Thursday, March 8, 2018

गाणी आणि वर्तमान (भाग १)

--------
-------
ईशान्येकडील राज्यांतील निवडणुकांचा निकाल लागला. समाजमाध्यमांवर विविध पक्षांच्या समर्थकांच्या मतांच्या फैरी झडू लागल्या. आवडत्या पक्षाप्रमाणे किंवा पटलेल्या विचारधारेप्रमाणे कुणाला हा निकाल फॅसिस्ट हुकूमशाहीच्या आगमनाची नांदी वाटला तर कुणाला राष्ट्रवादाच्या आगमनाची नांदी वाटला. कुणाला ही लोकशाहीची मृत्युघंटा वाटली तर कुणाला छद्म धर्मनिरपेक्षतेची मृत्युघंटा वाटली. माझ्या मित्रांत विविध पक्षांचे समर्थक आणि विविध विचारधारांशी बांधिलकी असणारे सर्वजण असल्याने प्रत्येकाच्या पोस्ट्स वाचून माझ्या मनात वेगवेगळे विचार येत होते. आणि मग या विचारांना अनुसरून कुठलं गाणं त्या मित्रांच्या मनोवस्थेसाठी योग्य ठरेल त्याच्या जोड्या माझ्या मनात लागू लागल्या.

भाजप समर्थक मित्रांच्या पोस्टमधील ऊर्जा आणि विजयोन्माद पाहिला. या निवडणुकीत श्री सुनील देवधरांनी काय काम केलं याबद्दल कौतुकमिश्रित वर्णनं वाचली. संघ कार्यकर्ते कशाप्रकारे ईशान्येकडील राज्यांत निरलसपणे कार्य करत आहेत याबद्दलची आदरयुक्त वर्णनं वाचली. आणि मला 'वंदे मातरम' हे गीत आठवलं. रोज शाळा सुटताना म्हणतात त्या संथ लयीतील नाही तर बंकिमचंद्र चॅटर्जींच्या आनंदमठ या कादंबरीवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटात हेमंतकुमारांनी गायलेलं द्रुतलयीतलं वीरश्रीपूर्ण वंदे मातरम. बंकिमचंद्र बंगालमधील होते. आणि ईशान्य भारताच्या सध्याच्या निवडणूक क्षेत्राच्या आसपास त्यांची कादंबरी घडते. म्हणून वाटलं की हे गाणं चपखल बसतंय.



पण थोडा विचार केला आणि जाणवलं की ते वीरश्रीपूर्ण गीत या मित्रांसाठी लागू पडत नाही. कारण वंदे मातरम मध्ये मातेला वंदन आहे. भारत माता आहे. तिच्या भूमीचे वर्णन आहे. तिच्या रिपुदमन करण्याच्या शक्तीचे वर्णन आहे. तिच्या दुर्गारूपाचा गौरव आहे. तिच्यासाठी काय करू त्याचे वर्णन नसून ती कशी आहे त्याचे वर्णन आहे. त्यामुळे ते वीरश्रीपूर्ण असले तरी मातेचे गौरवगीत आहे. आपल्याला काय करायचे आहे त्याचे योजनागीत नाही.

मग दुसरंच गीत आठवलं. हिंदीतील प्रसिद्ध छायावादी कवी किंबहुना ज्यांना छायावादाचाया चार खांबांपैकी एक खांब मानलं जातं, ज्यांनी 'कामायनी' या महाकाव्याची रचना केली त्या जशंकर प्रसाद यांनी ही कविता लिहिली आहे. त्यांनी स्कंदगुप्त. चंद्रगुप्त अशी ऐतिहासिक नायकांबद्दलची नाटके लिहिली. कदाचित त्यांच्या 'चंद्रगुप्त' या नाटकातील रचना असू शकेल. जुन्या चाणक्य सिरीयल मधे ही रचना चंद्रगुप्त म्हणतो आणि मग त्याचे मित्र साथ देतात असं चित्रिकरण केलं आहे.

या रचनेत राष्ट्र हा शब्द महत्वाचा आहे. भौगोलिक संदर्भ असलेला देश हा शब्द नाही, तर सांस्कृतिक संदर्भ असलेला राष्ट्र हा शब्द वापरलेला आहे. स्त्रीलिंगी जन्मभूमी किंवा मातृभूमी नाही. तर पुल्लिंगी राष्ट्र शब्द वापरलेला आहे. सुरवातीला पुल्लिंगी राष्ट्र शब्द वापरणाऱ्या या गीताच्या शेवटी मात्र स्त्रीलिंगी माँ शब्द येतो. पण ही माँ वंदे मातरम सारखी सुजलाम सुफलाम नाही, बहुबल धारिणीं रिपुदलवारिणीं नाही.

या गाण्यात ती सर्वशक्तिमान दुर्गा नसून तिच्या पुत्रांनी तिला शत्रूंच्या रुधिराने अभिषेक केलेला होता आणि शत्रूंच्या मुंडक्याची माळ घालून तिचा शृंगार केलेला होता. पुत्रांनी दिलेल्या सांस्कृतिक सिंहासनावर बसून ती जगावर राज्य करत होती. कालचक्राच्या गतीने हे सिंहासन मोडकळीस आलेले आहे आणि तिच्या पुत्रांवर जबाबदारी आहे की आपले तन मन धन अर्पून तिला तिचा नष्ट झालेला गौरव पुन्हा प्राप्त करून द्यायचा आहे. म्हणजे ती वंदे मातरम मधील सर्वशक्तिमान माँ नसून; तन मन धन अर्पण करण्यास तयार असलेल्या सर्वशक्तिमान पुत्रांची ती माँ आहे.

जुन्या चाणक्य सिरियलमध्ये या गीताचं चित्रीकरण ज्या प्रकारे केलेलं होतं त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील माझ्या मित्रांना हे गाणे आपलेसे वाटणे स्वाभाविक आहे. आणि संघविरोधकांना संघाची वैशिष्ट्ये धारण करणारे वाटणेही स्वाभाविक आहे. संघाचे विरोधक संघाला जी दूषणे देतात ती सर्व या गीतात ठळकपणे दिसून येतात. शेंडीवाल्यांचा गट. जानवेधाऱ्यांचा गट. स्त्रियांना दुय्यम स्थान देणाऱ्यांचा गट. गुरुआज्ञा शिरसावंद्य मानणाऱ्यांचा गट. भूमी पेक्षा अमूर्त राष्ट्रसंकल्पनेला महत्व देणाऱ्यांचा गट, वगैरे गोष्टी या चित्रीकरणात दिसून येतात.

गाणे सुरु होते तेव्हा रात्रीची वेळ आहे. आश्रमात मशालींचा उजेड आहे. सर्व विद्यार्थी आणि गुरुजन आपापल्या कक्षात विश्राम करत आहेत. एकटा चंद्रगुप्त सचिंत मुद्रेत एका खांबाला टेकून शून्यात नजर लावून बसलेला आहे. आणि तो सहज संथ सुरात स्वगत असल्याप्रमाणे म्हणतो

अन्तर से मुख से कृती से
निश्र्चल हो निर्मल मति से
श्रद्धा से मस्तक नत से
हम करें राष्ट्र अभिवादन....

आणि आश्रमाला जाग येते. एकामागून एक विद्यार्थी आपापल्या कक्षातून बाहेर येऊ लागतात. आतापर्यंत शांत आणि संथ असलेलं स्वगत आता वीररसपूर्ण गीतात बदलतं. सस्मित आचार्यही आपल्या कक्षातून बाहेर येतात. विद्यार्थी कवायत करत असल्याप्रमाणे शिस्तबद्ध रीतीने राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या भावना एकसुरात मांडतात. हे गाणं बघताना भावनाप्रधान प्रेक्षकांना आपोआप स्फुरण चढतं. आपण काहीतरी करावं ही ऊर्मी दाटून येते.

हम करें राष्ट्र आराधन
तन से मन से धन से
तन मन धन जीवनसे
हम करें राष्ट्र आराधन ।।धृ।।

अन्तर से मुख से कृती से
निश्र्चल हो निर्मल मति से
श्रद्धा से मस्तक नत से
हम करें राष्ट्र अभिवादन ।। १।।

अपने हंसते शैशव से
अपने खिलते यौवन से
प्रौढता पूर्ण जीवन से
हम करें राष्ट्र का अर्चन ।।२।।

अपने अतीत को पढकर
अपना ईतिहास उलटकर
अपना भवितव्य समझकर
हम करें राष्ट्र का चिंतन ।।३।।

है याद हमें युग युग की जलती अनेक घटनायें
जो मां के सेवा पथ पर आई बनकर विपदायें
हमने अभिषेक किया था जननी का अरिशोणित से
हमने शृंगार किया था माता का अरिमुंडो से

हमने ही उसे दिया था सांस्कृतिक उच्च सिंहासन
मां जिस पर बैठी सुख से करती थी जग का शासन
अब काल चक्र की गति से वह टूट गया सिंहासन
अपना तन मन धन देकर हम करें पुन: संस्थापन ।।४।।



कम्युनिस्ट पार्टीला त्रिपुरात धूळ चारण्यात आलेल्या यशामुळे अनेक तरुण भाजप समर्थक ज्या प्रकारे व्यक्त होत होते ते पाहून मला वाटले की त्यांच्या डोक्यात वंदे मातरम मधील सर्वशक्तिमान माँ नसून हम करे राष्ट्र आराधन मधील माँ आहे.

No comments:

Post a Comment