Saturday, July 22, 2017

आगमन निर्गमन आणि पुनरागमन (भाग ११)


युरोपमध्ये युरोपियनांच्या नकळत आर्थिक मानव अवतरला. त्याचे आगमन अनपेक्षित होते. आणि तो अवतरावा म्हणून कोणी त्याला किंवा अजून कुणाला साकडेही घातले नव्हते. किंबहुना तो अवतरत असताना त्याला सरकार आणि सामान्य माणसांकडून सारखाच विरोध झाला. पण तो आलाच. आणि आल्यावर त्याने केवळ युरोपचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा चेहरा बदलून टाकला. त्याने युरोपचा तळ ढवळून काढला. जुनी व्यवस्था पार मोडून काढली. प्रस्थापितांना उखडून फेकलं आणि नवोदितांनी पुढे येण्याचा मार्ग सुकर केला. अनेकांना भुकेकंगाल केलं पण अनेकांना सुखसमृद्धीचे मालक बनवलं. का जगायचं? का काम करायचं? किती काम करायचं? याची सगळी उत्तरं या आर्थिक मानवाने नव्याने दिली.

का जगायचं? सुख मिळवण्यासाठी.

का काम करायचं? नफा मिळवण्यासाठी.

किती काम करायचं? जोपर्यंत स्वार्थ साधता येतो आहे आणि नफा मिळतो आहे तोपर्यंत.

या उत्तरांमुळे स्पर्धा, नफा आणि स्वार्थ या तीन संकल्पनांना नैतिक अधिष्ठान मिळवून दिलं. ज्यांना ही नवीन उत्तरे, स्पर्धा, नफा आणि स्वार्थ यांना मिळालेले नैतिक अधिष्ठान पटले नाहीत ते आपोआप मागे पडत गेले.

कसा होता हा आर्थिक मानव? आणि त्याची वैशिष्ट्ये कोणती होती?

बाजार, वस्तू विनिमय आणि पैसा या गोष्टी मानवी इतिहासात फार प्राचीन काळापासून आहेत. पण त्या देखील सामाजिक मानावाभोवती फिरत होत्या. का काम करायचं? या प्रश्नाचं उत्तर बाजाराकडून मिळत नव्हतं. लोक एखादं काम करत होते कारण ते वडिलोपार्जित होतं किंवा मग कुठल्यातरी राजकीय शक्तीकडून त्यांच्यावर सक्ती केली होती म्हणून ते कामं करत होते. भलेही युरोपात भारतासारख्या जातीव्यवस्था नसतील तरीही तिथेही वडिलोपार्जित व्यवसाय हेच व्यवसाय निवडीचं कारण होतं. 'नफा मिळतो म्हणून अमुक एक व्यवसाय करू' हा विचार कुणाच्याही मनात येत नव्हता.

पण युरोपमध्ये साधारणपणे एकाच कालखंडात चार गोष्टी घडल्या.

१) एकसंध आणि सर्वशक्तिमान कॅथलिक चर्चचे विकेंद्रीकरण होऊ लागले.

२) मुस्लिम धर्माविरुद्ध विजयी होण्याची ख्रिश्चन धर्मियांची इच्छा रक्तपात घडवू लागली.

३) रेनेसांची (नवनिर्माणाच्या काळाची) सुरुवात झाली.

४) मानवी जीवनातील श्रम कमी करू शकणाऱ्या यंत्रांचे शोध लागू लागले.

या चार महत्वपूर्ण घटनांमुळे आर्थिक मानवाचे आगमन होण्यासाठी आवश्यक ती परिस्थिती निर्माण झाली. जेव्हा दुष्काळ, पूर, भूकंप, रोगराईसारख्या आपत्ती कोसळतात तेव्हा संपूर्ण समाजाला त्याचे चटके बसू लागतात. सगळेजण एकाच नावेतील प्रवासी असल्याने आपल्या दु:खाचे कारण ईश्वरी इच्छा आहे अशी मनाची समजूत घालणं सोपं असतं आणि समाजाला आपल्या नैतिक धारणा पुन्हा तपासून घ्याव्या असे वाटत नाही. पण वर उल्लेख केलेल्या चार महत्वाच्या घटनांमुळे युरोपात गरीब श्रीमंत यांतील दरी एकाएकी वाढली. आणि या घटना नैसर्गिक नसल्याने, ‘आपण सगळेजण एकाच नावेतील प्रवासी नाही. आपल्या दु:खाचे कारण ईश्वरेच्छा नाही’ असे विचार रुजण्यास सुरवात झाली. त्यामुळे युरोपियन समाजातील छोट्या वर्तुळात का होईना पण जुन्या नैतिक धारणांवर विचारमंथन सुरु झाले.

अगदी साधं उदाहरण द्यायचं तर लोकरीचे कापड तयार करणाऱ्या यंत्रांचा शोध लागल्यावर, कामगारांच्या कौशल्यावर आणि वेगावर अवलंबून राहण्यापेक्षा यंत्रांत गुंतवणूक करणे अधिक आकर्षक वाटू लागले. कारण यात निर्माण होणाऱ्या उत्पादनाची गुणवत्ता आणि सारखेपणा कल्पनातीत होता आणि उत्पादनाचा वेगही अचंबित करणारा होता. मग या अथक काम करणाऱ्या या यंत्रांची भूक भागवण्यासाठी मेंढीपालन महत्वाचे ठरले. आणि मेंढीपालनासाठी कुरणे मोकळी ठेवणे आकर्षक ठरले. शेती करण्यापेक्षा कुरणे राखणे कमी श्रमाचे आणि अधिक मोबदल्याचे ठरू लागले. म्हणून जमीनदारांनी आपल्या शेतजमिनी कुरणांत बदलल्या. त्यामुळे अनेक शेतमजूर बेकार झाले. भिकारी होऊन लाचारीचे जगणे त्यांच्या नशिबी आले. त्यामुळे एकट्या इंग्लडात अश्या बेकारांची संख्या इतकी वाढली की सामाजिक सुरक्षेला धोका होऊ नये म्हणून सरकारने त्यांना ठराविक भूभागाबाहेर येण्यास मनाई केली. ज्यांना असे सरकारी मदतीवर जगणे नकोसे वाटत होते ते यंत्रशक्तीवर काम करणाऱ्या कारखान्यात काम करायला तयार झाले. ज्यांचा पिढीजात व्यवसाय शेतजमिनीवर काम करणे होता ते कारखान्यात मजूर झाले. या सगळ्या बदलांत, आपण कारखान्यांत यंत्रे का वापरतो आहोत? आपण शेतजमिनी कुरणात का बदलतो आहोत? त्यावर पिढीजात कसणाऱ्या अनेक कुळांना आपण का विस्थापित करत आहोत? आपण पिढीजात शेतीचे काम सोडून कारखान्यात काम करायला का जात आहोत? या प्रश्नांची उत्तरे शोधणे सगळ्या समाजाला आवश्यक झाले. कारण नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कामी येणारे ईश्वरेच्छेचे प्रयोजन आता कामी येत नव्हते.

माणसाचे एक वैशिष्ट्य आहे. त्याला आपल्या जगण्यावागण्याला नैतिक अधिष्ठान असावे अशी सुप्त इच्छा असते. मग तो आपल्या जगण्यावागण्याचे समर्थन करू शकणारी नीतीतत्वे शोधून काढतो. एकदा ही नीतीतत्त्वे सर्वमान्य झाली की मग त्याच्या निर्णयांची तीव्रता आणि व्याप्ती वाढू लागते.

ईश्वरेच्छा, पिढीजात व्यवसाय, शासनाची इच्छा ही सगळी प्रयोजने बाद ठरलेल्या काळात युरोपात स्पर्धेचे, नफ्याचे आणि स्वार्थाचे तत्वज्ञान जन्माला आले. या तत्त्वज्ञानाने राजेरजवाडे आणि त्यांचे युद्धखोर सरदार दरकदार, जमीनदार आणि त्यांची कुळे आणि त्यांच्या वंशपरंपरागत उतरंडीला जबरदस्त धक्का बसला. आणि सगळ्यांना एका पातळीवर आणून त्यांचे ढोबळमानाने जमीनदार, कामगार, उद्योजक आणि भांडवलदार असे चार वर्ग बनवले. आणि आपल्याकडील जमीन, श्रमशक्ती, कल्पना आणि योजनाशक्ती आणि धन इतरांना उपलब्ध करून देण्यासाठी नफा आणि स्वार्थ ही तगडी कारणमीमांसा तयार होत गेली. कंपनी नावाची अमूर्त पण ताकदवान व्यक्ती बनण्याच्या प्रक्रियेला वेग आला. ठरलेल्या कामासाठी कंपनी देश किंवा राष्ट्रांपेक्षाही अधिक ताकदवान होती आणि तिच्यावर नागरिकांचे भले करण्याचेही ओझे नव्हते. त्यामुळे तिची ताकद अमर्याद होत चालली होती.

नवीन विचारांचे हे आगमन युरोपात बदलास सामोरे जाण्यास तयार नसलेल्या लाखो लोकांसाठी अत्यंत यातनादायी ठरले. राजांचे अधिकार कमी होण्यास आधीपासून सुरवात झालेली होती पण आता राज्यक्रांती होण्यासाठी समाज तयार झाला. लोकशाही विचारांचे आगमन होण्याची वेळ आली होती. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ह्या त्रयीचा अर्थ युरोपातील किमान काही लोकांना उमगू लागला होता. त्यांना स्वातंत्र्य हवे होते ते कुणा परकीय शक्तीपासून नव्हे तर त्यांच्याच जुन्या तंत्रापासून. त्यांना त्यांच्या समाजाला पुढे नेणारे जुने तंत्र झुगारून द्यायचे होते. त्यांना समता हवी होती पण ती आर्थिक मानव म्हणून. समता आली म्हणजे पूर्वाश्रमीचा राजा आपल्याला पंगतीला बसवेल अश्या भ्रमात ते नव्हते. पण जीवन जगण्याच्या धडपडीत सगळे समान आहेत ही मान्यता त्यांना हवी होती. पूर्वजांचे किंवा पूर्वाश्रमीचे कुठलेही ओझे नवीन आयुष्यावर पडू ना देता सर्वांना एकाच पातळीवरून सुरवात करण्याची मुभा आहे अशी मान्यता हवी होती. बंधुत्व म्हणजे कोणी आपल्या ताटातले काढून दुसऱ्याला स्वतःहून देईल अश्या गॉड स्वप्नांत ते रममाण नव्हते तर आर्थिक आणि सामाजिक व्यवहारांत प्रत्येक माणूस त्याचे धार्मिक संस्कार बाजूला ठेवून नवीन विचारांच्या सहाय्याने एका गटात सामील होऊ शकेल असा विश्वास त्यांना निर्माण करायचा होता.

भाग सहा मध्ये आगमन संकल्पनेबद्दल बोलताना मी वर्णन केलेली नवीन विचारांची प्रस्थापित विचारांबरोबरची लढाई युरोपने पूर्ण केली. त्याची भरपूर किंमत मोजली. आणि आपल्या समाजाला स्थिर करण्यासाठी, नवीन विचारांच्या आगमनामुळे समाजात होत असणारी उलथापालथ थोपवण्यासाठी युरोपमधून सुरु झाले ते विजेत्यांचे निर्गमन. त्यातून सुरु झाला वसाहतवाद आणि साम्राज्यवाद. म्हणजे युरोपात नवीन विचारांचे आगमन त्यांच्या समाजाच्या घुसळणीमुळे झाले. स्पर्धा, नफा आणि स्वार्थ यावर उभ्या राहणाऱ्या या अस्थिर व्यवस्थेला स्थिर करण्यासाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या संकल्पना पुढे आल्या आणि शेवटी त्याचे पर्यवसान साम्राज्यवादात होऊन जगातील इतर समाज आर्थिक मानवासाठी तयार नसताना त्यांत आर्थिक मानव आणि लोकशाही विचारांचे आगमन बाहेरून झाले. त्यामुळे या विचारांनी युरोपात जितकी पडझड केली त्यापेक्षा कित्येक पटीने मोठी पडझड इतर देशात होणार होती. पण त्याची कल्पना ना युरोपियन साम्राज्यवादयांना होती ना त्यांच्या विस्तारणाऱ्या साम्रज्यात जोडल्या जात असलेल्या प्रजेला.

1 comment: