Tuesday, March 19, 2019

मोठा भाऊ आणि पुरंदर

१) माझे वडील गावातून येऊन मुंबईजवळ स्थायिक झाले. चाकरमानी असल्याने त्यांचा शिवसेनेकडे ओढा होता. आपल्या खळ्ळ खट्याक करणाऱ्या मित्रांचं गुणगान पण शाळेतून एकजरी तक्रार घरी आली तर मला चालणार नाही अशा त्यांच्या धोरणामुळे शिवसेनेच्या कार्यपद्धतीबद्दलचं माझं आकर्षण, त्यांच्या नकळत त्यांनीच कमी केलं. आर्थिक उदारीकरणानंतर मी पदवीधर झालो. तोपर्यंत शिवसेनेने मराठी मुद्दा सोडून हिंदुत्वाची कास धरली होती. त्यामुळे माझ्यासाठी शिवसेनेची ओढ वाटण्याचं कारण उरलेलं नव्हतं.

२) २०१४ मधे शिवसेनेने 'मोठा भाऊ' हा शब्द फार वापरला. नंतर धुसफूस करत आणि राजीनाम्याचं शस्त्र वापरत आपले नेते टिकवून ठेवले. स्वबळाच्या घोषणा करत शेवटी काल युतीची घोषणा केली.

Source : Internet 
३) युती करणारे दोघे असून सोशल मीडियावर खिल्ली मात्र शिवसेनेचीच उडवली गेली. आणि अनेक कट्टर शिवसैनिक हताश होऊन स्वपक्षावर आणि नेत्यांवर टीका करताना दिसले.

४) मोदी लाट, केंद्रात आणि राज्यात भाजपचा वरचष्मा, सर्वपक्षांतून नेत्यांची भाजपने चालू ठेवलेली आयात, नोटबंदी आणि जीएसटी नंतर महानगरपालिकांच्या अर्थव्यवस्थेवर घडलेला प्रतिकूल परिणाम, शब्दात लीलया खेळून समाजमाध्यमांवर शिवसेनेची खिल्ली उडवणारे, पण पक्षश्रेष्ठींच्या प्रत्येक कोलांटउडीलाला शिरोधार्य मानणारे भाजपा समर्थक आणि भावनिक होऊन स्वतःच्या शब्दात अडकणारे आणि पक्षश्रेष्ठींवर आपला शब्द चालतो का नाही यात गोंधळून जाणारे शिवसैनिक... अशा सगळ्या गडबडीत शिवसेना नेत्यांनी खरंतर युती करून स्वपक्षाला थोडंफार अधिक आयुष्य बहाल केलं आहे.

५) आता खरी कसोटी शिवसैनिकांची आहे. जर राज्यापुरती समसमान जागावाटणी झाली आहे आणि युती जिंकली तर मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल तर शिवसेनेला भविष्य आहे. पण जर युती जिंकत असताना भाजपने जास्त जागा जिंकल्या तर शिवसेनेची विघटन प्रक्रिया सुरू होईल.

६) त्यामुळे आता शिवसैनिकांचं आपल्या संघटनेवर प्रेम असेल तर त्यांना शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने निवडून आणण्यासाठी कंबर कसायला पर्याय नाही. ही वेळ जर त्यांनी अपेक्षाभंगाचं दुःख करण्यात आणि आपल्याच नेत्यांवर टीका करण्यात घालवली तर शिवसेना संपवण्यात खरा हातभार भाजपऐवजी सैनिकांकडून लागेल.

७) बाळासाहेबांसमोरचे प्रश्न वेगळे होते. त्यांची उत्तरं वेगळी होती. आताच्या शिवसेनेचे प्रश्न वेगळे आहेत. तेव्हा जुनी उत्तरं चालणार नाहीत.

८) कानामागून येऊन तिखट झालेल्या धाकट्या भावासमोर आपला मान ठेवणं सोपं नसतं. अशा वेळी गप्प बसून आपलं काम कसं करावं ते समजत नसेल तर शिवसैनिकांनी अनिल अंबानीच्या मोठ्या भावाकडे बघावं. धीरुभाईंच्या मृत्यूनंतर जास्त आवाज अनिल अंबानींचा झाला होता पण आज मुकेश अंबानीच मोठा भाऊ आहे हे सिद्ध झालं आहे.

९) शिखरांवर चढण्यापेक्षा चढलेल्या शिखरांवर टिकणं कठीण असतं.

१०) जमल्यास शिवसेना नेत्यांनी मातोश्रीचं नामकरण 'पुरंदर' करावं. ;-)

No comments:

Post a Comment