Tuesday, September 3, 2019

एका महत्वाच्या व्यक्तीचं मनोगत

इस्रोच्या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांचं मनःपूर्वक अभिनंदन करुन थोडी गंमत करतो.

दिवसा उडवणार असं कळलं आणि मला टेंशनच आलं. सूर्ययान असेल आणि दिवसा उडवलं तर ठीक. पण हे तर चंद्रयान मग रात्री उडवायला हवं.

मी लगेच इस्रोला ईमेल केलं. आता माझ्याकडून ईमेल म्हटल्यावर त्यांनी लगेच प्रक्षेपण थांबवलं. तांत्रिक अडचणीची सबब जगाला सांगितली आणि सगळे तंत्रज्ञ लागले विचार करायला. काहींनी आपापल्या लाडक्या बाबांचा धावा केला तर काहींनी बालाजीचा. प्रश्न सुटेपर्यंत बाबांना पाण्यात ठेवावं अशी कल्पना काहींनी सुचवली तर अन्य काहींनी बालाजीला पाण्यात ठेवायची युक्ती सुचवली. बाबांपेक्षा बालाजी आकाराने लहान असल्याने बालाजीलाच पाण्यात ठेवण्यावर एकमत झालं. काही बाबांनी रोखून धरलेला श्वास सोडल्याचं ऐकू आलं असंही काहीजण म्हणाले. बालाजीच्या श्वासाबद्दल काही कळलं नाही.

कुणी सुचवलं की श्रीहरिकोट्याला रात्रीच्या ठिकाणी हलवू पण पृथ्वी फिरत असल्याने आपण श्रीहरिकोट्याला तिथे घेऊन जाईपर्यंत तिथे दिवस उजाडला तर सगळंच मुसळ केरात म्हणून तो विचार बदलला. मग कुणी म्हणालं की श्रीहरिकोट्याला एक मोठं कव्हर घालूया. पण तसं केलं तर कव्हरमुळे चंद्र दिसणार नाही म्हणून ती योजनाही बारगळली. कुणाला काही सुचेना.

इथे मीही विचार करत होतोच. शेवटी रात्रीच्या प्रक्षेपणात अंधाराची अडचण येऊ नये म्हणून श्रीहरीकोट्याच्या यानतळासाठी एल ई डी बल्ब पंतप्रधान प्रकाश योजनेतून मागवायचं ठरु लागलं. त्यामुळे पूर्ण प्रोजेक्टची किंमत वाढणार याची काळजी सर्वांच्या चेहऱ्यावर दाटून आली.

चीफ मला फोनवर म्हणाले सर काहीतरी मार्ग काढा. करदात्यांचा पैसा वाचला पाहिजे.

मग मी गणित केलं. तेच माझं आवडतं गणित. आणि आताही मला 2ab सापडला.

मी म्हणालो काळजी नको. दुपारी उडवा. लाईटची गरज नाही. वर जाईपर्यंत संध्याकाळ होईल आणि पोचेपर्यंत रात्र होईल. बेनिफीट होऊन जाईल.

मग काय दिलं उडवून.

No comments:

Post a Comment