Tuesday, March 19, 2019

Fault Lines



काल 'भारतीय तत्वज्ञान' नावाचं पुस्तक वाचत होतो. तत्त्वज्ञानाच्या व्याख्येबद्दल लिहिताना लेखक श्रीनिवास दीक्षितांनी सॉक्रेटिसचं वचन उदघृत केलं.

सॉक्रेटिस म्हणतो की तत्त्वचिंतक सुईण असतो. सुईण मूल निर्माण करत नाही. आईच्या उदरात असलेल्या मुलाला बाहेर येण्यास मदत करते. त्याचप्रमाणे तत्त्वचिंतक विश्लेषणाच्या पध्दतीने लोकांच्या मनात असलेल्या सत्याला अविष्कृत करत असतो.

ते वाचताना मला जाणवलं की राजकीय नेते एका पध्दतीने तत्त्वचिंतक असतात. फक्त सत्याऐवजी ते धारणांचा / पूर्वग्रहांचा वापर करतात. जे लोकांच्या मनात आधीपासून असते त्याचा ते अविष्कार करुन दाखवतात.

मग समाजाच्या वेगवेगळ्या गटात गतकालीन आणि वर्तमानकालीन नेत्यांबद्दल, एकेका गटाबद्दल आजकाल व्यक्त होणारा विखार असा का असावा त्याचं कोडं उलगडतं आहे असं वाटलं. आपल्यापैकी अनेकांच्या मनात इतरांबद्दल आधीपासून असलेली अढी, राजकीय नेते अविष्कृत करुन दाखवतात.

प्रत्येक बहुजिनसी समाजात आधीपासून fault lines अस्तित्वात असतात. नेते त्यांच्यावर पडणाऱ्या दाबांना वाढवू शकतात किंवा कमी करु शकतात.

गरीब-श्रीमंत, शहरी-खेडुत, हिंदू - मुस्लिम. सवर्ण - इतर, सुशिक्षित - अशिक्षित, मालक - नोकर, प्रस्थापित - धडपडे, भांडवलवादी - इतर. स्त्री - पुरुष, वृद्ध - तरुण,हे आणि असे अनेक छोटे छोटे गट आपल्या fault lines सकट आपल्या समाजात आधीपासून अस्तित्वात आहेत. आणि आपले नेते, समाजमाध्यमांवर व्यक्त होणारे त्यांचे समर्थक ; या fault lines वर पडणारा दाब वाढवत आहेत.

असा विचार मनात आला आणि एक सत्य गवसल्याचा आनंद झाला. माझ्या देशात फोडा आणि झोडाचं सूत्र वापरल्याबद्दल इंग्रजांवरचा राग थोडा कमी झाला. आणि आता कुठल्याही राजकीय पक्षाला ते सूत्र वापरता येऊ नये म्हणून आपल्यावरची वाढलेली जबाबदारी जाणवली.

No comments:

Post a Comment