Tuesday, September 3, 2019

इस्लामी हिंदू

तुम्ही ज्याचा द्वेष / तिरस्कार करता तेच तुम्ही बनत जाता हे सिद्ध होताना बघतोय.

इस्लामबद्दल वाचत असताना एक मस्त संकल्पना कळली. 'अल्लाह न्यायी असतो' हे वाक्य इस्लामी धर्मगुरूंना मान्य नसतं. कारण मग अल्लाहपेक्षा न्याय ही संकल्पना अधिक मूलभूत आणि बलवान होते. मग कशाला न्याय म्हणायचं ते ठरवणाऱ्या एका शक्तीचं अस्तित्व मान्य करावं लागतं. परिणामी अल्लाह सर्वशक्तिमान, सर्वश्रेष्ठ न रहाता, त्या अज्ञात शक्तीने ठरवून दिलेल्या न्याय संकल्पनेला अमलात आणणारा साधा अधिकारी ठरतो. हे तर चालणार नाही.

म्हणून मुस्लिम तत्वज्ञानाने दणदणीत उपाय काढला. तत्वज्ञानाने जाहीर केलं की अल्लाह न्याय करत नाही,तर अल्लाह जे करतो तोच न्याय असतो.

अशी मांडणी केल्याने मग अल्लाहपेक्षा सर्वशक्तीमान कुणी असण्याची गरज नाही. न्याय संकल्पनाही रहाते. आणि असं का केलं अल्लाहने? या प्रश्नाचं उत्तर द्यायची जबाबदारी संपते. मग अल्लाह पूर आणो की दुष्काळ, सज्जनांना दुःखात लोटो की दुर्जनांना सुखात ठेवो... सगळं काही अल्लाहचा न्याय ठरतं. आणि अल्लाहला प्रश्न विचारणारे पाखंडी, धर्मद्रोही.

पंतप्रधानांचे आणि त्यांच्या पक्षाचे समर्थक मुस्लिमांचा त्यातही कट्टर मुस्लिमांचा उघड द्वेष करतात. मुस्लिमांना जरब बसवणारा नेता ही पंतप्रधानांची प्रतिमा लोकप्रिय आहे.

पण नेहरू गांधी परिवाराबाबतची पंतप्रधानांची वक्तव्ये, कित्येक मुद्द्यांवर दडपून केलेला सत्यापलाप या सर्व बाबतीत पंतप्रधानसमर्थक ज्या अहमहमिकेने बोललेला प्रत्येक शब्द अचूक आणि पूर्णसत्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात ते बघून मला कट्टर हिंदूंची कट्टर मुसलमान बनण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण होते आहे असं वाटतं.

आता त्यांनी, पंतप्रधान नेहमी सत्य बोलतात याऐवजी पंतप्रधान जे बोलतात तेच सत्य असतं अशी घोषणा केली की पंतप्रधानांची अल्लाह म्हणून प्रतिष्ठापना होईल आणि नवे धर्मगुरू तयार होतील. आणि कट्टर मूर्तीभंजकांना तोंड देण्यासाठी कट्टर मूर्तीपूजक अजून प्रगती करतील. आणि 'तुम्ही ज्याचा द्वेष / तिरस्कार करता त्याच्यासारखेच बनत जाता' हे सत्य पुन्हा सिद्ध होईल. आणि कदाचित तलवारही न वापरता नकळत धर्मांतर करुन घेण्यात मुस्लिम धर्म यशस्वी झाला आहे हे कुणालाही कळणार नाही.

No comments:

Post a Comment