Sunday, December 15, 2019

वारसा

ही पोस्ट महाभारत युध्दाचे मूळ कारण सांगणारी वगैरे नाही. खरंतर महाभारत युध्दाला कुठलेतरी एकमेव कारण असेल अशी माझी समजूत नाही.

पण महाभारतकालीन समाजात पैतृक आणि मातुल घराण्याच्या संपत्तीच्या वारसाहक्काच्या व्यवस्थेचा पैलूही या युध्दाला असू शकतो अशी माझी धारणा आहे. त्या धारणेचा विस्तार म्हणजे ही पोस्ट आहे.

दोन गोष्टी आहेत

१) कुल कुणाचे? मातृकुलीन की पितृकुलीन. (मूल आईचे की बापाचे?)
२) आणि सत्ता कुणाकडे? (पुरुषाकडे की स्त्रीकडे?)

अनेकांच्या मताप्रमाणे महाभारतकालीन भारतात सत्ता पुरुषांच्या हातात गेली होती. स्त्री राज्य असलेले प्रदेश तुरळक होते. स्त्रीने माहेर सोडून सासरी जायची पद्धतही रुळली होती. पण विवाह ही सार्वत्रिक आणि सक्तीची बाब नव्हती. त्यामुळे विवाहबाह्य संबंध आणि विवाहपूर्व संबंध फार लक्षवेधी किंवा समाजविसंगत नव्हते. एकाच पुरुषाला अनेक स्त्रियांकडून मुले असणे किंवा एकाच स्त्रीला अनेक पुरुषांकडून मुले असणे याला समाजबाह्य वर्तन मानले जात नव्हते. पण त्यामुळे पहिला प्रश्न कळीचा झाला होता. की मुलाचे कुल कुठले? आईचे की बापाचे? कुणाच्या संपत्तीत मुलाला वाटा मिळणार, आईच्या की बापाच्या?

हिमालयीन समाजात मातृकुलीन व्यवस्था होती तर गांधार, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पठारी प्रदेशात पितृकुलीन व्यवस्था स्थिरावत चाललेली होती.

शकुंतलेच्या पुत्राला (भरताला) राजा दुष्यंताने स्वीकारावे आणि आपले कुल द्यावे, आपल्या संपत्तीचा वारस म्हणून नेमावे अशी कण्वमुनींची आणि स्वतः शकुंतलेची इच्छा असते. इथे पित्याच्या संपत्तीत (मातेच्या नव्हे) मुलाला हक्क मिळणे मान्य केले जाते. हस्तिनापूरमध्ये (उत्तर प्रदेशातल्या पठारी भागात) मुलावर पित्याचा हक्क आणि मुलाचा जन्मदात्या पित्याच्या संपत्तीवरचा हक्क प्रस्थापित होतो.

गंगा हिमालयीन समाजातील मुलगी. ती लग्न करते हस्तिनापूरच्या शंतनूशी. गंगा शंतनूकडून मुलं माहेरी पाठविण्यास संमती मिळवते. म्हणजे ती स्वतः जरी पुरुषसत्ता मानत असली, स्वतः जरी सासरी आलेली असली तरी मुलांना माहेरी पाठवते. जेव्हा भीष्माच्या वेळी शंतनू अडवतो तेव्हा ती भीष्माला त्याच्याकडे सोडून स्वतः माहेरी निघून जाते. म्हणजे शंतनू आणि गंगेच्या सुरवातीच्या सात पुत्रांना मातृकुल मिळते तर आठवा पुत्र भीष्माला मात्र पितृकुल मिळते पण त्याचे आजोळ तुटते. आणि पित्याच्या संपत्तीचा तो उत्तराधिकारी होतो.

पराशर तर सत्यवतीकडे कामभिक्षा मागतात आणि नंतर व्यासांना आपल्याबरोबर घेऊन जातात. म्हणजे सत्यवती सासरी जात नाही पण तिचा मुलगा मात्र बापाकडे जातो. म्हणजे व्यासाला पितृकुल मिळते पण त्याचेही आजोळ तुटते. पराशर फिरते तर सत्यवती हस्तिनापूर म्हणजे उत्तर प्रदेशातील. तिला पितृकुल व्यवस्था चालते आणि तीच व्यवस्था पुढे चालावी म्हणून ती नंतर जागरूक असते.

शंतनू आणि सत्यवतीचा मुलगा विचित्रवीर्य, बापाकडे राहतो. त्याचे आजोळही तुटत नाही आणि त्याला पैतृक संपत्तीचा वारस नेमावे म्हणून विवाहपूर्व अट त्याच्या आईने आणि आजोबानेच घातलेली असते. म्हणजे इथे पित्याच्या संपत्तीत (मातेच्या नव्हे) मुलाचा हक्क असणे अजून घट्ट होत जाते.

कुंती आणि माद्रीच्या वेळी गुंता अजून वाढतो. कारण त्यांच्या मुलांचा जन्मदाता पिता वेगळा आणि सामाजिक पिता वेगळा. जन्मदाता पिता हिमालयीन समाजातला तर सामाजिक पिता उत्तर प्रदेशातल्या हस्तिनापूरचा. जन्मदाते तर मुलांना सांगणार की माझ्या संपत्तीत तुमचा वाट नाही तुम्ही आईची संपत्ती बघा. आणि सामाजिक पिता म्हणावे तर उत्तर प्रदेशातील नियोगाचे प्रचलित नियम पाळलेले नाहीत.

त्यामुळे पैतृक संपत्ती मिळायची तर कुठल्या पित्याची? मूल आईचे म्हणावे तर त्यांना पहिल्या तीन पांडवांना कुंतिभोज (कुंतीला दत्तक घेणारा पिता) किंवा शूरसेन (कुंतीचा जन्मदाता) राजाच्या संपत्तीचे वारस बनावे लागेल आणि शेवटच्या दोन पांडवांना मद्रदेशाच्या संपत्तीचे वारस बनावे लागेल.

कुंती आणि माद्री पुत्र प्राप्त करून घेतात आणि त्या दोघींचे पुत्र त्यांच्याकडेच राहतात. आपापल्या बापाकडे जात नाहीत. म्हणजे पांडवांना मातृकुल मिळते आणि त्यांचे बापकडचे आजोळ तुटते. त्यांना जन्मदाता पित्याची संपत्ती मिळत नाही. कारण की कुंती आणि माद्रीने निवडलेले साथीदार त्या गंगेच्या समाजव्यवस्थेला मनात असतात. आणि कुंतीचा प्रयत्न असतो की त्यांना सामाजिक पित्याची संपत्ती मिळावी.

जर पांडवांना गंगेचा न्याय लावला असता माद्रीचा भाऊ शल्य राजाला नकुल सहदेवांना आपल्या संपत्तीमध्ये वाटा द्यावा लागला असता आणि कृष्णाला (कारण कृष्ण मथुरेचा आणि शूरसेन मथुरेचा राजा होता) पांडवांना वाटा द्यावा लागला असता. त्यामुळे शल्य आणि आणि कृष्ण दोघांचीही इच्छा होती की कुंती आणि पांडवांनी गंगेचा न्याय वापरू नये. तर सत्यवतीच्या न्याय वापरावा. म्हणून शल्य लढतो कौरवांकडून आणि कृष्ण लढतो पांडवांकडून.

बरं धृतराष्ट्र म्हणजे कौरवांचा जन्मदाताही अव्यंग नसल्याने समाजमान्य सम्राट नाही. आणि त्याची सूतसंतती भरपूर त्यामुळे पैतृक संपत्तीचा भरताचा किंवा विचित्रवीर्याचा न्याय लावला तर दुर्योधन आणि दुःशासनाला भरपूर वाटेकरी. (व्यासांच्या चरूची गोष्ट खरी मानून व्यासांकडे पितृत्व द्यावे तर व्यासांच्या पैतृक संपत्तीचा वाटा मिळेल पण हस्तिनापुरचा नाही.) आणि कौरव आईचे म्हणावेत तर त्यांना शकुनी मामाच्या संपत्तीत वाटा मागावा लागला असता.

या सगळ्यात विचित्रपणे अडकलेली दोन माणसे म्हणजे भीष्म आणि व्यास. म्हटलं तर भावंडे. कारण आई वडील वेगवेगळे असले तरी एकाच्या आईचा दुसऱ्याच्या वडिलांशी विवाह झालेला. आणि दोघांनाही पित्याच्या संपत्तीचा अधिकार मिळालेला. पण कुंती, माद्री आणि गांधारी या स्त्रियांनी दोन वेगवेगळ्या समाजांना (हिमालयीन आणि पठारी) एकत्र आणून जो गुंता तयार करतात त्याला सोडवणे कुणालाही शक्य नसते. आणि सर्वजण संपत्तीचे मालक असल्याने युद्ध अटळ होते.

No comments:

Post a Comment