Thursday, March 8, 2018

गुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग २)

-----
----

सगळ्यात प्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो. सध्या गाजत असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याशी संबंधित व्यक्ती मारवाडी नाहीत. पण अनेकांचा समज आहे की त्या व्यक्ती मारवाडी आहेत.

असा समज होण्याचे कारण गुजराथ आणि राजस्थान ही राज्ये स्वतंत्र भारतात जरी वेगळी असली तरी अनेक भारतीयांच्या दृष्टीने ती एकत्र आहेत. जसे दक्षिणेकडच्या सगळ्या लोकांना अनेक भारतीय मद्रासी समजतात आणि ईशान्येकडच्या राज्यांतील आसामी, मणिपुरी, नागा, मेघालयी आणि अरुणाचली लोक इतर बहुसंख्य भारतीयांना सारखेच वाटतात. तसेच गुजराथी आणि मारवाडी लोक अनेकांना सारखेच वाटतात. त्याशिवाय या दोन्ही प्रदेशातील प्रचलित भाषा एकाच कुळातील आहेत. या दोन्ही प्रदेशात जैन धर्माचा प्रभाव आहे. या दोन्ही प्रदेशातील अनेक लोक नोकरीपेशा किंवा कलोपासना किंवा मुलुखगिरीसाठी फार प्रसिद्ध नसून व्यापार उदिमासाठी प्रसिद्ध आहेत. व्यवसायाचे हिशोब ठेवण्याची स्वतःची अशी वेगळी पद्धत (हिला पर्था किंवा परता असं म्हणतात) या प्रदेशात विकसित करण्यात आली होती. दोन्ही प्रदेशातील लोक आपापल्या व्यावसायिकांचे गट करण्यात आणि त्या गटांत इतरांना सहजासहजी सामील न करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. दोन्ही प्रदेशातील व्यावसायिक एकत्र कुटुंब पद्धतीची व्यवस्था अजूनही मोठ्या प्रमाणावर वापरतात. त्यामुळे गुजराथी, कच्छी, राजस्थानी, मारवाडी यात पोटभेद असले आणि प्रत्येक समूहाची गुणवैशिष्ट्ये वेगवेगळी असली तरी बहुसंख्य भारतीयांच्या दृष्टीने गुजराथी हिंदू, गुजराथी जैन, मारवाडी हिंदू, मारवाडी जैन, किंवा कच्छी समाज यांच्यात फार फरक नाही.

मारवाडी समाजाबद्दल विचार करताना माझ्या डोक्यात ज्यू लोकांचा विचार येण्याचे एकमेव कारण होते बँकिंग. ज्यू हा धर्म आहे आणि मारवाडी हा धर्म नाही हे मला माहिती आहे. ज्यू लोक बँकिंगमध्ये येण्याचे प्रमुख कारण इतर संधींचा अभाव हे होते याउलट मारवाडी लोक बँकिंगमध्ये येण्यामागे असे कुठलेही कारण नव्हते.

किंबहुना जगत सेठ सारखी मारवाडी पेढी मुघलांना पैसा पुरवत होती. प्लासीच्या लढाईत ब्रिटिशांना जगत सेठ पेढीची मदत मिळाली होती. पुढे ताराचंद घनश्यामदास सारखी मारवाडी पेढी; लोकर आणि अफूचा व्यापार, ठोक व्यापार, अंगडिया सेवा, कर्ज, ठेवी, इन्शुरन्स, हुंडी सारख्या विविध सेवा पुरवून एखाद्या युरोपियन बहुराष्ट्रीय कंपनीसारखी बलाढ्य कंपनी झाली होती. आजच्या बिर्ला, मित्तल आणि सिंघानिया घराण्यांचे पूर्वज याच ताराचंद घनश्यामदासमध्ये तयार झाले होते. आणि स्वातंत्र्यलढ्यात त्यांची सहानुभूती व सहकार्य काँग्रेसला होते.

१९५६ च्या भाषावार प्रांतरचनेच्या योजनेला भारतभर पसरलेल्या मारवाड्यांचा विरोध होता आणि त्याकाळात त्यांनी अनेक प्रादेशिक वर्तमानपत्रे विकत घेऊन त्यावर आपली पकड बसवली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र मारवाडी लोकांनी बँकिंगऐवजी आणि व्यापाराऐवजी उत्पादनक्षेत्रात लक्ष घातले. त्या काळात भारतात उत्पादन क्षेत्रात दोन समाजांनी पैसा ओतला. एक म्हणजे पारशी आणि दुसरा म्हणजे मारवाडी. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९९१ च्या उदारीकरणाच्या काळापर्यंत मारवाड्यांनी जवळपास २५% उत्पादनक्षेत्र काबीज केलेले होते. आता डिजिटल क्षेत्रातही ऑनलाईन व्यापारात मारवाडी लोक पुढे आहेत. म्हणजे मूळ व्यापार, मग बँकिंग पेढी, त्यातून राजा महाराजांना कर्ज पुरवठा, मग त्या जोडीने व्यापार,मग बँकिंगच्या उद्योगातून काढता पाय घेऊन उत्पादन आणि मिडीया आणि आता पुन्हा ऑनलाईन व्यापार अश्या विविध क्षेत्रात मारवाडी समाजाने बस्तान बसवले.

इतके असूनही लेबले लावण्याच्या भारतीय समाजाच्या सवयीत; मराठी म्हणजे डोक्यात राख घालून घेणारे, दक्षिण भारतीय म्हणजे नियमांच्या बाबतीत कट्टर, पंजाबी म्हणजे दिलखुलास असे करता करता मारवाडी म्हणजे कंजूष असे लेबल चटकन लागते. याच्यामागचे कारण काय असावे? याचा विचार करताना मला खालील गोष्टी जाणवल्या.

मुळात राजस्थान, नेपाळ आणि कलकत्ता याठिकाणी एकवटलेला हा समाज, ब्रिटिश आमदानीत भारतभर पसरला. मोठया पेढ्यांच्या धर्तीवर अनेक मारवाडी कुटुंबे ब्रिटिश आमदनीत सावकारी धंद्यात शिरली. हिशोब ठेवण्याच्या त्यांच्या पर्था (किंवा परता) पद्धतीमुळे, चक्रवाढ व्याजावर कायदेशीर नियंत्रण नसल्यामुळे आणि कर्जवसुलीसाठी विशिष्ट नियम नसल्यामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ होत गेली. आणि छोट्या खेड्यातील सर्वसामान्य भारतीयांना पैशाला चोख असणारा मारवाडी माणूस दिसला. ज्याच्या उद्योगासाठी पैसा हीच वस्तू आहे त्याने हिशोबाला पक्के राहणे आवश्यक आहे. याला कुणी चिकट म्हणेल किंवा कुणी स्वार्थी पण मला यात काही वावगे दिसत नाही. किंबहुना जो समाज स्वार्थी नसतो तो आपल्या उत्कर्षासाठी इतरांवर अवलंबून असतो. मारवाड्यांच्या बाबतीत एक नक्की झालं की जितक्या चटकन ते युरोपियनांनी आणलेल्या बाजाराच्या व्यवस्थेशी एकरूप होऊ शकले आणि आपल्या एकत्र कुटुंब पद्धतीत त्या व्यवस्थेला रुजवू शकले तितक्या वेगाने इतर कुठलाही भारतीय समाज बाजार व्यवस्थेशी एकरूप होऊ शकला नाही. त्यामुळे या समाजातील उद्यमी आणि क्षुद्रबुद्धी अश्या दोन्ही प्रकारच्या लोकांना भारतात मोकळं रान मिळालं. आणि न्यून ते पुरते अधिक ते सरते या न्यायाने मारवाडी समाज चिकूपणाबद्दल, कंजूषपणाबद्दल बदनाम झाला.

असे असूनही त्यांच्याबद्दल संपूर्ण भारतात रोष का निर्माण होत नाही? ह्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळल्यावर मला जाणवले की,

जसा मारवाडी समाज आहे तसेच भारतात इतर अनेक समाज आहेत. मग तो आगरी असो, कोळी असो, शेट्टी असो वा अजून कोणी. आणि या प्रत्येक समाजाला मारवाडी समाजाच्या व्यवसायाच्या मॉडेलचे कौतुक असते, मारवाडी समाजाला नावे ठेवणारे सर्वजण आपल्या समाजात तशी एकी नाही, एकमेकांना सांभाळून घेण्याची तशी कुवत नाही याबद्दल मनोमन हळहळत असतात. म्हणजे तशी संधी निर्माण झाल्यास आज मारवाडी नसलेले सर्वजण व्यवसायाचे मारवाडी मॉडेल वापरण्यास मनोमन तयार असतात. त्यामुळे भारतीयांना मारवाड्यांबद्दल असूया वाटली तरी द्वेष वाटत नाही.

आणि त्याचमुळे मारवाडी भ्रष्ट आहेत, स्वार्थी आहेत, त्यांची निष्ठा पैशाशी आहे हे सर्व आरोप मला बिन बुडाचे वाटतात. जर तसे असेल तर ती बहुसंख्य भारतीयांची प्रवृत्ती आहे. आणि तिचे कारण कुणी मारवाडी असणे किंवा नसणे नसून आपल्या समाजाच्या पापपुण्याच्या धारणेत आहे असे मला वाटते.

अब्राहमिक धर्मात देवाशी केलेला करार आणि अंतिम न्यायाचा दिवस या दोन गोष्टींमुळे माणसाला आपण कुणाला तरी आपल्या वर्तणुकीबाबत उत्तर देण्यास बांधील आहोत असे वाटते. त्यामुळे पाप पुण्याच्या संकल्पना फिकट असल्या तरी

समाजव्यवहारावर सामाजिक कायद्यांचे आणि देवाशी केलेलया कराराचे नियंत्रण रहाते. जो नियमबाह्य वर्तन करेल त्याला शिक्षा व्हावी अशी इच्छा स्वाभाविक ठरते.

याउलट प्रमुख भारतीय धर्म; यात हिंदू, जैन, बौद्ध व शीख सगळे आले. या सर्व धर्मात देवाशी करार नाही. अंतिम न्यायाचा दिवस नाही. या दोन्हीच्या ऐवजी आपल्याकडे पुनर्जन्म ही कल्पना आहे. आणि या जन्मातील पापांची शिक्षा किंवा पुण्याचे फळ पुढील जन्मात मिळण्याची सोय आहे. त्यामुळे नियमबाह्य वर्तनाला तात्काळ शिक्षा व्हावी अशी कुणाला इच्छादेखील होत नाही. किंबहुना दानधर्म, भूतदया, देवभक्ती करून आपण केलेल्या पापाचे प्रायश्चित्त याच जन्मी घेणे आणि पुढील जन्मातील शिक्षेचे पारडे हलके करणे आपल्या धार्मिक धारणांना मान्य आहे. म्हणजे पूर्णपणे वेगळ्या धार्मिक धारणांशी बांधील असलेल्या आपल्या समाजावर आपण अब्राहमिक धर्माशी बांधील अशा धारणांवर आधारित कायदे लादण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्यामुळे भ्रष्टाचार, स्वार्थ यांचे भारतीय अर्थ इतर समाजांपेक्षा वेगळे ठरतात. आणि आपल्यापैकी अनेकांना मारवाडी समाजाबद्दल असूया असूनही त्यांच्याबद्दल द्वेष वाटत नाही.

याचाच अर्थ एखादी जादूची काडी फिरली आणि भारतातील मारवाडी समाज एका रात्रीत बदलला तरी त्यांच्या जागी येणारा दुसरा समाज तीच गुणवैशिष्ट्ये धारण करेल. युरोपियनांनी आणलेली बाजारव्यवस्था जर मारवाडी समाजाआधी कोकणस्थ ब्राह्मण, किंवा शहाण्णव कुळी मराठा किंवा दलित किंवा फासेपारधी किंवा नंबुद्री किंवा नागा लोकांना इतर भारतीयांपेक्षा जास्त लवकर आत्मसात करता आली असती तर तेही मारवाड्यांसारखेच वागले असते आणि आपण त्यांच्याबद्दल असूयाग्रस्त झालो असतो. आणि आज जसे आपल्याला अनेक घोटाळ्यात एका समाजाचे लोक दिसून येतात तसे दुसऱ्या समाजाचे लोक दिसून आले असते.

म्हणजे ही स्थिती काळापुढे धावण्याच्या केवळ गुजराथ्यांच्या किंवा मारवाड्यांच्या वृत्तीमुळे येत नसून इतर सर्व समाजांच्या काळामागे राहण्याच्या वृत्तीमुळे तयार होते आहे. यातून बाहेर येण्यासाठीचे पहिले पाऊल तर आपण टाकलेले आहेच. ते म्हणजे गुजराथ्यांना किंवा मारवाड्यांना आपण ज्यू लोकांसारखे वागवत नाही. आता पुढची पावले टाकणे आवश्यक आहे. गुजराथी किंवा मारवाडी लोकांना त्यांचा वेग कमी करायला सांगणे मूर्खपणाचे ठरेल. पण त्याचबरोबर हा वेग खरा आहे तो फुगवटा नाही याची खात्री पटवण्यासाठी सरकारला जास्त काळजी घ्यावी लागेल.

मी सांगितलेल्या उपायांवर अमल करावा इतका मोठा मी नाही हे मला माहिती आहे. पण ऑडिटमध्ये इंटर्नल कंट्रोलचे एक तत्व मी शिकलो आहे आणि ते नेहमी शिकवतो देखील. त्यानुसार, काम करणाऱ्यालाच ते लिहून ठेवायची आणि तपासायची जबाबदारी द्यायची नसते. सध्या शब्दात पेपर लिहिणाऱ्याला तो तपासायच्या कामावर नेमायचे नसते. जर एक समाज म्हणून मारवाडी उद्योगात पुढे असतील तर हिशोब राखणे आणि तो तपासणे या क्षेत्रात त्यांना प्रवेश देताना जास्त निर्बंध असले पाहिजेत. अर्थव्यवस्थेतील उद्योगाचे काम हे ऍक्सिलरेटरचे असते तर हिशोबतपासनीसाचे काम ब्रेकचे असते. एकाच समाजातील व्यक्ती दोन्ही कामे करत असतील तर दोघांपैकी एकाचे काम मागे पडून संपूर्ण अर्थव्यवस्थेला धक्का लागू शकतो. असे अनेक धक्के आपण १९९१च्या आर्थिक उदारीकरणापासून खातो आहोत. कारण उदारीकरण यशस्वी होण्यासाठी करारांचे बंधन पाळणारा समाज अपेक्षित आहे. आणि आपला समाज करारांचे बंधन पाळण्यासाठी प्रसिद्ध नाही.

आर्थिक घोटाळे सर्व देशात होतात. अगदी युरोपीय देशात सुद्धा होतात. पण विकसित देशांच्या तुलनेत भारतात घोटाळे करणे अधिक सोपे आहे आणि घोटाळ्यानंतर शिक्षा चुकवून पळून जाणेदेखील भारतात अधिक सोपे आहे. आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत आणि बाजारव्यवस्थेच्या आकलनाच्याबाबतीत विविध पातळीवर असलेल्या विविध सामाजिक गटांनी आपला देश बनलेला आहे, त्यापैकी विविध सामाजिक गटांत भांडवलाची उपलब्धता वेगवेगळी आहे हे जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत घोटाळेबाजांसाठी भारत हा एक स्वर्ग असेल. आपण कधी मारवाड्यांच्या नावे तर कधी गुजराथ्यांच्या नावे तर कधी अजून कुणाच्या नावे खडे फोडत बसू आणि आपल्या धार्मिक धारणांनुसार आपल्याच नशीबाला बोल लावत बसू.

No comments:

Post a Comment