झालं वैयक्तिक.
सामाजिक पातळीवर देखील मला जगात हा सी-सॉ मोठ्या प्रमाणावर दिसतो. आस्तिक आणि नास्तिक इथे हमरीतुमरीवर येऊन खेळतात. ज्यांच्या बाजूला जास्त लोक असतात ती बाजू तात्पुरती जिंकते आणि मग दुसऱ्या बाजूचे लोक वाढले की ती बाजू जिंकते. आस्तिकांची संख्या वाढणे फार सोपे असते. लहान मुले जिज्ञासू असली तरी क्वचितच चिकित्सक स्वभावाची असतात. त्यामुळे लहान मुलाला नास्तिक बनवण्यापेक्षा आस्तिक बनवायला फार कमी कष्ट पडतात. असे झाल्याने आस्तिकांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत राहाते. त्यामुळे नास्तिकांना आपली संख्या वाढवण्यासाठी अधिक तीव्र आणि अधिक कठोर व्हावे लागते. त्यांचे काठिण्य मग देवापासून ते कर्मकांडापर्यंत आणि भक्तीपासून ते श्रद्धेपर्यंत सर्वांवर प्रहार करते. त्यांची तीव्रता वाढली की मनापासून आस्तिक असलेले लोक देवावर हवाला ठेवून, मसीहा किंवा अवताराची वाट पहात स्वस्थ बसतात. पण आर्थिक आणि राजकीय कारणांसाठी आस्तिक झालेले दिखाऊ आस्तिक मात्र अस्वस्थ होऊन नास्तिकांवर जोरदार हल्ला चढवतात. पुन्हा त्यांच्याकडे भाबड्या आस्तिकांचे प्रचंड संख्याबळ आणि त्यांच्या श्रद्धांचे नैतिक अधिष्ठान असते. हमरीतुमरी हाणामारी पर्यंत जाऊन पोहोचते.
माझ्या मते कट्टर आस्तिक किंवा कट्टर नास्तिक असण्याऐवजी आपण जर प्रत्येकाच्या मनात चाललेला हा आस्तिक नास्तिकाचा सी-सॉ उमजून त्यावर शेरेबाजी टाळू शकलो; हात का जोडलेस? देवाला नमस्कार का केला नाहीस? याचा जाब विचारत बसण्यापेक्षा हात जोडायची किंवा नमस्कार करावासा न वाटण्याची वेळ का आली असावी? ते समजून भावनांच्या या करामतीवर खूष होऊ शकलो; आस्तिक्याकडून नास्तिक्याकडे किंवा उलट दिशेने होणाऱ्या कुणाच्याही प्रवासाला सजगपणे पाहू शकलो, त्यात त्यांनी केलेल्या चुका टाळू शकलो आणि समाजाच्या आर्थिक आणि राजकीय बाजूला आस्तिक आणि नास्तिक या दोघांपासून दूर निरपेक्ष ठेऊ शकलो तर हमरी तुमरी बंद करून सी-सॉचा निसर्गाने चालू केलेला खेळ सोपा होईल आणि आपण आपली ऊर्जा अधिक महत्वाच्या गोष्टींकडे वळवू शकू. किंवा कदाचित वैयक्तिक पातळीवर चालणाऱ्या सी-सॉला मान्य केलं की सामाजिक पातळीवर चाललेला सी-सॉ समतोल राखू शकेल आणि आपण नवा खेळ शोधू शकू.
Medha Naikआणि श्रीनिकेत देशपांडे तुम्हा दोघांमुळे हे सुचलं.




Original Post by Medha Naik is as follows,


There are no absolutes for something so relative as a human life.
There are no rules for something so gentle as a heart.
Hugh Prather
My parents were god fearing people. Also very ritualistic. My mom recited the " vyankatesh stotra" every night before having dinner. As a kid I also remember being hungry and sleepy trying to convince her to have dinner first. I would sit on her lap half asleep till she finished her recitation. In sometime I had learnt it by heart. Summer holidays , every evening, at 7 pm we had to recite " manache shlok and ramraksha stotra ".
As a teenager, I rebelled. And the rituals were forgotten.
When my kids were born, I would recite them every evening. Without fail. Praying to the Almighty and asking him to bless them...
As teenagers, they rebelled. And the rituals forgotten.
After my dad, mom performed the Pooja every morning.
I was too caught up in my job, life , etc etc.
Now, mom has forgotten that she used to do so. Sometimes she does remember. Sometimes, she feels sad that she no longer can sit in front of her deities and pray.
Now, I light a diya before leaving the home. And some incense sticks for the fresh pleasant aroma.
She seems content. And relaxed....
I neither claim to be an atheist or a theist. Neither a ritualistic nor a non....
There are no absolutes for something so relative as a human life.

There are no rules for something so gentle as a heart.

मराठा मोर्चा, फेसबुक-व्हॉट्स ऍप आणि विखारी प्रचार


प्रभावी मूक मोर्चांची सुरवात करून देणाऱ्या मराठा समाजाचे अभिनंदन.


जे एन यु प्रकरणाच्या वेळी सात भागांची एक मालिका लिहिली होती त्यातील चौथ्या आणि पाचव्या भागात हे दोन परिच्छेद, भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बाबतीत लिहिलेले होते.
------
सबंध देशातील संपूर्ण जनता कायम एकाच दिशेने जात नव्हती. जसे आपण आज आहोत तसेच आपले आजोबा पणजोबा पण असतील. आपण आपले गुण काही आकाशातून घेऊन नाही आलो. ते ही या मातीच्या संस्कारांचे भाग आहेत. त्यामुळे आपले भव्य आणि क्षुद्र गुण आपल्या पूर्वजात देखील होते याची मला खात्री पटलेली आहे. आपल्या पूर्वजांपैकी काहींना ब्रिटीश राज्य मानवले असल्याने, ते जाऊ नये असे वाटत असेल, काही ते जाऊ नये म्हणून सक्रिय प्रयत्न करीत असतील, काही पूर्णपणे तटस्थ असतील, काही स्वातंत्र्याच्या कल्पनेने भारावून जाऊन क्रांतीकारी झाले असतील, तर काहींनी गांधीजींचा अहिंसेचा आणि असहकाराचा मार्ग आपलासा करून स्वातंत्र्य चळवळीत आपला खारीचा वाटा उचलला असेल. काहींना प्राचीन भारतीय संस्कृतीचे पुनरुत्थान करायचे असेल तर काहींना आधुनिक जगाच्या संकल्पनांना वापरून आपल्या या देशाचे हुकलेले प्रबोधनाचे युग प्रत्यक्षात आणायचे असेल.


कोणी देश अखंड रहावा म्हणून झटत होते. तर कोणी आपले संस्थान टिकावे म्हणून. कोणी स्वार्थाने अंध झाले होते तर कोणी परमार्थाने धुंद झाले होते. कोणी हक्क टिकवून ठेवण्याची पराकाष्ठा करत होते तर कोणी कर्तव्यपूर्तीसाठी झटत होते. कोणी उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नाने प्रेरित झाले होते तर कोणी गतकालीन संस्कृतीच्या महापुरुषांतून आणि पुराणपुरूषांतून आपली प्रेरणा घेऊन उभे रहात होते. खंडित राज्यांची परंपरा असलेला देश अखंड होत चालला होता. भारतमाता जन्म घेत होती, आपल्या अनेक लेकरांचे बळी घेऊन. परकीय शासकाशी अहिंसक लढा देणारी तिची लेकरं स्वकीयांशी मात्र हिंसक होऊन लढत होती. ज्याला सगळे स्वातंत्र्य म्हणतात आणि ज्याला मी स्वराज्य म्हणतो, ते आपण अहिंसेने मिळवू शकलो, तरी स्वदेश मिळवताना मात्र आपण प्रचंड हिंसेचा वापर केला. कुणी मारत होते तर कुणी मारले जात होते. प्रत्येकाला आपले वागणे योग्य वाटत होते. वैभवशाली प्राचीन संस्कृती आणि तितकेच उज्ज्वल भविष्य एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. त्या काळच्या घटनाक्रमांकडे बघताना, मला तर कायम भगवद्गीतेतल्या ११ व्या अध्यायातील वर्णन केलेले विश्वरूपदर्शनच आठवते.
------
आज मराठा समाजाने सुरवात करून दिलेले, नंतर अन्य समाजातून पाठिंबा मिळत असलेले, स्त्री-पुरुष, आबालवृद्ध, अल्पभूधारक - मोठे शेतकरी, पादचारी आणि स्कॉर्पिओधारक या सर्वांना सामावून घेणारे शांततापूर्ण मोर्चे बघताना मला पुन्हा त्या विश्वरूपाचे दर्शन झाले. आणि अजून एक जाणवले की स्वातंत्र्य लढ्याच्या काळात फेसबुक-व्हॉट्स ऍप नव्हते. त्यामुळे सातत्याने विस्कळीत होणाऱ्या स्वातंत्र्यलढ्याला पुन्हा पुन्हा मार्गावर आणणे त्याकाळच्या नेत्यांना थोडे कमी कठीण गेले असावे.


आपण नैतिक अधिष्ठान नसलेल्या नेत्यांच्या काळात जन्माला आलेल्यांची पिढी आहोत. आपण परकीय सरकारशी लढत नसून आपणंच निवडून दिलेल्या सरकारनी निवडणूकपूर्व काळात दिलेल्या वचनांच्या पूर्तीचा आग्रह धरण्यासाठी एकत्र येत आहोत. आपल्यापैकी अनेकांचे स्वतःच्या दैन्यावस्थेबद्दलचे आकलन अपूर्ण आहे. कशाचा अभिमान धरायचा आणि तो कधीपर्यंत धरायचा या बद्दल आपल्या सगळ्यांत मतभिन्नता आहे. देशबांधव असूनही आपल्या सगळ्यांच्या अस्मिता निरनिराळ्या आहेत. आणि कितीही नाकारले तरी आपण क्रौर्यातून मिळणाऱ्या आनंदाला आपल्या जीवनातून हद्दपार करू शकलेले नाही आहोत. आपल्या या मोर्चाला चेहरा म्हणून नेता नाही आहे. आपल्या मागण्या मोर्चागणिक थोड्याफार प्रमाणात बदलताना दिसत आहेत. यामुळे आपण जुन्या मागण्यांमधील अव्यवहार्य भाग सुधारित करून घेत असलो तरी त्यामुळे मोर्चाबद्दल स्वतःचे मत ठरवू न शकलेल्या लोकांना आपण गोंधळात पडत आहोत. यात भर म्हणून आपल्या हातात फेसबुक-व्हॉट्स ऍप आहे.


नजीकच्या भूतकाळात फेसबुक-व्हॉट्स ऍपवरून वणव्यासारखी पसरलेली एक क्रांती २०११ मध्ये इजिप्त मध्ये झाली होती. तिने खुर्चीवरील सरकारला हलवण्यात यश मिळवले. नंतर सैन्याचे अंतरिम सरकार आले. नंतर मुस्लिम ब्रदरहूड नावाच्या कट्टर धार्मिक पक्षाने तिथली सत्ता काबीज केली. शेवटी तिथे सर्व राजकीय पक्षांनी बहिष्कार घातलेल्या निवडणुकीत पूर्वाश्रमीचे लष्करप्रमुख, राष्ट्रप्रमुख म्हणून निवडून आलेले आहेत. लोकांच्या मागण्या काही पूर्ण झालेल्या नाहीत.


म्हणून इथे व्यक्त होताना डोके शांत ठेवणे आवश्यक आहे असे मला वाटते. आपल्या एकजुटीचा आणि शिस्तीचा धाक राज्यकर्त्यांना बसला आणि अस्मितेच्या आधारावर राजकारण करणे त्यांना थांबवायला लावून विकासाचे राजकारण करण्यास आपण जर त्यांना भाग पाडू शकलो तर मूक मोर्चाचा बुलंद आवाज सगळीकडे दुमदुमत राहील.

आपल्यापैकी कुणासाठीही मूक मोर्चा काढण्याच्या हक्काला विरोध करणे हा पर्यायच नाही. मूक मोर्चात सहभागी व्हायचे किंवा त्याला बाहेरून पाठिंबा द्यायचा किंवा त्यातील मागण्यांना विरोध करायचा ते ज्याने त्याने ठरवायचे पण मूक मोर्चावर तावातावाने बोलताना तोल ढळू द्यायचा नाही हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे.

पतंजली संस्था, बाबा रामदेव आणि जीन्स

Omkar Dabhadkar आणि श्रीनिकेत देशपांडे, माझा नफ्याला विरोध नाही. भारतीय माणसाने नफा कमावण्याला तर अजिबात नाही. नफा कमावताना नीतिमान माणसांकडून देखील कधी थोडी लांडी लबाडी केली जाते हे मला मान्य आहे. त्यामुळे रामदेव बाबाने नफा कमावण्यास माझा विरोध नाही. किमती स्वस्त आणि उत्तम दर्जा राखला तर, कुणीही, फेसबुकवर किंवा इथे तिथे काहीही लिहो तरी ते यापुढेही अनेक वर्ष नफा मिळवत राहतील हे मला समजते.
माझा असापण अंदाज आहे की, बाबांनी मल्टीनॅशनल कंपन्यांच्या ग्राहकांना आपल्याकडे वळविण्यात फार यश मिळविले नसून आतापर्यंत जो ग्राहक, ही उत्पादने वापरत नव्हता, तोही आता ही उत्पादने भरभरून वापरू लागला आहे. त्यामुळे रामदेवांनी बाजारपेठ वाढवली असेच मी सध्यातरी म्हणेन. आणि त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत.
माझे केवळ दोन आक्षेप आहेत. पहिला म्हणजे आपल्या व्यवसायाला - नफ्याच्या उद्देशाला, देशसेवेशी जोडण्याला. जर ते 'देशसेवा' शब्द वापरत असतील, तर कशाला देशसेवा म्हणायचे आणि देशसेवा ज्या विविध उत्पादनांमुळे होऊ शकते त्यात प्राधान्यक्रम कशाला द्यायचा याबाबत अनेक देशवासीयांची वेगवेगळी मते असू शकतात. आणि ती बाबा रामदेवांबरोबर जुळली नाहीत तर ते टीका करू शकतात. त्या टीकेला उत्तर "उत्तम दर्जा" हे होऊ शकत नाही. "हो आम्ही नफा कमावतो आणि त्या नफ्यातून देशसेवा करतो" ही भूमिका वेगळी आणि "माझी उत्पादने वापरा म्हणजे आपोआप तुमच्याकडून देशसेवा घडेल" ही भूमिका वेगळी. आपल्या देशात लोक तसेही देशासाठी काही करायला फार तयार होत नाहीत. मग त्यांना केवळ 'आमचे ग्राहक बना आपोआप देशसेवा होईल' अशी ग्वाही देऊन अजून निष्क्रिय करणे योग्य ठरेल काय?, ते येणार काळच ठरवेल.
नफा कमविणारी कंपनी आपले उद्दिष्ट समोर ठेवते. त्याला दाखवून भांडवल गोळा करते. गिऱ्हाईकाला टेबलाच्या पलीकडील बाजूला बसवते. त्याला स्वतःची जबाबदारी घेण्याची सक्ती करते. पण पतंजलीने आधी योगाभ्यास शिकवणारी धर्मादाय संस्था म्हणून लोकप्रिय झाल्यावर, मग आपली उत्पादने आधी आपल्या समर्थकांना विकल्यावर, नंतर आपली उत्पादन करणारी संस्था वेगळी करून तिचा चेहरा मात्र तोच ठेवला आहे. यात कुठलाही कायदा मोडला नसला तरी व्यवहाराचे एक मूलतत्व आहे की कुठल्याही करारात दोन्ही पक्षकारांपैकी कुणाचाही एकमेकांवर undue influence नसावा. हे तत्व इथे काही प्रमाणात मोडले गेले आहे असे मला वाटते. बाबा टेबलाच्या एका बाजूला आणि त्यांचा ग्राहक टेबलाच्या दुसऱ्या बाजूला दोघेही आपापल्या लाभासाठी विचार करत आहेत असे चित्र माझ्या मनात तयार न होता, ग्राहकाच्या बाजूला बाबा अध्यात्मिक आणि उदात्त भावनेने भारलेले संन्यासी ह्या रूपात बसून पुन्हा त्याला आपलीच नफ्याच्या उद्देशाने तयार झालेली उत्पादने विकत घेण्यास उद्युक्त करीत आहेत असेच चित्र मला दिसते.
तुम्हा दोघांना कदाचित माझे मत फार तात्विक वाटेल, पण संन्यासी जिचा चेहरा आहे त्या संस्थेकडून राजकीय जवळीक वापरणे आणि साधनशुचितेकडे दुर्लक्ष करणे, किमान मलातरी खटकते.
मी पतंजली संस्थेच्या व्यवस्थेचा/रचनेचा अभ्यास केला नाही आहे. पतंजली ही कंपनी कायद्याच्या कलम २५ अन्वये तयार केलेली कंपनी आहे का? तसे असेल तर तिचा नफा भागधारकांना वाटता येत नाही. आणि अनेकांच्या विरोधाची धार बोथट होऊ शकते. पण ती आपल्या पदाधिकाऱ्यांना अनिर्बंध पगार देऊ शकते. म्हणजे वेगळ्या मार्गाने नफ्याचे केंद्रीकरण होऊ शकते. आणि रामदेव बाबांच्या संस्थेत असे काही होणार नाही असे मानायला माझे मन तयार नाही. कदाचित बाबांना लाभाचे प्रलोभन नसेल, पण ज्यांनी त्यांना मदत केली त्यांना आणि जे त्यांच्या मदतीने राजकीय किंवा व्यावसायिक लाभार्थी ठरले त्यांच्या बाबतीत हे प्रलोभन किती जोरकस असेल हे समजायला जगाचा फार अनुभव असण्याची आवश्यकता नाही. त्याशिवाय बाबांना समाजाचे नेतृत्व करण्याची इच्छा दिसून येते. हे मला अजूनच खटकते. अंबानीने जिओ काढला. लोकांनी त्यावरही टीका केली. पण काही काळ जाऊ दे; बाबांच्या उत्पादनावर टीका करणे किंवा त्यात गैरव्यवहार झालेच तर त्यांचा तपास करणे ते उघडकीस आणणे हे सगळे अश्लाघ्य, अनैतिक, धर्मबाह्य आणि बेकायदेशीर देखील मानले जाऊ शकते. बाबांना न्यायालयात खेचणेंच अशक्य होईल आणि जर कुणी माईचा लाल ते करू शकलाच तर बाबांचे समर्थक त्या न्यायाला मानणार नाहीत. बाबा देखील, "या न्यायायलात मी दोषी ठरलो तरी जनतेच्या न्यायालयात मी निर्दोष आहेच अशी टिमकी वाजवून आपले व्यवहार बिनबोभाट पार पाडतील.
ही अतिशयोक्ती वाटली तर आसाराम बापूंचे, लालू प्रसादांचे, सैयद शहाबुद्दीन यांचे आणि सलमान खान यांचे उदाहरण पहा. मग तुम्हाला जाणवेल की मी तिळमात्रही अतिशयोक्ती करत नाही आहे.
इथेच माझा दुसरा आक्षेप सुरु होतो. तो आहे बाबांच्या संस्था उभारण्याच्या पद्धतीला आणि त्याला आपण सर्वजण देत असलेल्या मान्यतेला.
या देशाची घटना आपणच मान्य केली. आपणच घटनेद्वारे अनेक जुन्या कायद्यांना मान्य केले आणि अनेक नवीन कायदे तयार केले. आपला इंडियन काँट्रॅक्ट्स ऍक्ट तर १८७२ चा आहे. तो व्यापाराच्या मिषाने अख्ख्या जगावर राज्य करू शकलेल्या ब्रिटिशांचा आहे. ब्रिटिशांची पार्लमेंटरी लोकशाही आपण उचलली आहे. एव्हढे सगळे आपण त्यांचे घेतले, पण त्यांनी या सगळ्याच्या तळाशी ठेवलेले एक मूळ तत्व मात्र आपण घ्यायला विसरलो आहोत. ब्रिटिश कायदा "व्यक्ती कायम एकाच विचाराने भारलेली असते" हे अमान्य करतो. व्यक्ती वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या विचारांनी प्रेरित होते. म्हणून व्यक्ती आयुष्यात निरनिराळ्या टप्प्यांवर त्याच त्याच घटनांना सामोरी जात असताना वेगवेगळ्या तऱ्हेने वागते. जर व्यक्ती कायम बदलत असेल, परिवर्तनीय असेल, कधी धर्मनिहीत नफा, कधी अधर्माने कमावलेला नफा, कधी स्वार्थ, कधी परमार्थ, कधी तत्त्वनिष्ठा, कधी वैयक्तिक सुख यात जर व्यक्ती हिंदोळे घेत असतील तर मग व्यवहार कसे करायचे? या प्रश्नाला सोडवण्यासाठी त्यांनी मग संस्थांना अपरिवर्तनीय स्वरूप दिले.
व्यक्ती जन्माला येते. तिचा परीघ; स्वतः, पालक, नातेवाईक, शेजारी , मित्र असा वाढत जातो. मग ही व्यक्ती अनोळखी व्यक्तींशी देखील सुयोग्य पध्द्तीने वागू शकते. तिचे वागणे नियंत्रित आणि समाजमान्य राहावे म्हणून कायदे केले जातात. ज्यात शिक्षा असते पण शिक्षेच्या कालावधीत वर्तन चांगले असल्यास सूट देखील दिली जाते. ही व्यवस्था हळू हळू सामाजिकरित्या उत्क्रांत होत जाणाऱ्या नैसर्गिक व्यक्तींसाठी (individuals) साठी सुयोग्य आहे. पण संस्थांचे (artificial person) तसे नसते. त्या अपरिवर्तनीय राहणे आवश्यक असल्यामुळे त्या विशिष्ट उद्दिष्टांसाठीच चालू कराव्या लागतात, आणि ही उद्दिष्टे त्यांना जन्माला घालण्याआधी सांगावी लागतात. त्यात बदल करून चालत नाही. कारण संस्था जन्मतःच सामाजिक असतात. त्या टप्प्याटप्याने सामाजिक होत नाहीत. तसे करणे म्हणजे व्यापाराच्या व्यवस्थेला सुरुंग लावण्यासारखे आहे. आणि बाबा रामदेव यांनी जरी आधी एक धर्मादाय संस्था आणि मग व्यापार करणारी नफ्याची इच्छा धरणारी संस्था अश्या दोन वेगवेगळ्या संस्था स्थापन करून आपण कुठलाही कायदा मोडला नाही हे दाखवले असले तरी दोन्ही संस्थांचे व्यावहारिक नाव आणि दोन्हीमधली कार्यकारी व्यक्ती एकच असल्याने जरी या दोन संस्था असल्या तरी हा बाबा रामदेव या अस्थायी आणि परिवर्तनीय व्यक्तीच्या महत्वाकांक्षेचा विस्तार आहे. आणि त्याला संन्यासी, अध्यात्म यांचा मुलामा दिला गेला आहे. ज्यामुळे पुढे बाबा स्वतः किंवा त्यांचे उत्तराधिकारी स्वतःला कायद्याबाहेर ठेवू शकतील असे चित्र मला दिसते. बाबा तर परिवर्तनीय आहेतच पण त्यांच्या संस्थाही आपल्या नकळत परिवर्तनीय होण्यात वाकबगार आहेत. अश्या व्यक्ती आणि त्यांच्या संस्था केवळ दर्जेदार उत्पादने देतात म्हणून त्यांच्या काम करण्याच्या, पैसे उभारण्याच्या आणि जनतेवर प्रभाव टाकण्याच्या पद्धतीकडे आपण दुर्लक्ष केले तर आपण मेक इन इंडियाच्या तत्वाला हरताळ फासत आहोत. विदेशी गुंतवणूक केवळ करसवलत मिळते आहे म्हणून आली तर ती आपणच तयार केलेल्या आणि मान्य केलेल्या कायदाबाह्य राहू शकण्याच्या या भस्मासुराला आपलेसे करून पुन्हा मागल्या दाराने ईस्ट इंडिया कंपनी आणेल, आणि आपल्याला ते कळणार पण नाही.
आपण ब्रिटिशांचे राज्य नाकारले आहे पण त्यांचे व्यापाराला स्थैर्य देणारे नियम नाकारण्यात तोपर्यंत अर्थ नाही जोपर्यंत आपण अपरिवर्तनीय संस्था उभारण्याचा त्याहून अधिक चांगला मार्ग तयार करू शकत नाही.
आपली ताकद हीच आपली मर्यादा असते, या निष्कर्षावर माझा पूर्ण विश्वास आहे. बाबा रामदेवांची ताकद म्हणजे त्यांची धर्मादाय संस्था. तिथूनच त्यांनी नफा कमविणारी संस्था सुरु केली त्यामुळे नफ्याच्या उद्देशाने चालू झालेल्या संस्थेला त्यांच्या धर्मादाय संस्थेच्या ताकदीचा फायदा झाला आणि आता तीच त्यांची मर्यादा ठरवते आहे.

बिपीन राजन कुलकर्णी आणि Yogesh Damlé तुमच्या दोघांच्या पोस्टमुळे आणि त्यावरील कमेंटमुळे हे सुचले म्हणून तुम्हा दोघांनाही टॅग करतोय. त्रास झाल्यास नोटोफिकेशन बंद करून टाका. ;-)