Thursday, October 10, 2019

जिसने पाप ना किया हो

येशूच्या आयुष्यात एक प्रसंग आहे असं मानतात. माऊंट ऑफ ऑलिव्हजवर रात्र घालवून दुसऱ्या दिवशी देवळात लोकांना तो शिकवत असताना तिथे काही ज्यू धर्मनिष्ठ आणि ज्यू देवळातील कारकून तिथे आले. त्यांच्याबरोबर एक स्त्री होती. ती बाहेरख्याली आहे असा आरोप लावून तिला मोझेसने दिलेल्या कायद्यानुसार (दगड मरून मृत्युदंड) शिक्षा करावी का? असा प्रश्न ते विचारात होते. येशूने सुरवातीला या नवीन आलेल्या गटाकडे लक्ष दिले नाही आणि आपले शिकवणे चालू ठेवले. पण ते जेव्हा येशूला पुन्हा पुन्हा विचारू लागले तेव्हा येशूने जमिनीवर लिहीत लिहीत (किंवा चित्र काढत) म्हटले, तिला त्यानेच पहिला दगड मारावा ज्याने आयुष्यात कधीच पापं केलेली नाहीत. "the one who is without sin is the one who should cast the first stone" थोडक्यात "जिसने पाप ना किया हो जो पापी ना हो" हे गाणं येशूने त्या काळात गद्यात म्हटलं. आणि मग त्या ज्यू धर्मनिष्ठांना आपल्या वागण्यातला विरोधाभास कळला. त्या स्त्रीला शिक्षा देण्याचा आपला हट्ट त्यांनी सोडला. आणि ते तिथून निघून गेले. नंतर येशूने त्या स्त्रीला विचारले "तुला कोणी शिक्षा केली आहे का?" त्यावर ती स्त्री "नाही" म्हणाली. मग येशू म्हणाला "मीही तुला शिक्षा करत नाही. तू आता इथून जा आणि यापुढे पापाचरण करू नकोस".

दोन दिवसापासून फेसबुकवर आरेतील वृक्षतोडीविरुद्ध बोलणाऱ्यांना वृक्षतोडसमर्थक जी उत्तरे देत आहेत ते वाचून मला हीच गोष्ट सारखी आठवत होती.

वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांना विरोध करण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण
१) ते कार वापरतात,
२) त्यांच्या घरात लाकडी फर्निचर आहे,
३) अंत्यसंस्काराला ते लाकडंच जाळतात,
४) ते मुंबईत राहतात जिथे आधी भलंमोठं जंगल होतं. ते तोडलं तेव्हा ते गप्प होते,
५) त्यांना आरेतील रॉयल पाल्म्स किंवा फिल्मसिटी चालते, त्यावेळी ते गप्प होते,
६) भारतात ठिकठिकाणी जंगलतोड, डोंगर पोखरणे अनधिकृतपणे चालते, त्यावेळी ते गप्प राहतात,
७) गडचिरोतील आदिवासींच्या बाबतीत ते गप्प राहतात
८) त्यांचा विरोध सिलेक्टिव्ह विरोध आहे
९) ब्रिटिशांनी जेव्हा रेल्वे बांधली तेव्हा काय जंगलं साफ केली नव्हती का?,
१०) नंतर मेट्रोतून ते कधीच प्रवास करणार नाहीत याचं वचन देतील का?,

हे सगळं वाचून आपण नैतिकतेचा आणि कायद्याचा संकल्पनेचा भलताच अर्थ तर लावत नाही ना असा विचार माझ्या मनात आला.

या पोस्टचा विषय मेट्रोला विरोध करणे नाही. माझ्यामते सेव्ह आरे चळवळीतील कोणाचाच मेट्रोला विरोध नाही आहे. वृक्षतोड केली तरी दुसरीकडे रोपांची लागवड होणार आहे ते प्रभावी आहे की नाही? हा देखील या पोस्टचा विषय नाही. मेट्रोमुळे प्रदूषण कमी होईल का? लोकलमधून पडून मारणाऱ्या लोकांचे प्राण वाचतील का? रस्त्यावरील कार्सची संख्या कमी होईल का? मुंबईत येणारे लोंढे थांबतील का? मेट्रोमुळे वाहतूक सुविधा वाढली म्हणून तिथली लोकवस्ती अजून वाढेल का? तिथल्या जागांचे भाव अजून वाढतील का? बिल्डर लॉबी या मागे आहे का? भारताच्या विकासात खोडा घालू इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा यात हात आहे का? ख्रिश्चन धर्मानुयायी लोकांच्या पोटात दुखणे चालू आहे का? यापैकी एकही मुद्दा या पोस्टचा विषय नाही.

सरकारी निर्णयाला (मग ते फडणवीसांचे असो किंवा केजरीवाल किंवा बॅनर्जी किंवा मोदी शहांचे) जाब विचारण्याचा हक्क नागरिकांना आहे की नाही? असला तर तो अनिर्बंध आहे की नाही? आणि तो हक्क बजावण्याआधी येशूने आणलेलं नैतिकतेचं तत्व इथे लागू होतं की नाही? याबद्दल ही पोस्ट आहे. (इतकं सगळं स्पष्ट सांगूनही काही मित्र मैत्रिणी नसलेल्या मुद्द्यांवर प्रतिसाद देतील याची मला खात्री आहे. पण तो समाजमाध्यमांच्या स्वरूपाचा आणि मानवी स्वभावाचा दोष आहे असं मानून मी पुढे जातो)

येशूची गोष्ट नीट वाचली तर खालील मुद्दे लक्षात येतात.
१) अनैतिक संबंध ठेवणे शिक्षापात्र पापाचरण आहे हा मोझेसचा कायदा आधीपासून अस्तित्वात होता आणि तो सगळ्यांना माहिती होता.
२) त्यासाठी मृत्युदंड हीच शिक्षा होती. जर मुलगी कुमारिका असेल तर तो मृत्युदंड दगडं मारून करणे अस उपकलम त्या कायद्यात होतं, हेही सर्वांना माहिती होतं.
३) मोझेसच्या मृत्यूनंतर येशू साधारण १५२८ वर्षांनी जन्माला आला. तोपर्यंत ज्यू लोकांतील कायद्याचे ज्ञान आणि त्याच्या अंमलबजावणीतील तत्परता आणि कट्टरता वाढली असली तरी मोझेसच्या कायद्याच्या दृष्टीने ज्याला पापाचरण मानले जात होते ते संपले नव्हते. त्यामुळे तथाकथित पापाचरण चालू होते. त्यातील जे उघडकीस येत होते त्यांना एकतर शिक्षा होत होती किंवा मग त्याकाळची माणसेही फार वेगळी नसल्याने कदाचित लाचखोरी होऊन पकडलेल्याना सोडून दिले जात असावे. हा भ्रष्टाचार येशूला माहीत होता.
४) येशूने त्या स्त्रीला माफ करून मोझेसचा कायदा संपवला नव्हता. तर त्याने कायद्याच्या अंमलबजावणीतील भ्रष्टाचार संपवला होता.
५) त्याने स्त्रीचे वर्तन पाप नाही असं न म्हणता पुढे असं पापाचरण करू नकोस असं म्हटलं होतं.
६) त्याने शिक्षा देणाऱ्यांना नैतिकतेचा आग्रह धरला होता.
७) म्हणजे येशूने कायदा मोडीत न काढता कायदा राबवणाऱ्यांवर जबाबदारी वाढवली होती. आणि स्वतः तथाकथित देवपुत्र असूनही स्वतः शिक्षा देण्याची जबाबदारी अंगावर घेतली नव्हती.

म्हणजे येशूने मांडलेली नैतिकतेची संकल्पना अधिकारी व्यक्तीने इतरांना शिक्षा देण्याच्या बाबतीत आहे. अधिकारी व्यक्तीला इतरांनी जाब विचारण्याच्या बाबतीत नाही. येशूचं सुदैव हे की अधिकारी व्यक्ती स्वतःहून त्याच्याकडे समस्या घेऊन आले त्यामुळे मोझेसने सांगितलेली शिक्षा रद्द करण्याचा येशूला नैतिक अधिकार काय? याआधी त्याने मोझेसचा कायदा पाळला जावा म्हणून आग्रह धरला होता की नाही? मग आताच का कच खातोय? असे प्रश्न कुणी येशूला विचारले नाहीत. आणि "बहुतेक येशू स्वतःच स्खलनशील असावा", अश्या वावड्याही उठल्या नाहीत.

आता आपण वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांच्या मुद्दा बघूया.
ते सरकारला शिक्षा ठोठावत आहेत का? ते लगोलग शिक्षेची अंमलबजावणी करत आहेत का? ते सरकार उलथवून लावत आहेत का? ते निःसंदिग्ध कायदा किंवा संदिग्ध कायद्यावरील निःसंदिग्ध निकालाचे उल्लंघन करीत आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. त्यामुळे त्यांना सरकारला जाब विचारण्याचा नैतिक अधिकार आहे का? हा प्रश्नच अस्थानी ठरतो.

सरकारने कारशेड आरेत बनवणे अयोग्य आहे, इतर पर्यायांचा विचार केला आहे आणि ते अव्यवहार्य आहेत असा प्रचार करणे अयोग्य आहे, हे त्यांचे मुद्दे आहेत. ते खरे की खोटे हे न्यायालयात सिद्ध होईल. त्यासाठी सरकारने न्यायालयात माहिती सादर करताना खोटेपणा केला नसेल तर त्यानंतर जो निर्णय होईल तो मान्य करावा ही माझीही अपेक्षा असेल.

पण यामुळे कित्येकांना असे वाटू शकते की सरकारला जाब विचारण्याचा अधिकार इतका सोपा आणि सगळ्यांना उपलब्ध करून दिला तर अनेक देशविघातक शक्ती किंवा सरकारविरोधी शक्ती याचा वापर करून देशातील विकासकामांना खोडा लावू शकतील. आणि देशाची प्रगती रोखू शकतील किंवा तिला विलंब करवून तिचे फायदे कमी करवू शकतील.

हा धोका मला मान्य आहे. पण यावर उपाय म्हणजे सरकारला जाब विचारणाऱ्यांवर नैतिकतेचे बंधन घालणे नाही. जोपर्यंत निवडून येणाऱ्या पक्षाला कोण, किती आणि कश्या स्वरूपात देणगी देतं? याची माहिती कायमस्वरूपी सगळ्यांसाठी उपलब्ध (केवळ मागितल्यावर नाही) होत नाही, जोपर्यंत सरकारात बसलेल्या पक्षाच्या मंत्र्यांनी किंवा त्यांच्या नातलगांनी वैयक्तिक आयुष्यात करत असलेल्या उद्योगांवर पारदर्शकतेचे बंधन सक्तीचे करता येत नाही, तोपर्यंत केवळ आपल्या आवडत्या पक्षाचा माणूस आहे म्हणजे तो भ्रष्टाचार करणारच नाही असा विश्वास समाजाला खड्ड्यात घालणारा ठरेल. विदेशी शक्ती केवळ आपण करीत असलेल्या विकासात खोडा घालण्यात धन्यता मानतात असे नसून इथल्या नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास घडवून अंतिमतः देशाला जेरीला आणू शकतात हे विसरून चालणार नाही. त्यासाठी ते सरकारांना विकतही घेऊ शकतात. जर आपले सरकार ईडी, आयकर, सीबीआय विरोधकांविरुद्ध वापरू शकते तर आंतरराष्ट्रीय संस्था किंवा भांडवलदार आपल्या सरकारमधील अधिकारी व्यक्तींवर दबाव आणू शकणार नाहीत ही समजूत भाबडेपणाची आहे.

त्यामुळे सरकारला जाब विचारण्याचा अधिकार हा नैतिकतेच्या कक्षेबाहेर असला पाहिजे. उद्या जर सरकारने शाळा कॉलेजजवळ परमिट रूम उघडण्यास परवानगी दिली तर ज्यांच्या घरात दारूच्या बाटल्या आहेत, जे सहकुटुंब मद्यसेवन करतात, त्यांना या निर्णयाविरुद्ध बोलण्याचा अधिकार नाही असं म्हणणं चुकीचं आहे. मी तर म्हणीन अट्टल बेवड्यालासुद्धा सरकारच्या अश्या निर्णयाविरुद्ध आवाज उठवण्याचा अधिकार आहे. अर्थात अट्टल बेवड्याला या निर्णयाविरुद्धच्या लढाईचे नेतृत्व करू द्यावे की नाही हा त्या समाजातील लोकांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. पण विरोध करणारे अनेक नागरिक दारू पितात किंवा बेवडे आहेत म्हणून तो लढाच अनैतिक ठरत नाही.

सरकारकडे सामान्य नागरिकांपेक्षा जास्त अधिकार असतात. त्यामुळे सामान्य नागरिकांपेक्षा नैतिकतेची जबाबदारी सरकारवर जास्त असते. अधिकारी व्यक्तीवर नैतिकता टिकवण्याची जबाबदारी सामान्य नागरिकांपेक्षा जास्त असते. हेच तत्व प्रभू रामचंद्रालाही माहिती होते. आणि त्या एकपत्नी, एकबाणी, मर्यादापुरुषोत्तमाने याच तत्वाचे पालन करताना सीतामाईच्या चारित्र्यावर शंका घेणाऱ्या धोब्याला अशी शंका घेण्याचा नैतिक अधिकार आहे काय? असा प्रतिप्रश्न केला नव्हता.

जेव्हा सरकारच्या भ्रष्टाचाराला, अनैतिक निर्णयांना, बेकायदेशीर कारवाईला आळा घालण्याचं काम असलेला विरोधी पक्षही सरकारच्या निर्णयात कुठल्याही कारणामुळे सहभागी होतो तेव्हा त्या निर्णयाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या नागरिकांना नैतिकतेच्या जाळ्यात अडकवून त्यांचा आवाज दाबणे म्हणजे आपण आपल्या लोकशाहीचा गळा घोटणे आहे.

वाढत जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे अमरनाथचे शिवलिंग मोठे होत नाही किंवा लवकर वितळते. म्हणून सरकार जर यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या नियंत्रित करू इच्छिते तर "आधी सगळ्यांना परवानगी होती मग आता का परवानगी नाकारत आहात?" असा युक्तिवाद कुणी केला तर तो जितका हास्यास्पद असेल तसेच 'आधी झाडं कापली तेव्हा नाही बोललात, अजूनही अनधिकृतपणे सगळीकडे झाडं कापतात, तेव्हा त्या माफियांविरुद्ध नाही बोलत, तर आता सरकार झाडं कापताना बोलायचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही" हा युक्तिवाद देखील हास्यास्पद आहे.

नैतिकतेच्या मुद्द्याला दोन पदर आहेत. शिक्षा देताना शिक्षा देणाऱ्याची नैतिकता आणि धोरण ठरवताना किंवा राबवताना अधिकारी व्यक्तीला जाब विचारणाऱ्याची नैतिकता. जर आपल्याला लोकशाही व्यवस्थित टिकवायची असेल तर जाब विचारणाऱ्याला नैतिकतेच्या बंधनातून मुक्त केले पाहिजे. त्यांनी लढ्याचे नेतृत्व करावे की नाही हा मुद्दा पूर्णतः वेगळा. अश्या लोकांनी नेतृत्व केले तर लढा क्षीण होतो हे मला मान्य आहे. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वर्तनामुळे त्यांनी मांडलेल्या मुद्द्याची तीव्रता आणि योग्यता कमी होत नाही. जाब विचारणाऱ्या प्रत्येकाला जर नैतिकतेच्या बंधनात अडकवले तर अधिकारारूढ सरकार अजून बळकट होत जाईल. आणि अधिकारारूढ असताना बळकटी मिळाली तर भ्रष्टाचाराची शक्यता वाढेल असाच मानवी समाजाचा इतिहास सांगतो.

त्यामुळे बालादपि सुभाषितं ग्राह्यम् च्या वचनाला स्मरून मी तर म्हणीन अनैतिकादपि विरोधम् ग्राह्यम् .

Wednesday, September 4, 2019

थोडक्यात सांगायचं झालं तर

जर्मन भाषेतील 'कुर्त्झगेझाग्ट' म्हणजे इंग्रजीतील 'In a nutshell' किंवा मराठीतील 'थोडक्यात सांगायचं झालं तर'.

तर या कुर्त्झगेझाग्ट नावाचं एक युट्यूब चॅनेल आहे. वेगवेगळ्या वैज्ञानिक संकल्पना सुंदर अॅनिमेशनच्या सहाय्याने थोडक्यात समजावून सांगणे हा या चॅनेलचा उद्देश आहे. आणि हे काम करत गेली सहा वर्षे ते यशस्वीपणे टिकून आहेत.

असं काही चॅनेल आहे हे मला माहिती नव्हतं. सकाळी पोरांना घेऊन बाहेर गेलो होतो. त्यांच्याबरोबर रिसेशनवर गप्पा मारत होतो. काही व्हिडिओ बघत होतो. एक दीड तासाने मी जरा गप्प बसलो तर मोठा लेक म्हणाला, "बाबा तुला एक व्हिडिओ दाखवायचा आहे. विषय वेगळा आहे. पण तुला आवडेल."

मी गाडी चालवत होतो. त्याने व्हिडिओ लावला आणि मग मला ९०लाख सबस्क्रायबर असलेल्या आणि २०१३ साली स्थापन झालेल्या या चॅनेलची ओळख झाली. मग उरलेला दिवस या चॅनेलच्या मागे कधी संपला ते कळलंच नाही.

जो व्हिडिओ लेकाने आग्रहाने दाखवला त्याचं नाव होतं The Egg.

अॅण्डी वियर नावाच्या लेखकाच्या कथेवर बेतलेला हा व्हिडीओ गेली दोन वर्षं बनत होता. दि १ सप्टेंबरला तो अपलोड केल्यापासून आज ४ सप्टेंबरला संध्याकाळी सातपर्यंत त्याला ६६लाख लोकांनी पाहिलंय.

काळ एकरेषीय असतो या गृहितकाला छेद देत आयुष्याचं प्रयोजन सांगणारा हा व्हिडीओ नितांतसुंदर आहे.

या निमित्ताने गेल्या वर्षी सुरू केलेली सिध्दार्थ मालिका पूर्ण करण्याची इच्छा तीव्र झाली. आणि मुलांना स्मार्टफोन घेऊन दिल्याचं चीज झाल्यासारखं वाटलं.

 

इतिहासाची पुनरावृत्ती

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस किंवा विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जर फेसबुक असतं तर किती वेगळं चित्र दिसलं असतं.

सतीबंदीवरची भद्र लोकांची अभद्र मतं राजा राममोहन रॉयना जितकी ऐकू आली त्यापेक्षा अधिक जास्त प्रमाणात ऐकू आली असती. आणि सतीसमर्थकांनी रॉयविरूध्द जनमत एकत्र करून त्यांना बिनशर्त माफी मागायला लावली असती.

नेहरू सुभाष संबंधांबद्दल उडणाऱ्या अफवा बघून सुभाषबाबूंनी आझाद हिंद सेनेला 'चलो दिल्ली' ऐवजी 'चलो घर' म्हणून बरखास्त तरी केले असते किंवा मग 'तुम मुझे खून मत दो क्यूंकी उससे मै तुम्हे केवल अंग्रेजोंसे आजादी दे सकता हूं, तुम्हारे अज्ञानसे नही |' असं म्हणत अज्ञातवास स्विकारला असता.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? किंवा पुनश्च हरिओम सारख्या अग्रलेखांवर आम जनतेची मतं. गणेशोत्सव आणि शिवजयंती सार्वजनिक साजरी करण्यावरून केवळ ब्रह्मवृदांतंच नाही तर जनसामान्यांत उठलेला गदारोळ टिळकांना अधिक तीव्रतेने ऐकू आला असता. आणि कदाचित त्यांनी 'कायमचा रामराम' असा एखादा अग्रलेख लिहून केसरीला टाळं ठोकलं असतं.

सावरकरांची जन्मठेप व त्यानंतरच्या सशर्त सुटकेच्या बातम्या, गाय हा उपयुक्त पशू आहे सारख्या त्यांच्या विधानांवर आणि 1857 चे स्वातंत्र्यसमर सारख्या पुस्तकांवर वाचकांची मते त्यांना लगोलग मिळाली असती. आणि सरकारने लादलेल्या शर्तींचा भंग करून पोहत जाऊन त्यांनी अंदमानचे काळेपाणी गाठले असते.

पुणे करार. गोलमेज परिषदा. दांडी यात्रा. असहकार आंदोलन. फाळणी. पाकिस्तानला दिलेले पन्नास लाख. हिंसाचाराचा आगडोंब यासारख्या प्रत्येक घटनेवर लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून आपण 'पराई पीड जाणत नाही' म्हणून गांधीजींनी स्वतःला 'वैष्णव जन' मानणं सोडलं असतं.

चवदार तळे, पुणे करार, मंदिर प्रवेश, मनुस्मृती दहन, निवडणुकीतील पराभव, धर्मांतर यासारख्या घटनांवर आपल्या विरोधकांच्या अनुयायांची टोकाची मतं आणि स्वतःच्या मूक अनुयायांना गतकालीन मानसिकतेला सोडताना होणारा प्रचंड त्रास पाहून तो महान मूकनायक हतबल झाला असता की अधिक त्वेषाने लढला असता?

जुनागढ आणि हैदराबाद येथील सरकारी समर्थनाने आणि काश्मीरबाबतीत पाकिस्तान समर्थनाने चालणाऱ्या पेड ट्रोल्सच्या पोस्टचा मारा सहन न होऊन पोलादी पुरूष भारतीय एकीकरण व्हायच्या आधीच वितळला असता.

एडविनाची उडवली जाणारी खिल्ली, नियतीशी करारच्या भाषणावरील लोकांची मते, अणुऊर्जा, शिक्षण, आय आय टीची स्थापना, धरण प्रकल्प यावर प्रस्थापितांची आणि विस्थापितांची मते ऐकून पंडीतजी पुन्हा भारत एक खोज लिहायला बसले असते.

कधी कधी वाटतं मार्क झुकरबर्गच्या आईबाबांनी मार्कला जन्म देण्याची घाई न केल्याने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला अप्रत्यक्षपणे मोठी मदत केली आहे. नाहीतर आपल्या वाडवडिलांनी त्यांच्या समाजबांधवांना रोजच्या रोज फेसबुकवर हाणून आणि नेत्यांना कायम तोंडघशी पाडून आजच्या पिढीला पारतंत्र्यात जन्माला घातलं असतं.

फोडा आणि झोडा हे ब्रिटिशांचं राजकारण नव्हतंच हे मला फेसबुकमुळे कळलंय. फोडा आणि झोडा ही भारतीय प्रवृत्ती आहे.

Tuesday, September 3, 2019

उत्क्रांती

पाठीवर सॅक, अंगावर ढगळ टीशर्ट, कमरेवर ढगळ जीन्स, डोक्यावर उलटी टोपी, त्यातून बाहेर आलेला आणि पाठीवर लोंबणारा केसांचा शेपटा अशा अवतारातला तिशी चाळीशीचा तरुण, एअरपोर्टच्या वॉशरुममधे माझ्याशेजारी दोन जागा सोडून एका हाताने व्हॉटस अॅप झरझर वापरत निसर्गाच्या हाकेला ओ देत, कुठलाही अपघात होऊ न देता उरलेल्या मोकळ्या एका हाताने जीन्सची चेन लावत फोनच्या स्क्रीनवरुन नजर अजिबात न हटवता ज्या सहजतेने बाहेर गेला ते पाहता पूर्ण लक्ष देऊन दोन हात वापरूनही कायम अपघातप्रवण असलेला मी अतिशय आश्चर्यचकित झालो आहे.

उत्क्रांतीत माझ्यापुढे असलेला तो जीव पाहून; माणसांकडे पहाताना ओरांग उटान, चिंपांझीला काय वाटत असेल त्याचा अनुभव घेतो आहे.

अटकेपार इकॉनॉमिक्स

मी आर्थिक बाबींवर लिहिताना गांभीर्य पाळतो. कारण तो विषय मला पूर्णपणे कळत नसला तरी अतिशय आवडतो.

आर्थिक बाबींवर लिहिण्याचे दोन प्रकार असतात.

१) डेटासकट लिहिणे. सेन्सेक्स इतक्या टक्क्यांनी वाढला. जीडीपी अमूक एक टक्क्यांनी कमी झाला. बेरोजगारीचा दर, रेपो रेट असा असा कमी झाला /वाढला वगैरे. डेटा वाचताना वाचकाला एखादी संकल्पना माहिती नसेल किंवा कळली नाही तर तो ती शोधून समजून घेईल अशी अपेक्षा असते. हे लिखाण बातमीसारखं असतं.

2) केवळ संकल्पनांवर लिहिणे. यात डेटापेक्षा संकल्पनांवर भर दिलेला असतो. भाषा सोपी किंवा क्लिष्ट असू शकते. संकल्पना कळली की ती कुठे वापरायची ते वाचक शोधेल अशी खात्री असते. हे लिखाण कथेसारखं असतं.

माझं लिखाण दुसऱ्या प्रकारात मोडतं असं मला वाटतं.

पहिल्या प्रकारचं लिखाण महत्त्वाचं असतं कारण ते विमानाच्या डॅशबोर्डप्रमाणे महत्वाच्या निर्देशांकांची एका क्षणात माहिती देतं. हुशार विमानचालक त्या माहितीचा अचूक वापर करून आपल्या विमानाचं इंजिन गरम न करता, इंधन वाया न घालवता, वेगावर नियंत्रण ठेवत, केबिन प्रेशर योग्य ठेवत, एअर पॉकेट्स, जमिनीपासूनची उंची या सर्व बाबींना लक्षात ठेवत आणि आतल्या प्रवाशांच्या सोयीत कमीत कमी घट करत प्रवास सुखकर करतो.

पण डॅशबोर्ड म्हणजे काय? डॅशबोर्डवरची माहिती कशी वापरायची? याचं ज्ञान नसलेल्या माणसाला इंजिनच्या हीट इंडिकेटरचा आकडा, केबिन प्रेशर, आर्द्रता वगैरे सांगून काही उपयोग होत नसतो. झालाच तर त्रासच होतो. आपापल्या पूर्वानुभवानुसार आणि मतीनुसार ते आपापले निर्णय घेऊ शकतात आणि त्यामुळे समस्या असेल तर ती कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता जास्त असते.

पण म्हणून अशा प्रकारची माहिती देऊच नये या मताचा मी नाही. माहिती सर्वांना उपलब्ध असणे हा आधुनिक अर्थाभ्यासाचा पाया आहे. पण आधुनिक अर्थाभ्यासाचं अजून एक गृहीतक आहे. ते म्हणजे व्यक्ती रॅशनल असते. तर्कशुद्ध रहाणे आणि भावनांवर हेलकावे न खाणे हे प्रत्येक व्यक्तीकडून अपेक्षित असतं.

तर्कशुद्ध विचार करायचा कसा? भावनांना मतांवर आरुढ होण्यापासून कसं रोखायचं? हे समजण्यासाठी संकल्पना समजून घेणं आवश्यक असतं. संकल्पना अमूर्त असतात. त्यांचे शब्दरुप हीच त्यांची मूर्ती असते. अर्थव्यवस्था अमूर्त असते. त्यामुळे अमूर्त अर्थव्यवस्थेबाबतच्या अमूर्त संकल्पना समजावून सांगणे अजून कठीण असते.

सांगणाऱ्याचे शब्दवैभव, विषयाची सखोल माहिती, आणि वापरलेल्या उदाहरणाची मार्मिकता यावरून ठरते की सांगणारा आपल्या मनातले सर्व काही यथास्थित वाचकापर्यंत पोचवण्यात यशस्वी झाला की नाही.

अगदी साधं उदाहरण म्हणजे मंदीबाबत बोलताना अनेकदा 'तेजी मंदीचं चक्र असतं' असं म्हटलं जातं. त्यातील चक्र या शब्दामुळे संकल्पना वेगळ्या पद्धतीने वाचकाला समजते. म्हणून मी 'तेजी मंदीच्या लाटा शब्द' वापरतो. पण दोन तीन दिवसापूर्वीची पोस्ट लिहिताना जाणवलं की या लाटा तलावातल्या आहेत की नदीतल्या की समुद्रातल्या ते कळणार कसं? आणि खरंतर एखाद्या देशाची अर्थव्यवस्था म्हणजे पाण्यातील लाटांवरुन चालणारं जहाज नसून हवेच्या लाटांच्या तडाख्यात सापडलेलं विमान असतं. याचाच अर्थ ज्याला मंदी म्हणजे महामार्गावरील खड्डा वाटतो किंवा समतल तलावातील लाट वाटते किंवा नदीतली लाट किंवा समुद्रातील लाट त्या प्रत्येकाचं मंदीबाबतची आकलन वस्तुस्थितीपेक्षा बरंच वेगळं असणार.

म्हणून विषय सोपा करण्यापेक्षा चपखल पण शक्य तितकी अचूक उदाहरणे देण्याकडे माझा कल असतो.

अर्थात मी सर्वज्ञ नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर, सरकारने डेफिसिट फिनान्सिंग ऐवजी सरप्लस ट्रान्स्फरचा मार्ग अवलंबला म्हणजे नक्की काय फरक पडला? डेफिसिट फिनान्सिंगमधे आरबीआयचा ताळेबंद भक्कम रहातो पण अर्थव्यवस्थेत जास्त पैसा खेळू लागल्याने महागाई वाढते. हे मला माहिती आहे. पण सरप्लस ट्रान्स्फरमुळे आरबीआयचा ताळेबंद नाजूक झाला असला तरी आता महागाई वाढेल का? हे मला अजूनही नीट कळलेलं नाही. मी त्याबाबत अजून वाचन करतो आहे. त्यामुळे माझ्या पोस्ट्स केवळ मला काय कळतं ते दाखवणारा पिसारा नसून कित्येकदा तो इथल्या मित्रांबरोबर केलेला संवाद असतो. त्यातून मला माझं अज्ञान दूर करता येतं आणि माझ्या उदाहरणांतील कच्चे दुवेही लक्षात येतात.

पण फेसबुकवर संवाद साधणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. अर्थविषयक निर्णय सरकार घेत असल्याने आणि सरकारसमर्थक व विरोधकांत अर्थनिर्णयांना राजकीय निर्णयाचे पूरक म्हणून बघण्याची सवय असल्याने इथल्या अर्थसंकल्पनांविषयक पोस्टवर अपरिहार्यपणे राजकीय कमेंट्स येतात आणि संकल्पना पूर्ण समजून घेण्याऐवजी शाब्दिक आसूडाचे फटकारे ऐकू येत रहातात.

मी पॉलिटिकल सायन्सपेक्षा इकॉनॉमिक्समधे जास्त रस घेतो. आणि त्यातल्या सीमारेषा मला स्पष्ट दिसतात. माझ्या बऱ्याच मित्र मैत्रिणींना त्या तशा दिसत नाहीत हे मला आता कळून चुकलंय. त्याबद्दल माझी तक्रार नाही. पण त्यामुळे जेव्हा पोस्ट भरकटते तेव्हा ज्या संकल्पनांचा व्यूह पाश्चात्य समाजाने रचला, जो आपण कळत नकळत स्वीकारला, जो आपल्या जीवनावर सर्वांगीण प्रभाव पाडतो, तो समजून घेण्यासाठी आपण अजूनही पुरेसे गंभीर नाही, हे जाणवून मन थोडं खट्टू होतं.

मी पोस्ट लिहिताना राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवतो आणि माझ्या मित्र मैत्रिणींनी शक्य असेल तर माझ्या पोस्टवर किंवा अन्यत्रही आर्थिक संकल्पनाविषयक पोस्टवर राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवला तर अटकेपार गेलेल्या मराठी भाषेत अर्थविषयक संकल्पना अधिक स्पष्टपणे व्यक्त होऊन त्याचा अप्रत्यक्ष फायदा पुढील अनेक पिढ्यांना होईल याची मला खात्री आहे.

त्याचबरोबर माझे काही मित्र मैत्रिणी पोस्ट ऐवजी अन्य बाबींवर कमेंट करुन काव्य आणि विनोदाचा आनंद घेत असतात. त्याला कदाचित माझी किंचित विनोदी विषयांवर पोस्ट्स लिहिण्याची सवयही कारणीभूत असेल, हे मला मान्य आहे. पण शास्त्रविषयक पोस्टवर काव्य विनोद माफक असेल तर शोभून दिसतो अन्यथा शोभा होते हे वेगळे सांगायला नको.

कुणाला कदाचित माझी ही पोस्ट पटणार नाही. पण गूगल वापरून अर्धवट निदान करुन डॉक्टरशी वाद घालणाऱ्या पेशंटपेक्षा चुकीची उदाहरणं देऊन आणि अर्थाभ्यासाला राजकारणाची उपशाखा मानून सर्वत्र राजकीय मते मांडणारे लोक अधिक घातक आहेत. कारण जेव्हा पेशंट गडबड करतो तेव्हा तो केवळ स्वतःच्या जीवनाशी खेळतो. याउलट अर्थविषयक संकल्पनांना कमी लेखणारा समाज या ना त्या प्रकारे गुलामीत रहातो.