Tuesday, September 3, 2019

इदं न मम

जुन्या काळी बरं होतं. एखादा माणूस प्रसिद्ध झाला की लोक आपले विचारही त्या प्रसिद्ध माणसाच्या नावे इतरांना सांगायचे. परिणामी व्यासांच्या जय नावाच्या काव्याचे महाभारत नावाचे प्रचंड महाकाव्य झाले आणि उष्ट करुन सोडायची सवय नसलेल्या व्यासांवर व्यासोत्छिष्टं जगत् सर्वम् चा आळ आला.

नामा म्हणे, तुका म्हणे, ज्ञाना म्हणे, एका जनार्दनी, दास रामाचा, जनी म्हणे अशी नाममुद्रा उठवत अनेक सदू आणि दादूंनी आपले विचार लोकप्रिय करुन घेतले.

कदाचित जुन्या काळात लोक भलतेच खाष्ट असावेत. की इतका चांगला विचार आपला सदू किंवा दादू कसा काय करेल याबद्दल ते साशंक असावेत. बहुतेक त्या काळी आपलं ते कार्ट दुसऱ्याचा तो बाब्या ही म्हण प्रचलित असावी. त्यामुळे आपले चांगले विचार इतरांच्या नावावर खपवण्याशिवाय त्या काळच्या सदू आणि दादूंना गत्यंतर नव्हते.

पण नंतर म्हणींच्या पुस्तकाच्या कुठल्यातरी आवृत्तीत आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट अशी छापण्यात चूक झाली आणि लोकांचा दृष्टीकोन बदलला. साहित्य मानवी जीवनावर परिणाम करतं ते असं.

हा परिणाम दृश्य स्वरूपात जाणवू लागला तो मात्र या सोशल माध्यमांच्या जमान्यात. आपला माणूस कुठलाही उत्कृष्ट विचार किंवा विनोद करु शकतो याची मित्रांना खात्री असल्याने इथे कुणाची पोस्ट पॉप्युलर झाली तर ती उचलून स्वतःच्या नावावर डकवणे सर्रास चालते. आणि सर्व मित्र वाहवा करतात. मग वाहवा मिळवण्यासाठी दिसतील त्या पोस्ट उष्ट्या करण्याकडे अनेकांचा कल असतो.

माझ्या कित्येक मित्रांच्या पोस्ट दुसऱ्याच्या नावाने माझ्याकडे व्हॉटस अॅपवर येतात. (म्हणजे माझे मित्र त्या ढापून स्वतःच्या नावावर खपवतात असं मी म्हणत नसून मित्रांच्या पोस्ट्स इतरजण ढापतात असं मी म्हणतो आहे)

माझे कित्येक मित्र अशा वाङ्मयचौर्याबद्दल किंवा उष्टावणाच्या सामूहिक कार्यक्रमाबद्दल पोस्ट्स टाकत असतात. त्यांचा त्रागा बघून मला फार वाईट वाटतं. पण सध्या माझे काही लोकप्रिय मित्र स्वतःचं सांत्वन करुन घेताना 'फेसबुकाय स्वाहा.. इदम् न मम' असा मंत्र म्हणतात.

मला हा मंत्र फार आवडला. आता आपणही हा मंत्र म्हणायला हवा असं माझ्या मनाने घेतलं. याबाबतीत माझ्यात आणि सलमान खानमधे फार साम्य आहे. एकबार मैने जो कमिटमेंट कर दि तो मै अपने आप कि भी नही सुनता. म्हणून मी माझ्या पोस्ट्स लोकांनी चोराव्यात आणि स्वतःच्या नावावर खपवाव्यात याच्या मागे लागलो.

सर्व पोस्ट्सचं सेटिंग पब्लिक केलं. पोस्टमधे वैयक्तिक संदर्भ टाळण्यास सुरवात केली. Feel free to share अशी लालूचही दाखवली. पण चोर बधेनात.

आधुनिक सदू आणि दादू भलतेच चोखंदळ झालेले जाणवून मी विषय वैविध्य आणायला सुरुवात केली. मी विनोदी लिहिलं. आर्थिक, सामाजिक, राजकीय विषयांवर लिहिलं. सिनेमावर लिहिलं. गाणी, पुस्तकं, नाटकं काही काही सोडलं नाही. कधीकधी चावटही लिहिलं. पण छे! एकाएकी जगातले सगळे सदू आणि दादू भलतेच सज्जन झाल्यासारखे वागू लागले. बरं मित्र रोज इदं न ममचा मंत्रघोष करत होतेच पण माझ्यासाठी मात्र इदमपि त्वयम् चा अघोषित मंत्रघोष जग करत होतं.

आता मी पेटून उठलो. कुणीच आपली पोस्ट चोरुन स्वतःच्या नावावर खपवत नाही म्हणून मीच माझी पोस्ट चोरुन सोसायटीच्या व्हॉटस अॅप ग्रुपवर दुसऱ्याच्या नावाने टाकली. पण कुणाचीच काही प्रतिक्रिया आली नाही. मग शाळेच्या मित्रांच्या ग्रुपवर टाकली. तिथेही मित्रांनी अजिबात कुतूहल दाखवलं नाही. शेवटी मुलांच्या शाळेच्या ग्रुपवर टाकली. तर त्यावर मुख्याध्यापकांनी मला खडे बोल पाठवले आणि त्याखाली मुलांच्या मित्रांनी खदाखदा हसण्याच्या स्मायली टाकल्या. मग त्यावर मुख्याध्यापक त्या मुलांवर डाफरले. मग मी खदाखदा हसण्याच्या स्मायली टाकल्या. नंतर काय झालं कळत नाही पण मला त्या ग्रुपमधे आता काही पोस्ट करता येत नाही. पण असो.

आपणंच आपल्या पोस्ट चोरुन इतरांना पाठवल्या तर त्या आपल्याला परत कशा मिळणार? त्यासाठी त्या इतरांनी आपल्याला पाठवायला हव्या हा विचार माझ्या मनात आला. आणि मी खट्टू झालो. इदं न मम म्हणण्याचा आनंद या जगात मला मिळणारंच नाही काय? लिहित्या हाताला ही सजाए कालापानी किंवा अंडा सेलची शिक्षा का? असं मी स्वतःलाच विचारु लागलो. पोस्टचा आकार छोटा केला. तरी जग माझा इवलासा आनंद मला द्यायला तयार नव्हतं.

मग एक दिवस मला उपाय सुचला. मी ड्युएल सिमचा फोन घेतला. त्यावर व्हॉटस अॅपचं अजून एक अॅप सुरू केलं. माझी पोस्ट मीच चोरली. मग त्याखाली सदू आणि दादूचं नाव टाकलं आणि मलाच पाठवली.

मग एक स्क्रीन शॉट काढला. आणि फेसबुकवर टाकून म्हणालो 'इदं न मम'.

No comments:

Post a Comment