Monday, January 23, 2017

पॉर्नबंदी


२०१६मध्ये केंद्र सरकारने पॉर्न बंदी करण्याचा प्रयत्न केला.  एका आठवड्यात मोडून पडला. त्यावेळी मित्रांशी झालेला संवाद



माझ्या आवडत्या लेखिका इरावती कर्वे बाई त्यांच्या काळातील पिवळ्या कव्हरच्या पुस्तकांबद्दल बोलताना म्हणाल्या होत्या की वाचून किंवा चित्रे बघून माणसाला मिळणारे सुख जास्त हवे हवे वाटते. कारण त्यात शारीरिक मेहनत नसते. मनात विचार आले की ते प्रत्यक्षात आणण्यासाठी बर्याच गोष्टींची जुळवाजुळव करायला लागते. जोडीदार, त्याचा मूड, जागा, वेळ आणि स्वतःची इच्छा सगळ्यांची जुळवाजुळव करताना बऱ्याचदा इच्छेची तीव्रता कमी होते आणि त्यानंतरदेखील प्रत्यक्षात अनुभव घेताना, जागेची योग्यता, त्या वेळेची आल्हादकारकता, संपूर्ण वातावरणाचा परिणाम, जोडीदाराचा मुखश्वासगंध आणि होणारे शारीरिक श्रम यामुळे अनुभव कल्पनेच्या तोडीस तोड असेल याची खात्री नसते.

याउलट जेव्हा शरीरभोगांची वर्णने पुस्तकात येतात, चित्रात दिसतात किंवा चित्रपटात पाहायला मिळतात तेंव्हा हे जागेचे, वेळेचे, वातावरणाचे, घामाचे, गंधाचे आणि श्रमाचे परिणाम भोगावे लागत नाही आणि मेंदूला मात्र सर्व समाधान मिळते. संपूर्ण शरीराऐवजी केवळ डोळे आणि मेंदू हे दोनच अवयव बाकी सर्व अवयवांचे काम करतात. गंध आणि स्पर्शदेखील केवळ कल्पनेने अनुभवाला जातो. म्हणून पिवळी पुस्तके आणि कामुक चित्रपट बहुतेकांना खासगीत तरी आवडतातच.

ज्या गोष्टींमुळे मेंदूला श्रमाशिवाय मिळणारे गंमत हवीहवीशी वाटते त्याच गोष्टींच्या अभावाने मग मेंदूला मिळणारे दृष्टिसुख कमी वाटू लागते. मिळणाऱ्या झिणझिण्या कमी होऊ लागतात. अनुभवांची तीव्रता जाणवेनाशी होते. मग सुरु होते केवळ शब्दातून किंवा चित्रातून किंवा कलाकारांकडून मेंदूला पटकन उद्दीपित करू शकेल, बोथटलेल्या जाणिवांना धक्का देऊ शकेल, अश्या कलाकृतीची अपेक्षा. मग कला कुठे संपते आणि क्रौर्य कुठे सुरु होते हे कळण्याचा मार्ग नसतो.

सभ्य समाजात समाजघटकांना होणाऱ्या सर्वच नाही तरी शक्य तितक्या भावनांचे विरेचन होणे आवश्यक असते. यात एक विरोधाभासी गंमत अशी की विरेचनाची साधने नसल्यामुळे किंवा मुबलक प्रमाणात असल्यामुळे दोन्ही वेळेस समाजात बुभुक्षितपणाच वाढीला लागतो.

म्हणून सरकारचे आणि नागरिकांचे काम केवळ साधनांच्या नियंत्रणाचे नसून समाजाला जाणवणाऱ्या भावना आपल्या पूर्वजांच्या संस्कृतीशी सांधून घ्यायला शिकवणे हे देखील असते. त्यामुळेच आपल्या भावनांबद्दल अपराधी वाटण्याऐवजी किंवा त्यासाठी नैतिक- अनैतिक किंवा कायदेशीर - बेकायदेशीर मार्ग चोखाळण्याऐवजी समाज अधिक जबाबदार होऊ शकेल.

नाहीतर खजुराहो आणि वात्स्यनांची भूमी, राधा कृष्णाच्या बिन लग्नाच्या प्रेमाची मंदिरे बांधणारी भूमी खोट्या नैतिकतेखाली कुंभ मेळ्यात आणि नवरात्रोत्सवात कंडोमच्या होणाऱ्या वाढत्या खपाबद्दल आश्चर्य व्यक्त करत बसेल.



माझ्या कालच्या इरावती कर्वे बाईंच्या लेखनावर आधारीत लेखावर लिहिलेल्या कमेंट आणि पोस्ट वर आलेल्या प्रकट आणि खाजगी प्रतिक्रियांवर विचार करताना सुचलेले विचार इथे मांडतो आहे


ओमकार, आपल्या समाजावरची तुझी व्यक्ती आणि समष्टी वाली कमेंट वाचताना जाणवले कि, आपल्या भारत देशाचे प्रश्न फारच वेगळे आहेत …. इंग्रजांच्या गुलामीतून मोकळे झालेले इतर देश इंग्रजी आक्रमणापूर्वी सामाजिक, वैचारिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अप्रगत होते या उलट जाती पातीमध्ये आणि जुन्या अंधश्रद्धामध्ये अडकलेला भारतीय समाज वैज्ञानिकदृष्ट्या अप्रगत असला तरी सामाजिक आणि वैचारिक दृष्ट्या खूपच प्रगत होता …. त्यामुळे इंग्रजी अमलाखालील इतर देशांच्या इतिहासाचे सरळ सरळ दोन भाग पडतात,

१) इंग्रजी राज्याच्या आधीचे अंधार युग ,
२) आणि इंग्रजी राज्याच्या नंतरचे नवीन युग

ज्यांना समाज हि संकल्पना माहिती नव्हती त्यांनी एक भाषा, एक धर्म, एक देव आणि व्यापाराची एक संस्कृती असलेली देशाची संकल्पना इंग्रजांकडून उचलली आणि तिथपासूनच त्यांच्या देशाचा इतिहास सुरु होतो ….

भारताचे मात्र तसे नाही…. इंग्रजी अंमल चालू होण्यापूर्वी आपण जन्म मृत्यूच्या आणि कर्म सिद्धांताच्या वर्तुळाकार चक्रात फिरणारा एक संस्कृतिपूर्ण समाज निर्माण केला होता … या समाजात पाश्चात्यांप्रमाणे देशाची एकरेषीय संकल्पना नसली तरी वेगवेगळी सार्वभौम राज्ये असलेली अनेकदा लयाला जाऊन मनात कायम तेवत असलेली राष्ट्राची संकल्पना होती….

या केवळ संकल्पनारूपी राष्ट्रात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या चालीरीती, भाषा, खाद्य संस्कृती, कुटुंब व्यवस्था गुण्यागोविंदाने नांदत होत्या. चर्चिल ने सांगितलेल्या एका भाषेने आणि एका देवाने जोडला गेलेला आणि एका राजाशी निष्ठा ठेवणारा असा आपला देश कधीच नव्हता …. काही भागात स्त्री सत्ताक पद्धती होती तर काही भागात पुरुष सत्ताक. काही भागात अनेक पत्नी असणे तर काही भागात अनेक पती असणे समाज मान्य होते. काही भागात योनी पूजा तर काही भागात लिंग पूजा प्रचलित होती. काही भागात कनिष्ठ वर्णीयांच्या स्त्रिया वरिष्ठ वर्णीयांच्या कायम सेवेसाठी होत्या तर काही भागात रोटी बेटी व्यवहार आणि शरीरसंबंध पूर्णपणे नियंत्रित होते. काही ठिकाणी खजुराहोचे उन्मुक्त प्रदर्शन आणि कामाख्येची पूजा होती तर काही ठिकाणी ब्रह्मचारी हनुमंत पूजनीय होता… इंग्रजांशी लढून स्वतंत्र केलेला हा देश कधी देश नव्हताच मुळी.

त्यात पुन्हा भर पडते ती आपल्या वर्तुळाकार इतिहासाची. पाश्चात्य संस्कृती एक रेषीय आहे. पुढील पिढी केवळ त्यांच्या मागील एका पिढीचे अनुकरण किंवा उल्लंघन करते पण कोणी मागच्या च्या मागच्या पिढीचे अनुकरण करत नाही. येशू आवडला ना मग आदम, मूसा वगैरे विसरून जायचे. मुहम्मद आवडला ना मग येशूला पण विसरून जायचे. अब्राहम, इसाक, इस्माइलचे नाव घ्या पण नियम पाळायचे शेवटच्या प्रेषिताचे. त्यामुळे समाजात एकाच बिंदूतून निघून वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या नवीन रेषा तयार होत असतील पण सर्व रेषा अंतहीन आणि सरळच रहातात वर्तुळाकार होत नाहीत. या उलट भारतीय समाजाच्या वर्तुळाकार पद्धतीत प्रत्येक नवीन पिढी वर्तुळाच्या केंद्रबिंदूत जन्म घेते आणि हळू हळू परीघामध्ये रूपांतरित होते. त्यामुळे प्रत्येक नवीन पिढीला आपल्या इतिहासाचा आरंभबिंदू स्वतःच्या मागे न मिळता स्वतःच्या समॊर विस्तारणाऱ्या परिघात बघत येतो … त्यामुळे एकमेकांशी असंबद्ध असा सगळाच भूतकाळ आपल्या इतिहासाचा भाग होतो. कोणी एकपत्नी रामाचा आदर्श ठेवतो तर कुणी अनेकपत्नी कृष्णाचा. कुणी खजुराहोला आपलेसे करते तर कुणी ब्रह्मचारी हनुमंताला. कुणी सती प्रथा मानतो तर कुणी विधवा विवाह. कुणी जातीप्रथा मानतो तर कुणी वसुधैव कुटुंबकम. कुणी जरठकुमारी विवाह मानतो तर कुणी त्याला चिमुकल्यांचे लैंगिक शोषण.

मग ह्या प्राचीन वैविध्यपूर्ण राष्ट्राचे रूपांतर एका विकसित देशात करायचे तरी कसे ?

कदाचित जास्त आततायी वाटेल पण मला वाटते कि इतर कुठल्याही देशाने न सोडवलेला पेच आपल्या देशासमोर आहे तो म्हणजे विस्तृत आणि विविधतापूर्ण प्राचीन इतिहासामधून पुढील काळासाठी जे उपयोगी पडेल तो इतिहास निवडून घेण्याचा. अश्या निवडा निवडीत बरेच जन समूह दुखावले जातील आणि ज्यांच्या हाती हे काम देऊ ते एकाचवेळी इतिहासाचे जाणकार आणि भविष्याचा खोल वेध घेऊ शकणारे दूरदर्शी असावे लागतील. अशी उत्तुंग व्यक्तिमत्त्व कमीच असतील त्यामुळे आपला इतिहास ठरवण्याच्या या कर्मकठिण प्रयत्नाला एका व्यवस्थेचे रूप द्यावे लागेल. जे घेतले ते का घेतले त्याची कारणे स्पष्ट ठेवावी लागतील आणि जे सोडले त्याला फेकून न देत त्याचे प्रेमपूर्वक विसर्जन करावे लागेल. सोडलेल्या त्या इतिहासाला नाकारून गाडून टाकायचे नसून, त्याला केवळ एक कालवश झालेल्या परंतू अमुल्य आणि प्रिय अश्या खापरपणजोबांचे रूप द्यावे लागेल. सद्य स्थितीत आपल्या समाजाकडे इतकी प्रगल्भता नसेल कदाचित पण भाषावार प्रांत रचनेचा प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी करून आपण १००% नाही तरी विशेष उल्लेखनीय श्रेणीत पास होण्याची क्षमता तर नक्कीच दाखवली आहे .

No comments:

Post a Comment