Monday, January 23, 2017

मसान


माझे मित्र मंदार काळे उर्फ रमताराम यांनी मसान चित्रपट पाहून त्यावर जग दस्तूरी रे या लेखात त्याचे रसग्रहण केले. ते वाचून चित्रपट न पाहताच माझ्या मनात केवळ रसग्रहणामुळे  जे विचार आले ते लिहून ठेवले होते.



Source ; Internet 
मी मसान पाहिला नाही अजून, पण परीक्षण वर्तमानपत्रात वाचले आणि दूरदर्शन वर पाहिले… YouTube वर ट्रेलर देखील पाहिले होते… ह्या रविवारी कुटुंबाला द्रिष्यमचे दिलेले वचन पूर्ण करायचे असल्याने मसान पाहण्यासाठी वेळ कसा काढायचा त्याच्या विचारात होतो तेवढ्यात तुमची परीशीलनाची पोस्ट वाचली आणि मूळ चित्रपटापेक्षा तुमच्या लेखाची वाट पाहू लागलो .

खूप छान लिहिले आहे तुम्ही. माणसाला कुठल्या गोष्टी चटकन दिसतात त्यावरून त्याच्या विचारांची दिशा, प्राथमिकता आणि वैचारिक क्षमता दिसून येते… आणि या सर्वच पातळींवर तुम्ही वाचणाऱ्याला तुमच्या अनुभवाजवळ घेऊन जाण्यात यशस्वी झाला आहात. वाचायला सुरुवात केल्यानंतर एक क्षणही इकडे तिकडे न बघावसं वाटावं इतकी छान पकड आहे आणि दुसऱ्या कुठल्याही विषयावर विचार न करता यावा इतकी सुंदर मुद्देसूद मांडणी आहे लेखाची … अगदी लेख संपल्याची -oOo- खूण देखील या चित्रपटाच्या अस्सलपणाची आणि रमता राम ह्या रसग्रहणात किती रमला होता त्याची साक्ष देते.

या सुंदर परिशीलनापुढे काही लिहिणे म्हणजे सोनियाच्या ताटी नरोटी ठेवण्यासारखे आहे हे माहिती असून मी नाथ महाराजांचे उसने अवसान आणून काही विचार मांडतो.

सृष्टीच्या अविरत चालणाऱ्या चक्रात आपण हिंदू लोकांनी उत्पत्ती - लय - विनाशाचे तीन बिंदू शोधले आणि वर्तुळाला त्रिकोणाचे स्वरूप दिले. मग त्रिमूर्तीची संकल्पना मांडून हि तीन कामे तीन देवांना वाटून टाकली. निर्माण करणारा ब्रम्हा, प्रतिपाळ करणारा विष्णू आणि संहार करणारा महेश. आणि मग त्याहिपुढे जाऊन त्यांच्या वास्तव्याच्या जागा ठरवून टाकल्या.

जसे आपले जीवनाचे आकलन तशीच आपली मांडणी. जीवन सुरु कुठून आणि का होते त्याचा काही पत्ता लागत नाही म्हणून त्याचा अनुत्तरीत प्रश्न विसरून जायचा, इतका कि त्याच्या देवतेचे स्थान नगण्य ठेवायचे. जीवनाचे प्रेम आणि सुखांची ओढ प्रचंड म्हणून प्रतिपाळ करणाऱ्याला अवतारांच्या रूपाने घरात, नगरात, आणि मंदिरात मंगलतेचे प्रतीक बनवून त्याच्या लीलांचे प्रेममय वर्णन करून मधुरा भक्तीची नवीन परंपरा सुरु करायची आणि अनर्थकारी आणि अतर्क्य मृत्यूला भिउन संहारकर्त्याला वेशीबाहेर; आपल्या प्रेममय, मंगलमय, सुखी जीवनापासून दूर ठेवायचे. कुठे ? तर मसणात. बनारस किंवा वाराणसीला आपण ओळखतो तेच मुळी त्याच्या मृत्यूशी असलेल्या गाठीमुळे. संहाराची देवता महादेवाचं हे क्षेत्र. महादेव आपण बहाल केलंय स्मशान. मराठी बोलीभाषेत मसण आणि हिंदी बोलीभाषेत मसान. हे बनारस म्हणजे अखिल हिंदूंचे सर्वात मोठे मसान.

आपण जरी या त्रिकोणी रचनेत बऱ्यापैकी स्थैर्य शोधले असले तरी मुळात निसर्ग फिरतोय वर्तुळात. ज्याला नसतो आरंभ आणि नसतो अंतदेखील. प्रत्येक बिंदू असतो त्याच्या मागील बिंदूचा अंत तर त्याच्या पुढील बिंदूचा आरंभ. प्रत्येक बिंदू असतो निर्माता आणि संहारकर्ता देखील. म्हणूनच आरती प्रभू म्हणाले असावेत,

अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी

वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी

देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी

हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे ।।

परंपरेला मानणाऱ्या सर्वांचा अंत त्यांचा अस्त होण्याआधीच होतो आणि परंपरे विरुद्ध हळी देणारे सारेच हुतात्मे होत असतात .

एकूण काय, विकासाचे सुख अशाश्वत ठरून शाश्वत राहतो फक्त आरंभ आणि अंत. आपल्याला आवडो किंवा नावडो, उत्पत्ती आणि विनाश हे दोनच बिंदू शाश्वत ठरतात आणि त्या दोघांमधील भासमान अंतरातील आपल्या वाटचालीला आपण उगाच विकासाचे, प्रगतीचे, उन्नतीचे गोंडस नाव देऊन त्यात आपले सुख शोधत असतो.

मी आधी म्हटल्याप्रमाणे हे दोन बिंदू वेगवेगळे नसून प्रत्येक बिंदू दोन्ही कामे करीत असतो, एका नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे. जी निर्मिती तोच संहार. जो ब्रह्मा तोच महेश. इकडून पाहिला तर ब्रह्मा आणि तिकडून पाहिला तर महेश.

विष्णूला खरं तर निसर्गात स्थान नाहीच. असलेच तर नाण्याच्या जाडीएव्हढे भासमान कार्यक्षेत्र विष्णूचे. निर्मिती म्हणजेच विनाशाच्या ह्या अविरत चक्रात भांबावून बुडणाऱ्या आपल्या अस्तित्वाला काडीचा आधार म्हणजे विष्णू आणि त्याचे अवतार.

जीवनदात्री निसर्गदेवता म्हणून जिचे पूजन करावे ती आहे खरी तर निर्दय मृत्युदेवता आणि आपले जीवन म्हणजे म्हणजे या मृत्युदेवतेचे तांडव करण्याचे ठिकाण … स्मशान - मसण, शमशान - मसान. असे माझे आकलन होते.

पण तुमचे परिशीलन वाचल्यावर; जीवन समुद्राच्या लाटेवर स्वार या ओंडक्यांच्या एकत्र राहाण्याच्या वेळेचा आलेखाची, वेगवेगळ्या प्रतलात एकाचवेळी चालणाऱ्या वेगवेगळ्या जीवांच्या या चित्रपटातील कथांची तुम्ही मांडलेल्या संगतीमुळे माझ्या आकलनाला एक नवीन आयाम मिळाला.

आपले बिन्दुरूपी जीवन एक भरीव बिंदू नसून ते देखील एक पोकळ छोट्या परिघाचे वर्तुळ आहे आणि मागील पिढ्यांची बिन्दुरूपी वर्तुळे पुढील पिढ्यांच्या बिन्दुरूपी वर्तुळांना कायम छेदत आहेत. काहींच्या बिंदूचा परीघ त्यांच्या मागच्या आणि पुढच्या बिन्दुन्पेक्षा मोठा असल्याने तो दोन तीन पिढ्यांना आपल्या आवाक्यात घेत आहे. त्यामुळे दोन तीन पिढ्यांना थोडा अधिक काळ शाश्वततेचा आभास होत आहे. पण शेवटी हरमन हेसेच्या सिद्धार्थला वसुदेवाने दिलेल्या दृष्टांतात दिसल्या प्रमाणे सर्व बिंदू आपापले दु:ख उपभोगीत आहेत. कधी कळत तर कधी नकळत. आणि जीवनगंगेच्या तीरी आयुष्यरूपी बनारसच्या मसणात ब्रम्हारूपी महेशाची निर्मितीतून विनाशाची किंवा महेशरूपी ब्रम्ह्याची विनाशातून निर्मितीची लीला कायम चालू आहे.

मसान वेशीबाहेर नाही तर आपण सर्व मसणातच आहोत.

No comments:

Post a Comment