Monday, July 30, 2018

फेसबुकची छळछावणी

लग्नाचा समारंभ आहे. आमंत्रित आनंदी आहेत. हास्य विनोद चालू आहे. वातावरणात उत्साह भरलेला आहे आणि एकाएकी काही आमंत्रितांना गुदमरायला होऊ लागतं. नक्की काय होतं आहे ते कळण्याआधी आमंत्रितांपैकी पंधरा व्यक्ती गुदमरून मृत्युमुखी पडतात. काय घडले असेल त्याचा शोध घेणाऱ्या तपास अधिकाऱ्यांना एक योगायोग दिसून येतो की मृत्युमुखी पडलेल्या सर्व व्यक्ती नवऱ्यामुलाकडील असतात आणि नाझी छळछावणीतून वाचलेल्या एका वृद्ध महिलेशी रक्ताच्या नात्याने जोडलेले असतात.

मग काही दिवसांनी एका कॉफी शॉपमध्ये अशाच प्रकारे अनेक लोक मृत्युमुखी पडतात. सगळ्यांच्यात एक सामान धागा असतो की या सगळ्या व्यक्तींचे डोळे तपकिरी रंगाचे असतात.

तपास अधिकाऱ्यांना मग पत्ता लागतो तो एका अश्या रासायनिक हत्याराचा की जे प्रचंड गर्दीतही केवळ विशिष्ट गुणसूत्र असणाऱ्या व्यक्तींनाच लक्ष्य करू शकेल. बाकी कुणालाही काहीही न होता केवळ विशिष्ट गुणसूत्रे असणाऱ्या व्यक्तींची जीवनयात्रा संपवू शकेल. अॅमेझॉन प्राईमवर असलेल्या फ्रिन्ज नावाच्या सिरियलच्या दुसऱ्या सीझनच्या चौदाव्या भागाचे हे कथासूत्र आहे.


मला सिरियलमध्ये रस नाही, किंबहुना तो या लेखाचा विषयही नाही. पण एका प्रिय मित्राशी फेसबुकच्या जाहिरात मॉडेलबद्दल बोलत असताना त्याला हा एपिसोड आठवला आणि मला जे सांगायचे आहे त्याची व्याप्ती समजून घेण्यासाठी हा एपिसोड अतिशय चपखल उदाहरण आहे. शेजारी उभ्या असलेल्या माणसाला काही होत नाही पण तुमच्यातील विशिष्ट शारीरिक गुणांमुळे तुमचे जीवन संपवेल इतका घातक परिणाम घडवून आणता येऊ शकतो, ही कल्पना अतिशय भयानक आहे. असं एखादं तंत्रज्ञान जर नाझी जर्मनीच्या हाती लागलं असतं तर विविध ठिकाणी छळछावण्या उभारून जगभरातील ज्यूंना तिथे आणून मग त्यांच्यावर अत्याचार करण्यापेक्षा त्यांनी जगभर असे घातक विषारी वायू सोडून, इतर कुणाच्या नखालाही धक्का न लावता आरामात ज्यू लोकांचे प्राण घेतले असते.

असे रासायनिक तंत्रज्ञान अजून प्रगत झालेले नाही हे आपले सुदैव आहे पण समाजमाध्यमांवर मात्र या तंत्राच्या जवळपास जाऊ शकेल अशी प्रगती झालेली आहे. २०१९ ला भारतात पुन्हा निवडणुका होतील. त्याचे पडघम आता वाजायला सुरवात होईल आणि यावेळी या निवडणुकांच्या निमित्ताने सर्व राजकीय पक्षांकडून समाजमाध्यमांवरही मोठा धुरळा उडेल. आणि कदाचित त्यातून समाजातील अनेकांची मने एकमेकांबद्दल कायमची दूषित होऊन बसतील. सरकार कुणाचेही येवो पण समाजमाध्यमांवर उडू शकणाऱ्या या धुरळ्यामुळे कुणाच्याही मनात कायमचे विष कालवले जाऊ नये या इच्छेपोटी हा लेख लिहिला आहे.

या लेखात मी जी शक्यता मांडली आहे तसेच होईल याची मला खात्री नाही. किंबहुना असे झाले नाही तर त्यामुळे सगळ्यात जास्त आनंद मला होईल. पण दुर्दैवाने कुठल्याही पक्षाकडून हा मार्ग चोखाळला गेला तर किमान माझ्या मित्रांनातरी त्याचा त्रास न व्हावा अशी इच्छा आहे.

गूगल आणि फेसबुकच्या जाहिरातींचे मॉडेल पूर्णपणे वेगळे आहे. तुम्हाला कुठली जाहिरात दाखवायची हे गुगलला; तुम्ही काय शोधता? तुम्ही काय बघता? तुम्ही कुठल्या वेबसाईट्सना भेट देता; यावरून कळते. गूगल तुम्हाला दाखवत असलेल्या जाहिराती ‘तुम्ही कोण आहात?’ यावर अवलंबून नसतात. तर 'तुम्ही सध्या काय शोधताय?' यावर अवलंबून असतात. गुगलच्या जाहिराती संपूर्ण इंटरनेटवर विविध वेबसाईट्सवर पसरलेल्या असतात. गुगलच्या जाहिराती बघायला तुम्ही गुगलच्या वेबसाईट्सवर जात नाही तर तुम्ही जिथं जाल तिथे तुम्हाला गुगलच्या जाहिराती दिसतील. म्हणजे मी दाढीच्या सामानाबद्दल गूगल सर्च करून मग नंतर युट्युबवर अंदाज अपना अपना हा चित्रपट बघायला गेलो तर मला चित्रपटाच्या खाली आणि मधेमधे दाढीच्या सामानाच्या जाहिराती दिसतील पण माझ्या बायकोने लिपस्टिकबद्दल गूगल सर्च करून नंतर अंदाज अपना अपना बघायला युट्युब वापरले तर जिथे मला दाढीच्या जाहिराती दिसत आहेत तिथे तिला लिपस्टिकच्या जाहिराती दिसतील. आणि ज्या वेबसाईट्सवर गूगलच्या जाहिराती दाखवतात त्या सर्व वेबसाईट्सवर आम्ही आपापल्या लॅपटॉपवरून किंवा मोबाईलवरून गेलो तर तिथेही हाच प्रकार होईल.

गंमत म्हणजे समजा आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला भेट म्हणून मी हिला लिपस्टिक आणि हिने मला दाढीसाठी ट्रीमर देण्याचं ठरवून त्याबद्दल गूगल सर्च केलं असेल तर तिला पुढे ट्रीमरच्या तर मला लिपस्टिकच्या जाहिराती दाखवून गूगल शांत होईल. याचा अर्थ गूगल तुमचे प्रोफाईल बनवत नाही असा नाही पण जितक्या स्पष्टपणे आपण फेसबुकवर आपली माहिती स्वतःहून देतो तितक्या स्पष्टपणे स्वतःहून गुगलकडे माहिती देत नाही. अॅड्रॉईड, क्रोम आणि विविध अॅप्सच्या माध्यमातून गूगल आपल्याबद्दल विश्वास बसणार नाही इतकी माहिती गोळा करत असते. याउलट फेसबुकवर ही माहिती आपण फेसबुकसाठी, तिथल्या जाहिरातदारांसाठी आणि उर्वरित जगासाठी स्वतःहून देत असतो.

म्हणजे सर्च करणारा पुरुष आहे की स्त्री? तरुण आहे की वृद्ध? सिंगल आहे की मॅरिड याचा उपयोग गूगलच्या जाहिरातींपेक्षा फेसबुकच्या जाहिराती अधिक प्रभावीपणे करतात.

कारण फेसबुक वापरण्याची आपण सगळ्यांची पध्दत गूगल वापरण्याच्या पध्दतीपेक्षा वेगळी आहे. आपण गूगलच्या वेबसाईटवर थांबत नाही, सर्च करून पुढे जातो. याउलट आपण फेसबुकवर रमतो. दिवसाचे तासन् तास इथे घालवतो. आपण कुठे रहातो, कुठल्या भाषा बोलतो, आपला फोन नंबर काय, आपल्याला कुठली पुस्तके आवडतात, चित्रपट आवडतात, संगीत आवडते, आपले शिक्षण कुठपर्यंत झाले आहे, आपण कुठल्या हुद्द्यावर काम करतो; याची माहिती नोंदवून ठेवतो. आपला आवडता नट, नटी, राजकीय पुढारी, राजकीय पक्ष, चित्रपट, चित्रपटविषयक कार्यक्रम वगैरेंची पेजेस असतील तर तीही लाईक करून ठेवतो. आणि रासायनिक अस्त्राला लाजवेल अशी स्फोटक तयारी फेसबुकला आणि फेसबुकवरील जाहिरातदारांना करून देत असतो. कारण आपली शारीरिक गुणसूत्रे कुणाला कळली नाहीत तरी आपली सामाजिक गुणसूत्रे आपण जगजाहीर करुन ठेवतो.

फेसबुकवर तुम्हाला दिसणारी जाहिरात तुम्ही काय शोधता यावर अवलंबून नसते, तर तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठे राहता, तुमचे वय, लिंग, हुद्दा, भाषा, मूळगाव, आवडी निवडी यासारख्या घटकांवर म्हणजे तुम्ही जाहीर केलेल्या सामाजिक गुणसुत्रांवर अवलंबून असते.

फेसबुकच्या अॅड मॅनेजरमध्ये जेव्हा एखादी जाहिरात तयार केली जाते तेव्हा ती कुणाला दिसावी याचे परिपूर्ण नियोजन करण्याची संधी जाहिरातदाराला मिळते. म्हणजे माझ्या क्लासची जाहिरात फेसबुकर करताना मी फेसबुकला असे सांगू शकतो की माझ्या क्लासची जाहिरात फक्त डोंबिवली आणि पुणे या शहरात राहणाऱ्या, फक्त १८ ते २० वयोगटातील मुलं आणि मुलींना दाखव. मला क्लासमध्ये केवळ उच्चभ्रू पालकांची मुलं हवी असतील तर मी फेसबुकला असेही सांगू शकतो की ही जाहिरात फक्त इंग्रजी भाषा येणाऱ्यांना दाखव, किंवा मग ज्यांनी व्होडाफोनच्या पेजला लाईक केलं आहे त्याच लोकांना दाखव, किंवा मग ज्यांना ऑडी गाडी आवडते आहे, ज्यांनी क्लब महिंद्राच्या पेजला लाईक केले आहे त्यांनाच दाखव.

यावर कुणी म्हणेल की यात वाईट काय आहे? धुरळा, रासायनिक अस्त्राला लाजविणारी ताकद कुठे आहे?

तर थोडा विचार करून बघा. जाहिरात फक्त वस्तू किंवा सेवांची नसते. जे गूगलवर सहजी शक्य नाही ती ताकद फेसबुकवर सगळ्यांना मिळते. फेसबुकवर कुणीही कुठल्याही विषयाला वाहिलेलं पेज तयार करू शकतो. आणि मग त्या पेजची जाहिरात करुन त्या पेजवरील बातम्या, चित्रे, फोटो, व्हिडिओ इतरांनी पहावेत म्हणून मी फेसबुकवरुनंच जाहिरात करू शकतो.

म्हणजे समजा मला समाजात तेढ पसरवायची आहे. मग मी माझ्या पेजची, अॅपची, वेबसाईटची जाहिरात कुणाला दाखवायची ते फेसबुकला सांगताना असे सांगू शकतो की, 'हे झुकरबर्ग माझी जाहिरात मुंबईत राहणाऱ्या, पण मूळच्या उत्तर प्रदेशातील, आणि संजय निरुपम यांचे पेज लाईक करणाऱ्या वय वर्षे २५ ते ४५ मधील, पुरुषांनाच दाखव. किंवा मग माझी जाहिरात ‘I hate Modi’ किंवा ‘I hate Rahul Gandhi’ किंवा ‘I love Modi’ किंवा ‘I love Rahul Gandhi’ किंवा तत्सम पेज लाईक करणाऱ्या, १८ ते ७५ वयोगटातील स्त्री पुरुषांना दाखव. किंवा माझी जाहिरात बहुजन समाज पार्टीचे पेज लाईक करणाऱ्या लोकांनाच दाखव.' त्यामुळे तुम्हाला फेसबुकवर दिसणाऱ्या जाहिराती तुमच्या शेजारी बसलेल्या तुमच्या मित्राला दिसणाऱ्या जाहिरातींपेक्षा वेगळ्या असू शकतील. या जाहिराती त्याला न्यूजफीडमध्ये दिसू शकतील किंवा मेसेंजरमध्ये दिसतील.

आणि या जाहिराती, जाहिरातदाराच्या विषयाला पुढे आणण्यासाठीच असाव्यात असे बंधन फेसबुक घालत नाही. किंबहुना निवडणुकीच्या निमित्ताने दुष्प्रचार करणारी, खोट्या बातम्या देणारी पेजेस तयार केली जातात. आणि ट्रोल्सचे सैन्य सर्व चर्चांमधे घुसून भडक कमेंट्स करून सर्वसामान्य माणसांच्या मनात विष पेरत रहाते. हाच प्रकार अमेरिकेतील निवडणुकांच्या वेळी केंब्रिज अॅनालिटिकाने आणि रशियन हॅकर्सने केला होता.

म्हणजे आपल्याकडे दलितांवर अत्याचार झाला अश्या खऱ्या किंवा खोट्या बातम्या देणाऱ्या पेजची जाहिरात केवळ एका राजकीय पक्षाच्या पेजला लाईक करणाऱ्या लोकांना दिसतील, तर मुसलमानांनी काय खरे खोटे अत्याचार केले याच्या बातम्या देणाऱ्या पेजच्या, वेबसाईट्सच्या जाहिराती एका धर्माचे अनुयायी असणाऱ्या लोकांना दिसतील. हिंदू, बौद्ध, जैन, मुसलमान, शीख अश्या विविध धर्माच्या अनुयायांना वेगवेगळ्या जाहिराती दिसतील आणि त्यातही पुरुषांना, स्त्रियांना, तरुणांना, वृद्धांना, अधिकाऱ्यांना, कारकुनांना, डॉक्टरांना, वकिलांना वेगवेगळ्या जाहिराती दिसतील. आणि प्रत्येकाच्या मनात इतर समाजाविषयी चुकीच्या धारणा पसरविणे सोपे जाईल.

मग यातून बाहेर कसे पडायचे?

प्रश्न कठीण वाटला तरी उत्तरे सोपी आहेत.

१) कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या hate pages ना लाईक न करणे.
२) कुठलीही बातमी, शहानिशा न करता शेअर न करणे
३) भडक चित्रे, चिथावणीखोर भाषा किंवा व्हिडीओ असलेल्या बातम्या देणाऱ्या पेजेसना लाईक न करणे. त्यांच्या पोस्ट्स शेअर न करणे.
४) कुठलीही पाशवी अत्याचाराची बातमी आली तर त्यावरून रान पेटवण्याआधी, जर फेसबुक नसते तर अश्या बातम्या कानी पडल्यावर आपण काय केले असते असा प्रश्न स्वतःला विचारणे, आणि मग मन शांत झाल्यावर योग्य शब्दात व्यक्त होऊ याची खात्री झाल्यावर समाजमाध्यमांवर आपले मत किंवा विचार मांडणे.
५) सरकार कुठलेही येवो आपल्या समाजातील लोकांच्या चांगुलपणावरील आपला विश्वास ढळू न देणे.

हे करू शकलो तर अनेक निवडणुका आणि अनेक वादळे आपण सहज पचवू शकू.

No comments:

Post a Comment