Monday, November 25, 2019

हलाहल से हलाहल धुल रहा है

जे होणार होतं ते वाईट होतं. जे होत आहे तेही तितकंच वाईट आहे. पण या दोघांच्या वाईटपणाला एकत्र केलं तरी त्याहूनही अधिक वाईट गोष्ट घडते आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या नकळत आपण तिला हातभार लावतो आहोत.

सर्वपक्षीय नेते आपापले निर्णय केवळ सत्तेची लालसा आणि त्यामागच्या अर्थकारणामुळे घेतलेले आहेत हे पदोपदी दाखवून देत असताना पक्षसमर्थक आणि सर्वसामान्य मतदार मात्र आपापल्या आवडत्या पक्षाचे नेते कसे चारित्र्यवान आणि नीतिमान आहेत हे स्वतःला आणि इतरांना पटवून देण्याची धडपड करत आहेत. त्यातल्या काहीजणांना यातला फोलपणा कळतो पण मग त्यांना एक नवीन प्रश्न छळतो की इतर सर्वजण नीतीमत्ता सोडून वागत असताना केवळ एकाच पक्षावर नीतीमत्तेची जबाबदारी कशी काय टाकावी?

फेसबुकवरील एका वरिष्ठ मित्राने तर अटलजींचा काळ आता राहिला नाही. आता बदललेल्या काळात एका मताच्या अभावामुळे सत्तेवरून पायउतार होणाऱ्या अटलजींसारखी वर्तणूक ठेवणे अशक्य आहे असंही सांगितलं.

हे वाचताना मला दोन गोष्टी आठवल्या.

१) कलियुग आहे कलियुग : अटलजींच्या वेळी बाकीचे पक्षही नीतीमान होते हे आपण अप्रत्यक्षपणे मान्य करतो आहोत हे अनेकांच्या लक्षात येत नाही. वस्तुतः त्याकाळीही अन्य पक्ष तितकेच नीतीमान होते जितके आजकालचे पक्ष आहेत. त्याकाळीही संधीसाधू आणि आप्पलपोटे नेते तितकेच होते जितके आज आहेत. त्याकाळीही आपापला अजेंडा राबवण्यासाठी, स्वार्थ साधण्यासाठी आणि त्यासाठी विरोधी पक्षाला नामोहरम करण्यासाठी सगळे राजकीय पक्ष तितकेच उतावीळ होते जितके आज आहेत. 'अटलजींचा काळ आज राहिला नाही' या वाक्यामागे गतकाळ फार उत्कृष्ट होता आणि वर्तमानात सगळी माती झाली आहे, हा भारतीयांचा निराशावाद कारणीभूत आहे.

एकदा का एकेका मन्वंतराचे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग असे चार भाग परमेश्वराने केले आहेत असं मान्य केलं आणि प्रत्येक युगात समाजातील कलीचं प्रस्थ वाढत जाणार हे मान्य केलं की भूतकाळ हा कायम वर्तमानापेक्षा अधिक स्वच्छ वाटणं स्वाभाविक आहे. पण त्यातून एक अनपेक्षित वाईट परिणाम दिसून येतो की वर्तमान आणि भविष्याला बदलण्याची आपली जबाबदारी टाळून आपण अनीतीचं समर्थन तरी करू लागतो किंवा मग त्याला विरोध करण्याची आपली जबाबदारी टाळतो.

२) रश्मिरथी : राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांची रश्मिरथी या नावाची एक महाकविता आहे. शिवाजी सावंतांची मृत्युंजय ही कादंबरी ज्याप्रमाणे कर्णाला उत्तुंग दाखवते त्याप्रमाणे रश्मिरथी कर्णाला मध्यवर्ती भूमिका देऊन रचलेलं महाकाव्य आहे. त्यातील कित्येक संकल्पनांबद्दल माझ्या मनात वादाचे भरपूर मुद्दे तयार असले तरीही एक काव्य म्हणून रश्मिरथी माझी अतिशय आवडती रचना आहे. यात शेवटच्या म्हणजे सातव्या प्रकरणात जेव्हा कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत रुतून बसतं आणि त्याच्यावर शरसंधान करायला कृष्ण जेव्हा अर्जुनाला सांगतो तेव्हा कवी दिनकरांनी कर्णाच्या तोंडी खालील वाक्ये घातली आहेत

Image Courtesy :  Devadutt Patanaik 

'नरोचित धर्म से कुछ काम तो लो !
बहुत खेले, जरा विश्राम तो लो ।
फंसे रथचक्र को जब तक निकालूं,
धनुष धारण करूं, प्रहरण संभालूं,'

'रुको तब तक, चलाना बाण फिर तुम;
हरण करना, सको तो, प्राण फिर तुम ।
नहीं अर्जुन ! शरण मैं मागंता हूं,
समर्थित धर्म से रण मागंता हूं ।'


त्यावर अर्जुन गोंधळतो आणि त्याला त्या द्विधा मनस्थितीतून बाहेर काढण्यासाठी कृष्णाच्या तोंडून दिनकरांनी कौरवांची भीमाला विष खाऊ घालण्यापासून ते द्यूत आणि शेवटी अभिमन्यूवधापर्यंतची पापे वदवून घेतली आहेत आणि मग पुढे दिनकरांचा कृष्ण, कर्णाला विचारतो की,

'हमीं धर्मार्थ क्या दहते रहेंगे ?
सभी कुछ मौन हो सहते रहेंगे ?
कि देंगे धर्म को बल अन्य जन भी ?
तजेंगे क्रूरता-छल अन्य जन भी ?'

'न दी क्या यातना इन कौरवों ने ?
किया क्या-क्या न निर्घिन कौरवों ने ?
मगर, तेरे लिए सब धर्म ही था,
दुहित निज मित्र का, सत्कर्म ही था ।'

'किये का जब उपस्थित फल हुआ है,
ग्रसित अभिशाप से सम्बल हुआ है,
चला है खोजने तू धर्म रण में,
मृषा किल्विष बताने अन्य जन में ।'

'शिथिल कर पार्थ ! किंचित् भी न मन तू ।
न धर्माधर्म में पड भीरु बन तू ।
कडा कर वक्ष को, शर मार इसको,
चढा शायक तुरत संहार इसको ।'


माझ्या वरिष्ठ मित्राने जेव्हा आजकाल सर्वपक्षांची नीतीमत्ता खालावली आहे त्यामुळे एका पक्षाकडून नीतीची अपेक्षा का करावी? हा प्रश्न विचारला तेव्हा मला दिनकरांच्या कृष्णाचं 'हमीं धर्मार्थ क्या दहते रहेंगे ?' हेच वाक्य आठवलं.

आपली गंमत अशी आहे की आपण सगळ्यांनी कृष्णाला भगवंत मानून टाकलेलं आहे त्यामुळे त्याने केलेल्या कृत्याला अधर्म म्हणणं आपल्या कुवतीबाहेरचं आहे. त्यामुळे अनीतीचं उत्तर अनीतीनेच आणि अधर्माचं उत्तर अधर्मानेच प्रभावीपणे देता येऊ शकतं असा आपण आपला गैरसमज करून घेतला आहे. त्याला साक्ष म्हणून आपण कृष्णाला उभं केलं आहे आणि ती साक्ष सर्वमान्य व्हावी म्हणून आपण कृष्णाला भगवंत म्हणून प्रश्न संपवला आहे. परिणामी आपण कवी दिनकरांच्या कर्णाने पुढे भगवान कृष्णाला दिलेलं उत्तर आपण नजरेआड करतो. कर्ण म्हणतो,

'वृथा है पूछना, था दोष किसका ?
खुला पहले गरल का कोष किसका ?
जहर अब तो सभी का खुल रहा है,
हलाहल से हलाहल धुल रहा है ।'

जहर की कीच में ही आ गये जब,
कलुष बन कर कलुष पर छा गये जब,
दिखाना दोष फिर क्या अन्य जन में,
अहं से फूलना क्या व्यर्थ मन में ?'

'सुयोधन को मिले जो फल किये का,
कुटिल परिणाम द्रोहानल पिये का,
मगर, पाण्डव जहां अब चल रहे हैं,
विकट जिस वासना में जल रहे हैं,'

'अभी पातक बहुत करवायेगी वह,
उन्हें जानें कहां ले जायेगी वह ।
न जानें, वे इसी विष से जलेंगे,
कहीं या बर्फ में जाकर गलेंगे ।'

Image Credit : Internet 
मग यातून बाहेर पडायचं कसं? मला वाटतं याचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला आपल्या पुराणकथांचं महत्व समजून घेतलं पाहिजे. कितीही आधुनिक प्रकारचं तंत्रशिक्षण आणि समाजव्यवस्थाशिक्षण घेतलं तरी अजूनही आपली मूल्यव्यवस्था आपल्या जुन्या पुराणकथांवरच अवलंबून आहे. त्यामुळे केवळ गावखेड्यातील बेरकीच नव्हे तर शहरांतील उच्चविद्याविभूषित लोकही नवीन पेचप्रसंगात आपल्या वर्तनाचं किंवा आपल्या असहाय्यतेचं समर्थन करताना पुराणकथांतील दाखले देतात. आपली भाषा आपल्या नकळत तेच प्रश्न विचारते. तेच दाखले देते. पुराणातील विजेत्याला देवत्व दिल्यामुळे आपल्याला आपल्या वर्तनातील विरोधाभासांची जाणीव होत नाही.

राजकारणी, मग ते भारतातील असोत वा जगातील कुठल्याही देशातील, त्यांचे वर्तन फार वेगळे असेल असं मला वाटत नाही. व्यावसायिकांकडून स्वतःसाठी किंवा पक्षासाठी पैसे घेऊन निवडून आलेले राजकारणी शेवटी खाल्ल्या मिठाला जागणार आणि स्वतःच्या सत्तालालसेच्या हाकेलाच ओ देणार याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. मग ते घराणेशाहीतून आलेले असोत किंवा मग कुठल्याही सांस्कृतिक संघटनेतून आलेले असोत. त्यामुळे त्यांच्याकडून माझा काही फार मोठा अपेक्षाभंग झालेला नाही. त्यांना वेसण घालण्यासाठी गरज आहे ती इतरांच्या अनीतीतून आपल्या किंवा आपल्या लाडक्या पक्षाच्या अनीतीला नैतिक अधिष्ठान न देण्याची. विरोध करायचा नसेल तरी किमान नापसंती दर्शविण्याची.

आपली लोकशाही अजून तारुण्यात आहे. त्यामुळे ती अशी गोंधळलेली असणं फार नवलाचं नाही. तिचा गोंधळ भांडवलदारांकडून, राजकारण्यांकडून किंवा प्रत्यक्ष भगवंतांकडून दूर केला जाणार नाही. तो दूर होईल तो केवळ शिकल्या सवरलेल्या लोकांच्या पसंती किंवा नापसंतीच्या हुंकारामुळे.

शिवाजी महाराजांनी आपल्यासारखा विचार केला असता तर एतद्देशियांचं राज्य स्थापन झालंच नसतं. किंबहुना मला तर असं वाटतं की तत्कालीन सामान्य माणसांनी आजच्यासारखाच विचार केला असावा ज्यामुळे माझ्या लाडक्या शिवाजीराजाला अविरत संघर्ष करावा लागला. म्हणून भक्तीमार्गाच्या संतांची, शक्तीमार्गाच्या रामदासांची शेवटी स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांची स्वप्ने अपूर्ण राहिली. आणि आता आपल्यातील अनेकांची स्वप्नही अपूर्ण राहतील. पण करणार काय? शेवटी कलियुग आहे. आणि आपण ते स्वीकारलं आहे. आपले नेते घोर कली आहेत. आणि त्यांच्याविरुद्ध एक नापसंतीचा कटाक्ष टाकण्यासही घाबरतो आहोत. दुसऱ्या कुणी टाकला तर आपण त्यालाही निरुत्तर करणार आहोत, दिनकरांच्या कृष्णाचं वाक्य त्याच्या तोंडावर फेकणार आहोत, 'हमीं धर्मार्थ क्या दहते रहेंगे ?' मग ते भलेही कितीका चुकीचं असेना.

No comments:

Post a Comment