Tuesday, September 3, 2019

मंदी आणि सकारात्मक विचार

1) जगावर आणि भारतावर मंदीचं सावट पडलेलं आहे. असं अनेकजण म्हणत आहेत. त्यावर 'कुठाय मंदी' असं काहीजण म्हणत आहेत. तर काहीजण,'आमचं तर ठीक चाललंय ' असंही म्हणत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मंदीच्या संकल्पनेचा संक्षिप्त आढावा घेऊया.

2) सगळ्यांना कठीण गेलेल्या पेपरमधेही काही मुलांना चांगले मार्क मिळतात. (कारण ते कदाचित खरंच हुशार असतात किंवा त्यांनी केलेल्या अभ्यासावरचेच प्रश्न नेमके परिक्षेला आलेले असतात किंवा त्यांना पेपर आधी मिळालेला असतो किंवा ते परिक्षकाला ओळखत असतात किंवा ते मार्कशीटमधे अनधिकृत फेरफार करून बघणाऱ्याच्या डोळ्यात धूळफेक करतात)

यातील केवळ पहिलं कारण खरं आहे असं गृहीत धरलं तरी काहीजणांना पैकीच्यापैकी मार्क्स मिळाले म्हणजे पेपर सोपा आहे असा निष्कर्ष काढणं चूक आहे.

गेल्या शतकातील ख्यातनाम अर्थतज्ञ जॉन मेनार्ड केन्सने सांगून ठेवलंय की 'जे एका झाडासाठी योग्य ते संपूर्ण जंगलासाठीही योग्य ठरत नाही.' त्यामुळे आपल्या धंद्याला झटका बसला नाही म्हणजे अर्थव्यवस्था तेजीत आहे असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे.

हे मान्य असेल तर पुढचे मुद्दे वाचताना तुमचं मन शांत असेल.

3) इंग्रजीतला शब्द आहे इकॉनॉमिक सायकल. बरेचदा सायकल शब्द वाचला की आपल्या मनात एक वर्तुळ येतं. पण इथे वर्तुळ अपेक्षित नसून वर खाली होणाऱ्या लाटांचं पुनरावर्तन अपेक्षित आहे.

लाटेचा वरचा बिंदू म्हणजे 'बूम किंवा सुबत्ता' तर लाटेचा खालचा बिंदू म्हणजे 'डिप्रेशन किंवा मंदी'.

मंदीतून वर उठणाऱ्या लाटेला म्हणायचं रिकव्हरी तर सुबत्तेकडून खाली घसरणाऱ्या लाटेला म्हणायचं रिसेशन.

4) बरं या लाटा एकाच उंचीच्या नसतात. त्यांची उंची कमीजास्त होऊ शकते. त्यामुळे कधी प्रगती संपणार नाही असा आशावाद तर कधी अधोगती संपणार नाही अशा स्थिती तयार होतात.

5)आणि त्याहून महत्वाचं म्हणजे सगळ्या लाटा एकाच समतल पृष्ठभागावर नसून त्या लाटाही चढणीवर किंवा उतरणीवर समाजाला पुढे नेत असतात. म्हणजे वर खाली हेलकावे घेत अर्थव्यवस्था उंचावर जाऊ शकते किंवा मग वरखाली हेलकावे घेत अर्थव्यवस्था रसातळाला जाऊ शकते.

6) वरखाली हेलकावे घेणारी अर्थव्यवस्था यशोशिखराकडे चालली आहे की रसातळाला, हे कसं कळणार? तर एक सोपा संकेत आहे. सलग दोन तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग जर मागच्या तिमाहीपेक्षा कमी होत चालला असेल तर समजून जावे आपण रसातळाला जाण्यासाठी वळलो आहोत. रिसेशन सुरू झालं असं मानून सरकारने हातपाय हलवावेत. नाहीतर बैल गेला आणि झोपा केला अशी गत व्हायची.

थोडक्यात सांगायचं तर पावसाची एखादी सर आली म्हणजे लगेच घाबरून जाऊ नये पण लागोपाठ दोन दिवस पाऊस आला तर तिसऱ्या दिवशी घराबाहेर पडताना रेनकोट छत्री घ्यायला विसरू नये.

7) आता यावर कुणी म्हणेल की दोन दिवस पाऊस आला म्हणून तिसर्‍यांदा येईलंच याची काय खात्री?

अगदी खरं आहे. पण काळजी घेतली की दुर्घटना टळते. रिसेशनमधून बाहेर पडणं डिप्रेशनमधून बाहेर पडण्यापेक्षा तुलनात्मकदृष्ट्या कमी कष्टप्रद आहे.

दोन तिमाहीत झालेली घट म्हणजे रिसेशन. आता अर्थव्यवस्था पुढे घसरणार की सावरणार ते बाह्य घटकांवर अवलंबून असतं. या बाह्य घटकांवर प्रभाव पाडणं हे एकेकट्या व्यक्तीचं काम नाही. एकेक कंपनी किंवा एकेक इंडस्ट्रीही तसं करु शकत नाही. मोकाट सुटलेल्या बाह्य घटकांना वेसण घालणं केवळ सरकारला शक्य असतं. जर सरकारने योग्य निर्णय घेतले तर दोन तिमाहीतील घसरण अर्थव्यवस्थेसाठी कातरवेळ न ठरता सुर्योदयापूर्वीची पहाट होऊ शकते.

योग्य निर्णय घेणं, ते कौशल्याने राबवणं ही दोन्ही कामं सरकारला करावी लागतात आणि त्यासाठी सरकारने Economics चे नियम सर्वशक्तिमान आहेत हे मान्य करणं आवश्यक असतं.

सर्वसामान्य नागरिकांनी सकारात्मक रहावे हे खरं असलं तरी सरकार अर्थव्यवस्थेला प्राधान्यक्रमात मागे टाकत असताना सर्वसामान्य माणसांनी सकारात्मक राहून रिसेशनचं संकट टळेल असं म्हणणं म्हणजे सर्जन नीरसपणे काम करत असताना अॉपरेशन टेबलवर भूल घेऊन पडलेल्या रुग्णाने सकारात्मक विचार केला की अॉपरेशन यशस्वी होईल असं मानण्यासारखं आहे.

इथे सरकारची जबाबदारी जास्त आहे. कारण सरकारकडे एकाच वेळी अनेक बाह्यघटकांना प्रभावित करण्याची शक्ती असते.

सरकारचे समर्थक किंवा विरोधक काहीही म्हणोत Economics चे नियम त्याप्रमाणे बदलणार नाहीत. सध्या जे आहे ती रिसेशनची सुरवात आहे असंच Economics सांगतंय. या विद्याशाखेला मूर्खात काढणाऱ्यांसाठी भारतीय अर्थशास्त्राच्या आद्यगुरुचा एक व्हिडिओ खाली देतो. 



या वेळची गोष्ट २००८ पेक्षा वेगळी आहे. थोडी जास्त कठीणही आहे. ती व्यवस्थितपणे हाताळून काळरात्र न होऊ देता उषःकाल घडवून आणण्यासाठी या सरकारला माझ्या शुभेच्छा.

No comments:

Post a Comment