Tuesday, September 3, 2019

काशीला जायची गोष्ट

बंगळूरुत आहे. मेहुणीच्या लग्नाला आलोय. रम्य सकाळ आहे. हवेत सुखदपेक्षा किंचित जास्त गारवा आहे.

विधी सुरू झाले आहेत. नवरा मुलगा कमरेला वेष्टी आणि अंगावर उपरणं आणि डोक्यावर कानडी पगडी या वेषात काशीला निघालाय. मुलीकडचे आम्ही सगळे त्याची विनवणी करतोय की 'बाबारे ! नको जाऊस. आमची सालंकृत लेक तुला देतो. तुझ्या आयुष्यात ती छान रंग भरेल'

तो नाही म्हणतोय. शेवटी छान सजलेली वधू पुढे आली. तिला पहाताच नवरदेवाचं मन पाघळलं. त्याने काशीचा विचार रद्द केला. आता दोघं मोकळ्या अंगणात फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यावर झोके घेत आहेत. सगळे आनंदले आहेत. मला एकंच वाटतंय की, नवरा उघडा आहे. थंडी बोचरी आहे. फार जोरात झोके देऊ नका रे. नाही झालं सहन तर पुन्हा विचार बदलेल आणि जाईल काशीला.

इतक्यात माझ्या नजरेला माझी हसतमुख अर्धांगिनी आणि तिचे वडील दिसले. आणि लग्नानंतर आता एकोणीस वीस वर्षांनी जर मी काशीला जाण्याचा हट्ट धरला तर अगदी चटकन परवानगी देतील की काय या विचारामुळे मला या भर थंडीत घाम फुटला आहे.

No comments:

Post a Comment