Saturday, June 4, 2016

सगुणातून निर्गुणाकडे, साकारातून निराकाराकडे, वरदायी कडून जबाबदारीकडे

One of my Facebook Friends, Mr. Irshad Bagwan, posted that despite his repeated efforts to avoid it, his brain used to project the image of his grandfather as Allah. Following are the screenshots of his post and my comments thereon

(Irshad's Original Post)

Part 1 of series of my comment on Irshaad's Post

Part 2 of series of my comment on Irshaad's Post
Then I fulfilled my promise with this long comment, given below....

बाकी सर्व प्राण्यांपेक्षा माणसात वेगळे काय असेल तर ते म्हणजे त्याची विशिष्ट प्रकारे जबाबदारी घेण्याची वृत्ती. तो स्वतः जबाबदारी घेतो आणि इतरांनी पण जबाबदारी घ्यावी अशी त्याची अपेक्षा असते. धर्म किंवा समाजव्यवस्था काय करतात, तर ही जबाबदारी घेण्याची वृत्ती वाढीस लावतात. कधी कधी तर लादतात देखील. यामुळे अनेक मानवी देहधारी जीवांची कुचंबणा देखील होते. पण कधी राजीखुशीने तर कधी समाजाच्या रेट्याने पार पाडलेल्या जबाबदाऱ्यांमुळे  मानवी संस्कृती आज इथपर्यंत येउन पोहोचली आहे.

जबाबदारी घेण्याच्या आणि तिच्या सातत्याच्या अपेक्षेचा कळस म्हणजे मानवी जीवनात प्रचंड रस असलेला पितृरुपी ईश्वर. हा ईश्वर व्यक्तीने व्यक्तीशी, व्यक्तीने समूहाशी, समूहाने व्यक्तीशी आणि एका समूहाने दुसऱ्या समूहाशी कसे वागावे त्याचे नियम देतो. नियम पाळल्यास मृत्यूनंतरच्या परलोकातील सुखाचे आश्वासन देतो आणि  ते मोडल्यास प्रचंड मोठ्या शिक्षेची भीती देखील दाखवतो.

या ईश्वरकल्पनेचे साध्य फक्त एकच असते. व्यक्तीने परलोकातील सुखाच्या लालसेने किंवा शिक्षेच्या भीतीने इहलोकातील जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. त्यांच्यापासून दूर पळू नये. त्यामुळे अश्या प्रकारची ईश्वर कल्पना असणारे सर्व धर्म, मग ते मूर्तिपूजक असोत किंवा नसोत, ईश्वराला सगुण साकार किंवा निर्गुण निराकार, कसाही मानणारे असोत, शेवटी हे सर्व धर्म, या सर्व व्यवस्था, ईश्वराला मानवी आयुष्यात ढवळा ढवळ करण्यात प्रचंड रस असण्याचा गुण चिकटवतातच.

मूर्तिपूजकांचे काम थोडे सोपे असते. जे नीती नियम त्यांना स्वतःला पाळायचे असतात ते सगळे नियम ते देवाला लावू शकतात. यांचे देव शाप देतात, वर देतात, आपापसात स्पर्धा करतात. जे जे काही माणसांत होते ते ते सर्व काही करतात. आणि मग जे केले त्याच्या परिणामातून मुक्त देखील नसतात. मग कुणी सहस्त्राक्ष होतो, कुणावर काळे डाग पडतात, कुणी तुंदिलतनू होतो. मग यांच्या कृत्याचे परिणाम देणारी शक्ती अस्तित्वात आणावी लागते. या शक्तीला मग निर्गुण निराकार असावेच लागते. ती कशातच  ढवळा ढवळ करत नाही. ती निसर्ग चक्र चालू देते. कारण आणि परिणाम यांच्या साखळीला तिचा आधार असतो.

म्हणजे या व्यवस्थेत तीन पदर असतात. पहिला पदर असतो मानव. हा सगुण, साकार, निसर्ग नियमांनी बांधलेला आणि मर्त्य असतो. यालाच समाजाच्या नियमांनी बांधण्यासाठी बाकीचे दोन पदर आवश्यक असतात. दुसरा पदर असतो देव. शाप किंवा वर देणारे, स्तुतीमुळे आराधनेमुळे खुष होणारे आणि आराधना न केल्यास कोपणारे हे देव सगुण, साकार, निसर्ग नियमांनी बांधलेले, पण समाज बंधनातून मुक्त आणि अमर असतात. आणि या सगळ्यांचा कर्ता करविता म्हणजे तिसरा पदर म्हणजे परमेश्वर. हा निर्गुण, निराकार, अमर असतो. तो मानवी नीती नियमांच्या कक्षेबाहेर असतो. त्याला सुख-दु:ख, आनंद-वैताग, दया-द्वेष, प्रेम-वैर अश्या भावना नाहीत. आपल्या स्तुतीने श्रद्धाळूपणामुळे तो खूष होत नाही. आणि आपल्या निन्देने किंवा अश्रद्ध पणामुळे त्याला वाईट देखील वाटत नाही. तो निर्लिप्त असतो. आगीवर पाय पडला की भाजतो. मग तो लहान बाळाचा असो की वयोवृद्ध माणसाचा. समाजाच्या दृष्टीने पापी माणसाचा असो की पुण्यवान माणसाचा. सगळ्यांसाठी सारखाच परिणाम. तसे काहीसे परमेश्वराचे स्वरूप असते.

पण सातत्याने बदलत राहणाऱ्या निसर्गामुळे, मूर्तिपूजकांनी बनवलेल्या ईश्वर कल्पनेच्या या व्यवस्थेत मग साचलेपणा येतो. समाजाचा आकार बदलल्यावर, पर्यावरणात  बदल घडून आल्यावर, निसर्गाचे चक्र निसर्ग नियमाने बदलल्यावर, समाजाचे नीती नियम बदलावे लागतात. जुने देव कामी येत नाहीत. निर्गुण निराकार तर निर्लिप्त असतो. यावर तोडगा म्हणून मग आणखी नवीन देवांची निर्मिती होते. या सगळ्यात सुसूत्रता नसते. मग ही हरवलेली सुसूत्रता पुन्हा आणण्यासाठी मूर्तीपूजक लोक अवतार संकल्पना मांडतात. निर्गुण निराकाराने धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी घेतलेला अवतार. हा अवतार सगुण असतो, साकार असतो. बऱ्याचदा तो मानव देहधारी असतो. तो माणसाची सर्व सुख दुःखे भोगतो. तो बहुधा अमर नसतो. त्याचे अवतार कार्य संपले की तो देह सोडतो.

अश्या प्रकारे मूर्तिपूजक सगुण आणि निर्गुण, साकार आणि निराकार यांची उपयुक्त मांडणी करून, मानवाला समाजाप्रती जबाबदार करतात आणि त्याच्याकडून बऱ्यापैकी चाकोरीबद्ध वर्तन घडवून आणून समाजाचा गाडा चालवितात.

जे धर्म मूर्तीपूजा निषिद्ध मानतात, आणि देव संकल्पनेचा दुसरा पदर नाकारतात, त्यांना मानवाचा संबंध थेट निर्गुण निराकार परमेश्वराशी लावायची कसरत करावी लागते.

जो निर्गुण निराकार ईश्वर मोझेसला, इजिप्शियन देवांच्या इच्छेने चालणारा राजप्रासाद सोडून बारा वर्षे मेंढपाळाचे जीवन जगून झाल्यावर, सिनाईच्या डोंगरावर जळत्या झुडपाच्या रुपात भेटला. जो निर्गुण निराकार ईश्वर येशूला समाजाच्या अवहेलनेला झेलल्यानंतर आणि जुन्या कराराचे पालन होत नाही आहे हे पूर्णपणे समजल्यावर, कर्मकांडांनी भरलेल्या जेरुसलेमच्या देवळात अंतर्यामी भेटला. जो निर्गुण निराकार ईश्वर  प्रेषितांना वयाची चाळीशी उलटल्यावर, जगाचे टक्के टोणपे खाल्ल्यावर देवदूतामार्फत भेटला. आणि ज्या निर्गुण निराकार ईश्वराने स्वतःच्या स्वरूपाचे ज्ञान या महात्म्यांना दिले;  ते सर्व ज्ञान, ईश्वराचे ते सर्व आकलन, सामान्य माणसाला, देवदूताच्या मदतीशिवाय, जगाचे टक्के टोणपे न खाता, शरीरात आणि मनात निसर्ग काय आणि कसा हैदोस घालू शकतो ते माहीत नसण्याच्या अजाणत्या वयात, तसेच्या तसेच कळेल याची मला खात्री नाही. त्यात मला हे देखील दिसते की हे तीनही महात्मे सगुण साकार ईश्वर कल्पना किंवा कर्मकांड जीवनात धुडगूस घालत असण्याच्या काळात जन्मले आणि मोठे झाले. त्यानंतर त्यांना निर्गुण निराकार ईश्वराचे ज्ञान झाले आणि तरीही त्यांचे हृदय प्रेमाने, दयेने आणि मानावाप्रती अपार करुणेने भरलेले राहिले. त्यांनी मूर्तीचा, मूर्तीपूजेचा अव्हेर केला असला तरी त्यानी मानवाचा अव्हेर कधीही केला नाही.

म्हणजे प्रेषितांचा प्रवास, प्रत्यक्ष देवाच्या किंवा देवदूताच्या मार्गदर्शनाखाली सगुण साकाराकडून निर्गुण निराकाराकडे झाला आणि ते क्षमाशील राहिले. याउलट जेंव्हा सामान्य माणूस, सगुणाकडून निर्गुणाकडे, साकाराकडून निराकाराकडे या प्रेषितांच्या राजमार्गावर न चालता, कुठल्याही  दैवी शक्तीच्या मार्गदर्शनाशिवाय,  थेट निर्गुण निराकाराची भक्ती करू लागतो, तेंव्हा तो गोंधळेल नाही तर काय?  दया, क्षमा शांती या भावना त्याच्यात उद्भवल्या तरीही त्या क्षणिक राहतात. आणि बरेचदा, मूर्ती का फोडायची ते कळण्याआधीच, मूर्ती फोडता फोडता, माणसाप्रतीचे प्रेम देखील सोडतो. आणि प्रेषितांनी सांगितलेला जिहाद, जो स्वतःच्या अज्ञानाशी असला पाहिजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जुन्या अपरिपक्व जाणीवा सोडताना जो केला पाहिजे, त्या ऐवजी तो इतर माणसांविरुद्ध केला जातो. आपल्या जाणीवा संपूर्ण करण्याकडे लक्ष देण्याऐवजी इतरांच्या जाणीवा आपल्या वाडवडिलांनी सांगितलेल्याप्रमाणे आहेत की नाहीत याकडे कट्टरपणे लक्ष देण्यात अनेक जण आपल्या आयुष्याची इतिकर्त्यव्यता मानतात.

जग कसे आहे ते समजणे महत्वाचे आहेच पण हे जग आपल्याला कश्या प्रकारे समजते ते समजणे देखील महत्वाचे आहे. जर महात्म्यांना निराकाराची जाणीव साकाराची भक्ती पूर्णपणे बघितल्यावर झाली तर आपण सामान्य लोक देखील त्या निराकाराची ओळख साकारातून नक्कीच घेऊ शकू. महात्म्यांच्या उलट दिशेने प्रवास करून आपण फारसे काही साध्य करू शकणार नाही. किंबहुना, वयाच्या चाळीशीनंतर अनेक मूर्तिपूजकांना त्यातला फोलपणा कळलेला असतो. अनेकदा ते सशक्त पर्याय उपलब्ध नाही किंवा केवळ तो दुसऱ्या समूहाच्या मान्यतेचा आहे म्हणून नाकारतात किंवा केवळ सवयीचा भाग म्हणून मूर्तिपूजेला, सगुण साकाराच्या पूजेला कवटाळून बसतात. त्यांचे वागणे असे आहे कारण सध्याचे उपलब्ध पर्याय गुंतागुंतीचे आहेत.

त्यापेक्षा आपण जर भक्तीची सुरवात होत असताना सगुणाचे अस्तित्व मान्य केले; जसजसा आणि ज्याचा ज्याचा सगुणावरचा विश्वास कमी होऊन त्याचे मन निर्गुण निराकाराचे, नीती पल्याड असलेल्या ईश्वराचे अस्तित्व मान्य करून देखील समाजाप्रती असलेल्या आपल्या जबाबदारीचे पालन करण्यास तयार होईल; त्याला सगुण भक्ती ही निर्गुण भक्तीची पहिली पायरी आहे असे जाणवू दिले तर त्याचा आणि सर्वांचा गोंधळ कमी होईल. आणि कट्टरता देखील नाममात्र उरेल. म्हणून  Irshad Bagwan माझ्या दृष्टीने, नमाज पढताना आजोबांची मूर्ती डोळ्यापुढे येण्याचा  तुमचा अनुभव म्हणजे निर्गुण परमेश्वराच्या भक्तीच्या दिशेने आणि कट्टरतेकडे पाठ फिरवून उचललेले पहिले पाऊल वाटते. या प्रवासात तुम्हाला माझ्या शुभेच्छा.

No comments:

Post a Comment