Saturday, October 13, 2018

सारं काही परत येतं (भाग ४)

गोविंदला सोडून आणि गौतम बुद्धाचा निरोप घेऊन सिद्धार्थ जैतवनातून निघतो. ज्ञानियांचा गुरु भेटूनही आपण त्याला सोडून का चाललो आहोत? या प्रश्नावर विचार करताना त्याला जाणवतं की ब्राह्मण आणि श्रमण जीवनाचा त्याग करणे, बालमित्र भिक्षूसंघात प्रवेश करत असताना गुरूपदेश नाकारून तिथून निघून जाणे या सर्वामागे एकंच कारण होते. अहम्, त्याचे स्वरूप, त्याची लक्षणे जाणण्याची त्याची इच्छा होती. आणि यज्ञयाग, व्रत वैकल्ये, किंवा इंद्रियदमन यातून त्याला अहम् शी लपंडाव खेळता आला असला तरी ‘मी सिद्धार्थ आहे’ या जाणिवेपासून त्याची कायमस्वरूपी सुटका झालेली नव्हती. म्हणजे अहम् ला जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या सिद्धार्थला अजून सिद्धार्थची ओळख पटलेली नव्हती. त्याला जीव शिवाचे ऐक्य असते हा विचार माहीत होता पण त्यातील 'जीव असतो कसा?' याबद्दल काहीही माहिती नसल्यामुळे तो ते ऐक्य अनुभवू शकत नव्हता.

आधी विचारांच्या व परंपरांच्या सहाय्याने त्याने जिवाशिवाचे अद्वैत अनुभवायचा प्रयत्न केला होता. ते न साधल्यामुळे त्याने जीवाच्या सर्व ऐंद्रिय इच्छांचे दमन करून जीव नष्टप्राय करून पाहिला होता. परंतु या सर्व झटापटी स्वस्वरूप न ओळखता केल्यामुळेच तो अनिकेत अवस्थेत होता.

इथपर्यंत पोहोचल्यावर मग या अस्थिरतेतून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला दिसतो. स्वतःला अनुभवणे. जगाला अनुभवणे.

सत्य, विचारांच्या मागे किंवा भावनांच्या मागे कुठेतरी आत दडलेले नसून ते सर्वत्र आहे. 'जग माया आहे आणि इंद्रिये योगायोग आहेत असे मानणे' म्हणजे स्वतःची फसगत करून घेणे आहे. जर स्वतःचे सत्य स्वरूप जाणून घ्यायचे असेल तर जगणे नाकारून चालणार नाही. सर्व विचार, इच्छा, भावना आणि भौतिक जग म्हणजे स्वस्वरूपाच्या पुस्तकातील विरामचिन्हे आहेत. विरामचिन्हांचा तिरस्कार करत पुस्तक वाचणे आणि जीवनाला माया समजून जीवनविन्मुख होणे दोन्ही सारखेच निरुपयोगी आहे.

विचारांच्या या नव्या दिशेमुळे सिद्धार्थ आनंदित होतो आणि त्याचवेळी आपण असंग आहोत. आपल्याला आता कोणीही नातेवाईक, मित्र, श्रद्धा, वेष नाहीत हे जाणवून त्याला अथांग विश्वातील स्वतःच्या एकाकीपणाची जाणीव होते.

जग अनुभवण्यासाठी आता तो पुढे सरसावतो. निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा रंग, गंध, तापमान तो आसुसून अनुभवू लागतो. शिकारी प्राण्यांच्या आणि त्यांच्या भक्ष्यांच्या परस्परविरोधी जीवनेच्छेचा आवेग त्याला जाणवतो. आणि मग थकलेला सिद्धार्थ नदीकिनारी एका नावाड्याच्या खोपटात झोपी जातो. त्याला स्वप्न पडते. स्वप्नात त्याचा बालमित्र गोविंद दिसतो. सिद्धार्थ त्याला एकटा सोडून गेल्यामुळे तो दु:खी आहे असे सिद्धार्थला दिसते. सिद्धार्थ त्याला स्वप्नातच मिठीत घेतो, प्रेमाने त्याचे चुंबन घेतो. आणि त्याला गोविंदाच्या जागी एक स्त्री आहे असे जाणवते. स्वप्नात सिद्धार्थला पहिला स्रीस्पर्श घडतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी नगाराकडे जाण्यास निघालेला सिद्धार्थ नावाड्याच्या मदतीने नदी पार करतो. त्यावेळी त्याला नदी फार सुंदर भासते. आणि नावडीही त्याला दुजोरा देतो. 'नदी आपल्याशी बोलते. तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखे असते', असे नावाडी सिद्धार्थला सांगतो.

सिद्धार्थ नगरात जातो. आणि त्याचे लौकिक जीवन सुरु होते. (आतापर्यंत लहान लहान प्रसंगात मोठमोठ्या घटना सांगून गोष्टीला वेग देणारा लेखक आता मात्र गोष्टीचा वेग कमी करतो.) सिद्धार्थचे लौकिक जीवन हेसेंनी मोठ्या बारकाईने रंगवले आहे. नावाड्याला द्यायला पैसे नसलेल्या सिद्धार्थची नगरात पहिली भेट होते नगरवधू असलेल्या कमलेबरोबर. तिच्याकडून प्रेमदीक्षा मिळवतो. तिच्याच ओळखीने नगरातील धनाढ्य व्यापारी असलेल्या कामस्वामींचा भागीदार बनतो. त्याच्या हातात पैसा खेळू लागतो. तरीही त्याच्यासाठी पैसा हे साध्य नसून साधन असते. गोरगरीबांना पैसे देण्यात तो हात कधीही आखडता घेत नाही. त्याच्या बेहिशोबी वागण्यामुळे कामस्वामी गोंधळतो पण सिद्धार्थ लोकांच्या प्रेमादरास पात्र होतो. जीवनाचा आनंद घेत असलेल्या सिद्धार्थला लोकांच्या व्यवहाराची मोठी मौज वाटत असते. त्याच्यासाठी व्यापार, व्यवहार म्हणजे जणू खेळ असतो. इतरांना बेहिशोबी आणि बेभान वाटावे अशा आवेगाने तो हा खेळ खेळत असतो.

सिद्धार्थच्या जीवनातील हा भाग वाचताना कुणीही गुंगून जाईल इतक्या तपशीलाने तो लेखकाने रंगवलेला आहे. पण यातील काही वाक्ये माझ्या मनात घर करून राहिली आहेत.

‘तुला काय येतं?’ या कमलेच्या प्रश्नावर सिद्धार्थ म्हणतो ‘मी वाट पाहू शकतो. मला चिंतन करता येतं आणि मला उपास करता येतो.’

आणि रतिसुखाचा आवेग ओसरल्यावर जेव्हा कमला सिद्धार्थला उद्देशून म्हणते ‘तुमचं कुणावरंच खरं प्रेम नाही’. तेव्हा सिद्धार्थ म्हणतो, ‘तू ही प्रेम करू शकत नाहीस. करू शकत असतीस तर तुला कलावंतीण होता आलं नसतं. सामान्य माणसं प्रेम करू शकतात हेच त्यांच्या जीवनाचं रहस्य आहे.’

ही वाक्ये वाचनाच्या ओघात जेव्हा येतात तेव्हा वाचकाला दणदणीत धक्के देऊन जागं करतात. मला त्या धक्क्यांमध्ये अजून गोष्ट दिसली की अहम् च्या शोधात जीवनसन्मुख झालेला सिद्धार्थ अजूनही अहम् चं स्वरूप ओळखू शकलेला नाही; हेच लेखक आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो आहे.

सिद्धार्थचं व्यवहाराकडे खेळ म्हणून पाहणं. सामान्य लोकांच्या जीवनेच्छेचं त्याला कौतुक वाटणं, कमलेबरोबर प्रेमरंग खेळताना त्याकडेही खेळ म्हणून पाहणं आणि सामान्यांना प्रेम करता येतं हेच त्यांचं जीवनरहस्य आहे हे कबूल करणं; यातून लेखक आपल्याला एकंच मुद्दा सांगत असतो की अहम् चं स्वरुप जाणून घेण्यासाठी जीवनसन्मुख झालेला सिद्धार्थ कर्माला खेळ समजत असल्याने, 'मी सिध्दार्थ आहे' या भावनेपासून त्याची सुटका न झाल्याने त्याचा प्रवास अजून संपलेला नाही.

No comments:

Post a Comment