Wednesday, August 23, 2017

डिमॉनेटाझेशन अँड ब्लॅक मनी

६ मे २०१७ ला लोकसत्तेच्या लोकरंग पुरवणीत 'डिमॉनेटाझेशन अँड ब्लॅक मनी' या 'श्री. सी राममनोहर रेड्डी' यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा मी करून दिलेला परिचय प्रसिद्ध झाला होता. त्याचे शीर्षक लोकसत्ताने दिले असले तरी माझ्या मूळच्या लेखात कुठलाही बदल केलेला नव्हता. तो लेख खालीलप्रमाणे.
----


२०१६च्या रब्बी पिकांच्या लागवडीचा हंगाम संपला आहे. विविध राज्यांतील नगरपालिकांच्या आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका व उत्तरेतील काही राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ संपले आहे. नवीन आर्थिक वर्ष २०१७-१८ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेने मंजूर केला आहे. राजकीय पक्षांना देणग्या देण्याबाबत या अर्थसंकल्पात विशेष लगाम घातलेला नाही. आणि ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री ८ वाजता पंतप्रधान मोदिंनी जाहीर केलेल्या नोटबंदीच्या निर्णयाबरहुकूम नोटा बदलून घेण्याच्या सर्व मुदती संपल्या आहेत. पण नोटबंदीच्या या निर्णयाबाबत नेमकी सांख्यिकी अजून आरबीआय आणि सरकारकडून प्रसिद्ध केली गेलेली नाही. ज्या निर्णयामुळे संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था ढवळून निघाली; जागतिक मानांकन संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदारचे आपले अंदाज कमी केले आणि अर्थतज्ञांच्या मते आरबीआयची विश्वासार्हता कमी झाली त्या निर्णयाच्या फलनिष्पत्तीबद्दल संबंधित सरकारी संस्थांकडून अधिकृतरीत्या कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

या पार्श्वभूमीवर स्क्रोल या संकेतस्थळाचे संपादक, सी राममनोहर रेड्डी यांनी लिहिलेले 'डिमॉनेटायझेशन अँड ब्लॅक मनी' (नोटबंदी आणि काळे धन) हे पुस्तक म्हणजे नोटबंदीच्या घटनेच्या सैद्धांतिक, प्रशासकीय आणि आर्थिक बाजूंचा संदर्भासहीत घेतलेला परिपूर्ण आढावा आहे. लेखक श्री. सी राममनोहर रेड्डी हे १९९३ ते २००४ या कालावधीत द हिंदू या दैनिकात अर्थविषयक संपादनाचे काम करीत होते. त्यानंतर त्यांनी २०१६ पर्यंत इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली या या नियतकालिकाचे संपादन केले. मद्रास विद्यापीठातून भौतिकशास्त्राचे पदवीधर असलेले श्री रेड्डी यांनी आय आय एम कलकत्ता येथून मॅनेजमेंटचा डिप्लोमा पूर्ण केला असून त्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात मास्टर ऑफ फिलॉसॉफी आणि डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी या पदवी मिळाल्या आहेत. अर्थशास्त्र हाच लेखकाच्या अध्ययन आणि अर्थार्जनाचा विषय असल्याने त्यांनी विषय अतिशय सोपा करून मांडला आहे. अर्थशास्त्रातील संकल्पना माहित नसणाऱ्या वाचकालादेखील पुस्तक सोपे वाटावे म्हणून पारिभाषिक संज्ञांचा वापर न करता सोपी आणि प्रवाही भाषा वापरली आहे. त्यामुळे विषय समजून घेण्यासाठी वाचकाला केवळ इंग्रजी भाषेचे ज्ञान असले तरी पुरेसे आहे.

विषयाची मांडणी करताना पुस्तकात चार भाग आणि चौदा प्रकरणे वापरली आहेत. पहिला भाग 'काळे धन' या संकल्पनेला विशद करण्यासाठी वापरला आहे. दुसऱ्या भागात 'काळ्या धनावर उपाय, नोटबंदीची त्याबाबत उपयुक्तता, कॅशलेस अर्थव्यवस्थेचे स्वरूप' यावर चर्चा केली आहे. तिसरा भाग नोटबंदीमुळे झालेल्या त्रासाची आणि हानीची नोंद करणारा आहे. तर चौथ्या भागात लेखकाने बँकांवर आणि आरबीआयवर झालेल्या नोटबंदीच्या परिणामांची चर्चा करताना पुढे काय करायची आवश्यकता आहे त्याचा उहापोह केला आहे. पुस्तकात अनेक परिशिष्टे, तळटीपा आणि कोष्टके देऊन लेखकाने आपला मुद्दा स्पष्ट केला आहे.

नोटबंदीच्या निर्णयामागील कारण म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेला गांजणाऱ्या काळे धन, नकली चलन आणि दहशतवाद या तीन समस्या पुढे केल्या गेल्या. परंतू काही काळानंतर कॅशलेस भारत किंवा डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीसाठी नोटबंदी हे पहिले पाऊल आहे असे सांगण्यात येऊ लागले.

'काळे धन बाळगणारे लोक आपले काळे धन रोख रकमेच्या स्वरूपात बाळगतात' हे नोटबंदीच्या मागील एक महत्वाचे गृहीतक होते. आणि याच गृहितकावर लेखकाने बोट ठेवून त्याचा फोलपणा दाखवायचा साधार प्रयत्न केला आहे. बरेचदा काळे धन आणि काळा पैसा हे शब्द एकमेकांना पर्यायी शब्द म्हणून वापरले जातात. पण हे चुकीचे असून या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, हे सांगण्यासाठी लेखकाने पुस्तकातील पहिला भाग वापरला असून त्यात काळ्या धनाबाबत विस्तृत सैद्धांतिक चर्चा केली आहे.

पैसा म्हणजे विनिमयाचे साधन. ते आरबीएआयने परिणामी सरकारने निर्माण केले असल्याने पैसा काळा नसतो. याउलट धन म्हणजे साठवून ठेवलेली संपत्ती. ती जर कायदेशीर मार्गाने कमवून आणि सर्व कर भरून बाळगली असेल तर ती पांढरी असते. याउलट जर ती गैरमार्गाने कमवाली असेल करचुकवेगिरीतून कमावली असेल असेल तर मात्र ती काळी संपत्ती किंवा काळे धन बनते. हे काळे धन साठवून ठेवायचे असल्याने; स्थावर मालमत्ता, सोने, किंवा बेनामी बँक अकाउंट्सच्या माध्यमातून साठवणे अश्या करचुकव्यांना सोपे जाते.

बहुतांश काळे धन असे मालमत्तेच्या स्वरूपात असल्याने त्याचा विनिमयासाठी वापर करणे कठीण असते. कुठलाही व्यवहार पूर्ण करण्यासाठी जर काळ्या धनाला वापरण्याचे ठरवले तर त्याला रोख स्वरूपात रुपांतरीत करून घेणे आवश्यक असते. त्या तात्पुरत्या काळासाठी काळे धन रोख रकमेच्या किंवा पैशाच्या स्वरूपात बदलले जाते. पण त्याचे हस्तांतरण पूर्ण झाले की त्याला स्वीकारणारी व्यक्ती पुन्हा त्या रोख रकमेला स्थावर मालमत्ता किंवा सोने किंवा बेनामी बँक अकाउंट्समध्ये रुपांतरीत करते. बेकायदेशीर व्यवहारातून किंवा मिळवलेली रोख रक्कम रोख स्वरूपात धरून ठेवणे फायद्याचे नसल्याने अशी रोख रक्कम धरून ठेवण्याचे प्रमाण संपूर्ण देशाच्या अर्थकारणावर परिणाम घडवू शकेल इतके मोठे नसते. रोख रकमेच्या स्वरूपात काळे धन धरून ठेवण्याचे प्रमाण फार कमी असल्यामुळे नोटबंदी करून काळे धन पकडले जाईल असा आशावाद बाळगणे म्हणजे काळ्या धनाच्या स्वरूपाविषयी अनभिज्ञ असण्याचे लक्षण आहे.

केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने २०१२ साली काळ्या धनाच्या बाबतीत काढलेल्या श्वेत पत्राच्या आधारे, लेखकाने काळ्या धनाचा उगम दोन ठिकाणाहून होतो असे मांडले आहे. उगमाचे पहिले ठिकाण आहे 'बेकायदेशीर कृत्ये'. यात तस्करी, खंडणी, वेश्याव्यवसाय, प्रशासकीय आणि शासकीय पातळीवर होणारा भ्रष्टाचार हे सर्व अंतर्भूत आहेत. तर दुसरे ठिकाण आहे 'करचुकवेगिरी'. यात असंघटीत क्षेत्रातील उद्योग, संघटीत क्षेत्रातील आणि स्थावर मालमत्तेसंबंधी व्यवहार, सरकारी खात्यांकडून केली जाणारी खरेदी, समभाग व्यवहारात करचुकवेगिरी करण्यासाठी स्थापन केलेल्या शेल कंपनींमार्फत केले जाणारे व्यवहार आणि वाढीव किंवा अल्प दराने बनवली जाणारी बिले, ट्रान्स्फर प्रायसिंग या गोष्टी येतात. यातले कित्येक व्यवहार चक्क बँकांतूनच होतात. म्हणजे व्यवहारासाठीसुद्धा रोख रक्कम वापरली जात नाही. आणि ज्या व्यवहारात ती वापरली जाते ती देखील व्यवहार पूर्ण झाल्यावर स्थावर मालमत्तेत किंवा बेनामी बँक अकाउंटमध्ये जमा केली जाते. त्यामुळे नोटबंदी या काळ्या धनाविरुद्ध अतिशय बोथट हत्यार आहे.

हा मुद्दा विषद करताना लेखक तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता आणि त्यांची सहकारी शशिकला यांचे उदाहरण देतो. दोन दशकापूर्वी जयललिता यांच्या अवैध संपत्तीला पुन्हा पांढरे करून घेण्यासाठी ३४ शेल कंपन्यांची ५० बँक अकाउंट वापरली गेली होती. आणि आता वीस वर्षानंतर तर नवनवीन आर्थिक व्यवहार करून अवैध संपत्तीला पांढरे करून घेणे अजूनच सोपे झाले आहे. म्हणजे ज्या काळ्या पैशाविरुद्ध ही लढाई सुरु झाली तो कधी काळा नसतोच. असलेच तर साठवून ठेवलेले धन काळे असू शकते. आणि ते देखील रोख रकमेच्या स्वरूपात फार कमी असते. त्यामुळे रोख रकमेच्या स्वरूपात पकडून ठेवलेल्या थोड्याथोडक्या काळ्या धनाला पकडण्यासाठी नोटबंदी करणे म्हणजे नखाच्या कामाला कुऱ्हाड वापरण्यासारखे आहे; अशी साधार मांडणी करून लेखक नोटबंदीच्या दुसऱ्या उद्दिष्टाकडे वळतो. ते म्हणजे ‘कॅशलेस अर्थव्यवस्था’.

यातदेखील लेखक हे सप्रमाण दाखवून देतो की एनइएफटी, आरटीजीएस सारख्या सुविधा देऊन आरबीआयने संस्थात्मक व्यवहार कॅशलेस करण्याला एक दशकभरापूर्वीचा सुरवात केली होती. आणि त्यात मोठे यशदेखील मिळवले होते. पण वैयक्तिक पातळीवरील व्यवहार कॅशलेस करण्यात अनंत अडचणी होत्या आणि त्या अजूनही आहेत. सर्व खेड्या पाड्यात बँकिंग सुविधा नसणे; वीज, मोबाईल आणि इंटरनेट जोडणी नसणे; सर्व नागरिकांकडे स्मार्टफोन नसणे; स्मार्टफोन, फीचर फोन आणि साधा टेलिफोन या सर्वांना उपयुक्त ठरेल अशी एकसमान प्रणाली तयार करणे, ती विविध भाषांत उपलब्ध करून देणे; या सर्व अडचणी सोडविण्याचा प्रयत्न गेली दशकभर चालू आहे आणि तो चुटकीसरशी सुटणार नाही. विकासाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने कॅशलेस व्यवहाराचा प्रश्न सुटणार नाही. नोटबंदीमुळे काही रोखीचे व्यवहार बंद व्हायला मदत होईल हे खरे असले तरी सर्व रोखीचे व्यवहार बंद करायला नोटबंदी करणे म्हणजे हवा फिरवण्यासाठी पवनचक्की उभारण्यासारखे आहे.

लेखकाने बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सच्या संस्थळावरून सतरा देशांचा जीडीपी आणि रोख रकमेच्या प्रमाणाचा (३ डिसेंबर २०१६ रोजी लागू असलेला) एक तक्ता दिलेला आहे. त्यात युनायटेड किंगडम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, सौदी अरेबिया, कोरियासारख्या देशातील रोख रकमेचे जीडीपीशी प्रमाण भारतापेक्षा फार कमी आहे हे दिसून येते. त्यामुळे विकसित होण्यासाठी कॅशलेस व्यवहार आवश्यक आहेत अशी समजूत होणे शक्य आहे. पण त्याचबरोबर तक्ता हेदेखील सांगतो की स्वित्झर्लंड, अमेरिका, जपान, हॉंगकॉंग, सिंगापूर आणि युरोझोन या विकसित अर्थव्यवस्थांमध्येदेखील जीडीपीच्या तुलनेत रोख रकमेचे प्रमाण भारतापेक्षाच काय पण सामूहिक सरासरीपेक्षादेखील जास्त आहे. म्हणजे विकसित अर्थव्यवस्था होण्यासाठी आधी कॅशलेस होणे आवश्यक आहे या प्रकारची मांडणी ठिसूळ होते.

म्हणजे नोटबंदी ज्यासाठी केली ते काळे धन नोटबंदीमुळे नष्ट होणार नाही. कॅशलेस अर्थव्यवस्था हा केवळ दिशादर्शन करणारा ध्रुवतारा असू शकतो, ते मुक्कामाचे ठिकाण नाही. आणि त्या दिशेने आपली वाटचाल दशकभरापूर्वीच सुरु झाली आहे हे सर्व स्पष्ट केल्यावर लेखक एका मोठ्या मुद्द्याला हात घालतो. तो आहे निवडणुका आणि काळे धन.

आपल्या देशातील निवडणुका हा काळे धन रोखीत येण्याचा आणि त्याचे हस्तांतरण होण्याचा महामार्ग आहे, हे उघड गुपित आहे. निवडणुकीत उमेदवाराने जाहीर केलेला खर्च आणि त्याचा प्रत्यक्ष खर्च यात ताळमेळ नसतो. त्याशिवाय निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची संपत्ती किमान २००% ने तर निवडून न आलेल्या लोकप्रतिनिधींची संपत्ती १३०% च्या आसपास दराने वाढते. म्हणजे प्रत्येक उमेदवार निवडणुकीवर केलेला खर्च पुन्हा या ना त्या मार्गाने वसूल करतो. त्यासाठी सत्ता आणि उद्योग अशी अभद्र युती होत असून; व्यावसायिक आणि राजकारणी यांच्यातली दरी कमी होत आहे. हे चिंताजनक आहे. निवडणूक आयोगाकडे नोंद झालेल्या राजकीय पक्षाला २० हजारापेक्षा कमी रकमेच्या देणग्यांचा तपशील द्यावा लागत नाही या नियमाचा वापर करून अनेक राजकीय पक्ष कोणतीही निवडणूक न लढवता केवळ निवडणूक आयोगाकडे नोंद करून अस्तित्वात आहेत. ते मोठ्या राजकीय पक्षांची किंवा त्यांच्या नेत्यांची काळी संपत्ती पांढरी करून घेण्याचे कारखाने आहेत.

निवडणूकीत कराव्या लागणाऱ्या अधिकृत खर्चावरील नियंत्रण अवास्तव आहे म्हणून निवडणुकीत अनधिकृत पैशाचा वापर वाढतो अशी मांडणी जर कुणी निरीक्षकाने केली तर तिथेदेखील भारतीय समाज निरीक्षकाला बुचकळ्यात पाडतो. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व उमेदवारांच्या निवडणुकीच्या खर्चाची सरासरी ही अधिकृत कमाल मर्यादेच्या केवळ ५७% इतकी आहे. म्हणजे जर अधिकृतरीत्या १०० रुपये खर्च करण्यास परवानगी असताना उमेदवारांनी केवळ ५७ रुपये खर्च करून निवडणुकीत यश मिळवले आहे. आणि लोकसभेच्या १/३ सभासदांनी तर अधिकृत कमाल मर्यादेच्या केवळ ५०% रक्कम खर्च केली असे जाहीर केले आहे.

म्हणजे उमेदवारांनी जाहीर केलेली संपत्ती आणि त्यांचे राहणीमान यांचा ताळमेळ बसत नाही. त्याच प्रमाणे उमेदवारांनी जाहीर केलेला निवडणूक खर्च आणि प्रत्यक्षात झालेला निवडणूक खर्च यात देखील ताळमेळ दिसत नाही . निवडणुकीत दिसून येणाऱ्या, भारतीय लोकशाहीत पर्यायाने भारतीय समाजात आणि अर्थव्यवस्थेत आपली पाळेमुळे खोलवर रुजवलेल्या खोटेपणाकडे लक्ष वेधून घेताना लेखक निवडणुकीतील अजून एका कलाकडे लक्ष वेधतो. ते म्हणजे राजकारण्यांनी व्यावसायिक होणे आणि श्रीमंत व्यावसायिकांनी राजकारणात उतरणे.

पक्षांना देणगी देऊन आपल्याला हवी तशी धोरणे वळवून घेण्याचा प्रयत्न जगभरातले सर्व व्यावसायिक करतात. पण भारतात मात्र राजकारणी आणि व्यावसायिक यातील सीमारेषा मिटत चालली आहे. त्यामुळे शासन हा व्यवसायाचा भाग बनत चालला आहे. आणि क्रोनी कॅपिटलिझमला उत्तेजन मिळते आहे. निवडणुका काळ्या धनाला जन्म देत आहेत आणि काळे धन अयोग्य उमेदवाराला निवडणुका लढविण्यासाठी बळ पुरवत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला राजकारणातून जडलेल्या आणि काळ्या ध्यानाला बळकटी देणाऱ्या आजाराचे नेमके निदान केले आहे परंतू त्यावर कुठलीही उपाययोजना सुचविली नाही आहे.

सोन्याप्रती भारतीयांच्या प्रेमाबद्दल लेखकाने एक पूर्ण प्रकरण दिले आहे. भारतात सुवर्णनियंत्रण कायद्याची पार्श्वभूमी, कायद्याच्या काळात भारतात चालू राहिलेली सोन्याची तस्करी, भारतीय महिलांच्या आयुष्यातील सोन्याचे स्थान, स्वातंत्र्योत्तर काळात वेगवेगळ्या सरकारांनी तिजोरीत अडकलेले हे सोने बाहेर आणण्याचे केलेले विविध प्रयत्न आणि नोटबंदीच्या काळात सोने खरेदीवर सरकारने आणलेले नियंत्रण याबाबत लेखकाने चर्चा केलेली आहे. पूर्वापार चालत आलेल्या परंपरांनुसार स्त्रियांना मालमत्तेत वाटा नसल्याने स्त्रीधनातील सोने हा स्त्रियांचा आधार बनण्याची प्रक्रिया लेखकाने विस्ताराने मांडली आहे. पण अर्थव्यवस्थेला गतिरोधक म्हणून काम करणाऱ्या सोन्याच्या ह्या आत्यंतिक हव्यासावर लेखक काही उपाय सुचवत नाही.

नोटबंदीच्या निर्णयामुळे आरबीआयच्या विश्वासार्हतेला धक्का पोहोचला असल्याचे नोंदवून लेखक त्याला वाटणारी खरी भीती नोंदवतो. लेखकाच्या मते जर नोटबंदीच्या निर्णयामुळे कोणताही दृश्य फायदा आला नाही तर भविष्यात अश्या कोणत्याही योजनेस मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद नकारात्मक असेल. हे म्हणजे आजारी व्यक्तीची जीवनेच्छा कमी करण्यासारखे आहे. आणि लेखकाची ही भीती मला रास्त वाटते.

या पुस्तकाला रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर श्री. वाय व्ही रेड्डी यांची मुद्देसूद प्रस्तावना लाभली आहे. ऋणनिर्देशात लेखकाने हे देखील सांगितले आहे की श्री. रेड्डी यांनी प्रत्येक प्रकरण काळजीपूर्वक नजरेखालून घातले आहे. नोटबंदीच्या काळात श्री. वाय व्ही रेड्डी स्पष्टपणे नोटबंदीच्या निर्णयाविरुद्ध बोलले होते. त्यावरून आणि ऋणनिर्देशातील स्पष्ट उल्लेखावरून हे पुस्तक म्हणजे श्री. वाय व्ही रेड्डीआणि श्री सी राममनोहर रेड्डी यांनी संयुक्तपणे लिहिले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

या प्रस्तावनेत श्री वाय व्ही रेड्डी यांनी नोटबंदी तज्ञांच्या वर्तुळात टीकेचा विषय झाली असली आणि नोटबंदीमुळे सामान्य लोकांचे जीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले असले तरी नोटबंदीबाबत जनमत सर्वसाधारणपणे अनुकूल असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. माझ्यामते १९९१च्या आर्थिक सुधारानंतर पहिले दशक भारतीय उद्योगांसाठी धक्कादायक ठरले. अनेक उद्योग जागतिकीकरणाच्या त्या झंझावातात नामशेष झाले. पण त्याचवेळी माहिती क्रांती आल्यामुळे हे दशक सामान्य नागरिकांसाठी धक्कादायक न ठरता नवीन संधी घेऊन आले. त्यानंतर सावरलेल्या उद्योगांनी संगणकांना जवळ केले. आणि माहिती क्रांतीची लाटदेखील ओसरू लागली. पण या मोठ्या बदलांमुळे बहुसंख्य भारतीयांना आर्थिक सुधारणेच्या दुसऱ्या दशकात आपण 'नाहीरे' वर्गात ढकलले गेलो आहोत याची जाणीव झाली. यातून श्रीमंत आणि नवश्रीमंत लोकांविषयी चीड निर्माण होऊन बहुसंख्य भारतीय नोटबंदीच्या कार्यक्रमात कडकलक्ष्मीच्या रूपात स्वतःला फटके मरून घ्यायला तयार झाले असावेत.

अर्थव्यवस्थेला ग्रासून असलेल्या जुन्या आजारांपासून आणि नोटबंदीच्या धक्क्यापासून सावरण्यासाठी प्रस्तावनेत माजी गव्हर्नरांनी सात मुद्दे मांडले आहेत. त्याचे सार सांगताना त्यांनी स्वतःच बायबलमधील "Physician, heal thyself" या उक्तीचा उल्लेख केला आहे. 'जो दुसऱ्यावर उपचार करू इच्छितो त्याने प्रथम स्वतः निरोगी असावे' अश्या अर्थाच्या या उक्तीतून श्री रेड्डी यांनी शासन, प्रशासन आणि न्यायासन या लोकशाहीच्या तिन्ही अंगांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.

पुस्तक जरी आक्रस्ताळा विरोध करणारे नसले तरी नकली चलन आणि दहशतवाद यांच्यावर नोटबंदीच्या निर्णयाचा काय परिणाम झाला ते यात नोंदवलेले नाही. तसेच नोटबंदीच्या काळात हवाला व्यवहारांत लक्षणीय घट झाली होती असे अहवाल इकॉनॉमिक टाइम्स सारख्या वृत्तपत्रातूनही आले होते. त्यांचा देखील पुस्तकात कुठे उल्लेख आढळत नाही. कदाचित ही केवळ तत्कालीन घट होती असे लेखकाचे अनुमान असावे म्हणून त्याने या गोष्टींचा उल्लेख केलेला दिसत नाही. असे असले तरी विपुल संदर्भ, अभिनिवेशरहित विवेचन आणि नोटबंदीच्या घटनेच्या सैद्धांतिक, प्रशासकीय आणि आर्थिक बाजूंचा अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.

No comments:

Post a Comment