Tuesday, September 3, 2019

कलम ३७०

जाहिरनाम्यात सांगितलेला एक मुद्दा पूर्ण केल्याबद्दल सरकारचं अभिनंदन.

लहानपणी मला प्रश्न पडायचा की नारदमुनी भेटायच्या आधी जर वाल्या कोळ्याच्या बायकोने त्याला प्रश्न विचारला असता की, 'बाबारे, तू हे जे काही रोज पैसे घरी आणतो आहेस, त्यासाठी तू नक्की कुठलं काम करतो आहेस?'

त्यावर 'मी वाटमारी करतो आहे' असं खरं उत्तर वाल्याने दिलं असतं तर बायकोची प्रतिक्रिया काय झाली असती?

तिने त्याच्या व्यवसायाला संमती दिली असती? की 'मी हवं तर भाकरतुकडा खाईन पण तुमची पापाची पक्वान्नं नकोत मला' असं वाल्याला सांगितलं असतं?

जर तिने स्वतःहून वाल्याला पापाचरण करण्यापासून परावृत्त केलं असतं तर वाल्याने तिला जुमानलं असतं की तिला टाकून देऊन त्याच्या व्यवसायात आनंद मानणारी किंवा 'गुठलिया गिने बिना आम खाणारी' नवीन बायको शोधली असती?

किंवा मग जर दशरथासारख्या वाल्यालापण दोन तीन बायका असत्या. उत्तानपादाच्या बायकांप्रमाणे त्यांची नावं सुरुची व सुनीती असती. त्यातल्या सुनीतीने वाल्याला वाटमारीपासून परावृत्त करायचा प्रयत्न केल्यावर, सुरुचीने वाल्याची पाठराखण केली असती तर वाल्याने कुणाचं ऐकलं असतं? नेहमीप्रमाणे सुनीती नावडती आणि सुरुची आवडती ठरली असती? की वाल्याला सुनीतीचं ऐकावंसं वाटलं असतं?

आणि जर वाल्याने सुनीतीचं ऐकायचं ठरवलं असतं तर सुरुची आणि तिच्या माहेरच्यांनी वाल्याला षंढ ठरवून त्याची निर्भत्सना केली असती की सुनीतीचे पाय धरले असते?

२००८ मधे जेव्हा सत्यमचा घोटाळा उघडकीस आला तेव्हा प्रश्न पडला की खरंच इतका मोठा घोटाळा एकट्या रामलिंग राजूने कुणालाही काहीही कळू न देता केला असेल का? नियम तुटत आहेत हे कुणालाच दिसलं नसेल का? कुणीच त्याला आक्षेप घेतला नसेल का? ज्यांनी आक्षेप घेतला असेल त्यांना नेभळट ठरवून बाजूला काढलं असेल का?

कंपनी कायद्यातील Oppression and Mismanagement च्या संकल्पना शिकवताना मुलं विचारतात की या कलमांची गरज काय? कुठलाही एक गट कंपनीतील अल्पभागधारकांची गळचेपी का करेल? तेव्हा मी नेहमी सांगतो की 'Spiderman also needs to be told that with great powers come great responsibilities'.

सत्ताधाऱ्यांनी नियम पाळावेत ही अपेक्षा करणारे कायम मूर्खात काढले जातील का? 'जरा सबुरीने घेतलं तर चालेल' हा सल्ला, शिर्डीवाले साईबाबांचे अगणित भक्त असणाऱ्या देशात मूर्खपणाचा ठरेल का? सुनीतीचा आग्रह धरणारे नेभळट आणि देशद्रोही ठरतील का? यातल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं सार्वकालिक आहेत हेच काल जाणवलं.

सुनीती मिथ आहे. सुरुची सत्य आहे. We all love people who are riding tiger. Not just that we love people who will help us ride a tiger although no one knows how to get off the same.

भांडवलशाही असो वा साम्यवाद, हुकूमशाही असो वा लोकशाही, आस्तिकांचा असो वा नास्तिकांचा समूह, धार्मिकांचा असो वा निधर्मींचा समूह; सुनीतीची जागा फक्त देव्हाऱ्यात बसण्याची. लाडाने मांडीवर बसणार फक्त सुरुची आणि तिची लेकरं.

No comments:

Post a Comment