Tuesday, September 3, 2019

महानगरपालिकेत उंदीर मारण्याच्या विभागात काम न मिळालेला माणूस

आजकाल तुम्ही राजकारणावर फार लिहू लागले आहात.
आजकाल तुम्ही थेट नावं घेऊन लिहू लागले आहात.
आजकाल तुम्ही तटस्थ वाटत नाही.
आजकाल तुम्ही भूमिका घेऊ लागले आहात. .

या किंवा अशा प्रकारच्या कमेंट्स माझ्या पोस्टवर वाचून मला हसायला येतं.

मी अगदीच काही महानगरपालिकेत उंदीर मारायच्या कामावर नसलो तरी मला माझ्या मर्यादित आकलनाची आणि त्यामुळे येणाऱ्या मर्यादांची जाणीव आहे. त्यामुळे न मो, अ शा, रा गां, रा ठा, उ ठा, श प किंवा अन्य नेत्यांनी काय करावं ते सांगण्याचा माझा अधिकार किती मर्यादित आहे हे मला पक्कं ठाऊक आहे.

गेली वीस वर्षे स्वतःचा व्यवसाय करत असल्याने, सत्ता मिळवणे, टिकवणे, राबवणे यासाठी केवळ स्वप्नाळू असून चालत नाही याची मला जाणीव आहे.

त्यामुळे माझ्या ज्या पोस्ट्स राजकारणाशी संबंधित आहेत असं माझ्या मित्रांना वाटतं त्यात मी नेत्यांनी काय बरोबर किंवा चूक केलं याबद्दल कधी बोलत नाही. नेता दिवंगत असेल तर त्याचं कार्य सांत असल्याने मूल्यमापन करता येईल पण नेता सक्रिय असेल तर भविष्यात त्याची क्षमता आणि तिचा वापर कसा बदलेल हे सांगणं कठीण असल्याने मी सक्रिय नेत्यांवर बोलणं शक्यतोवर टाळतो.

नेत्यांचं विश्व माझ्या आकलनापेक्षा विस्तारित असलं तरी नेत्यांचे अनुयायी माझ्यासारखे असतात. घर, नोकरी, व्यवसाय, मुलं वगैरेंच्या चिंता असणारे. धडपडे पण कित्येकदा हतबलता अनुभवणारे.

त्यामुळे जेव्हा मी माझ्या मित्रांना राजकारणाच्या धुळवडीत गुदमरताना आणि हे गुदमरणं म्हणजेच खरा आनंद असं समजून अधिक त्वेषाने धुळवड खेळताना बघतो तेव्हा मला मित्रांच्या पोस्टवरुन पोस्ट सुचतात. माझ्या पोस्ट्स नेत्यांनी कसं वागावं हे सांगणाऱ्या नसून माझे मित्र असे का वागतात त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करणाऱ्या असतात.

माझी राजकीय भूमिका मला माहिती असते. पण ती इतरांना सांगून इतरांना प्रभावित करण्यात मला रस नसतो. मी गमतीने स्वतःलाच सांगतो की मी खरा हिंदू असल्याने कुणाचे परिवर्तन करण्यात मला रस नसतो. आणि माझी राजकीय भूमिका स्थिर नसून प्रवाही असते. मग कुठल्याही नेत्याची बाजू घेऊन मी स्थिर राहू शकत नाही. मी फारतर कसा विचार करतो ते मित्रांना सांगू शकतो.

पक्षनिष्ठा हा शब्द कार्यकर्त्यांसाठी ठीक आहे. सामान्य नागरिकाने पक्षनिष्ठा दाखवणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेणे असं माझं स्पष्ट मत आहे. पारंपरिक मतदार हा देखील एक चुकीचा पायंडा आहे. घराणेशाही नको असेल तर मतदारांनी पारंपरिक मतदार बनणंं बंद केलं पाहिजे. इथे आपला पारंपरिक मतदार आहे हे कळलं की राजकीय पक्ष त्यांच्या कर्तव्यात ढिले पडतात.

आमचं जीवन सुखकर करण्यासाठी जो सध्या योग्य वाटेल तो आमचा तत्कालीन नेता इतकं साधं गृहितक लोकांनी ठेवलं की सगळे राजकीय पक्ष सुतासारखे सरळ येतील असं मला वाटतं.

मी महानगरपालिकेत उंदीर मारण्याच्या विभागात कामाला नसल्याने मी इतकाच विचार करु शकतो. आणि तो मांडणे म्हणजे तटस्थ रहाणे किंवा भूमिका घेणे वगैरे काही आहे असं मला वाटतं.

No comments:

Post a Comment