Thursday, March 16, 2017

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग १)



‘संस्कार’ कादंबरी वाचली ती दहावी अकरावीत असताना. चाळीतल्या शेंडे काकूंनी त्यांच्या संग्रहातील प्रत वाचायला दिली होती. नंतर कित्येक वर्षे त्यांना ती कादंबरी परत करायला टाळाटाळ करत होतो आणि परत केल्यावर हातातून काहीतरी महत्वाचं निसटून गेलंय अशी भावना मनात सलत होती. पुढे पैसे मिळवू लागल्यावर लेखकाला ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून देणारी ही कादंबरी विकत घेतली. सुखांत किंवा दुःखांत नसलेली पुस्तके आधी वाचली होती. पण शेवटी उत्तर न देता प्रश्न पाडणारी आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सांगणारी ही कादंबरी वाचल्यानंतर यू आर अनंतमूर्ती या लेखकाबद्दल आदराशिवाय दुसरी कुठलीही भावना मनात येऊ शकत नाही. अवघ्या १२२ पानांत अनंतमूर्तींनी जे मांडलेलं आहे ते तितक्याच प्रभावीपणे श्री रं शा लोकापूर आणि श्री वि ग कानिटकरांनी मराठीत आणलंय.

अनंतमूर्तींनी संस्कारशिवाय अजून दोन कादंबऱ्या लिहिल्या. पण मला त्या मिळत नव्हत्या. तोपर्यंत भैरप्पा त्यांच्या पुस्तकातून भेटले. त्यामुळे भैरप्पा आणि अनंतमूर्तींचा वाद कळला. मला आवडलेल्या वंशवृक्ष या भैरप्पांच्या कादंबरीत अनंतमूर्तींनी काढलेली चूक आणि मला आवडलेल्या संस्कार या अनंतमूर्तींच्या कादंबरीत भैरप्पांनी काढलेली चूक वाचली. २००७ मध्ये भैरप्पांच्या आवरण या गाजलेल्या कादंबरीच्या प्रकाशनवेळी अनंतमूर्ती आणि भैरप्पा यांच्यात झालेल्या वादाचा धुरळा उडालेला पाहिला. अनंतमूर्ती म्हणाले, ‘भैरप्पा एक उत्तम वादविवादपटू आहेत पण ते कादंबरीकार नाहीत”. त्यावेळी भैरप्पा समर्थकांनी अनंतमूर्तींवर, “आयुष्यभरात केवळ अडीच कादंबरी लिहू शकणाऱ्या माणसाने भैरप्पांना कादंबरी लिहिण्यास शिकवू नये”, अश्या अर्थाने केलेले विधान वाचले (अनंतमूर्तींच्या दोन कादंबऱ्यांचे आकार बरेच छोटे आहेत). आणि अनंतमूर्तींच्या, ‘संस्कार’ सोडून इतर कादंबऱ्या वाचायच्या बाकी आहेत हे पुन्हा जाणवले. पण त्या मिळत नसल्यामुळे शांत राहण्याशिवाय इतर कुठलाही पर्याय नव्हता.

आणि डोंबिवलीत साहित्य संमेलन झाले. दोन दिवस पुस्तकांच्या राज्यात फिरताना इतके दिवस हुलकावणी देणाऱ्या अनंतमूर्तींच्या दोन कादंबऱ्या सापडल्या. त्यांची नावे भारतीपूर आणि अवस्था. सौ उमा वि कुलकर्णी आणि श्री विरुपाक्ष कुलकर्णी यांनी कन्नडमधून मराठीत रुपांतरीत केलेल्या साहित्याने माझ्याकडच्या कपाटातील एक कप्पा ओसंडून वाहतो आहे. ह्या सिद्धहस्त जोडप्याने माझ्यासारख्या कन्नड न कळणाऱ्या मराठी वाचकाला आजन्म ऋणी करून ठेवले आहे.

‘अवस्था’ आकाराने थोडी लहान असल्याने आधी वाचली. पण ती माझ्या मनावर अपेक्षित प्रभाव पाडू शकली नाही. त्यातील आस्तिकांची आणि कम्युनिस्टांची तुलना फारच लक्षवेधी होती. आणि नंतर कळले की घटश्राद्ध या कथेतून सुरु झालेला अनंतमूर्तींच्या विचारांचा रस्ता प्रथम संस्कार या कादंबरीवर पोहोचतो, तिथून तो दुसरी कादंबरी भारतीपूरला जातो आणि शेवटी अवस्था या कादंबरीमध्ये त्याचा शेवट होतो. दुसरी कादंबरी न वाचता मी थेट तिसऱ्या कादंबरीकडे वळलो म्हणून कदाचित माझा अपेक्षाभंग झाला असावा. मग भारतीपूर वाचायला घेतली. आणि पुन्हा एकदा अनंतमूर्तींच्याविषयीचा आदर दुणावला.

No comments:

Post a Comment